Saturday, 15 January 2022

कोरोना शाळा बंद करू शकतो? शिक्षण नव्हे!

कोरोना शाळा बंद करू शकतो? शिक्षण नव्हे! 

जगातील भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक देशात विविधता आढळते. तसेच शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण, व्यवसाय, तंत्रज्ञान, आरोग्य, शेती, नोकरी, उद्योगधंदे आदी गोष्टींमध्ये वेगळेपण दिसून येते. परंतु गेल्या दोन वर्षापासून जगातील अर्ध्यापेक्षा जास्त देशांमध्ये एक गोष्ट सारखी आढळून आली. ती म्हणजे कोरोना महामारी सारखी भयंकर आपत्ती. प्रगतीच्या चढाओढी मध्ये अनेक देश कोरोनाच्या संकटात अडकून पडली. यामुळे प्रगतीला चांगलाच अडसर निर्माण झाला. कोरोना दरवर्षी नव्या लक्षणासह एकामागून एक लाट घेऊन येत आहे. कोरोनाच्या आतापर्यंत दोन लाटा मोठ्या भयंकर रुद्र संकट घेऊन आल्या. त्यात मानवासह अनेक गोष्टींचे नुकसान झाले. त्यात प्रामुख्याने जिवितहानी, आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक, सामाजिक व शैक्षणिक अशा प्रकारच्या हानी देशात झाल्या आहे. या दोन्ही लाटांना देशाने समर्थपणे तोंड देऊन कोरोनाला रोखण्यात यश मिळवले. परंतु कोरोनाला पुर्णपणे घालवण्यात अपयश आले. आणि म्हणून पुन्हा नवीन रूप घेऊन कोरोनाची तिसरी लाट जगाबरोबर भारतात सुद्धा येऊन ठेपली. पुन्हा हळूहळू या तिसऱ्या लाटेचा प्रभाव सगळीकडे दिसू लागला. आतापर्यंत या तिन्ही लाटेत सर्वाधिक न दिसणारे असे मोठे नुकसान झाले ते म्हणजे शिक्षणाचे. देशाच्या प्रगतीत सर्वाधिक मोलाचा वाटा असणारा घटक म्हणजे शिक्षण. याच शिक्षणावर गेली दोन वर्षे सर्वाधिक दुष्परिणाम झाला. शिक्षणाची प्रक्रिया कोलमडून पडली. कोरोनाच्या भीतीने संसर्ग रोखण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून लॉकडाऊचा जन्म झाला. हा पर्याय सर्वात अगोदर शाळेंना लागू करण्यात आला. कारण येणारी पिढी, घडणारा तरुण वर्ग याच शाळा, कॉलेज, महाविद्यालया मध्ये शिकत आहे. मनुष्य जन्मा मध्ये सर्वाधिक महत्त्व जगण्याला दिले जाते. मनुष्य जगला तरच देश टिकेल. आणि म्हणून सहाजिकच आतापर्यंत दोन्ही लाटेत सर्वाधिक काळ कोरोनाच्या भीतीने शाळा, कॉलेज, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. याचा दुष्परिणाम मुलांच्या शिक्षण पद्धतीवर, जडणघडणीवर, शैक्षणिक संस्कारावर झाला. मुले स्वभावाने रागीट, आक्रमक, एकेखोर, बंड होत गेली. अभ्यास सोडून इतर गोष्टीकडे आकर्षित झाली. मोबाईल, टीव्ही, कार्टून, मोबाईल वरील गेम्स, खेड्यापाड्यात घराबाहेरील सायकल, गोट्या, टायर आदी खेळ, भांडण, व्यसन, गुन्हेगारी अशा गोष्टींकडे मुलं, तरुणवर्ग खेचला गेला. समाज, पालक, शिक्षणतज्ञ यांना पुन्हा एकदा शाळा, शिक्षक, शिक्षण या गोष्टींचे महत्त्व व गरज पटली. प्रत्येकाच्या जीवनात शाळा, शिक्षक, आणि शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे कोरोना व लॉकडाऊन मुळे दिसून आले. कोरोनाची दुसरी लाट देशातुन ओसरली तसे हळूहळू सरकारने महाविद्यालये, कॉलेज, शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. पुन्हा एकदा राज्यभर शाळा सुरू झाल्या. शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचायला सुरुवात झाली. घराबाहेर दंगामस्ती करणारी मुलं शाळेत शिक्षण घेऊ लागली. ज्ञान व शिस्त यांची सांगड घालून पुन्हा एकदा गुरु शिष्याचा ज्ञानदानाचा यज्ञ सुरू झाला. सर्व सुरळीत सुरु असताना ओमिक्रॉन नावाच्या कोरोना रूपाने तोंड वर काढले. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव हळूहळू वाढत गेला. तिसऱ्या लाटेच्या भीतीने सरकारने शाळा बंद केल्या. कोरोनाच्या भीतीने राज्य सरकारने नियमावली जाहीर केली. यामध्ये अर्ध्या क्षमतेने अनेक गोष्टी बंद केल्या. शाळा, कॉलेज, महाविद्यालये मात्र पूर्ण क्षमतेने बंद केली. यात राज्य शासनाचा हेतू हा लहान मुलं, तरुण, युवक यांना या कोरोनाच्या धोक्यापासून दूर ठेवणे हा होता. परंतु पालक, समाज यामधून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. शाळा बंदला विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाज यांनी तीव्र विरोध दर्शवला. कारण शिक्षणाची प्रक्रिया बंद पडता कामा नये हा प्रामाणिक हेतू या सर्वांचा यामागे होता. परंतु राज्य शासन शाळा बंद वर ठाम आहे. कोरोना शाळा बंद करू शकतो? शिक्षण नव्हे! हे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांनी समजून घेतले पाहिजे. शाळा जरी बंद झाल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण हे कालही सुरू होते आजही सुरू आहे व उद्याही सुरू राहील. फक्त शिक्षण प्रक्रियेतील बदल परिस्थितीनुसार व वेळेनुसार स्वीकारणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालये बंद झाली म्हणून शिक्षण बंद होत नाही. शिक्षण हे ऑनलाईन, स्वयंअध्ययन, स्वाध्याय अशा पद्धतीनुसार घेत राहणे महत्त्वाचे आहे. संकटाला प्राप्त परिस्थितीनुसार सामोरे जाणे हा माणसाचा स्वाभाविक गुण आहे. कोरोना, सरकार, लॉकडाऊन या सर्वांच्या भूमिकेतून जाताना विद्यार्थी आणि पालकांनी स्वयम शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आजच्या परिस्थिती नुसार मुलांना शिक्षण कसे व कुठून मिळेल याला अधिक महत्त्व आहे. प्रत्येक बालक शिकले पाहिजे यासाठी शिक्षण हक्क कायदा 2009 करण्यात आला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण देणे गरजेचे आहे तसेच शिक्षण घेणे सुद्धा बंधनकारक आहे. शिक्षण ही सामाजिक गरज आहे त्यापेक्षा अधिक ती स्वतःची गरज आहे. हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. शिक्षण ही स्वतःची गरज म्हणून आपण स्वीकारले तर अनेक आव्हानांचे व समस्यांचे ते उत्तर ठरेल. कोरोना ने शाळा बंद केल्या परंतु शिक्षण सुरू आहे. हे पालकांनी मुलांना समजावून सांगावे. "सारे शिकूया पुढे जाऊया" हा निर्धारच शिक्षण प्रक्रियेला व सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे.

राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु. पो. किनगाव राजा
ता. सिंदखेड राजा
जि. बुलडाणा
मो. न. 9823425852

Thursday, 13 January 2022

विचारांची श्रीमंती

 




*विचारांची श्रीमंती*

जीवनातील विचारांची श्रीमंती वाढवण्यासाठी विचारांची श्रीमंती (ललीत लेख) हे पुस्तक अवश्य वाचा.

पुस्तकाची मुळ किंमत 120 रुपये

(पुस्तकावर 33% सुट) 

पुस्तक विक्री किंमत 80 रुपये

पोस्ट खर्च 50 रुपये

पुस्तक हवे असल्यास 130 रुपये फोन पे/गुगल पे करा.

पुर्ण पत्ता, पिन कोड, मोबाईल नंबर वाट्सअप करा.

पुस्तक बाय पोस्ट पाठवतो.

फोन पे 9823425852

गुगल पे 9823425852

🙏🙏

संपर्क:- राजेंद्र शेळके 9823425852

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...