आधुनिक युगात जीवन जगतांना प्रत्येक जण धावपळीचे आयुष्य जगतोय.दिवस निघाल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत प्रत्येक मनुष्य स्वतःच्या आयुष्यात खूप बिझी झाला.पर्यायाने त्याला समाज,शेजारी-पाजारी,मित्रमंडळी यांच्यासोबत वेळ देणे शक्य होत नाही.आपले घर आणि आपले काम यातच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे.त्यामुळे समाज,शेजारी,मित्रमंडळी, यांच्यातील संवाद घडवून आणणे बंद झाले.स्वतःच्या कुटुंबात तो व्यस्त झाला.यातच तंत्रज्ञानाने गरुड झेप घेतली.इंटरनेटच्या जमान्यात थ्री जी, फोर जी इंटरनेट सुविधा आली.व्हाट्सअप, फेसबुक,ट्विटर,इंस्टाग्राम यासारखी साधने आली.माणसाने स्वतःला या सर्वांशी गुंतवून घेतले.एकेकाळी समाज,शेजारी, मित्रमंडळी यांच्यापासून दुरावलेला माणूस आतातर कुटुंबातून सुद्धा दुरावत चाललेला आहे.कारण कुटुंबात प्रत्येकाकडे मोबाईल आला.या मोबाईलने प्रत्येकाला व्हाट्सअप,फेसबुक, ट्विटर यासारखी व्यसने लावली.या सर्वांमध्ये मनुष्य एवढा गुंतला गेला की,तो कुटुंबात सुद्धा संवाद साधत नाही.घरात एकमेकासमोर बसलेली कुटुंबातील माणसे अनोळखी माणसा सारखी एकमेकांकडे बघतात. पण बोलत नाही.कारण त्यांचे सर्व लक्ष मोबाईलमध्ये गुंतलेले असते.एकेकाळी गावातील चावडीवर,मंदिरावर, माणसांचा घोळका दिसायचा.एकमेकांशी माणसं मनमोकळेपणाने गप्पा मारायची एकमेकांची विचारपूस करायची.यातुन अनेकांचे सुख दुःख कळायचे.एकमेकांची आपुलकीने चौकशी करायची यातून माणसा माणसांमध्ये सुसंवाद व्हायचा व प्रेम, जिव्हाळा वाढिस लागायचा.बसने प्रवास करताना सहाजिकच शेजारी बसलेल्या माणसाची विचारपूस करून ओळख निर्माण व्हायची.यात्रा-जत्रा, बस स्टॅन्ड,लग्न समारंभ अशा विविध गर्दीच्या ठिकाणी ओळखीचा माणूस बघितला की गर्दीतून वाट काढत त्याच्याकडे जाऊन आपुलकीने विचारपूस व्हायची.आता मात्र या गोष्टी होताना दिसत नाही.कुटुंबातील सुसंवाद बंद झाला.यामुळे कुटुंबातील प्रेम,जिव्हाळा कमी होत चालला आहे.कुटुंबातील आपुलकीची भावना लोप पावत आहे. सणवार,उत्सव यासाठी कुटुंब एकत्र जमायचे.प्रत्येक जण मनमोकळेपणाने गप्पा मारायचे,मनमुराद हसायचे,मुक्तपणे चर्चा चालायच्या.यातून अनेक गोष्टींची, विचारांची देवाण-घेवाण व्हायची.यामुळे मन प्रसन्न होऊन प्रत्येक जण दुसऱ्या दिवशी उत्साहाने आपापल्या कामावर जायचा.सहाजिकच आनंदी जीवन शैलीमुळे मानसिक व शारीरिक संतुलन अबाधीत राहायचे.आजकाल मात्र मोबाईल, टीव्ही,इंटरनेट यामुळे संवाद होत नाही.चर्चा,गप्पा,हसणे या गोष्टींना कोणीच महत्त्व देत नाही.यातून विचारांची देवाण-घेवाण होत नाही.सुख,दुःख अनेक अडचणी शेअर होत नाही.माणूस भावनिक दृष्ट्या एकटा पडत चालला आहे. यामुळे चिडचिड होणे,अति राग येणे,मानसिक अस्वस्थता या गोष्टी घडत आहे. माणूस भावनाशील आहे कुठेतरी त्याच्या भावना मोकळ्या झाल्या पाहिजे.नाही तर मनुष्य चिडचिडा बनतो,आक्रमक बनतो यातून नैराश्य निर्माण होते.अनेक जण आत्महत्या करतात.स्वतःला संपवतात. कुठेतरी या गोष्टी थांबवण्यासाठी कुटुंबातील सुसंवाद घडणे गरजेचे आहे.सुसंवाद,गप्पा-गोष्टी, चर्चा,वाचन,लेखन या गोष्टी करण्यासाठी प्रत्येकाने व्हाट्सअप, फेसबुक,ट्विटर यासारख्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.तरच कुटुंबातील सुसंवाद वाढेल.सुखी आयुष्य जगण्यासाठी सुसंवाद,वाचन,लेखनाची नितांत गरज आहे.नविन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण सर्वजण संकल्प करूया. कुटुंबातील सुसंवाद वाढवूया आनंदी जीवन जगूया.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
No comments:
Post a Comment