Thursday, 19 November 2020

यात्रा (लघुकथा)

                       यात्रा (लघुकथा) 

रामपूर हे गाव नदीच्या काठावर वसलेले होते. नदीच्या एका किनाऱ्यावर हिरवीगार झाडी बहरली होती. तर दुसर्‍या किनार्‍यावर रामपुर नावाचं टुमदार गाव उभं होतं. गावातील बहुतेक तरुण शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त शहरात वास्तवास होते. गाव छोटे असल्यामुळे गावात सर्वांना काम मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे तरुण पिढी शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात दोन वर्षे वाट बघत असे. सरकारी नोकरी नाही मिळाली तर शहरात खासगी कंपनीत नोकरी मिळवत असे. गावातील लोक शेती व्यवसाय करून पोट भरत असे. नदीला पावसाळ्यात दोन चार पूर गेले की, हिवाळा संपेपर्यंत नदीत पाणी वाहत असे. त्यामुळे शेतीसाठी नदीच्या पाण्याचा वापर होत होता. रामपूरची नदी म्हणजे गावातील सर्वांना देवाची देणगीच होती. शेतात हिरवा भाजीपाला, फळं, कडधान्य, ऊस, कापूस अशा सगळ्या गोष्टी शेतकरी पिकवत असे. रामपूर गावातील भाजीपाला रोजच शहरात जात असे. अन्नधान्य, फळ, भाजीपाला, दूध व पाणी यांनी रामपूर समृद्ध होते. वर्षभर गावातील लोकं कष्ट करण्यात व्यस्त राहत असे. गावात नदीच्या काठावर खंडोबाचे पुरातन सुंदर असे मंदिर होते. गावाचे ग्रामदैवत या मंदिराला समजून गावकरी खंडोबाची भक्ती करत असे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला गावात खंडोबाची मोठी यात्रा भरत असे. रामपुरची खंडोबाची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. दरवर्षी भरणाऱ्या या यात्रेला गावातील प्रत्येक नोकरदार, तरुण, बाहेरगावी कामानिमित्त असलेले प्रत्येक जण आठवणीने येत असे. गावातील लेकीबाळी, पाहुणे, नातलग, यांना यात्रेचे निमंत्रण आवर्जून जात असे. त्यामुळे यात्रेला सर्व नातलग, गावकरी एकत्र जमत असे. त्याचबरोबर खंडोबाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील अनेक गावकरी येत होते. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेत गर्दीचे स्वरूप प्राप्त होत असे. खंडोबाचे देवस्थान ग्रामदैवत असल्यामुळे गावकरी या यात्रेच्या वेळी खंडोबाची मनोभावे पूजन करत असे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यात्रा जवळ आली होती. गावातील प्रत्येकाच्या मनात यात्रेविषयीचा आनंद झळकत होता. जशी जशी चंपाषष्टी जवळ येत होती. तसे तसे गावकरी यात्रेच्या प्रतीक्षेत होते. खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांनी मंदिराला छान रंगरंगोटी करून घेतली. यात्रा दोन दिवसावर आली होती त्यामुळे मंदिरावर लाइटिंगची रोषणाई करण्यात आली होती. या यात्रेसाठी बाहेरगावावरून वेगवेगळी दुकाने गावात येऊ लागली होती. भंडारा, प्रसाद विकणारी दुकाने, खेळणीची दुकाने, त्याचबरोबर भांडी, कपडे, किराणा अशी सगळ्या वस्तूंची दुकाने या यात्रेत येत असे. रास पाळणा, मोठीमोठी पाळणे, हात बाहुलीचा खेळ करणारी कलाकार, तमाशा कलावंत, वाघे मुरुळी, आदींनी गावाच्या बाहेर नदीकाठी जागा धरून साफसफाईला सुरुवात केली.  यात्रा दोन दिवसावर आल्यामुळे बाहेरगावी असणारी मंडळी गावावर येऊ लागली होती. गावाला शहराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यात्रेसाठी गावातील मुलीबाळी नातेवाईक प्रत्येकाच्या घरी जमू लागली. खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळीने सर्व यात्रेकरूंना जागा उपलब्ध करून दिली. दर वर्षीपेक्षा यावर्षी यात्रा धुमधडाक्यात पार पडली पाहिजे यासाठी सरपंच, पाटील, गावातील प्रतिष्ठित मंडळी यांची बैठक पार पडली. गावात यात्रेच्या सूचना देण्यात आल्या यात्रा जमायला सुरुवात झाली. दोन दिवसात रामपूरची यात्रा भरगच्च भरली होती.

                                      आज चंपाषष्ठीचा दिवस खंडोबाच्या मंदिरातून देवाच्या काठीची मिरवणूक निघत असते. त्यामुळे गावातील प्रत्येक बायकांनी घरासमोर शेणाचा सडा टाकून सुंदर रांगोळी काढली होती. काठीला ओवळण्यासाठी ताट घेऊन बायका आपापल्या घरासमोर उभ्या होत्या. काठीचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष खंडोबाचे दर्शन घेण्यासारखे होते. त्यामुळे काठीच्या दर्शनासाठी लोक जमू लागली होती. येळकोट….! येळकोट….! जय मल्हार….! च्या जयघोषात मंदिरातून देवाची काठी निघाली. काहीजण भंडारा उधळत होते तर काहीजण खोबऱ्याचा प्रसाद उधळत होते. वाजत गाजत काठीची मिरवणूक समोर समोर सरकत होती. आजच्या या चंपाषष्ठीच्या दिवशी काठीची मिरवणूक पूर्ण गावातून मिरवूण देवाच्या मंदिरात वापस जाणार होती. चंपाषष्ठीच्या दिवसापासून सुरू झालेली ही यात्रा आठवडाभर राहत असे. रामपूर गावाची यात्रा म्हणजे एक प्रकारचा सण होता. ऐरव्ही वर्षभर वेगवेगळ्या सणांच्या पेक्षा यात्रा सर्वांना अधिक आनंद देत असे. हळूहळू यात्रा विनायकच्या घरासमोर आली. विनायक त्याची पत्नी दुर्गा व छोटा मुलगा वैभव तिघांनी काठीचे दर्शन घेतले. दुर्गाने काठीची पूजा केली. वैभवने दोन्ही मुठी भरून भंडारा उधळला. विनायकने मोठ्याने येळकोट….! येळकोट….! जय मल्हार….! असा गजर केला. विनायकने खोबऱ्याच्या प्रसादाची उधळण केली. अनेकांनी गर्दीत पटकन खाली वाकून प्रसाद वेचला. काठीचे दर्शन घेऊन ते गर्दीतून बाहेर आले. आज काठी सोबत मिरवणुकीतील लोकं भंडाऱ्याने पिवळी झाली होती. आज सगळीकडे नुसता भंडारा उधळण सुरू होती. त्यामुळे लोकं, रस्ता, अंगण सगळे पिवळे झाले होते. खंडोबाला भंडारा प्रिय असल्यामुळे सर्व भक्त मनोभावे भंडारा उधळण करत होते मध्येच दुर्गा म्हणाली, ‘‘ अहो मी काय म्हणते….! वैभवला न्या थोड्यावेळ काठीच्या मिरवणुकी सोबत ’’ त्याला यात्रेबद्दल, देवाबद्दल चार नवीन गोष्टी माहिती होईल. ऐरव्ही यात्रा जवळ आल्यापासून तो सारखा यात्रेविषयी मला विचारत होता. आई कधी आहे गं….! चंपाषष्टी. मी यात्रेत जाणार, देवाच्या काठी सोबत गावभर फेरी मारणार, भंडारा उधळणार, खोबऱ्याचा प्रसाद वेचणार. यात्रेसाठी पार उतावीळ झाला आहे तो….! अग….! लहान आहे तो, लहान मुलांना यात्रेचे कुतूहल असते की, मी लहान असताना मला ही यात्रा म्हटले की खूप आनंद व्हायचा. मी व माझे मित्र आम्ही सर्वजण दिवसभर यात्रेत फिरायचो. काठीच्या मिरवणुकीच्या दिवशी तर आम्ही सगळे भंडाऱ्याने पिवळे होऊन जायचो. संध्याकाळी घरी आल्यावर लवकर ओळखू सुद्धा येत नव्हतो. त्यावेळची मजाच खूप वेगळी होती. विनायक दुर्गाला लहानपणीचा अनुभव सांगत होता. काठीची मिरवणूक आता थोडी पुढे गेली होती. दुर्गा वैभवला घेऊन दारातच उभी होती. विनायक दुर्गाला घरात जायला सांगतो. विनायक वैभवला घेऊन काठी सोबत मिरवणुकीत सामील झाला. वैभव सहा वर्षाचा झाला होता. त्याला आता नेहमी नवीन प्रश्न पडत असे. त्याला प्रश्न पडले की, तो विनायकला विचारत असे. मिरवणुकीत आता गर्दी खूप वाढली होती.  त्यामुळे काठी हळू हळू पुढे जात होती. ऐरव्ही मंदिरात दर्शन घेणारी माणसं काठीचे दर्शन घेण्यासाठी मिरवणुकीत गर्दी करू लागली होती. वर्षभर खंडोबाच्या मंदिरात वेगवेगळे उत्सव सुरूच राहत असे. परंतु काठीची मिरवणूक वर्षभरात फक्त चंपाषष्ठीला काढत असे. काठीची मिरवणूक वर्षात एकदाच होत होती त्यामुळे या मिरवणुकीला खूप महत्व होते. आता विनायक व वैभव दोघेही भंडाऱ्याने भरून गेले होते. पिवळा भंडारा मिरवणुकीत सारखा उधळला जात होता. वैभवने मध्येच  वडिलाला प्रश्न विचारला, ‘‘ बाबा मिरवणुकीत भंडारा व खोबऱ्याचा प्रसाद का उधळतात. ’’ अरे बाळा….! अनेकजण खंडोबाला आपल्या अडीअडचणीत नवस करतात. देवाच्या कृपेने मनातील इच्छा पूर्ण झाली तर, चंपाषष्टीच्या दिवशी मिरवणुकीत लोक नवस फेडत असतात. म्हणून भंडारा व खोबऱ्याची खूप एकसारखी उधळण सुरूच असते. शेवटी लोकांना अनुभव आला असेल, मनातील इच्छा पूर्ण होतात तेव्हाच लोक एवढे एकाग्र होऊन भंडारा व खोबऱ्याची उधळण करतात. हळूहळू देवाची काठीची मिरवणूक गावभर फिरून मंदिरात आली. मंदिरात सामुहिक आरती झाली. गावातील पुंजाराम शेठला यावर्षीचा आरतीचा मान मिळाला होता. शेवटी मोठा गजर झाला. येळकोट….! येळकोट….! जय मल्हार….! मंदिराच्या परिसरात भंडाऱ्याची उधळण झाली. शेवटी मंदिराच्या पुजाऱ्यांनी मनसोक्त खोबऱ्याच्या प्रसादाची उधळण केली. उपस्थितांनी खूपच खोबऱ्याचा प्रसाद वेचला. वैभव मोठ्याने म्हणत होता. बाबा….! आपल्याला वेचा खोबऱ्याचा प्रसाद….! बाबा खूप वेचा….! मला खूप आवडतो खोबऱ्याचा प्रसाद….! गर्दीत प्रसाद म्हणून विनायकने दोन खोबऱ्याची तुकडे वेचली. तो वैभवला घेऊन घरी निघाला. अरे बाळा….! हा देवाचा प्रसाद आहे. प्रसाद कमीच असतो तो खूप खायचा नसतो. आपण उद्या यात्रेमध्ये येऊ तेव्हा तुला खूप सारा खोबऱ्याचा प्रसाद घेऊन देईल. मग तू खुशाल खात बस….! जेवढा पाहिजे तेवढा. वैभव हे ऐकून खूप खुश झाला. अरे वा….! उद्या यात्रेत जायचे. मजाच….! मजा….! येणार. बाबा मी पाळण्यात बसणार आहे बर का? हो….! हो….! धीर धर….! यात्रेत आज जायचे नाही उद्या जायचे आहे. गप्पा मारत मारत दोघेही घरी पोहोचले. ‘‘ वैभव कशी झाली काठीची मिरवणूक, मज्जा आली का बघायला. ’’ वैभव घरी आल्या आल्या दुर्गा त्याला विचारू लागली. हो आई….! खूप मजा आली. मिरवणुकीत केवढी गर्दी होती. मी तर बाबांचा हात सोडलाच नाही. सगळीकडे भंडारा उधळत होते काहीजण तर खूप खोबऱ्याचा प्रसाद उधळत होते. आई माझ्यापेक्षा मोठी मुलं खूप प्रसाद वेचत होती. काही मुलांनी तर खिसे भरून प्रसाद घेतला होता. काठीच्या दर्शनासाठी पण लोकं खूप गर्दीत शिरून दर्शन घ्यायचे. ही सगळी मज्जा मला बघता आली. आज मिरवणुकीत आई….! मी काही वेळ बाबांच्या खांद्यावर बसलो होतो. त्यामुळे मला खूप छान दिसत होते. मंदिरात आरती पण झाली. देवाचा खूप मोठ्याने जयघोष झाला. मी तर मोठ्याने म्हणत होतो. येळकोट….! येळकोट….! जय मल्हार….! खूप मज्जा आली. बाबांनी तर माझ्यासाठी गर्दीत पण खोबऱ्याचा प्रसाद वेचला. वैभवने पटकन खिशातील दोन खोबऱ्याची तुकडे काढली व दुर्गाच्या हातावर ठेवली. वैभवचे बोलणे विनायक व दुर्गा कुतुहलाने ऐकत होते. यावर्षीची यात्रा वैभवमुळे अधिकच मजेत जाणार होती. दुर्गा हसत….!  हसत….! म्हणाली, चला हात पाय धुऊन घ्या. देवाला नैवेद्य दाखवा व गरम गरम जेवून घ्या. आज देवाला वरण पोळी वांग्याचे भरीत असा नैवेद्य दाखवून दोघेपण मनसोक्त जेवण करत बसली. रामपूरची यात्रा भरगच्च भरली होती. गावाला जणू शहराचे रूप आले होते. गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप वाढली होती. म्हणता म्हणता यात्रेचे दोन दिवस निघून गेले. दुर्गा हळूच म्हणते, ‘‘ अहो आपल्याला कधी जायचे यात्रेत ’’ वैभव दोन दिवसापासून माझ्या मागे लागला. तुम्ही ऑफिसला गेले की, तो मला सारखा यात्रेत घेऊन चल म्हणतो. बरं….! जाऊ उद्या….!  तुला पण घाई झाली असेलच की, यात्रेत जायची. लहान मुलांन ऐवढाच आनंद होतो तुम्हा बायकांना….!  यात्रा म्हटले की….! विनायकच्या बोलण्याने दुर्गा लाजत….! लाजत….! आतल्या खोलीत निघून गेली. चला आता शांत झोपा. उद्या जाऊ यात्रेत, मी उद्याची सुट्टी काढली आहे. उद्या दिवसभर यात्रेत फिरूया….! तुम्हाला यात्रेत काय मज्जा करायची ती करा. असे म्हणून, लाईट बंद करून सगळेजण झोपी जातात.

                             आज सकाळी उठून दुर्गा लवकर लवकर कामे आटपून तयार होते. वैभवला लवकर उठवुन त्याची सुद्धा तयारी करून देते. तिघेही यात्रेमध्ये जायला निघतात. आज गावातील अनेक जण सहकुटुंब यात्रेमध्ये आलेले होते. काहीजण तर खूप दिवसांनी रामपूरला आले होते. यात्रेच्या निमित्ताने का होईना पण बालपणीचे मित्र यात्रेत भेटत होते. सहकुटुंब ओळख होत होती. यात्रेत अनेक वेगवेगळी दुकाने आली होती. लोकं आपापल्या गरजेनुसार वस्तू घेण्यात व्यस्त होती. वैभव मधेच म्हणाला, ‘‘ बाबा….! बाबा….! तो पहा पाळणा मला त्यात बसायचे आहे. ’’ चला….! पटकन तिकडे. वैभवच्या आनंदासाठी दुर्गा, विनायक पाळण्यात बसतात. खूप उंचच उंच पाळणा होता तो….! पाळणा वरती गेला की, सगळे रामपूर दिसायचे. नदी, गाव, मंदिर व मोकळ्या जागेत भरलेली मोठी यात्रा स्पष्ट दिसत होती. पाळणा खूप वेगात आल्यावर तर दुर्गांनी डोळे लावून घेतले. तिला भीती वाटू लागली होती. वैभव मात्र मोठ्या मोठ्याने ओरडत पाळण्याचा आनंद घेत होता. शेवटी पाळणा खेळून झाला. तिथले अनेक छोटी छोटी पाळणे वैभवला खेळु दिली. लहान मुलांना पाळणा खेळण्याचा खूपच आनंद असतो. वैभवच्या त्या आनंदाने विनायकला बालपणाची आठवण करून दिली. मी लहान असताना आठही दिवस मित्रांसोबत यात्रेत फिरायचो. परिस्थिती गरिबीची असल्यामुळे घरचे पैसे देऊ शकत नव्हते. त्यामुळे यात्रेत काही खाणेपिणे, खेळणी घेणे, पाळणा खेळणे, या गोष्टी शक्य होत नव्हत्या. त्यामुळे रिकाम्या खिशाने दिवसभर यात्रेत फिरायचे. डोळ्यांनी मन भरून यात्रेतील प्रत्येक गोष्ट कुतूहलाने पाहायची. आठ दिवसात यात्रेतील प्रत्येक दुकान, प्रत्येक गोष्ट रोज मी बघायचो. यात्रा म्हणजे दिवसभर फिरायचे, घरी येऊन जेऊन झोपायचे. हा नित्यक्रम खुप आनंद देत होता. पण त्या वेळचा आनंद आज कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नव्हता. बालपण ते बालपणच असते. विनायक बालपणाच्या आठवणीत हरवून गेला होता. दुर्गा हळूच म्हणते, ‘‘ अहो….! ऐकलत का, मी केव्हापासून तुम्हाला आवाज देते. ’’ तुमचे लक्ष कुठे आहे. आपल्याला देव घरात ठेवण्यासाठी एक छान समई घेऊ का? बघाना किती छान पितळी समया आहेत. विनायक गालातल्या गालात हसून म्हणतो, ‘‘ अग….! तुला आवडली असेल तर घे ’’ दुर्गा ने एक छान पितळी समई विकत घेतली. पुढे यात्रेत फिरत फिरत खेळण्याच्या दुकानाची लाईन सुरु झाली. वैभव नाचत उड्या मारू लागला. बापरे….! केवढी मोठी मोठी खेळणी….! अरे….! वा….! रिमोट वरची गाडी पण आहे. बाबा….! चला लवकर मला खेळणी घेऊन द्या. मी रिमोटची गाडी घेणार. विनायक वैभवला घेऊन एका खेळण्याच्या दुकानात थांबतो. अरे….! अगोदर दुरूनच खेळणी बघून घे, तुला नेमकी जी खेळणी आवडली असेल तीच घेऊया. दुकानात सगळीच खेळणी छान आहे. मग काय सगळे दुकान घ्यायचे का? तू सांग….! वैभव कधी रिमोट गाडीला हात लावायचा. तर कधी हवेचा मोठा चेंडू, तर कधी हवेत उडणारे विमान, तर कधी वाजणारे डमरू, एकदम ऐवढी खेळणी बघून त्याला काय घ्यावे काहीच सुचत नव्हते. शेवटी खूप वेळाने त्या दुकानात रिमोटची गाडी घेतली. पुढे  चालता चालता वैभव पुन्हा म्हणतो, ‘‘ बाबा तुम्ही मला एक खेळणी घेऊन दिली, आता आई मला एक खेळणी घेऊन देईल ’’ मी आई कडून परत एक खेळणी घेणार म्हणजे घेणारच….! बरं.…! तुझ्या आईकडून पण एक खेळणी घे. पण परत काही घ्यायचे म्हणू नको. खूप सारी खेळणी एकदाच घेऊन तू एकावेळी खेळू शकतील का? नाही ना.…! मग कशाला खूप खेळणी….! असे म्हणून विनायक वैभवला घेऊन परत एका खेळण्यांच्या दुकानात जातो. तिथे खेळणी पहात असताना एक स्त्री विनायक कडे बघत.…! बघत….! अरे विनायक कसा आहेस. ओळखले का? विनायक एकदम त्या स्त्री कडे बघून विचारात पडतो. अरे….! मी प्रिया….! माने गुरुजींची मुलगी. हो….! हो….! प्रिया आता ओळखले. अग….! किती दिवसानंतर आपण भेटतोय. कसे ओळखणार….! लहानपणी आपण शाळेत होतो. सातवी नंतर तुझी माझी भेटच नाही. अरे हो….! माझ्या बाबांची बदली झाली. त्यानंतर आम्ही रामपूर सोडून गेलो. त्यानंतर माझे पुढचे शिक्षण ही तिकडेच झाले. त्यानंतर बाबांनी माझे लग्न करून दिले. लग्नानंतर मी पुण्याला राहायला गेले. त्या सगळ्या घाईत रामपूरला येण्याचा कधी योग आलाच नाही. हे माझे मिस्टर सुशांत….! पुण्यात अभियंता आहेत. नमस्कार साहेब….! मी विनायक पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीला आहे. ही माझी बायको दुर्गा….! व हा माझा मुलगा वैभव….! प्रिया व मी पहिली ते सातवी एकाच वर्गात शिकलो. ती आमच्याच गल्लीत राहत होती. आम्ही लहानपणी चांगले मित्र होतो. पुढे तिच्या वडिलांच्या बदलीमुळे ते रामपूर सोडून गेले. त्यानंतर कधी भेट झालीच नाही. त्यानंतर यात्रेमुळे आज भेटण्याचा योग आला. विनायक हळुच विचारतो. काका काकू कसे आहेत. छान….! आहेत. माझे बाबा आता निवृत्त झाले. त्यामुळे आई बाबा दोघेही आमच्या मूळ गावी राहतात. प्रिया म्हणाली, ‘‘ तुझे आई बाबा कसे आहेत. ’’ ते पण छान आहेत. माझी छोटी बहिण मुंबईला राहते. तिला छोटे बाळ आहे. त्यामुळे आई-बाबा गेल्या काही दिवसापासून तिच्याकडेच गेलेले आहे. ताईचे बाळ छोटे आहे ना….! त्यामुळे आई-बाबा यात्रेला सुद्धा नाही आले यावर्षी. हो….! का….! त्यांना सांगशील प्रिया भेटली होती. तुमच्याबद्दल विचारत होती. हो….!  हो….! नक्की सांगतो. मला शिक्षणानंतर पोस्टात नोकरी मिळाली. योगायोगाने माझी गावाजवळच बदली झाली. त्यामुळे मी रामपूरलाच राहतो. हो….!  का….!  अरे वा छान….! झाले. वहिनीला घेऊन ये….! पुण्याला एकदा….! माझ्याकडे, दोन चार दिवस राहा. गप्पा-टप्पा होईल पुण्यात फिरता येईल. बघू….! कधी तरी….! योग आला की, येईल नक्की. विनायक मान हलवुन प्रियाला होकार देत होता. प्रिया जाताना ये घरी साहेबांना घेऊन. वाटल्यास थांबून जा आजच्या दिवस.…! उद्या परत यात्रेत फिरता येईल. अरे….! विनायक थांबता नाही येणार. आम्ही आजच रात्री पुण्याला वापस निघतोय. यांना सुट्टी नाही त्यामुळे जावेच लागेल. पण येतांना चहा घ्यायला नक्की येतो घरी. असे म्हणून प्रिया व तिचे पती तिथून निघून जातात.

                             विनायक दुर्गाला सांगतो. अग….! प्रियाचे बाबा आपल्या रामपूरच्या शाळेत शिक्षक होते. त्यामुळे ते येथेच राहत होते. आपल्या घराच्या बाजूलाच दोन घरं सोडून ते तिथे किरायाने राहत होते. प्रिया लहानपणी तिच्या आई सोबत आपल्या घरी नेहमी येत असे. आम्ही लहानपणी एकत्रच खेळायचो. लहानपणी आमची खुप खुप गट्टी जमायची. आम्ही खूप चांगले मित्र होतो. पण पुढे बदलीमुळे ते रामपूर सोडून गेले. यामुळे प्रियाला व गुरुजींना भेटण्याचा योग आला नाही. पण तुझ्या एक लक्षात आले का….! तिच्या बाबाने तीला या यात्रेच्या निमित्ताने खंडोबाच्‍या दर्शनाला पाठवले. गुरुजी नियमित मंदिरात जायचे ते खंडोबाचे खूप भक्त होते. गुरुजी आमच्या शाळेची कधी कधी सहल मंदिरात घेऊन जात असे. आम्ही सर्व मुलं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरच्या मोकळ्या पटांगणात बसायचो. गुरुजी आम्हाला देवाच्या विषयी माहिती सांगायचे. प्रियाचे वडील अतिशय शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे होते. आम्ही त्यांना खूप घाबरायचो. मुले गल्लीत खेळत असले व समोरून गुरुजी आले की, सगळी मुले एका क्षणात गायब होऊन जायचे. ऐवढी आदरयुक्त गुरुजीची भीती होती सर्वांना त्यामुळेच तर रामपुरची अनेक मुलं घडली. मला पण गुरुजीच्या शिकवणीमुळे नोकरी मिळाली. आता एक दिवस नक्कीच….! प्रियाच्या मूळ गावी जाऊन गुरुजीची भेट घेऊ या….! त्यांनाही खूप आनंद होईल. आपल्या रामपूर बद्दल गुरुजी कुतूहलाने सारी विचारपूस करतील. गप्पा मारत मारत यात्रा फिरून झाली. वैभवला खेळणी घेतली. दुर्गाला घरात लागणाऱ्या काही वस्तू घेतल्या. आज दिवसभर यात्रेत फिरून कंटाळा आला होता. भूक पण लागली होती. आम्ही एका मिठाईच्या दुकानात जाऊन गरम गरम जिलेबी खाल्ली. तिखट चिवडा व जिलेबीचा पोटभर अस्वाद घेतला. यात्रेतील जिलेबी व चिवडा म्हणजे फेमस पदार्थ होय. यात्रेतील जिलेबीची चव वर्षात एकदा चाखायला मिळते. वैभवसाठी घरी जाताना भरपूर खोबऱ्याचा प्रसाद घेतला. आम्ही घरी निघालो. दुर्गा मध्येच म्हणाली, ‘‘ अहो तुमच्यासाठी काहीच घेतले नाही यात्रेत आपण ’’ मी हसत म्हणालो, ‘‘  मी वैभव सारखा छोटा आहे का….! खेळणी वगैरे घ्यायला. ’’ अहो….!  असे नाही. पण काही महत्त्वाची एखादी अशी वस्तू घेतली असती बघा….! माझ्याच डोक्यात आले नाही. अग….! मी तुमच्या चेहर्‍यावरचा मन भरून आनंद घेतला. मला यातच समाधान वाटले. यात्रेत अनेक मित्र भेटले, प्रिया भेटली, या माणसांना भेटण्याचा आनंद मला बालपणीची यात्रा करून गेला. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. घरी येताच वैभवने रिमोटच्या गाडीत सेल टाकून गाडी खेळणे सुरू केले. गाडी खेळता-खेळता वैभव म्हणतो, ‘‘ बाबा यात्रा संपण्याच्या अगोदर पुन्हा एकदा जाऊ या, यात्रेत मजा करायला. ’’ बघूया वेळ मिळाला तर नक्की जाऊ. असे म्हणून मी अंग टाकले. दुर्गा पाण्याचा ग्लास घेऊन आली. मी पाणी पित दुर्गाला सांगु लागलो. माणसाच्या जीवनात पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा खूप वाढते. पण समूहातील आनंद हा या सगळ्यापेक्षा अधिक समाधान देऊन जातो. माणसाचे आयुष्य हे यात्रे सारखेच भरगच्च सजलेले व सर्वांना आनंद वाटणारे असावे.


No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...