Monday, 17 August 2020

पोळा (लघुकथा)

                 " पोळा " ( लघुकथा ) 

बाबा.....! ओ......! बाबा....! आपल्याला नवीन बैल कधी घ्यायचा. घेऊ रे बाळा ....! आपल्याकडे पैसे आले की नक्की बैल घेऊ आपण, सखाराम हळू आवाजात मुलाशी बोलला. मलापण बैल घ्यावे वाटतात. पण पैशाचा मेळ बसत नाही. सखाराम निराश होऊन मंग्याशी बोलत होता. मंग्याला काय माहीत बैल घेण्यासाठी फक्त इच्छा असून चालत नाही तर त्यासाठी नगदी पैसेही लागतात. पण यावर्षी पेरणीच्या आधी काहीही झाले तरी बैल घ्यायचेच ! असे सखारामने मनोमन ठरवले. बैल असले की, शेतीची मशागत चांगली होते. पीक पाणी चांगले येते त्याचबरोबर शेणखतही जमिनीला मिळते. असा विचार सखाराम मनाशीच करत बसला होता. उन्हाळ्याचे दिवस सुरू होते लग्नसराई धुमधडाक्यात सुरू होती. पाहुण्या राहुण्यांच्या घरी लग्नासाठी येणे जाणे सुरूच होते. सखाराम असाच एक दिवस सकाळीच एका पाहुण्यांच्या घरी पाहूनकीसाठी निघाला. सखारामच्या पत्नीने हळूच आवाज दिला. अहो....! ऐकले का? मी काय म्हणते....! पाहुण्याकडे चाललाच आहे तर, त्यांच्याकडे काढा बैलाचा विषय. किती दिवसापासून बैल घ्यायचे म्हणताय ना ! पाहुण्याकडे बघा विषय काढून. त्यांच्या गावातील कुणाकडे बैलजोडी विक्री असेल तर पाहुणे दाखवतील कि तुम्हाला ! सखाराम चिडून म्हणाला अ....! पाहुण्याकडे बैलाचा विषय काढायला येथे कुठे? नगदी पैसे आहे माझ्याजवळ….! पाहुण्यांच्या कडे कशाला बैलाचा विषय. त्यांनी बैल दाखवले व पसंत पडले तर बोला म्हणतील लगेच किंमतीचे….! मंग काय पैशाची दैना दाखवु तिथे….! पार्वती हळूच म्हणाली,  ‘‘ माझ्यावर काय चिडताय, माझ्यावर चिडून काय बैल फुकट मिळणार आहे. ’’ बैल कुठूनही घेतले तरी पैसे लागतीलच. पैसे ही महत्त्वाचे आहे व बैल सुद्धा. घेऊनच टाकू यावर्षी....! पैशाचे काय? जाईल फिटून कसेबी माला टालावर. तुम्ही फक्त बैल पाहून घ्या. तुमच्या पसंत असेल तर, पुढचे पुढे बघू. सखारामने मुकाट्याने ऐकून घेतले व मान हलवून म्हणाला, बघतो तसे पाहुण्यांना म्हणून, बैलाचे....! बरं....! मी येतो आता….! पोरांवर लक्ष ठेव. त्यांना जास्त वेळ एकटे कुठे जाऊ देऊ नको. घरीच खेळा म्हणा….! ऊन जास्त आहे उन्हाचा चटका लागला तर परत बिमार पडतील. असे बोलून सखाराम पाहूनकीसाठी घरून निघाला. मनात मात्र बैलाचा विषय पक्का करून टाकला.
                     दुपारची वेळ होती पाहूनकीच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून नवीन नवीन पाहुणे येतच होते. बैठकीत पाहुण्यांची गर्दी जमू लागली. हळूहळू नवरदेवा कडील पाहुणे आले मानपान झाला. लग्नाची बोलणी झाली. जेवण आटपलं, लग्नाची तारीख ठरली. कार्यक्रम आटोपला पाहुणेमंडळी शिदोरी घेऊन निघाली. जवळजवळ सांजवेळ झाली सर्व पाहुणे निघून गेली. सखाराम पाहुण्यांना म्हणतो, येतो मी आता….! पाहुणे हळूच म्हणतात, ‘‘ अहो दाजी एवढ्या उशिरा कशाला जाता. ’’ परत आमची बहीण म्हणेल पाहुण्याची लय अडचण झालती का? आलेच  आहे तर थांबा आता आजच्या दिवस. गप्पाटप्पा होईल, आराम होईल सकाळी जा उठून. तसही बैलाचा विषय राहिलाच की आपला बोलायचा. संध्याकाळी बोलता येईल….! थांबूच आजच्या दिवस असे मनाशीच सखाराम पुटपुटला. हो....! हो....! तसा उशीरच झाला. गाड्याही लागतील याचा भरोसा नाही. थांबतो रात्रभर सकाळीच जाईल उठून गावाकडं....! असं म्हणून सखाराम व पाहूणे पुन्हा एकदा घरात बैठकीत येऊन बसतात. पाहुणे सखारामला पीक-पाणी, लेकरां बाळाची खुशाली विचारतात. नवीन काय चाललं दाजी....! काही नाही बस घर शेत....! आणि शेत घर....! दुसरं काय असणार आपल्या नशिबी. पीक पाणी कसे झाले यावर्षी दाजी. बरे झाले जेम….! तेम….! सखाराम हळू स्वरात म्हणाला. माझ्याकडे बैल नाही दुसरे जनावर नाही. आता काय शेतात काम धंदा नाही. चालू आहे लग्न खाणं आरामशीर.
               बरं....! किसनराव मी काय म्हणतो. कुणाकडे चांगली बैल जोडी आहे का विक्री? ‘‘ कुणाला घ्यायची दाजी बैलजोडी ’’ किसनराव विचारतात. मीच घ्यायची म्हणतोय ! दरवर्षी पेरणीच्या अगोदर बैलजोडी नसल्यामुळे मशागतीची लय फजिती होते. पेरणीला पण लय उशीर होतो. जो तो आपली पेरणी आटोपल्यानंतर बैलजोडी देतो. ते पण खरं आहे दाजी….! पण बैलजोडी नाही म्हटल्यावर काही विलाज चालत नाही. आमच्या शेजाऱ्यांची बैलजोडी विक्री आहे. लय माणसं बघून गेली. बैलजोडी तगडी आहे त्यामुळे अजून काही विकली नाही. तुम्ही घ्या दाजी सकाळी बैलजोडी बघून ! तुम्हाला पसंत पडली तर भावाचे बघू पुढच्या पुढे? काय करायचं ते….! किसन तळमळीने बोलत होता. सखाराम म्हणाला, ‘‘ बरं…!  बरं…! बघू की सकाळी ’’ आपल्याला झेपली तर घेऊ नाहीतर देऊ सोडून. गप्पा मारत मारत दोघेही झोपी गेले. सकाळ झाली सखाराम झोपेतून उठला. चहापाणी, अंघोळ आटपली किसन व सखाराम न्याहारीसाठी बसले. दाजी मी दिला निरोप शेजार्‍यांना बैलाच्या बाबतीत थोड्यावेळाने जाऊ बघायला. गप्पा मारत मारत पोटभर न्याहारी करून सखाराम व किसन बैलजोडी पाहण्यासाठी शेजारच्या शेतात निघून जातात. उंचपुरी, लालसर रंगाची, टोकदार शिंगांची, अगदी लुसलुशीत अशी बैल जोडी होती. बैलाच्या मालकाने पाठीवरून हात मारून दाखविला. बैल आतिशय चांगले आहेत. मारत नाही, कामाला, चरायला लय चांगली आहे. दातात पण पुर्ण भरली आहे. किसनरावच्या नेहमीच पाहण्यातील आहे आमची बैल जोडी….! लय लोकांच्या पसंत पडली. पण भावाकडून नाही जुळला सवदा. खरं सांगु का, पाहुणे….! मला बैलजोडी विकायची इच्छा नाही पण पोरीचं लग्न ठरलंय….! त्यामुळे चार पैसे हातात शिल्लक असलेले बरे….! म्हणुन काढली बैलजोडी विक्रीला. बगा तुमच्या पसंत पडली असेल तर किसनरावच्या मध्यस्तीने देऊ हिशोबा हिशोबाने लावून. बैलजोडी सखारामच्या पसंतीला पडली होती. त्यामुळे सखारामने किंमत विचारून घेतली व कळवतो निरोप म्हणून सखाराम व किसन घरी वापस निघून आले. पाहुण्यांचा निरोप घेऊन सखाराम दुपारी आपल्या गावी परतला.
             पार्वती सकाळपासून वाटच पाहत होती. सखाराम घरी येताच लेकरांनी एकच गोंधळ केला. बाबा आले...! बाबा आले....! जसा काही सखाराम खूप दिवसापासून गावी गेला होता. शेवटी बाप आल्याची खुशी लेकरांनी त्यांच्या गोंधळातून प्रगट केलीच. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर हळूच पार्वतीने बैलाचा विषय काढला. सखारामने सर्व हकिगत सांगितली. नगदी पैसे असेल तर पंचवीस हजारापर्यंत बैलजोडी मिळते. बैल एकदम खास आहेत पंचवीस हजाराला घ्यायला पुरतात. पण माझ्याकडे जेमतेम दहा हजार रुपयेच आहेत नगदी. बाकीचे पंधरा हजार रुपये आणायचे कुठून ? असा प्रश्न उपस्थित करून सखारामने पार्वतीला सुद्धा विचारात पाडले. थोडा वेळ दोघेही पैशाच्या विचारात शांत बसले. अंगणात खेळणाऱ्या लेकरांचा स्पष्ट आवाज येत होता. मध्येच पार्वती म्हणाली, मी काय म्हणते तुम्हाला? बैल जोडी आवडली ना....! मग या घेऊन. मी माझा दागिना देते तुमच्या जवळ तो सोनाराकडे घेऊन जा व मोडीत किती पैसे येतात बघा. बैलजोडी महत्त्वाची आहे. गळ्यातील दागिना काय? कधी नवा करता येईल. पार्वतीच्या बोलण्याने सखाराम भारावून गेला. अग पार्वती....! तुझ्या गळ्यात काही चार-पाच दागिने नाहीत मोडायला.....! एकुंती एक मंगळसूत्राची पोत हाय....! ती कशी काय मोडते. ते तर बाईच्या जातीचा महत्त्वाचा दागिना असतो. नको....! नको....! तो पर्याय नकोच. बघू दुसरी काही व्यवस्था होती का पैशाची. सखाराम उठून बाहेर गेला. दोन दिवस प्रयत्न करूनही पैशाचा मेळ बसत नाही. म्हणून शेवटी सखारामने बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र नेऊन सोनाराकडे मोडीत विकले. त्याचे नगदी अठरा हजार रुपये सखारामच्या हातात आले. दागिन्याचे पैसे व स्वतः जवळचे पैसे घेऊन सखाराम किसनरावच्या गावी गेला. त्यांच्या मदतीने नगदी पैशाने बैलजोडी विकत घेऊन आला. सखाराम बैलांना घेऊन दारात येताच लेकरं उड्याच मारू लागली. लेकरांना खूप आनंद झाला. पार्वती ओवाळण्यासाठी ताट घेऊन बाहेर आली. बैलाच्या पायावर पाणी टाकून बैलांना ओवाळले. भाकरीचा कुटका बैलांच्या वरुन ओवाळून फेकला. मालकीण बाई काय नाव ठेवायचे यांचे आता....! तुम्हीच सांगा. सखाराम हसतच पार्वतीला म्हणाला. हरणा सारखी सुंदर जोडी आहे म्हणून याचे नाव ‘हरण्या’ व याचा सोबती म्हणून याचे नाव ‘सुदाम्या’ ठेऊया. घरात नवीन पाहुणे आल्यासारखे बैलजोडीने घरातील वातावरण आनंदी झाले होते. पार्वतीच्या समजुतदार पणामुळे आज सोन्याचे शिंग दारात आले होते. याचा आनंद सखारामला मनोमन झाला होता. घरचीच बैलजोडी असल्यामुळे शेतीच्या कामाला सुरुवात झाली. दर वर्षीपेक्षा या वर्षी लवकर पाऊस पडला. त्यामुळे पेरणीही लवकर आटोपली. शेतातील माल चांगला उगवला होता काही दिवसांनी खुरपणी, कोळपणी झाली. आता रान हिरवंगार दिसू लागलं होतं. श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती. काही दिवसावर पोळा हा सण येऊन ठेपला होता. यावर्षी सुदाम्या व हरण्यामुळे पोळा या सणाला विशेष महत्व आले होते. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा सण पोळाच असतो. त्यामुळे सखाराम व पार्वती सुद्धा खूप आनंदी होती. बैलजोडीसाठी यावर्षी नवा साज घ्यावा लागणार म्हणून, पार्वती काही दिवस दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ लागली. दोन पैसे नगदी मिळाले तर बैलासाठी चांगला नवा साज घेता येईल. श्रावण महिन्यातील दिवस भुरकून निघून गेले. पोळा सहा दिवसांवर आला होता. सखारामने शेजारच्या गावावरून आठवडी बाजारातून सुदाम्या व हरण्यासाठी नवा कासरा, वेसण, कवड्या व घुंगरांच्या माळा, बाशिंग, झुल, हिंगूळ, बेगड असा नवा साज आणला. पोटच्या लेकरा सारखीच हेही दोन लेकरं समजून सखाराम बैलांना खूप जीव लावत होता. सकाळपासून बैलांचा साज घेण्यासाठी बाजारात बाबाच्या मागे मागे फिरणारा मंग्या मात्र खूप थकला होता. जेवून तो आज लगेच झोपी गेला.
        सकाळ झाली दिवस उगवला. पार्वतीने हळूच मंग्याला आवाज दिला. मंग्या….! ये ! मंग्या....! उठ आज पोळ्याचा दिवस आहे ना ! तुला बैल धुवायला जायचे नाही का? तुझ्या बाबासोबत. पार्वतीने आवाज देताच मंग्या पटकन उठला. गडबडीने तोंड धुवुन त्याच्या बाबासंग नदीवर गेला. बैलांच्या अंगावर पाणी उडवून उडवून बैलांना अंघोळ घातली. सुदाम्या व हरण्या खूप गरीब होते. लेकरा पासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही सहज जवळ येऊ देत असत. त्यामुळे मंग्या बैलांना खूप सांभाळत असे. दिवसभर कासरा हातात घेऊन मंग्याने बैलांना गवत चारले. खांदमळन, पोळा, शिळा पोळा असे तीन दिवस त्यांचा सण म्हणून बैलांना फक्त चारा गवत खाणे व आराम करणे एवढेच काम असते. बर का.....मंग्या ! लक्षात ठेव. या तीन दिवसात बैलांना शेतीच्या कामाला जुपायचे नसते. सखाराम मंग्याला समजून सांगत होता. दुपारी बैलांना घेऊन मंग्या बाबासोबत घरी आला. सखारमने सुदाम्या व हरण्याला अंगणात बांधून त्यांच्या शिंगाना हिंगूळ लावू लागला. बैलांना नवीन वेसण, नवीन कासरा लावण्यात आला. गळ्यात कवड्याची व घुंगराची माळ घालण्यात आली. बाशिंग बांधून पाठीवर झुला टाकल्या. शिंगांना नवीन बेगड चिटकवून बैल पोळ्यात जाण्यासाठी तयार झाले होते. आज सुदाम्या व हरण्या ओळखूच येत नव्हते. नवीन साजाने बैलजोडी उठून दिसत होती. शेवटी दुपारचे चार वाजले. गावातील बैल वेशीवर पोळ्यात जाऊ लागली. गावाच्या वेशीवर गावातील सगळ्या बैलांचा पोळा भरत असे. सखाराम मंग्याच्या हातात कासरा देऊन बैलांना घेऊन वेशीवर आला. गावातील सगळे बैल जमा झाले होते. कधी नव्हे ती सर्व बैल सजवून एकत्र आली होती. पोळा खूप भरला होता. सखाराम व मंग्या दोघेही खूप खुश होती. कितीतरी दिवसांची त्यांची इच्छा आज पूर्ण झाली होती. दोघेही बैलांचा कासरा हातात धरून पोळा फुटण्याची वाट पाहत होते. ‘‘ बाबा….! कधी फुटणार पोळा ’’ मंग्या हळूच म्हणाला. सर्व गावातील बैल आले की, पाच वाजता फुठत असतो पोळा. आता थोड्या वेळात फुठेलच पोळा तू आवाजाकडे लक्ष ठेव. आवाज आला की लगेच सर्व लोक बैल घेऊन तोरणा खालुन धावत जातील. आपल्यालाही लगेच धावावे लागेल नाहीतर मागचे बैल आपल्याला तुडवून जातील असे सखाराम मंग्याशी बोलतच होता. तोच डफड्याचा आवाज सुरु झाला. आंब्याच्या पानाचे तोरण आडवे ओढले व पोळा फुटला. पोळ्यातील बैल एका पेक्षा एक जोरात धावत सुटली. कुणाचा बैल निसटून गेला, तर कुणाचा कासरा सुटला. गावातील तुकाराम जोरात पळता पळता पडला बैलांनी त्याला तुडवून काढले. लोकांनी गर्दीतून पटकन तुकारामला बाहेर ओढले. सगळ्या गोंधळात सखाराम दोन्ही बैलांना व मंग्याला घेऊन हळूहळू तोरणा खालून निघाला. बाबा....! बाबा....! पळवा लवकर सुदाम्या व हरण्याला. चला लवकर घरी सगळ्यांच्या आधी….! मंग्याची घाई सुरू होती. शेवटी गावातून चक्कर मारून सखाराम मंग्याला व बैलांना सुखरुप घेउन अंगणात आला. पार्वती बैलांना ओवाळण्यासाठी ताट घेऊन उभीच होती. पार्वतीने बैलांना मंग्याला व सखारामला कुंकू लावून ओवाळले. बैलांना पुरणपोळी चारली. बैल शेजारी पाजारी मिरवून शेवटी सखारामने बैल गोठ्यात नेऊन बांधले. स्वतःचे बैल पोळ्यात मिरवून आल्याचा आनंद सखारामच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शेतात दिवस-रात्र कष्ट करून शेती पिकवण्या मध्ये राबणारा आपला धनी व सुदाम्या हरण्याच्या कष्टाच्या पाय गुणाने पिकणारी शेती यापुढे आपल्या मंगळसूत्राची किंमत कमीच आहे. सखारामच्या चेहऱ्याकडे पाहून पार्वतीच्या मनात विचार आला. लेकरांना घेऊन सखाराम जेवायला बसला. आईच्या हाताची गरम-गरम पुरणपोळी खात मंग्या हळूच म्हणतो. बाबा.....! रोजच पाहिजे असा पोळा.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा ता सिंदखेड राजा
जि बुलढाणा मो नं 9823425852
ब्लॉग वरती वाचा

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...