अपयश हीच यशाची पहिली पायरी
शिक्षणाच्या प्रवाहातील वेगवेगळ्या परीक्षेचा, कोणत्याही स्पर्धेचा, क्रिडा प्रकारातील खेळाचा, निकाल पास नापास, हार जीत याप्रकारे असतो. नाण्याला ज्याप्रकारे दोन बाजू आहेत. त्याप्रमाणे जय-पराजय या सुद्धा जीवनातील महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. खेळ, स्पर्धा, परीक्षा यामध्ये प्रत्येक विद्यार्थी, खेळाडू पूर्ण ताकतीने उतरत असतो. कारण येथे प्रत्येकालाच जिंकायचे आहे. प्रत्येकालाच पुढे जायचे आहे. पण ही स्पर्धा, परीक्षा, खेळ म्हटले म्हणजे कुणीतरी जिंकणार तर कोणीतरी हरणार हे निश्चितच असते. स्पर्धेत, परीक्षेत, खेळात भाग घेणारा प्रत्येकजण जिंकलेला असतो. पण कुठेतरी क्रम देतांना मात्र कुणाला पहिला, दुसरा, तिसरा असा क्रम प्राप्त होत असतो. अर्थात क्रम मिळालेले कुठेतरी इतरांपेक्षा काकणभर शिल्लक भरलेले असतात. याचा अर्थ बाकीचे खूप काही कमी किंवा पूर्णपणे बाद असे होत नाही. हे क्रमांकाचे, नंबरचे यश-अपयश मात्र प्रत्येकाला पचवता आले पाहिजे. आयुष्यात अनेक कठीण स्पर्धा माणूस म्हणून प्रत्येकाला द्याव्याच लागतात. त्यातील ही काही टप्पे आहेत. शिक्षण या प्रवासातील सुरुवातीचा टप्पा म्हणजे दहावी ची परीक्षा नंतर बारावीची परीक्षा होय. दरवर्षी दहावी व बारावीचा निकाल घोषित होताच दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात, टीव्हीवर बातमाच्या माध्यमातून कानावर येते की, कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या केली. नापास झाला म्हणुन आत्महत्या केली. कमी मार्क मिळाले म्हणून आई-वडील निराश झाले म्हणून आत्महत्या केली. अशा बातम्या बघून, वाचून मन खिन्न होते. कुठेतरी गुणांच्या, मार्काच्या या जीवघेण्या स्पर्धेत अनेक मुलं जीव गमावून बसतात. अर्थात यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत. पालकांच्या मुलांकडून वाढलेल्या अपेक्षा असतील, आई-वडील, शाळा, महाविद्यालय, क्लासेस यांचे नाव मोठे होण्यासाठीची धडपड असेल किंवा नातेवाईक समाज यांच्याशी तुम्ही करत असलेली तुलना असेल. अभ्यासक्रम, शाळा, पालक, समाज यांनी मुलांना स्पर्धेच्या खाईत ढकलून दिले आहे. येथे प्रत्येकाला फक्त पहिला नंबर पाहिजे. बालक, मूलं, विद्यार्थी म्हणून त्याच्या अडचणी समजून घेण्याची मानसिकता मात्र कुणाची नाही. येथे फक्त प्रत्येकाला गुणांच्या स्पर्धेत इतरांपेक्षा पुढे जायचे आहे. आज समाजातील कोणत्याच आई-वडिलांना आपल्या मुलांने एक उत्तम माणूस म्हणून घडावे असे वाटत नाही. किंवा त्यासाठी प्रयत्नही होत नाही. जन्माला आल्यापासून फक्त स्पर्धा आणि स्पर्धा एवढेच ध्येय पालकांचे आहे. मुलाने स्पर्धेत उडी घ्यावी व सतत आकड्यांचे क्रम मिळवून हुशार असल्याचे सिद्ध करावे. जगाच्या स्पर्धेत प्रत्येकाला सिद्ध व्हायचे आहे. पण त्यासाठी जीवघेण्या स्पर्धा कितपत योग्य आहे ? हा विचार प्रत्येक पालकांनी केला पाहिजे. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. प्रत्येक बोट दुसऱ्या बोटा पेक्षा लांब, आखूड, जाड अशा रचनेने बदलेले आहे. परंतु प्रत्येक बोटाची कार्य मात्र सारखेच आहे. कोणतेही काम करताना हाताची सर्व बोटे एकत्र येऊन ते काम करते. तसे शाळेतील प्रत्येक मुलं जरी वेगळे असले तरी ते सर्वगुणसंपन्न आहे. ते त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केल्याशिवाय राहत नाही. फरक एवढाच आहे की, प्रत्येक मुल त्याच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार क्षेत्र निवडत असते. समाजाची आज फार मोठी मानसिकता झाली आहे की, माझ्या मुलांने शिक्षण घेऊन प्रशासनात अधिकारी व्हावे, डॉक्टर, इंजिनीअर, वकील, पोलिस अशा विविध क्षेत्रात मोठे नाव कमवावे असा निर्धार पालक करून टाकतात. त्यादृष्टीने अपेक्षांचे ओझे त्याच्या पाठीवर बांधून त्याला या जीवघेण्या स्पर्धेत उतरवतात. त्याला समजून घ्यायला त्याच्या आवडी निवडी, कल ओळखायला येथे कुणालाच रुची नाही. पालकांना त्याला समजून घ्यायला वेळ नाही. कारण त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पैसा लागेल यासाठी पालक रात्रंण दिवस स्वतःच्या कामात गुंतून घेतात. ज्यांच्यासाठी पैसा कमावतो, ज्याच्या पाठीवर अपेक्षांचे ओझे बांधले, त्याला मात्र एकदाही जवळ घेऊन आपण विचारत नाही. बाळा तुला हे अपेक्षांचे ओझे झेपवते का, की तुला तुझ्या इच्छेने आवडीने क्षेत्र निवडायचे आहे. जर हा संवाद मुलांनसोबत आवडीने साधला गेला, तर मुले स्वच्छेने आवडीने क्षेत्र निवडतील. पुढील येणाऱ्या काळात देशात कलाकार, कलावंत, खेळाडू, शास्त्रज्ञ, संशोधक असे विविध क्षेत्रात काम करणारी माणसं निर्माण झालेली दिसतील. भारत हा कृषीप्रधान देश आहे. प्रत्येकाला स्वतःची भरपूर शेती असावी असे वाटते. परंतु आपल्या मुलाने शेतात काम करू नये हा अट्टाहास प्रत्येकाचा आहे. ज्या देशात सर्वात मोठा व्यवसाय शेती आहे आणि जो तुम्हाला करायला आवडत नाही. येणाऱ्या पिढीने तो करू नये म्हणून त्याच्या मनात तुम्ही भरवत असाल तर भारत देश व भारताची आर्थिक व्यवस्था येणाऱ्या काळात कशी असेल? हा विचार न केलेलाच बरा. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितले होते. जोपर्यंत या देशातील आई-वडील आपला मुलगा नोकर व्हावा असे स्वप्न पाहणे बंद करणार नाही. तोपर्यंत या देशात मालक जन्माला येणार नाही. अर्थात प्रत्येक जण नोकर होण्याच्या मागे लागलेला आहे. कुठेतरी हे मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले पाहिजे. तरच मुलांच्या आत्महत्या थांबतील. मुलांमधील नैराश्य, निरुत्साह संपेल. मुलांना त्यांच्या इच्छेनुसार क्षेत्र निवडू द्या, त्यांच्या अंगी असलेले कलागुण त्यांना जोपासू द्या. अभ्यासाबरोबर इतर आवडीनिवडी जोपासल्या तर अभ्यासाचा ताण येत नाही. ज्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट आणि घाम गाळला तिच मुले राहिली नाही. तर आयुष्यात पाहिलेल्या स्वप्नांचे काय करायचे. यासाठी पालकांनी स्वतःच्या मुलांना समजून घ्यायला पाहिजे. मुलांशी वागताना पालक, मित्र, गुरू अशा विविध भूमिकेतून त्यांच्याशी वागले पाहिजे. आज मुलांना पालकांशी मनमोकळा संवाद साधता आला पाहिजे. त्यातून मुले व्यक्त होतील त्यांच्या मनातील भावना प्रकट होतील. कुठे तरी त्यांच्या मनावरील अपेक्षेचा ताण कमी होईल. जीवनात यश व अपयश पचवता आले पाहिजे. मुलांना सक्षम बनवा त्याला आनंद, दुःख, यश, अपयश पचवण्या योग्य सक्षम बनवा. एकदा अपयश आले म्हणजे आयुष्य संपत नाही. जगात असंख्य अपयश आलेल्या व्यक्तीने स्वतःची ओळख जगाला करून दिलेली आहे. अपयश तुम्हाला संपवत नाही तर तुमच्यात पुन्हा जिद्द, प्रेरणा निर्माण करत असते. पुन्हा पूर्ण ताकतीने तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला पुन्हा एक संधी देत असते. मुलांनी हे अपयश मनाला लावून न घेता स्वतःला परिपूर्ण होण्याची पुन्हा एक मिळणारी संधी म्हणून ते स्वीकारले पाहिजे. जीवन हेच एक संघर्षमय परीक्षा आहे. या परीक्षेसाठी आयुष्यभर झिजावे लागते. तुम्ही माणूस म्हणून हरलात तर आयुष्यातील कोणतीही गोष्ट जिंकू शकणार नाही. म्हणून सर्वप्रथम स्वतःला जिंका तर तुम्ही जगाला जिंकु शकाल. आत्महत्या हा कोणत्याच अपयशावरचा पर्याय नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पुन्हा एकदा जोमाने तेवढ्यात जिद्दीने स्वतःला सिद्ध करा. मेहनत व अपार कष्ट करण्याची जिद्द तुमच्यात असेल, तर तुम्ही परीक्षा नाही तर स्वतःचे आयुष्य जिंकाल.
असफलता एक चुनौती है,
स्वीकार करो क्या कमी रह गई,
देखो और सुधार करो जब तक न सफल हो,
नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का
मैदान छोड मत भागो तुम
कुछ किये बिना ही जय जय कार नही होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती ||
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment