Thursday, 13 April 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत

डॉ बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर विचारवंत, समाज सुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडाजवळ असलेले आंबवडे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सपकाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबेडकरांचा जन्म झाला. रामजी सपकाळ हे फार उद्योगी व महत्त्वकांक्षी गृहस्थ होते. प्रथम सैन्यातील एका तुकडीत ते साधे सैनिक होते. कालांतराने ते लष्करी छावणीतील शाळेत मुख्याध्यापक झाले आणि सुभेदार, मेजर या पदापर्यंत पोहोचले. ते नाथपंथी असून त्यांनी रामायण, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा अभ्यास केला होता. ते स्वतः उत्तम वाचक, अभ्यासूवृत्तीचे चांगले विचारवंत होते. त्यामुळे बाबासाहेबांना आपल्या वडीलाकडून चांगले संस्कार मिळाले. सुसंस्कारित व शिक्षित वडील असल्यामुळे बाबासाहेबांच्या मनावर बालपणीच चांगले विचार, अभ्यास, शिक्षण अशा अनेक गोष्टी कोरल्या गेल्या. आंबेडकर सहा वर्षाचे असतानाच त्यांची आई भीमाबाई या मरण पावल्या. त्यामुळे बाबासाहेबांच्या आयुष्यातील आई नावाचे छत्र हरवले. त्यामुळे आंबेडकरांचे पुढील सर्व पालन पोषण त्यांचे वडील व आत्या मीराबाई यांनी केले. बाबासाहेबांना आई नाही याची जाणीव कधीही होऊ दिली नाही. रामजी आंबेडकर लक्षरातून निवृत्त झाल्यानंतर कुटुंबासह नोकरीसाठी साताऱ्यात राहण्यासाठी आले. त्यामुळे बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास झाले. सातारा येथील शाळेत शिक्षण घेत असताना बाबासाहेब शिक्षकांचे लाडके विद्यार्थी होते. लहानपणापासूनच हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता, नवीन शिकण्याची जिद्द बाबासाहेबांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे शाळेत प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती ते घेत असत. स्वतःच्या हुशारीमुळे शाळेतील आंबेडकर नावाच्या शिक्षकाचे ते लाडके विद्यार्थी बनले. बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबावडेकर होते हे आडनाव आंबेडकर नावाच्या शिक्षकांना आवडत नसे. म्हणून त्यांनी बाबासाहेबांना आंबेडकर हे नाव लावण्यास सांगितले आणि शाळेच्या दप्तरात तशी नोंद सुद्धा करून टाकली. तेव्हापासून बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव मिळाले. स्वतःच्या संस्कारामुळे व शिक्षण घेण्याच्या जिद्दीमुळे शिक्षकानी स्वतःचे आडनाव बाबासाहेबांना दिले. आंबेडकरांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. याच काळात बाबासाहेबांचे रमाबाई यांच्याशी लग्न झाले. लग्न झाले तरी बाबासाहेबांनी स्वतःचे शिक्षण थांबवले नाही. लग्नानंतरचे जीवन स्वतःच्या संसारात व्यतीत करण्यापेक्षा या समाजातील गोरगरीब दलित बांधवांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही खंत बाबासाहेबांना शांत बसु देत नव्हती. त्यामुळे बाबासाहेब स्वत:च्या संसारात न रमता त्यांनी स्वतःचे शिक्षण सुरू ठेवले. ते रमाबाईंना नेहमी सांगायचे माझे शिक्षण फक्त माझ्या पुरते मर्यादित न राहता ते या समाजातील गोरगरीब, दलित बांधवांच्या न्यायासाठी, हक्कासाठी कामी आले पाहिजे. यासाठी मी शिक्षण घेत आहे. माझ्या शिक्षणासाठी कितीही अडचणी आल्या, लोकांनी कितीही अडथळे आणले तरी माझे शिक्षण मी थांबवणार नाही. आणि म्हणूनच पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी बडोदे संस्थांची शिष्यवृत्ती मिळवली. व 1913 मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेस गेले. अमेरिकेतील कोलंबी या विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम ए व पीएचडी या पदव्या मिळविल्या. उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशात गेले होते तेव्हा त्यांना फार हालआपेक्षा भोगाव्या लागल्या. अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. आर्थिक अडचण, पुरेसे अन्नधान्य उपलब्ध नसल्यामुळे बाबासाहेबांना अर्ध्या पोटी राहावे लागत असे. कधीकधी दोनवेळा पोटभर अन्न मिळत नसे. तरी बाबासाहेब त्याची खंत न करता अभ्यास करत असायचे. ते स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत काढत असत. की मला अन्नाची भुक लागत नसुन मला ज्ञानाची भुक लागते. याठिकाणी मला भरपुर पोटभर ज्ञान मिळते. त्यामुळे मी जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करतो. याही परिस्थितीचा सामना करत त्यांनी स्वतःचे शिक्षण जिद्दीने सुरू ठेवले. बाबासाहेबांनी अनेक अडचणीचा सामना करून शिक्षण घेतले व सर्व शिक्षण क्रमात उत्तम असे यश संपादन केले. बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात अनेक अडथळे आले विद्यार्थी, शिक्षक, समाज वेळोवेळी अस्पृश्य म्हणून हिनावत होता. अस्पृश्यतेच्या नावाखाली बाबासाहेबांना पावला पावलावर मागे खेचले जात होते. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ असणारे अफाट ज्ञान यांना कुठेतरी खिळ घालण्याचा प्रयत्न अस्पृश्यतेच्या नावाखाली केला जात होता. अत्यंत हुशार व उच्चविद्याविभूषित असूनही अस्पृश्य जातीत जन्माला आल्यामुळे त्यांना आयुष्यात फार अपमान सोसावा लागला. अस्पृश्य जातीत जन्माला येणे हा काही गुन्हा नाही. त्यांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा, शिक्षण घेण्याचा, समाजाचा एक महत्त्वाचा घटक असण्याचा अधिकार आहे असे त्यांचे ठाम मत होते. अस्पृश्यतेच्या नावाखाली बाबासाहेबांना त्यांच्या शालेय जीवनात एक चांगला मित्र लाभला नाही. कारण अस्पृश्य असल्याने मुलं त्यांच्याशी मैत्री करत नव्हते. अशावेळी बाबासाहेबांनी निराश न होता पुस्तकाशी मैत्री केली. पुस्तकच खरा मित्र समजुन मिळेल ते पुस्तक वाचत गेले. यातून त्यांना अफाट ज्ञान प्राप्त होत गेले. स्वतः येवढेच त्यांचे पुस्तकावर प्रेम होते. आपण अस्पृश्य जातीत जन्माला आलो तरी उच्च जातीतील मुलांपेक्षा जास्त शिक्षण घ्यायचे ही त्यांची जिद्द होती. त्यांचे विचार सुद्धा खुप आधुनिक होते. अस्पृश्यतेच्या नावाखाली जो त्रास आपल्याला भोगावा लागला तो येणाऱ्या काळात कुणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी त्यांनी कार्य करायचे ठरवले होते. अस्पृश्य जातीतील प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे व त्यांच्या उद्धाराची व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे निर्मूलन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. आपल्या प्रतिज्ञाला अनुसरून त्यांनी स्वतःला या कामी सर्वस्वी वाहून घेतले होते. बाबासाहेब एक व्यक्ती नाही तर एक नवविचार आहे एक प्रेरणा आहे. आजची समाजाची, राज्याची, देशाची परिस्थिती पाहता आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खरच या देशाला खूप गरज आहे. भलेही बाबासाहेब आज या जगात प्रत्यक्षात पुन्हा वापस येऊ शकत नसतील. पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांचे कार्य, संविधान आज प्रत्यक्ष आपल्या समवेत आहे. आज प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी, प्रत्येक बाबतीत पुढे जाण्यासाठी बाबासाहेबांची शिकवण एक उत्तम प्रेरणा आहे. आज एकविसाव्या शतकात बाबासाहेब हे कुण्या एका धर्माचे, एका समाजाचे, एका प्रदेशाचे नाही तर संपूर्ण भारताचे एक प्रेरणास्थान आहे. समाजाने, या देशाने बाबासाहेबाना आपआपसात वाटणे म्हणजे त्यांच्या विचारांचा व कार्याचा तो अपमान होईल. आज बाबासाहेबांना जगाने स्वीकारले आहे. जगातील अनेक देशातील विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांचे विचार व कार्य मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. ही तर भारत देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा प्रत्येक नागरिकासाठी गर्व आहे. बाबासाहेब एक थोर विचारवंत, समाज सुधारक, अर्थतज्ञ, कायदातज्ञ, व दूरदृष्टी असणारे होते. त्यांनी कायदा, शिक्षण, नागरिकाचे अधिकार, देशाची अर्थव्यवस्था, अशा विविध क्षेत्रात भरीव काम केलेले आहे. स्वतः च्या अनेक ग्रंथात मौल्यवान विचार मांडलेले आहे. आज तेच विचार प्रत्येकाला प्रेरणा देत आहे. बाबासाहेबांची शिकवण प्रत्येकाने अमलात आणली तर स्वतःचा, कुटुंबाचा, राज्याचा, व देशाचा विकास होईल. 'शिका संघटित व्हा व संघर्ष करा' ही शिकवण आज प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे. बाबासाहेबांची जयंती दरवर्षी देशभरात उत्साहात साजरी होते. आज देशाला नवविचारांची गरज आहे. म्हणून बाबासाहेबांची जयंती विचारांनी साजरी व्हावी. त्यांचे विचार, कार्य आज तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येकाने ते फक्त ऐकून न घेता स्वतःच्या आचरणात आणली पाहिजे. भारत हा देश लोकशाही प्रणालीवर व संविधानावर चालणारा आहे. बाबासाहेबांचे संविधानातील विचार कायदा, कर्तव्य, प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाने संविधान वाचले पाहिजे संविधानाचा आदर केला पाहिजे. संविधान अंगीकारली पाहिजे तरच बाबासाहेबांची खरी जयंती साजरी होईल. समाजातील माणसांसाठी स्वतःचे जीवन व्यथित केले त्या महामानवाला त्यांच्या विचारांना व कार्याला विनम्र अभिवादन.

लेखक

राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजा

ता सिंदखेड राजा जि बुलढाणा

मो नं 9823425852

rajendrashelke2018@gmail.com



Sunday, 2 April 2023

आनंदाची गुढी

 आनंदाची गुढी

नुकताच गुढीपाडवा संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुढीपाडवा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिका प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, नवीन व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी, इत्यादी गोष्टी केल्या जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारली जाते. प्रत्येकजण हा दिवस जास्तीत जास्त आनंदी घालवण्याचा प्रयत्न करतात. गुढीपाडव्याचा दिवस एकदा मागे पडला की, नवीन आखलेले संकल्प परिपुर्ततेसाठी धावपळ सुरू होऊन जाते. दिवस उजाडल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू असते ती पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान व स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी. या सर्वांमध्ये माणूस एवढा व्यस्त होऊन जातो की, स्वतःचा आनंद हरवून बसतो. खदखदून हसायला टाईम नसतो. तसा प्रसंग सुद्धा निर्माण होत नाही. कारण पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान यासाठी ओढाताण होत राहते. या सर्वामध्ये सतत ताण-तणाव, शारीरिक धावपळ, मानसिक अस्वस्थता याशिवाय दुसरे काही सापडत नाही. जमिनीवर पाय ठेवून आभाळाएवढे स्वप्न पाहणारा माणूस जीवनात कितीही मिळवले तरी समाधानी होत नाही. इतरांच्या पेक्षा जास्त प्रगती, जास्त पैसा, जास्त प्रतिष्ठा यासाठी स्पर्धा करत राहायची ही भावना माणसाला खूप व्यस्त करून टाकते. व स्वतःच्या आनंदापासून स्वतःच्या जगण्यापासून दूर घेऊन जाते. जीवनात सर्वाधिक मौल्यवान स्वतःचे जीवन आहे. जन्माला आल्यापासून ते मृत्यूला सामोरे जाईपर्यंतचा काळ म्हणजे जीवन. जन्म आणि मृत्यू यामधील काळ आपण कसा जगतो. हे जीवन कुटुंब, शेजार, समाज, राष्ट्र यासाठी कितपत खर्च करतो यावर माणसाची खरी श्रीमंती ठरत असते. आयुष्यभर फक्त पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या मृगजळा मागे धावणे म्हणजे जीवन नाही. जीवनाची खरी श्रीमंती आनंदी जीवन जगणे होय. स्वतः बरोबर इतरांना आनंदी ठेवणे, इतरांना आनंद देणे होय. प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण येतात हा आनंदी क्षण मन भरून जगला पाहिजे. ओढ्याला खळखळून वाहणाऱ्या नितळ पाण्याप्रमाणे आनंदाचे झरे जीवनात सदैव वाहते ठेवले पाहिजे. आनंद कुठे विकत मिळत नाही किंवा आनंद कुणाकडून उधार घेता येत नाही. आनंद प्रत्येकाला आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, करत असलेल्या कामातून, आपल्या कष्टाच्या घामातून निर्माण करावा लागतो. आनंदी जीवन जगायला लागते ती फक्त सकारात्मक इच्छाशक्ती. जी सर्वांकडे असते फक्त काहीजण तीचा वापर करून भरभरून आनंदी जगतात. काही मात्र सकारात्मक इच्छाशक्तीचा वापर करत नाही किंवा स्वतःला एवढे व्यस्त करून टाकतात की त्यांना स्वतःला ओळखायला, जगायला वेळच मिळत नाही. स्वतःच्या हव्यासापोटी पाहिलेली मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. एकमेकांशी स्पर्धा करत असतात. या स्पर्धेमध्ये माणूस नकळतच कधीतरी इतरांच्या मागे पडतो, माघे राहतो. आणि मग या स्पर्धेत आपण माघे आहोत ही भावना त्याच्या मनाला सतत बोचत राहते. स्वतःची स्वप्न पूर्ण झाली नाही म्हणून माणूस हळूहळू नैराश्याकडे झुकला जातो. आयुष्यात आपल्याकडे काय आहे हे विसरून काय पाहिजे यासाठी तो नाहक परेशान होत राहतो. यातून आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा सोडून नसणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी झटत राहतो व त्या प्राप्त झाल्या नाही तर प्रचंड ताणतणावात, अस्वस्थतेत नैराश्यात जीवन जगतो. अशा अवस्थेत तो स्वतः जवळचा आनंद संपवून टाकतो. प्रत्येक दिवस सकाळी सुंदर प्रकाश घेऊन येतो आणि मावळताना अंधार पसरवून जातो. प्रकाश आणि अंधार हे चक्र ज्याप्रमाणे अखंड सुरू आहे. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख येत असते. ज्याप्रमाणे ऊन आणि सावली हा खेळ सुरू राहतो. त्याप्रमाणे कधी सुख तर कधी दुःख असा हा ऊन सावलीचा खेळ माणसाच्याही आयुष्यात सुरू राहतो. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक पावला सोबत येणारे सुख आणि दुःख यात सुद्धा माणसाला आनंदी राहता आले पाहिजे. कारण या जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही. त्यामुळे जीवनात आलेले सुख ही एक दिवस संपेल व दुःख सुद्धा एक दिवस नक्कीच संपेल. प्रत्येक दिवस हा आपल्या जीवनातील अमूल्य असा दिवस समजून तो आपण आनंदात घालवला पाहिजे. देहूचे महान संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात "आनंदाचे डोही आनंद तरंग | आनंद ची अंग आनंदाचें || सर्व जीवन आनंदीमय झाले पाहिजे. जीवनात आनंद सर्वत्र दरवळत राहिला पाहिजे. यावर्षी गुढीपाडव्यानिमित्त उभारलेली आनंदची गुढी येणाऱ्या वर्षभर सर्वांना आनंद देत राहो. लहान मुलांना खेळणारी बागडणारी आनंदी गुढी, शाळकरी मुलांना शिक्षणाची ज्ञानाची गुढी, नोकरदार व्यावसायिकांना प्रामाणिक कष्टाची गुढी, वयोवृद्ध नागरिकांना निरोगी आरोग्याची गुढी या वर्षात लाभदायक ठरू हीच अपेक्षा.


राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजा

ता. सिंदखेड राजा

जि बुलढाणा

मो नं 9823425852

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...