" क्रोध " विनाशास आमत्रण !
माणसाचे मन हे उधळणाऱ्या घोड्याच्या टाका सारखे असते. मिळेल त्या जागेवर दौडत राहते. क्षणात जगाची सफर करण्याची ताकत मनात असते. मनाचा मागोवा घेणे म्हणजे समुद्राच्या पाण्याचा तळ गाठण्यासारखे आहे. मनासारख्या गोष्टी घडल्या तर मन आनंदी होते. एखादी नको असलेली सहज गोष्ट घडली तर लगेच मन दुखावते. ती भावनेतून प्रगट होते. त्यालाच क्रोध आला असे आपण म्हणतो. क्रोध म्हणजे विनाशाचे आमंत्रण होय. माणसाला क्रोध आला की, त्याच्या मनावर व विचारावर त्याचा ताबा राहत नाही. आपण कुणासमोर बोलतो, काय बोलतो याचे भान माणसाला राहत नाही. क्रोध मुळात प्रत्येकात असतो. फक्त काही जण प्रगट करतात. तर काहीजण याला आवर घालतात. क्षणाक्षणाला सैरावैरा वायूच्या वेगाने धावणाऱ्या मनावर ताबा मिळवला तर क्रोध येणारच नाही. क्रोध आमचा चांगुलपणा आहे. चांगले वाईट क्षणात ओळखून विचारांना प्रगट व्हायला लावते ते मन. आयुष्यात जन्माबरोबर प्रत्येकाला सुंदर शरीर व सुंदर मन मिळते. पुढे याच शरीराच्या साथीने मन इच्छा, आकांक्षांचा डोंगर सजवायला लागते. यशाची शिखरे व प्रतिष्ठेचा डोंगर रोजच काबीज करावे असे वाटते. आयुष्याच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी माणूस क्षण क्षण झिजत राहतो. कधीकधी मात्र ही शिखरे व डोंगर काबीज होत नाही. याचा माणसाला प्रचंड राग येतो. मनुष्य सतत क्रोधित राहतो. यामधून तिरस्काराच्या भावनांनी सतत व्यक्त होतो. त्याचाच क्रोध त्याला जाळत असतो. क्रोध हा स्वतःचाच शत्रू आहे. तो एकदा आपल्या मनावर ताबा करायला लागला की, आपल्या हातून नको असलेल्या चुका घडत जातात. क्रोधामुळे नाती-गोती, यश, प्रतिष्ठा क्षणात धुळीस मिसळते. क्रोधावर नियंत्रण ठेवले नाही तर माणूस अनेक गोष्टींपासून दुरावत जातो. क्रोधाला संयमात रूपांतर करता आले पाहिजे. क्रोधाला आवर घालण्यासाठी योग्य औषध म्हणजे नम्रता होय. नम्रपणा सतत जवळ ठेवला तर क्रोध जवळही भटकत नाही. अहंकाराची वलयं हळूहळू नाहीशी होत जाते. माणसाचा स्वभाव हा वेगवेगळ्या फुलांच्या अलंकारांनी नटलेला आहे. राग, लोभ, मत्सर, अहंकार, नम्रपणा, प्रामाणिकपणा या अलंकारांना ओळखता आले पाहिजे. क्रोधाच्या अंलकारा पेक्षा नम्रतेचा अलंकार अंगी बाळगला, तर जीवन रंगाप्रमाणे उमटून व सुगंधा प्रमाणे सुवाच्छ होऊन जाते. जीवनात मिळविलेल्या अनेक गोष्टींना टिकवण्यासाठी क्रोध आवरता आला पाहिजे. माणसाला जगातील कोणतेच विचार हरवत नाही. तर त्याचा क्रोध त्याला अपयशाची पायरी चढायला लावतो. जगात सुंदर नाती, सुंदर माणसं आहे. ती जपतांना फक्त त्यांना आपल्या क्रोधाचा स्पर्श होऊ देता कामा नये. सुंदर विचारांची वेसन मनाला सतत घालून ठेवली. व संयमाचा ओलावा पाझरत राहिला तर क्रोध कधीच आपले डोके वर काढणार नाही. एकदा क्रोध नाहीसा झाला की, मनुष्य चंदनाच्या वृक्षाप्रमाणे सतत सुगंधी होऊन जाईल. तो सुंगध सगळीकडे दरवळत राहील.
आनंद या जीवनाचा सुंगधापरी दरवळावा,
झिजून स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा….
पाव्यातला सूर जैसा ओठांनी ओघळावा,
आनंद या जीवनाचा सुंगधापरी दरवळावा….
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment