Saturday, 3 December 2022

लघुकथा- सोंगाड्या

  सोंगाड्या


           ढोलकी वर थाप पडताच, ढोलकीचा आवाज लयीत घुमाया लागला. ढोलकीच्या आवाजाने तंबूत टांग… टांग… टांग… नाद घुमायला लागला. ढोलकीच्या आवाजाने लोकं तंबूकडे वळू लागली. केंव्हापासून ओस पडलेल्या तंबूत माणसं शिराया लागली. माणसाच्या घोळक्याने तंबूतील जागा पटापटा भरू लागली. माणसांकड बघून ढोलकी आणखीच लयीत वाजायला लागली. तंबूत दूरवर नजर फिरवून किसन मामा तावा तावात तंबूचा पडदा बाजूला सारीत खोपीच्या आत मधी शिरला. आरशापुढे बसलेल्या भिमाला पाहून मामा संतापलं. “ये भिमा आटप की लवकर, कव्हापासून नटतोया बायागत, बस कर की आता.”

“बाईच आहे की ती सगळ्यांची भिमा मावशी.”

कोपऱ्यात बसलेले कौतिकराव दात हिचकीत मधीच बोलले.

“कौतिकराव करा की तुमचं काळ तंबूत, इथं काय कोणी आरती उतरणार नाही.”

रागानं भिमा कौतिकराव वर फिसकला.

“ये भिमा… नीट बोलकी लेका, तंबूत तर पोरी बरोबर लय उड्या मारतो मावशी बनुन. आता कशाला उगीच गर्मी दाखवतो. गुप गमान रंगीत पावडर फासकी तोंडाला.”

“कौतिकराव बस करा तुमचं कौतिक. पोरी हुंडका लवकर, कुठे आहे त्या तर. तंबूत लोक जमल्यात, खेळ सुरू कराया पाहिजे.”

“भिमा मावशी या लवकर आटपून तंबूत.”

“मोठ्याने हसत… हसत… किसन मामा गडबडीने कौतिकरावला घेऊन खोपीच्या बाहेर निघाले.”

“कौतिकराव व किसन मामाच्या हसण्याचा आवाज सारखा कानात घुमत राहिला.”

भिमाने हातातील आरसा पुन्हा तोंडाजवळ धरून तो तोंड न्याहाळू लागला. रंगीत पावडरच्या ठिपक्यांनी चेहरा पार बदलून गेला होता. कितीतरी दिवसापासून ढोलकीच्या आवाजाने चेहरा बदलून टाकला होता. या चेहऱ्याकडे पाहून तंबूतील लोक गदा गदा हसायची. या लोकांसारखं आता तर सोबतीला असणारी माणसं हसायला लागली. भिमाला कौतिकरावचे हसणे मनाला चांगलेच ओरबाडले. भिमा स्वतःच्या तोंडाला आरशात न्याहाळू लागला. मिशरूड काढून रंगीत पावडरने मुखवटा चांगलाच रंगला होता. या मुखवट्याला कुणाची नजर लागू नये म्हणून त्याच्यावर उमटवलेला काजळाचा ठिपका चांगला चमकत होता. भिमा आरशात पाहून स्वतःचाच आधीचा मुखवटा शोधू लागला. ढोलकीने भिमाला रंगाचा बेरंग करायला लावला होता. एकेकाळी तरणा बांड पोरगा पिळदार मिशीचा झुपका पिळवत गावभर फिरणारा भिमा सगळ्याच बाई माणसांना धडकी भरवायचा. दिवस-रात तालमीत शरीर पिळवायचं. बापानं गाईचं वासरू तोडलं की, तांब्याभर धारा पिळायच्या व तांब्या भिमाच्या हातात ठेवायचा. क्षणभर श्वास रोखून घटाघटा तांब्याभर दूध संपवून टाकायचा. ओठावर दुधाच्या फेसाची मिशरूड उमटल्या शिवाय तात्या जागचं हालू देत नव्हते.

तात्या नेहमी म्हणायचे, “माझ्या भिमा पैलवानाचा हात पंचक्रोशीत कुणी धरला नाही पाहिजे. दावणीच्या बैलागत भिमा फुसकारातच पैलवानावर तुटून पडला पाहिजे. बारा गावच्या मानाची चांदीची गदा छातीवर घेऊन गावभर भिमा फिरल्यागत मला चैन पडायची नाही.”

तात्याच्या या स्वप्नांन तात्या तांबडं फुटल्यापासून दिवस मावळोगत शेतात राब राब राबायचे. शेतातील कामाचा व्याप सांभाळून तात्यांनी तीन गाई सांभाळल्या होत्या. पोराला दूध कमी पडू नये म्हणून तात्या गाईचा सांभाळ लेकरागत करत होते. भिमाला फक्त दोन टाईम तालमीत मस्ती जिरवायची व किती पोरांची पाठ जमिनीला लावली हे रातच्याला तात्याला सांगायचे. एवढेच काम भिमाला होते. गाईच्या दुधाने व तालमीतल्या कुस्त्याने भिमा सांड बनला होता. तात्याचे स्वप्न पूर्ण करायचा विडाच त्याने उचलला होता. भिमा रोज नवनवीन पैलवाना सोबत कुस्ती खेळत असत. भिमाचे पिळदार शरीर व कुस्तीच्या डावाने गावातील एकही पोरगं भिमाच्या सोबत कुस्ती खेळायला तयार होत नव्हतं. भिमा आता कुस्तीतील पिळदार शरीराचा गुर गुरणारा पैलवान बारागावच्या पैलवानांना लोळवायला सज्ज झाला होता. अंबाबाईच्या देवळात चैत्र महिन्यात भरणारी यात्रा जवळ आली होती. या यात्रेत मानाच्या कुस्त्या खेळवल्या जातात. लय वर्षापासून ही परंपरा चालू होती. यावर्षी यात्रेतील मानाची कुस्ती जिंकून बारागावची मानाची चांदीची गदा तात्याच्या खांद्यावर द्यायची असा विडाच भिमाने उचलला होता. भिमा तालमीत सराव करून करून चांगलाच कसला होता. जशी जशी यात्रा जवळ येत होती तसा तसा भिमाचा गावात रुबाब वाढला होता. भिमा मानाची गदा जिंकल्यागत गावात मिरवत होता. तात्या गाईला सांभाळत पोरगं कधी मानाची गदा जिंकेल याकडे आस लावून बसले होते.

                बघता बघता यात्रेचा दिवस उजाडला. अंबादेवीच्या आजपासून यात्रेला सुरुवात झाली. सात दिवस चालणारी यात्रा कुस्तीच्या आखाड्याने चांगलीच रंगायची. आज यात्रेत आखाड्याचे नारळ फुटणार होते. पंचक्रोशीतील पैलवान, गावचे पाटील, सरपंच, सगळी मंडळी गावातील मारोतीच्या देवळासमोर जमायला लागली. कुस्तीचा आखाडा नारळ फोडून सुरू होणार होता. भिमा गावातील काही पैलवाना सोबत देवळासमोर आला. पंचक्रोशीतील अनेक पैलवान सुद्धा आखाड्याच्या मानाची गदा जिंकायला हजर होते. सगळी मानाची माणसं हजर झाली. गावचे सरपंच आबाजीराव पाटील यांना नारळ फोडण्याचा मान मिळाला होता. सरपंच नारळ घेऊन आखाड्याच्या मैदानात आले. मैदानाच्या मधोमध या वर्षी दिली जाणारी मानाची चांदीची गदा ठेवली होती. सरपंचांनी गुलाल उधळण केली. एका दगडावर नारळाला आपटून नारळाचे दोन भाग केले. मानाची गदा उचलून आखाड्याला एक रिंगण घातले. आखाडा गुलालाने रंगला होता. आखाड्याच्या अवतीभोवती जमलेली माणसं गुलालाने रंगली होती. आखाड्यासाठी आलेल्या पंचक्रोशीतील पैलवानांना अनेकांनी गुलालाने माखले होते. भिमा सुद्धा त्याच्या मित्रासोबत आखाड्याच्या बाहेर उभा होता. एका मित्राने मूठभर गुलाल आणुन भिमाच्या अंगावर उधळणार तेवढ्यात भिमानी त्याचे दोन्ही हात घट्ट धरुन त्याला रोखले. भिमाची कावरी बावरी नजर आखाड्यातील चांदीच्या गदेला न्याहाळत होती.

भिमा म्हणाला, “अरे गड्यांनो ही चांदीची गदा खांद्यावर घेतल्याशिवाय गुलाल नाही अंगावर घेणार. यंदा आखाडा गाजवल्याशिवाय नाही करायचा गाजावाजा.”

“या भिमाने कुस्तीचा भांग प्यायला. आखाड्यातील पैलवानाला मातीत लोळल्याशिवाय गुलाल अंगाला लावणार नाही.” भिमा मोठ्या अवेषाण बोलत होता. यंदा भिमाने तालमीत लय घाम गाळला होता. पोळ्याच्या बैलागत कुस्ती खेळण्यासाठी भिमा फुकांरत होता. आखाड्यात कधी पैलवान मिरवणार व मी त्याच्या पाठीला कधी जमीन दावतो असे भिमाला झाले होते. सरपंचानी मानाची गदा आखाड्यात वाजत गाजत मिरवली व आखाड्याच्या बाहेर पंचाजवळ सुपूर्द केली. आखाड्यात एकच जल्लोष सुरू होता. थोड्याच वेळात मानाची कुस्ती लावून यावर्षीच्या कुस्तीच्या आखाड्याला सुरुवात होणार होती. पहिलीच मानाची कुस्ती कोणाला खेळायला मिळणार याकडे सगळ्या गावाची नजर लागली होती. सरपंचांनी आखाड्यातील पैलवानावर नजर फिरवली व शेजारच्या गण्या पैलवानाला आखाड्यात बोलावले. गण्या पैलवान क्षणाचाही विलंबन न लावता दंड थोपटत आखड्यात आला. सरपंचांनी गण्या पैलवानाचा हात धरून आखाड्याला चक्कर मारली. पुन्हा एकदा सगळ्या आखाड्यात नजर फिरवली व भिमा पैलवानाच्या नावाचा पुकारा केला. भिमा पैलवान नाव ऐकताच आखाड्यात एकदम जीव आला. लोक जोरजोरात ओरडू लागली. शिट्या वाजून मोठमोठ्याने भिमाच्या नावाच्या घोषणा देऊ लागली. भिमा आखाड्याच्या काठावर आला. खाली वाकून आखाड्यातील माती कपाळावर लावत मांडी वाजवत सरपंचाच्या बाजूला घेऊन उभा राहिला. सरपंचाने हात उंचावून भिमाला आखाड्यात मिरवून आणले. दोघांच्या हातात हात देत कुस्तीला दुजोरा दिला. भिमाने गण्या पैलवानाच्या हातात हात दिला. दोघांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवला व हात उंचावून उपस्थित लोकांना अभिवादन केले. एकदाची कुस्ती सुरू झाली. सकाळपासून डोळ्यात तेल घालुन बसलेल्या माणसांनी आखाड्यात एकच जल्लोष सुरू केला. कुस्ती पाहणारी माणसं मोठमोठ्यांनी ओरडू लागले कुणी शिट्ट्या फुकु लागली. रेड्याच्या टकरी गत दोघांनी डोके एकमेकांना भिडवली. हाताच्या मुठी आवळल्या व दोघे एकमेकांना ढकलू लागले. भिमा हळूहळू ढकलत होता मध्येच दोन पावलं मागे सरकत होता. गण्या पैलवानाची ताकद आजमावत होता. भिमा स्वभावाने चपळ होता. कुस्ती सुद्धा चपळाईने खेळायचा. भिमाने गण्या पैलवानाला ढकलायला भाग पाडले व स्वतः अंग थोडे सैल केले. गण्या लगेच भिमावर तुटून पडणार तेवढ्यात भिमाने पायाची कडी केली. गण्या पैलवानाचा पाय पायात अडकवला व त्याला अलगद उचलून जमिनीवर आदळले. गण्या पैलवान जमिनीवर पडतात आखाड्यातील मातीचा धुराळा उडाला. लोकांनी एकच गोंधळ उडवला. भिमा… भिमा… म्हणत मैदानावर एकच कल्ला केला. पोरांनी भिमाला खांद्यावर उचलून घेऊन आखाड्याला फेरा मारला. अंबाबाईच्या यात्रेतील कुस्तीच्या आखाड्याला एकदाची सुरुवात झाली. भिमाने कुस्ती जिंकून आखाड्यात जीव आणला होता. गावच्या सरपंचाची भिमाच्या पाठीवर थाप मारत, विजयाचे नारळ दिले. भिमाने पटकन खाली वाकून सरपंचांच्या पायाला हात लावत आशीर्वाद घेतला. भिमाने तात्याच्या संस्काराची शिदोरी जपली होती. भिमा तात्याचे संस्कार कुस्ती येवढेच जिवापाड जपायचा. कुस्तीचे जिंकलेले नारळ घेऊन भिमा मित्राबरोबर आखाडा सोडून घराकडे निघाला. पहिल्या रिंगणातील कुस्ती जिंकून भिमा पुढच्या रिंगणात उतरला होता. भिमाचे सोबती आज जाम खुश होते.

“भिमराव जमवलं बर का, पहिलीच कुस्ती जिंकून धुमधडाक्यात सुरुवात केली.”

“यंदा मानाची चांदीची गदा मिरवता तुम्ही गावभर.”

“ते तर करायचच भावा.”

“त्यासाठीच एवढा घाम गाळलाय, शरीराची पिळदार दोरी उगाच नाही केली.”

“तात्याच्या खांद्यावर मानाची चांदीची गदा मिरवायची म्हणजे मिरवायची…! शपथच आहे आपली तशी.”

फुसकरत भिमा मित्रांना सांगत होता. बोलत बोलत भिमा मित्रासंग घराच्या दारात पोहोचला.

                                   आज यात्रा सुरू झाल्यामुळे तात्या सकाळीच रानात जाऊन आले होते. अंगणातच सवंगड्या सोबत, काही यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत गप्पा मारत बसले होते. भिमाने तात्याच्या पायावर मुंडके ठेवून नारळ तात्याच्या हातात दिले. तात्यांनी पाठीवर थाप मारत म्हणाले, “असाच खेळत राहा पोरा.”

“एक दिवस या पंचक्रोशीला या तात्याच्या पोराची ओळख करून दे.”

“अहो तात्या ते तर पोरगं करणारच आहे.” बाजूला बसलेले पाहुणे म्हणाले.

“तुमचा भिमा फार गुणाचा आहे हो.”

“अहो पाहूणं कुस्ती जिताया सोपी आहे, पण डोक्यात जायला नको.”

“कुस्ती डोक्यात शिरली की पैलवानाचा मारकुट्या गडी व्हायला वेळ लागत नाही.”

पाहुणे मान हलवतच म्हणाले, “ते खरं आहे बरं का?”

पोरांनी कुस्तीला लय जपलं पाहिजे. कुस्ती म्हणजे ताकदीचा भांडखोरपणा करायचा खेळ नाही. भिमा आपला तात्या व पाहुण्यांचे बोलणे ऐकत उभा होता.

“अरे पोरा गप्पा काय ऐकत उभा राहिला. जा आता आंबाबाईच्या देवळात.”

“हे नारळ फोडून तिचा चांगला आशीर्वाद घेऊन ये.”

“पुढच्या फेरीत पैलवानांना लोळवायला ताकद दे म्हणा.” तात्या बोलतच होते तोपर्यंत भिमा मंदिराकडे निघाला. भिमाने कुस्ती जिंकल्याची आज गावभर चर्चा होती. गावातील लोकांना भिमाचा अभिमान होता. मानाची चांदीची गदा आपल्याच गावाला मिळाली पाहिजे असे सर्वांना वाटायचे. पण गावातील काही तात्याच्या विरोधातील लोक भिमाला टोचून सुद्धा बोलायचे. भिमाने कुस्ती जिंकली की काहींच्या पोटात दुखायचे. तात्याच्या पोराचे भिमा पैलवान म्हणून नाव मोठे झाले नाही पाहिजे यासाठी काही जण झटायचे. भिमा मंदिराच्या पायरीवर तोच गावातील सावकाराने त्याला अडवून बोलायला सुरुवात केली.

“भिमराव नीट खेळा आखाडा, नाहीतर गावाची इज्जत घालसाल.”

“मग तुमच्या या तरणाबांड शरीराला घालावे लागेल उन्हात वाळत.”

भिमानं हे शब्द ऐकताच भिमाची छाती फुगली, हाताच्या मुठी वळल्या व चेहरा लालभडक झाला. सावकाराला आत्ताच्या आता उचलून मातीत लोळवावे व कुस्तीची माती चारावी. असा मनातून राग आला होता पण पहिल्याच कुस्तीच्या आनंदाला गालबोट नको म्हणून भिमाने रागा आवरला.

तात्या पुन्हा ओरडतील, “माजला का भिमा? कुस्ती शिरली वाटतं डोक्यात.”

आपल्या तात्याच्या इज्जतीला घाबरून भिमा लालबुंद डोळे वटारून पायऱ्या उतरला व नीट घरी पोहोचला. तात्या जास्त मनाला लावून घेतील म्हणून भीमाने घरी विषय काढणे टाळले. रात्री पोटभर भाकरी खाऊन भिमा जमिनीला लोळला. एक दिवस या पैलवानाची औकात नाही सावकाराला दावली तर नाव भिमा लावणार नाही. मनाशी पुटपुटत असतांना भिमाला डोळा लागला.

                  जत्रा भरगच्च भरली होती. पंचक्रोशीतील माणसं दर्शनाला व आखाडा बघायला गर्दी करू लागले होते. आखाड्यात नवनवीन पैलवान दाखल होऊ लागले होते. नवीन पैलवान आला की त्याची चर्चा लोकांच्या ओठावर नाचायची. शेवटी नव्याचे कुतूहल सर्वांना असायचे. कुस्ती कशी रंगणार, कोण कुणाला माती दावणार. लोक मोठ्या आशेने आखाड्यात येऊन बसायचे. बघता बघता आखाड्याला तीन दिवस उलटले. लहान मोठ्या भरपूर कुस्त्या झाल्या. अनेक नवखे पैलवान कुस्ती खेळुन मोकळे झाले. आता तगडी नावाजलेली मोठी मोठी पैलवान बाकी होती. पुढच्या तीन दिवसात या सर्व पैलवानांना पाठीवर लोळवत शेवटच्या कुस्तीवर मजल मारायची होती. भिमा आता रोजच आखाड्यावर येऊन बसू लागला होता. प्रत्येक पैलवानाचा डाव मन भरून बघत होता. पैलवानाचे नवनवीन डावपेच व ताकतीचा अंदाज लावत होता. भिमाने बघता बघता पुन्हा चार पैलवालांना लोळवले. कुस्तीचा आखाडा आता रंगात आला होता. आता फक्त चार पैलवान शिल्लक राहिले होते. जे की आतापर्यंत पाच दिवसात कुस्ती जिंकत पुढे आले होते. आज आखाड्याचा सहावा दिवस. पंचाने पहिल्या दोन पैलवानाची कुस्ती पुकारली. दोन तगडे पैलवान एकमेकांशी भिडले. आगीच्या गोळ्याप्रमाणे एकमेकांना ताकतीचा करंट देत कुस्ती खेळू लागले. आज आखाड्याच्या भोवती श्वास घ्यायला जागा नव्हती एवढी प्रचंड गर्दी जमली होती. पिळदार शरीराची उंच पुरी पैलवान पाहून कुस्तीची मजा लुटायला सगळी माणसं जमली होती. शेवटी कुस्ती झाली शेजारच्या गावचाच पैलवान उद्याच्या कुस्तीसाठी निवडला होता. आता दुपारून भिमाची कुस्ती होणार होती. लोकांनी पुन्हा भिमाच्या नावाची ओरड सुरू केली. भिमा पूर्ण ताकतीने खेळला व कुस्ती जिंकून शेवटची मानाची कुस्ती खेळायला पात्र ठरला.

“उद्या सातव्या दिवशी दुपारी ही कुस्ती खेळवली जाणार होती. कुस्तीच्या आखाड्यात एका माणसाने ओरडून सांगितले.”

“ऐका हो…! ऐका…! उद्या दुपारी शेवटची मानाची कुस्ती खेळवली जाणार आहे. तरी सर्व लोकांनी कुस्ती पाहायला आखाड्यात जमावे हो….”

“उद्याची कुस्ती या गावचा भिमा पैलवान व पंचक्रोशीतील सारवाडी गावचा हणमंत पैलवान यांच्यात मानाची कुस्ती होणार आहे. जो कोणी कुस्ती जिंकेल त्याच्या खांद्यावर ही मानाची चांदीची गदा दिल्या जाईल हो…”

आजचा आखाडा आता या ठिकाणी संपला आहे. असे जाहीर होताच माणसांनी घरी जायला सुरुवात केली. आज अंबाबाईच्या जत्रा मध्ये गावात तमाशाचा फड आला होता. त्यामुळे गावात फक्त तमाशा आणि उद्याची कुस्ती येवढीच चर्चा सुरू होती. उद्या जत्रा संपणार होती व आखडा सुद्धा उद्याच्याने संपणार होता. यावर्षी जत्रा कुस्तीच्या आखाड्याने चांगलीच रंगली होती.

“सरपंचाने गावात दवंडी पेटवली. उद्याची मानाची शेवटची कुस्ती खेळवली जाणार आहे. पंचक्रोशीतील पैलवान, पाटील मंडळी, सावकार येणार आहे तरी गावातील समद्या लोकांनी कुस्ती पाहायला यायचे.”

“तर दुसरीकडे तमाशाचा भोंग्या फिरत होता.”

“ऐका मंडळी तुमच्या गावात घेऊन आलोया  तमाशा, कलाकारांची जत्रा, लावणीची नजाकत आणि पोरींची जुगलबंदी  ते पण गण गवळणी सोबत.”

“पाहायला विसरू नका? तमाशा लोकनाट्य. “

दिवस मावळतीला आला. भिमा आंबाबाईच्या देवळात जाऊन घरी परतला. तात्यांच्या सोबत पंगतीला बसला. दुधात भाकरी कुस्करून फुरका मारत भिमा बोलू लागला.

“तात्या तुम्ही उद्या कुस्ती बघायला या बरं का?”

“सकाळी लवकर जनावराला चारापाणी करून थेट आखाड्यात या.”

“उद्याची शेवटची कुस्ती हाय. काय जरी झालं तरी उद्याची कुस्ती मी जिंकणार म्हणजे जिंकणारच.”

“अरे भिमा बस…! लय हवेत उड्या मारू नकोस.”

“तू कुस्ती जिंकणार आहेस म्हणतो. मग तो दुसरा पैलवान काय कुस्ती हरायला थोडी खेळणार आहे.”

“त्याने सुद्धा लय आखाडे गाजवलेले आहे भिमा.” हणमंत पैलवान नावाजलेला आहे. तो सुद्धा पूर्ण ताकतीने कुस्ती खेळणार, त्यामुळे समजदारीने घे.”

“डोकं शांत ठेव. कुस्ती काही फक्त शरीराच्या ताकदीवर जिंकता येत नाही त्यासाठी बुद्धीचा सुद्धा वापर करावा लागतो. कुस्ती एक कला आहे, शारीरिक कसरत आहे. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास या जोरावर खेळणारा हा खेळ आहे. खुराक खाऊन तालमीत गाळलेला घाम व पिळदार लसलशीत शरीर काय कुणावर गुरगुर करायला तयार करायचे नसते. हा कष्टाचा घाम कुस्ती जिंकायला, आखाड्यातील प्रत्येक माणसाची मनं जिंकायला असतो.”

“एक लक्षात ठेव कुस्ती अभिमान वाढवते आणि शरीर अहंकार.”

“अभिमान समाजात व लोकांच्या मनावर घर करतो तर अहंकार अपयशाची चव दाखवतो. कुस्तीचा अभिमान बाळग अहंकार नको.”

“आले का ध्यानात भिमा.”

भिमा तात्याच्या समोर मान हलवून होकार देत होता. बापाची माझ्याविषयी तळमळ व कुस्तीवरचे प्रेम पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी पटकन तात्यांना कडकडून मिठी मारली.

“तात्या हा तुमचा भिमा कुस्तीला जिवापाड जपेल तुमची मान आणि कुस्तीची शान कधीच कमी होऊ देणार नाही. हा शब्द मी तुम्हाला देतो.”

“अरे बस… बस… पोरा..! मला माहित आहे तुझे कुस्तीवर किती प्रेम आहे ते.”

“आता हे प्रेम फक्त दोन हात आहेत तोपर्यंत तरी टिकून आहे म्हणायचं.” उद्या या हातात मात्र नवीन दोन हात आले म्हणजे कळेल प्रेम कसे अर्ध्य अर्ध्य होते.

“तात्या आता दोन हात कशाला नवीन येतील. दोन हात आहे की मजबूत कुस्ती खेळायला.”

अहो भिमराव नवीन दोन हात म्हणजे, “बायको आणावी लागेल की तुम्हाला…!”

“तात्या काही पण गंमत काय? भिमा लाजतच ताटावरून निघून गेला.”

तात्या मोठ्याने हसतच म्हणाले, “लाजले गड्या पैलवान आमचे.”

तात्या पण पोराच्या जिंकण्याने भारावून गेले होते. तात्याला विश्वास होता उद्याची कुस्ती भिमा नक्की जिंकेल. कारण लहान पणापासून भिमाचा जिद्दी स्वभाव व कुस्तीवरचे प्रेम त्याला कधीच आवरले नाही. चला आता आजची रात्र गेली की उद्या भिमाची कुस्ती पाहायला मोकळे. उद्या गुरांची सोय लावून रानातून थेट आखाड्यात जाऊन बसुया. पोराचे कौतुक करायला बाप नको का तिथे? तात्या मनाशीच फुटपुटत अंथरुणावर जाऊन पडले. भिमा सुद्धा उद्याच्या कुस्ती विषयीचे डावपेच मनात घोळत अंथरुणावर पडून होता. उद्याची कुस्तीची मनात तालीम सुरू होती. मध्येच ती पांढरी शुभ्र चकाकणारी चांदीची गदा डोळ्यासमोर यायची. भिमा विचार करू लागला ही डोळ्यासमोर येणारी गदा उद्या खांद्यावर आली पाहिजे.

“तेवढ्या दारावरची कडी वाजली.”

“भिमा ये भिमा”

“लगेच मागून असा आवाज आला.”

कोणीतरी दारावर आले हे ओळखून भिमा पटकन उठला व दारावरची कडी उघडली. भिमाला पाहून दारावर आलेली पोरं म्हणाली,

“ भिमा तुला सावकाराने वाड्यावर बोलावले आहे.”

“आत्ता”

“हो आताच्या आता”

“काय काम एवढ्या रात्री”

“ते आम्हास ठाऊक नाही.”

“पण तू आज कुस्ती जिंकलास असे कौतुक करत होते सावकार तुझ्याबद्दल.”

“बर…बर… येतो मी, तुम्ही व्हा पुढे…!”

“असे म्हणून भिमा घरात येऊन तात्याला उठवु लागला.”

“तात्या….! तात्या….!”

“मी काय म्हणतो?” मी जरा सावकाराच्या वाड्यावर जाऊन येतो.

“एवढ्या रात्री…!”

“आणि कशापायी. काय काम आहे.”

“काम काय ते नाही सांगितले. त्यांच्या वाड्यावरची पोरं आलती बोलवायला.”

“एवढ्या रात्री…! सावकाराने तुला कशाला बोलावलं असेल गड्या? असे म्हणून तात्या विचारात पडले.”

“अहो तात्या येवढा विचार काय करता. येतो मी जाऊन. बघू काय म्हणत्यात सावकार ते.”

“तसं नाही भिमा? हा सावकार म्हणजे लय खराब माणूस. याला रिकाम्या उचापती लय येतात. जिथे नाही तिथे टांग आडवी करायचा शोक आहे या सावकाराला.”

“याला दुसऱ्याचा आनंद खपत नाही. जपून जा भिमा व लवकर परत ये.”

“रात्र वैऱ्याची असते. आपण जपलेलं बरं असतं….! हे लक्षात ठेव.”

तात्याचे बोलणे सुरू होतेच तोवर भिमा पायथन घालून सावकाराच्या वाड्यावर जायला निघाला. रस्त्याने जाताना भिमाला प्रश्न पडला. सावकारांनी एवढ्या रात्री आपल्याला कशाला बोलावले असेल. काहीतरी महत्त्वाचे काम असल्याशिवाय बोलवणे येणार नाही. विचारमग्न होऊन भिमा चालत होता. मनात विचार सुरू होता तोवर पायाने सावकारांचा वाडा गाठला. वाड्यात आत शिरलो तर बैठकीत सावकार व काही माणसं बसून होती. भिमा बैठकीच्या समोर येताच सावकाराने आवाज दिला.

“ये भिमा बस इथं.”

“आजची कुस्ती जिंकली म्हणे तू”

“हो”

“मस्त झालं. आपल्या गावाच्या पैलवान अंतिम कुस्ती खेळणार.”

“बरं दुसरा पहिलवान कोण आहे? जो उद्या तुझ्यासोबत कुस्ती खेळणार.”

“हणमंत पैलवान…! शेजारच्या गावाचा आहे.”

“भिमा उद्याच्याला कोण कुस्ती जिंकणार म्हणायचं मग आम्ही.”

“मी जिंकणार आहे उद्याची कुस्ती. मोठ्या तावातावाने भिमा बोलू लागला.”

“बर हणमंत जिंकला उद्याची कुस्ती तर?”

“कसं काय जिंकेल हणम्या…! या भिमाने काय मरेल मायचं दूध पिलेलं नाही.”

“सावकार या अंगात लय रग भरून आहे व आंबाबाईचा व आमच्या तात्याचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. उद्याची कुस्ती मीच जिंकणार आहे.”

“भिमाच्या बोलल्याने सावकाराच्या डोक्यात मुंग्या आल्या. एकदम लालबुंद डोळे करून सावकार रागात एकदम उभा राहिला व भिमाकडे बोट करून मोठ्याने बोलू लागला.”

“ये भिम्या जास्त नाटकं करू नको. लई पहिलवानाचा माज दाखवू नको आम्हाला.” तुझ्यासारखे लय पैलवान गार केले आम्ही.

“हणमंत पैलवान आमचा नातलग आहे. त्यामुळे तो जिंकला पाहिजे यासाठी उद्याची कुस्ती तू हरायची.” हणम्याला कुस्ती जिंकू द्यायची. आणि हो…! हे कुणालाही कळले नाही पाहिजे. की तू मुद्दामून कुस्ती हरला ते. यासाठी तुला किती पैसे, चांदी पाहिजे ते सांग व घेऊन जा. परंतु उद्याची कुस्ती तू हरला पाहिजे हे मात्र नक्की. सावकाराने भिमाला चांगलाच दम भरला. भिमा किती तरी वेळपासून गुप गमानं नुसतं ऐकत होता. त्याला काय सुरू आहे हेच कळतच नव्हतं. डोळ्यात अंधार पडल्यागत नुसता चूप होता.

“सावकार ते जमणार नाही.” भिमाने मोठ्या स्वरात सांगितले.

“कसे काय?”

“कुस्ती हा खेळ आहे तो खेळूनच ठरेल कोण जिंकणार ते?”

“हणमंत तुमचा नातलग असला म्हणून मी कुस्तीशी बेईमानी करायची…! हे अजिबात जमणार नाही.” बेईमानी आमच्या रक्तात नाही.

“आणि हो…!”

“कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही हा भिमा.”

असे म्हणून भिमा बैठकीतून जायला निघाला. सावकाराने भिमाला लय समजावले. पण भिमा काही सहजा सहजी पटणारा नव्हता. भिमा आता बैठकीतून बाहेर पडला तर लय बोंबाबोंब होईल. सावकारांनी बैठकीतील आपल्या माणसांना सांगितले.

“ये बघताय काय? पकडा भिमाला.”

“दोरखंडाने आवळा तसा तो ऐकणार नाही.”

 दहा-बारा माणसांनी भिमाला कैचीत पकडले. भिमा खूप ताकतीने अंग झटकून त्यांना विरोध करत होता. पण जास्त माणसं असल्याने काहीच करता येत नव्हते. भिमाच्या डोळ्यावर कापड बांधले व हातपाय दोरीने बांधले. भिमाला चोरागत बांधून टाकले होते. सावकार म्हणाला उचला याला व गुपचूप बैलगाडीत माझ्या मागे घेऊन या. तोंडात कापड कोंबल्यामुळे ओरडता सुद्धा येत नव्हते. अंधारात कुठे घेऊन चालले काहीच कळत नव्हते.

                       थोड्यावेळाने भिमाला तमाशाच्या एका खोपीत आणून टाकले. गावाच्या बाहेर मोकळ्या जागेत तमाशा भरला होता. तंबूत गर्दी जमली होती. तमाशा सुरू होणार होता. आपआपल्या खोपीत बाया कापडं बदलत होती. बाया तमाशात नाचण्यासाठी तयार होत होत्या. थोड्यावेळाने बाया तयार होऊन तंबूत आल्या व तमाशाला सुरुवात झाली. भिमाला काय सुरू आहे काहीच कळत नव्हते. खोपीत सावकार व एक माणूस काहीतरी कुजबूज करत होते.

“मामा समजले का? तुम्हाला काय करायचे ते.”

“तुमच्या तमाशातील त्या पोरीला नीट समजावून सांगा.”

“काम फत्ते झाले पाहिजे.”

“काम झाल्यावर वाड्यावर चुपचाप तुमचा माणूस पाठवून पैसे घेऊन जा. आणि रात्रीच तमाशा गुंडाळून गाव सोडून निघून जा.”

“कुणालाही शंका यायच्या आत हे सर्व घडलं पाहिजे. यात जर काही बेईमानी केली तर गाठ सावकराशी आहे. हे लक्षात ठेवा.”

असे म्हणून सावकार व तो माणूस खोपीतून बाहेर पडला. तंबूत गण गवळण संपून लावणीला सुरुवात झाली होती.  भिमा नुसता फुसफुसणाऱ्या नागासारखा वळवळत होता. तेवढ्यात खोपीत एक बाई आली. ती भिमाला पाहून म्हणाली,

“पैलवान नका येवढी आडे वेढे घेऊ.”

“मी सोडते तुम्हाला.”

त्या बाईने भिमाला दोरीपासून वेगळे केले. डोळ्यावर बांधलेले कापड व तोंडातील कापड काढले. भिमा आता मोकळा झाला होता. पटकन उभा राहून इकडे तिकडे पाहून त्या बाईला विचारू लागला. 

“कुठे आहे मी?”

“अहो पैलवान तुम्ही तमाशाच्या तंबूतील बायकांच्या खोपीत आहात.”

“तू कोण आहेस?”

“मी तमाशातील नाचणारी शेवंता.”

“शेवंता”

“हो… हो… शेवतां”

“नाव ऐकुन भिमा शेवतांकडे एकटक नजरेने बघतच राहिला.”

“शेवंता खरीच शेवंतीच्या फुलासारखी गोरीपाण, उंचीपुरी, देखणी, धारदार नाकाची, टपोरी डोळे, सडपातळ देहाची, लसलसीत देखणी तरुणी नऊवारीत नटून उभी होती. सौंदर्याच्या मादक देहाला पाहून भिमा स्तब्ध झाला होता.”

“दुसरीकडे शेवंता भिमाला न्याहळत उभी होती. पिळदार शरीराचा, गोरापान, ओठावर मिशीचा झुपकेदार आकडा असलेला तरणाबांड पैलवान उभा होता. भिमाला पाहता क्षणीच शेवंता जणू प्रेमात पडल्यागत न्याहाळत उभी होती.” घाबरलेला पैलवान पाहून शेवंता म्हणते,

“पैलवान तुम्हाला मला काहीतरी सांगायचे आहे.”

“पटकन सांगा की?”

“तो सावकार आमच्या फडाच्या मालकासोबत बोलत होता. तुम्हाला बदनाम करायचं कारस्थान रचलाय त्या सावकारानी. आमच्या फडाच्या मालकाला लय पैसे कबूल केलेत. तुम्हाला बदनाम करून टाकायचा डाव आहे त्यांचा. त्यांनी मला तुमच्यावर खोटा आळ घ्यायला सांगितलाय. तुम्ही माझी अब्रू लुटली असे ओरडून ओरडून तमाशातील लोकांसमोर तुमची बदनामी करायची सांगितली.”

“काय सांगतेस?”

“हो…  मला जे सांगितले तेच सांगते.”

“मी आणि अब्रु… ! कसं शक्य आहे.”

“मला काही सुचेनासे झाले”

“तुमच्यासारखा पैलवान कशापाई बदनाम करायचा ठरवलाय कुणास ठाऊक.”

“मी हात जोडून विनंती करते तुम्हाला…!”

“ तुम्ही पळून जा लवकर येथून.”

“नाहीतर मला तुमच्यावर खोटा आळ घ्यावा लागेल.”

“नाही घेतला तर मालक मारून टाकतील मला.”

“आणि हो संभाळून जा…! नाही तर सावकाराची माणसं तुम्हाला पकडून मारून टाकतील.”

हे ऐकून भिमाच्या पायाखालची जमीनच हादरली. भूकंप झाल्यासारखं पुरा हदरला होता. काय ही वेळ येऊन ठेपली. असे कसे झाले. भिमाला काय करावे काही समजत नव्हते. भिमाने हात जोडून शेवंतीला विनंती केली मी तसला माणूस नाही. मी पैलवान आहे. मी बाई माणसांचा आदर करतो. शेवंता तूच मला वाचव. सावकारांनी सूडबुद्धीने मला कुस्तीत हरवायचे ठरवले. मी तयार होत नाही म्हणून हा डाव रचला त्या नास्तिक माणसाने.

“शेवंताने हळूच खोपीच्या फठीतून बाहेर डोकुन पाहिले तर काही माणसं काठ्या घेऊन उभी दिसली.” 

“बापरे…! पैलवान बाहेर तर तुमच्या जीवाला खूप धोका आहे. आणि आत मधी माझ्या जीवाला.”

“मी जर सांगितल्या प्रमाणे नाही केले तर माझा मालक मला जीवच मारीन. माझ्या जीवापेक्षा त्याला कागदी रुपयाची जास्त किंमत आहे.”

“शेवंता बिचारी तमाशात असून सुद्धा चांगली सुशील, सदगुणी मुलगी वाटत होती. तिच्या कडून खरं बाहेर पडलं.”

भिमाला काय करावे काहीच समजत नव्हते. आपण कसं बसं बाहेर पडलो तर आपला जीव वाचेल व बदनामी सुद्धा होणार नाही. पण माझ्यामुळे या निरागस शेवंताचा जीव मात्र जाईल. शेवंतीचा जीव वाचवायला गेलो तर मला बदनामीचा डाग आयुष्यभर अंगावर घेऊन जगावे लागेल. भिमा हात जोडून ढसाढसा रडू लागला. हे देवा…! काय तुझा गुन्हा केला मी? एवढ्या संकटात मला उभे केले. कुस्ती शिकलो व खेळत राहिलो हा गुन्हा केला का? भिमाच्या हाताला धरून शेवंता सावरू लागली.

“अहो पैलवान नका रडू. माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुमच्यावर हा डाग लागू देणार नाही. मी तुमच्यावर आळ घेणार नाही. ”

बोलताना शेवंताच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या. एका अनोळखी मुलीचा हा नम्र, शीलपणा पाहून भिमा भारावून गेला. आपल्या या कुस्तीच्या भानगडीत शेवंता नाहक बळी ठरत आहे. दोघांपैकी एकाचा जीव जाणार यात शंका नाही. हा सावकार पैशाच्या जोरावर एक तरी जीव घेईल. पैशाच्या घमंडीने आजपर्यंत गावभर माज करत आलाय हा सावकार. आता तर माझ्या कुस्तीच्या भीतीने त्याची फार झोप उडाली. मी जर कुस्ती जिंकली तर त्याचा पाहूणा हरेल व माझे पंचक्रोशीत नाव होईल. हे त्याला नकोय म्हणून त्याने हा सगळा डाव रचलाय. या डावात मात्र माझ्यामुळे तुझ्यावर संकट ओढावले शेवंता. नियतीने काय गाठ घातली. तुझा काहीच दोष नसतांना तुला हा त्रास सहन करावा लागतो.

“दोष कसा नाही म्हणता पैलवान. गरिबीचा व अनाथ असल्याचा भोग भोगते आहे. हा दोषच म्हणायचा बाकी काय?”

“थरथरत्या आवाजात शेवंता बोलली.”

“म्हणजे…! तुला आई बाप नाही.”

“नाही.”

“मी लहान असतानाच माझी मायबाप तमाशात काम करतानाच मला सोडून गेले. तेव्हापासून या तमाशातील बायांनी माझा सांभाळ केलाय व त्यांच्यासोबत या फडात कामावर घेऊन आल्यात.”

“शेवंता अनाथ असूनही येवढी गुणवान व शिलवान मुलगी आहे. गरीबीचा भोक अशा पद्धतीने भोगत होती. आता तर भिमाला काही सूचेना एकदम सुन्न होऊन तो पटकन खाली बसला.”

“शेवंता डोळे पुसत पुट पुटली अहो पैलवान ठरवा लवकर काहीतरी नाहीतर माझा मालक येईल.”

“शेवंता ठरवायचे काय त्यात तुझ्या जीवासाठी माझ्या बदनामीचा बळी जाऊ दे. नाहक तुझा बळी कशाला.”

“पहिलवान एक बोलू का?”

“बोल आता शेवंता तुझीच बोलण्याची वेळ आली.”

“पैलवान आपण दोघांचे जीव वाचवू.”

“ते कसे काय?”

“आपण येथून पळून जाऊ.”

“त्याने काय फरक पडणार शेवंता. बदनामीचा डाग तसाही लागणारच.”

“पण पैलवान बदनामीचा खोटा डाग लागण्यापेक्षा पळून जाण्याचा डाग कधी बरा.”

आणि हो, “मी तुमचा जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी म्हणतेया. लगेच माझ्यासोबत पळून चला नाही म्हणत.”

“एवढ्या संकटात सुद्धा निर्मळ मनाची शेवंता खरंच निर्मळ विचार करत होती. माझ्यासाठी स्वतःचे आयुष्य पोरकं करायला निघाली होती शेवंता.”

“खरंच किती निर्मळ आणि पवित्र मनाची ही स्त्री देवाने अशा नरकात जन्माला घातली.”

आजचा विचार हाच उद्याचा दिवस आता घडणार होता. शेवंता सोबत पळून गेलो तरी बदनामी. नाही गेलो तरी याही पेक्षा जास्त बदनामी. यात माझी कुस्ती मात्र गुरफटून कायमची मरणार. एका तमाशातील पोरीची इज्जत लुटणारा भिमा तात्याला तरी काय तोंड दाखवणार. तात्या या धक्क्यातून कसे जगतील या विचाराने भिमाचे डोके फार भनानले होते. त्यापेक्षा शेवंता सोबत भिमा पळून गेला एवढेच कानावर जाईल. असे काळे तोंड पाहण्याची वेळ तरी तात्यावर येणार नाही. भिमा ताटकन उभा राहिला. क्षणाचाही विलंब न करता शेवंताचा हातात हात धरून बोलू लागला. शेवंता या पैलवानाच्या हातात तुझ्या रूपाने पहिल्यांदा एका स्त्रीचा हात आलाय. हा विश्वासाचा हात मी कायमचा धरायचा ठरवलाय. लोक काय म्हणतील याची मला परवा नाही तू फक्त नाही म्हणू नको. शेवंता भिमाकडे एकटक पाहत उभी होती. दोन्ही डोळ्यातून पाणी घळाघळा गळत होते. ती काहीही न बोलता पटकन भिमाला बिलगली. तिच्या स्पर्शाने भिमाला समजले की शेवंतीचा होकार आहे. ती आपल्या सोबत आयुष्यभर राहायला तयार आहे. शेवंता आता इथून बाहेर कसे पडायचे पटकन ठरव.

शेवंताने पटकन एक लुगडे भिमा समोर फेकले आणि म्हणाली, “पैलवान पटकन तुम्ही हे लुगडे नेसा.”

“बाईच्या वेशात तुम्हाला कोणी ओळखणार नाही. व माझ्या मागे मागे चला तंबूच्या पाठीमागे घेऊन जाते तुम्हाला. तिथून पुढला रस्ता नाही माहित मला.”

“शेवंता माणसाच्या आयुष्यात कधी कोण पुढे आणि कधी कोण मागे राहील सांगता येत नाही. कुस्तीत फक्त पुढे जायची माहीत होते असे एक दिवस कुस्ती पासून दूर पळावे लागेल स्वप्नातही वाटले नव्हते.”

“भिमाने पटकन ते लुगडे नेसले, पदराने तोंड झाकून घेतले.”

“शेवंता या पैलवानाला लंगोट नसायची सवय होती आता नशिबाने लुगडं नेसायला लावले. नशिबाचे भोक बाकी काय?”

“भिमा ढसा ढसा रडू लागला.”

“शेवंताने भिमाने हात धरला व ती बोलु लागली.”

“पैलवान या शेवंतीचा जीवात जीव असेपर्यंत हा हात सोडणार नाही वचन देते तुम्हाला. उठा चला आता माझ्या मागे रडत बसु नका.”

शेवंताच्या मागे भिमा आयुष्यातील नको असलेली पावले टाकत निघाला. दोघांनी कोणाला समजायच्या आत तंबूतून पळ काढला. थोड्यावेळात तंबूतील एक मावशी खोपीत बघायला आली. खोपीत कोणीच दिसत नाही कापड उचलून बघितले. बया… बया… “शेवंती पळाली की काय?” मावशी ओरडतच फडाच्या मालकाकडे पळत आली आणि सांगू लागली.

“मालक शेवंता पळाली...!”

“काय? शेवंती पळाली.”

“आणि तो पैलवान”

“ पैलवाना सोबतच शेवंता पळाली.”

“आता सावकाराला काय तोंड दाखवू. मालक चक्रागत पटकन खाली बसला.”

“माणसाला पाठवून सावकाराला बाजूला बोलावून घेतलं आणि सांगू लागला. तुमचा पैलवान आमच्या पोरीला घेऊन पळाला.”

सावकार मोठ मोठ्याने खदा खदा हसत म्हणाला, “काटा काढायच्या ऐवजी काटा खुदच निघून गेला म्हणायचा.”

“मामा बारीक तोंड करून काय उभे राहिलात. जा आता जाहीर करा.”

“ भिमा पैलवान तमाशातील पोरीला घेऊन पळाला.”

डोळ्यातील घळाघळा निघणाऱ्या आठवणींच्या अश्रूंनी हातातील आरशाला आंघोळ घातली होती. कौतिकरावच्या हसण्याने भिमाला आज मागील आठवणींनी उजाळून टाकले होते. मागे वळुन पाहतांना पैलवानाचा सोगांड्या कधी झाला कळते सुद्धा नाही.

🙏🙏

 ©®राजेंद्र शेळके

मो नं 9823425852

Sunday, 19 June 2022

तो असतो बाप..!

 शिर्षक:- तो असतो बाप. 

चाळणी सारखे झालेले बनीयन अंगात घालुन
पोराला मालक बनवायचे स्वप्न पाहणारा.....||1||
तो असतो बाप.

आयुष्यात गरीबीच्या काटेरी वाटेवर चालतांना
स्वप्नाची पायघडी घालणारा.....||2||
तो असतो बाप.

आयुष्य झिजवुन लेकरांसाठी आनदांची,
सुखी समाधानाची बाग फुलवणारा.....||3||
तो असतो बाप.

परिस्थितीला समाधानाची झालर पांघरुण
प्रत्येक श्वासाशी संघर्ष करणारा.....||4||
तो असतो बाप.

कष्ट आणि घाम गाळून कमावलेली
इमानदारीची प्रतिष्ठा गावभर मिरवणारा.....||5||
तो असतो बाप.

आयुष्यभर पोटाला चिमटा देऊन
लेकरांच्या मुखात चिमुटभर घास भरवणारा.....||6||
तो असतो बाप.

अभिमान व अहंकार नसलेला
सामान्य माणूस म्हणून जीवन जगणारा.....||8||
तो असतो बाप.

जबाबदारीच्या वाढलेल्या वेलीचा गुंता सोडवतांना 
अंथरुणावर खितपत पडलेला.....||9||
तो असतो बाप.

मावळतीला गेलेल्या सूर्याप्रमाणे एक दिवस कायमचा आठवणींचा अंधार पसरवून गेलेला..... ||10||
तो असतो बाप.


🙏🙏
राजेंद्र शेळके
9823425852

Saturday, 15 January 2022

कोरोना शाळा बंद करू शकतो? शिक्षण नव्हे!

कोरोना शाळा बंद करू शकतो? शिक्षण नव्हे! 

जगातील भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक देशात विविधता आढळते. तसेच शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण, व्यवसाय, तंत्रज्ञान, आरोग्य, शेती, नोकरी, उद्योगधंदे आदी गोष्टींमध्ये वेगळेपण दिसून येते. परंतु गेल्या दोन वर्षापासून जगातील अर्ध्यापेक्षा जास्त देशांमध्ये एक गोष्ट सारखी आढळून आली. ती म्हणजे कोरोना महामारी सारखी भयंकर आपत्ती. प्रगतीच्या चढाओढी मध्ये अनेक देश कोरोनाच्या संकटात अडकून पडली. यामुळे प्रगतीला चांगलाच अडसर निर्माण झाला. कोरोना दरवर्षी नव्या लक्षणासह एकामागून एक लाट घेऊन येत आहे. कोरोनाच्या आतापर्यंत दोन लाटा मोठ्या भयंकर रुद्र संकट घेऊन आल्या. त्यात मानवासह अनेक गोष्टींचे नुकसान झाले. त्यात प्रामुख्याने जिवितहानी, आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक, सामाजिक व शैक्षणिक अशा प्रकारच्या हानी देशात झाल्या आहे. या दोन्ही लाटांना देशाने समर्थपणे तोंड देऊन कोरोनाला रोखण्यात यश मिळवले. परंतु कोरोनाला पुर्णपणे घालवण्यात अपयश आले. आणि म्हणून पुन्हा नवीन रूप घेऊन कोरोनाची तिसरी लाट जगाबरोबर भारतात सुद्धा येऊन ठेपली. पुन्हा हळूहळू या तिसऱ्या लाटेचा प्रभाव सगळीकडे दिसू लागला. आतापर्यंत या तिन्ही लाटेत सर्वाधिक न दिसणारे असे मोठे नुकसान झाले ते म्हणजे शिक्षणाचे. देशाच्या प्रगतीत सर्वाधिक मोलाचा वाटा असणारा घटक म्हणजे शिक्षण. याच शिक्षणावर गेली दोन वर्षे सर्वाधिक दुष्परिणाम झाला. शिक्षणाची प्रक्रिया कोलमडून पडली. कोरोनाच्या भीतीने संसर्ग रोखण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून लॉकडाऊचा जन्म झाला. हा पर्याय सर्वात अगोदर शाळेंना लागू करण्यात आला. कारण येणारी पिढी, घडणारा तरुण वर्ग याच शाळा, कॉलेज, महाविद्यालया मध्ये शिकत आहे. मनुष्य जन्मा मध्ये सर्वाधिक महत्त्व जगण्याला दिले जाते. मनुष्य जगला तरच देश टिकेल. आणि म्हणून सहाजिकच आतापर्यंत दोन्ही लाटेत सर्वाधिक काळ कोरोनाच्या भीतीने शाळा, कॉलेज, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. याचा दुष्परिणाम मुलांच्या शिक्षण पद्धतीवर, जडणघडणीवर, शैक्षणिक संस्कारावर झाला. मुले स्वभावाने रागीट, आक्रमक, एकेखोर, बंड होत गेली. अभ्यास सोडून इतर गोष्टीकडे आकर्षित झाली. मोबाईल, टीव्ही, कार्टून, मोबाईल वरील गेम्स, खेड्यापाड्यात घराबाहेरील सायकल, गोट्या, टायर आदी खेळ, भांडण, व्यसन, गुन्हेगारी अशा गोष्टींकडे मुलं, तरुणवर्ग खेचला गेला. समाज, पालक, शिक्षणतज्ञ यांना पुन्हा एकदा शाळा, शिक्षक, शिक्षण या गोष्टींचे महत्त्व व गरज पटली. प्रत्येकाच्या जीवनात शाळा, शिक्षक, आणि शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे कोरोना व लॉकडाऊन मुळे दिसून आले. कोरोनाची दुसरी लाट देशातुन ओसरली तसे हळूहळू सरकारने महाविद्यालये, कॉलेज, शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. पुन्हा एकदा राज्यभर शाळा सुरू झाल्या. शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचायला सुरुवात झाली. घराबाहेर दंगामस्ती करणारी मुलं शाळेत शिक्षण घेऊ लागली. ज्ञान व शिस्त यांची सांगड घालून पुन्हा एकदा गुरु शिष्याचा ज्ञानदानाचा यज्ञ सुरू झाला. सर्व सुरळीत सुरु असताना ओमिक्रॉन नावाच्या कोरोना रूपाने तोंड वर काढले. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव हळूहळू वाढत गेला. तिसऱ्या लाटेच्या भीतीने सरकारने शाळा बंद केल्या. कोरोनाच्या भीतीने राज्य सरकारने नियमावली जाहीर केली. यामध्ये अर्ध्या क्षमतेने अनेक गोष्टी बंद केल्या. शाळा, कॉलेज, महाविद्यालये मात्र पूर्ण क्षमतेने बंद केली. यात राज्य शासनाचा हेतू हा लहान मुलं, तरुण, युवक यांना या कोरोनाच्या धोक्यापासून दूर ठेवणे हा होता. परंतु पालक, समाज यामधून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. शाळा बंदला विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाज यांनी तीव्र विरोध दर्शवला. कारण शिक्षणाची प्रक्रिया बंद पडता कामा नये हा प्रामाणिक हेतू या सर्वांचा यामागे होता. परंतु राज्य शासन शाळा बंद वर ठाम आहे. कोरोना शाळा बंद करू शकतो? शिक्षण नव्हे! हे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांनी समजून घेतले पाहिजे. शाळा जरी बंद झाल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण हे कालही सुरू होते आजही सुरू आहे व उद्याही सुरू राहील. फक्त शिक्षण प्रक्रियेतील बदल परिस्थितीनुसार व वेळेनुसार स्वीकारणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालये बंद झाली म्हणून शिक्षण बंद होत नाही. शिक्षण हे ऑनलाईन, स्वयंअध्ययन, स्वाध्याय अशा पद्धतीनुसार घेत राहणे महत्त्वाचे आहे. संकटाला प्राप्त परिस्थितीनुसार सामोरे जाणे हा माणसाचा स्वाभाविक गुण आहे. कोरोना, सरकार, लॉकडाऊन या सर्वांच्या भूमिकेतून जाताना विद्यार्थी आणि पालकांनी स्वयम शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आजच्या परिस्थिती नुसार मुलांना शिक्षण कसे व कुठून मिळेल याला अधिक महत्त्व आहे. प्रत्येक बालक शिकले पाहिजे यासाठी शिक्षण हक्क कायदा 2009 करण्यात आला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण देणे गरजेचे आहे तसेच शिक्षण घेणे सुद्धा बंधनकारक आहे. शिक्षण ही सामाजिक गरज आहे त्यापेक्षा अधिक ती स्वतःची गरज आहे. हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. शिक्षण ही स्वतःची गरज म्हणून आपण स्वीकारले तर अनेक आव्हानांचे व समस्यांचे ते उत्तर ठरेल. कोरोना ने शाळा बंद केल्या परंतु शिक्षण सुरू आहे. हे पालकांनी मुलांना समजावून सांगावे. "सारे शिकूया पुढे जाऊया" हा निर्धारच शिक्षण प्रक्रियेला व सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे.

राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु. पो. किनगाव राजा
ता. सिंदखेड राजा
जि. बुलडाणा
मो. न. 9823425852

Thursday, 13 January 2022

विचारांची श्रीमंती

 




*विचारांची श्रीमंती*

जीवनातील विचारांची श्रीमंती वाढवण्यासाठी विचारांची श्रीमंती (ललीत लेख) हे पुस्तक अवश्य वाचा.

पुस्तकाची मुळ किंमत 120 रुपये

(पुस्तकावर 33% सुट) 

पुस्तक विक्री किंमत 80 रुपये

पोस्ट खर्च 50 रुपये

पुस्तक हवे असल्यास 130 रुपये फोन पे/गुगल पे करा.

पुर्ण पत्ता, पिन कोड, मोबाईल नंबर वाट्सअप करा.

पुस्तक बाय पोस्ट पाठवतो.

फोन पे 9823425852

गुगल पे 9823425852

🙏🙏

संपर्क:- राजेंद्र शेळके 9823425852

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...