युवकांचे प्रेरणास्थान
स्वामी विवेकानंद
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते काही खोटे नाही.ही म्हण अगदी जशीच्या तशी लागू पडते ती भारतासारख्या पावन भूमीत जन्म घेतलेल्या एका महान युगपुरुषासाठी.ज्यांनी आपल्या आयुष्यात छोट्याशा कारकीर्दीत स्वतःच्या कर्तृत्वाने प्रसिद्धी मिळविली. भारताबरोबर विदेशात सुद्धा ज्यांनी आपल्या देशाचा ठसा उमटवला.ज्यांच्या ज्ञानाने व तेजस्वी रुपाने लोकांना मंत्रमुग्ध करून सोडलं.भारतीय संस्कृती आणि येथील शिकवण विदेशात पोहोचविण्यासाठी या महापुरुषांने योगदान दिल.संपूर्ण विश्वात हिंदू धर्माचे स्थान निर्माण करून त्याचे महत्त्व टिकवून ठेवण्यात विवेकानंदांचा फार मोठा वाटा आहे.स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी भारतातील कलकत्ता या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते.स्वामी विवेकानंदांचे नाव नरेंद्रनाथ होते. स्वामी विवेकानंदांचा जन्म एका बंगाली कुटुंबात झाला होता.स्वामी विवेकानंदांचे वडील कोलकत्ता येथे उच्च न्यायालयात वकिली करत होते.विवेकानंदावर कुटुंबातून अध्यात्मिक व धर्मविषयक योग्य संस्कार झाले. बालपणापासूनच विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दिसून येत असत.त्या म्हणजे ते स्वभावाने श्रद्धाळू होते.व दुसरे म्हणजे कोणतीही गोष्ट बेधडकपणे करण्याची हिंमत त्यांच्यात होती.त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत पाठवण्यात आले.शाळेत असताना विवेकानंद अतिशय हुशार होते.शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी त्यांच्या लगेच लक्षात राहत असत.तसेच त्यांनी एकदा वाचन केले की ते लगेच त्यांचे पाठ होऊन जायचे.अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांची होती.या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वतःला घडवले,समृद्ध केले.विवेकानंदांनी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांच्या कुळाची व शाळेची कीर्ती ध्वजा उंचावली.पुढे कोलकत्ता च्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी तत्वज्ञान विषयात एम.ए केले.पुढे स्वामी विवेकानंद धर्म परिषदेसाठी शिकागोला जाण्यासाठी मुंबईवरुन रवाना झाले.अमेरिकेतील प्रख्यात अशा शिकागो शहरात आले.शिकागो येथे 11 सप्टेंबर रोजी धर्मपरिषद होणार असल्याची त्यांना समजले.श्रेष्ठ अशा हिंदु धर्माची ओळख भारतभूमीच्या या पुत्राने जगाला करून देणे हा दैवयोग होता.11 सप्टेंबर 1893 रोजी झालेल्या सर्व धर्म परिषदेच्या माध्यमातून साऱ्या जगाला आव्हान करणारे स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे खरे प्रतिनिधी ठरले.11 सप्टेंबर 1893 रोजी सकाळी धर्मगुरुंच्या मंत्रोच्चारानंतर संगीतमय वातावरणात धर्म परिषदेचा शुभारंभ झाला.व्यासपीठावर अनेक पंथांचे धर्म प्रमुख बसलेले होते.या परिषदेस सहा ते सात हजार स्त्री-पुरुष उपस्थित होते.अध्यक्षांच्या सूचनेनुसार व्यासपीठावरील प्रत्येक प्रतिनिधी आपली तयार केलेली भाषणे वाचून दाखवत होते.शेवटी स्वामीजींचे नाव पुकारले गेले.स्वामीजींनी आपले भाषण लिहून आणले नव्हते. वेळेवर ते उभे राहिले.व आपल्या गुरूंचे स्मरण करून बोलण्यास सुरुवात केली.अमेरिकेतील माझ्या ''भगिनींनो आणि बंधुंनो'' या शब्दांनी सुरुवात करून त्यांनी सभेला संबोधित केले.त्यांच्या चैतन्यपूर्ण ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले.स्वामी विवेकानंदांच्या चेहऱ्यावरील तेजस्वी तेज आणि वाणीतील गोडवा सदैव सर्वांना प्रेरित करणारा होता.त्यांच्या बोलण्यात अशी काही अद्भुत शक्ती होती की, स्वामीजींनी माझ्या भगिनींनो आणि बंधुंनो हे शब्द उच्चारताच हजारो स्त्री-पुरुष आपल्या जागी उभी राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.स्वामी विवेकानंदांचे विचार ऐकून सर्व जमा झालेले विद्वान चकित झाले होते.त्यांनी त्यांच्या बोलण्यातून हिंदू धर्माची व भारताच्या संस्कृतीची ओळख करून दिली होती. स्वामीजींनी कोणत्याही धर्माची निंदा किंवा टीका केली नाही.कोणत्याही धर्माला कमी लेखले नाही.म्हणूनच जागतिक सर्वधर्मपरिषदेत हिंदूधर्माला सर्वोच्च आसनावर विराजमान केले.या परिषदेत हिंदुस्तानाबद्दल बोलताना ते म्हणतात हिंदुस्तान ही पुण्यभूमी आहे,कर्तव्यभूमी आहे,या भूमीला अध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल.जगात परधर्माबद्दलची सहिष्णुता व जिव्हाळा फक्त याच भूमीत अनुभवता येतो.अमेरिकासारख्या परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करून कोलकात्यात परतल्यावर भारतातील नागरिकांनी स्वामीजींचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. आपल्या व्याख्यानातून ते लोकांना सदैव मार्गदर्शन करत राहिले.स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरु मानले होते.रामकृष्ण परमहंस यांच्या विचारातून ते घडत गेले होते.स्वामी विवेकानंद यांनी गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्याचबरोबर ठिकठिकाणी अनाथाश्रम,दवाखाने,वस्तीगृह यांची स्थापना केली.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात त्यांचे विचार खूप महान होते.विद्यार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे गेले पाहिजे असे ते म्हणत.अशा महान योगी पुरुषाने 4 जुलै 1902 या दिवशी कोलकत्ता जवळील बेलूर मठात समाधी घेतली.एका तेजस्वी, कर्मयोगी,संन्यासी,बुद्धिमान अशा स्वामी विवेकानंदांचा विचार आजच्या युवकांना प्रेरणादायी व स्फूर्तिदायी आहे. देशाच्या प्रत्येक युवकाच्या मनात व विचारात सदैव प्रेरणा बनून हिंदुस्तानाला व हिंदुस्थानाच्या संस्कृतीला हजारो वर्ष अबाधित राखण्याची शक्ती स्वामी विवेकानंदांनी दिली आहे.अशा महान स्वामी विवेकानंदांचा 12 जानेवारी हा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक सदैव प्रेरणा देत उभे राहिले आहे.स्वामी विवेकानंदांचे आयुष्य हिंदुस्थानाला व हिंदुस्थानातील युवकांना प्रेरित करणारे आहे.येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते प्रेरणादायी राहतील.देशातील युवकांनी विवेकानंदांची प्रेरणा घेऊन सदैव स्वतःला व हिंदुस्थानाला गौरवांकीत केले पाहिजे.बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं विवेकानंदांच्या बाबतीत म्हणणं वावगं ठरणार नाही.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment