Wednesday, 29 July 2020

मूल्यशिक्षण काळाची गरज



   मूल्यशिक्षण काळाची गरज



पुरोगामी महाराष्ट्रात राहत असतांना आठवतात ते फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार, तर राष्ट्रमाता मॉ जिजाऊ साहेब व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आठवतात. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला संस्कार आणि विचारांनी नावारूपास आणलेले आहे. आज आपण म्हणतोय जग विज्ञानवादी झाले. विज्ञानाने सर्वत्र प्रगती केली. पण आजही माणूस म्हणून जगतांना गरज आहे ती, उत्तम संस्काराची व चांगल्या विचारांची. आज शिक्षण घेत असताना संस्कार व विचार टिकवण्यासाठी मुल्यशिक्षणाची गरज आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जो-तो उच्च शिक्षणाची कास धरू लागला आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत शिक्षणात प्रगती झालेली आपल्याला दिसते. शिक्षणाने डॉक्टर, इंजिनीअर, वकील, पोलीस, शिक्षक, कलेक्टर, तहसीलदार, व्यावसायिक, राजकारणी असे अनेक पदे भूषवणारे माणसं तयार झाली. या पुरोगामी महाराष्ट्रात प्रगती झाली असे दिसून येऊ लाागले. तर याउलट या महाराष्ट्रात भ्रष्टाचार, व्यसनाधिनता, चोरी, लैंगिक अत्याचार, खून, मारामाऱ्या, आत्महत्या यासारख्या घटना सुद्धा घडतांना दिसून येतात. असे का घडत असेल याचा विचार केल्यावर असे लक्षात येते की, कुठेतरी मूल्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे. आपण करत असलेल्या चुका आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण जाणुन बुजुन त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. शिक्षणाच्या प्रवाहात प्रत्येकाने मुल्ये शिकली. पण धावपळीच्या जीवनशैलीत मूल्य पाळायला आपण विसरलो. मूल्यांचा जणूकाही विसर पडला. यातच वर्तमान पत्रातून, बातम्या मधुन, गावाच्या चावडीवरुन, विचित्र घटनां घडलेल्या कळु लागल्या. दिवसागणिक घडणाऱ्या या घटनांनी मन सुन्न होऊ लागले. यातुन असे लक्षात आले की, आजची स्त्री सुरक्षित नाही. तिला घराबाहेर पडतांना दहा वेळा विचार करावा लागतो. मी सुखरूप घरी परत येईल का? येथे माणूसच माणसाचा शत्रू बनत चालला आहे. तरुणांमध्ये प्रचंड व्यसनाधीनता वाढली. तरुण व्यसनाच्या आहारी गेला. जो तो स्वतःच्या स्वार्थासाठी येथे धावू लागला. येथे देशाप्रती कोणालाही खंत उरली नाही. सव्वाशे कोटींचा देश बिनधास्तपणे जगतोय माझ्या मूठभर जवानांच्या धैर्यावर, हिमतीवर. आज प्रत्येकाला राष्ट्रभक्तीचा विसर पडत चालला आहे. सामाजिक परिस्थिती खालावत चाललेली आहे. यावर उपाय म्हणून आज प्रत्येकांने श्रमप्रतिष्ठा, नीटनेटकेपणा, वैज्ञानिक, दृष्टिकोन, सौजन्यशीलता, सर्वधर्म समभाव, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, वक्तशीरपणा, संवेदनशीलता या मूल्यांना अंगीकृत करण्याची गरज आहे. मुल्यशिक्षण काळाची गरज आहे. या मूल्यशिक्षणातुन स्त्रीयांचा आदर करणे, ती कुटुंबातील असेल किंवा कुटुंबाबाहेरची तिचा योग्य तो आदर करणे, सन्मान राखणे, तिला समानतेची वागणूक देणे. हे प्रत्येक पुरुषांचे कर्तव्य आहे. याची जाणीव समाजातील प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्याचबरोबर श्रमदान करणे काळाची गरज आहे. श्रमदानातून गावाचा विकास साधता येऊ शकतो. म्हणून सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन श्रमदान केले पाहिजे. आजचा देशाचा युवक हा देशाला प्रगतीपथावर नेणारा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक युवकाने राष्ट्रभक्ती जोपासली पाहिजे. या राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य ओळखले पाहिजे. सर्व जाती धर्मातील मानव समुहाने एकत्र येऊन सलोख्याने राहिले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने स्वतः मध्ये मुल्य रुजवली पाहिजे. प्रत्येकाने मूल्यांचा आदर करून ती मनोमन जोपासली तर देशात घडणार्‍या घटनांचा, गुन्हेगारीचा, वाईट प्रवृत्तीचा, नाश होईल. या पुरोगामी महाराष्ट्रातील चांगले संस्कार व उत्तम विचार टिकवण्यासाठी मूल्यशिक्षण काळाची गरज आहे. एकविसाव्या शतकातील पालकांनी आपल्या मुलानमध्ये बालवयापासून मुल्य रुजवली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतुन मुलांना मुल्यांची गरज लक्षात आणुन दिली पाहीजे. रोजच्या दैनंदिन वापरात होत असलेल्या चुका, घडत असलेल्या वाईट घटना लक्षात आणुन दिल्या पाहिजे. यामुळे आजची नविन पिढी मुल्यशिक्षणावर भर देतील. मुल्यांची फक्त ओळख असून चालणार नाही. तर वेळोवेळी रोजच्या जगण्यातून मूल्ये दिसुन आली पाहिजे. मुल्य फक्त शिक्षणापुरती मर्यादित नाही. तर जीवन जगत असतांना संस्कृतीचे रक्षण करण्यासाठीचे ते उत्तम संस्कार आहेत. हे आपण समजून घेतले पाहिजे.

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके
रा.किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...