Monday, 27 July 2020

प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

        प्रथम महिला शिक्षिका         क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


एकोणिसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रूढिवादी,परंपरा असणार्‍या देशात स्त्रीला समाजात चूल आणि मूल एवढेच स्थान होते.स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते,शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते.त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला.सातारा जिल्ह्यातील शिरवळ पासून जवळच असलेल्या नायगाव या गावी 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते.वडील खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील होते.सावित्रीबाई फुले ह्या एकुलत्या एक लाडकी लेक होत्या.त्या काळात बालविवाहाची पद्धत होती.त्यामुळे सावित्रीबाई सात वर्षाच्या होताच त्यांच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरु झाली.एक चांगला नवरा मुलगा शोधून सावित्रीबाई फुले यांचा विवाह करावा या विचारात त्यांचे वडील होते.यातूनच ज्योतिबा फुले यांच्याशी 1840 मध्ये त्यांचा विवाह झाला.विवाहाच्या वेळी ज्योतिबा फुले तेरा वर्षांचे तर सावित्रीबाई नऊ वर्षांच्या होत्या. सावित्रीबाईंना बालवयापासूनच शिकावे असे मनातून वाटत होते.शिक्षणाविषयी त्यांना आवड होती.ज्योतिबा बरोबर सावित्रीबाईंचा विवाह झाल्यावर त्यांना मात्र त्यांच्या मनातील शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली.या दरम्यान ज्योतिबांना नेहमी वाटायचे स्त्रियांनी शिकावे शिक्षणामुळे स्त्री शिकली तर तिचा रूढी-परंपरा, छळ यातून सुटका होईल.स्त्रीला समाजात मान-सन्मान मिळेल.या विचारसरणीने ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीपासूनच स्त्री शिक्षणाचा आरंभ केला.सावित्रीबाईंना घरीच ते शिकवू लागले.दिवसभर काम करून सावित्रीबाई फुले घरीच शिक्षण घेऊ लागल्या.ज्योतिबा फुलेंनी शिकवलेले शिक्षण सावित्रीबाई लक्षपूर्वक ऐकत असत. वेळ मिळेल तसा त्याचा सराव करत.ज्योतीबा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई लिहायला आणि वाचायला शिकल्या.घरातून शिक्षणाचा संस्कार मिळत असल्यामुळे सावित्रीबाईंनी अतिशय आनंदाने शिक्षण स्वीकारले .त्या लिहायला-वाचायला लागल्या.यादरम्यान ज्योतीबा फुलेंनी पुणे येथे बुधवार पेठेत भिडेंच्या वाड्यात 1जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा काढली.समाजातील मुलींनी शिक्षण मिळावे या हेतूने शाळा काढण्यात आली होती. शाळा काढल्यानंतर मात्र एक अडचण निर्माण झाली.त्या शाळेतील मुलींना शिकवायला कुणी शिक्षक येईना.कारण या काळात समाजात मुलींनी शिक्षण घेणे पाप समजले जायचे.आणि मुलींना शिकवायचे म्हणजे हे तर महाभयंकर पाप आहे.यामुळे कोणी शिक्षक पुढे येत नव्हता.त्यावेळी जोतिरावांनी सावित्रीबाईंना विचारणा केली.तुम्ही मुलींना लिहायला वाचायला शिकवा. यावेळी सावित्रीबाईनी लगेच होकार दिला.त्या शाळेत जाऊन गोरगरीब मुलींना एकत्र जमवुन शिकवू लागल्या.एक स्त्री मुलींना एकत्रित करून शिक्षण देत आहे.ही बातमी पुण्यात वार्‍यासारखी पसरली. पुण्यातील अतिकर्मठ लोकांनी याला तीव्र विरोध केला. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे रूढी परंपरेच्या विरोधात आहे. स्त्रियांना शिक्षण देता येणार नाही.याचा कडाडून विरोध झाला पाहिजे.यापुढे कोणीच अशी हिंमत केली नाही पाहिजे.यासाठी अतिकर्मठ लोक एकत्र येऊन सावित्रीबाईंना विरोध करू लागले.त्यांना रस्त्यावर अडवून त्यांनी मुलींना शिक्षण देऊ नये असे त्यांना समजवण्यात आले.परंतु सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण देण्याचे काम चालूच ठेवले.यावेळी याविरोधात अतिकर्मठ लोकांनी एकत्र येऊन सावित्रीबाई फुले यांना विरोध म्हणून त्यांच्या अंगावर दगड,चिखल, शेण फेकून मारले व सावित्रीबाई फुलेंना कडकडून विरोध केला.मात्र या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करून मुलींना शिक्षण देण्याचे काम सावित्रीबाई फुलेंनी चालूच ठेवले.खऱ्या अर्थाने या लोकांना ही मोठी चपराक होती.ज्योतीबांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाच्या चळवळीत सावित्रीबाई फुले यांनी कार्य केले.आपल्या कार्याप्रती निष्ठा ठेवली.समाजातील विरोधाला धुडकावून स्त्री शिक्षणाचा वसा सुरूच ठेवला.यादरम्यान फुले दांपत्यांचे शिक्षणाचे कार्य पाहून 1952 मध्ये इंग्रज सरकारने सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांचा मेजर कँडी या इंग्रज अधिकाऱ्याच्या हस्ते जाहीर सत्कार केला.महात्मा फुले यांनी काढलेल्या शाळांना सरकारी अनुदान ही जाहीर केले.फुले दांपत्यांनी शिक्षणाचे काम चालू ठेवले. शिक्षणाबरोबरच सावित्रीबाई फुलेंनी काही क्रूर रूढींनाही आळा घातला.बाल विवाहप्रथेमुळे अनेक मुलीचे लहानपणीच लग्न व्हायचे.यातच एखाद्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले.तर तिला एक तर सती जावे लागे किंवा मग तिचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा स्त्रीला कुणाचातरी बळी व्हावा लागे.या छळाला कंटाळून स्त्रिया आत्महत्या करत असत.स्त्रीभ्रूणहत्या करत असत.ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले.ज्योतिबा फुले यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होऊन ते यशस्वीतेसाठी सावित्रीबाईंनी प्रयत्न केले.प्रत्येक कार्याविषयी निष्ठा बाळगली.लेखिका, कवियित्री, माता,समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारे आयुष्य पणाला लावले.पुढे पुण्यात 1897 मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्या लोकांसाठी काम केले.दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या आणि 10 मार्च 1997 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.समाजातल्या दीनदलितांना मायेने जवळ करणाऱ्या,स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणाऱ्या,सावित्रीबाई खऱ्या अर्थाने ज्योतीबांच्या अर्धांगिनी म्हणून शोभल्या.त्यांच्या थोर सामाजिक कार्या विषयाची कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी सावित्रीबाई यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.सावित्रीबाई फुलेंनी लावलेल्या शिक्षणरुपी रोपट्याचे आज महाकाय वटरुक्षात रुपांतर झाले.आज प्रत्येकजण या शिक्षणरुपी वटरुक्षाखाली सामावून गेले.आज प्रत्येक स्त्रीला शिक्षणाची व्दारे खुली असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता येते.सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणरुपी आशिर्वादामुळे देशाचे प्रत्येक पद स्त्रीयांनी भुषविले आहे.यामध्ये राष्ट्रपति, पंतप्रधान,मुख्यमंत्री,मंत्री, जिल्हाधिकारी, डाॅक्टर, वकील,पोलीस,खेळाडू, समाजसुधारक अशी अनेक पदे स्त्रीयांना भुषविली आहे.व यापुढेही भुषवतील यात शंका नाही. समाजाने फक्त सावित्रीबाई फुलेंना अपेक्षित असणारा स्त्रीयांचा सन्मान राखावा एवढीच माफक अपेक्षा.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...