मानवी जीवन संस्कार व संस्कृतीने घडलेले असते. संस्कार व संस्कृतीचे पालन करताना, अनेक चांगल्या गोष्टीचे पालन केले जाते. चांगल्या सवयी माणसाला उत्तम घडवतात. चांगल्या सवयी व चांगली माणसं हे समाजाची प्रतीक आहे. माणूस अनेक कलागुणांनी नटलेला असतो. अनेक चांगल्या सवयींनी घडलेला असतो. मानवाची प्रतिमा ही त्याच्या सत्यावर अवलंबून असते. सत्याची परीक्षा ही कठोर असते. परंतु त्याचा विजय दीर्घकाळ टिकणारा असतो. माणसाला जगत असतांना पावला पावलावर सत्याची परीक्षा द्यावी लागते. माणसाला चांगल्या सवयी बालपणापासून अंगवळणी पडलेल्या असतात. यातीलच एक चांगली सवय म्हणजे खरे बोलणे. सत्य बोलणारी माणसं नेहमी सूर्याच्या प्रकाशा सारखे उठुन दिसत असतात. सत्य हे नेहमी सूर्यासारखे प्रखर व गंगेच्या पाण्यासारखे नितळ असते. सत्याचा सुगंध हा चोहीकडे सदैव दरवळत असतो. आयुष्यात नेहमी सत्य बोलावे. माणसाच्या वाणीतून निघणारे शब्द हे त्याचे प्रतिबिंब उमटवत असतात. माणसाचे कर्तव्य मान-सन्मान अबाधित राखण्यासाठी मनुष्य हा सत्यवचनी असावा. समाजात माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या खऱ्या बोलण्यावरून ठरत असते. सत्य बोलणारी माणसं ही समाजाला आवडणारी असतात. जीवनात कितीही संकटे आली, कितीही मोठा स्वार्थ, फायदा असला तरी सत्य वचनाचा मार्ग सोडू नये. सत्य नेहमी परीक्षा घेत असते. पण सत्याचा निकाल हा चिरकाल टिकणारा असतो. समाजात सत्य बोलणाऱ्या लोकांना त्रास झालेला आहे. संत महात्म्य, समाजसुधारक, राजे-महाराजे, थोर विचारवंत यांना अनेक गोष्टीचा त्रास झाला. अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. परंतु त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही. सत्याचा जीवनात सदैव प्रकाश तेवत ठेवला. त्यामुळे ते आज समाजात आदर्श ठरले. समाजात न्याय, नीती व धर्म टिकून आहे तो सत्यावरच. जेव्हा जेव्हा समाजात अन्याय वाढतो. सत्याला किंमत राहत नाही. असत्य वाढू लागते. तेव्हा क्रांती घडल्याशिवाय राहत नाही. आज देशात धर्म टिकून आहे. संस्कृती टिकून आहे. याच्या मुळाशी सत्य हे खोलवर रुजलेले आहे. या देशात राहतांना संस्कार व संस्कृती बरोबरच स्वतःमध्ये सत्य सुद्धा ठासून भरले पाहिजे. तरच माणसाचे व्यक्तिमत्त्व उत्तम घडेल. सत्य हीच माणसाच्या जीवनाची खरी परीक्षा आहे. आयुष्यात जन्माला येताना सोबत काही आणले नव्हते व जाताना सुद्धा सोबत काहीच येणार नाही. येथेच मिळवलेले ज्ञान, देह, शरीर सर्व एक दिवस येथेच सोडून जायचे आहे. पण सत्यांनी कमावलेली कीर्ती तुमच्या सोबत येणार आहे. माणसाच्या पश्चात त्याची कीर्तीच त्याची ओळख बनून राहते. माणसाने आयुष्यात सदा सर्वकाळ सत्य बोलावे, सत्य वागावे. येणाऱ्या काळात सत्याची मधुर फळं चाखायची असेल तर जन्माला आलेल्या मुलामध्ये चांगले संस्कार व खरे बोलण्याची सवय बालपणीच रुजवली पाहिजे.
‘‘ सत्य परेशान हो सकता है, पराजित नही ’’
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment