स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे आपण नेहमी वाचतो. प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आई होय. जिचे प्रेम आणि ममत्व याचे ऋण कधीच फेडणे शक्य नाही. नऊ महिने नऊ दिवस बाळाला पोटात सांभाळून, अनेक असह्य वेदना सहन करुन आई बाळाला जन्माला घालते. बाळ आणि आई हे जगातील सर्वात मोठे सुंदर नाते आहे. पण हीच आई कोणाची तरी अगोदर मुलगी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आई सारख्या अनेक भूमिका स्त्रीला निभवाव्या लागतात. मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर अनेक भुमिकेतुन तिला जावे लागते. लक्ष्मीच्या पावलाने मुलगी म्हणून तिचे आगमन होते. आणी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या भूमिकेतून ती जात असते. प्रत्येक वडिलाचा अभिमान, गर्व, जोपासणारी ती लाडकी लेक होते. जिवापाड प्रेम करणारी लाडक्या भावाची बहीण ती होते. संसाराचा रथगाडा सांभाळून ती उत्तम पत्नी होते. वासल्य, ममत्व, जपणारी आई ती होते. थरथरणाऱ्या हातांनी कोवळ्या गालावरचा मुका घेणारी आजी ती होते. संस्कार आणि संस्कृती जोपासणारी समाजातील ती उत्तम स्त्री होते. अशा लेक, बहिण, पत्नी, आई, आजी, मावशी, काकू, आत्या, मामी अशा अनेक भूमिका स्त्रीला तिच्या आयुष्यात निभवाव्या लागतात. अर्थात प्रत्येक स्त्री या सर्व भूमिका उत्तमच निभावते. संस्कार आणि संस्कृती जोपासत प्रत्येक स्त्री या सर्व भूमिकेतून स्वतःला सिध्द करत असते. भारत एकविसाव्या शतकात महासत्तेकडे वाटचाल करताना येणाऱ्या काळात स्त्रीच्या या भूमिका संपुष्टात येतात की काय? ही भीती वाटू लागली आहे. याचे कारण म्हणजे स्वतःला सुशिक्षित, उच्चशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजात, कुटुंबात भ्रूणहत्या होत आहे. वंशाला दिवा पाहिजे, वंशाला वारसदार पाहिजे. या हट्टापायी भ्रूणहत्या सारखे महापाप घडत आहे. मुलगी जन्माला येण्या अगोदरच तिचे गर्भातच आयुष्य संपवले जात आहे. मुलगा हा म्हातारपणाची काठी, आधार समजला जातो. या समजुतीने मुलगी जन्माला येण्या अगोदरच लाखो रुपये खर्च करून मुलगा की मुलगी असे गर्भनिदान केले जाते. मुलगी सांगितली तर गर्भातच तिची हत्या केली जाते. या सर्व गोष्टी कायद्याने बंद आहे. लिंगनिदान चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे. असे करणाऱ्या डॉक्टर व संबंधित जोडप्याला कायद्याने शिक्षा होऊ शकते. हे माहित असताना सुद्धा अनेक ठिकाणी चोरीछुपे या गोष्टी घडतात. कुठेतरी हे महापाप थांबले पाहिजे. या सर्वावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे लेक वाचवा लेक शिकवा हे अभियान राबविण्यात येत आहे. समाजात, खेड्या-पाड्यात, वाडी वस्तीवर याची जागृती केली जात आहे. लेक वाचवा हे सांगण्यामागे खूप महत्त्व आहे. कारण लेक जन्माला आली तरच ती अनेक भुमिका निभाऊ शकेल. ‘‘ मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ’’ असे आपण नेहमी ऐकतो, अनेक ठिकाणी वाचतो. जन्मानंतर वडिलांच्या घरी संस्कृतीचा व लग्नानंतर नवऱ्याच्या घरी संस्काराचा प्रकाश पाडणारी ती मुलगीच असते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. लेक जन्माला आली नसती तर कदाचित तुम्ही आम्ही जन्माला आलो नसतो. कारण हे सुंदर जग आपल्याला ज्या आईमुळे बघायला मिळाले. ती आई कुणाची तरी लेक होती हा विचार सर्वप्रथम आपण केला पाहिजे. आजच्या सुशिक्षित समाजाने मुलगा-मुलगी हा भेद केला नाही पाहिजे. आज आपण पाहतो देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात मुलींनी, स्त्रीयांनी स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवलेला आहे. देशाचे प्रत्येक महत्त्वाचे पद महिलांनी भूषविलेले आहे. भारत देशाचे सर्वात मोठे पद राष्ट्रपती हे एका महिलेने भूषविलेले आहे. प्रतिभाताई पाटील या देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत. स्वर्गीय इंदिरा गांधींनी भारत देशाचे पंतप्रधान म्हणून पद भूषविलेले आहे. भारत या देशाला अनेक महिलांची यशोगाथा लाभलेली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार-या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब यासुद्धा अगोदर सिंदखेड राजा च्या जाधव घराण्याच्या लेक होत्या. जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, कल्पना चावला, पी.टी.उषा, लता मंगेशकर, मेरी कोम, सायना नेहवाल यासारख्या महिला मुलगी म्हणूनच जन्माला आल्या. त्यांच्या वडिलांनी जर आजच्या सारखा संकुचित विचार केला असता, तर आपला देश अनेक महत्त्वांच्या या स्त्रीरत्नांना मुकला असता. आणि म्हणून आज लेक वाचवा लेक शिकवा या अभियानाला स्वीकारण्याची गरज आहे. मुलींना आनंदाने जन्माला घालूया. तिच्या जन्माचा आनंदाने स्वीकार करूया. हा विचार या महाराष्ट्राला या देशाला शोभणारा आहे. लेक फक्त जन्माला घालून चालणार नाही. तर तिचे उत्तम संगोपण आणि सरंक्षण करणे गरजेचे आहे. तिला चांगले उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे. तिच्या आवडीनुसार तिला करिअर करू दिले पाहिजे. हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य प्रत्येक पालकांनी अभिमानाने स्वीकारले पाहिजे. ग्रामीण भागात अनेक अडचणी आहेत. यामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, वाडी-वस्तीवर गावात उच्च शिक्षणाची सुविधा नसणे, अनेक समाजामध्ये मुलींना उच्च शिक्षणास बंदी, लवकर लग्न करणे, अशा अनेक समस्या आहेत. परंतु या सर्व गोष्टीवर मात करून मुलींना शिक्षण देणे काळाची गरज आहे. पालक म्हणून ते कर्तव्य आहे. म्हणून मुलींना उत्तम शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उंच भरारी घेण्यासाठी आपण पालक म्हणून शुभेच्छा देऊया. कारण मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी या म्हणीप्रमाणे हा प्रकाश असाच अंखडपणे पडत राहो. यासाठी संकल्प करुया लेक वाचवा लेक शिकवा.
‘‘ मुलींना द्या शिक्षणाचा आधार, करतील अनेक पिढ्यांचा उद्धार. ’’
‘‘ स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी, शिकून सवरुन करतील रोशन दुनिया सारी. ’’
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
रा.किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा
जि.बुलडाणा
9823425852
No comments:
Post a Comment