अमावस्येची रात्र
अमावस्येची रात्र होती. बाहेर सर्वत्र काळाकुट्ट किर्र....! असा अंधार पडला होता. अंधारी रात्र समजून गावातील सर्व लोकं आपापल्या घरी शांतपणे झोपली होती. मी पण रात्रीचे जेवण लवकरच आटपून माझ्या खोलीत झोपण्यासाठी गेलो. घराच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले तर सर्वत्र किर्र....! असा काळोखमय अंधार मला दिसला. तो अंधार पाहून मला वाटले रात्र खूप झाली. आता आपण सुद्धा झोपले पाहिजे. असे समजून मी माझे अंथरून टाकले व कंदिलाची वात कमी करून झोपण्यासाठी माझ्या अंथरूणावर जाऊन पडलो. पण मला झोप काही लागेणा. अंथरुणावर पडल्या पडल्या मी इकडच्या तिकडच्या अंगावर होऊ लागलो. तरीसुद्धा झोपेचा थांगपत्ता लागेणा. थोड्यावेळाने मला झोप लागल्यावाणी झाली. तोच अचानक बाहेरुन आवाज ऐकु आला. वाचवा….! वाचवा. …! कुणीतरी मला वाचवा….! हा आवाज माझ्या कानावर येताच मी पटकन झोपेतून जागा झालो. पटकन अंगावरची रग बाजूला केली. जवळच असलेल्या कंदिलाची वात मोठी केली. ताटकन उठुन खिडकी उघडली. खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागलो. बाहेर अगोदरच अंधार होता. बाहेर कुणीच दिसत नाही म्हणजे आपल्याला नक्की भास झाला. असे समजुन मी पुन्हा माझ्या अंथरुणावर येऊन पडलो. थोड्यावेळाने परत वाचवा….! वाचवा….! कुणीतरी मला वाचवा….! असा आवाज आला. मी पटकन उठलो खिडकी उघडुन त्या अंधारात कोणी दिसते का ते बगु लागलो. आवाज कोणत्या दिशेने येत आहे याचा कानोसा घेऊ लागलो. पाहतो तर घराच्या पाठी मागच्या बाजूने आवाज येत होता. वाचवा….! वाचवा….! कुणीतरी मला वाचवा….! हा आवाज ऐकून मला वाटले कोणीतरी एक स्त्री संकटात आहे. म्हणून गयावया करून मदतीसाठी ओरडत आहे. अचानक माझ्या मनात प्रश्न पडला ….! कोण असावी ही स्त्री? एवढ्या रात्री काय संकट आले असेल तिच्यावर, अशा विचारात असताना मी पटकन उठलो. घरातील कंदील हातात घेतला. पायात चपला घालून घराबाहेर पडलो. आवाजाच्या दिशेने झपाझपा चालू लागलो. चालत चालत मी घराच्या पाठीमागे पोहोचलो. माझ्या घराच्या पाठीमागे पडीत मोठा वाडा होता. तिथे खूप वर्षापासून कोणीच राहत नव्हते. मी त्या वाड्याच्या जवळ जाताच माझ्या हातातील कंदील विझला. वाचवा….! वाचवा….! कुणीतरी मला वाचवा….! असा येणारा आवाज काही क्षणातच बंद झाला. अचानक कंदील विझनं, आवाज बंद होणं. या सर्व गोष्टी अचानक कशा काय घडल्या. असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. या सर्व गोष्टी अचानक घडणं हा काही योगायोग नव्हता. अशा विचारात असताना परत माझ्या लक्षात आले. आज तर अमावस्या आहे. अमावस्येला भुतकेत निघत असतात म्हणे. या सर्व विचारांच्या गोष्टींनी मी पुन्हा घाबरून गेलो. मला काहीच सुचेनासं झालं. तोच माझं लक्ष समोरच्या पडक्या वाड्याकडे गेले. अचानक माझ्या डोळ्यासमोर एक धष्टपुष्ट उंचच उंच अशी एक स्त्री माझ्याकडे पाठ करून उभी असलेली मला दिसली. मी पाहतच राहीलो. तिचे लांबसडक केस, केसांची घातलेली वेणी अशी ती सुंदर स्त्री मला दिसली. अचानक माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी झाली. तो येणारा आवाज सुद्धा नाहीसा झाला. हा सर्व प्रकार पाहून मी अतिशय घाबरलो. माझ्या संपूर्ण अंगाचा थरकाप होऊ लागला. मनात अनेक प्रश्नांचे काहूर उठले. काय करावे काही मला समजेनासे झाले. मी ताबडतोब तिथून निघालो. विझलेला कंदील लावण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हते. तसाच मी अंधारात रस्त्याने चालू लागलो. भूकंप झाल्या सारखी माझ्या पायाखालची जमीन हादरून गेली होती. माझे कपडे व अंग पावसात भिजल्यासारखं घामानं ओल झालं होतं. ऐवढी भीती मनात भरली होती. कसाबसा घरी परतलो. मी पटकन घर उघडले. घरात शिरलो व पहिली दरवाज्याची आतून कडी लावली. अंधारात चाचपडत आगपेटी शोधली. विझलेल्या कंदीलाची वात पेटवली व कंदील भिंतींच्या खुटींला लटकवला. पटकन एक पेला पाणी भरून घेतले घटाघटा पाणी पिऊन टाकले. अंथरुणावर येऊन निपचीत पडलो. एकदाचं श्वास घेतल्यावाणी मला झाले. अंथरुणावर येऊन पडलो होतो खरा पण मन मात्र दुसरीकडेच भटकत होते. घडलेल्या सर्व प्रकाराविषयी माझ्या मनात अनेक प्रश्न येत होते. कोण असावी ती स्त्री? तिने कशापायी ओरडावे? बर मला एक समजत नाही मी त्या ठिकाणी गेल्यावर तिचं ओरडणं का थांबावं. मला फक्त ती पाटमोहरीच का दिसावी. तिचा चेहरा का दिसला नाही. ती खरीखुरी स्त्री होती का? की एखादी पडछाया. मनातील भितीमुळे मला भास झाला असेल का? ती स्त्री त्या ठिकाणी काय करत असावी. मला काहीच न बोलता ती तिथून नाहीशी होणं हा सर्व कसला प्रकार आहे. हे काही केल्या माझ्या लक्षातच येत नव्हतं. अशा विचारातच मला कधी झोप लागली हे कळलं सुद्धा नाही.
सकाळ झाली….! दिवस उगवला होता. दरवाजाच्या फटीतून सूर्यप्रकाशाचा उजेड आत आला होता. बाहेरच्या लोकांचा कल्ला कानावर येऊ लागला. तेव्हा मला जाग आली. दरवाजाच्या फटीतून सूर्यप्रकाशाचा आलेला उजेड पाहून माझ्या लक्षात आले की, दिवस उगवुन खूप वेळ झाला आहे. मी अंथरुणात पटकन उठून बसलो. डोळे चोळत चोळत माझ्या मनात विचार आला. हा सर्व घडलेला प्रकार आपण भावड्याला सांगायला हवा. भावड्या म्हणजे माझा लंगोटी मित्र ‘शरद.’ शरद हा शरद ऋतूप्रमाणेच भारी. पण जीवलग, विश्वासपात्र होता. मी पटकन उठलो आंघोळ केली चहा घेतला व लगेच भावड्याच्या घराला जाण्यासाठी निघालो. घरी जात असताना परत माझ्या मनात विचार आला की, हा घडलेला सर्व प्रकार आपण शरदला सांगितल्यावर शरद आपल्याला कदाचित हसणार तर नाही ना….! किंवा शरदला हा सर्व प्रकार खोटा आहे असं तर वाटणार नाही ना….! अशा विचारात असतानाच शरद चे घर आले. मी घाईघाईने शरद च्या घरात शिरलो. घरात जातो तर शरद मला दिसेना. तोच मी पटकन शरद च्या आईला विचारले. ‘‘ काकू शरद घरी आहे का? ’’ हो आहे ना….! असे म्हणताच मी विचारले. कुठे आहे ? शरद ची आई म्हणाली ‘‘ त्याच्या खोलीत पेपर वाचत बसलाय ’’. मी पटकन त्याच्या खोलीत शिरलो. शरद पेपर वाचण्यात मग्न होता. मी शरदला म्हणालो चलं उठ आपण बाहेर जाऊ माझं तुझ्याशी काम आहे. हे ऐकून शरदचे माझ्याकडे लक्ष जाते. राजू केव्हा आलास….! व कुठे जायचे म्हणतोस? अरे खाली तर बस….! काय काम आहे ते तर सांग. मी त्याला म्हटले मी बसत नाही. तु आधी पटकन माझ्या सोबत चल मी काय काम आहे ते नंतर सांगतो. मी शरदला घेऊन लगबगीने माझ्या घरी आलो. मी घडलेला सर्व प्रकार शरदला सांगितला. तेव्हा शरद माझ्याकडे बघून मोठ्या मोठ्याने हसू लागला…! ‘‘ अरे स्वप्न पडले की काय तुला? ’’ मी शरदवर रागावलो. मला वाटलेच होते ….! तु मला हसशील. हे तुला सर्व खोटं वाटेल. पण शरद तू माझ्यावर विश्वास ठेव हा घडलेला सर्व प्रकार खरा आहे. माझा घाबरलेला चेहरा पाहून शरदला खरे वाटले. तो म्हणाला ‘‘ राजू काळजी करू नकोस ! ’’ ती स्त्री कोण होती. का ओरडत होती. तो ओरडण्याचा आवाज खरच येत होत का?, की तो सर्व अभास होता. या सर्व गोष्टीचा आपण शोध लावू. तु आधी शांत हो. घाबरून नको जाऊ, मी आहे ना….! हे ऐकुन मी जरा निवांत झालो. आमच्या शेजारी एक वयस्कर रामुकाका राहतात. त्यांना या वाड्याबद्दल खूप माहिती आहे म्हणे. ते काही वर्षे पाटलाकडे सालगडी म्हणून काम करत होते. त्यांना सुद्धा असाच एक अनुभव आलेला आहे. माझे बाबा एकदा आईला सांगत होते. ते आपल्याला या बद्दल सर्व माहिती सांगतील. मी व शरद रामुकाकांच्या घरी गेलो. रामुकाका नुकतेच जेवून पानसुपारी खात बसले होते. वय खुप झाल्यामुळे त्यांना फारसे नीट ऐकू येत नव्हते. पण गावातील जुन्या सर्व गोष्टी रामुकाकांना चांगल्याच माहीत होत्या. त्यामुळे घडलेल्या प्रकाराबद्दल नक्कीच त्यांना काहीतरी माहिती असेल असे विचार माझ्या मनात घोळत होते. शरदने घडलेला सर्व प्रकार रामुकाकांना सांगितला. रामुकाका माझ्याकडे बघून बोलू लागले. तो गावच्या पाटलाचा वाडा होता. त्या वाड्यात पाटील व त्यांची बायको राहत होती. पाटील गावात सर्वात श्रीमंत होते. शेतीबाडी, जनावरं, लय थाट होता त्या पाटलाचा. मी लय दिवस कामाला होतो पाटलाकडे….! पाटील स्वभावाने कडक माणुस….! अगदी कडक….! कुणाचीही दयामया करत नसत….! ‘‘ काम करी मिळे दाम ’’ असे पाटील नेहमी म्हणायचे. काम केल्याशिवाय दमडी हातावर देत नसत….! लय रुबाबात जगला हा माणुस….! पण नशिबापुढे हारला मात्र….! पाटलाला मूलबाळ नव्हते. म्हातारपणात आपल्याला आधार म्हणून त्यांनी त्यांच्या नातलगातील नवीनच लग्न झालेले एक नवरा बायकोचे जोडपे त्या वाड्यात राहण्यासाठी आणले होते. हे चौघेजण या वाड्यात राहु लागले. पाटील होते तोपर्यत या वाड्याकडे वाकडी नजर करुन पहायची कुणाची हिंमत होत नव्हती. अचानक एके दिवशी पाटलाच्या बायकोला ताप आला. म्हातारी दोन चार दिवस तापाने फणफणली व पाचव्या दिवशी म्हातारीने जिव सोडुन दिला. बायकोच्या जाण्याने पाटील एकाकी पडले. पाटलांने एक महिन्यात देह सोडला. पाटील व त्यांच्या पत्नीचे निधन झाले. यामुळे सर्व गाव सुन्न झाले होते. शेवटी गावातील श्रीमंत माणूस गेला गावाचे वैभव गेले होते. पाटलाने जातांना या नवरा बायकोकडुन कायमचे वाड्यावर राहण्याचे वचन घेतले होते. त्यांच्या पश्चात या वाड्याची जबाबदारी या जोडप्याकडे आली. खुप गर्भ श्रीमंत घराण्यातील होती ती दोघेही. त्यांच्याकडे खुप पैसा, सोने चांदीची दागीने होती. वरून पाटलाची सर्व संपत्ती ही आता त्यांच्याकडे आली होती. त्यामुळें ते गावात सर्वात श्रीमंत होते. हे जोडपं आनंदात जीवन जगत होते. एके दिवशी मात्र अमावस्येच्या रात्री त्यांच्या वाड्यावर चोरीच्या उद्देशाने दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोर सोने, नाणे ,पैसा, लुटण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळी त्या दाम्पत्यांनी दरोडेखोरांना विरोध केला. दरोडेखोरांच्या हातुन तो तरुण मारला गेला. आता त्या दरोडेखोरांनी त्या स्त्रीला सुद्धा मारायचे ठरवले. तेव्हा ती स्त्री ओरडली. वाचवा….! वाचवा….! कोणीतरी मला वाचवा….! असा आवाज करू लागली. शेवटी दरोडेखोरांनी तिला जीवे मारले. सर्व वाडा लुटुन ते दरोडेखोर पसार झाले. तेव्हापासून तो पाटलाचा वाडा बंदच आहे. गावातील कुणीच त्या वाड्याकडे फिरकत नाही. कधी कधी त्या स्त्रीचा आत्मा अमावास्येला त्या वाड्यात भटकत राहतो म्हणे. प्रत्यक्ष मात्र ती स्त्री कधी कुणाला दिसली नाही. मी मात्र पाटलाच्या आठवणीने कधी कधी जायचो त्या वाड्याकडे पण, मला एकदा त्या वाड्यावर असाच भास झाला. तेव्हापासून मी सुद्धा फिरकत नाही तिकडे….! हे सर्व ऐकून मी व शरद रामुकाकाकडे बघतच राहिलो. मला मात्र ती स्त्री व तिचा आवाज, तिची दिसलेली प्रतिमा हा भास मनात भिती करुन केला.
✍✍✍✍✍
लेखक
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
1 comment:
पुढे काय झाले तरि सांगा
Post a Comment