Monday, 27 July 2020

इंटरनेटच्या काळात वाचनाचा छंद जोपासुया


                   इंटरनेटच्या काळात
                वाचनाचा छंद जोपासुया


माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे पुस्तक होय. माणसाला बालपणापासून घडवण्याचे काम संस्कार करतात. कुटुंबातून व शाळेतून उत्तम संस्कार मिळत असतात. असाच वाचनाचा संस्कार बालपणी आपले गुरुजी आपल्याला देतात. अ आ इ पासून ज्ञ पर्यंत आपली स्वर व व्यंजनाशी ओळख होते. हळूहळू आपण वाचायला शिकतो. वाचनामुळे आयुष्यात किती मोठा फायदा होतो, ते त्या वयात कळत नाही. पण आपण वाचन करत जातो. हीच वाचनाची सवय माणसाला आयुष्यात समृद्ध बनवते. कारण प्रत्येक जण ज्या प्रकारचे वाचन करतो, त्यानुसार त्याचे विचार बनत जातात. विचारावर त्याचे आचरण घडत जाते. आचरणातून त्याचे कार्य घडत असते. म्हणून वाचनाची सवय ही प्रत्येकाला असलीच पाहिजे. वाचनामुळे माणूस किती मोठा होतो, याचे उदाहरण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना शाळेत जायला लागले. त्या काळातील समाजाने अस्पृश्यतेच्या नावाखाली त्यांना खूप छळले. यामध्ये वर्गातील विद्यार्थी सुद्धा मागे नव्हते. वर्गातील मुले बाबासाहेबांशी बोलत नसत. त्यांना जवळ बसू देत नसत. कुणी स्वतःहून त्यांच्याशी मैत्री करत नव्हते. यातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकाशी मैत्री झाली. याचा फायदा असा झाला की, याकाळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तके वाचायला सुरुवात केली. मिळेल ते पुस्तक त्यांनी वाचुन टाकले. यामुळे त्यांच्या ज्ञानात प्रचंड वाढ झाली. वाचनामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अठरा-अठरा तास अभ्यास करण्याची सवय लागली होती. वाचनामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडले. आज संपूर्ण भारत देशात व देशाच्या बाहेर सुद्धा बाबासाहेबांचे विचार व कार्याची प्रेरणा घेतली जाते. म्हणून प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. भारत देशाने विज्ञान व तंत्रज्ञानात प्रगती केली. या प्रगतीचा प्रभाव थोडासा आजच्या तरुण पिढीवर विरुद्ध होताना दिसत आहे. त्याचे कारण असे की आजची तरुण पिढी मोबाईल व इंटरनेट मध्ये प्रचंड गुंतली आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे अत्याधुनिक मोबाईल आहे. त्यामुळे वाचनाची सवय हळूहळू कमी होत चालली आहे. कुटुंबातील संवाद कमी होत आहे. गप्पागोष्टी, संवाद, चर्चा होताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, लॅपटॉप, वाट्सअप, फेसबुक, ट्विटर, यासारख्या गोष्टींचा अतिवापर होय. जुन्या काळात प्रत्येक जण न्यूज पेपर आवडीने वाचायचा. वाचनालयात जाऊन वाचन करायचा. अनेक कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, प्रवास वर्णन, नाटक, संवाद पत्रिका, आवडीने वाचायचे. यामुळे वैचारिक पातळी अत्यंत चांगली होती. आज आपण पाहतो शिक्षणाची टप्पे पार करताना प्रत्येक जण वाचन करतो. अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी वाचन करतो. स्वतःची ध्येय साध्य झाले की, जो तो आपापल्या व्यवसायात, नोकरीत, काम धंद्यात स्थिरावतो. हळूहळू वाचनापासून दूर होतो. माणसाला ज्याप्रमाणे शारीरिक वाढ व विकासासाठी उत्तम आहार व व्यायामाची गरज आहे. त्याप्रमाणे बौद्धिक विकासासाठी वाचनाची गरज आहे. प्रत्येकाला लहानपणापासून वाचण्याची सवय लागावी यासाठी राज्यसरकारने 15 ऑक्टोंबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सुरू केला आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोंबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो. डॉ.अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येकांनी वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. देशातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक विचार करून स्वतःला समृद्ध करण्यासाठी वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वजण नियमित वाचन करूया व इतरांना सुद्धा वाचनाची प्रेरणा देऊया.


“ वाचाल तर वाचाल. ’’

“ एक पुस्तकच सुंदर मस्तक घडवते. ”

“ पुस्तक वाचा ज्ञान वेचा. ”

“ वाचन केल्याने मिळते ज्ञान, दुर पळते आपले अज्ञान. ”

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...