Saturday, 25 July 2020

खाकीचा अभिमान बाळगा

    खाकीचा अभिमान बाळगा

महाराष्ट्र राज्य पोलीस हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था राखणारी संस्था आहे." सद्रक्षणाय खलनिग्रहणाय " हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की,महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत.दिवस असो अथवा रात्र याची तमा न बाळगता ऊन,वारा,पाऊस यांचा सामना करत जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहतात.ते खाकी वर्दीतील महाराष्ट्र पोलीस होय.राज्यात कोणतेही संकट येवो त्यांचा सामना करण्यासाठी पोलीस तात्काळ हजर असतात. अपघात झाला,गर्दी झाली,चोरी झाली,दंगा झाला,दरोडा पडला,अपहरण झाले,जातीय तेढ निर्माण झाली, आकस्मित नैसर्गिक घटना घडली.अशा अनेक घटना घडल्या की, क्षणात पोलीस हजर होतात.का तर त्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची शपथ घेतली आहे म्हणून, की त्यांना या गोष्टीची आवड आहे.याता विचार सर्वांनी केला पाहिजे.राज्यात वर्षभर मोठ्या धुमधडाक्यात राष्ट्रीय सण,परंपरेने चालत आलेले उत्सव साजरे होतात.यामध्ये गुढीपाडवा,पोळा, नागपंचमी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव,दसरा,दिवाळी सरत्या वर्षाला निरोप,नवीन वर्षाचे आगमन आदी उत्सव आपण आपल्या कुटुंबासोबत धुमधडाक्यात,जल्लोषात साजरे करतो.पण याच वेळेस खाकीतील पोलीस स्वतःच्या कुटुंबापासून दुर राहून,इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानतात.इतरांच्या कुटुंबातील आनंद असाच तेजोमय राहावा. यासाठी दिवस- रात्र गल्लीबोळात, शहरातील चौकाचौकात आपली ड्युटी बजावत असतात.का त्यांना हे सण साजरे करायला आवडत नाही.की हे सण त्यांच्यासाठी नाही.की त्यांच्या कुटुंबासोबत सण साजरे करू नये असे कुठे नियम बनवले गेले आहे. पोलिसांना सुद्धा मन, भावना, प्रेम,आदर आहे.त्यांनासुद्धा आई,वडील,मुलं,पत्नी,कुटुंब, नातेवाईक,शेजारी आहे.पण या सगळ्यापेक्षा कर्तव्य अधिक महत्त्वाचे आहे.स्वतःच्या आनंदापेक्षा कायदा सुव्यवस्थेची कर्तव्य अधिक मोठे व महत्त्वाचे आहे. हे पोलीस बांधव प्रामाणिकपणे जाणतात. इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद ते मानतात.अनेक दिव्यांच्या लख्ख प्रकाशात एखादा दिवा बंद राहिला तर,त्या प्रकाशाला काही फरक पडत नाही.मात्र बंद असलेल्या दिव्याभोवतीच्या अंधाराने तेथील परिसराला निश्चितच फरक पडतो.हा विचार समाज मनाने केला पाहिजे. आज-काल समाजाला खाकीतील राग दिसतो. पण खाकीच्या मागील त्याग कुणालाच दिसत नाही. पोलीस कठोर आहे.पोलिसांना मन,भावना नाहीत. पोलिस म्हणजे सामान्य जनतेवर अधिकार गाजवणारे खाकीतील निर्दयी माणसं असे समाजाला वाटते.परंतु माणसालाच माणसांसाठी कठोर व्हावे लागते.पोलिसांना कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर व्हावे लागते.ऐरवी ते सुद्धा माणसंच आहेत.त्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे.समाजात क्षमा न करणारे पोलिस आपल्याला आठवतात.पण चुका करणारे कायदा तोडणारा समाज,नागरिक आठवत नाही.कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस कठोर होतात. त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात.समाजाला फक्त नागरिक म्हणून कायदा-सुव्यवस्थेच्या नियमांचे काटेकोर पालन करायचे आहे.खाकीतील पोलीस बांधवांना सहकार्य करणे,त्यांचा आदर करणे, वेळोवेळी त्यांना मदत करणे,ही सामान्य नागरिक म्हणून आपली कर्तव्य आहे.या कर्तव्याचे आपण प्रत्येकाने पालन केले पाहिजे.आज सामान्य माणूस आपली कर्तव्य विसरत चालला आहे. कायदा हातात घेऊन तो मनमानी करत आहे.कायद्याने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहे.स्वतःला सुशिक्षित, उच्चशिक्षित समजून घेणारा नागरिक जेव्हा कायदा मोडू पाहतो. तेव्हा याच खाकीतील पोलीस त्याला नियमांची आठवण करून देतात.नियम,कायदा तोडण्या पासून रोखतात.अशावेळी नागरिकांना पोलिसांचा प्रचंड राग येतो.यातूनच पोलिसांना धक्काबुक्की करणे, पोलिसांवर हल्ला करणे,पोलिसांना धमकी देणे,शिवीगाळ करणे,अशा स्वरूपाच्या विघातक कृती घडतांना दिसत आहे.अत्यंत निंदनीय अशा घटना या महाराष्ट्रात घडतात. तेव्हा निश्चितच आपल्या सर्वांना कुठेतरी अस्वस्थ जाणवते.कुठेतरी विचार, चिंतन करण्याची गरज आहे. ज्यांच्या खांद्यावर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची,सामान्य जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे.त्यांचा आदर सोडून त्यांच्यावरच हल्ले होत असेल. तर त्यांनी या जनतेची का सेवा करावी.या जनतेला किती संरक्षण द्यावे.असा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांचा अभिमान बाळगायला हवा. कारण आपल्या घरातील आई,बहिण आज विश्वासाने घराबाहेर पाऊल टाकते.ते याच खाकीचा भरवशावर. आज प्रत्येकाच्या घरात उशिरा रात्री आई-बहीण सुरक्षित पोहोचते.याच खाकीच्या भरोशावर.हे सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.खाकीचा अभिमान बाळगला पाहिजे.आज संपूर्ण जग कोराना महामारीला तोंड देत आहे. यात महाराष्ट्र गेल्या एका महिन्यापासून लाॅकडाऊन आहे. प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी सुरक्षित घरात थांबुन आहे.पण याच वेळी पोलिस मात्र रात्रंण दिवस रस्तावर नागरिकांच्या रक्षणासाठी उभे आहेत.स्वतःच्या कुटुंबाची, स्वतःची काळजी न करता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी घेऊन, कोरोनाच्या जोखमीत स्वतःला झोकून दिले आहे.आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. अन्न,पाणी, उन्ह,वारा कशाचीही पर्वा न करता स्वतःची कर्तव्य पार पाडत आहे.महाराष्ट्रातील प्रत्येकाला ही अभिमानाची व गर्वाची बाब आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेने वेळोवेळी पोलीस बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.त्यांच्या कर्तव्य प्रती अभिमान बाळगला पाहिजे.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...