Sunday, 26 July 2020

परतीच्या यातना

         परतीच्या यातना

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले.कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने संपुर्ण देशात लाॅकडाऊन एक,दोन व तीन असे टप्पे केले.या लाॅकडाऊन काळात गल्ली ते दिल्ली पर्यंत लोकांनी घरातच थांबून कोरोनाची साखळी खंडित करायचीआहे. लाॅकडाऊनमुळे अनेक अडचणीचा सामना प्रत्येकाला करावा लागला. ग्रामीण भागातील अनेक मजूर कामाच्या शोधात शहरात येत असतात.मिळेल ते काम स्वीकारून,शहरातच स्थिरावतात.दोन पैसे कमावून आपला संसार भागवत असतात.या झगमगत्या सोनेरी शहरात स्वतःच्या परिस्थितीला घेऊन येत असतात.लाॅकडाऊनमुळे छोटे-मोठे सर्व व्यवसाय बंद करण्यात आले. साहजिकच छोटे व्यवसायिक व मोठ्या उद्योगधंद्यातील मजूर यांच्या हातचे काम बंद झाले.कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना घरातच बसून ठेवले.सहाजिकच हाताला काम नाही.अर्थात काम नाही,म्हणजे पैसा येणे बंद झाले.यातच एसटी बस, रेल्वे सेवा बंद असल्यामुळे शहरातून स्वतःच्या गावी जाता येत नाही.देशात अनेक भागात मजूर अडकून पडले आहे. कोरोनाच्या या संकटात जगण्याची परीक्षा सुरू झाली.पुन्हा एकदा परिस्थितीने छळले.एक वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला.गरिबाने दिवसभर काम केले.तर रात्री चुल पेटते.हि सत्य परिस्थिती मजुर वर्गाची आहे.देश बंद,काम बंद,पैसे मिळणे बंद,त्यामुळे पोटाला बंद ठेवण्याची वेळ आली.सरकार,सामाजिक संस्था,सेवाभावी लोक यांच्या कडून मिळालेल्या मदतीवर कसेबसे जगणे सुरू होते.यात कोरोनाचे संकट आजुबाजूला सावली सारखे छत धरुन उभेच होते.किती दिवस असे थांबणार या विचारात हे मजुर लोक होते.किमान स्वतःच्या गावी गेलो तर,कसेही करुन पोट भरेल.कोरोना पासुन वाचता येईल.या विचाराने अनेकांनी या लाॅकडाऊन काळात सरळ देशभर हजारो किलोमीटरचा पायी प्रवास सुरु केला.उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात दिवसभर पायपीट करत राहायचे. मिळेल ते अन्न खायचे.नाही मिळाले तर पाणी पोटात ढकलून पुढे चालत राहायचे.जेव्हा जगण्याचा प्रश्न निर्माण होतो.तेव्हा मनुष्य हतबल होऊन जातो.त्याची इच्छाशक्ती त्याला जगवत असते.अनेक मजुरांनी "आम्ही जातो आमच्या गावा,आमचा रामराम घ्यावा" असे म्हणत शहराला रामराम ठोकला.अनेकांनी शेवटीआपले गाव गाठले. जीवनात अशी वेळ कधी येईल.असे स्वप्नात सुद्धा त्यांना वाटले नसेल.अनेकांना हाताला काम नाही.तशी पोटाला पोटभर अन्न नाही.सरकारी मिळेल ती मदत घ्यायची व काही दिवस पोटाची भूक भागवायची.लॉकडाऊन उठेल व हाताला काम मिळेल.या आशेपोटी एक एक दिवस मोजत लाॅकडाऊन संपायची वाट पाहात बसायचे. अशातच लाॅकडाऊन एक सुरू असतांना,देशाच्या पंतप्रधानांनी दुसरे 21 दिवसाचे लाॅकडाऊन घोषित केले.एका छोटाश्या प्रकाश किरणांना,एखाद्या घनदाट काळोखांनी गिळून टाकावे.तसे क्षणात आशेचे किरण नाहीसे होऊन गेले.पुन्हा 21 दिवसाच्या नजर लावून सगळे जण बसले.या एकदिवस दिवसात कोरोनाचा नायनाट होईल असे वाटत होते.पुन्हा एकदा कोरोनाने नशिबाची क्रूर थट्टा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला.नाईलाजास्तव तिसरे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले.फरक एकच झाला.अगोदरचे दोन लाॅकडाऊन ब्लॅकेन व्हाईट होते. तिसरे मात्र कलरफुल झाले.कोरोना रुग्ण संख्येवरुन रेड,ऑरेंज,ग्रिन अशा तीन प्रकारे जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली.या प्रकारावरून काही नियमात थोडेफार बदल करण्यात आले.मात्र सामान्य नागरिकांना गोरगरीब मजुरांना हे कलरफुल लॉकडाऊन अपयशीच ठरले.काही गोष्टी सुरु तर काही गोष्टी बंद.यामध्ये हाताला न कुठले काम मिळत आहे ना घराच्या बाहेर पडून कामाचा शोध घेता येत आहे.यावर्षी कोरोनामुळे अनेक गोष्टी बंद झाल्या आहे.यात लग्न समारंभ,मोठे-मोठे सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, सामुहिक सण-उत्सव बंद करण्यात आलेले आहे.त्याबरोबरच कंपन्या, हॉटेल्स, मॉल्स,चित्रपटगृहे अद्यापही बंदच आहे.अशा ठिकाणी हाताला मिळणारे काम सुद्धा बंद झाले.भलेही सरकारने कलर झोन नुसार काही बाबतीत सूट दिली.पण कोरोनाच्या भितीमुळे लोक आजही घराबाहेर पडायला घाबरत आहे.अनेक राज्य, देश आर्थिक संकटाच्या छायेत ढकलला जातोय.कधी काळी सोन्याचा धूर निघणारा हा देश आज मात्र कोरोनाच्या संकटापुढे हतबल झाला आहे. देशाला प्रतिष्ठा व पैशापेक्षा देशातील प्रजा महत्त्वाची आहे.आज अनेकांना वाचविण्यासाठी देशात सर्व यंत्रणा सज्ज आहे.प्रत्येक जण आपापल्या परीने या संकटात योगदान देत आहे. कोरोनाने आज जगावर संकटाची वेळ आणली आहे.प्रत्येक देश या संकटातून बाहेर पडण्यासाठी झटत आहे.भारतासारखा सुजलाम सुफलाम देशही पूर्ण ताकदीने या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे.देशातील जनतेने सुद्धा या संकटात एकजुटीने देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.देश वाचला तर आपण वाचू,सामान्य जनता वाचली तर देश वाचेल.कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही.म्हणून वेळेचा सदुपयोग करुया.लाॅकडाऊनच्या काळात देवाला साकडे घालूया.की या संकटातून देशाला सुखरूप बाहेर सोडव. भारत या गरीब जनतेचा देश आहे.कष्टकरी शेतकऱ्याचा, घाम गाळणाऱ्या मजुराचा,नामस्मरण करणाऱ्या वारकर्‍याचा देश आहे.निश्चितच भारत हा पवित्र व भाग्यशाली,प्रयत्नवादी देश आहे.एक दिवस वाट चुकलेला कोरोना या देशातून निघून जाईल.आज आलेली वेळ निघून जाईल.गरज आहे ती नियमांच्या पालनाची व अनेक गोरगरीब लोकांना सहकार्याची.कोरोना बाधित रुग्णांना हिम्मत देण्याची ही वेळ आहे.वेळ,काळ कधीही कुणासाठी थांबत नाही.वेळ,काळाचे चक्र सदैव सुरू राहते.आज आलेली कोरोना व्हायरस संकटाची वेळ निघून जाईल.एक दिवस लाॅकडाऊनची सुद्धा वेळ संपेल.पुन्हा एकदा सगळीकडे जमेल गर्दी व माणसाला माणसाच्या माणुसकीच मिळेल साथ.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...