शिक्षण ऑनलाइन पण गुणवत्तेचं काय ?
कोरोना महामारी ने जगभर थैमान घातले यात असंख्य गोष्टीचे प्रचंड नुकसान झाले.प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा मृत्यूच्या भयाने सर्वाधिक ग्रासले गेले.या महामारी ने संपूर्ण गतिमान जग एका क्षणात ठप्प करून टाकले. मोठे मोठे उद्योगधंदे, लघुउद्योग, व्यवसाय या सर्वावर याचा विपरीत परिणाम झाला.अर्थव्यवस्थेला प्रचंड धक्का यामुळे बसला. अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन पटकन सर्वांच्या लक्षात आले.भारतात अर्थव्यवस्थे ऐवढीच महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण होय.या महामारी मध्ये शिक्षण व्यवस्था पुरी कोलमडली गेली.प्रचंड शिक्षण व्यवस्थेवर याचा परिणाम झाला.चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे शिक्षणाची वाटचाल सुरू असतानाच कोरोनाच्या महामारी ने रुद्र रूप धारण केले. यामुळे शिक्षण,अर्थव्यवस्था,विकास यापेक्षा प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे.सहाजिकच हे लक्षात घेऊन लाॅकडाऊन चा निर्णय घेण्यात आला.यात संपूर्ण व्यवस्था बंद करण्यात आल्या त्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया अचानक थांबल्या गेली.काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षासुद्धा रखडल्या गेल्या.इयत्ता पहिली पासून ते नववी पर्यंत त्याचबरोबर बी.ए,एम.ए,मेडिकल,इंजीनियरिंग, फार्मसी,अँग्रीकल्चर अशा विविध शिक्षणक्रमाच्या परीक्षा रखडल्या गेल्या आहेत.या शैक्षणिक सत्रात इयत्ता बारावीचे पेपर संपले होते.तर दहावीचा एक पेपर सुद्धा या बंदमध्ये बाकी राहिला होता.अर्थात परीक्षाच नाही त्यामुळे निकालाचा काही संबंध येत नाही. राज्यशासन,राज्यपाल महोदय,व यूजीसी यांच्या उलट-सुलट चर्चा सुरूच आहे.राज्य शासन म्हणते अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार नाही तर राज्यपाल महोदय म्हणतात परीक्षा होतील.या गोंधळाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर मात्र सहाजिकच याचा ताण येत आहे.काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या तर काही अभ्यासक्रमाच्या परीक्षेसंदर्भात निश्चितच निर्णय लागेल.वेळोवेळी शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या या चर्चेमुळे पालक व विद्यार्थी यांच्यात मात्र संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे.शैक्षणिक सत्र 2019-20 चा गोधळ संपतो न संपतो तोच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात सुद्धा झाली.विदर्भात 26 जूनला शाळा उघडतात तर उर्वरित महाराष्ट्रात 15 जूनला शाळा उघडतात.कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकले नसले तरी सुद्धा शाळा ठरलेल्या तारखेला सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला.विद्यार्थ्यांचे वर्ग प्रवेश प्रमोशन ऑनलाइन करण्यात आले.सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळून विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमाचे पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.राज्य शासनाच्या नियमानुसार सध्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे नाही अशा परिस्थितीत ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.शासनाने व शिक्षण विभागाने वेळोवेळी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी ऑनलाइन शिक्षण,दीक्षा ॲप,झूम ॲप,गूगल मिट ॲप, वॉट्सऐपवर अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे काम सुरू केले.या महामारीमध्ये सध्याच्या परिस्थितीनुसार निश्चितच ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय चांगला आहे.परंतु हे ऑनलाईन शिक्षण ग्रामीण भागात प्रत्येक खेड्यात, वाडी-वस्तीवर प्रत्येक बालकांपर्यंत पोहोचत नाही.याला अनेक कारणं आहेत.प्रत्येक पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाही.अनेक पालक मजुरी, शेती करतात.यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे.यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी महागडा मोबाईल घेऊ शकत नाही.अनेक गावात इंटरनेट सुविधा सुरळीत नाही.अनेक वाडी-वस्तीवर लाईट सुविधा पुर्णवेळ नाही.अनेक पालक शिक्षित नाही.मोबाईल हाताळण्याचे पुरेसे ज्ञान नाही.सर्व शिक्षणाच्या प्रवाहात वय,वर्ग यांचा स्तर वेगवेगळा आहे.प्रत्येक बालक सारख्या वयाचे नाहीत. त्यामुळे छोट्या वर्गाच्या मुलांना सुद्धा ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी पुरेसे ज्ञान नाही.दरवर्षी अनेक गावात, वाड्या वस्तीवर खडू व फळा या मोहिमेअंतर्गत शिक्षण प्रक्रिया पार पडत असते.शिक्षक प्रत्यक्ष गावात येऊन विद्यार्थ्यांना शाळेत दिवसभर ज्ञानदानाचे काम करत असतात.आज मात्र ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेमुळे शिक्षणाचे ग्रामीण व शहरी असे दोन भाग झाले.ग्रामीण भागातील अनेक अडचणींमुळे 100% बालकांपर्यंत हे ऑनलाइन शिक्षण पोहोचत नाही.एवढे मात्र खरे आहे.शिक्षणाच्या प्रवाहात सरकार,शिक्षण विभाग,अधिकारी व शिक्षक कर्मचारी वेळोवेळी शैक्षणिक उन्नतीसाठी धडपडत असतात.शिक्षण प्रक्रियेत नवनवीन बदल आत्मसात केले जातात.उद्देश हाच की दरवर्षीच्या तुलनेत विद्यार्थी गुणवत्ता वाढावी,अगदी तळागाळातील बालकांपर्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचावे.शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी फक्त शिकून चालणार नाही तर तो दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन एक उत्तम सर्वांगीण विकास झालेला नागरिक बनला पाहिजे. कोरोनाच्या विळख्यात शिक्षणाचा पार खेळखंडोबा झालेला आहे.ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी,प्रत्यक्ष शाळा सुरू असताना दिवसभर अध्ययन अध्यापन प्रक्रियेद्वारे मिळणारे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण या ऑनलाइन प्रक्रियेत मिळतेच असे नाही.ही वास्तविकता प्रत्येकाला स्विकारावीच लागेल.या कोरोना संकटाच्या परिस्थितीतून प्रत्येकाला जावे लागत आहे.त्याप्रमाणे शिक्षणक्षेत्र सुद्धा मार्गक्रमण करत आहे.या परिस्थितीला प्रत्यक्ष विद्यार्थी,पालक,शिक्षक,शिक्षण विभाग,सरकार हे कोणीही जबाबदार नाही.कोरोनामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. येणाऱ्या काळात या कोरोनाचा प्रभाव किती दिवस चालेल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापन,अभ्यासक्रम, परीक्षा याबाबत या पुढे काय होईल हे सद्या तरी सांगता येत नाही.त्यामुळे सध्या तरी ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेवरच समाधानी राहावे लागेल.ऑनलाईन शिक्षण सुरू आहे पण गुणवत्तेचं काय? हा प्रश्न मात्र सर्व सामान्यांच्या मनात पडल्या शिवाय राहत नाही.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment