एकविसाव्या शतकात भारत देश जगामध्ये महासत्तेकडे वाटचाल करतोय.आज भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली.या देशाच्या वाटचालीत माझा महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली.या प्रगतीमध्ये शिक्षणाचा मोठा वाटा आहे.शिक्षणामुळे प्रत्येक क्षेत्रात बदल होत गेले.महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीत मागे वळून पाहिले तर, आजही आठवते ती प्रत्येक गावात,तांड्यात,वाडी-वस्तीवर, डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या छोट्या छोट्या गावात असलेली माझी जिल्हा परिषदेची मराठी शाळा.या महाराष्ट्रातील प्रत्येक जातीधर्मातील गोरगरीब,श्रीमंत,दिन दुबळ्या, समाजातील प्रत्येकाला आनंदाने शिक्षण देणारी जिल्हा परिषदेची शाळा आजही तेवढ्यात ताकतीने उभी आहे. इंग्रजीच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत आहे.आज आपण शिक्षणाचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की प्रत्येकाला इंग्रजीने झपाटलेले आहे.जो तो इंग्रजी शाळेच्या मागे धावतोय.इंग्रजांनी दीडशे वर्ष भारत देशावर राज्य केले.शेवटी जाता जाता इंग्रजीचा प्रभाव सोडून गेले.इंग्रजी भाषा वाईट आहे असे नाही.इंग्रजी येणे काळाची गरज आहे.पण त्यासाठी इंग्रजी शाळेतच शिकले पाहिजे असे नाही. आजही मराठी माध्यमाच्या शाळेतुन सर्वांगीण विकास साधणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.हजारो विद्यार्थी मराठी शाळेत उत्तमातले उत्तम शिक्षण घेऊन घडत आहे.आपण गेल्या दोन चार वर्षात एमपीएससी, यूपीएससी,अशा स्पर्धा परीक्षेचा निकाल पाहिला तर मराठी शाळेत शिकलेल्या विद्यार्थी टक्का वाढलेला दिसत आहे.पण याच स्पर्धेच्या युगात माझ्या मराठी शाळेला कमी लेखले जाऊ लागले.मराठी शाळेत शिकणाऱ्यांचा कल इंग्रजी शाळेकडे वळला जाऊ लागला आहे.पण काळ्याच्या ओघात मागे डोकावून पाहीले तर,आपले आईवडील,आजी आजोबा याच मराठी शाळेत शिक्षण घेऊन उत्तम नागरिक बनले.वेगवेगळ्या क्षेत्रात वैविध्यपूर्ण भुमिका त्यांनी पार पाडलेल्या आहे.या महाराष्ट्रातील समाजसुधारक, राजकिय नेते, अधिकारी,खेळाडु,कलाकार,शास्त् रज्ञ याच मराठी शाळेने घडवलेले आहे.हा इतिहास विसरून चालणार नाही. आजच्या पालकाची शिक्षणाविषयी व आपल्या पाल्याविषयीची घौडदौड पाहता,फक्त इंग्रजी शाळाच मुलांना घडवू शकतात.हा मोठा गैरसमज पसरत आहे.या विचारसरणीमुळे शिक्षणाचे बाजारीकरण होतांना पाहायला मिळत आहे.आज शिक्षण फक्त श्रीमंताचे आहे.असे वाटायला लागले.वास्तव परिस्थितीमध्ये तसेच घडतांना दिसत आहे.सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.याची कारणे म्हणजे कौलारू व पत्राच्या शाळेच्या ऐवजी मोठ्या मोठ्या इमारती झाल्या. पांढराशुभ्र शर्ट व खाकीच्या पॅन्टची जागा रंगीबेरंगी गणवेशाने घेतली. भिंतीवरचा खडु फळा आता व्हाईट बोर्ड व मार्कर झाला.पाठीवर दप्तराचे ओझे व स्पर्धेचे युगातील स्वप्न घेऊन विद्यार्थी शाळेत येऊ लागला.पण आजच्या पालकांनी व समाजांनी कुठेतरी जागृत होणे गरजेचे आहे.मुलांना आपण किती मोठ्या शाळेत शिकवतो.किंवा किती भौतिक सुविधा असलेल्या शाळेत शिकवतो.यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षण किती आनंददायी व तणाव मुक्त मिळत आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना मशनरी बनवायचे नाही.तर मशनरी निर्माण करणारे विद्यार्थी घडवायचे आहे.बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा सरकारने तयार केला.6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली.वाडी-वस्ती,तांडा,गावागा वात 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक,मोफत गणवेश,दुपारी शालेय पोषण आहार, वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या अशा योजनेच्या माध्यमातून मराठी शाळेतील आजचा विद्यार्थी उत्तम शिक्षण घेत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये,म्हणून ई लर्निंग सारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.येणाऱ्या काळात मराठी भाषा व मराठी शाळा टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.हीच मराठी शाळा येणाऱ्या पिढीला सुद्धा घडवेल हा विश्वास प्रत्येकाने मनी ठेवला पाहिजे. आजच्या पिढीला हा विश्वास पालकांनी व समाजाने दिला पाहिजे.आज देशाची प्रगती पाहता खेळ,कला, साहित्य,विज्ञान,राजका रण, समाजकारण,आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे.यामध्ये माझ्या मराठी शाळेचा फार मोठा वाटा आहे.याच मराठी शाळेचा मला खुप अभिमान आहे.म्हणूनच आजही मला स्पर्धेचे युगात आठवते ती माझी मराठी शाळा.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment