Saturday, 25 July 2020

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराज

  स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराज


महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले.यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज,संत नामदेव महाराज,संत तुकाराम महाराज,संत नाथ महाराज,संत एकनाथ महाराज,संत रामदास स्वामी, संत तुकडोजी महाराज असे अनेक संत होऊन गेले.या संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर महाराज होत.संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेव महाराजांनी त्याचा भारत भर विस्तार केला.तर संत नाथ महाराजांनी त्यावर इमारत बांधली व देहूच्या महान संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. समाजाला नास्तिकते कडुन श्रद्धेच्या मार्गावर, दयेच्या मार्गावर संतांनी आणले.समाजाच्या उध्दारासाठी संतांनी स्वतःचे आयुष्य घालवले.असेच एक संत ज्यांनी संत मालिकेचा विचार गावोगाव नेऊन माणसाच्या मनात भरविला.ते म्हणजे स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराज होय.महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव या छोट्याशा गावी १३ फेब्रुवारी १८७६ रोजी त्यांचा जन्म झाला.संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर हे होते. झिंगराजी शेतीचे काम करून त्यावर उपजीविका करत होते.त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती.संत गाडगेबाबांना लहानपणी डेबूजी म्हणत असत. डेबुजी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.यामुळे सखुबाई यांनी आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी स्वतःच्या भावाकडे जाण्याचा निर्णय घेतला.सखुबाई भावाकडे राहण्यासाठी आल्या.डेबुजी मामाच्या घरी राहत असताना जनावरे सांभाळणे, जनावरांना चारा पाणी करणे हे काम करत असत.लहानपणापासून अंधश्रद्धा,भोंदूगिरी, फसवणूक यांचा त्यांना खूप राग येत असत. संत गाडगे महाराजांना आंधळे-पांगळे,लंगडे-लुळे, कुष्ठरोगी यांच्या विषयी नेहमीच कळवळा वाटे.डेबुजीचे वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न झाले होते.संसाराचा वेल फुलला व गाडगे बाबांच्या घरात कन्या रत्न जन्माला आले.अतिशय आनंदात संसार सुरू होता. यातच दुसरे अपंत मुलगा जन्माला आला.पण काही दिवसांनी मुलगा लहान असताना मरन पावला.सुखी संसारात मात्र डेबुजीचे मन रमेना दुसऱ्यांचा दुःखमय संसार सुखी करण्याची इच्छा सदैव त्यांच्या मनात होती.अशातच एक दिवस सकाळी पहाटे तीन वाजता १ फेब्रुवारी १९०५ या दिवशी जगाचा संसार सुखी करण्यासाठी डेबुजी घराबाहेर पडले.पुन्हा मात्र त्यांनी स्वतःच्या संसारात,स्वतःच्या सुखात कधीच डोकावून पाहिले नाही. शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी समाजातील रंजले-गांजले,दिन-दुबळे, अपंग,अनाथ यांच्यासाठी आयुष्य झिजविले.डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी,एका कानात कवडी,तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीचा काच,एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा वेश परिधान करून संत गाडगे महाराजांनी अनेक गावात जाऊन समाजाचे प्रबोधन केले.गावात जायचे व हातातील झाडुने गाव स्वच्छ करायचे.रात्री माणसांना एकत्र करून कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोके स्वच्छ करायचे.संत गाडगे महाराजांनी समाजातील लोकांच्या मनात असलेल्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा,भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा यांना विरोध केला.या गोष्टी सुधारण्यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला.कीर्तनाच्या माध्यमातून ते लोकांना आवाहन करत असत चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका,जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका,देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका,असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असे.मी काही देव नाही.मी कोणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही.असे ते ठामपणे सांगत असे.लोकांनी त्यांना विचारले बाबा तुमचे नाव काय तर ते म्हणायचे तुम्हाला पाहिजे त्या नावाने मला हाक मारा.मला तर नावच माहित नाही.म्हणून त्यांना कित्येक नावे पडले.लोक त्यांना अनेक नावांनी हाक मारत असे. त्यातूनच हातात गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले.तेव्हापासून संत गाडगेबाबा हे नाव नावारूपास आले.महाराष्ट्रातील अनेक संतांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.मात्र संत गाडगेबाबांनी भक्तीच्या नावाखाली होत असलेल्या अंधश्रद्धेला दूर करण्यासाठी प्रयत्न केले.देवावर श्रद्धा ठेवा परंतु ही श्रद्धा अंधश्रद्धा होता कामा नये हे संत गाडगेबाबा नेहमी सांगायचे.गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन करुन लोकांना ते सांगत असे देव दगडात नाही,देव देवळात नाही देव तुमच्या आमच्या हृदयात आहे. माणसातील देव ओळखायला शिका.प्राणीमात्रांवर दया करा. निसर्गावर प्रेम करा.असे ते कीर्तनातून लोकांना सांगत होते.गाडगेबाबांच्या हातातील झाडूंनी कमाल केली.स्वच्छतेचा मंत्र त्याचबरोबर लोकांच्या वैचारिकतेला स्वच्छ केले.दिवसभर गाव स्वच्छ करायचे तर रात्री स्वतःच्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोकी लोकांचे विचार स्वच्छ करण्याचे काम संत गाडगेबाबांनी त्या काळामध्ये केले.समाज सुधारण्यासाठी समाजातील तळागाळात त्यांनी वैचारिकतेचा प्रकाश टाकला. भुकेल्यांना जेवण, तहानलेल्यांना पाणी,बेघरांना घर, मुला-मुलींना शिक्षणाची सोय,आजारी रोगी माणसांना औषध, मुक्या प्राणी,पक्ष्यांना अभय यातच त्यांनी खरा धर्म आहे असे मानले.यालाच ईश्वराची सेवा समजून समाजाची सेवा करत राहिले.समाजाची सेवा करत करत 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव जिल्हा अमरावती येथे अखेरचा श्वास घेतला.संत गाडगे बाबांचे गाडगेनगर अमरावती येथे स्मारक आहे.ज्यांनी या समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. त्या संत गाडगेबाबांच्या नावाने आज महाराष्ट्र शासनातर्फे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवले जाते.व महाराष्ट्रातील स्वच्छता अभियाना अंतर्गत अनेक गावांची निवड करून राज्य शासनातर्फे पुरस्कार दिला जातो.या योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक गावे स्वच्छ झाली.संत गाडगेबाबांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या समाजात विचारांना स्वच्छ केले.हे मात्र लाख मोलाचे होते आणि म्हणून संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त गाडगेबाबांच्या विचारांना व कार्याला स्मरण करून संत गाडगे बाबाचा स्वच्छतेचा मंत्र आपण सर्वजण हाती घेऊया व महाराष्ट्रातील प्रत्येक गावा गावाला स्वच्छ करूया.स्वच्छ गाव स्वच्छ महाराष्ट्र हा संकल्प मनात पक्का करुया.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...