Saturday, 25 July 2020

अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान !


अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान


भारतीय संस्कृतीत अनेक धार्मिक रूढी, परंपरा आजही सुरूच आहे. या रूढी परंपरा माणुसकीचे दर्शन घडविते. एक माणूस दुसऱ्या माणसाशी माणुसकीची भावना जोपासतो. एका माणसाचा दुसऱ्याविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकीची भावना जोपासली जाते. यातूनच अनेकांना मदत करण्याची भावना आज प्रत्येक भारतीयाकडे आहे. भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे व वाटसरूला रस्ता दाखवणे ही पुण्यकर्माचे लक्षण समजले जाते. आजही प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने दानधर्म करत असतो. धर्म केल्याने आयुष्यात काहीच कमी पडत नाही. ही भावना पुर्वी पासुन रुढ आहे. जी वस्तू आपल्याला मर्यादेपेक्षा जास्त होते. किंवा मर्यादेपेक्षा जास्त आपल्याजवळ आहे. तिचा वापर झाला नाही तर ती खराब होते. त्यामुळे ती इतरांना दिली पाहिजे. दानाचे अनेक प्रकार आहेत जसेकी अन्नदान, रक्तदान, धनदान, भूदान, ज्ञानदान इ. अशा या दानाच्या प्रकारांपैकी अनेक धर्मामध्ये अन्नदानाचे महत्व पटवून दिले आहे. अन्नदान हेच श्रेष्ठदान आहे. जो अन्नदान करतो तो पुण्यकर्म कमावतो. ‘‘ अन्नदाता सुखी भव ’’ असे म्हटले जाते. अन्नदान करतो तो मनुष्य जीवनात सुखी राहतो. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान यासाठी समजले जाते. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. यातील पहिली गरज अन्न ही आहे. शरीर हे अन्नावर अवलंबून आहे. माणसाची वाढ ही अन्नावर अवलंबून आहे. अन्न हे कार्य करण्याची ऊर्जा वाढविते. अन्न पोटात नसेल तर कार्य करण्याची गती कमी होते. संपूर्ण शरीराचे कार्य हे अन्नावर अवलंबून असते. अन्न मूलभूत पहिली गरज आहे. म्हणून याला सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. अन्नदान हे मुळात भुकेल्या माणसांसाठी केले जावे. जो उपाशी आहे त्याला अन्नाची खरी गरज आहे. अशा लोकांना एक वेळचे जेवण दिले, तर आयुष्यात त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी हा येथील अन्नधान्याचा जनक आहे. तो दिवसरात्र उन्हा-तानात राहून अन्नधान्य पिकवितो. तेव्हा प्रत्येकाच्या पोटात अन्नाचा घास जातो. या कृषिप्रधान देशात तरीसुद्धा अनेक लोक उपाशीपोटी रात्री झोपी जातात. अनेक बालके कुपोषणाने ग्रस्त आहे. ही खरी शोकांतिका आहे. आज अनेकांना एक वेळचे जेवण मिळत नाही. अनेक मजुरांना दिवसभर कष्ट करावे लागते. तेव्हा एक वेळचे पोटभर अन्न खायला मिळते. जेव्हा जेव्हा देशावर नैसर्गिक संकटे येतात. महापूर, दुष्काळ, भूकंप अशा वेळेस अन्नदान केले पाहिजे. पोटभर जेवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आणि प्राप्त परीस्थितीनुसार उपासमार करावी लागते. यासाठी अन्नदान होणे गरजेचे आहे. मनुष्य जगला तर इतर कार्य करत राहील. जीवनात आपल्याकडे जे आहे तेच आपण दुसऱ्याला देऊ शकतो. अन्नदान काळाची गरज आहे. हे महत्त्व जाणून घेऊन अन्नदान केले पाहिजे. वेळ-काळ लक्षात घेऊन अन्नदान केले पाहिजे. अन्नदान करताना कुठलेही मतभेद करू नये. जात-पात, धर्म, परिस्थती याला महत्त्व न देता माणूस हा देव समजून अन्नदान केले पाहिजे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान ठरते. त्याचा आशीर्वाद एक मनुष्य रूपाने दुसऱ्या मनुष्याला मिळत असतो. चला अन्नदान करूया, अनेकांच्या भुकेच्या वेदना थांबूया.

“ अन्न जीवन आहे, अन्न केवळ परब्रम्ह आहे. ”
“ लावु एक चांगली सवय टाळु अन्नाचा अपव्यय. ”

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...