Sunday, 26 July 2020

वाढती लोकसंख्या बेरोजगारीस आमंत्रण



  वाढती लोकसंख्या बेरोजगारीस आमंत्रण



11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस

भारत हा कृषिप्रधान देश आहे.शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे.तर शेतीस काही पूरक व्यवसाय सुद्धा केले जातात. सर्वसामान्य लोकांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत म्हणून शेती या व्यवसायाकडे पाहिले जाते.परंतु गेल्या काही वर्षात मागे वळून पाहिले तर परिस्थिती थोडीशी वेगळी होती.भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या फार कमी होती.त्यामुळे सहाजिकच प्रत्येक कुटुंबात भरपूर शेती होती.पुढे कुटुंबाचे विभाजन होत गेले.नवीन वारस जन्माला आले त्यातून शेतीचे विभाजन होत गेले.शेती आहे तेवढी आहे.शेतीच्या क्षेत्रफळात काही बदल झाला नाही आणि उद्याही बदल होणार नाही. क्षेत्रफळ आहे तेवढेच आहे फक्त वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे विभाजन होत गेले.आज गावोगाव मोजक्याच शेतकरी वर्गाकडे भरपूर पुरेशी शेती आहे.नाहीतर जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे मोजकीच शेती आहे.कमी शेतीत कसाबसा उदरनिर्वाह शेतकरी भागवतात. यात सुद्धा वाढते शहरीकरण, तलाव,धरण,मोठी मोठी राष्ट्रीय महामार्ग,व्यवसाय,उद्योगधंदे यात भरपूर प्रमाणात शेती गुंतली गेली.अनेक शेतकरी भूमिहीन झाले.अर्थात आर्थिक स्वरूपाचा मोबदला मिळाला खरा,पण आयुष्याची पोटाची खळगी भरणारी जमीन मात्र कायमची गेली.भूमिहीन शेतकऱ्यांना आज मजुरी करावी लागते.अर्थात वाढत्या लोकसंख्येमुळे आज ही वेळ आलेली आहे.हे समजून घेणे गरजेचे आहे.आजही समाजात वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलगी झाल्यावर परत मुलासाठी अपत्य होऊ दिले जाते. मुलाच्या हट्टापायी कुटुंबात अनेक मुली जन्माला घातल्या जातात.तर काही भागात वाडी-वस्तीवर,खेड्यापाड्यात शिक्षणाचा अभाव पती-पत्नी दोघेही अशिक्षित किंवा फार कमी असणे,कुटुंब नियोजनाची माहिती नसणे,कुटुंबनियोजनाची साधने माहिती नसणे,कुटुंब नियोजनाची साधने उपलब्ध न होणे आदी कारणामुळे अनेक बालकांना जन्माला घातले जाते. यामुळे लोकसंख्या फार झपाट्याने वाढत गेली आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता बालकांना जन्माला घातले जाते.यात आई-वडील व जन्माला आलेली मुले यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो.आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत वाढत्या लोकसंख्येमुळे जिकडेतिकडे गर्दीच गर्दी पहावयास मिळते. बसस्थानक,रेल्वेस्थानक,बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे,शाळा, महाविद्यालय,शासकीय कार्यालये आदी ठिकाणी प्रचंड गर्दी दिसून येते. 
               आजची तरुण पिढी विविध क्षेत्रात शिक्षण घेत आहे.मेडीकल, इंजिनिअर,अँग्रीकल्चर,फार्मसी,शिक्षण शास्त्र, वकिलीचे शिक्षण,बँकिंग क्षेत्राचे शिक्षण घेऊन लाखोच्या संख्येने विद्यार्थी दरवर्षी नोकरीच्या शोधात फिरत आहे.मुळात राज्य सरकार,केंद्र सरकार यांच्या दरवर्षीच्या आर्थिक धोरणानुसार नोकरभरती केली जाते. लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय कार्यालयात नोकरभरती होत नाही.आवश्यकता असताना सुद्धा शासन भरती करत नाही.नोकरभरती केली तरी शंभर टक्के नोकर भरती होत नाही यामुळे उच्चशिक्षित मुलांना नोकरीसाठी वणवण फिरावे लागते.लोकसंख्येच्या तुलनेत व्यवसाय, उद्योगधंदे पुरेशे नाही.त्यामुळे खाजगी क्षेत्रात सुद्धा कंपन्यांमध्ये मुलांना नोकऱ्या नाही.आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या शोधामुळे यंत्रसामग्रीच्या माध्यमातून कामे केली जातात. यामुळे कमी वेळेत अधिक कामे होतात.दर्जेदार व जलद गतीने पुर्ण होणारे काम यामुळे आधुनिक यंत्रसामग्रीने कामे पूर्ण केली जात आहे.यामुळे हजारो हातातील काम चुटकीसरशी गायब झाले आहे.
                   भारत हा एक विकसनशील देश असुन नैसर्गिक साधनसंपत्ती पैकी मानवी साधनसंपत्तीचा विकासासाठी उपयोग करून घेणे हे एक आव्हान योजनाकारांपुढे आहे. आर्थिक विकास होत असताना यांत्रिकीकरण बरोबर मनुष्यबळाचा वापर करणे आवश्यक आहे.मानव श्रमामुळे आर्थिक विकासात भर घातली जाते. भारतासारख्या मुबलक मनुष्यबळ असणार्‍या देशात मानवी श्रमाचा वापराच्या अभावामुळे बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण होत आहे.ही समस्या केवळ व्यक्तिगत नसून ती एक राष्ट्रीय व ज्वलंत सामाजिक समस्या आहे. बेकारांची संख्या वाढल्याने त्यातून दारिद्र्य, विषमता,गुन्हेगारी,हिंसाचार यासारखे सामाजिक प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र बनतात.त्यामुळे समाजाचे स्वास्थ्य नष्ट होते.शिक्षण, नोकरी,व्यवसाय,कामधंदा,राहणीमान, आरोग्य, दैनंदिन उदरनिर्वाह अशा अनेक समस्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होत आहे.आज देशात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे काम न मिळणे होय.आज अनेकांच्या हाताला काम नाही काम नाही म्हणून दाम मिळत नाही.अर्थात हातात पैसा नाही म्हणजे पोटाचा प्रश्न निर्माण होतो.आजही खेड्यापाड्यातील लोक कामासाठी शहरात स्थलांतर करतात. या स्थलांतरामुळे शहरात प्रचंड गर्दी वाढली आहे.आज देशातील मुंबई व कलकत्ता ही सर्वात जास्त लोकसंख्येचे शहरे बनली आहे.तर महाराष्ट्रातील ठाणे हा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देशात मोठा जिल्हा ठरला आहे.आज भारताचा जगात लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो. 2019 पर्यंत भारताची लोकसंख्या 136 कोटी वर पोहोचली आहे.या वाढत्या लोकसंख्येतून बेरोजगारी हा एक ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे.कुठेतरी वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा म्हणून महाराष्ट्र सरकारतर्फे लहान कुटुंब नियम 2005 हा नियम 28 मार्च 2005 रोजी राज्यात लागू केला आहे. त्यानुसार दोन मुला पेक्षा अधिक मुले असणारी व्यक्ती राज्य सरकारच्या नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात आलेली आहे.याचबरोबर महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात दुरुस्ती करून तीन अपत्ये असणाऱ्या व्यक्तींना निवडणूक लढण्याचा अधिकार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.कुठेतरी लोकसंख्येला आळा बसावा व वाढत्या लोकसंख्येमुळे उद्भवणारे प्रश्न थांबावे यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना व जनजागृती केली जाते. आज समाजात प्रत्येक जण शिक्षित होतोय कुठेतरी सुशिक्षित वागण्याची गरज निर्माण झालेली आहे.मुलगा मुलगी असा भेद न करता जन्माला येणाऱ्या बाळाचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. भविष्यातील दुष्परिणामांची चाहूल लक्षात घेता प्रत्येक कुटुंबात जास्तीत जास्त दोन बालकांना जन्म दिला पाहिजे.किती बालके जन्माला घातली यापेक्षा त्या बालकांचे संगोपन, शिक्षण, आरोग्य किती चांगल्या प्रकारे आपण करु शकतो या गोष्टीचा विचार करूनच बालकाला जन्माला घातले पाहिजे. जगात फक्त लोकसंख्येने देश मोठा होऊन चालणार नाही तर त्याबरोबर प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळाले पाहिजे.प्रत्येक माणसाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला काम मिळणे ही महत्त्वाची गरज आहे. प्रत्येकाला काम मिळाले तर स्वतःचा उदरनिर्वाह व्यवस्थित पद्धतीने तो भागऊ शकेल.यामुळे निश्चितच दारिद्र्य, विषमता, गुन्हेगारी, हिंसाचार यासारखे सामाजिक प्रश्न सुटतील.प्रत्येक नागरिक सुजलाम सुफलाम होऊन या देशात आनंदाने जगू शकेल.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...