आजकालच्या पालकांच्या मुलांनकडून अपेक्षा !
महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अठराशे च्या दशकात शिक्षणाचे छोटेशे रोप लावले. आज त्याचा शिक्षणरुपी मोठा वटवृक्ष तयार झाला. आज तुम्हा-आम्हाला सर्वांना या वटवृक्षाने स्वतःच्या ज्ञानरुपी सावलीत सामावून घेतले. एकेकाळी स्त्रियांनी चूल आणि मूल या मध्ये अडकून राहण्याची परंपरा होती. शिक्षणाचे नाव घेणे पाप समजले जायचे. याकाळी शिक्षणाला समाजाचा तीव्र विरोध होता. हा विरोध पत्करून फुले दांपत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ज्ञानरुपी शिक्षणाचा दिवा पेटवला. आज लख्ख प्रकाशात शिक्षणाच्या प्रवाहात घराघरात, समाजात, प्रचंड बदल झाले. शिक्षण गतिमान झाले व काळानुरूप बदललेली शिक्षण पद्धती स्वीकारण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतोय. शाळा, शिकवणी, अभ्यासीका असे वेगवेगळे पर्याय निवडून विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत पालकांच्या आपल्या पाल्याकडून प्रचंड अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रत्येक पालकाला वाटते आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, वकील व्हावे, पोलीस व्हावे, कलेक्टर व्हावे, तहसीलदार व्हावे वेगवेगळ्या उच्चपदस्थ पदी त्यांनी गवसणी घालावी. सरकारी नोकरच व्हावे. या हट्टापायी मुलांनवर स्वतःच्या अपेक्षा लादल्या जात आहे. अर्थात आपल्या पाल्याला कशात आवड आहे. त्याच्या जन्मापासूनचा कल, आवड कशात आहे हे जाणून घ्यायला कोणीच तयार नाही. त्यांच्यावर पालकांच्या अपेक्षांचे ओझे खुप आहे. हे अपेक्षांचे ओझे घेऊन विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन मालक व्हावे असे कुणालाच वाटत नाही. उलट मुलांनी नोकर व्हावे यासाठी सर्वांचा अट्टाहास सुरू आहे. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम एका ठिकाणी असे म्हणतात. जोपर्यंत या देशात नोकर होण्याचे स्वप्न पाहणे बंद होत नाही तोपर्यंत देशात मालक जन्माला येणार नाही. याचा अर्थ व्यवसाय, उद्योगधंदे, शेती, अभिनय, खेळ, कला यासारख्या क्षेत्रात कुणालाच रस राहिलेला नाही. विद्यार्थी वेगवेगळ्या कलेमध्ये निपुण असतात. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात आवड असते. कुणाला गायनाची, कुणाला वादनाची, कुणाला खेळाची, कुणाला चित्र काढण्याची, कुणाला भाषण करण्याची, कुणाला लेखन करण्याची, कुणाला अभिनयाची अशा वेगवेगळ्या कलेमध्ये विद्यार्थ्यांना रस असतो. पालकांनी त्यांच्या कलेनुसार जर शिक्षणाला प्रोत्साहन दिले तर विद्यार्थी जीवनात खऱ्या अर्थाने यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही. जर प्रत्येकच पालकांनी स्वतःच्या अपेक्षा मुलांनवर लादल्या असत्या तर या देशात सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, पी.टी.उषा, कल्पना चावला, अमिताभ बच्चन यासारखी विविध क्षेत्रात यश संपादन करणारी मंडळी तयार झाली नसती. म्हणून पालकांनी मुलांकडून आपल्या वाढत्या अपेक्षा ठेवू नये. आजकाल पालक मुलांना समजून घ्यायला तयार नाही. मुलांना गुणांच्या स्पर्धेत ढकलून पहिला नंबर कसा येईल, शंभर पैकी शंभर टक्के मार्क कसे मिळतील. इतरांपेक्षा माझा मुलगा गुणानुक्रमे पहीला कसा येईल यासाठी पालक सतत विद्यार्थ्यांच्या मागे लागलेले असतात. उच्च शिक्षणासाठी इतरांपेक्षा सर्वप्रथम आपल्याच पाल्याचा नंबर कसा लागेल यासाठी सतत पाठपुरावा करत असतात. उलट आपल्या मुलांना आपण समजून घ्यायला तयार नाही. त्याला अभ्यासक्रम कसा वाटतो, त्याला शाळेत शिकलेले कितपत समजते, तो अभ्यासक्रमाला कशाप्रकारे पेलु शकतो. यासाठी त्याची शारीरिक क्षमता कितपत योग्य आहे. त्याची मानसिक क्षमता कशी आहे. याचा आपण विचार करत नाही. मुलांना आपण मानसिक बळ द्यायला हवेत. त्याला वेळोवेळी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आजच्या तरुण मुलांचे बालपण हिरावून घेतल्या जात आहे. लहानपणापासुन खेळणे, बागडणे, गप्पा मारणे, संवाद साधने, टीव्ही पाहणे, मित्रांसोबत वेळ घालणे, यासारख्या गोष्टींना लगाम घालण्यात येत आहे. मुलांना मनसोक्त खेळणे, मित्रांसोबत बाहेर जाणे, मामाच्या गावाला जाणे, वेगवेगळ्या नातेवाईकांकडे जाणे, सणवार, उत्सव एकत्र येऊन साजरा करणे. या गोष्टीचा आनंद आजकालच्या मुलांना मिळत नाही. याचे कारण म्हणजे पालकांनी आणलेले बंधन होय. कारण पालकांना वाटते माझ्या मुलांनी या सर्व गोष्टी जर केल्या, तर त्याचा अभ्यासावर परिणाम होईल. त्याचा वेळ व्यर्थ जाईल. त्याची गुणवत्तेची क्रमवारी घसरेल. आपण आपल्या पाल्यांना ज्या प्रकारे शैक्षणिक बंधने घालून दिलेली आहेत. यामुळे मुलांना स्वतःच्या कला, आवड, छंद जोपासता येत नाही. मुलांचे बालपण हरवले जात आहे. मनाच्या विरोधात जाऊन त्यांना अभ्यास आणि फक्त अभ्यासच करावा लागतो. यातूनच मुलांची निराशा वाढत जाते. मुलांना नैराश्यात ढकललेले जाते. यातुन मुले आत्महत्या सारखा पर्याय निवडतात. याला कुठलीही शिक्षणपद्धती किंवा अभ्यासक्रम, शाळा जबाबदार नाही. तर पालकांच्या आपल्या मुलाप्रती वाढलेल्या अपेक्षा आहे. म्हणून येणाऱ्या काळात पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता त्यांना त्यांच्या कलेनुसार, आवडीनुसार शिक्षण घेऊ द्यायला हवे. तरच देशात कलाकार, खेळाडू, लेखक, समाजसुधारक, विचारवंत, पुढारी निर्माण होईल. देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी होईल.कारण नोकर होण्याऐवजी मालक या देशात तयार होतील. शिक्षण फक्त नोकरीसाठी नसून ते व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी आहे. माणूस उत्तम घडला पाहिजे. आजचा तरुण आपल्या देशाचा उद्याचा नागरिक आहे. तो स्वतःच्या विचारांनी व कर्तुत्वाने घडलेला असला पाहिजे. आपण आपल्या पाल्याकडून वाढलेल्या अपेक्षा कमी करूया व मुलांना स्वतःच्या आयुष्यात मनमुराद जगण्याचे स्वातंत्र्य देऊया. स्वतःच्या कलागुणांना जोपासण्याचे, स्वतःचे आयुष्य घडविण्याचे स्वातंत्र्य मुलांना देऊया. तरच खऱ्या अर्थाने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणरुपी स्वप्न पूर्ण होईल.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment