Saturday, 1 August 2020

बळीराज्याची दिवाळी यावर्षी संकटात

   बळीराज्याची दिवाळी यावर्षी संकटात


भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक जाती धर्मात वेगवेगळे सण,उत्सव साजरे होत असतात.प्रत्येक राज्यात तेथील भौगोलिक,सामाजिक परिस्थितीनुसार सण साजरे होत असतात.महाराष्ट्रात सुद्धा अनेक सण,उत्सव साजरे होतात.यातीलच महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी होय.प्रत्येकाच्या घरात आनंदाचा प्रकाश घेऊन येणारा हा सण आहे.वर्षभर काबाडकष्ट,नोकरी सांभाळत असताना कुटुंबापासून, स्वतःच्या गावापासून दूर राहावे लागते.दिवाळी सणाला प्रत्येकजण स्वतःच्या गावी येतो.व कुटुंबासोबत उत्साहात दिवाळी साजरा करतो.देशातील बळीराजा कष्टकरी, शेतकरी मात्र निसर्गावर अवलंबून असतो.बळीराजाची या वर्षीची दिवाळी मात्र संकटात, अंधारात आहे.कारण दरवर्षी येणारे संकट त्याला सतत अडचणीत आणत असते. मागच्या वर्षी भीषण दुष्काळ होता.यामुळे शेतात उत्पन्न झाले नाही.गेल्या वर्षी खर्च केल्या इतका माल झाला नाही.यातच वीमा कंपनीने शेतकऱ्यांना पुरेसा विमा दिला नाही.यातून स्वतःला सावरत पुन्हा नवीन उमेदीने शेतकरी कामाला लागला.जून महिन्यात बँकेच्या पायऱ्या झिजवत कर्ज मिळविले.काहींना कर्ज सुद्धा मिळाले नाही.पैसे नाही म्हणून पेरणीसाठी खत,बी,भरण घेणे थांबले.कसाबसा पैसा मिळवून खत,बी,भरण घेतले.जुलैच्या सुरुवातीला पेरणी केली.कसबसे पिक उगवले. स्वतःच्या पोटच्या गोळ्याप्रमाणे शेतातील पीक जपले. खुरपणी, फवारणी,केली. यातच कुठे पाऊस पडला नाही,तर कुठे अतिवृष्टी झाली.एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले.काही भागात अतिवृष्टी झाली.बळीराजाच्या शेतातील पिकाचे एका रात्रीत संपूर्ण नुकसान झाले.तर याउलट काही भागांमध्ये पाऊस नाही.म्हणून शेतातील छोटी-छोटी पिके पावसाच्या आशेने आभाळाकडे बघत राहिले.या सर्वातुन सावरत शेतातील माल डोलायला लागला,रान हिरवेगार मोत्यासारखे चमकू लागले.कष्टाला पुन्हा एकदा उभारी आली.कधी नव्हे एवढे पीक यावर्षी आले.जणूकाही यावर्षी शेतकरी गर्भश्रीमंत होणार यासाठी निसर्गाने किमया घडवली असे वाटू लागले. सोयाबीन चा हंगाम सुरू झाला.दिवस-रात्र कष्ट करून सोयाबीन कापणी सुरू झाली.काही भागात सोयाबीन कापणी चालूच,तोच वरुणराजाने जोरदार हजेरी लावली.रोजच पाऊस पडू लागला व तोंडाजवळ आलेला घास पुन्हा निसर्गाने हिसकावून घेणे सुरू झाले.नको त्या वेळी पडलेल्या या पावसाने ज्वारीच्या उभ्या कणसाला कोम फुटु लागले,सोयाबीनच्या सूड्या शेतात खराब होऊ लागल्या. कपाशीचे बोंड सडू लागले.बळीराजावर पुन्हा एकदा संकट आले.मात्र या संकटात लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे.पुढारी मात्र विधानसभेच्या धामधुमीत व्यस्त होते. सरकारला नवीन सरकारचे वेध लागले.कर्मचारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त झाले.शेतकरी मात्र चिंतेने पार हतबल झाला.नेहमीप्रमाणे रोजच नको असलेलं आयुष्य जगू लागला.निसर्गच त्याचा मित्र आणि निसर्गच त्याचा शत्रू सांगावे तरी कुणाला अशी त्याची अवस्था झाली.जवळचे पैसे शेतीला लावून बसला.आता त्याच्या जवळ पैसे उरले नाही व उमेदही उरली नाही.वर्षभराचा उत्सव दिवाळीच्या रुपाने अंगणात आला.मात्र आता या उत्सवाचा प्रकाश करायला त्याच्याकडे पैसे नाही.मनात इच्छा उरली नाही.आज पुढारी, नोकरदार,व्यवसायिक यांच्या घरात उत्साहात दिवाळी साजरी होणार,पण जगाचा पोशिंदा माझ्या बळीराजाची दिवाळी या वर्षीसुद्धा संकटातच साजरी होणार.या कृषीप्रधान देशात माझ्या बळीराजाला चांगले दिवस येवोत व माझ्या बळीराजाची दिवाळी दरवर्षी आनंदाने लख्ख प्रकाशात साजरी होवो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना.यासाठी प्रत्येकाने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया तरच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...