Sunday, 11 June 2023

लघुकथा- रातपाळी

लघुकथा:- रातपाळी

            आबा शेतातून लगबगीने घरी आले. गडबडीने पायावर दोन तांबे ओतून चौकटीतून आत आले व खांबाला टेकून बसले. कसा बसा वेळ काढून पाठीला टेका लावून आबा निवांत बसले असे मंगलला वाटले. तीन पोरांची माय होऊन सुद्धा मंगलला आबांचा स्वभाव कळाला नव्हता.

“अहो... चहा घेता का कपभर.”

“अहो... मी काय म्हणते! चहा घेता का कपभर.”

“करत असाल तर घेतो.” खांबाला टेकून बसलेले आबा हळू आवाजात म्हणाले.

मंगलने चहा उकळून कपबशी भरून आबांना दिला. गुळाचा गोड चहा आबांना आज गोड लागला नाही. चहा घेऊन आबा डोक्याला हात लावून विचार करू लागले. शेतात घडलेला प्रकार आबांच्या मनात सारखा घोळत होता. शेतात उभं असलेलं हिरवंगार पीक पाण्या वाचून सुखतया. लेकरागत जीव लावत लहानचं मोठ करायचं आणि हाता तोंडाशी आलेल पीक डोळ्यादेखत गमवायचं हे आबाच्या मनाला पटत नव्हतं. पण करणार तरी काय? पाण्यासाठी एकच विहीर आहे. ती पण दोघांची मिळून सामुहिक. हिवाळ भरणी आली की, तिच्या मागे हात धुवून लागतात. ती तरी किती दिवस पाणी देत राहणार. तिच्या पोटात थोडेसे पाणी आले की, उपसायची घाई होते. शेतातील हिरवं पीक आणि विहीर या दोघांच्या काळजीने आबा डोक्याला हात लावून बसले होते.

“अहो…! सांजवेळेला डोक्याला का हात लावून बसलात.” “डोक्याला हात लावून नको तर काय करू! आता वेळच तशी आली मी तरी काय करू.”

“म्हणजे...! काय झालं ते स्पष्ट सांगा की.”

“लय आडेवेढे घेत नका बोलू. तुम्ही सांगितल्या बीगर मला कळणार तरी कसं.”

“आज शेतावर भांडण झालं.”

“काय...? भांडण! आणि कशासाठी”

“विहिरीतील पाण्यासाठी.”

“कुणासोबत….! तरी म्हटलं मघापासून काय विचारात पडलात.”

“शंकर दादा सोबत”

“शंकर भाऊजी सोबत.”

“बापरे…! या माणसाला म्हणावं तरी काय?”

“शेतातील भूतं निव्वळ ही माणसं.”

“काळ्या मातीशी इमान सोडून निव्वळ पैशासाठी हपालेली, मस्ताडलेली ही जगंली माणसं हाय. भाऊबंदकी झाली म्हणून नुसतं भांडण करत राहायचं येवढाच उद्योग येतो त्यांना.”

“कोण कोण होतं परत विहिरीवर.”

“शंकर दादा, वहिनी व गण्या.”

“तुम्हाला कशापायी भांडले ते आज.”

तुम्ही ऐकटे या लोकांसोबत कशाला भांडत बसले. उद्या भांडणात त्यांनी तुम्हाला काही मारहाण केली तर? ही हैवान माणसं आधीच आपल्या जीवावर उठलेली आहे. त्यांना तुमच्या जीवापेक्षा शेत महत्त्वाचं आहे. कधी पण तुम्हाला एकटे पाहून ते जोरावर येतात. त्यांना लय मस्ती आली हाय. गावात दुसऱ्या कुणासोबत टक्कर घ्या म्हणावं. मग कसा प्रसाद मिळतो तर. उगाच एकट्याला पाहून जोर काढत असतात. आपल्या वाट्याला आलेलं सुद्धा नीट खाऊ देत नाही. या लोकापायी गाव सोडून जायची वेळ आली आपल्याला.

“अग मगंल हळू बोल की, किती चिडशील अजून. नुसतं चिडुन काही रानात पाणी येणार नाही.” आबा मंगलला समजावून लागले.

“अहो मग काय भांडुण पाणी येणार आहे. गावातील चार माणसं गोळा करा आणि पाळ्या लावून घ्या. आपल्या पाळीत आपण शेताला पाणी देत जाऊ.”

“मला पण तेच वाटतं. नेहमीच्या भांडणावर एकदाच तोडगा काढावा. पाळ्या लावून घेतल्या म्हणजे आडकाठी राहत नाही. आपण आपल्या दिवसाला मोटर सुरू करायची आणि शेतात पाणी सोडायचे. बाकीच्या दिवशी तसेही आपल्याला पाण्याची गरज नाही. उद्या सकाळी मारुतीच्या देवळावर गावातील चार पंचांना जमा करून विषय कानावर घालतो. चार लोक काढतीलच काहीतरी तोडगा.”

“पण ही आगाव माणसं आली पाहिजे की पंचासमोर…! नाही तर लपवतील काळं तोंड कुठं तरी? तसही चार लोकात उठ बैस करायची सवय नाही त्यांना. पंचांसमोर गरीब गाय व्हायला आवडणार नाही. अंगातील रंग भांडणातून ओकल्या शिवाय त्यांची मस्ती जिरणार नाही.”

“पंचासमोर आपली कैफीयत तर मांडू. ते ऐकून घेतील व बोलावतील शंकर दादा व गण्याला. तु उगाच मनाला ताप लावून घेऊ नको.”

या लोकांना काही फरक पडत नाही हे गिधाडं आहे. भूक लागल्यावर माणसाची लचके तोडायला मागे पुढे पाहत नाही. श्रीमंतीची भूक त्यांना कधी समाधानी करत नाही व शांत सुद्धा बसू देत नाही. स्वार्थासाठी नातीगोती कळत नाही. मंगल व आबा खूप वेळ गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात शेजारच्या चुलत सासूबाईंनी आवाज दिला.

“काय मंगल स्वयंपाक झाला वाटतं. त्यामुळेच नवरा-बायको येवढे गप्पांमध्ये रमले.”

“नाही… नाही… आत्याबाई स्वयंपाक बाकी आहे अजून. सहजच गप्पा मारत बसलो. लेकरं बाहेर खेळायला गेलीत. घर शांत झालं की, अधुन मधुन बोलायचं. शेवटी आपल्या नवऱ्यासोबत आपणच बोलणार की? बरं काय म्हणता आत्या.”

“काय नाही मला वाटीभर डाळ पाहिजे उसनी. नवी केली की देईल परत.”

“बरं…! म्हणून मंगल घरात गेली व एक वाटीभर डाळ घेऊन आली.”

“आत्याने डाळीची वाटी घेतली व घरातून बाहेर पडल्या.”

“मंगल तुला कितीदा हळू बोल म्हटले होते. म्हातारीने आपल्या गप्पा ऐकल्या वाटतं.” आबा हळु स्वरात मंगलकडे बघून बोलू लागले.

“नाही.. नाही..”

“म्हातारी कशाला आपल्या गप्पा ऐकेल.”

“अग त्यांची पण विहीर आटली ना..! त्यांना अधुन मधुन शंकर दादा कडून पाणी घेता येते ना. पाळ्या लागल्यावर त्यांचा मेळ लागत नाही ना भिजवायला.”

“ऐकू द्या. ऐकलं तर! मी काय त्यांच्या बापाला घाबरत नाही. तश्या ही त्या लय खडूस आहे. सारखं तोंड घालत असत्या कुणाच्या ना कुणाच्या घरात.”

“अगं पण मी तुला हळू बोल सांगतो पण तु ऐकतेच कुठे?”

“अहो..! मी काही त्यांना मूळ घेऊन गेले नव्हते की, चला आत्याबाई आमच्या घरी गप्पा ऐकायला. त्यांना सवयच आहे इथे तिथे तोंड खुपसायची.”

“बस करा मंगलबाई तुमच्या रागाचा तोरा! एवढ्या रागा रागात चुलीजवळ गेल्या तर आपोआप चुल पेटेल. आबांनी रागाचा विषय काढून चुल पेटवायचा इशारा देऊन टाकला.”

आबाचे बोलणे मंगलच्या लक्षात आले. मंगल पटकन उठून चुलीजवळ गेली व स्वयंपाक करू लागली. आबा उठून अंगणात येऊन लेकरांना शोधू लागले. लेकरं गल्लीत बाकीच्या लेकरांमध्ये खेळण्यात गुंग होती. लेकरांना आवाज देऊन घरात घेऊन गेले. स्वयंपाक झाल्यावर आबा व मुलांनी पोटभर जेवण केले. थोडावेळ मुलांनी आबासोबत बडबड केली व शांत झोपी गेली. आबांना मात्र झोप लागत नव्हती कुस बदलून बदलून कंटाळा आला होता पण डोळे मिटायला तयार नव्हते. डोक्यात विचारांचे काहूर लय वेळ घुमत राहिले. आबांना कधी झोप लागली कळले सुद्धा नाही.

            सकाळ होताच आबा आंघोळ आटोपुन पाटलाच्या घरी गेले. पाटलांना घडलेला प्रकार सांगितला. “पाटील तुम्हाला हात जोडून विनंती आहे एवढा प्रश्न मिटवून द्या.” पाटील खूप समजदार माणूस होते. पाटलांनी सुद्धा आबांना समजावून सांगितले. भांडणात काही पडले नाही. आपसात पाण्याचा प्रश्न मिटवायचा असेल तर पाळ्या लावून टाकू़. शेताला पाणी भेटले बस झाले. कुठे अंगातील गर्मी दाखवायची ती पण आपल्या रक्ताच्या माणसांना. तसं पाहायला गेलं तर शंकर काही वाईट माणूस नाही पण त्याला पैशाची लय हाव आहे. भाऊबंदकीत फक्त आपणच श्रीमंत झालं पाहिजे असं वाटतं त्याला आणि त्यातल्या त्यात आबा तुमचा स्वभाव झाला गरीब त्यामुळे तो अधिकच गुरगुर करतो. तुमच्या ठिकाणी एखादा दुसरा माणूस असता तर त्याला आतापर्यंत हाताखालून काढला असता तेव्हा त्याची अक्कल ताळ्यावर आली असती.

“ते बरोबर आहे पाटील. पण माझी लेकरं लहान आहे. मला त्याच्यासोबत भांडण करणे शक्य नाही. एकमेकांशी मारहाण करून पोलीस कैफीयत करायची व कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या हे माझ्या मनाला पटत नाही. वरीस दोन वरीस कसंतरी या विहिरीवर भागवतो. पिकपाणी बरं झालं दोन पैसे माझ्याजवळ जमा झाले की, माझी मी एक नवीन विहीर खोदून घेतो म्हणजे नेहमीची कटकट संपून जाईल.”

“आबा येवढे नका जीवाला लावून घेऊ. काढू आपण उपाय काहीतरी काय काळजी करू नका. उद्या सकाळी मारुतीच्या देवळावर शंकरला बोलावून घेऊ. तुम्ही पण या आम्ही पंच ठरवू काय ते. गावातील रीतभात पाळायला लागेल. गावापेक्षा कोणी मोठा नसतं आणि शंकर लयच दादागिरी करायला लागला तर त्याला कायद्याचा हिसका दाखवावा लागेल. तुम्ही काही काळजी करू नका.”

“बरं येतो पाटील. हात जोडून आबांनी पाटलांना रामराम केला व घराकडे निघून आले.”

“अग मंगल आवरले का? शेताकडे जायची वेळ झाली. माझी भाकरी बांध बरं लवकर”

“अहो काय म्हणाले पाटील? मला दोन शब्द सांगा तरी.”

“काही नाही! उद्या देवळावर पंचासमोर शंकर दादाला बोलून घेऊ म्हणे. त्याच्या समोर पाळ्या लावून देऊ.”

“बरं झालं रे देवा…! पाटलांनी उद्याच बोलायचे ठरवले. शेतातील माल वाळून जायच्या अगोदर पाण्याची सोय झाली म्हणजे बरं.”

“अहो मी काय म्हणते! आजच्या दिवस रानात गेल्यावर शंकर भाऊजी सोबत काही वाकड तिकडं बोलू नका आणि पाण्याचा पण विषय करू नका. त्यांना घेऊ द्या पाणी आज पण. तुम्हाला एकट्याला पाहून ते परत भांडायला उठतील.”

“अग आता कशाला भांडायचे उद्या पाटलाकडून पाळ्या लावून घेऊ. आपण आपल्या पाळीत भिजवायचे. भांडण करून तो कुठे आपल्याला दबणार आहे. मी आज विहिरीवर जातच नाही तु काही काळजी करू नको आणि हो उद्या पाटील देवळावर शंकरला बोलावणार आहे कुणाला सांगू नको परत त्याच्या बायकोला माहीत झाले तर रात्रीला भांडण सुरू होईल.”

“नाही... नाही... मी कशाला कुणाला सांगू.”

“नाही म्हटलं! बोलता बोलता सहज सांगशील.”

“मी नाही कुणाला बोलत मला घरातच खुप कामं आहे. मी कशाला कोणाच्या दारावर जाऊन बसू.”

भाकर बांधलेली पिशवी घेऊन आबा शेतावर गेले. शेतात दिवसभर काम करतांना आबाचे मन लागत नव्हते. शेतातील हिरवंगार पीक पाण्यावाचून सुकलं होतं. माणसा सारखं पिकाला पण वेळेवर खत, पाणी मिळालं नाही तर ते खराब होतं. आबाला कधी मोटार सुरू करू व पिकाला पाणी देऊ असं झालं होतं. दिवसभर शेतात काम करून आबा रात्रीला घरी आले. मंगल सोबत गप्पा मारत जेवण केले व झोपी गेले.

            सकाळ झाली सूर्यकिरणांनी सगळीकडे प्रकाश पसरवला. चिमण्यांची चिव चिव सुरू झाली. आबा लगबगीने सकाळी लवकर उठले. आंघोळ करून मारुतीच्या देवळात जाऊन आले. दररोज सकाळी गावातील लोकं आंघोळ करून मारुतीच्या दर्शनाला येतात व मारुतीच्या देवळासमोर गप्पा मारत उभे राहतात. रोजच्या सवयी प्रमाणे आजही हळूहळू मंदिराजवळ गर्दी जमली. पाटील व बाकीचे चार पाच मध्यस्थी करणारी माणसं सुद्धा आली. पाटलांनी एका माणसाला शंकरला बोलवायला पाठवले. तेवढ्यात आबा देवळाजवळ आले. गावातील नेहमीची भांडण मिटवणारी पंच सुद्धा मंदिरावर जमा झाली. पाटील व गावातील चार पंच अशी ही पाच माणसं गावातील भांडण नेहमीच आपापसात मिटवत असे. गावातील भांडण वेशीच्या आतच मिटवायचे. गावातील भांडण वेशीच्या बाहेर नेऊन गावाचा अपमान कशाला करायचा अशी पाटलाची धारणा होती. त्यामुळे पाटील गावातील कुणाचेही भांडण गावातच मिटवत असे. पाटील देवळाजवळ आले म्हणजे, आज कुणाचा तरी न्यायनिवाडा आहे. देवळावर जमलेली माणसं आपापसात कुजबूज करू लागली. हळूहळू चांगलीच गर्दी जमली. पाटील गावातील माणसाशी गप्पा मारू लागले. गावाची चौकशी करू लागले.

“काय माधवराव कसं हाय पीक पाणी.”

“चांगलं आहे पाटील. निसर्गाची कृपा बरी आहे यावर्षी अजून तरी शेतात हिरवळ आहे.”

“माधवराव तुमचे मन फार समाधानी आहे त्यामुळे तुम्हाला सगळीकडे हिरवळ दिसते. तुमच्या सारखी वारकरी माणसं आम्हाला चांगली हिमंत देतात. पांडुरंगाची भक्ती तुम्हाला आयुष्यात काही कमी पडू देत नाही.”

पाटील, माधवराव, आबा व देवळासमोर जमलेली माणसं गावगाड्याच्या विचारात रमली होती. तेवढ्यात शंकर देवळासमोर येतो. गरम डोक्याचा शंकर मोठ्या तावातावात पाटलांशी बोलतो.

“काय पाटील…! कसा काय निरोप पाठवला.”

“कशाला जमवली येवढी गर्दी.”

“शंकरचा राग आवाजातून जाणवत होता. अगदी मोठमोठ्याने हात वारे करून बोलण्याची त्याची सवयच होती.”

“अहो शंकरराव सहज तुम्हाला भेटायला जमली मंडळी. तुम्ही गावचे प्रमुख शेतकरी आहात तुम्हाला सगळ्यांना भेटावं वाटले म्हणून निरोप पाठवला. काही चुकी तर नाही केली ना आम्ही.”

“तसं नाही पाटील मला शेतात पाणी द्यायला जायचं आहे. तुमच्या सारखी मोठी माणसं नाही आम्ही.”

शंकरचा बोलण्याचा ओघ लक्षात घेऊन पाटील स्पष्टच म्हणाले, “शंकरराव तुमचे धाकले बंधू आबासाहेब यांनी एक अडचण मांडली ती सोडवायला तुम्हाला बोलावलं आहे.” तुम्ही आधी शांतपणे ऐकून घ्या नंतर तुमचे मत मांडा. दोघांच्या सांगण्यावर आम्ही पंचमंडळी विचार करून निर्णय देऊ. आमच्या घरात चार पिढ्यापासून पाटीलकी या नात्याने आम्ही गावातील लोकांचे प्रश्न सोडवतो. आम्हाला काही लोकांच्या घरातील भांडणात रस नाही. आम्ही काही कुणाला भांडण करा म्हणून निरोप पाठवत नाही. पाटील स्पष्टपणे बोलू लागले. सगळी माणसं शांतपणे ऐकून घेत होती. पाटलासमोर कोणी विरोधात बोलत नसे कारण पाटलाशी विरोध घ्यायची गावात कोणाची हिंमत नव्हती. पैसा, प्रतिष्ठा, जमीन, घरदार, माणसं या सगळ्यां बाबतीत पाटील गावात पुढे होते. पंचक्रोशीत सर्वात श्रीमंत म्हणून पाटलाची ओळख होती परंतु पाटलाला कशाचाही गर्व नव्हता. प्रेमळ स्वभावाचे सर्वसामान्य माणसाप्रमाणे पाटील वागत असे. “आबा मांडा तुमची काय समस्या आहे.”

“पाटील माझ्या रानात सद्या गहू व ज्वारी पीक आहे. जेमतेम पाणी देऊन कसा बसा गहू ओंब्या भरायला लागला. पण आता पाणी नसल्यामुळे डोळ्या देखत गहू वाळून जाणार.”

“का? विहीर आटली का?”

“नाही... नाही... विहिरीला चांगले पाणी आहे अजून.”

“मग कसं काय गहू वाळणार म्हणता.”

“पाटील विहिरीतील दिवसभरातील पाणी बंधू उपसून घेतात. मी विहिरीवर मोटार सुरू करायला गेलो की मला अजून दोन-चार दिवस थांब असे सांगतात. त्यांचे मात्र सारखं शेतात पाणी सोडणे सुरू आहे. माझ्या शेतातील पीक वाळणार नाही यासाठी काहीतरी तोडगा काढा व मला शेतात पाणी देता येईल असा उपाय सुचवा.”

पाटील व देवळासमोर जमलेल्या माणसांनी आबाचे बोलणे ऐकून घेतले. आबासाहेब मुळात शांत, गरीब स्वभावाचा माणूस त्याच्या बोलण्यात लबाडी नसणार हे सगळ्यांचे लक्षात आले. “शंकरराव तुमचे यावर काय म्हणणे आहे ते सांगा.”

“पाटील सांगायचे काय यात! माझे जेव्हा पूर्ण रानाला पाणी देणं होईल त्यानंतर याने पाणी द्यावे. मी काय आबासाठी माझे पीक वाळत घालू.”

शंकर खूप दादागिरीच्या भाषेत बोलत होता. त्यानी मोठ्या चढ्या आवाजात बोलून स्वतःचा अधिकार जास्त असल्याचे दाखवून दिले. शंकरचा भांडखोर स्वभाव सगळ्यांना माहीत होता त्यामुळे शंकर किती खरं बोलणार आणि किती खोटं बोलणार याचा अंदाज पाटलांना अगोदरच होता.

हे बघा शंकरराव विहीर दोघांची सामूहिक आहे. विहिरीवर दोघांचा सारखा अधिकार आहे म्हणजे रानात पाणी सुद्धा दोघांना सारखे देता येणार. त्यामुळे मला असे वाटते विहिरीवरील पाणीसुद्धा अर्धे अर्धे वाटून घेतले पाहिजे म्हणजे दोघांचे पीक व्यवस्थित येईल. कुणाची पीकं वाळणार नाहीत. पाटलांनी स्वतःचे म्हणणे सगळ्यांसमोर मांडले. बाकीच्यांनी सुद्धा याचा विचार करून मत सांगा. असे आव्हान पाटलांनी केले. पंचमंडळी आपापसात चर्चा करू लागली. थोड्यावेळाने पाटील सांगतात आम्हा पंचांना असे वाटते तुम्ही दोघा भावांना विहिरीवर पाळ्या लावून द्याव्यात. ज्याने त्याने आपल्या पाळीत भिजवायचे म्हणजे वाद होणार नाही. दोघांचे पीक सुद्धा वाळणार नाही. पाटील बोलत असतानाच शंकर मध्येच म्हणाला, “पाटील माझे हिरवं शेत जास्त आहे. त्यामुळे मला पहिली चार दिवस लागतील. उरले तीन दिवस आबांनी घ्यायचे. मान्य असेल तर आत्ताच सांगा नाहीतर मी माझ्या पद्धतीने शेत भिजवायला सक्षम आहे.” मोठ्या अहंकारात शंकर पाटलांना उलटून बोलत होता. सगळ्यांना वाटले हा शंकर पाटलासोबत भांडण करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. पाटील शांतपणे म्हणाले, “शंकरराव आम्ही पंच मंडळी तुम्हाला शांतपणे समजावत आहोत. तुम्ही मात्र भांडणाचा तोरा दाखवत आहात. आम्ही न्यायाने बोलणारी माणसं असा चुकीचा न्याय करणार नाही. दोघांनाही साडेतीन साडेतीन दिवस येतील. तुम्ही मोठे आहात तर सुरुवातीची साडेतीन दिवस तुम्ही घ्या.”

“काय आबा बरोबर का?”

“पाटील तुम्ही एकदम बरोबर बोललात. परंतु त्यांचे शेत माझ्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे चार दिवस त्यांना व तीन दिवस मला असे करून टाका. फक्त ज्याच्या त्याच्या पाळीत त्यानेच भिजवायचे हे सर्वासमोर कबूल करून घ्या. पुन्हा आपआपसात दिवस बदला बदली नको.”

“ठीक आहे.”

“आबांच्या सांगण्यावरून शंकरला सुरुवातीचे चार दिवस व पुढचे तीन दिवस आबाचे दोघांनाही कबूल असेल तर हो सांगा.”

“आबांनी मोठ्या आवाजात हो सांगितले.”

शंकर काहीच न बोलतां नाक मुरडत, ओरडत तिथून झटक्याने निघून गेला. आंबानी पाटील व पंचाचे आभार मानले. मारुतीच्या देवळात जाऊन दर्शन घेतले व लगबगीने घरी निघून आला. मंगल आबाची कितीतरी वेळपासून वाट बघत होती. तिचे मन सारखं मंदिराकडे लागून होतं. आबाला येताच मंगल ने पाण्याचा तांब्या भरून दिला. आबाने देवळासमोर घडलेला सर्व प्रकार मंगलला सांगितला. मारुतीराया तुझी अशीच कृपा राहू दे. मंगलने हात जोडून देवाचे आभार मानून टाकले. मंगलची देवावर खूप श्रद्धा होती. देवळावर भांडण झाले नाही शंकर भाऊजींनी जास्त काही धिंगाणा घातला नाही ही देवाची कृपा झाली अशी मंगलची धारणा होती.

“आता मी काय म्हणते, चार दिवस विहिरीवर जाऊच नका.”

त्यांच्या पाळी मध्ये तिकडे पाय टाकू नका, चार दिवस संपले की आपण तीन दिवस विहिरीवर ये जा करायची. आता भांडणाला उगाच तोंड नको. शंकर भाऊजी, पोरगं व जाऊबाई अगोदरच चिडचिड करणार आहे. मंगलचा समजदारपणा आबाच्या संसारात शांतता भरून होता. बराच वेळ नवरा बायकोने गप्पा गेल्या जेवण आटोपून दोघेही शेतावर निघून गेली. मंगल दिवसभर उत्साहाने शेतात काम करत होती. खूप दिवसानंतर स्वतःचा हक्क मिळाल्यागत तीला आनंद झाला होता. बघता बघता तीन दिवस निघून गेले शंकरचा पाळीचा आजचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून मोटार, विहिर आबाच्या ताब्यात येणार होते. गेल्या दहा-बारा दिवसापासून पाण्याची आतुरतेने वाट पाहणारा गहू उद्या पाणी दिल्याने सुखावणार होता. सकाळची न्याहरी लवकर द्यावी लागेल म्हणून मंगलने रात्री झोपण्या अगोदर मटकी भिजू घातली. सकाळी लवकर उठायचा ध्यास मनात धरून झोपी गेली. सकाळी सकाळी ताबडं फुटल्याबरोबर मंगल उठली. अंगण झाडुन घेतले. शेणाचा सडा शिंपून रांगोळी काढली. सकाळी चुलीवर गरम गरम भाकरी व मटकीची मोट करून आबांचा डबा भरून ठेवला. आबा सुद्धा लवकर उठले. आंघोळ करून मारुतीच्या देवळात जाऊन आले. गरम गरम चहा पिऊन न्याहारीची पिशवी घेऊन रानात निघाले. आबा सरळ विहिरीवर गेले. न्याहरीची पिशवी झाडाला टांगून दिली. मोटार पेटीचे झाकण उघडून मोटार चालू केली. मोटार काही सुरू झाली नाही. एकदा दोनदा प्रयत्न करून झाल्यानंतर आबाचे लक्षात आले की लाईट गेलेली आहे. थोडा वेळ आबांनी वाट पाहिली परंतु लाईट काही आली नाही. न्याहरीची वेळ होऊन गेली दिवस माथ्यावर आला तरी आबांनी न्याहरी केली नव्हती. लाईट नसल्यामुळे आबांचे मन कशातच लागत नव्हते. थोड्यावेळाने शेजारच्या शेतातील वामनराव दिसले. शेतालगतच्या रस्ताच्या कडेने त्यांच्या रानात चालले होतो. त्यांची व आबाची नजरानजर झाली. त्यांनी आबाला बघुन बोलायला सुरुवात केली.

“काय आबासाहेब आज लवकरच रानात आले होते वाटतं.” “हो सकाळीच आलो होतो.”

“कसं काय? काय काम काढले.”

“काम काही नाही गव्हाला पाणी द्यायचे आहे.”

“आज पासून तुमची पाळी का? ”

“हो… आजपासून माझी पाळी आहे.”

“अरे...! रे...! कठीण आहे मग.”

“काय झाले.”

“तुम्हाला माहित नाही का?”

“काय?”

“आजपासून आठवडाभर दिवसभर लाईट नसणार फक्त रात्रीलाच लाईट असणार. आजपासून लाईटचे गॅप सुरू झाले.”

वामनरावांचे बोलणे आबांच्या काळजाला जाऊन भिडले. आबा हताश होऊन आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसले. मंगल दुपारचे जेवण घेऊन थेट विहिरीवर आली. आबा विहिरीवर काही दिसेना म्हणून तिने डोक्यावरील टोपली खाली ठेवली व गव्हाच्या शेतात आबांना शोधू लागली. तिला आबा आंब्याच्या झाडाखाली बसलेले दिसले. मंगलने लांबूनच आवाज दिला.

“अहो… चला की जेवायला ऊन डोक्यावर आले तुम्हाला भूक लागली असेल ना.”

आबांनी मंगलचे बोलणे ऐकून सुद्धा काही आवाज दिला नाही. मंगल जवळ गेली तर आबा झाडाला टेकून शांत बसून होते. आबाचा पडलेला चेहरा पाहून तिने विचारायला सुरुवात केली.

“काय झाले? इथे का येऊन बसले.”

“अग सकाळपासून लाईट नाही.”

“काय? लाईट नाही.” गावात तर लाईट होती.

“शेतातील लाईटचे गॅप आजपासून सुरु झाले. दिवसभर लाईट नसणार फक्त रात्री लाईट असणार.”

आता काय म्हणावे आपल्या नशिबाला. “नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न” तशी गत झाली. तुम्ही हाताश होऊ नका आज रात्री येऊ पाणी द्यायला. रात्रभरात खूप भिजवणे होते. एवढी काय काळजी करायची. तिन दिवस रातपाळी करता येईल.

“चला जेवायला भूक लागली असेल ना..!”

“मला भूक नाही मंगल.”

“का? न्याहरी उशिरा केली.”

“नाही.”

““मग भुक कशी काय नाही.”

“अग मी अजून न्याहरी सुद्धा केली नाही.”

“काय? अजून तुम्ही उपाशी आहात! उठा बघू पहिले, जेवायला चला.”

मंगलने हात धरून आबाला उठवले व विहीरीवर घेऊन गेली. दोघेही विहिरीच्या थारोळ्यात बसून जेवले. आज लवकर घरी जाऊ. रात्री शेतात यायचे म्हणजे तयारी करून यावे लागेल. चहाचे सामान, दिवाबत्ती, अंगावरचे कपडे कारण थंडी खूप आहे. तुम्ही काय करा रात्रीच्याला शेकोटी पेटवायला थोडी लाकडं जमा करून ठेवा. आंब्याच्या झाडाखाली शेकोटी करू म्हणजे आपल्याला शेकोटीच्या उजेडात बसता येईल. अंबानी मान हलवून होकार दिला. जेवण झाल्यावर आबांनी वाळलेली लाकडं व थोडेसे गवत झाडाच्या खाली नेऊन ठेवले व दोघेही घरी निघून आले. रातपाळीला जायचे पण लेकरं कोणाजवळ ठेवावे हा प्रश्न मंगलला पडला. आबांना सोबतीला नाही गेले तर लेकरांची फजिती होत नाही. परंतु नवरा रात्रीला एकटाच शेतात हे सुद्धा तिला चिंतेत टाकणारे होते. तिने लगेच लगबगीने रात्रीचा स्वयंपाक केला लेकरांना जवळ घेऊन सांगितले.

“आज आम्ही दोघे रात्रीला पाणी द्यायला शेतात जाणार आहोत. तुम्ही चौघे बहिण भाऊ घरात शांत झोपी जा. आम्ही सकाळी लवकर येऊ. तसं तुम्हाला आपल्या शेजारच्या शांता आजींना झोपायला सोबतीला यायला सांगते.”

“लेकरांनी मायेचा आदेश ऐकून माना हलवल्या.”

मंगलने घरातील सर्व सामान आवरून शेतातील पिशवी भरून ठेवली. जाता जाता शेजारच्या शांता मावशींना पोरांजवळ जायला सांगितले. शांता मावशी मंगलला स्वतःच्या आईसारखी होती. त्यामुळे घरची चिंता तिच्यावर सोडून ती आबा सोबत रानावर निघाली. गहू वेळेवर ओलावला तर चार दाणे घरात येतील. वर्षभर लेकरा बाळाची खायची सोय होईल. जातील तीन दिवस रात्रीचे निघून पण चांगला गहू घरात येई. मंगलच्या मनात विचार सुरू होते तोपर्यंत रानात पोहोचले सुद्धा. आबांनी शेकोटी रचली व अंधार घालवायचा म्हणून शेकोटीला माचीसची काडी लावली. वाळलेली लाकडं व गवतानी लगेच पेट घेतला. शेकोटी चांगलीच पेटली होती. तेवढ्यात विहिरीवरचा लाईट लागला.

“अहो… लाईट आली बर का…! करा पटकन मोटार चालू.” मंगल विहीरीकडे बघून म्हणाली.

आबांनी क्षणाचाही विलंबन न लावता पेटीजवळ जाऊन मोटार चे बटन दाबले. एकदाची मोटार सुरू झाली. काही क्षणातच पाणी दांडाला वाहू लागले. गव्हाच्या शेतात दांड पाडलेले होते. दुपारीच पाणी लावून ठेवलेले असल्यामुळे बरोबर पहिल्या दांडाने पाणी शेतात जाणे सुरू झाले. दिवसभर उपसा बंद असल्यामुळे विहीर सुद्धा पाण्याने चांगलीच भरली होती. आबांनी एकदा उजेड घेऊन पाणी बरोबर सुरू आहे का पाहिले व शेकोटीजवळ येऊन बसले. रात्रीच्याला रानात शेकोटीचाच आधार असतो. शेकोटीजवळ बसल्यावर आबा हळूच विचारतात.

“मंगल शांता मावशी आल्या असतील ना पोरांजवळ.”

“होय नक्की आल्या असतील.”

मी लय जीव तोडून सांगितले होते. शांता मावशी पण मला म्हणाल्या होत्या बिनफिकीर जाय पोरी मागची काळजी करू नको. मी जाईल लेकरा जवळ नीट ध्यान ठेवील तु काही काळजी करु नको. शेकोटी व गप्पा याच्या नादात रात्र सरत आली होती. विहिरीतील पाणी संपत आले होते. सकाळी लाईट जाईल म्हणून थांबून थांबून विहिरीतील सगळे पाणी उपसणे सुरू होते. रात्रभरात जवळजवळ अर्ध रान ओलेचिंब झाले होते. अजून दोन दिवसात तर गहू व काही ज्वारी सुद्धा भिजून होईल असा आबांचा अंदाज होता. सकाळ झाली बरोबर वेळेवर लाईट गेली. आबा व मंगल घराकडे निघाली. रात्रभर गहू भिजून मनाला थोडेफार का होईना समाधान वाटले होते. रस्त्याने जाताना आबा म्हणतात, “मंगल आता अजून दोन दिवस करावी लागते वाटतं रातपाळी.”

“जाऊ द्या देवाने आपल्या संसारात नाही आणली ना रातपाळी? बस झालं! अजून काय पाहिजे.”

देवाने साखरे सारखी गोड लेकरं दिली. कष्ट करायला दोन हात व दोन पाय दिले. तुमच्यासारखा जोडीदार दिला. आपल्या आयुष्यात हा तर आनंदाचा प्रकाश आहे यापेक्षा अजून काय पाहिजे. आज दिवसभर आराम करा म्हणजे पुन्हा रात्रभर जागरण करता येईल. आबा दिवसभर बिनफिकीर झोपुन होते. मंगलने घरातील कामे आवरली. पुन्हा रात्रीचे जेवण बनवुन लेकरांना स्वतःच्या हाताने पोटभर जेऊ घातले. आबा सोबत स्वतः जेवण केले. अंधार पडताच मंगल पिशवी घेऊन दारात आली. तेवढ्यात छोटी मुक्ता पळतच आली. आबाला बिलगुण म्हणाली, “बाबा आज पण शेतात चालले.”

“हो बाळा आज पण रातपाळी आहे.”

“मंगलने मुक्ताचे बोलने ऐकून आलेला हुंदका पदराच्या बोळ्याने दाबला व रस्त्याने चालू लागली.”

आज रातपाळीचा दुसरा दिवस होता. आबांनी शेतात आल्याबरोबर शेकोटी पेटवली. लाईटची वाट पाहत विहिरीकडे तोंड करून बसले. मंगल केव्हापासून शांत होती. रात्रीची भीषण शांतता मंगलच्या शांत असण्याने आणखीनच वाढली होती. किड्यांचा किर्रर्र…. आवाज स्पष्ट कानावर येत होता. मंगल एवढी शांत का बसलीस. गहू घरात जाईपर्यंत अजून किती रातपाळी करायला लागणार सांगता येत नाही. तू तर दुसऱ्याच दिवशी कंटाळली वाटतं.

“अहो…! तसं काही नाही.” मला कंटाळा वगैरे काही आला नाही. मुक्ताच्या बोलण्याने मन पिळवटून टाकलं. लेकरांचा काही गुन्हा नसतांना एकटं राहव लागतं.

“लेकरांना असं रात्री सोडून आपल्याला शेतात यावं लागतं हा गुन्हा कसा नाही म्हणते.”

“गरीबी हा गुन्हा आहेस की त्यांचा!”

“नशिबाने त्यांना गरीब कुटुंबात जन्माला घातले हा गुन्हाच आहे.”

“एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्माला आली असती तर असं मायबापांना सोडून रात्री बेरात्री एकटं राहावं लागलं नसतं.”

“अहो जातील आपले दिवस निघून. तुम्ही पण एवढे हताश होऊ नका. परिस्थिती काय कुणाची बसून राहत नाही. एक ना एक दिवस बदलते. आपण काही कायमचे शेतात रातपाळी करणार नाही. उद्याचा दिवस संपला की, परत रात्री शेतात कशाला येणार?”

“मंगल यावर्षी आपल्याला प्रत्येक पाळीत रातपाळी करावी लागणार. तेव्हा कुठे गहू व ज्वारी यांना घर दाखवता येईल.”

दोघांच्या गप्पांनी खूप वेळ पासून किर्रर्र…. आवाज करणारी किडे पण आता शांत झाली होती. लाईट आली. आबांनी जाऊन मोटर सुरू केली. पुन्हा एकदा गव्हाच्या शेतात पाणी सुरू झाले. रात्रभर गव्हाचे शेत पूर्ण भिजवून झाले होते. सकाळ होताच लाईट सुद्धा गेली होती. आबा व मंगल घराकडे निघाली. उद्याच्या रात्रीत ज्वारी भिजून टाकू या. म्हणजे आठवडाभर पिकांना पाण्याची गरज राहत नाही. आबा मंगलला सांगु लागले.

                      आबा व मंगल यांनी पुढील दोन पाळ्यामध्ये रातपाळी केली. गव्हाचे व ज्वारीचे शेत मोत्याच्या दाण्याप्रमाणे फुलले होते. संपूर्ण शेतात गहु व ज्वारीचे पीक दाण्यांनी भरले होते. हळूहळू दाणे वाळायला सुरुवात झाली. आता काही दिवसात ज्वारी, गहू काढायला येणार होती. मंगलने अनेक बायकांना अगोदरच कापणीसाठी सांगून ठेवले होते. काही दिवसांनी गहू, ज्वारीची कापणी सुरू झाली. चार दिवसात गव्हाचे शेत कापून झाले. पुढील चार दिवसात ज्वारीचे शेत कापून झाले. गहु व ज्वारी काढण्यासाठी आबांनी गावातील सावकाराचे मळणी यंत्र सांगून ठेवले. दोन दिवसांनी सकाळीच मळणी यंत्र शेतात आले. आबा पोत्याचं गाठोडं घेऊन सकाळीच शेतात आले. मंगलने मळयंत्राची पूजा केली. भाकरीचा तुकडा यंत्रावरुन ओवाळून फेकला. नारळ फोडून मारुतीला हात जोडून सांगितले. चांगली बरकत येऊ दे…! पहिल्या दळण्याचे जेवण तुझ्याच नावाने. मळयंत्र सुरू झाले. आबांनी पेंढ्या द्यायला सुरुवात केली. मळयंत्रावरील दादांनी गव्हाच्या पेंढ्या कोंबायला सुरुवात केली. मोत्या प्रमाणे पिवळे जरत दाणे मळयंत्रातून टोपल्यात पडू लागले. मंगलने मुठभर दाणे हातावर घेऊन पाहिले. अतिशय सुंदर अशी दाणे भरले होते. रातपाळी मुळे गव्हाला भरपुर पाणी मिळाले होते. त्यामुळे दाणा चांगलाच भरला होता. दुपारपर्यंत गहू व ज्वारीचे खळे पूर्ण झाले. आबांनी सोबत्याला बैलगाडी मागून ठेवलेली होती. ती पटकन जुपुन आणली व संध्याकाळपर्यंत चार खेपामध्ये दाणे घरी नेऊन टाकले. गव्हाणे व ज्वारीने सगळे घर भरले होते. लेकरांनी तर गव्हाच्या पोत्यावर उड्या मारून मारून पोती मोकळी केली होती. आबा रात्री थकून भागून घरी आले. मंगलने गरमागरम स्वयंपाक केला. आबा सगळ्या लेकरांना घेऊन जेवायला बसले. जेवता जेवता छोटी मुक्ता आबांना म्हणाली. “बाबा एवढे सारे गहू आपलेच आहे.”

“हो बाळा! हे सगळे गहू व ज्वारीचे पोते आपलेच आहे.”

“आपल्याला वर्षभर खायला लागतात ना!”

“हो….! सगळ्या लेकरांनी मोठ्या आवाजात होकार दिला.”

“बाबा तुम्ही व आईने रातपाळी केली म्हणून एवढे सारे गहू झाले.” मुक्ता बोबड्या भाषेत विचारत होती.

“हो बाळा”

“रातपाळी केली म्हणून येवढे मोठे गहू मिळाले बरं का मुक्ताबाई.”

“मंग बाबा पुढच्या वर्षी मी पण येणार आहे रातपाळीला!” मग आणखीन पोती वाढतील.

“बरं”

“पुढच्या वर्षीची रातपाळी माझी व मुक्ताची.”

आबाच्या घोषणेने मंगल व सगळी मुलं मोठमोठ्याने हसू लागली.


Thursday, 13 April 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत

डॉ बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर विचारवंत, समाज सुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडाजवळ असलेले आंबवडे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सपकाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबेडकरांचा जन्म झाला. रामजी सपकाळ हे फार उद्योगी व महत्त्वकांक्षी गृहस्थ होते. प्रथम सैन्यातील एका तुकडीत ते साधे सैनिक होते. कालांतराने ते लष्करी छावणीतील शाळेत मुख्याध्यापक झाले आणि सुभेदार, मेजर या पदापर्यंत पोहोचले. ते नाथपंथी असून त्यांनी रामायण, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा अभ्यास केला होता. ते स्वतः उत्तम वाचक, अभ्यासूवृत्तीचे चांगले विचारवंत होते. त्यामुळे बाबासाहेबांना आपल्या वडीलाकडून चांगले संस्कार मिळाले. सुसंस्कारित व शिक्षित वडील असल्यामुळे बाबासाहेबांच्या मनावर बालपणीच चांगले विचार, अभ्यास, शिक्षण अशा अनेक गोष्टी कोरल्या गेल्या. आंबेडकर सहा वर्षाचे असतानाच त्यांची आई भीमाबाई या मरण पावल्या. त्यामुळे बाबासाहेबांच्या आयुष्यातील आई नावाचे छत्र हरवले. त्यामुळे आंबेडकरांचे पुढील सर्व पालन पोषण त्यांचे वडील व आत्या मीराबाई यांनी केले. बाबासाहेबांना आई नाही याची जाणीव कधीही होऊ दिली नाही. रामजी आंबेडकर लक्षरातून निवृत्त झाल्यानंतर कुटुंबासह नोकरीसाठी साताऱ्यात राहण्यासाठी आले. त्यामुळे बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास झाले. सातारा येथील शाळेत शिक्षण घेत असताना बाबासाहेब शिक्षकांचे लाडके विद्यार्थी होते. लहानपणापासूनच हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता, नवीन शिकण्याची जिद्द बाबासाहेबांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे शाळेत प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती ते घेत असत. स्वतःच्या हुशारीमुळे शाळेतील आंबेडकर नावाच्या शिक्षकाचे ते लाडके विद्यार्थी बनले. बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबावडेकर होते हे आडनाव आंबेडकर नावाच्या शिक्षकांना आवडत नसे. म्हणून त्यांनी बाबासाहेबांना आंबेडकर हे नाव लावण्यास सांगितले आणि शाळेच्या दप्तरात तशी नोंद सुद्धा करून टाकली. तेव्हापासून बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव मिळाले. स्वतःच्या संस्कारामुळे व शिक्षण घेण्याच्या जिद्दीमुळे शिक्षकानी स्वतःचे आडनाव बाबासाहेबांना दिले. आंबेडकरांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. याच काळात बाबासाहेबांचे रमाबाई यांच्याशी लग्न झाले. लग्न झाले तरी बाबासाहेबांनी स्वतःचे शिक्षण थांबवले नाही. लग्नानंतरचे जीवन स्वतःच्या संसारात व्यतीत करण्यापेक्षा या समाजातील गोरगरीब दलित बांधवांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही खंत बाबासाहेबांना शांत बसु देत नव्हती. त्यामुळे बाबासाहेब स्वत:च्या संसारात न रमता त्यांनी स्वतःचे शिक्षण सुरू ठेवले. ते रमाबाईंना नेहमी सांगायचे माझे शिक्षण फक्त माझ्या पुरते मर्यादित न राहता ते या समाजातील गोरगरीब, दलित बांधवांच्या न्यायासाठी, हक्कासाठी कामी आले पाहिजे. यासाठी मी शिक्षण घेत आहे. माझ्या शिक्षणासाठी कितीही अडचणी आल्या, लोकांनी कितीही अडथळे आणले तरी माझे शिक्षण मी थांबवणार नाही. आणि म्हणूनच पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी बडोदे संस्थांची शिष्यवृत्ती मिळवली. व 1913 मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेस गेले. अमेरिकेतील कोलंबी या विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम ए व पीएचडी या पदव्या मिळविल्या. उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशात गेले होते तेव्हा त्यांना फार हालआपेक्षा भोगाव्या लागल्या. अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. आर्थिक अडचण, पुरेसे अन्नधान्य उपलब्ध नसल्यामुळे बाबासाहेबांना अर्ध्या पोटी राहावे लागत असे. कधीकधी दोनवेळा पोटभर अन्न मिळत नसे. तरी बाबासाहेब त्याची खंत न करता अभ्यास करत असायचे. ते स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत काढत असत. की मला अन्नाची भुक लागत नसुन मला ज्ञानाची भुक लागते. याठिकाणी मला भरपुर पोटभर ज्ञान मिळते. त्यामुळे मी जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करतो. याही परिस्थितीचा सामना करत त्यांनी स्वतःचे शिक्षण जिद्दीने सुरू ठेवले. बाबासाहेबांनी अनेक अडचणीचा सामना करून शिक्षण घेतले व सर्व शिक्षण क्रमात उत्तम असे यश संपादन केले. बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात अनेक अडथळे आले विद्यार्थी, शिक्षक, समाज वेळोवेळी अस्पृश्य म्हणून हिनावत होता. अस्पृश्यतेच्या नावाखाली बाबासाहेबांना पावला पावलावर मागे खेचले जात होते. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ असणारे अफाट ज्ञान यांना कुठेतरी खिळ घालण्याचा प्रयत्न अस्पृश्यतेच्या नावाखाली केला जात होता. अत्यंत हुशार व उच्चविद्याविभूषित असूनही अस्पृश्य जातीत जन्माला आल्यामुळे त्यांना आयुष्यात फार अपमान सोसावा लागला. अस्पृश्य जातीत जन्माला येणे हा काही गुन्हा नाही. त्यांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा, शिक्षण घेण्याचा, समाजाचा एक महत्त्वाचा घटक असण्याचा अधिकार आहे असे त्यांचे ठाम मत होते. अस्पृश्यतेच्या नावाखाली बाबासाहेबांना त्यांच्या शालेय जीवनात एक चांगला मित्र लाभला नाही. कारण अस्पृश्य असल्याने मुलं त्यांच्याशी मैत्री करत नव्हते. अशावेळी बाबासाहेबांनी निराश न होता पुस्तकाशी मैत्री केली. पुस्तकच खरा मित्र समजुन मिळेल ते पुस्तक वाचत गेले. यातून त्यांना अफाट ज्ञान प्राप्त होत गेले. स्वतः येवढेच त्यांचे पुस्तकावर प्रेम होते. आपण अस्पृश्य जातीत जन्माला आलो तरी उच्च जातीतील मुलांपेक्षा जास्त शिक्षण घ्यायचे ही त्यांची जिद्द होती. त्यांचे विचार सुद्धा खुप आधुनिक होते. अस्पृश्यतेच्या नावाखाली जो त्रास आपल्याला भोगावा लागला तो येणाऱ्या काळात कुणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी त्यांनी कार्य करायचे ठरवले होते. अस्पृश्य जातीतील प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे व त्यांच्या उद्धाराची व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे निर्मूलन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. आपल्या प्रतिज्ञाला अनुसरून त्यांनी स्वतःला या कामी सर्वस्वी वाहून घेतले होते. बाबासाहेब एक व्यक्ती नाही तर एक नवविचार आहे एक प्रेरणा आहे. आजची समाजाची, राज्याची, देशाची परिस्थिती पाहता आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खरच या देशाला खूप गरज आहे. भलेही बाबासाहेब आज या जगात प्रत्यक्षात पुन्हा वापस येऊ शकत नसतील. पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांचे कार्य, संविधान आज प्रत्यक्ष आपल्या समवेत आहे. आज प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी, प्रत्येक बाबतीत पुढे जाण्यासाठी बाबासाहेबांची शिकवण एक उत्तम प्रेरणा आहे. आज एकविसाव्या शतकात बाबासाहेब हे कुण्या एका धर्माचे, एका समाजाचे, एका प्रदेशाचे नाही तर संपूर्ण भारताचे एक प्रेरणास्थान आहे. समाजाने, या देशाने बाबासाहेबाना आपआपसात वाटणे म्हणजे त्यांच्या विचारांचा व कार्याचा तो अपमान होईल. आज बाबासाहेबांना जगाने स्वीकारले आहे. जगातील अनेक देशातील विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांचे विचार व कार्य मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. ही तर भारत देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा प्रत्येक नागरिकासाठी गर्व आहे. बाबासाहेब एक थोर विचारवंत, समाज सुधारक, अर्थतज्ञ, कायदातज्ञ, व दूरदृष्टी असणारे होते. त्यांनी कायदा, शिक्षण, नागरिकाचे अधिकार, देशाची अर्थव्यवस्था, अशा विविध क्षेत्रात भरीव काम केलेले आहे. स्वतः च्या अनेक ग्रंथात मौल्यवान विचार मांडलेले आहे. आज तेच विचार प्रत्येकाला प्रेरणा देत आहे. बाबासाहेबांची शिकवण प्रत्येकाने अमलात आणली तर स्वतःचा, कुटुंबाचा, राज्याचा, व देशाचा विकास होईल. 'शिका संघटित व्हा व संघर्ष करा' ही शिकवण आज प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे. बाबासाहेबांची जयंती दरवर्षी देशभरात उत्साहात साजरी होते. आज देशाला नवविचारांची गरज आहे. म्हणून बाबासाहेबांची जयंती विचारांनी साजरी व्हावी. त्यांचे विचार, कार्य आज तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येकाने ते फक्त ऐकून न घेता स्वतःच्या आचरणात आणली पाहिजे. भारत हा देश लोकशाही प्रणालीवर व संविधानावर चालणारा आहे. बाबासाहेबांचे संविधानातील विचार कायदा, कर्तव्य, प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाने संविधान वाचले पाहिजे संविधानाचा आदर केला पाहिजे. संविधान अंगीकारली पाहिजे तरच बाबासाहेबांची खरी जयंती साजरी होईल. समाजातील माणसांसाठी स्वतःचे जीवन व्यथित केले त्या महामानवाला त्यांच्या विचारांना व कार्याला विनम्र अभिवादन.

लेखक

राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजा

ता सिंदखेड राजा जि बुलढाणा

मो नं 9823425852

rajendrashelke2018@gmail.com



Sunday, 2 April 2023

आनंदाची गुढी

 आनंदाची गुढी

नुकताच गुढीपाडवा संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुढीपाडवा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिका प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, नवीन व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी, इत्यादी गोष्टी केल्या जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारली जाते. प्रत्येकजण हा दिवस जास्तीत जास्त आनंदी घालवण्याचा प्रयत्न करतात. गुढीपाडव्याचा दिवस एकदा मागे पडला की, नवीन आखलेले संकल्प परिपुर्ततेसाठी धावपळ सुरू होऊन जाते. दिवस उजाडल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू असते ती पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान व स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी. या सर्वांमध्ये माणूस एवढा व्यस्त होऊन जातो की, स्वतःचा आनंद हरवून बसतो. खदखदून हसायला टाईम नसतो. तसा प्रसंग सुद्धा निर्माण होत नाही. कारण पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान यासाठी ओढाताण होत राहते. या सर्वामध्ये सतत ताण-तणाव, शारीरिक धावपळ, मानसिक अस्वस्थता याशिवाय दुसरे काही सापडत नाही. जमिनीवर पाय ठेवून आभाळाएवढे स्वप्न पाहणारा माणूस जीवनात कितीही मिळवले तरी समाधानी होत नाही. इतरांच्या पेक्षा जास्त प्रगती, जास्त पैसा, जास्त प्रतिष्ठा यासाठी स्पर्धा करत राहायची ही भावना माणसाला खूप व्यस्त करून टाकते. व स्वतःच्या आनंदापासून स्वतःच्या जगण्यापासून दूर घेऊन जाते. जीवनात सर्वाधिक मौल्यवान स्वतःचे जीवन आहे. जन्माला आल्यापासून ते मृत्यूला सामोरे जाईपर्यंतचा काळ म्हणजे जीवन. जन्म आणि मृत्यू यामधील काळ आपण कसा जगतो. हे जीवन कुटुंब, शेजार, समाज, राष्ट्र यासाठी कितपत खर्च करतो यावर माणसाची खरी श्रीमंती ठरत असते. आयुष्यभर फक्त पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या मृगजळा मागे धावणे म्हणजे जीवन नाही. जीवनाची खरी श्रीमंती आनंदी जीवन जगणे होय. स्वतः बरोबर इतरांना आनंदी ठेवणे, इतरांना आनंद देणे होय. प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण येतात हा आनंदी क्षण मन भरून जगला पाहिजे. ओढ्याला खळखळून वाहणाऱ्या नितळ पाण्याप्रमाणे आनंदाचे झरे जीवनात सदैव वाहते ठेवले पाहिजे. आनंद कुठे विकत मिळत नाही किंवा आनंद कुणाकडून उधार घेता येत नाही. आनंद प्रत्येकाला आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, करत असलेल्या कामातून, आपल्या कष्टाच्या घामातून निर्माण करावा लागतो. आनंदी जीवन जगायला लागते ती फक्त सकारात्मक इच्छाशक्ती. जी सर्वांकडे असते फक्त काहीजण तीचा वापर करून भरभरून आनंदी जगतात. काही मात्र सकारात्मक इच्छाशक्तीचा वापर करत नाही किंवा स्वतःला एवढे व्यस्त करून टाकतात की त्यांना स्वतःला ओळखायला, जगायला वेळच मिळत नाही. स्वतःच्या हव्यासापोटी पाहिलेली मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. एकमेकांशी स्पर्धा करत असतात. या स्पर्धेमध्ये माणूस नकळतच कधीतरी इतरांच्या मागे पडतो, माघे राहतो. आणि मग या स्पर्धेत आपण माघे आहोत ही भावना त्याच्या मनाला सतत बोचत राहते. स्वतःची स्वप्न पूर्ण झाली नाही म्हणून माणूस हळूहळू नैराश्याकडे झुकला जातो. आयुष्यात आपल्याकडे काय आहे हे विसरून काय पाहिजे यासाठी तो नाहक परेशान होत राहतो. यातून आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा सोडून नसणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी झटत राहतो व त्या प्राप्त झाल्या नाही तर प्रचंड ताणतणावात, अस्वस्थतेत नैराश्यात जीवन जगतो. अशा अवस्थेत तो स्वतः जवळचा आनंद संपवून टाकतो. प्रत्येक दिवस सकाळी सुंदर प्रकाश घेऊन येतो आणि मावळताना अंधार पसरवून जातो. प्रकाश आणि अंधार हे चक्र ज्याप्रमाणे अखंड सुरू आहे. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख येत असते. ज्याप्रमाणे ऊन आणि सावली हा खेळ सुरू राहतो. त्याप्रमाणे कधी सुख तर कधी दुःख असा हा ऊन सावलीचा खेळ माणसाच्याही आयुष्यात सुरू राहतो. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक पावला सोबत येणारे सुख आणि दुःख यात सुद्धा माणसाला आनंदी राहता आले पाहिजे. कारण या जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही. त्यामुळे जीवनात आलेले सुख ही एक दिवस संपेल व दुःख सुद्धा एक दिवस नक्कीच संपेल. प्रत्येक दिवस हा आपल्या जीवनातील अमूल्य असा दिवस समजून तो आपण आनंदात घालवला पाहिजे. देहूचे महान संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात "आनंदाचे डोही आनंद तरंग | आनंद ची अंग आनंदाचें || सर्व जीवन आनंदीमय झाले पाहिजे. जीवनात आनंद सर्वत्र दरवळत राहिला पाहिजे. यावर्षी गुढीपाडव्यानिमित्त उभारलेली आनंदची गुढी येणाऱ्या वर्षभर सर्वांना आनंद देत राहो. लहान मुलांना खेळणारी बागडणारी आनंदी गुढी, शाळकरी मुलांना शिक्षणाची ज्ञानाची गुढी, नोकरदार व्यावसायिकांना प्रामाणिक कष्टाची गुढी, वयोवृद्ध नागरिकांना निरोगी आरोग्याची गुढी या वर्षात लाभदायक ठरू हीच अपेक्षा.


राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजा

ता. सिंदखेड राजा

जि बुलढाणा

मो नं 9823425852

Sunday, 19 March 2023

एकच मिशन जुनी पेन्शन

                  एकच मिशन जुनी पेन्शन


महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. संस्कार व संस्कृती यांच्या एकत्रित बळावर महाराष्ट्र सदैव वाटचाल करत आलेले प्रगतशील राज्य आहे. आज भारत देशाचा विचार केला तर इतर राज्यांच्या बरोबरीने महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. व्यवसाय, उद्योगधंदे, आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान या सगळ्यांमध्ये प्रगती झालेली दिसते. आज महाराष्ट्रात शेती, शिक्षण, आरोग्य, लघुउद्योग, यासारख्या अनेक गोष्टींना पायाभूत सुविधा आज उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील प्रगतीचा आलेख चढता आहे व येणाऱ्या काळात निश्चितच अधिक प्रगती होईल यात शंका नाही. भारतातील प्रगतशील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख होतो ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्राला अधिक प्रगतशील व गतिमान बनवण्यासाठी सरकार व प्रशासन खांद्याला खांदा लावून काम करत असते. परंतु महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून प्रशासनातील अनेक कर्मचारी कमालीचे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतून प्रशासनातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी 14 मार्च पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. या संपाचे प्रमुख कारण काय तर नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करणे होय. महाराष्ट्रात गेल्या 17 वर्षापासून सतत जुनी पेन्शनची मागणी होत आहे. ही मागणी होण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना म्हणजे  (महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना, शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत. अशा स्वरूपाचा शासन आदेश दिनांक 31 ऑक्टोबर 2005 रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला. त्या ऐवजी शासनाने असा निर्णय घेतला की, शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या निवृत्तीवेतन, योजने ऐवजी केंद्र शासनाच्या धर्तीवर, "नवीन परिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना" लागू केली. यामुळे एकाच कार्यालयात समान पदावर, सारखेच काम करणाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन व नवी पेन्शन असे दोन भेद निर्माण झाले. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात या नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध केला जातोय. या विरोधाचे प्रमुख कारण म्हणजे जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यामध्ये कमालीचा फरक आहे. सेवानिवृत्ती नंतरचे म्हातारपण सुरक्षित वाटत नाही. या फरक म्हणजे जुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कुठल्याही प्रकारची कपात केली जात नाही. यात जी.पी.एफ.सुविधा आहे. यातील काही रक्कम संकटाच्या वेळी कर्मचार्याला काढता येते. सेवाकाळात मृत्यू झाल्यास वारसास कुटुंब निवृत्तीवेतन मिळते. महागाई भत्त्यानुसार व वेतन आयोगानुसार पेन्शनची रक्कम वाढत जाते. यामध्ये शेअर बाजारात रक्कम गुंतवली जात नाही. शारीरिक विकलांगतेमुळे कर्मचारी निवृत्त झाल्यास वरील लाभ कर्मचाऱ्याला मिळतात. या उलट नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील 10% रक्कम दरमहा कपात केली जाते. यात जी.पी.एफ. सुविधा नाही यामुळे संकटकाळी रक्कम काढण्याचा प्रश्नच नाही. सेवाकाळात कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास वारसास कुटुंब निवृत्ती योजना लागू नाही. यामध्ये महागाई भत्त्यानुसार व वेतन आयोगानुसार पेन्शनची रक्कम वाढत नाही. सेवा काळात जमा झालेली रक्कम व निवृत्तीनंतरची जमा झालेली रक्कम यातील 40% रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. शेअर बाजारावर आधारीत पेन्शन योजना आहे. शारीरिक विकलांगतेमुळे कर्मचारी निवृत्त झाल्यास कसलाही लाभ मिळत नाही. अशा प्रकारे जुनी पेन्शन व नवी पेन्शनमध्ये प्रमुख फरक आहे. म्हणून 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लाभदायक व हमी पेन्शन योजना वाटत नाही. वयाच्या 35 ते 38 वर्षे प्रशासनात काम करून सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आर्थिक दृष्ट्या सक्षम नसेल तर या योजनेचा फायदा काय? अशा निर्माण झालेल्या प्रश्नामुळे कर्मचारी गेल्या 17 वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सातत्याने मागणी करत आहे. कर्मचारी गेली 17 वर्ष निवेदन आंदोलन, मोर्चा, मुंडन मोर्चा, साखळी उपोषण, एवढं सर्व करूनही शासनास जाग न आल्यामुळे शेवटी 18 लाख कर्मचाऱ्यांना संपाच हत्यार उपसावे लागले. परंतु सरकारमधील आजी-माजी अर्थमंत्री तथा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राज्याच्या आर्थिक स्थितीचे कारण सांगून जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही असे सांगत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या काळात वेतन व निवृत्तीवेतन यावरील खर्च राज्याला झेपावणारा नसेल असे कारण पुढे केले जात आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडून जाण्याची आभासी भिती निर्माण केली जात आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडण्याचे कारण फक्त कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन, वेतन, निवृत्तीवेतन असू शकत नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. राज्यावर येणारी नैसर्गिक संकटे, राज्याची आर्थिक गुंतवणूक व त्यावर मिळणारे आर्थिक उत्पादन कमी होणे, राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनेवर वाढलेला खर्च, राज्यातील पायाभूत सुविधेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी केलेली गुंतवणूक अशा स्वरूपाच्या अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. राज्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी वेतन कपात, निवृत्तीवेतन योजना बंद करणे, सरकारी नोकरीचे खाजगीकरण हे उपाय असू शकत नाही. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारला दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी गेल्या सतरा वर्षापासून सातत्याने जुन्या पेन्शनची मागणी का करत आहे याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. राज्यातील कर्मचारी प्रशासनात प्रामाणिक काम करून सरकारच्या धोरणावर असमाधानी असेल तर निश्चितच सरकारने यावर विचार केला पाहिजे. कर्मचारी संघटनांचा संप, त्यांच्या मागण्या यावर वेळोवेळी तोडगा काढला पाहिजे. कर्मचारी हा सरकार व प्रशासनातील मुख्य घटक आहे. राज्यशासनाच्या वतीने निघालेला प्रत्येक आदेश, सुचना परिपत्रक याची तंतोतंत अमलबजावणी करण्याचे काम कर्मचारी करत असतात. शासनाची प्रत्येक कल्याणकारी योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम कर्मचारी करत असतात. सर्वसामान्यांची सेवा करण्याचे व्रत कर्मचारी सेवा काळात बजावत असतात. वाडी-वस्त्यावर, गावागावात सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे, नागरिकांचे प्रश्न, समस्या शासन दरबारी मांडण्याचे काम सुद्धा कर्मचारी करत असतात. प्रत्येक कर्मचारी शासन सेवेत प्रत्येक दिवसी आठ, दहा प्रामाणिक काम करतात. म्हणूनच राज्याचा काढा सुरळीत सुरू राहतो. शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा राज्यातील कर्मचारी एक महत्त्वाचा घटक आहे. शेवटी कर्मचारी सुद्धा एक माणूस आहे. त्याला इतर नागरिकाप्रमाणे मन, भावना, कुटुंब, नाती-गोती आहेत. आणि म्हणूनच त्याच्याही काही गरजा असतात. मुलाबाळांचे शिक्षण, स्वतःचे हक्काचे एक घर, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ, निरोगी आरोग्य अशी छोटी-मोठी स्वप्न बाळगून कर्मचारी आपापल्या विभागात, कार्यालयात काम करत असतात. कर्मचारी वर्गाविषयी समाजात कमालीची अस्वस्थता दिसून येते. कर्मचारी यांचे पद, वेतन, भत्ते, शासकीय सुविधा यावर नेहमी चर्चा होते. परंतु या उलट कर्मचाऱ्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या कामाचा ताण, सरकार, समाज, राजकीय पुढारी यांच्या कामाबाबतीत वाढत्या अपेक्षा, ऑनलाइन ऑफलाइन कामे या सर्व गोष्टींची जबाबदारी त्याला अचूक पार पाडावी लागते. याबरोबरच शासन, प्रशासन, समाज, आणि कुटुंब अशा घटकांचा प्रवास कर्मचारी करत असतो. सरकारी, निमसरकारी कर्मचारी हा सुद्धा या राज्याचा नागरिक आहे आणि म्हणून राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. त्याला आवश्यक त्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. प्रशासनात काम करणारा कर्मचारी समाधानी असेल तर सर्वसामान्यांची कामे अधिक गतीने पूर्ण होतील. कर्मचारी उत्साहाने, आनंदाने प्रशासनातील सर्व कामे वेळेवर पूर्ण करतील. कर्मचारी वर्गाचे मानसिक आरोग्य उत्तम राहील. सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात सुद्धा शासनाने वेळोवेळी सकारात्मक विचार करायला पाहिजे. सरकार व प्रशासन ही राज्याच्या रथाची दोन चाके आहेत. ही जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत राज्याचा विकासाचा रथ अधिक गतीने पुढे सरकत जाईल. आणि म्हणून 14 मार्चपासून पुकारलेल्या बेमुदत संपावर शासनाने योग्य तो तोडगा काढावा. कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनची होत असलेली मागणी सकारात्मक असून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन ही शासनाची मेहेरबानी नसून कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक विनाखंड सेवेचा आणि त्याला म्हातारपण यासाठी जगण्यासाठी मिळण्याचा हक्क आहे हे विचारात घेतले पाहिजे.


राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजा

ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा

मो. नं 9823425852

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...