Wednesday, 29 July 2020

शिक्षण क्षेत्रात मूल्यवर्धन कार्यक्रम ठरतोय प्रेरणादायी !

    शिक्षण क्षेत्रात मूल्यवर्धन        कार्यक्रम ठरतोय प्रेरणादायी ! 

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्य घटनेतील स्वातंत्र्य,न्याय,समता,बंधुता मूल्य रुजविण्यासाठी महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे. सामाजिक क्षेत्रात तिन दशकाहून अधिक वर्ष कार्यरत असलेल्या श्री शांतिलाल मुथ्था यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मूल्यवर्धन चे बीज रोवले आहे.या बीजापासून छोटेसे रोपटे तयार झाले.आज हळूहळू हेच रोपटे एका महाकाय वटवृक्षाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांनी सुरुवातीला सन 2009-10 या शैक्षणिक वर्षांत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 159 मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला.सन 2009-10 या वर्षात हा कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये काही बदल दिसून आले.येणाऱ्या शैक्षणिक वर्षात 2010-11 मध्ये शिक्षक पालकांचा सकारात्मक प्रतिसाद या कार्यक्रमामध्ये दिसून येऊ लागला.शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये या कार्यक्रमाविषयी उत्सुकता दिसून येऊ लागली.त्यामुळे बीड जिल्ह्यातील पाटोदा व त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील एकूण 500 शाळा व 38000 विद्यार्थ्यांपर्यंत या कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात आली.वर्ष 2011-12 मध्ये इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ञांकडून बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा व आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाची पाहणी करण्यात आली.काही निवडक शाळेत जाऊन शिक्षक,विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्यात आला. शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयीचे मत जाणून घेण्यात आले.वर्ष 2012-13 मध्ये शांतीलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रमाचे संस्थेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आले.केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ञांकडून आणि एनसीईआरटी तील तज्ञांकडून करण्यात आलेल्या परीक्षणातून असे दिसून आले की,मूल्यवर्धन कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांत सकारात्मक बदल दिसून आले. याउलट मूल्यवर्धन कार्यक्रमात सहभागी नसणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा सहभागी असणार्‍या विद्यार्थ्यात सकारात्मक बदल दिसून आले.यानंतर बीड जिल्ह्यातील पाटोदा व आष्टी या ठिकाणी राबवण्यात आलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे अनुभव व प्रचलित शैक्षणिक धोरणे तसेच एनसीईआरटी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त धोरणे यांच्या अनुषंगाने मूल्यवर्धन कार्यक्रम आराखड्याची निर्मिती करण्यात आली.सन 2014-15 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ अधिकारी,शिक्षण विभागातील अधिकारी यांनी आष्टी व पाटोदा तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांन मध्ये झालेले बदल लक्षात आले.यामध्ये विद्यार्थ्यांन सोबत संवाद साधण्यात आला.विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी विचारण्यात आले.विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन या कार्यक्रमाविषयी काय वाटते हे जाणून घेण्यात आले.यातून विद्यार्थ्यांची सकारात्मक विचार,मते दिसून आली.यानंतर मूल्यवर्धन कार्यक्रमाचा महाराष्ट्र शासनाकडून प्रथम प्रायोगिक तत्त्वावर बीड जिल्ह्यातील आष्टी व पाटोदा तालुक्यातील राबवलेला हा मूल्यवर्धन कार्यक्रम कायमस्वरूपी स्वीकारण्यात आला.यामध्ये शांतीलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या परिषद यांच्यामध्ये करार झाला.सन 2015 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला.2016-17 मध्ये महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यांमध्ये,35तालुके,63केंद्र,724 शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली.शांतीलाल मुथ्था फाउंडेशन मार्फत निरनिराळया टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.मूल्यवर्धन कार्यक्रम शिक्षकांना कळावा,मूल्यवर्धन कार्यक्रमाचा हेतू, उद्देश हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. सुरुवातीला तालुक्यातील प्रत्येक केंद्रातुन एका शिक्षकाला प्रेरक म्हणून नेमण्यात आले.तालुक्यातील सर्व केंद्राच्या प्रेरकांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यानंतर या प्रेरकामार्फत केंद्रातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले.राज्यघटनेतील मुल्ये शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये रुजावित आणि हीच विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक व्हावेत हा या उपक्रमामागील उद्देश आहे.या उद्देशाने शाळासाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.मराठी भाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी आणी उर्दू भाषेमध्ये हा कार्यक्रम उपलब्ध केला आहे.इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनसाठी हा कार्यक्रम असुन यामध्ये शिक्षक उपक्रम पुस्तीका व विद्यार्थी उपक्रम पुस्तीका तयार करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र विद्या प्राधिकरण मार्फत या पुस्तिका शाळेवर पुरविण्यात येतात.मूल्यवर्धन उपक्रम कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना नियमितपणे आपल्या वर्गात काही उपक्रमांचे आयोजन करायचे आहे.यासाठी या पुस्तीका मार्गदर्शक ठरतात.तसेच घेतलेल्या उपक्रमावर आधारित कृती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून उपक्रम पुस्तिका सोडवुन सराव घेतला जातो.शिक्षक उपक्रम पुस्तिकेमध्ये पाच विभाग करण्यात आलेले आहेत.मी आणि माझी क्षमता,माझ्या जबाबदाऱ्या, माझे नातेसंबंध,मी आणि आपले जग,सहयोगी खेळ असे पाच विभाग आहेत.प्रत्येक विभागात अभ्यासक्रमाशी निगडीत,सुसंगत असे उपक्रम दिलेलेआहेत.हे उपक्रम इयत्ता निहाय शिक्षकांनी आपल्या सोयीनुसार आठवड्यात किमान तीन तासिका घेऊन हे उपक्रम घ्यायचे आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेच्या माध्यमातून स्वतः उपक्रमांमध्ये भाग घेऊन या पुस्तिकेतील उपक्रम विद्यार्थी स्वतः शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करतात.गेल्या चार वर्षापासून हा मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.आजच्या घडीला मूल्यवर्धन कार्यक्रम हा महाराष्ट्रातील 36 जिल्हे,405 तालुके,5487 केंद्र, 67000 शाळा,3784000 विद्यार्थी,192000 शिक्षक यात सहभागी आहेत.यामुळे शाळास्तरावर विद्यार्थी उपस्थिती शंभर टक्के आढळून येत आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण होत आहे.शाळा व शिक्षक यामध्ये मैत्रीपूर्ण नाते संबंध प्रस्थापित होताना दिसत आहे.शाळेची पटसंख्या टिकुन ठेवण्यात मदत होत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील पटसंख्या वाढतांना दिसत आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतच पाल्यांनी शिकावे असा निश्चय पालक करत आहे.विद्यार्थी एकमेकांशी सुसंवाद,गटचर्चा करतात. वाडी,वस्ती, तांडा,गाव याठिकाणी जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून नकळत मूल्य रुजत आहे.विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत आहे. घटनेतील मुल्ये लादण्याची गोष्ट नाही.तर ती नकळत अंगीकारायची गरज आहे.मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात बालवयापासून स्वातंत्र,न्याय,समता,बंधुता ही मुल्ये रुजतांना दिसत आहे.विद्यार्थी अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून, अनुभवातून मुल्य अंगीकारत आहे. अशाप्रकारे आनंददायी शिक्षण प्रक्रियेत मुल्ये रुजत राहिली तर, आजचे विद्यार्थी उद्याचे भारत देशाचे उत्तम नागरिक म्हणून समोर येतील. भारतीय राज्य घटनेचा व भारतीय लोकशाहीचा आनंदाने,आदराने स्वीकार करतील.यातून भारतीय राज्यघटना व लोकशाही अधिक मजबूत व बळकट राहील.यामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचा निश्चितच सिंहाचा वाटा राहील.आज मात्र समाज,शाळा,शिक्षक,पालक व विद्यार्थी यांच्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम प्रेरणादायी ठरतोय.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...