लेख
लॉकडाऊनमुळे कौटुंबिक स्नेह वाढला
पूर्वीच्या काळातील माणुस व त्याचे जीवनमान इतिहास जमा झाले असे वाटु लागले होते.कारण पूर्वीच्या काळातील माणुस अतिशय शांततेचे व आनंदाचे जीवन जगत होता.त्याच्या जगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भय,ताण तणाव,स्पर्धा दिसत नव्हती. तो त्याच्या कुटुंबाला लागणाऱ्या उदरनिर्वाहाच्या गोष्टी पुरताच विचार करत होता. मर्यादित स्वतःच्या गरजा पुरताच काम करत होता.हळूहळू परिस्थिती बदलली. एकविसाव्या शतकाला सुरुवात झाली. या एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाने केलेली प्रगती पाहता,माणसाचे जीवनमान अतिशय जलद गतीचे व वेळेच्या चौकटीत बांधले गेले आहे.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घड्याळातील काट्याप्रमाणे मनुष्य धावत आहे.या प्रगतीच्या मृगजळामागे धावतांना तो कधी मागे वळुन पाहतच नव्हता.माणूसच माणसाला हरवायला निघाला होता. जगाच्या स्पर्धेत टिकतांना स्वतःचे आयुष्य जगायला तो विसरला.अचानक कोरोना सारख्या विषाणूने या स्पर्धेला ब्रेक लावला.कुठेतरी एकदम सुन्नपणा आला. जगात महासत्ता म्हणून मिरवणारे अनेक देश कोरोनाच्या या संकटात चिंतेत पडले.या चिंतेने मनुष्याच्या जगण्याला बदलवून टाकले.माणूस स्वतःच्या आयुष्यात सुरुवातीच्या काळाप्रमाणे जगायला लागला.याचे कारण असे की,कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी एकविस दिवसाचे लाॅकडाऊन जाहीर केले. संपूर्ण भारत वासियांना एकविस दिवस घरातच राहण्याचे आव्हान केले. एकवीस दिवस घरातच बसून दैनंदिन कामे पूर्ण करायचे असे सांगितले.मग ती स्वतःची कामे असतील,अथवा प्रशासनाचे काम असेल घरी बसून पूर्ण करायचे.या एकविस दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये प्रत्येक माणूस सकाळी झोपेतूनच रिलॅक्सपणे उठत आहे.कुठलाही ताण तणाव चेहऱ्यावर नाही.कुठलीही स्पर्धा,घाई,धावपळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्णवेळ स्वतःच्या कुटुंबात तो घालवत आहे.कुटुंबातील लोक एकमेकांच्या जवळ आली.एकमेकांना वेळ देऊ लागली. नाष्टा,चहा,जेवण या गोष्टी एकत्र बसून करून लागली. रोजच्या दैनंदिन कामामुळे मग व्यवसाय असेल किंवा नौकरी या व्यस्ततेमुळे संपूर्ण कुटुंब आपआपल्या वेळेनुसार करणाऱ्या गोष्टी आज आनंदाने एकत्र करत आहे.यामध्ये जेवण करणे,टीव्ही पाहणे,गप्पा,गोष्टी,संवाद,हसी मजाक पुन्हा एकदा कुटुंबात घडत आहे.त्याचबरोबर बालपणीचे आवडते छंद शिक्षण,नोकरी,व्यवसाय यामध्ये कुठेतरी मागे पडले होते.कारण जगाच्या स्पर्धेत आपण मागे पडू नये म्हणून प्रत्येकजण छंद,आवड हे विसरला होता.स्वतःला या स्पर्धेत पुढे रेटून नेत होता.पण या एकविस दिवसाच्या लाॅकडाऊन मध्ये पुन्हा एकदा बालपणीचे छंद आठवले. यामध्ये चित्र काढणे असेल,गाणी म्हणणे,गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे,कविता,कथा,कादंबरीचे वाचण,इत्यादी. याबरोबरच चार भिंतीच्या आतील खेळ कॅरम,बुद्धिबळ, चंफुल,सोळाखडी हे खेळ नविन पिढीसोबत खेळता येत आहे.अशा गोष्टी नकळत घडत आहे.व यातून प्रत्येकाला आनंद मिळत आहे.अगदी बालपणात गेल्यासारखा अनुभव प्रत्येकाला येत आहे.आई,वडील,पत्नी,मुले यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारत मारत हळूच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू निश्चितच पैसा,संपत्ती, प्रगती यापेक्षा ते मोठे आहे.या लाॅकडाऊन च्या काळात निश्चितच प्रत्येक जण आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या अगदी जवळ आला आहे. मन,भावना,विचार या गोष्टी फक्त बोलून चालत नाही.तर त्या अनुभवाव्या लागतात.यासाठीच माणूस समूहाने राहत आलेला आहे.समूहातून निश्चितच प्रेम,आनंद,स्नेहभाव एकमेकांना मिळतो.व यातून माणूस वैचारिक व सुसंस्कारित बनत असतो.अशा माणसाच्या हातूनच उत्तम कार्य घडत असते.एकविस दिवसाच्या लाॅकडाऊनने निश्चितच प्रत्येकाला बालपण व तरुणपणाची आठवण करून दिली.या आठवणींनी प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात मागे वळून पाहता आले.कधी कधी नकळत चांगल्या गोष्टी घडतात.कोरोनाने प्रत्येकाला घरात बसायला लावले.पण या मोबदल्यात कौटुंबिक स्नेह वाढला हे तेवढेच खरे आहे.
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु.पो.किनगाव राजा
ता. सिंदखेड राजा
जि.बुलडाणा
9823425852
No comments:
Post a Comment