Saturday, 25 July 2020

जगाचा पोशिंदा " बळीराजा "

    जगाचा पोशिंदा '' बळीराजा ''


भारत हा कृषिप्रधान देश आहे.एकविसाव्या शतकात भारतात अनेक मोठे-मोठे व्यवसाय,उद्योग धंदे उभारले गेले.यामध्ये तरुण आणि उच्चशिक्षित लोकांना काम मिळाले.उत्तम काम उत्तम दाम यामुळे आजचा तरुण याकडे ओढला गेला.भारताची आधुनिक तंत्रज्ञानाने व्यवसायात प्रगती केली.पण या स्पर्धेच्या जगात आजही माझ्या देशात शेती हा व्यवसाय त्याच तोला मोलाने टिकून आहे.अनेक नैसर्गिक, आर्थिक,राजकीय संकटांचा सामना करून शेती हा व्यवसाय माझा शेतकरी बांधव दरवर्षी करतो.बळीराजाला वंशपरंपरेने मिळालेला हा शेतीचा वारसा आनंदाने पुढे नेत आहे.बळीराजाला माहीत आहे.शेती पिकली तरच माझा देश जिवंत राहील.आज प्रत्येकाच्या मुखात अन्नाचा घास पडतो,तो बळीराजा मुळेच.तो जीवाचे रान करून कष्टाच्या घामाने दरवर्षी शेती फुलवितो.शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.दरवर्षी वाढत्या प्रदूषणामुळे,अतिप्रमाणात वृक्षतोड, जमिनीची धूप,वाढते तापमान आधी गोष्टीमुळे पाऊस पडण्यामध्ये अनियमितता दिसून येते.दरवर्षी पावसाची हुलकावणी बळीराजाच्या जीवावर बेतते.कधी पाऊस खूप कमी पडतो. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते.या दुष्काळ परिस्थितीचा सामना करून स्वतःच्या लेकराप्रमाणे शेतातील पिकाला जपावे लागते.तर कधी जास्त पाऊस पडून अतिवृष्टी,महापुराचा सामना करावा लागतो. डोळ्यादेखत शेतातील माल खराब होताना बघावा लागतो.कष्ट करून हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटामुळे हिसकावून घेतला जातो.कोणाच्या नावाने रडणार,कुणाला दोष देणार कारण हे सर्व काही दरवर्षीच ठरलेलं.रोज मरे त्याला कोण रडे म्हणीप्रमाणे या संकटांची आता बळीराजाला सवय झाली आहे.नैसर्गिक संकटं हे सूत्र ठरलेलंच आहे.हे लक्षात घेऊनच शेती व्यवसाय करावा लागतो.देशातील तरुण पिढी उच्च शिक्षण,विज्ञान तंत्रज्ञान, प्रगीतीचे वेड,अति महत्वकांक्षा यामुळे नोकरी,उद्योग, स्वतःचा व्यवसाय याकडे झुकलेला पाहायला मिळतो. आजच्या तरुणाला शेती करणे हे कमीपणाचे वाटते.तसेच शेती हा आर्थिक स्रोत नसून तो कष्टाचा डोंगर आहे.अति कष्ट,अति वेळ खर्च करून हातात मात्र पुरेसा पैसा येत नाही.आणि म्हणूनच तरुण पिढीला शेती हा व्यवसाय नकोसा वाटतोय. परंतु याउलट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास निश्चितच आर्थिक उत्पन्न मिळू शकते.शेती हा फक्त आर्थिक स्रोताचा व्यवसाय नाही.तर तो मानवाच्या मूलभूत गरजा भागवणारा व्यवसाय आहे. माणसाने दिवसभर कोणत्याही क्षेत्रात काम केले.कितीही पैसा मिळविला. तरी रात्री त्याला पोटभर अन्न मिळते.ते या शेती व्यवसायामुळेच. शेती हा फक्त आर्थिक स्वताचा व्यवसाय नसून तो मानव जातीला पोसणारा व्यवसाय आहे.बळीराजा स्वतः उपाशीपोटी शेतात राबतो.स्वतःच्या कष्टाच्या घामाने मात्र प्रत्येकाच्या पोटात अन्नाचा घास घालतो. फुले,फळे, भाजीपाला, अन्नधान्य हे शेतीतूनच मिळते.या शेतीला, बळीराजाला चांगले दिवस यायचे असे वाटत असेल.तर निसर्गाबरोबरच सरकारची धोरणे सुद्धा शेतीच्या हिताची असली पाहिजे.शेतीच्या मालाला हमीभावा प्रमाणे किंमत मिळणे,दरवर्षी शेतीला विमाचे कवच असावे,शेतीसाठी शेतकऱ्यांना कर्ज व्यवस्था उपलब्ध असावी. तसेच मुबलक पाणी व मोफत विजेची सुविधा सरकारने करावी. शेतकऱ्यांना शेतातील माल विकण्यासाठी जवळच हक्काची बाजारपेठ असावी. शेतीविषयक धोरण चांगले असले तर शेतकऱ्याला स्वतःचा उदरनिर्वाह बरोबर दोन पैसेसुद्धा मिळतील.इतर व्यवसाय सारखाच शेती हा चांगला व्यवसाय आहे.अशी नवीन पिढीची धारणा होईल.देशात सर्वात मोठा व्यवसाय शेतीच आहे.शेतीवर देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया अवलंबून आहे. देशाची आर्थिक गतिमानता शेतीमुळेच तेजीत येते.सरकारने शेती विषयक धोरण जाहीर करावे.शेतीला उच्च व्यवसायाचा दर्जा मिळवून द्यावा.या काळ्या आईच्या कुशीतून निघणारा घास मानवाला जगवत असतो.हे कोणी विसरता कामा नये.सरकारने शेती व्यवसायाला चांगला दर्जा मिळवून दिला.तर जगात भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.देशाच्या प्रत्येक संकटाच्या वेळी देशाच्या पाठीशी भक्कम पणे बळीराजा उभा राहतो. त्याचप्रमाणे बळीराजाच्या संकटाच्या वेळी सर्व भारतीयांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. शेतकरी जगला तरच आपण जगू.शेतकरी हा या भूमीचा खरा पालनकर्ता आहे.त्याचा सन्मान व अभिमान सर्वांनी बाळगुया.व भारतभुमिच्या बळीराजासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करुया.

ईडा पिडा टळु दे, बळीचे राज्य येऊ दे.

ईडा पिडा टळु दे, बळीचे राज्य येऊ दे.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9826425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...