पंढरीची वारी भेटी लागे जीवा
उन्हाळाभर सूर्य उष्णतेची आग ओकत असतो. चार महिन्याच्या या ऋतूमध्ये मे हा शेवटचा महिना अती तापमानाचे उच्चांक गाठत राहतो. सूर्य उष्णतेची आग ओकतांना कधी थांबतो असे सर्वांना वाटते. मे महिना संपताच पावसाळा ऋतूची चाहूल लागते. चातक पक्षी आकाशाकडे पावसाच्या थेंबासाठी वाट बघतो. शेतकरी वाट बघतो धो-धो पावसासाठी, तसा वारकरी वाट पाहतो पंढरीच्या वारीची. दरवर्षी जून महिन्यात पावसाच्या सरी पडल्या की शेतीच्या कामांना वेग येतो. तसा वारकरी पंढरीच्या वारीसाठी सज्ज होत असतो. लहान लेकराला खूप वेळ आईपासून दूर ठेवले की, त्याला आईजवळ जाण्याची घाही होते. तसे सर्व भक्तांना पांडुरंगाच्या भेटीची आस लागते. पंढरीचा पांडुरंग विटेवर हात जोडून सर्व भक्तांची वाट पाहत असतो. जशी जशी वारी जवळ येईल. तसे तसे वारकरी हातातील कामे संपवतात. वारीला जायचे यासाठी देहभान विसरून काबाडकष्ट करणारे शेतकरी, मजूर हातातील काम संपवतात. वारकरी म्हटले म्हणजे गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, मुखात पांडुरंगाच्या हरिनामाचे गुणगान होय. संसारात आल्यापासून दुःख भोगत असणारा मनुष्य, आयुष्यभर सुखाच्या शोधात झिजत राहतो. मात्र त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. मात्र त्याला एक दिवस पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवल्यावर मिळणारे सुख हे संसारा पेक्षा अधिक मोलाचे वाटते. म्हणून वारकरी घरादारावर तुळशीपत्र ठेवून वारीसाठी निघून जातात. कुणाची पेरणी होते. कुणाची पेरणी बाकी राहते. कुणाची लेकरं लहान असतात. तर कुणाचे आई-वडील म्हातारी असतात. संसारातील अनंत अडचणी दिवसागणिक समोर उभ्या असतात. या सर्व अडचणीचे डोंगर मागे सोडून पांडुरंगाच्या वारीत सहभागी होण्याचे भाग्य वारकरी मिळवतात. वर्षभर संसाराचा रथगाडा हाकणे चालूच असते. जीवनात कधीच सवड मिळत नाही. मोह, लोभ मनुष्याला संसारात खुप गुंतून ठेवतो. आयुष्यात प्रगती, पैसा, मान सन्मान, प्रति्ष्ठा यासाठी मनुष्य झगडत असतो. जीवनात त्याला कधीच सवड मिळत नाही. काम आणि पैसा याचा मोह त्याला शांत बसु देत नाही. पण आषाढी एकादशी जसी जसी जवळ येईल. तसा पंढरीच्या वारीसाठी आवर्जून सवड काढून वारकरी घराबाहेर पडतो. लेकरं बाळं, घरदार, शेतीबाडी, मानपान, प्रतिष्ठा, धन-दौलत सगळं मागे सोडून भगवी पताका खांद्यावर घेऊन, तर कोणी गळ्यात टाळ घेऊन, कोणी गळ्यात मृदंग वीणा घेऊन, तर कोणी तुळसी वृदांवन डोक्यावर घेऊन वारीसाठी निघतात. घरची चिंता आता पांडुरंगावर स्वाधीन करून वारकरी वारीत सामील होतो. त्याला माहिती आहे आयुष्यभर पांडुरंगाने आपणाला सांभाळले. आपल्या अनंत अडचणीत मार्ग दाखवण्याचे कामही त्यानीच केले. आता वारीत जाऊन येईपर्यंत तो आपला संसार सांभाळेल हा विश्वास वारकऱ्यांच्या मनी असतो. परमार्थात सुख आहे. ते उपभोगण्यासाठी हरिनामाचा गजर आणि पांडुरंगाच्या चरण्याचा स्पर्श झाला पाहिजे. वारीमध्ये ही दोन्ही सफल होते. वारीसाठी निघतांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस डोळ्यात साठवून वारकरी पंढरीकडे वाटचाल करतात. दिवसभर चालत चालत पांडूरंगाच्या नामाचा गजर करत दरगाव दर मुक्काम करत वारीमध्ये पंढरीच्या दिशेने वारकरी जात असतात. अनेक वारकरी घराण्यात वारीची खूप दिवसापासून परंपरा आहे. अनेक पिढ्यांपासून ही वारीची परंपरा पुढे चालू आहे. जीवनात भगवंतांनी खूप दिले. पण समाधान मात्र त्याच्या चरणाशी आहे. त्याचा चरणस्पर्श भक्तीच्या मार्गाने प्राप्त करता येतो. वारी ही जीवनात संसारातील कामाचा विसावा आहे. जीवनातील सर्व दुःखावरचे औषध वारी आहे. वारीच्या दरम्यान वारकरी पूर्ण चित्ताने पांडुरंगाच्या हरिनामात धुंद होऊन जातात. भजन, कीर्तन, गवळण, भारुड, अभंग या सर्वांचा टाळमृदंगाच्या गजरात जयघोष सुरू असतो. एकचित्त होऊन वारीत सर्वजण पांडुरंगाचा जयघोष करत असतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अतिशय उत्साहाने वारकरी या वारीत सहभागी होतात. देहभान विसरून वारीचा आनंद लुटला जातो. वारीत मोह, मत्सर, गर्व, याला थारा नाही. जमेल तसे जमेल त्या ठिकाणी थोडा विसावा घ्यायचा. मिळेल ते अन्न सेवन करायचे. वारीत सर्व सुखाचा त्याग करुन वारकरी आलेले असतात. त्यामुळे येथे कोणतीच तक्रार उरत नाही. विटेवरचा पांडुरंग लाखो वारकऱ्यांना अगदी सुखात घेऊन चालत असतो. वारी हे प्रत्यक्ष भगवंताचे वास असलेले ठिकाण होय. परमार्थात वारीच्या सुखाची तुलना संसारात कशाशीच होऊ शकत नाही. वारी म्हणजे कष्टकरी गोर गोरीबांचा श्वास, वारी म्हणजे थकलेल्या वृद्ध चेहऱ्यावरचे ताजेतवाने हसु, वारी म्हणजे हरीनामाच्या रसाने भरलेले अमृत, वारी म्हणजे संसार सुखाचा त्याग, वारी म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लिन झालेले चित्त होय. या सर्व अनुभवासाठी प्रत्येकजण सहकुटुंब वारी करतात. तर अनेक जण जोडीने वारी करतात. प्रत्येक जण आयुष्यभर स्वतःच्या जीवनात स्वार्थाच्या मृगजळामागे धावत धावत आयुष्यात पुढे सरकत असतो. कष्ट, हाल, अपेष्टा सहन करत परिस्थितीशी दोन हात करत अनेकजण जीवन जगत असतात. भगवंताने या पृथ्वीतलावर प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार मनुष्य जन्माला घातले आहे. त्यामुळे मनुष्य जीवनात प्रत्येकजण रंगरूप, शरीरयष्टी, परिस्थिती यांनी भिन्न आहे. ऐरवी पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान मिळवणारे लोकं, वारीत मात्र सहभागी होताना सगळे पांडुरंगाचे वारकरी म्हणून सहभागी होतात. वारीत सगळेजण सारखे आहे. येथे कोणालाच कोणताच मतभेद नाही. पांडुरंगाचे भक्त हे सारखेच आहे. परमार्थात भक्ती श्रेष्ठ आहे. भक्तीच्या या प्रवाहात सगळेजण पांडुरंगाचा एक सामान्य वारकरी म्हणून सहभागी होतात. जीवनात पांडुरंगाने सगळे काही दिले. जीवन हे एक मृगजळ आहे. या मृगजळामागे धावत आयुष्य संपते. परंतु सुख मिळत नाही. भौतिक सुविधेणे मिळणारे सुख हे क्षणिक आहे. तर परमार्थात भक्तीच्या मार्गाने मिळणारे सुख हे दीर्घकाळ आहे. याच सुखासाठी वारकरी दरवर्षी न चुकता वारी करतात. वारी मानवाला अनेक संदेश देते. भक्ती, प्रेम, समाधान, जिव्हाळा याबरोबरच ऐकोपा, आत्मविश्वास, दृढ इच्छाशक्ती प्रदान करते. वारीला जाऊन आलेला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाने प्रसन्न, प्रफुल्लित होतो. संसारातील दुःखाला सामोरे जाण्यासाठी सज्ज होतो. पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दर वर्षी दिंड्या निघत असतात. या दिंड्या मध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. शेगाव जिल्हा बुलडाणा येथून संतश्रेष्ठ गजानन महाराजांची दिंडी पंढरीकडे सर्वप्रथम मार्गक्रमण करत असते. देहु जिल्हा पुणे येथुन श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होते. तर आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते. याचबरोबर महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून हजारो दिंड्या दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात. याच दिंड्यांमध्ये वेगवेगळ्या भागातून वारकरी सहभागी होतात. महिला, पुरुष, म्हातारी माणसे, अपंग बांधव असे सगळेजण सहभागी होतात. उद्देश एकच असतो पांडुरंगाचे दर्शन घेणे. पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवायचे. मनभरुन डोळ्यात पांडुरंग साठवायचा. याची देही याची डोळा पांडुरंग मनात साठवायचा.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment