Saturday, 29 August 2020

जाणून घेऊया रक्तदानाचे महत्त्व


जाणून घेऊया रक्तदानाचे महत्त्व


जगात विज्ञानाने अनेक शोध लावले. विज्ञानाने माणसाचे जीवनमान उंचावले गेले. पूर्वीच्या काळी मनुष्य अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगत होता. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या सुद्धा पुरेशा प्रमाणात त्याला भागवता येत नव्हत्या. याशिवाय त्याला इतर गरजा नव्हत्या असे नाही. परंतु त्या त्या परिस्थितीत तो जीवन जगण्याला प्राधान्य देत होता. जिवंत राहण्यासाठी त्याची धडपड चालत असे. मुळात विचार करणे, शिक्षण घेणे, शोधक वृत्तीला चालना देणे या गोष्टी त्या काळात घडत नसत. यामुळे साधे जीवन जगणे हाच पर्याय त्याच्यापुढे होता. हळूहळू मनुष्य विचार करू लागला. शिक्षणाचे माध्यम उपलब्ध झाले. त्याच्या शोधक वृत्तीचा विकास होत गेला. याच्या जोरावर मनुष्य अनेक शोध साध्य करू लागला. यातूनच शिक्षण, शोध व विज्ञान याच्या जोरावर अनेक नवीन शोध लागत गेले. नवीन शोधाच्या उपलब्धतेनुसार मानवाच्या गरजा सुद्धा वाढत गेल्या. स्वतःच्या मूलभूत गरजांबरोबरच शिक्षण, मनोरंजन, आरोग्य, शोध, संशोधन या गरजा निर्माण होत गेल्या. यातून मानवाने स्वतःचे विचार, शिक्षण व बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक शोध लावले. मग ते शोध प्रत्येक क्षेत्रात लावले गेले. आरोग्याच्या क्षेत्रात मानवाच्या संपूर्ण शरीराचा अभ्यास करणारे शास्त्र शिक्षणाच्या रुपाने समोर आले. आज संपूर्ण मानवी शरीरावर उपचार केले जातात. एवढा प्रचंड मोठा शोध विज्ञानाने लावला. रक्तगट व रक्तातील पेशींचा शोध लावला गेला. परंतु जगात आजही विज्ञान व विज्ञानवादी शास्त्रज्ञ यांना मानवी शरीरातील रक्ताप्रमाणे नविन रक्त निर्माण करता आले नाही. रक्त निर्माण करुन मानवाच्या शरीरात सोडता आले नाही. रक्त निर्माण करण्याचे अनेक प्रयोग झाले. परंतु त्यात अद्यापही यश आले नाही. आज आपण पाहतो मानवाच्या आजारपणात अनेक व्याधीवर शस्त्रक्रिया केली जाते. तसेच नैसर्गिक अपघातातून सुद्धा मनुष्यावर शारीरिक संकटाचे प्रसंग ओढावले जाते. या वेळी त्याला वाचवतांना रक्ताची गरज भासते. मुळात रक्ताची निर्मिती केली जात नाही. रक्त कुठे बाजारात, दुकानात विकत मिळत नाही. रक्त शेतात पिकवता येत नाही. हे दानाच्या स्वरूपाने एकाकडून दुसऱ्या पर्यंत पोहचवता येते. त्यासाठी सुद्धा खूप तपासण्या, रक्त काढणे, रक्ततपासणी, रक्त टिकविणे व गरजेनुसार समोरच्या व्यक्तीला रक्तगट जुळवून रक्त देणे. या सर्व प्रक्रियेला खर्च येतो. अर्थात या प्रक्रिया घडण्यासाठी मनुष्याच्या शरीरातून रक्त काढणे गरजेचे असते. आजकाल आरोग्य यंत्रणेत औषधी बरोबरच रक्त ही महत्त्वाची गोष्ट बनली आहे. याचा विचार करून गावोगाव रक्त संकलन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. समाजात रक्तदानासाठी आव्हान केले जाते. परंतु समाजात आजही रक्तदानाविषयी पाहिजे तेवढी जागृती झाली नाही. रक्त दिल्याने प्रकृती बिघडेल, प्रकृती खालावली तर वजन कमी होईल, परत रक्त येणार नाही, रक्ताची रिकव्हरी झाली नाही तर कदाचित जीवितास धोका निर्माण होईल. अशा वेगवेगळ्या वैचारिक गैरसमजुती आहेत. यामुळे अनेक जण रक्तदान करत नाही. रक्तदान हे अतीशय महत्त्वाचे दान आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत. अन्नदान, ज्ञानदान, मतदान, अवयवदान, नेत्रदान, रक्तदान अशा स्वरूपाने दान दिले जाते. प्रत्येकाला दान देणे शक्य आहे. जो तो आपआपल्या परीने दान करत असतो. परमार्थात अन्नदानाला महत्त्व आहे. शिक्षण क्षेत्रात ज्ञान दानाला महत्त्व आहे. राजकारणात मतदानाला महत्त्व आहे. आरोग्य क्षेत्रात अवयवदानाला महत्त्व आहे. तसेच मनुष्याला शारीरिक व्याधीच्या संकटातून वाचण्यासाठी रक्ताची गरज आहे. त्यासाठी रक्तदान सुद्धा महत्वाचे दान आहे. आयुष्यात कधी कोणाच्या कुटुंबावर, कुटुंबातील व्यक्तीवर जीवन-मरणाचा प्रसंग ओढावेल सांगता येत नाही. अशा वेळी डॉक्टर रक्ताची गरज आहे असे सांगतात. रक्त त्वरित उपलब्ध करावे लागेल अशा सूचना करतात. अशावेळी मनुष्य धावत पळत रक्तपेढीची पायरी ओलांडतो. त्याठिकाणी रक्ताची पिशवी उपलब्ध नसेल तर खूप मोठे संकट उभे राहते. अशावेळी रक्तदानाचे महत्त्व कळते. स्वतःचे प्राण, स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीचे प्राण किंवा जवळच्या नातेवाईकांचे प्राण आपल्याला महत्त्वाचे वाटतात. परंतु या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याचे प्राणही तेवढेच महत्त्वाचे आहे. मग तो आपला जवळचा असो किंवा आपला नातेवाईक नसो. आपल्या एका रक्तदानाने आपण त्याचे प्राण वाचू शकतो. रक्तदान हे असे धन आहे की, मनुष्याचे प्राण वाचवू शकतात. एका रक्तदानामुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात. माणसाने माणसाला जीवदान देणारे दान म्हणजे रक्तदान होय. आजकाल नैसर्गिक संकटे खूप ओढवली जातात. अपघाता सारखे संकटे पावला पावलावर उभी आहे. तसेच आरोग्याच्या व्याधीमुळे अनेकांना सर्जरी करावी लागते. सर्जरी करण्याचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे. यासाठी रक्ताची खूप गरज भासते. यासाठी समाजातील तरुण पिढीने पुढे आले पाहिजे. स्वतः रक्तदान करून इतरांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. रक्तदानाचे अनेक फायदे आहेत. हे फायदे समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. रक्तदानाची महती प्रत्येकाला कळली पाहिजे. लाखो करोडो रुपये खर्च करून मनुष्य स्वतःचा प्राण वाचवू शकत नाही. पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा यामुळे प्राण वाचत नाही. तर योग्य उपचार, योग्य औषधे व वेळेवर रक्त यामुळे मात्र अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकते. पैशाची मदत अनेकजण करतात. उपचाराची मदत डॉक्टर करतात. पण रक्तदानाची मदत मात्र सामान्य माणूसच करू शकतो. रक्तदान हे निस्वार्थी दान आहे. आपण दिलेले रक्त कधी कुणाला कामी येईल हे आपल्याला माहित नाही. परंतु निश्चितच एखाद्याचे प्राण वाचेल ऐवढे मात्र खरे. समाजाने रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. अनेक गावात, शहरात वेळोवेळी रक्तदानाच्या शिबिराचे आयोजन केले पाहिजे. अशा शिबिरांमध्ये अनेकांनी रक्तदान केले पाहिजे. दर तीन महिन्यानंतर रक्तदाता रक्तदान करू शकतो. अमूल्य असे रक्तदान निस्वार्थी सेवा भावनेने केले जाते. त्याचा मोबदला वाचलेल्या मनुष्याच्या आशीर्वादाने आपल्याला मिळत असतो. जनमानसात आलेल्या संकटात आपण माणुस म्हणून एकमेकांसाठी धावून जाऊया. आपल्या आपल्या परीने रक्तदान करण्यासाठी पुढे येऊया. सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी समजून रक्तदान करूया. अनेकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करूया. अनेकांचे प्राण वाचवूया. चला पुन्हा एकदा रक्तदान करू या.

‘‘ एक रक्तदान वाचवेल अनेकांचे प्राण. ’’

‘‘ रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.’’

‘‘ थेंब आहे हा रक्ताचा, आधार आहे दुसर्याच्या जीवनाचा.’’


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852


No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...