Sunday, 26 July 2020

मानवी जीवन कष्टमय


मानवी जीवन कष्टमय



आईच्या गर्भातून मूल जन्माला येते. एक निरागस हास्य घेऊन या जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होते. जन्मानंतर आनंदात स्वतःच्या विश्वात हरवून जाते. हळूहळू जसजसे मोठे होऊ लागते. तसेतसे त्याला प्राप्त परिस्थितीचा अनुभव येत जातो. स्वतःच्या कुटुंबातून, परिसरातून ते अनेक गोष्टी शिकत जाते. स्वतःच्या कौटुंबिक परिस्थितीनुसार आलेल्या समस्यांना तोंड देत राहते. ताठ मानेने उभे राहण्याचा प्रयत्न करत असते. अशा जडणघडणीत ते घडत असताना स्वतःच्या वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्या स्विकारत राहते. प्राप्त परिस्थिती नुसार मुलांना शिक्षण व संस्कार दिले जाते. मोठेपणी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, कामधंदा करण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी ते सतत धडपडत असते. आपण पाहतो आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतात सर्वात जास्त शेती हा व्यवसाय केल्या जातो. अर्थात लहानपणापासूनच मुलांना शेतीविषयी कामे करण्याची, कष्ट करण्याची सवय लागलेली असते. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे विभाजन होत चालले आहे. पृथ्वीवर पाणी, जमीन यांचे क्षेत्रफळ आहे तेवढेच आहे. परंतु वाढती लोकसंख्या, शहरीकरण, व्यवसाय, उद्योग धंदे, धरण, रस्ते यामुळे जमिनीचे विभाजन होत चालले आहे. यातून शेतीचे क्षेत्रफळ कमी होत आहे. अनेकांना शेती नाही. अनेकांना स्वतःचा व्यवसाय नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नोकरी किंवा मजुरी करावी लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम करावे लागते. कष्ट केल्याशिवाय संसाराचा रथ गाडा चालत नाही. आज देशात सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे अनेकांना काम मिळत नाही. कामासाठी वणवण फिरावे लागते. शिक्षण घेणाऱ्या युवकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. तर एकीकडे शिक्षण नाही म्हणून काम मिळत नाही. अशी अवस्था आधुनिक युगात झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक यंत्रसामुग्री मुळे मानवांना मिळणारी कामे बंद झाली. याचे कारण म्हणजे यंत्रसामुग्री मुळे कमी वेळेत जास्त काम होते. कामासाठी पैसा ही कमी लागतो .कामाचा दर्जा सुधारला. यामध्ये गोरगरीब मजुरांच्या हाताला मिळणारी कामे नाहीसे होत चालले आहे. ग्रामीण भागात व शहरी भागात काम मिळाले नाही तर जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. काम मिळाल्याशिवाय घाम घाळता येत नाही. घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाही. दाम मिळाल्याशिवाय चूल पेटत नाही. ही वास्तव परिस्थिती आज देशात आहे. खेड्यापाड्यात काम मिळत नाही म्हणून दरवर्षी लोक कामाच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करत आहे. शहर हे आर्थिक गतिमानतेचे चक्र फिरवणारे ठिकाण. या ठिकाणी निश्चितच काम मिळते. या आशेवर लोक शहरात येऊन राहतात. मिळेल ते काम दिवसभर करायचे. सायंकाळी दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला घ्यायचा. मिळालेल्या रोजगारातून संध्याकाळच्या पोटासाठी लागणारे अन्नधान्य घ्यायचे. पोटाची खळगी भरायची. ही कामगाराची वास्तविक परिस्थिती आहे. जी आपण नाकारू शकत नाही. परंतु बदल मात्र निश्चित करु शकतो. सरकारने प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. असे धोरण ठरवावे. उद्योग, व्यवसाय उभारुन प्रत्येकालाच काम मिळावे असे धोरण ठरवले पाहिजे. १ मे हा कामगार दिन आहे. महाराष्ट्रात आज कामगारांच्या समस्या अनेक आहेत. वेळोवेळी कामगार आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात. कामगारांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे. वेळेवर वेतन मिळाले पाहिजे. कामगारांना कामावर मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. कामगार हा एक महत्त्वाचा घटक आहे. ही जाणीव सर्वात आधी समजून घेतली पाहिजे. कामगार टिकला तर काम पूर्ण होईल. मनुष्याला जन्माबरोबरच परिस्थितीशी झगडावे लागते. आपला जन्म कुठे व्हावा हे विध्यात्याने आपल्या हातात ठेवले नाही. कोण नोकर होणार आणि कोण मालक हे आपल्या हातात नाही. परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द मात्र प्रत्येकात आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात उत्तम कष्ट करत असतो. कष्टाची फळे गोड असतात. जीवनात कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. या जगात सहज काही मिळत नाही. अपार कष्ट व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते. माणूस जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत कष्ट करत असतो. मुळात मनुष्य जीवन फार कष्टमय आहे. इतर प्राणी, पक्षी यांच्या पेक्षा माणूस खूप कष्टाळू आहे. कारण माणसाच्या आशा-आकांक्षा खूप आहे. तो बुद्धिमान आहे. त्यामुळे त्याला या जगाच्या स्पर्धेत यशाचे अनेक उत्तुंग शिखरे चढावी वाटतात. यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करत असतो. स्वतः झिजत राहतो. जीवन जगणे एवढेच माणसाचे आयुष्य नाही. त्या पलीकडे काहीतरी नवीन येणाऱ्या पिढीसाठी करून ठेवण्याचे वेड त्याच्या अंगी असते. अपार कष्ट, जिद्द यांच्या जोरावर प्रत्येक मनुष्य स्वतःचे जीवन फुलवत असतो.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
rajendrashelke2018@gmail.com

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...