Friday, 24 July 2020

लेख सकारात्मक आयुष्य

सकारात्मक आयुष्य


जीवन जगताना स्वतःमध्ये प्रचंड सकारात्मक असायला पाहिजे.प्रत्येक दिवशी निघणारी सकाळ रात्रीच्या  गडद अंधारावर मात करून निघत असते.प्रत्येक दिवस नवीन प्रेरणा, नवीन उत्साह,नवीन कार्य घेऊन येत असतो.आपण या नवीन कार्यासाठी सकारात्मक असले पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक सकाळ कालच्या पेक्षा अधिक नवचैतन्य घेऊन येत असते.आपल्याला मात्र हे नवचैतन्य ओळखता आले पाहिजे.आयुष्यातील प्रत्येक दिवस,प्रत्येक क्षण हा अनमोल आहे तो क्षण आपण सकारात्मक व्यतीत केला पाहिजे.येणारा क्षण कसाही येईल तो आपण सकारात्मक जगला पाहिजे.जीवन सुंदर आहे ते अधिक सुंदर बनवणे प्रत्येकाच्या हातात आहे.आपण जीवनाला कसे गृहीत धरून जगतो यावर आपले सुख व दुःख अवलंबून आहे.अनेक जण स्वतःमध्ये प्रचंड नकारात्मकता बाळगतात.प्रत्येक दिवस,प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव हा त्यांच्या दृष्टीने मनासारख्या घडत नाही.असे ते मनाशी गृहीत धरतात.जीवनात चांगले घडणार नाही.जीवन हे नशिबावर अवलंबून आहे असा त्यांचा गैरसमज असतो.अर्थात स्वकर्तृत्व व स्वतः मधील सकारात्मकता तुमचे नशीब घडवत असते. तुम्ही जसा विचार करता तसे तुमचे आचरण घडत जाते. तुमचे आचरण जसे असेल तशी कृती तुमच्या हातून घडत जाते.त्यामुळे विचार सकारात्मक ठेवा सकारात्मक विचार हे सकारात्मक कृतीला जन्माला घालते.आयुष्यात कुठलाही प्रसंग घडो कुठलीही वेळ येवो तुम्ही मात्र त्यावेळी सकारात्मक असायला पाहिजे.तुमच्यावर येणारे संकट किंवा दुःख तुम्ही कसे वागता यावर त्याचे जाणे अवलंबून असते.नकारात्मक सोच ही माणसांला नैराश्याकडे घेऊन जात असते.नैराश्याची खायी खूप खोल असते.त्यातून स्वतःला सावरणे फार कठीण असते.नकारात्मक गोष्टी माणसाला व्यसन,नैराश्य,आत्महत्या आदी गोष्टीकडे खेचत जात असते. म्हणून जीवनात प्रचंड सकारात्मक असायला हवे.जन्माला येतांना बरोबर काहीच सोबत घेऊन आलो नाही व जाताना सोबत काहीच येणार नाही. म्हणुन खंत करत बसण्यापेक्षा आनंदी जीवन जगत राहणे हे महत्त्वाचे आहे.महाभारताचा युद्धभूमीवर अर्जुनाने समोर लढण्यासाठी उभे असलेल्या स्वकीयांना पाहून स्वतःमध्ये प्रचंड नकारात्मकता निर्माण केली होती.मी माझे गुरु,वडील बंधू,कुलगुरू, पितामह,सखे सोयरे त्यांच्याशी युद्ध करू शकत नाही.ज्यांनी मला वाढविले,शिकवले ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळून मोठा झालो त्यांच्याशी युद्ध करू शकत नाही.या युद्धासाठी माझे धनुष्य मला पेलवत नाही.स्वतःच्या हातातील धनुष्य खाली ठेवला.अर्थात अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता परंतु त्यांच्या मनात निर्माण झालेल्या नकारात्मकतेमुळे स्वतःच्या हातातील धनुष्य पेलण्या इतपत शौर्य त्याच्यात उरले नव्हते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितले.त्याच्यामध्ये सकारात्मक भाव निर्माण केला व धर्म-अधर्म यातील भेद समजुन सांगितला.खचलेला तोच अर्जुन पुन्हा एकदा नवचैतन्याने युद्धभुमीमध्ये युद्धासाठी उभा राहतो.प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तक,ग्रंथ,शाळा, शिक्षक,आत्मविश्वास,अपार कष्ट करण्याची जिद्द,गुरु यांच्या रूपाने श्रीकृष्णासारखा सारथी लाभतो.फक्त आपण त्या सारथ्याला ओळखले पाहिजे.त्यांच्या साहाय्याने आयुष्यात आलेली नकारात्मकता घालवली पाहिजे.तरच आपण आपल्या जीवनातील जगण्याचे खरे महायुद्ध जिंकू.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...