Wednesday, 3 January 2024

नवीन वर्ष

 नवीन वर्ष

बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले
पानं मात्र बाराच
प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या
पानं ही नेहमी सारखीच
पण
प्रत्येक पानावर संकल्प मात्र नवे
नवीन आशा, नवी स्वप्न, क्षितिजाकडे
भरारी घेण्याची नवी जिद्द


पुन्हा तेच कष्ट, तीच उमेद
घामाच्या प्रामाणिकपणाची ओळख ही तीच
यश अपयशाची शिदोरी सोबत घेऊन
वाटचाल पुन्हा सुरू


जुन्या आठवणींची पुन्हा नवीन खुणगाट बांधू
नवीन वर्षाचे प्रत्येक पानं
नवीन आठवणींनी भरू

©®राजेंद्र प्रल्हाद शेळके

Sunday, 11 June 2023

लघुकथा- रातपाळी

लघुकथा:- रातपाळी

            आबा शेतातून लगबगीने घरी आले. गडबडीने पायावर दोन तांबे ओतून चौकटीतून आत आले व खांबाला टेकून बसले. कसा बसा वेळ काढून पाठीला टेका लावून आबा निवांत बसले असे मंगलला वाटले. तीन पोरांची माय होऊन सुद्धा मंगलला आबांचा स्वभाव कळाला नव्हता.

“अहो... चहा घेता का कपभर.”

“अहो... मी काय म्हणते! चहा घेता का कपभर.”

“करत असाल तर घेतो.” खांबाला टेकून बसलेले आबा हळू आवाजात म्हणाले.

मंगलने चहा उकळून कपबशी भरून आबांना दिला. गुळाचा गोड चहा आबांना आज गोड लागला नाही. चहा घेऊन आबा डोक्याला हात लावून विचार करू लागले. शेतात घडलेला प्रकार आबांच्या मनात सारखा घोळत होता. शेतात उभं असलेलं हिरवंगार पीक पाण्या वाचून सुखतया. लेकरागत जीव लावत लहानचं मोठ करायचं आणि हाता तोंडाशी आलेल पीक डोळ्यादेखत गमवायचं हे आबाच्या मनाला पटत नव्हतं. पण करणार तरी काय? पाण्यासाठी एकच विहीर आहे. ती पण दोघांची मिळून सामुहिक. हिवाळ भरणी आली की, तिच्या मागे हात धुवून लागतात. ती तरी किती दिवस पाणी देत राहणार. तिच्या पोटात थोडेसे पाणी आले की, उपसायची घाई होते. शेतातील हिरवं पीक आणि विहीर या दोघांच्या काळजीने आबा डोक्याला हात लावून बसले होते.

“अहो…! सांजवेळेला डोक्याला का हात लावून बसलात.” “डोक्याला हात लावून नको तर काय करू! आता वेळच तशी आली मी तरी काय करू.”

“म्हणजे...! काय झालं ते स्पष्ट सांगा की.”

“लय आडेवेढे घेत नका बोलू. तुम्ही सांगितल्या बीगर मला कळणार तरी कसं.”

“आज शेतावर भांडण झालं.”

“काय...? भांडण! आणि कशासाठी”

“विहिरीतील पाण्यासाठी.”

“कुणासोबत….! तरी म्हटलं मघापासून काय विचारात पडलात.”

“शंकर दादा सोबत”

“शंकर भाऊजी सोबत.”

“बापरे…! या माणसाला म्हणावं तरी काय?”

“शेतातील भूतं निव्वळ ही माणसं.”

“काळ्या मातीशी इमान सोडून निव्वळ पैशासाठी हपालेली, मस्ताडलेली ही जगंली माणसं हाय. भाऊबंदकी झाली म्हणून नुसतं भांडण करत राहायचं येवढाच उद्योग येतो त्यांना.”

“कोण कोण होतं परत विहिरीवर.”

“शंकर दादा, वहिनी व गण्या.”

“तुम्हाला कशापायी भांडले ते आज.”

तुम्ही ऐकटे या लोकांसोबत कशाला भांडत बसले. उद्या भांडणात त्यांनी तुम्हाला काही मारहाण केली तर? ही हैवान माणसं आधीच आपल्या जीवावर उठलेली आहे. त्यांना तुमच्या जीवापेक्षा शेत महत्त्वाचं आहे. कधी पण तुम्हाला एकटे पाहून ते जोरावर येतात. त्यांना लय मस्ती आली हाय. गावात दुसऱ्या कुणासोबत टक्कर घ्या म्हणावं. मग कसा प्रसाद मिळतो तर. उगाच एकट्याला पाहून जोर काढत असतात. आपल्या वाट्याला आलेलं सुद्धा नीट खाऊ देत नाही. या लोकापायी गाव सोडून जायची वेळ आली आपल्याला.

“अग मगंल हळू बोल की, किती चिडशील अजून. नुसतं चिडुन काही रानात पाणी येणार नाही.” आबा मंगलला समजावून लागले.

“अहो मग काय भांडुण पाणी येणार आहे. गावातील चार माणसं गोळा करा आणि पाळ्या लावून घ्या. आपल्या पाळीत आपण शेताला पाणी देत जाऊ.”

“मला पण तेच वाटतं. नेहमीच्या भांडणावर एकदाच तोडगा काढावा. पाळ्या लावून घेतल्या म्हणजे आडकाठी राहत नाही. आपण आपल्या दिवसाला मोटर सुरू करायची आणि शेतात पाणी सोडायचे. बाकीच्या दिवशी तसेही आपल्याला पाण्याची गरज नाही. उद्या सकाळी मारुतीच्या देवळावर गावातील चार पंचांना जमा करून विषय कानावर घालतो. चार लोक काढतीलच काहीतरी तोडगा.”

“पण ही आगाव माणसं आली पाहिजे की पंचासमोर…! नाही तर लपवतील काळं तोंड कुठं तरी? तसही चार लोकात उठ बैस करायची सवय नाही त्यांना. पंचांसमोर गरीब गाय व्हायला आवडणार नाही. अंगातील रंग भांडणातून ओकल्या शिवाय त्यांची मस्ती जिरणार नाही.”

“पंचासमोर आपली कैफीयत तर मांडू. ते ऐकून घेतील व बोलावतील शंकर दादा व गण्याला. तु उगाच मनाला ताप लावून घेऊ नको.”

या लोकांना काही फरक पडत नाही हे गिधाडं आहे. भूक लागल्यावर माणसाची लचके तोडायला मागे पुढे पाहत नाही. श्रीमंतीची भूक त्यांना कधी समाधानी करत नाही व शांत सुद्धा बसू देत नाही. स्वार्थासाठी नातीगोती कळत नाही. मंगल व आबा खूप वेळ गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात शेजारच्या चुलत सासूबाईंनी आवाज दिला.

“काय मंगल स्वयंपाक झाला वाटतं. त्यामुळेच नवरा-बायको येवढे गप्पांमध्ये रमले.”

“नाही… नाही… आत्याबाई स्वयंपाक बाकी आहे अजून. सहजच गप्पा मारत बसलो. लेकरं बाहेर खेळायला गेलीत. घर शांत झालं की, अधुन मधुन बोलायचं. शेवटी आपल्या नवऱ्यासोबत आपणच बोलणार की? बरं काय म्हणता आत्या.”

“काय नाही मला वाटीभर डाळ पाहिजे उसनी. नवी केली की देईल परत.”

“बरं…! म्हणून मंगल घरात गेली व एक वाटीभर डाळ घेऊन आली.”

“आत्याने डाळीची वाटी घेतली व घरातून बाहेर पडल्या.”

“मंगल तुला कितीदा हळू बोल म्हटले होते. म्हातारीने आपल्या गप्पा ऐकल्या वाटतं.” आबा हळु स्वरात मंगलकडे बघून बोलू लागले.

“नाही.. नाही..”

“म्हातारी कशाला आपल्या गप्पा ऐकेल.”

“अग त्यांची पण विहीर आटली ना..! त्यांना अधुन मधुन शंकर दादा कडून पाणी घेता येते ना. पाळ्या लागल्यावर त्यांचा मेळ लागत नाही ना भिजवायला.”

“ऐकू द्या. ऐकलं तर! मी काय त्यांच्या बापाला घाबरत नाही. तश्या ही त्या लय खडूस आहे. सारखं तोंड घालत असत्या कुणाच्या ना कुणाच्या घरात.”

“अगं पण मी तुला हळू बोल सांगतो पण तु ऐकतेच कुठे?”

“अहो..! मी काही त्यांना मूळ घेऊन गेले नव्हते की, चला आत्याबाई आमच्या घरी गप्पा ऐकायला. त्यांना सवयच आहे इथे तिथे तोंड खुपसायची.”

“बस करा मंगलबाई तुमच्या रागाचा तोरा! एवढ्या रागा रागात चुलीजवळ गेल्या तर आपोआप चुल पेटेल. आबांनी रागाचा विषय काढून चुल पेटवायचा इशारा देऊन टाकला.”

आबाचे बोलणे मंगलच्या लक्षात आले. मंगल पटकन उठून चुलीजवळ गेली व स्वयंपाक करू लागली. आबा उठून अंगणात येऊन लेकरांना शोधू लागले. लेकरं गल्लीत बाकीच्या लेकरांमध्ये खेळण्यात गुंग होती. लेकरांना आवाज देऊन घरात घेऊन गेले. स्वयंपाक झाल्यावर आबा व मुलांनी पोटभर जेवण केले. थोडावेळ मुलांनी आबासोबत बडबड केली व शांत झोपी गेली. आबांना मात्र झोप लागत नव्हती कुस बदलून बदलून कंटाळा आला होता पण डोळे मिटायला तयार नव्हते. डोक्यात विचारांचे काहूर लय वेळ घुमत राहिले. आबांना कधी झोप लागली कळले सुद्धा नाही.

            सकाळ होताच आबा आंघोळ आटोपुन पाटलाच्या घरी गेले. पाटलांना घडलेला प्रकार सांगितला. “पाटील तुम्हाला हात जोडून विनंती आहे एवढा प्रश्न मिटवून द्या.” पाटील खूप समजदार माणूस होते. पाटलांनी सुद्धा आबांना समजावून सांगितले. भांडणात काही पडले नाही. आपसात पाण्याचा प्रश्न मिटवायचा असेल तर पाळ्या लावून टाकू़. शेताला पाणी भेटले बस झाले. कुठे अंगातील गर्मी दाखवायची ती पण आपल्या रक्ताच्या माणसांना. तसं पाहायला गेलं तर शंकर काही वाईट माणूस नाही पण त्याला पैशाची लय हाव आहे. भाऊबंदकीत फक्त आपणच श्रीमंत झालं पाहिजे असं वाटतं त्याला आणि त्यातल्या त्यात आबा तुमचा स्वभाव झाला गरीब त्यामुळे तो अधिकच गुरगुर करतो. तुमच्या ठिकाणी एखादा दुसरा माणूस असता तर त्याला आतापर्यंत हाताखालून काढला असता तेव्हा त्याची अक्कल ताळ्यावर आली असती.

“ते बरोबर आहे पाटील. पण माझी लेकरं लहान आहे. मला त्याच्यासोबत भांडण करणे शक्य नाही. एकमेकांशी मारहाण करून पोलीस कैफीयत करायची व कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या हे माझ्या मनाला पटत नाही. वरीस दोन वरीस कसंतरी या विहिरीवर भागवतो. पिकपाणी बरं झालं दोन पैसे माझ्याजवळ जमा झाले की, माझी मी एक नवीन विहीर खोदून घेतो म्हणजे नेहमीची कटकट संपून जाईल.”

“आबा येवढे नका जीवाला लावून घेऊ. काढू आपण उपाय काहीतरी काय काळजी करू नका. उद्या सकाळी मारुतीच्या देवळावर शंकरला बोलावून घेऊ. तुम्ही पण या आम्ही पंच ठरवू काय ते. गावातील रीतभात पाळायला लागेल. गावापेक्षा कोणी मोठा नसतं आणि शंकर लयच दादागिरी करायला लागला तर त्याला कायद्याचा हिसका दाखवावा लागेल. तुम्ही काही काळजी करू नका.”

“बरं येतो पाटील. हात जोडून आबांनी पाटलांना रामराम केला व घराकडे निघून आले.”

“अग मंगल आवरले का? शेताकडे जायची वेळ झाली. माझी भाकरी बांध बरं लवकर”

“अहो काय म्हणाले पाटील? मला दोन शब्द सांगा तरी.”

“काही नाही! उद्या देवळावर पंचासमोर शंकर दादाला बोलून घेऊ म्हणे. त्याच्या समोर पाळ्या लावून देऊ.”

“बरं झालं रे देवा…! पाटलांनी उद्याच बोलायचे ठरवले. शेतातील माल वाळून जायच्या अगोदर पाण्याची सोय झाली म्हणजे बरं.”

“अहो मी काय म्हणते! आजच्या दिवस रानात गेल्यावर शंकर भाऊजी सोबत काही वाकड तिकडं बोलू नका आणि पाण्याचा पण विषय करू नका. त्यांना घेऊ द्या पाणी आज पण. तुम्हाला एकट्याला पाहून ते परत भांडायला उठतील.”

“अग आता कशाला भांडायचे उद्या पाटलाकडून पाळ्या लावून घेऊ. आपण आपल्या पाळीत भिजवायचे. भांडण करून तो कुठे आपल्याला दबणार आहे. मी आज विहिरीवर जातच नाही तु काही काळजी करू नको आणि हो उद्या पाटील देवळावर शंकरला बोलावणार आहे कुणाला सांगू नको परत त्याच्या बायकोला माहीत झाले तर रात्रीला भांडण सुरू होईल.”

“नाही... नाही... मी कशाला कुणाला सांगू.”

“नाही म्हटलं! बोलता बोलता सहज सांगशील.”

“मी नाही कुणाला बोलत मला घरातच खुप कामं आहे. मी कशाला कोणाच्या दारावर जाऊन बसू.”

भाकर बांधलेली पिशवी घेऊन आबा शेतावर गेले. शेतात दिवसभर काम करतांना आबाचे मन लागत नव्हते. शेतातील हिरवंगार पीक पाण्यावाचून सुकलं होतं. माणसा सारखं पिकाला पण वेळेवर खत, पाणी मिळालं नाही तर ते खराब होतं. आबाला कधी मोटार सुरू करू व पिकाला पाणी देऊ असं झालं होतं. दिवसभर शेतात काम करून आबा रात्रीला घरी आले. मंगल सोबत गप्पा मारत जेवण केले व झोपी गेले.

            सकाळ झाली सूर्यकिरणांनी सगळीकडे प्रकाश पसरवला. चिमण्यांची चिव चिव सुरू झाली. आबा लगबगीने सकाळी लवकर उठले. आंघोळ करून मारुतीच्या देवळात जाऊन आले. दररोज सकाळी गावातील लोकं आंघोळ करून मारुतीच्या दर्शनाला येतात व मारुतीच्या देवळासमोर गप्पा मारत उभे राहतात. रोजच्या सवयी प्रमाणे आजही हळूहळू मंदिराजवळ गर्दी जमली. पाटील व बाकीचे चार पाच मध्यस्थी करणारी माणसं सुद्धा आली. पाटलांनी एका माणसाला शंकरला बोलवायला पाठवले. तेवढ्यात आबा देवळाजवळ आले. गावातील नेहमीची भांडण मिटवणारी पंच सुद्धा मंदिरावर जमा झाली. पाटील व गावातील चार पंच अशी ही पाच माणसं गावातील भांडण नेहमीच आपापसात मिटवत असे. गावातील भांडण वेशीच्या आतच मिटवायचे. गावातील भांडण वेशीच्या बाहेर नेऊन गावाचा अपमान कशाला करायचा अशी पाटलाची धारणा होती. त्यामुळे पाटील गावातील कुणाचेही भांडण गावातच मिटवत असे. पाटील देवळाजवळ आले म्हणजे, आज कुणाचा तरी न्यायनिवाडा आहे. देवळावर जमलेली माणसं आपापसात कुजबूज करू लागली. हळूहळू चांगलीच गर्दी जमली. पाटील गावातील माणसाशी गप्पा मारू लागले. गावाची चौकशी करू लागले.

“काय माधवराव कसं हाय पीक पाणी.”

“चांगलं आहे पाटील. निसर्गाची कृपा बरी आहे यावर्षी अजून तरी शेतात हिरवळ आहे.”

“माधवराव तुमचे मन फार समाधानी आहे त्यामुळे तुम्हाला सगळीकडे हिरवळ दिसते. तुमच्या सारखी वारकरी माणसं आम्हाला चांगली हिमंत देतात. पांडुरंगाची भक्ती तुम्हाला आयुष्यात काही कमी पडू देत नाही.”

पाटील, माधवराव, आबा व देवळासमोर जमलेली माणसं गावगाड्याच्या विचारात रमली होती. तेवढ्यात शंकर देवळासमोर येतो. गरम डोक्याचा शंकर मोठ्या तावातावात पाटलांशी बोलतो.

“काय पाटील…! कसा काय निरोप पाठवला.”

“कशाला जमवली येवढी गर्दी.”

“शंकरचा राग आवाजातून जाणवत होता. अगदी मोठमोठ्याने हात वारे करून बोलण्याची त्याची सवयच होती.”

“अहो शंकरराव सहज तुम्हाला भेटायला जमली मंडळी. तुम्ही गावचे प्रमुख शेतकरी आहात तुम्हाला सगळ्यांना भेटावं वाटले म्हणून निरोप पाठवला. काही चुकी तर नाही केली ना आम्ही.”

“तसं नाही पाटील मला शेतात पाणी द्यायला जायचं आहे. तुमच्या सारखी मोठी माणसं नाही आम्ही.”

शंकरचा बोलण्याचा ओघ लक्षात घेऊन पाटील स्पष्टच म्हणाले, “शंकरराव तुमचे धाकले बंधू आबासाहेब यांनी एक अडचण मांडली ती सोडवायला तुम्हाला बोलावलं आहे.” तुम्ही आधी शांतपणे ऐकून घ्या नंतर तुमचे मत मांडा. दोघांच्या सांगण्यावर आम्ही पंचमंडळी विचार करून निर्णय देऊ. आमच्या घरात चार पिढ्यापासून पाटीलकी या नात्याने आम्ही गावातील लोकांचे प्रश्न सोडवतो. आम्हाला काही लोकांच्या घरातील भांडणात रस नाही. आम्ही काही कुणाला भांडण करा म्हणून निरोप पाठवत नाही. पाटील स्पष्टपणे बोलू लागले. सगळी माणसं शांतपणे ऐकून घेत होती. पाटलासमोर कोणी विरोधात बोलत नसे कारण पाटलाशी विरोध घ्यायची गावात कोणाची हिंमत नव्हती. पैसा, प्रतिष्ठा, जमीन, घरदार, माणसं या सगळ्यां बाबतीत पाटील गावात पुढे होते. पंचक्रोशीत सर्वात श्रीमंत म्हणून पाटलाची ओळख होती परंतु पाटलाला कशाचाही गर्व नव्हता. प्रेमळ स्वभावाचे सर्वसामान्य माणसाप्रमाणे पाटील वागत असे. “आबा मांडा तुमची काय समस्या आहे.”

“पाटील माझ्या रानात सद्या गहू व ज्वारी पीक आहे. जेमतेम पाणी देऊन कसा बसा गहू ओंब्या भरायला लागला. पण आता पाणी नसल्यामुळे डोळ्या देखत गहू वाळून जाणार.”

“का? विहीर आटली का?”

“नाही... नाही... विहिरीला चांगले पाणी आहे अजून.”

“मग कसं काय गहू वाळणार म्हणता.”

“पाटील विहिरीतील दिवसभरातील पाणी बंधू उपसून घेतात. मी विहिरीवर मोटार सुरू करायला गेलो की मला अजून दोन-चार दिवस थांब असे सांगतात. त्यांचे मात्र सारखं शेतात पाणी सोडणे सुरू आहे. माझ्या शेतातील पीक वाळणार नाही यासाठी काहीतरी तोडगा काढा व मला शेतात पाणी देता येईल असा उपाय सुचवा.”

पाटील व देवळासमोर जमलेल्या माणसांनी आबाचे बोलणे ऐकून घेतले. आबासाहेब मुळात शांत, गरीब स्वभावाचा माणूस त्याच्या बोलण्यात लबाडी नसणार हे सगळ्यांचे लक्षात आले. “शंकरराव तुमचे यावर काय म्हणणे आहे ते सांगा.”

“पाटील सांगायचे काय यात! माझे जेव्हा पूर्ण रानाला पाणी देणं होईल त्यानंतर याने पाणी द्यावे. मी काय आबासाठी माझे पीक वाळत घालू.”

शंकर खूप दादागिरीच्या भाषेत बोलत होता. त्यानी मोठ्या चढ्या आवाजात बोलून स्वतःचा अधिकार जास्त असल्याचे दाखवून दिले. शंकरचा भांडखोर स्वभाव सगळ्यांना माहीत होता त्यामुळे शंकर किती खरं बोलणार आणि किती खोटं बोलणार याचा अंदाज पाटलांना अगोदरच होता.

हे बघा शंकरराव विहीर दोघांची सामूहिक आहे. विहिरीवर दोघांचा सारखा अधिकार आहे म्हणजे रानात पाणी सुद्धा दोघांना सारखे देता येणार. त्यामुळे मला असे वाटते विहिरीवरील पाणीसुद्धा अर्धे अर्धे वाटून घेतले पाहिजे म्हणजे दोघांचे पीक व्यवस्थित येईल. कुणाची पीकं वाळणार नाहीत. पाटलांनी स्वतःचे म्हणणे सगळ्यांसमोर मांडले. बाकीच्यांनी सुद्धा याचा विचार करून मत सांगा. असे आव्हान पाटलांनी केले. पंचमंडळी आपापसात चर्चा करू लागली. थोड्यावेळाने पाटील सांगतात आम्हा पंचांना असे वाटते तुम्ही दोघा भावांना विहिरीवर पाळ्या लावून द्याव्यात. ज्याने त्याने आपल्या पाळीत भिजवायचे म्हणजे वाद होणार नाही. दोघांचे पीक सुद्धा वाळणार नाही. पाटील बोलत असतानाच शंकर मध्येच म्हणाला, “पाटील माझे हिरवं शेत जास्त आहे. त्यामुळे मला पहिली चार दिवस लागतील. उरले तीन दिवस आबांनी घ्यायचे. मान्य असेल तर आत्ताच सांगा नाहीतर मी माझ्या पद्धतीने शेत भिजवायला सक्षम आहे.” मोठ्या अहंकारात शंकर पाटलांना उलटून बोलत होता. सगळ्यांना वाटले हा शंकर पाटलासोबत भांडण करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. पाटील शांतपणे म्हणाले, “शंकरराव आम्ही पंच मंडळी तुम्हाला शांतपणे समजावत आहोत. तुम्ही मात्र भांडणाचा तोरा दाखवत आहात. आम्ही न्यायाने बोलणारी माणसं असा चुकीचा न्याय करणार नाही. दोघांनाही साडेतीन साडेतीन दिवस येतील. तुम्ही मोठे आहात तर सुरुवातीची साडेतीन दिवस तुम्ही घ्या.”

“काय आबा बरोबर का?”

“पाटील तुम्ही एकदम बरोबर बोललात. परंतु त्यांचे शेत माझ्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे चार दिवस त्यांना व तीन दिवस मला असे करून टाका. फक्त ज्याच्या त्याच्या पाळीत त्यानेच भिजवायचे हे सर्वासमोर कबूल करून घ्या. पुन्हा आपआपसात दिवस बदला बदली नको.”

“ठीक आहे.”

“आबांच्या सांगण्यावरून शंकरला सुरुवातीचे चार दिवस व पुढचे तीन दिवस आबाचे दोघांनाही कबूल असेल तर हो सांगा.”

“आबांनी मोठ्या आवाजात हो सांगितले.”

शंकर काहीच न बोलतां नाक मुरडत, ओरडत तिथून झटक्याने निघून गेला. आंबानी पाटील व पंचाचे आभार मानले. मारुतीच्या देवळात जाऊन दर्शन घेतले व लगबगीने घरी निघून आला. मंगल आबाची कितीतरी वेळपासून वाट बघत होती. तिचे मन सारखं मंदिराकडे लागून होतं. आबाला येताच मंगल ने पाण्याचा तांब्या भरून दिला. आबाने देवळासमोर घडलेला सर्व प्रकार मंगलला सांगितला. मारुतीराया तुझी अशीच कृपा राहू दे. मंगलने हात जोडून देवाचे आभार मानून टाकले. मंगलची देवावर खूप श्रद्धा होती. देवळावर भांडण झाले नाही शंकर भाऊजींनी जास्त काही धिंगाणा घातला नाही ही देवाची कृपा झाली अशी मंगलची धारणा होती.

“आता मी काय म्हणते, चार दिवस विहिरीवर जाऊच नका.”

त्यांच्या पाळी मध्ये तिकडे पाय टाकू नका, चार दिवस संपले की आपण तीन दिवस विहिरीवर ये जा करायची. आता भांडणाला उगाच तोंड नको. शंकर भाऊजी, पोरगं व जाऊबाई अगोदरच चिडचिड करणार आहे. मंगलचा समजदारपणा आबाच्या संसारात शांतता भरून होता. बराच वेळ नवरा बायकोने गप्पा गेल्या जेवण आटोपून दोघेही शेतावर निघून गेली. मंगल दिवसभर उत्साहाने शेतात काम करत होती. खूप दिवसानंतर स्वतःचा हक्क मिळाल्यागत तीला आनंद झाला होता. बघता बघता तीन दिवस निघून गेले शंकरचा पाळीचा आजचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून मोटार, विहिर आबाच्या ताब्यात येणार होते. गेल्या दहा-बारा दिवसापासून पाण्याची आतुरतेने वाट पाहणारा गहू उद्या पाणी दिल्याने सुखावणार होता. सकाळची न्याहरी लवकर द्यावी लागेल म्हणून मंगलने रात्री झोपण्या अगोदर मटकी भिजू घातली. सकाळी लवकर उठायचा ध्यास मनात धरून झोपी गेली. सकाळी सकाळी ताबडं फुटल्याबरोबर मंगल उठली. अंगण झाडुन घेतले. शेणाचा सडा शिंपून रांगोळी काढली. सकाळी चुलीवर गरम गरम भाकरी व मटकीची मोट करून आबांचा डबा भरून ठेवला. आबा सुद्धा लवकर उठले. आंघोळ करून मारुतीच्या देवळात जाऊन आले. गरम गरम चहा पिऊन न्याहारीची पिशवी घेऊन रानात निघाले. आबा सरळ विहिरीवर गेले. न्याहरीची पिशवी झाडाला टांगून दिली. मोटार पेटीचे झाकण उघडून मोटार चालू केली. मोटार काही सुरू झाली नाही. एकदा दोनदा प्रयत्न करून झाल्यानंतर आबाचे लक्षात आले की लाईट गेलेली आहे. थोडा वेळ आबांनी वाट पाहिली परंतु लाईट काही आली नाही. न्याहरीची वेळ होऊन गेली दिवस माथ्यावर आला तरी आबांनी न्याहरी केली नव्हती. लाईट नसल्यामुळे आबांचे मन कशातच लागत नव्हते. थोड्यावेळाने शेजारच्या शेतातील वामनराव दिसले. शेतालगतच्या रस्ताच्या कडेने त्यांच्या रानात चालले होतो. त्यांची व आबाची नजरानजर झाली. त्यांनी आबाला बघुन बोलायला सुरुवात केली.

“काय आबासाहेब आज लवकरच रानात आले होते वाटतं.” “हो सकाळीच आलो होतो.”

“कसं काय? काय काम काढले.”

“काम काही नाही गव्हाला पाणी द्यायचे आहे.”

“आज पासून तुमची पाळी का? ”

“हो… आजपासून माझी पाळी आहे.”

“अरे...! रे...! कठीण आहे मग.”

“काय झाले.”

“तुम्हाला माहित नाही का?”

“काय?”

“आजपासून आठवडाभर दिवसभर लाईट नसणार फक्त रात्रीलाच लाईट असणार. आजपासून लाईटचे गॅप सुरू झाले.”

वामनरावांचे बोलणे आबांच्या काळजाला जाऊन भिडले. आबा हताश होऊन आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसले. मंगल दुपारचे जेवण घेऊन थेट विहिरीवर आली. आबा विहिरीवर काही दिसेना म्हणून तिने डोक्यावरील टोपली खाली ठेवली व गव्हाच्या शेतात आबांना शोधू लागली. तिला आबा आंब्याच्या झाडाखाली बसलेले दिसले. मंगलने लांबूनच आवाज दिला.

“अहो… चला की जेवायला ऊन डोक्यावर आले तुम्हाला भूक लागली असेल ना.”

आबांनी मंगलचे बोलणे ऐकून सुद्धा काही आवाज दिला नाही. मंगल जवळ गेली तर आबा झाडाला टेकून शांत बसून होते. आबाचा पडलेला चेहरा पाहून तिने विचारायला सुरुवात केली.

“काय झाले? इथे का येऊन बसले.”

“अग सकाळपासून लाईट नाही.”

“काय? लाईट नाही.” गावात तर लाईट होती.

“शेतातील लाईटचे गॅप आजपासून सुरु झाले. दिवसभर लाईट नसणार फक्त रात्री लाईट असणार.”

आता काय म्हणावे आपल्या नशिबाला. “नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न” तशी गत झाली. तुम्ही हाताश होऊ नका आज रात्री येऊ पाणी द्यायला. रात्रभरात खूप भिजवणे होते. एवढी काय काळजी करायची. तिन दिवस रातपाळी करता येईल.

“चला जेवायला भूक लागली असेल ना..!”

“मला भूक नाही मंगल.”

“का? न्याहरी उशिरा केली.”

“नाही.”

““मग भुक कशी काय नाही.”

“अग मी अजून न्याहरी सुद्धा केली नाही.”

“काय? अजून तुम्ही उपाशी आहात! उठा बघू पहिले, जेवायला चला.”

मंगलने हात धरून आबाला उठवले व विहीरीवर घेऊन गेली. दोघेही विहिरीच्या थारोळ्यात बसून जेवले. आज लवकर घरी जाऊ. रात्री शेतात यायचे म्हणजे तयारी करून यावे लागेल. चहाचे सामान, दिवाबत्ती, अंगावरचे कपडे कारण थंडी खूप आहे. तुम्ही काय करा रात्रीच्याला शेकोटी पेटवायला थोडी लाकडं जमा करून ठेवा. आंब्याच्या झाडाखाली शेकोटी करू म्हणजे आपल्याला शेकोटीच्या उजेडात बसता येईल. अंबानी मान हलवून होकार दिला. जेवण झाल्यावर आबांनी वाळलेली लाकडं व थोडेसे गवत झाडाच्या खाली नेऊन ठेवले व दोघेही घरी निघून आले. रातपाळीला जायचे पण लेकरं कोणाजवळ ठेवावे हा प्रश्न मंगलला पडला. आबांना सोबतीला नाही गेले तर लेकरांची फजिती होत नाही. परंतु नवरा रात्रीला एकटाच शेतात हे सुद्धा तिला चिंतेत टाकणारे होते. तिने लगेच लगबगीने रात्रीचा स्वयंपाक केला लेकरांना जवळ घेऊन सांगितले.

“आज आम्ही दोघे रात्रीला पाणी द्यायला शेतात जाणार आहोत. तुम्ही चौघे बहिण भाऊ घरात शांत झोपी जा. आम्ही सकाळी लवकर येऊ. तसं तुम्हाला आपल्या शेजारच्या शांता आजींना झोपायला सोबतीला यायला सांगते.”

“लेकरांनी मायेचा आदेश ऐकून माना हलवल्या.”

मंगलने घरातील सर्व सामान आवरून शेतातील पिशवी भरून ठेवली. जाता जाता शेजारच्या शांता मावशींना पोरांजवळ जायला सांगितले. शांता मावशी मंगलला स्वतःच्या आईसारखी होती. त्यामुळे घरची चिंता तिच्यावर सोडून ती आबा सोबत रानावर निघाली. गहू वेळेवर ओलावला तर चार दाणे घरात येतील. वर्षभर लेकरा बाळाची खायची सोय होईल. जातील तीन दिवस रात्रीचे निघून पण चांगला गहू घरात येई. मंगलच्या मनात विचार सुरू होते तोपर्यंत रानात पोहोचले सुद्धा. आबांनी शेकोटी रचली व अंधार घालवायचा म्हणून शेकोटीला माचीसची काडी लावली. वाळलेली लाकडं व गवतानी लगेच पेट घेतला. शेकोटी चांगलीच पेटली होती. तेवढ्यात विहिरीवरचा लाईट लागला.

“अहो… लाईट आली बर का…! करा पटकन मोटार चालू.” मंगल विहीरीकडे बघून म्हणाली.

आबांनी क्षणाचाही विलंबन न लावता पेटीजवळ जाऊन मोटार चे बटन दाबले. एकदाची मोटार सुरू झाली. काही क्षणातच पाणी दांडाला वाहू लागले. गव्हाच्या शेतात दांड पाडलेले होते. दुपारीच पाणी लावून ठेवलेले असल्यामुळे बरोबर पहिल्या दांडाने पाणी शेतात जाणे सुरू झाले. दिवसभर उपसा बंद असल्यामुळे विहीर सुद्धा पाण्याने चांगलीच भरली होती. आबांनी एकदा उजेड घेऊन पाणी बरोबर सुरू आहे का पाहिले व शेकोटीजवळ येऊन बसले. रात्रीच्याला रानात शेकोटीचाच आधार असतो. शेकोटीजवळ बसल्यावर आबा हळूच विचारतात.

“मंगल शांता मावशी आल्या असतील ना पोरांजवळ.”

“होय नक्की आल्या असतील.”

मी लय जीव तोडून सांगितले होते. शांता मावशी पण मला म्हणाल्या होत्या बिनफिकीर जाय पोरी मागची काळजी करू नको. मी जाईल लेकरा जवळ नीट ध्यान ठेवील तु काही काळजी करु नको. शेकोटी व गप्पा याच्या नादात रात्र सरत आली होती. विहिरीतील पाणी संपत आले होते. सकाळी लाईट जाईल म्हणून थांबून थांबून विहिरीतील सगळे पाणी उपसणे सुरू होते. रात्रभरात जवळजवळ अर्ध रान ओलेचिंब झाले होते. अजून दोन दिवसात तर गहू व काही ज्वारी सुद्धा भिजून होईल असा आबांचा अंदाज होता. सकाळ झाली बरोबर वेळेवर लाईट गेली. आबा व मंगल घराकडे निघाली. रात्रभर गहू भिजून मनाला थोडेफार का होईना समाधान वाटले होते. रस्त्याने जाताना आबा म्हणतात, “मंगल आता अजून दोन दिवस करावी लागते वाटतं रातपाळी.”

“जाऊ द्या देवाने आपल्या संसारात नाही आणली ना रातपाळी? बस झालं! अजून काय पाहिजे.”

देवाने साखरे सारखी गोड लेकरं दिली. कष्ट करायला दोन हात व दोन पाय दिले. तुमच्यासारखा जोडीदार दिला. आपल्या आयुष्यात हा तर आनंदाचा प्रकाश आहे यापेक्षा अजून काय पाहिजे. आज दिवसभर आराम करा म्हणजे पुन्हा रात्रभर जागरण करता येईल. आबा दिवसभर बिनफिकीर झोपुन होते. मंगलने घरातील कामे आवरली. पुन्हा रात्रीचे जेवण बनवुन लेकरांना स्वतःच्या हाताने पोटभर जेऊ घातले. आबा सोबत स्वतः जेवण केले. अंधार पडताच मंगल पिशवी घेऊन दारात आली. तेवढ्यात छोटी मुक्ता पळतच आली. आबाला बिलगुण म्हणाली, “बाबा आज पण शेतात चालले.”

“हो बाळा आज पण रातपाळी आहे.”

“मंगलने मुक्ताचे बोलने ऐकून आलेला हुंदका पदराच्या बोळ्याने दाबला व रस्त्याने चालू लागली.”

आज रातपाळीचा दुसरा दिवस होता. आबांनी शेतात आल्याबरोबर शेकोटी पेटवली. लाईटची वाट पाहत विहिरीकडे तोंड करून बसले. मंगल केव्हापासून शांत होती. रात्रीची भीषण शांतता मंगलच्या शांत असण्याने आणखीनच वाढली होती. किड्यांचा किर्रर्र…. आवाज स्पष्ट कानावर येत होता. मंगल एवढी शांत का बसलीस. गहू घरात जाईपर्यंत अजून किती रातपाळी करायला लागणार सांगता येत नाही. तू तर दुसऱ्याच दिवशी कंटाळली वाटतं.

“अहो…! तसं काही नाही.” मला कंटाळा वगैरे काही आला नाही. मुक्ताच्या बोलण्याने मन पिळवटून टाकलं. लेकरांचा काही गुन्हा नसतांना एकटं राहव लागतं.

“लेकरांना असं रात्री सोडून आपल्याला शेतात यावं लागतं हा गुन्हा कसा नाही म्हणते.”

“गरीबी हा गुन्हा आहेस की त्यांचा!”

“नशिबाने त्यांना गरीब कुटुंबात जन्माला घातले हा गुन्हाच आहे.”

“एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्माला आली असती तर असं मायबापांना सोडून रात्री बेरात्री एकटं राहावं लागलं नसतं.”

“अहो जातील आपले दिवस निघून. तुम्ही पण एवढे हताश होऊ नका. परिस्थिती काय कुणाची बसून राहत नाही. एक ना एक दिवस बदलते. आपण काही कायमचे शेतात रातपाळी करणार नाही. उद्याचा दिवस संपला की, परत रात्री शेतात कशाला येणार?”

“मंगल यावर्षी आपल्याला प्रत्येक पाळीत रातपाळी करावी लागणार. तेव्हा कुठे गहू व ज्वारी यांना घर दाखवता येईल.”

दोघांच्या गप्पांनी खूप वेळ पासून किर्रर्र…. आवाज करणारी किडे पण आता शांत झाली होती. लाईट आली. आबांनी जाऊन मोटर सुरू केली. पुन्हा एकदा गव्हाच्या शेतात पाणी सुरू झाले. रात्रभर गव्हाचे शेत पूर्ण भिजवून झाले होते. सकाळ होताच लाईट सुद्धा गेली होती. आबा व मंगल घराकडे निघाली. उद्याच्या रात्रीत ज्वारी भिजून टाकू या. म्हणजे आठवडाभर पिकांना पाण्याची गरज राहत नाही. आबा मंगलला सांगु लागले.

                      आबा व मंगल यांनी पुढील दोन पाळ्यामध्ये रातपाळी केली. गव्हाचे व ज्वारीचे शेत मोत्याच्या दाण्याप्रमाणे फुलले होते. संपूर्ण शेतात गहु व ज्वारीचे पीक दाण्यांनी भरले होते. हळूहळू दाणे वाळायला सुरुवात झाली. आता काही दिवसात ज्वारी, गहू काढायला येणार होती. मंगलने अनेक बायकांना अगोदरच कापणीसाठी सांगून ठेवले होते. काही दिवसांनी गहू, ज्वारीची कापणी सुरू झाली. चार दिवसात गव्हाचे शेत कापून झाले. पुढील चार दिवसात ज्वारीचे शेत कापून झाले. गहु व ज्वारी काढण्यासाठी आबांनी गावातील सावकाराचे मळणी यंत्र सांगून ठेवले. दोन दिवसांनी सकाळीच मळणी यंत्र शेतात आले. आबा पोत्याचं गाठोडं घेऊन सकाळीच शेतात आले. मंगलने मळयंत्राची पूजा केली. भाकरीचा तुकडा यंत्रावरुन ओवाळून फेकला. नारळ फोडून मारुतीला हात जोडून सांगितले. चांगली बरकत येऊ दे…! पहिल्या दळण्याचे जेवण तुझ्याच नावाने. मळयंत्र सुरू झाले. आबांनी पेंढ्या द्यायला सुरुवात केली. मळयंत्रावरील दादांनी गव्हाच्या पेंढ्या कोंबायला सुरुवात केली. मोत्या प्रमाणे पिवळे जरत दाणे मळयंत्रातून टोपल्यात पडू लागले. मंगलने मुठभर दाणे हातावर घेऊन पाहिले. अतिशय सुंदर अशी दाणे भरले होते. रातपाळी मुळे गव्हाला भरपुर पाणी मिळाले होते. त्यामुळे दाणा चांगलाच भरला होता. दुपारपर्यंत गहू व ज्वारीचे खळे पूर्ण झाले. आबांनी सोबत्याला बैलगाडी मागून ठेवलेली होती. ती पटकन जुपुन आणली व संध्याकाळपर्यंत चार खेपामध्ये दाणे घरी नेऊन टाकले. गव्हाणे व ज्वारीने सगळे घर भरले होते. लेकरांनी तर गव्हाच्या पोत्यावर उड्या मारून मारून पोती मोकळी केली होती. आबा रात्री थकून भागून घरी आले. मंगलने गरमागरम स्वयंपाक केला. आबा सगळ्या लेकरांना घेऊन जेवायला बसले. जेवता जेवता छोटी मुक्ता आबांना म्हणाली. “बाबा एवढे सारे गहू आपलेच आहे.”

“हो बाळा! हे सगळे गहू व ज्वारीचे पोते आपलेच आहे.”

“आपल्याला वर्षभर खायला लागतात ना!”

“हो….! सगळ्या लेकरांनी मोठ्या आवाजात होकार दिला.”

“बाबा तुम्ही व आईने रातपाळी केली म्हणून एवढे सारे गहू झाले.” मुक्ता बोबड्या भाषेत विचारत होती.

“हो बाळा”

“रातपाळी केली म्हणून येवढे मोठे गहू मिळाले बरं का मुक्ताबाई.”

“मंग बाबा पुढच्या वर्षी मी पण येणार आहे रातपाळीला!” मग आणखीन पोती वाढतील.

“बरं”

“पुढच्या वर्षीची रातपाळी माझी व मुक्ताची.”

आबाच्या घोषणेने मंगल व सगळी मुलं मोठमोठ्याने हसू लागली.


Thursday, 13 April 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत

डॉ बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर विचारवंत, समाज सुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडाजवळ असलेले आंबवडे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सपकाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबेडकरांचा जन्म झाला. रामजी सपकाळ हे फार उद्योगी व महत्त्वकांक्षी गृहस्थ होते. प्रथम सैन्यातील एका तुकडीत ते साधे सैनिक होते. कालांतराने ते लष्करी छावणीतील शाळेत मुख्याध्यापक झाले आणि सुभेदार, मेजर या पदापर्यंत पोहोचले. ते नाथपंथी असून त्यांनी रामायण, ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा अभ्यास केला होता. ते स्वतः उत्तम वाचक, अभ्यासूवृत्तीचे चांगले विचारवंत होते. त्यामुळे बाबासाहेबांना आपल्या वडीलाकडून चांगले संस्कार मिळाले. सुसंस्कारित व शिक्षित वडील असल्यामुळे बाबासाहेबांच्या मनावर बालपणीच चांगले विचार, अभ्यास, शिक्षण अशा अनेक गोष्टी कोरल्या गेल्या. आंबेडकर सहा वर्षाचे असतानाच त्यांची आई भीमाबाई या मरण पावल्या. त्यामुळे बाबासाहेबांच्या आयुष्यातील आई नावाचे छत्र हरवले. त्यामुळे आंबेडकरांचे पुढील सर्व पालन पोषण त्यांचे वडील व आत्या मीराबाई यांनी केले. बाबासाहेबांना आई नाही याची जाणीव कधीही होऊ दिली नाही. रामजी आंबेडकर लक्षरातून निवृत्त झाल्यानंतर कुटुंबासह नोकरीसाठी साताऱ्यात राहण्यासाठी आले. त्यामुळे बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास झाले. सातारा येथील शाळेत शिक्षण घेत असताना बाबासाहेब शिक्षकांचे लाडके विद्यार्थी होते. लहानपणापासूनच हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता, नवीन शिकण्याची जिद्द बाबासाहेबांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे शाळेत प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती ते घेत असत. स्वतःच्या हुशारीमुळे शाळेतील आंबेडकर नावाच्या शिक्षकाचे ते लाडके विद्यार्थी बनले. बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबावडेकर होते हे आडनाव आंबेडकर नावाच्या शिक्षकांना आवडत नसे. म्हणून त्यांनी बाबासाहेबांना आंबेडकर हे नाव लावण्यास सांगितले आणि शाळेच्या दप्तरात तशी नोंद सुद्धा करून टाकली. तेव्हापासून बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव मिळाले. स्वतःच्या संस्कारामुळे व शिक्षण घेण्याच्या जिद्दीमुळे शिक्षकानी स्वतःचे आडनाव बाबासाहेबांना दिले. आंबेडकरांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. याच काळात बाबासाहेबांचे रमाबाई यांच्याशी लग्न झाले. लग्न झाले तरी बाबासाहेबांनी स्वतःचे शिक्षण थांबवले नाही. लग्नानंतरचे जीवन स्वतःच्या संसारात व्यतीत करण्यापेक्षा या समाजातील गोरगरीब दलित बांधवांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही खंत बाबासाहेबांना शांत बसु देत नव्हती. त्यामुळे बाबासाहेब स्वत:च्या संसारात न रमता त्यांनी स्वतःचे शिक्षण सुरू ठेवले. ते रमाबाईंना नेहमी सांगायचे माझे शिक्षण फक्त माझ्या पुरते मर्यादित न राहता ते या समाजातील गोरगरीब, दलित बांधवांच्या न्यायासाठी, हक्कासाठी कामी आले पाहिजे. यासाठी मी शिक्षण घेत आहे. माझ्या शिक्षणासाठी कितीही अडचणी आल्या, लोकांनी कितीही अडथळे आणले तरी माझे शिक्षण मी थांबवणार नाही. आणि म्हणूनच पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी बडोदे संस्थांची शिष्यवृत्ती मिळवली. व 1913 मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेस गेले. अमेरिकेतील कोलंबी या विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम ए व पीएचडी या पदव्या मिळविल्या. उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशात गेले होते तेव्हा त्यांना फार हालआपेक्षा भोगाव्या लागल्या. अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. आर्थिक अडचण, पुरेसे अन्नधान्य उपलब्ध नसल्यामुळे बाबासाहेबांना अर्ध्या पोटी राहावे लागत असे. कधीकधी दोनवेळा पोटभर अन्न मिळत नसे. तरी बाबासाहेब त्याची खंत न करता अभ्यास करत असायचे. ते स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत काढत असत. की मला अन्नाची भुक लागत नसुन मला ज्ञानाची भुक लागते. याठिकाणी मला भरपुर पोटभर ज्ञान मिळते. त्यामुळे मी जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करतो. याही परिस्थितीचा सामना करत त्यांनी स्वतःचे शिक्षण जिद्दीने सुरू ठेवले. बाबासाहेबांनी अनेक अडचणीचा सामना करून शिक्षण घेतले व सर्व शिक्षण क्रमात उत्तम असे यश संपादन केले. बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात अनेक अडथळे आले विद्यार्थी, शिक्षक, समाज वेळोवेळी अस्पृश्य म्हणून हिनावत होता. अस्पृश्यतेच्या नावाखाली बाबासाहेबांना पावला पावलावर मागे खेचले जात होते. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ असणारे अफाट ज्ञान यांना कुठेतरी खिळ घालण्याचा प्रयत्न अस्पृश्यतेच्या नावाखाली केला जात होता. अत्यंत हुशार व उच्चविद्याविभूषित असूनही अस्पृश्य जातीत जन्माला आल्यामुळे त्यांना आयुष्यात फार अपमान सोसावा लागला. अस्पृश्य जातीत जन्माला येणे हा काही गुन्हा नाही. त्यांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा, शिक्षण घेण्याचा, समाजाचा एक महत्त्वाचा घटक असण्याचा अधिकार आहे असे त्यांचे ठाम मत होते. अस्पृश्यतेच्या नावाखाली बाबासाहेबांना त्यांच्या शालेय जीवनात एक चांगला मित्र लाभला नाही. कारण अस्पृश्य असल्याने मुलं त्यांच्याशी मैत्री करत नव्हते. अशावेळी बाबासाहेबांनी निराश न होता पुस्तकाशी मैत्री केली. पुस्तकच खरा मित्र समजुन मिळेल ते पुस्तक वाचत गेले. यातून त्यांना अफाट ज्ञान प्राप्त होत गेले. स्वतः येवढेच त्यांचे पुस्तकावर प्रेम होते. आपण अस्पृश्य जातीत जन्माला आलो तरी उच्च जातीतील मुलांपेक्षा जास्त शिक्षण घ्यायचे ही त्यांची जिद्द होती. त्यांचे विचार सुद्धा खुप आधुनिक होते. अस्पृश्यतेच्या नावाखाली जो त्रास आपल्याला भोगावा लागला तो येणाऱ्या काळात कुणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी त्यांनी कार्य करायचे ठरवले होते. अस्पृश्य जातीतील प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे व त्यांच्या उद्धाराची व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे निर्मूलन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. आपल्या प्रतिज्ञाला अनुसरून त्यांनी स्वतःला या कामी सर्वस्वी वाहून घेतले होते. बाबासाहेब एक व्यक्ती नाही तर एक नवविचार आहे एक प्रेरणा आहे. आजची समाजाची, राज्याची, देशाची परिस्थिती पाहता आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खरच या देशाला खूप गरज आहे. भलेही बाबासाहेब आज या जगात प्रत्यक्षात पुन्हा वापस येऊ शकत नसतील. पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांचे कार्य, संविधान आज प्रत्यक्ष आपल्या समवेत आहे. आज प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी, प्रत्येक बाबतीत पुढे जाण्यासाठी बाबासाहेबांची शिकवण एक उत्तम प्रेरणा आहे. आज एकविसाव्या शतकात बाबासाहेब हे कुण्या एका धर्माचे, एका समाजाचे, एका प्रदेशाचे नाही तर संपूर्ण भारताचे एक प्रेरणास्थान आहे. समाजाने, या देशाने बाबासाहेबाना आपआपसात वाटणे म्हणजे त्यांच्या विचारांचा व कार्याचा तो अपमान होईल. आज बाबासाहेबांना जगाने स्वीकारले आहे. जगातील अनेक देशातील विद्यापीठांमध्ये बाबासाहेबांचे विचार व कार्य मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. ही तर भारत देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा प्रत्येक नागरिकासाठी गर्व आहे. बाबासाहेब एक थोर विचारवंत, समाज सुधारक, अर्थतज्ञ, कायदातज्ञ, व दूरदृष्टी असणारे होते. त्यांनी कायदा, शिक्षण, नागरिकाचे अधिकार, देशाची अर्थव्यवस्था, अशा विविध क्षेत्रात भरीव काम केलेले आहे. स्वतः च्या अनेक ग्रंथात मौल्यवान विचार मांडलेले आहे. आज तेच विचार प्रत्येकाला प्रेरणा देत आहे. बाबासाहेबांची शिकवण प्रत्येकाने अमलात आणली तर स्वतःचा, कुटुंबाचा, राज्याचा, व देशाचा विकास होईल. 'शिका संघटित व्हा व संघर्ष करा' ही शिकवण आज प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे. बाबासाहेबांची जयंती दरवर्षी देशभरात उत्साहात साजरी होते. आज देशाला नवविचारांची गरज आहे. म्हणून बाबासाहेबांची जयंती विचारांनी साजरी व्हावी. त्यांचे विचार, कार्य आज तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येकाने ते फक्त ऐकून न घेता स्वतःच्या आचरणात आणली पाहिजे. भारत हा देश लोकशाही प्रणालीवर व संविधानावर चालणारा आहे. बाबासाहेबांचे संविधानातील विचार कायदा, कर्तव्य, प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाने संविधान वाचले पाहिजे संविधानाचा आदर केला पाहिजे. संविधान अंगीकारली पाहिजे तरच बाबासाहेबांची खरी जयंती साजरी होईल. समाजातील माणसांसाठी स्वतःचे जीवन व्यथित केले त्या महामानवाला त्यांच्या विचारांना व कार्याला विनम्र अभिवादन.

लेखक

राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजा

ता सिंदखेड राजा जि बुलढाणा

मो नं 9823425852

rajendrashelke2018@gmail.com



Sunday, 2 April 2023

आनंदाची गुढी

 आनंदाची गुढी

नुकताच गुढीपाडवा संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुढीपाडवा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिका प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, नवीन व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी, इत्यादी गोष्टी केल्या जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारली जाते. प्रत्येकजण हा दिवस जास्तीत जास्त आनंदी घालवण्याचा प्रयत्न करतात. गुढीपाडव्याचा दिवस एकदा मागे पडला की, नवीन आखलेले संकल्प परिपुर्ततेसाठी धावपळ सुरू होऊन जाते. दिवस उजाडल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू असते ती पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान व स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी. या सर्वांमध्ये माणूस एवढा व्यस्त होऊन जातो की, स्वतःचा आनंद हरवून बसतो. खदखदून हसायला टाईम नसतो. तसा प्रसंग सुद्धा निर्माण होत नाही. कारण पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान यासाठी ओढाताण होत राहते. या सर्वामध्ये सतत ताण-तणाव, शारीरिक धावपळ, मानसिक अस्वस्थता याशिवाय दुसरे काही सापडत नाही. जमिनीवर पाय ठेवून आभाळाएवढे स्वप्न पाहणारा माणूस जीवनात कितीही मिळवले तरी समाधानी होत नाही. इतरांच्या पेक्षा जास्त प्रगती, जास्त पैसा, जास्त प्रतिष्ठा यासाठी स्पर्धा करत राहायची ही भावना माणसाला खूप व्यस्त करून टाकते. व स्वतःच्या आनंदापासून स्वतःच्या जगण्यापासून दूर घेऊन जाते. जीवनात सर्वाधिक मौल्यवान स्वतःचे जीवन आहे. जन्माला आल्यापासून ते मृत्यूला सामोरे जाईपर्यंतचा काळ म्हणजे जीवन. जन्म आणि मृत्यू यामधील काळ आपण कसा जगतो. हे जीवन कुटुंब, शेजार, समाज, राष्ट्र यासाठी कितपत खर्च करतो यावर माणसाची खरी श्रीमंती ठरत असते. आयुष्यभर फक्त पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या मृगजळा मागे धावणे म्हणजे जीवन नाही. जीवनाची खरी श्रीमंती आनंदी जीवन जगणे होय. स्वतः बरोबर इतरांना आनंदी ठेवणे, इतरांना आनंद देणे होय. प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण येतात हा आनंदी क्षण मन भरून जगला पाहिजे. ओढ्याला खळखळून वाहणाऱ्या नितळ पाण्याप्रमाणे आनंदाचे झरे जीवनात सदैव वाहते ठेवले पाहिजे. आनंद कुठे विकत मिळत नाही किंवा आनंद कुणाकडून उधार घेता येत नाही. आनंद प्रत्येकाला आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, करत असलेल्या कामातून, आपल्या कष्टाच्या घामातून निर्माण करावा लागतो. आनंदी जीवन जगायला लागते ती फक्त सकारात्मक इच्छाशक्ती. जी सर्वांकडे असते फक्त काहीजण तीचा वापर करून भरभरून आनंदी जगतात. काही मात्र सकारात्मक इच्छाशक्तीचा वापर करत नाही किंवा स्वतःला एवढे व्यस्त करून टाकतात की त्यांना स्वतःला ओळखायला, जगायला वेळच मिळत नाही. स्वतःच्या हव्यासापोटी पाहिलेली मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. एकमेकांशी स्पर्धा करत असतात. या स्पर्धेमध्ये माणूस नकळतच कधीतरी इतरांच्या मागे पडतो, माघे राहतो. आणि मग या स्पर्धेत आपण माघे आहोत ही भावना त्याच्या मनाला सतत बोचत राहते. स्वतःची स्वप्न पूर्ण झाली नाही म्हणून माणूस हळूहळू नैराश्याकडे झुकला जातो. आयुष्यात आपल्याकडे काय आहे हे विसरून काय पाहिजे यासाठी तो नाहक परेशान होत राहतो. यातून आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा सोडून नसणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी झटत राहतो व त्या प्राप्त झाल्या नाही तर प्रचंड ताणतणावात, अस्वस्थतेत नैराश्यात जीवन जगतो. अशा अवस्थेत तो स्वतः जवळचा आनंद संपवून टाकतो. प्रत्येक दिवस सकाळी सुंदर प्रकाश घेऊन येतो आणि मावळताना अंधार पसरवून जातो. प्रकाश आणि अंधार हे चक्र ज्याप्रमाणे अखंड सुरू आहे. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख येत असते. ज्याप्रमाणे ऊन आणि सावली हा खेळ सुरू राहतो. त्याप्रमाणे कधी सुख तर कधी दुःख असा हा ऊन सावलीचा खेळ माणसाच्याही आयुष्यात सुरू राहतो. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक पावला सोबत येणारे सुख आणि दुःख यात सुद्धा माणसाला आनंदी राहता आले पाहिजे. कारण या जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही. त्यामुळे जीवनात आलेले सुख ही एक दिवस संपेल व दुःख सुद्धा एक दिवस नक्कीच संपेल. प्रत्येक दिवस हा आपल्या जीवनातील अमूल्य असा दिवस समजून तो आपण आनंदात घालवला पाहिजे. देहूचे महान संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात "आनंदाचे डोही आनंद तरंग | आनंद ची अंग आनंदाचें || सर्व जीवन आनंदीमय झाले पाहिजे. जीवनात आनंद सर्वत्र दरवळत राहिला पाहिजे. यावर्षी गुढीपाडव्यानिमित्त उभारलेली आनंदची गुढी येणाऱ्या वर्षभर सर्वांना आनंद देत राहो. लहान मुलांना खेळणारी बागडणारी आनंदी गुढी, शाळकरी मुलांना शिक्षणाची ज्ञानाची गुढी, नोकरदार व्यावसायिकांना प्रामाणिक कष्टाची गुढी, वयोवृद्ध नागरिकांना निरोगी आरोग्याची गुढी या वर्षात लाभदायक ठरू हीच अपेक्षा.


राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजा

ता. सिंदखेड राजा

जि बुलढाणा

मो नं 9823425852

Sunday, 19 March 2023

एकच मिशन जुनी पेन्शन

                  एकच मिशन जुनी पेन्शन


महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. संस्कार व संस्कृती यांच्या एकत्रित बळावर महाराष्ट्र सदैव वाटचाल करत आलेले प्रगतशील राज्य आहे. आज भारत देशाचा विचार केला तर इतर राज्यांच्या बरोबरीने महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. व्यवसाय, उद्योगधंदे, आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान या सगळ्यांमध्ये प्रगती झालेली दिसते. आज महाराष्ट्रात शेती, शिक्षण, आरोग्य, लघुउद्योग, यासारख्या अनेक गोष्टींना पायाभूत सुविधा आज उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील प्रगतीचा आलेख चढता आहे व येणाऱ्या काळात निश्चितच अधिक प्रगती होईल यात शंका नाही. भारतातील प्रगतशील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख होतो ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्राला अधिक प्रगतशील व गतिमान बनवण्यासाठी सरकार व प्रशासन खांद्याला खांदा लावून काम करत असते. परंतु महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून प्रशासनातील अनेक कर्मचारी कमालीचे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतून प्रशासनातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी 14 मार्च पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. या संपाचे प्रमुख कारण काय तर नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करणे होय. महाराष्ट्रात गेल्या 17 वर्षापासून सतत जुनी पेन्शनची मागणी होत आहे. ही मागणी होण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना म्हणजे  (महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना, शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत. अशा स्वरूपाचा शासन आदेश दिनांक 31 ऑक्टोबर 2005 रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला. त्या ऐवजी शासनाने असा निर्णय घेतला की, शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या निवृत्तीवेतन, योजने ऐवजी केंद्र शासनाच्या धर्तीवर, "नवीन परिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना" लागू केली. यामुळे एकाच कार्यालयात समान पदावर, सारखेच काम करणाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन व नवी पेन्शन असे दोन भेद निर्माण झाले. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात या नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध केला जातोय. या विरोधाचे प्रमुख कारण म्हणजे जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यामध्ये कमालीचा फरक आहे. सेवानिवृत्ती नंतरचे म्हातारपण सुरक्षित वाटत नाही. या फरक म्हणजे जुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कुठल्याही प्रकारची कपात केली जात नाही. यात जी.पी.एफ.सुविधा आहे. यातील काही रक्कम संकटाच्या वेळी कर्मचार्याला काढता येते. सेवाकाळात मृत्यू झाल्यास वारसास कुटुंब निवृत्तीवेतन मिळते. महागाई भत्त्यानुसार व वेतन आयोगानुसार पेन्शनची रक्कम वाढत जाते. यामध्ये शेअर बाजारात रक्कम गुंतवली जात नाही. शारीरिक विकलांगतेमुळे कर्मचारी निवृत्त झाल्यास वरील लाभ कर्मचाऱ्याला मिळतात. या उलट नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील 10% रक्कम दरमहा कपात केली जाते. यात जी.पी.एफ. सुविधा नाही यामुळे संकटकाळी रक्कम काढण्याचा प्रश्नच नाही. सेवाकाळात कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास वारसास कुटुंब निवृत्ती योजना लागू नाही. यामध्ये महागाई भत्त्यानुसार व वेतन आयोगानुसार पेन्शनची रक्कम वाढत नाही. सेवा काळात जमा झालेली रक्कम व निवृत्तीनंतरची जमा झालेली रक्कम यातील 40% रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. शेअर बाजारावर आधारीत पेन्शन योजना आहे. शारीरिक विकलांगतेमुळे कर्मचारी निवृत्त झाल्यास कसलाही लाभ मिळत नाही. अशा प्रकारे जुनी पेन्शन व नवी पेन्शनमध्ये प्रमुख फरक आहे. म्हणून 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लाभदायक व हमी पेन्शन योजना वाटत नाही. वयाच्या 35 ते 38 वर्षे प्रशासनात काम करून सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आर्थिक दृष्ट्या सक्षम नसेल तर या योजनेचा फायदा काय? अशा निर्माण झालेल्या प्रश्नामुळे कर्मचारी गेल्या 17 वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सातत्याने मागणी करत आहे. कर्मचारी गेली 17 वर्ष निवेदन आंदोलन, मोर्चा, मुंडन मोर्चा, साखळी उपोषण, एवढं सर्व करूनही शासनास जाग न आल्यामुळे शेवटी 18 लाख कर्मचाऱ्यांना संपाच हत्यार उपसावे लागले. परंतु सरकारमधील आजी-माजी अर्थमंत्री तथा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राज्याच्या आर्थिक स्थितीचे कारण सांगून जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही असे सांगत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या काळात वेतन व निवृत्तीवेतन यावरील खर्च राज्याला झेपावणारा नसेल असे कारण पुढे केले जात आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडून जाण्याची आभासी भिती निर्माण केली जात आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडण्याचे कारण फक्त कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन, वेतन, निवृत्तीवेतन असू शकत नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. राज्यावर येणारी नैसर्गिक संकटे, राज्याची आर्थिक गुंतवणूक व त्यावर मिळणारे आर्थिक उत्पादन कमी होणे, राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनेवर वाढलेला खर्च, राज्यातील पायाभूत सुविधेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी केलेली गुंतवणूक अशा स्वरूपाच्या अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. राज्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी वेतन कपात, निवृत्तीवेतन योजना बंद करणे, सरकारी नोकरीचे खाजगीकरण हे उपाय असू शकत नाही. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारला दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी गेल्या सतरा वर्षापासून सातत्याने जुन्या पेन्शनची मागणी का करत आहे याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. राज्यातील कर्मचारी प्रशासनात प्रामाणिक काम करून सरकारच्या धोरणावर असमाधानी असेल तर निश्चितच सरकारने यावर विचार केला पाहिजे. कर्मचारी संघटनांचा संप, त्यांच्या मागण्या यावर वेळोवेळी तोडगा काढला पाहिजे. कर्मचारी हा सरकार व प्रशासनातील मुख्य घटक आहे. राज्यशासनाच्या वतीने निघालेला प्रत्येक आदेश, सुचना परिपत्रक याची तंतोतंत अमलबजावणी करण्याचे काम कर्मचारी करत असतात. शासनाची प्रत्येक कल्याणकारी योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम कर्मचारी करत असतात. सर्वसामान्यांची सेवा करण्याचे व्रत कर्मचारी सेवा काळात बजावत असतात. वाडी-वस्त्यावर, गावागावात सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे, नागरिकांचे प्रश्न, समस्या शासन दरबारी मांडण्याचे काम सुद्धा कर्मचारी करत असतात. प्रत्येक कर्मचारी शासन सेवेत प्रत्येक दिवसी आठ, दहा प्रामाणिक काम करतात. म्हणूनच राज्याचा काढा सुरळीत सुरू राहतो. शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा राज्यातील कर्मचारी एक महत्त्वाचा घटक आहे. शेवटी कर्मचारी सुद्धा एक माणूस आहे. त्याला इतर नागरिकाप्रमाणे मन, भावना, कुटुंब, नाती-गोती आहेत. आणि म्हणूनच त्याच्याही काही गरजा असतात. मुलाबाळांचे शिक्षण, स्वतःचे हक्काचे एक घर, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ, निरोगी आरोग्य अशी छोटी-मोठी स्वप्न बाळगून कर्मचारी आपापल्या विभागात, कार्यालयात काम करत असतात. कर्मचारी वर्गाविषयी समाजात कमालीची अस्वस्थता दिसून येते. कर्मचारी यांचे पद, वेतन, भत्ते, शासकीय सुविधा यावर नेहमी चर्चा होते. परंतु या उलट कर्मचाऱ्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या कामाचा ताण, सरकार, समाज, राजकीय पुढारी यांच्या कामाबाबतीत वाढत्या अपेक्षा, ऑनलाइन ऑफलाइन कामे या सर्व गोष्टींची जबाबदारी त्याला अचूक पार पाडावी लागते. याबरोबरच शासन, प्रशासन, समाज, आणि कुटुंब अशा घटकांचा प्रवास कर्मचारी करत असतो. सरकारी, निमसरकारी कर्मचारी हा सुद्धा या राज्याचा नागरिक आहे आणि म्हणून राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. त्याला आवश्यक त्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. प्रशासनात काम करणारा कर्मचारी समाधानी असेल तर सर्वसामान्यांची कामे अधिक गतीने पूर्ण होतील. कर्मचारी उत्साहाने, आनंदाने प्रशासनातील सर्व कामे वेळेवर पूर्ण करतील. कर्मचारी वर्गाचे मानसिक आरोग्य उत्तम राहील. सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात सुद्धा शासनाने वेळोवेळी सकारात्मक विचार करायला पाहिजे. सरकार व प्रशासन ही राज्याच्या रथाची दोन चाके आहेत. ही जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत राज्याचा विकासाचा रथ अधिक गतीने पुढे सरकत जाईल. आणि म्हणून 14 मार्चपासून पुकारलेल्या बेमुदत संपावर शासनाने योग्य तो तोडगा काढावा. कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनची होत असलेली मागणी सकारात्मक असून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन ही शासनाची मेहेरबानी नसून कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक विनाखंड सेवेचा आणि त्याला म्हातारपण यासाठी जगण्यासाठी मिळण्याचा हक्क आहे हे विचारात घेतले पाहिजे.


राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजा

ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा

मो. नं 9823425852

Saturday, 3 December 2022

लघुकथा- सोंगाड्या

  सोंगाड्या


           ढोलकी वर थाप पडताच, ढोलकीचा आवाज लयीत घुमाया लागला. ढोलकीच्या आवाजाने तंबूत टांग… टांग… टांग… नाद घुमायला लागला. ढोलकीच्या आवाजाने लोकं तंबूकडे वळू लागली. केंव्हापासून ओस पडलेल्या तंबूत माणसं शिराया लागली. माणसाच्या घोळक्याने तंबूतील जागा पटापटा भरू लागली. माणसांकड बघून ढोलकी आणखीच लयीत वाजायला लागली. तंबूत दूरवर नजर फिरवून किसन मामा तावा तावात तंबूचा पडदा बाजूला सारीत खोपीच्या आत मधी शिरला. आरशापुढे बसलेल्या भिमाला पाहून मामा संतापलं. “ये भिमा आटप की लवकर, कव्हापासून नटतोया बायागत, बस कर की आता.”

“बाईच आहे की ती सगळ्यांची भिमा मावशी.”

कोपऱ्यात बसलेले कौतिकराव दात हिचकीत मधीच बोलले.

“कौतिकराव करा की तुमचं काळ तंबूत, इथं काय कोणी आरती उतरणार नाही.”

रागानं भिमा कौतिकराव वर फिसकला.

“ये भिमा… नीट बोलकी लेका, तंबूत तर पोरी बरोबर लय उड्या मारतो मावशी बनुन. आता कशाला उगीच गर्मी दाखवतो. गुप गमान रंगीत पावडर फासकी तोंडाला.”

“कौतिकराव बस करा तुमचं कौतिक. पोरी हुंडका लवकर, कुठे आहे त्या तर. तंबूत लोक जमल्यात, खेळ सुरू कराया पाहिजे.”

“भिमा मावशी या लवकर आटपून तंबूत.”

“मोठ्याने हसत… हसत… किसन मामा गडबडीने कौतिकरावला घेऊन खोपीच्या बाहेर निघाले.”

“कौतिकराव व किसन मामाच्या हसण्याचा आवाज सारखा कानात घुमत राहिला.”

भिमाने हातातील आरसा पुन्हा तोंडाजवळ धरून तो तोंड न्याहाळू लागला. रंगीत पावडरच्या ठिपक्यांनी चेहरा पार बदलून गेला होता. कितीतरी दिवसापासून ढोलकीच्या आवाजाने चेहरा बदलून टाकला होता. या चेहऱ्याकडे पाहून तंबूतील लोक गदा गदा हसायची. या लोकांसारखं आता तर सोबतीला असणारी माणसं हसायला लागली. भिमाला कौतिकरावचे हसणे मनाला चांगलेच ओरबाडले. भिमा स्वतःच्या तोंडाला आरशात न्याहाळू लागला. मिशरूड काढून रंगीत पावडरने मुखवटा चांगलाच रंगला होता. या मुखवट्याला कुणाची नजर लागू नये म्हणून त्याच्यावर उमटवलेला काजळाचा ठिपका चांगला चमकत होता. भिमा आरशात पाहून स्वतःचाच आधीचा मुखवटा शोधू लागला. ढोलकीने भिमाला रंगाचा बेरंग करायला लावला होता. एकेकाळी तरणा बांड पोरगा पिळदार मिशीचा झुपका पिळवत गावभर फिरणारा भिमा सगळ्याच बाई माणसांना धडकी भरवायचा. दिवस-रात तालमीत शरीर पिळवायचं. बापानं गाईचं वासरू तोडलं की, तांब्याभर धारा पिळायच्या व तांब्या भिमाच्या हातात ठेवायचा. क्षणभर श्वास रोखून घटाघटा तांब्याभर दूध संपवून टाकायचा. ओठावर दुधाच्या फेसाची मिशरूड उमटल्या शिवाय तात्या जागचं हालू देत नव्हते.

तात्या नेहमी म्हणायचे, “माझ्या भिमा पैलवानाचा हात पंचक्रोशीत कुणी धरला नाही पाहिजे. दावणीच्या बैलागत भिमा फुसकारातच पैलवानावर तुटून पडला पाहिजे. बारा गावच्या मानाची चांदीची गदा छातीवर घेऊन गावभर भिमा फिरल्यागत मला चैन पडायची नाही.”

तात्याच्या या स्वप्नांन तात्या तांबडं फुटल्यापासून दिवस मावळोगत शेतात राब राब राबायचे. शेतातील कामाचा व्याप सांभाळून तात्यांनी तीन गाई सांभाळल्या होत्या. पोराला दूध कमी पडू नये म्हणून तात्या गाईचा सांभाळ लेकरागत करत होते. भिमाला फक्त दोन टाईम तालमीत मस्ती जिरवायची व किती पोरांची पाठ जमिनीला लावली हे रातच्याला तात्याला सांगायचे. एवढेच काम भिमाला होते. गाईच्या दुधाने व तालमीतल्या कुस्त्याने भिमा सांड बनला होता. तात्याचे स्वप्न पूर्ण करायचा विडाच त्याने उचलला होता. भिमा रोज नवनवीन पैलवाना सोबत कुस्ती खेळत असत. भिमाचे पिळदार शरीर व कुस्तीच्या डावाने गावातील एकही पोरगं भिमाच्या सोबत कुस्ती खेळायला तयार होत नव्हतं. भिमा आता कुस्तीतील पिळदार शरीराचा गुर गुरणारा पैलवान बारागावच्या पैलवानांना लोळवायला सज्ज झाला होता. अंबाबाईच्या देवळात चैत्र महिन्यात भरणारी यात्रा जवळ आली होती. या यात्रेत मानाच्या कुस्त्या खेळवल्या जातात. लय वर्षापासून ही परंपरा चालू होती. यावर्षी यात्रेतील मानाची कुस्ती जिंकून बारागावची मानाची चांदीची गदा तात्याच्या खांद्यावर द्यायची असा विडाच भिमाने उचलला होता. भिमा तालमीत सराव करून करून चांगलाच कसला होता. जशी जशी यात्रा जवळ येत होती तसा तसा भिमाचा गावात रुबाब वाढला होता. भिमा मानाची गदा जिंकल्यागत गावात मिरवत होता. तात्या गाईला सांभाळत पोरगं कधी मानाची गदा जिंकेल याकडे आस लावून बसले होते.

                बघता बघता यात्रेचा दिवस उजाडला. अंबादेवीच्या आजपासून यात्रेला सुरुवात झाली. सात दिवस चालणारी यात्रा कुस्तीच्या आखाड्याने चांगलीच रंगायची. आज यात्रेत आखाड्याचे नारळ फुटणार होते. पंचक्रोशीतील पैलवान, गावचे पाटील, सरपंच, सगळी मंडळी गावातील मारोतीच्या देवळासमोर जमायला लागली. कुस्तीचा आखाडा नारळ फोडून सुरू होणार होता. भिमा गावातील काही पैलवाना सोबत देवळासमोर आला. पंचक्रोशीतील अनेक पैलवान सुद्धा आखाड्याच्या मानाची गदा जिंकायला हजर होते. सगळी मानाची माणसं हजर झाली. गावचे सरपंच आबाजीराव पाटील यांना नारळ फोडण्याचा मान मिळाला होता. सरपंच नारळ घेऊन आखाड्याच्या मैदानात आले. मैदानाच्या मधोमध या वर्षी दिली जाणारी मानाची चांदीची गदा ठेवली होती. सरपंचांनी गुलाल उधळण केली. एका दगडावर नारळाला आपटून नारळाचे दोन भाग केले. मानाची गदा उचलून आखाड्याला एक रिंगण घातले. आखाडा गुलालाने रंगला होता. आखाड्याच्या अवतीभोवती जमलेली माणसं गुलालाने रंगली होती. आखाड्यासाठी आलेल्या पंचक्रोशीतील पैलवानांना अनेकांनी गुलालाने माखले होते. भिमा सुद्धा त्याच्या मित्रासोबत आखाड्याच्या बाहेर उभा होता. एका मित्राने मूठभर गुलाल आणुन भिमाच्या अंगावर उधळणार तेवढ्यात भिमानी त्याचे दोन्ही हात घट्ट धरुन त्याला रोखले. भिमाची कावरी बावरी नजर आखाड्यातील चांदीच्या गदेला न्याहाळत होती.

भिमा म्हणाला, “अरे गड्यांनो ही चांदीची गदा खांद्यावर घेतल्याशिवाय गुलाल नाही अंगावर घेणार. यंदा आखाडा गाजवल्याशिवाय नाही करायचा गाजावाजा.”

“या भिमाने कुस्तीचा भांग प्यायला. आखाड्यातील पैलवानाला मातीत लोळल्याशिवाय गुलाल अंगाला लावणार नाही.” भिमा मोठ्या अवेषाण बोलत होता. यंदा भिमाने तालमीत लय घाम गाळला होता. पोळ्याच्या बैलागत कुस्ती खेळण्यासाठी भिमा फुकांरत होता. आखाड्यात कधी पैलवान मिरवणार व मी त्याच्या पाठीला कधी जमीन दावतो असे भिमाला झाले होते. सरपंचानी मानाची गदा आखाड्यात वाजत गाजत मिरवली व आखाड्याच्या बाहेर पंचाजवळ सुपूर्द केली. आखाड्यात एकच जल्लोष सुरू होता. थोड्याच वेळात मानाची कुस्ती लावून यावर्षीच्या कुस्तीच्या आखाड्याला सुरुवात होणार होती. पहिलीच मानाची कुस्ती कोणाला खेळायला मिळणार याकडे सगळ्या गावाची नजर लागली होती. सरपंचांनी आखाड्यातील पैलवानावर नजर फिरवली व शेजारच्या गण्या पैलवानाला आखाड्यात बोलावले. गण्या पैलवान क्षणाचाही विलंबन न लावता दंड थोपटत आखड्यात आला. सरपंचांनी गण्या पैलवानाचा हात धरून आखाड्याला चक्कर मारली. पुन्हा एकदा सगळ्या आखाड्यात नजर फिरवली व भिमा पैलवानाच्या नावाचा पुकारा केला. भिमा पैलवान नाव ऐकताच आखाड्यात एकदम जीव आला. लोक जोरजोरात ओरडू लागली. शिट्या वाजून मोठमोठ्याने भिमाच्या नावाच्या घोषणा देऊ लागली. भिमा आखाड्याच्या काठावर आला. खाली वाकून आखाड्यातील माती कपाळावर लावत मांडी वाजवत सरपंचाच्या बाजूला घेऊन उभा राहिला. सरपंचाने हात उंचावून भिमाला आखाड्यात मिरवून आणले. दोघांच्या हातात हात देत कुस्तीला दुजोरा दिला. भिमाने गण्या पैलवानाच्या हातात हात दिला. दोघांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवला व हात उंचावून उपस्थित लोकांना अभिवादन केले. एकदाची कुस्ती सुरू झाली. सकाळपासून डोळ्यात तेल घालुन बसलेल्या माणसांनी आखाड्यात एकच जल्लोष सुरू केला. कुस्ती पाहणारी माणसं मोठमोठ्यांनी ओरडू लागले कुणी शिट्ट्या फुकु लागली. रेड्याच्या टकरी गत दोघांनी डोके एकमेकांना भिडवली. हाताच्या मुठी आवळल्या व दोघे एकमेकांना ढकलू लागले. भिमा हळूहळू ढकलत होता मध्येच दोन पावलं मागे सरकत होता. गण्या पैलवानाची ताकद आजमावत होता. भिमा स्वभावाने चपळ होता. कुस्ती सुद्धा चपळाईने खेळायचा. भिमाने गण्या पैलवानाला ढकलायला भाग पाडले व स्वतः अंग थोडे सैल केले. गण्या लगेच भिमावर तुटून पडणार तेवढ्यात भिमाने पायाची कडी केली. गण्या पैलवानाचा पाय पायात अडकवला व त्याला अलगद उचलून जमिनीवर आदळले. गण्या पैलवान जमिनीवर पडतात आखाड्यातील मातीचा धुराळा उडाला. लोकांनी एकच गोंधळ उडवला. भिमा… भिमा… म्हणत मैदानावर एकच कल्ला केला. पोरांनी भिमाला खांद्यावर उचलून घेऊन आखाड्याला फेरा मारला. अंबाबाईच्या यात्रेतील कुस्तीच्या आखाड्याला एकदाची सुरुवात झाली. भिमाने कुस्ती जिंकून आखाड्यात जीव आणला होता. गावच्या सरपंचाची भिमाच्या पाठीवर थाप मारत, विजयाचे नारळ दिले. भिमाने पटकन खाली वाकून सरपंचांच्या पायाला हात लावत आशीर्वाद घेतला. भिमाने तात्याच्या संस्काराची शिदोरी जपली होती. भिमा तात्याचे संस्कार कुस्ती येवढेच जिवापाड जपायचा. कुस्तीचे जिंकलेले नारळ घेऊन भिमा मित्राबरोबर आखाडा सोडून घराकडे निघाला. पहिल्या रिंगणातील कुस्ती जिंकून भिमा पुढच्या रिंगणात उतरला होता. भिमाचे सोबती आज जाम खुश होते.

“भिमराव जमवलं बर का, पहिलीच कुस्ती जिंकून धुमधडाक्यात सुरुवात केली.”

“यंदा मानाची चांदीची गदा मिरवता तुम्ही गावभर.”

“ते तर करायचच भावा.”

“त्यासाठीच एवढा घाम गाळलाय, शरीराची पिळदार दोरी उगाच नाही केली.”

“तात्याच्या खांद्यावर मानाची चांदीची गदा मिरवायची म्हणजे मिरवायची…! शपथच आहे आपली तशी.”

फुसकरत भिमा मित्रांना सांगत होता. बोलत बोलत भिमा मित्रासंग घराच्या दारात पोहोचला.

                                   आज यात्रा सुरू झाल्यामुळे तात्या सकाळीच रानात जाऊन आले होते. अंगणातच सवंगड्या सोबत, काही यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत गप्पा मारत बसले होते. भिमाने तात्याच्या पायावर मुंडके ठेवून नारळ तात्याच्या हातात दिले. तात्यांनी पाठीवर थाप मारत म्हणाले, “असाच खेळत राहा पोरा.”

“एक दिवस या पंचक्रोशीला या तात्याच्या पोराची ओळख करून दे.”

“अहो तात्या ते तर पोरगं करणारच आहे.” बाजूला बसलेले पाहुणे म्हणाले.

“तुमचा भिमा फार गुणाचा आहे हो.”

“अहो पाहूणं कुस्ती जिताया सोपी आहे, पण डोक्यात जायला नको.”

“कुस्ती डोक्यात शिरली की पैलवानाचा मारकुट्या गडी व्हायला वेळ लागत नाही.”

पाहुणे मान हलवतच म्हणाले, “ते खरं आहे बरं का?”

पोरांनी कुस्तीला लय जपलं पाहिजे. कुस्ती म्हणजे ताकदीचा भांडखोरपणा करायचा खेळ नाही. भिमा आपला तात्या व पाहुण्यांचे बोलणे ऐकत उभा होता.

“अरे पोरा गप्पा काय ऐकत उभा राहिला. जा आता आंबाबाईच्या देवळात.”

“हे नारळ फोडून तिचा चांगला आशीर्वाद घेऊन ये.”

“पुढच्या फेरीत पैलवानांना लोळवायला ताकद दे म्हणा.” तात्या बोलतच होते तोपर्यंत भिमा मंदिराकडे निघाला. भिमाने कुस्ती जिंकल्याची आज गावभर चर्चा होती. गावातील लोकांना भिमाचा अभिमान होता. मानाची चांदीची गदा आपल्याच गावाला मिळाली पाहिजे असे सर्वांना वाटायचे. पण गावातील काही तात्याच्या विरोधातील लोक भिमाला टोचून सुद्धा बोलायचे. भिमाने कुस्ती जिंकली की काहींच्या पोटात दुखायचे. तात्याच्या पोराचे भिमा पैलवान म्हणून नाव मोठे झाले नाही पाहिजे यासाठी काही जण झटायचे. भिमा मंदिराच्या पायरीवर तोच गावातील सावकाराने त्याला अडवून बोलायला सुरुवात केली.

“भिमराव नीट खेळा आखाडा, नाहीतर गावाची इज्जत घालसाल.”

“मग तुमच्या या तरणाबांड शरीराला घालावे लागेल उन्हात वाळत.”

भिमानं हे शब्द ऐकताच भिमाची छाती फुगली, हाताच्या मुठी वळल्या व चेहरा लालभडक झाला. सावकाराला आत्ताच्या आता उचलून मातीत लोळवावे व कुस्तीची माती चारावी. असा मनातून राग आला होता पण पहिल्याच कुस्तीच्या आनंदाला गालबोट नको म्हणून भिमाने रागा आवरला.

तात्या पुन्हा ओरडतील, “माजला का भिमा? कुस्ती शिरली वाटतं डोक्यात.”

आपल्या तात्याच्या इज्जतीला घाबरून भिमा लालबुंद डोळे वटारून पायऱ्या उतरला व नीट घरी पोहोचला. तात्या जास्त मनाला लावून घेतील म्हणून भीमाने घरी विषय काढणे टाळले. रात्री पोटभर भाकरी खाऊन भिमा जमिनीला लोळला. एक दिवस या पैलवानाची औकात नाही सावकाराला दावली तर नाव भिमा लावणार नाही. मनाशी पुटपुटत असतांना भिमाला डोळा लागला.

                  जत्रा भरगच्च भरली होती. पंचक्रोशीतील माणसं दर्शनाला व आखाडा बघायला गर्दी करू लागले होते. आखाड्यात नवनवीन पैलवान दाखल होऊ लागले होते. नवीन पैलवान आला की त्याची चर्चा लोकांच्या ओठावर नाचायची. शेवटी नव्याचे कुतूहल सर्वांना असायचे. कुस्ती कशी रंगणार, कोण कुणाला माती दावणार. लोक मोठ्या आशेने आखाड्यात येऊन बसायचे. बघता बघता आखाड्याला तीन दिवस उलटले. लहान मोठ्या भरपूर कुस्त्या झाल्या. अनेक नवखे पैलवान कुस्ती खेळुन मोकळे झाले. आता तगडी नावाजलेली मोठी मोठी पैलवान बाकी होती. पुढच्या तीन दिवसात या सर्व पैलवानांना पाठीवर लोळवत शेवटच्या कुस्तीवर मजल मारायची होती. भिमा आता रोजच आखाड्यावर येऊन बसू लागला होता. प्रत्येक पैलवानाचा डाव मन भरून बघत होता. पैलवानाचे नवनवीन डावपेच व ताकतीचा अंदाज लावत होता. भिमाने बघता बघता पुन्हा चार पैलवालांना लोळवले. कुस्तीचा आखाडा आता रंगात आला होता. आता फक्त चार पैलवान शिल्लक राहिले होते. जे की आतापर्यंत पाच दिवसात कुस्ती जिंकत पुढे आले होते. आज आखाड्याचा सहावा दिवस. पंचाने पहिल्या दोन पैलवानाची कुस्ती पुकारली. दोन तगडे पैलवान एकमेकांशी भिडले. आगीच्या गोळ्याप्रमाणे एकमेकांना ताकतीचा करंट देत कुस्ती खेळू लागले. आज आखाड्याच्या भोवती श्वास घ्यायला जागा नव्हती एवढी प्रचंड गर्दी जमली होती. पिळदार शरीराची उंच पुरी पैलवान पाहून कुस्तीची मजा लुटायला सगळी माणसं जमली होती. शेवटी कुस्ती झाली शेजारच्या गावचाच पैलवान उद्याच्या कुस्तीसाठी निवडला होता. आता दुपारून भिमाची कुस्ती होणार होती. लोकांनी पुन्हा भिमाच्या नावाची ओरड सुरू केली. भिमा पूर्ण ताकतीने खेळला व कुस्ती जिंकून शेवटची मानाची कुस्ती खेळायला पात्र ठरला.

“उद्या सातव्या दिवशी दुपारी ही कुस्ती खेळवली जाणार होती. कुस्तीच्या आखाड्यात एका माणसाने ओरडून सांगितले.”

“ऐका हो…! ऐका…! उद्या दुपारी शेवटची मानाची कुस्ती खेळवली जाणार आहे. तरी सर्व लोकांनी कुस्ती पाहायला आखाड्यात जमावे हो….”

“उद्याची कुस्ती या गावचा भिमा पैलवान व पंचक्रोशीतील सारवाडी गावचा हणमंत पैलवान यांच्यात मानाची कुस्ती होणार आहे. जो कोणी कुस्ती जिंकेल त्याच्या खांद्यावर ही मानाची चांदीची गदा दिल्या जाईल हो…”

आजचा आखाडा आता या ठिकाणी संपला आहे. असे जाहीर होताच माणसांनी घरी जायला सुरुवात केली. आज अंबाबाईच्या जत्रा मध्ये गावात तमाशाचा फड आला होता. त्यामुळे गावात फक्त तमाशा आणि उद्याची कुस्ती येवढीच चर्चा सुरू होती. उद्या जत्रा संपणार होती व आखडा सुद्धा उद्याच्याने संपणार होता. यावर्षी जत्रा कुस्तीच्या आखाड्याने चांगलीच रंगली होती.

“सरपंचाने गावात दवंडी पेटवली. उद्याची मानाची शेवटची कुस्ती खेळवली जाणार आहे. पंचक्रोशीतील पैलवान, पाटील मंडळी, सावकार येणार आहे तरी गावातील समद्या लोकांनी कुस्ती पाहायला यायचे.”

“तर दुसरीकडे तमाशाचा भोंग्या फिरत होता.”

“ऐका मंडळी तुमच्या गावात घेऊन आलोया  तमाशा, कलाकारांची जत्रा, लावणीची नजाकत आणि पोरींची जुगलबंदी  ते पण गण गवळणी सोबत.”

“पाहायला विसरू नका? तमाशा लोकनाट्य. “

दिवस मावळतीला आला. भिमा आंबाबाईच्या देवळात जाऊन घरी परतला. तात्यांच्या सोबत पंगतीला बसला. दुधात भाकरी कुस्करून फुरका मारत भिमा बोलू लागला.

“तात्या तुम्ही उद्या कुस्ती बघायला या बरं का?”

“सकाळी लवकर जनावराला चारापाणी करून थेट आखाड्यात या.”

“उद्याची शेवटची कुस्ती हाय. काय जरी झालं तरी उद्याची कुस्ती मी जिंकणार म्हणजे जिंकणारच.”

“अरे भिमा बस…! लय हवेत उड्या मारू नकोस.”

“तू कुस्ती जिंकणार आहेस म्हणतो. मग तो दुसरा पैलवान काय कुस्ती हरायला थोडी खेळणार आहे.”

“त्याने सुद्धा लय आखाडे गाजवलेले आहे भिमा.” हणमंत पैलवान नावाजलेला आहे. तो सुद्धा पूर्ण ताकतीने कुस्ती खेळणार, त्यामुळे समजदारीने घे.”

“डोकं शांत ठेव. कुस्ती काही फक्त शरीराच्या ताकदीवर जिंकता येत नाही त्यासाठी बुद्धीचा सुद्धा वापर करावा लागतो. कुस्ती एक कला आहे, शारीरिक कसरत आहे. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास या जोरावर खेळणारा हा खेळ आहे. खुराक खाऊन तालमीत गाळलेला घाम व पिळदार लसलशीत शरीर काय कुणावर गुरगुर करायला तयार करायचे नसते. हा कष्टाचा घाम कुस्ती जिंकायला, आखाड्यातील प्रत्येक माणसाची मनं जिंकायला असतो.”

“एक लक्षात ठेव कुस्ती अभिमान वाढवते आणि शरीर अहंकार.”

“अभिमान समाजात व लोकांच्या मनावर घर करतो तर अहंकार अपयशाची चव दाखवतो. कुस्तीचा अभिमान बाळग अहंकार नको.”

“आले का ध्यानात भिमा.”

भिमा तात्याच्या समोर मान हलवून होकार देत होता. बापाची माझ्याविषयी तळमळ व कुस्तीवरचे प्रेम पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी पटकन तात्यांना कडकडून मिठी मारली.

“तात्या हा तुमचा भिमा कुस्तीला जिवापाड जपेल तुमची मान आणि कुस्तीची शान कधीच कमी होऊ देणार नाही. हा शब्द मी तुम्हाला देतो.”

“अरे बस… बस… पोरा..! मला माहित आहे तुझे कुस्तीवर किती प्रेम आहे ते.”

“आता हे प्रेम फक्त दोन हात आहेत तोपर्यंत तरी टिकून आहे म्हणायचं.” उद्या या हातात मात्र नवीन दोन हात आले म्हणजे कळेल प्रेम कसे अर्ध्य अर्ध्य होते.

“तात्या आता दोन हात कशाला नवीन येतील. दोन हात आहे की मजबूत कुस्ती खेळायला.”

अहो भिमराव नवीन दोन हात म्हणजे, “बायको आणावी लागेल की तुम्हाला…!”

“तात्या काही पण गंमत काय? भिमा लाजतच ताटावरून निघून गेला.”

तात्या मोठ्याने हसतच म्हणाले, “लाजले गड्या पैलवान आमचे.”

तात्या पण पोराच्या जिंकण्याने भारावून गेले होते. तात्याला विश्वास होता उद्याची कुस्ती भिमा नक्की जिंकेल. कारण लहान पणापासून भिमाचा जिद्दी स्वभाव व कुस्तीवरचे प्रेम त्याला कधीच आवरले नाही. चला आता आजची रात्र गेली की उद्या भिमाची कुस्ती पाहायला मोकळे. उद्या गुरांची सोय लावून रानातून थेट आखाड्यात जाऊन बसुया. पोराचे कौतुक करायला बाप नको का तिथे? तात्या मनाशीच फुटपुटत अंथरुणावर जाऊन पडले. भिमा सुद्धा उद्याच्या कुस्ती विषयीचे डावपेच मनात घोळत अंथरुणावर पडून होता. उद्याची कुस्तीची मनात तालीम सुरू होती. मध्येच ती पांढरी शुभ्र चकाकणारी चांदीची गदा डोळ्यासमोर यायची. भिमा विचार करू लागला ही डोळ्यासमोर येणारी गदा उद्या खांद्यावर आली पाहिजे.

“तेवढ्या दारावरची कडी वाजली.”

“भिमा ये भिमा”

“लगेच मागून असा आवाज आला.”

कोणीतरी दारावर आले हे ओळखून भिमा पटकन उठला व दारावरची कडी उघडली. भिमाला पाहून दारावर आलेली पोरं म्हणाली,

“ भिमा तुला सावकाराने वाड्यावर बोलावले आहे.”

“आत्ता”

“हो आताच्या आता”

“काय काम एवढ्या रात्री”

“ते आम्हास ठाऊक नाही.”

“पण तू आज कुस्ती जिंकलास असे कौतुक करत होते सावकार तुझ्याबद्दल.”

“बर…बर… येतो मी, तुम्ही व्हा पुढे…!”

“असे म्हणून भिमा घरात येऊन तात्याला उठवु लागला.”

“तात्या….! तात्या….!”

“मी काय म्हणतो?” मी जरा सावकाराच्या वाड्यावर जाऊन येतो.

“एवढ्या रात्री…!”

“आणि कशापायी. काय काम आहे.”

“काम काय ते नाही सांगितले. त्यांच्या वाड्यावरची पोरं आलती बोलवायला.”

“एवढ्या रात्री…! सावकाराने तुला कशाला बोलावलं असेल गड्या? असे म्हणून तात्या विचारात पडले.”

“अहो तात्या येवढा विचार काय करता. येतो मी जाऊन. बघू काय म्हणत्यात सावकार ते.”

“तसं नाही भिमा? हा सावकार म्हणजे लय खराब माणूस. याला रिकाम्या उचापती लय येतात. जिथे नाही तिथे टांग आडवी करायचा शोक आहे या सावकाराला.”

“याला दुसऱ्याचा आनंद खपत नाही. जपून जा भिमा व लवकर परत ये.”

“रात्र वैऱ्याची असते. आपण जपलेलं बरं असतं….! हे लक्षात ठेव.”

तात्याचे बोलणे सुरू होतेच तोवर भिमा पायथन घालून सावकाराच्या वाड्यावर जायला निघाला. रस्त्याने जाताना भिमाला प्रश्न पडला. सावकारांनी एवढ्या रात्री आपल्याला कशाला बोलावले असेल. काहीतरी महत्त्वाचे काम असल्याशिवाय बोलवणे येणार नाही. विचारमग्न होऊन भिमा चालत होता. मनात विचार सुरू होता तोवर पायाने सावकारांचा वाडा गाठला. वाड्यात आत शिरलो तर बैठकीत सावकार व काही माणसं बसून होती. भिमा बैठकीच्या समोर येताच सावकाराने आवाज दिला.

“ये भिमा बस इथं.”

“आजची कुस्ती जिंकली म्हणे तू”

“हो”

“मस्त झालं. आपल्या गावाच्या पैलवान अंतिम कुस्ती खेळणार.”

“बरं दुसरा पहिलवान कोण आहे? जो उद्या तुझ्यासोबत कुस्ती खेळणार.”

“हणमंत पैलवान…! शेजारच्या गावाचा आहे.”

“भिमा उद्याच्याला कोण कुस्ती जिंकणार म्हणायचं मग आम्ही.”

“मी जिंकणार आहे उद्याची कुस्ती. मोठ्या तावातावाने भिमा बोलू लागला.”

“बर हणमंत जिंकला उद्याची कुस्ती तर?”

“कसं काय जिंकेल हणम्या…! या भिमाने काय मरेल मायचं दूध पिलेलं नाही.”

“सावकार या अंगात लय रग भरून आहे व आंबाबाईचा व आमच्या तात्याचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. उद्याची कुस्ती मीच जिंकणार आहे.”

“भिमाच्या बोलल्याने सावकाराच्या डोक्यात मुंग्या आल्या. एकदम लालबुंद डोळे करून सावकार रागात एकदम उभा राहिला व भिमाकडे बोट करून मोठ्याने बोलू लागला.”

“ये भिम्या जास्त नाटकं करू नको. लई पहिलवानाचा माज दाखवू नको आम्हाला.” तुझ्यासारखे लय पैलवान गार केले आम्ही.

“हणमंत पैलवान आमचा नातलग आहे. त्यामुळे तो जिंकला पाहिजे यासाठी उद्याची कुस्ती तू हरायची.” हणम्याला कुस्ती जिंकू द्यायची. आणि हो…! हे कुणालाही कळले नाही पाहिजे. की तू मुद्दामून कुस्ती हरला ते. यासाठी तुला किती पैसे, चांदी पाहिजे ते सांग व घेऊन जा. परंतु उद्याची कुस्ती तू हरला पाहिजे हे मात्र नक्की. सावकाराने भिमाला चांगलाच दम भरला. भिमा किती तरी वेळपासून गुप गमानं नुसतं ऐकत होता. त्याला काय सुरू आहे हेच कळतच नव्हतं. डोळ्यात अंधार पडल्यागत नुसता चूप होता.

“सावकार ते जमणार नाही.” भिमाने मोठ्या स्वरात सांगितले.

“कसे काय?”

“कुस्ती हा खेळ आहे तो खेळूनच ठरेल कोण जिंकणार ते?”

“हणमंत तुमचा नातलग असला म्हणून मी कुस्तीशी बेईमानी करायची…! हे अजिबात जमणार नाही.” बेईमानी आमच्या रक्तात नाही.

“आणि हो…!”

“कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही हा भिमा.”

असे म्हणून भिमा बैठकीतून जायला निघाला. सावकाराने भिमाला लय समजावले. पण भिमा काही सहजा सहजी पटणारा नव्हता. भिमा आता बैठकीतून बाहेर पडला तर लय बोंबाबोंब होईल. सावकारांनी बैठकीतील आपल्या माणसांना सांगितले.

“ये बघताय काय? पकडा भिमाला.”

“दोरखंडाने आवळा तसा तो ऐकणार नाही.”

 दहा-बारा माणसांनी भिमाला कैचीत पकडले. भिमा खूप ताकतीने अंग झटकून त्यांना विरोध करत होता. पण जास्त माणसं असल्याने काहीच करता येत नव्हते. भिमाच्या डोळ्यावर कापड बांधले व हातपाय दोरीने बांधले. भिमाला चोरागत बांधून टाकले होते. सावकार म्हणाला उचला याला व गुपचूप बैलगाडीत माझ्या मागे घेऊन या. तोंडात कापड कोंबल्यामुळे ओरडता सुद्धा येत नव्हते. अंधारात कुठे घेऊन चालले काहीच कळत नव्हते.

                       थोड्यावेळाने भिमाला तमाशाच्या एका खोपीत आणून टाकले. गावाच्या बाहेर मोकळ्या जागेत तमाशा भरला होता. तंबूत गर्दी जमली होती. तमाशा सुरू होणार होता. आपआपल्या खोपीत बाया कापडं बदलत होती. बाया तमाशात नाचण्यासाठी तयार होत होत्या. थोड्यावेळाने बाया तयार होऊन तंबूत आल्या व तमाशाला सुरुवात झाली. भिमाला काय सुरू आहे काहीच कळत नव्हते. खोपीत सावकार व एक माणूस काहीतरी कुजबूज करत होते.

“मामा समजले का? तुम्हाला काय करायचे ते.”

“तुमच्या तमाशातील त्या पोरीला नीट समजावून सांगा.”

“काम फत्ते झाले पाहिजे.”

“काम झाल्यावर वाड्यावर चुपचाप तुमचा माणूस पाठवून पैसे घेऊन जा. आणि रात्रीच तमाशा गुंडाळून गाव सोडून निघून जा.”

“कुणालाही शंका यायच्या आत हे सर्व घडलं पाहिजे. यात जर काही बेईमानी केली तर गाठ सावकराशी आहे. हे लक्षात ठेवा.”

असे म्हणून सावकार व तो माणूस खोपीतून बाहेर पडला. तंबूत गण गवळण संपून लावणीला सुरुवात झाली होती.  भिमा नुसता फुसफुसणाऱ्या नागासारखा वळवळत होता. तेवढ्यात खोपीत एक बाई आली. ती भिमाला पाहून म्हणाली,

“पैलवान नका येवढी आडे वेढे घेऊ.”

“मी सोडते तुम्हाला.”

त्या बाईने भिमाला दोरीपासून वेगळे केले. डोळ्यावर बांधलेले कापड व तोंडातील कापड काढले. भिमा आता मोकळा झाला होता. पटकन उभा राहून इकडे तिकडे पाहून त्या बाईला विचारू लागला. 

“कुठे आहे मी?”

“अहो पैलवान तुम्ही तमाशाच्या तंबूतील बायकांच्या खोपीत आहात.”

“तू कोण आहेस?”

“मी तमाशातील नाचणारी शेवंता.”

“शेवंता”

“हो… हो… शेवतां”

“नाव ऐकुन भिमा शेवतांकडे एकटक नजरेने बघतच राहिला.”

“शेवंता खरीच शेवंतीच्या फुलासारखी गोरीपाण, उंचीपुरी, देखणी, धारदार नाकाची, टपोरी डोळे, सडपातळ देहाची, लसलसीत देखणी तरुणी नऊवारीत नटून उभी होती. सौंदर्याच्या मादक देहाला पाहून भिमा स्तब्ध झाला होता.”

“दुसरीकडे शेवंता भिमाला न्याहळत उभी होती. पिळदार शरीराचा, गोरापान, ओठावर मिशीचा झुपकेदार आकडा असलेला तरणाबांड पैलवान उभा होता. भिमाला पाहता क्षणीच शेवंता जणू प्रेमात पडल्यागत न्याहाळत उभी होती.” घाबरलेला पैलवान पाहून शेवंता म्हणते,

“पैलवान तुम्हाला मला काहीतरी सांगायचे आहे.”

“पटकन सांगा की?”

“तो सावकार आमच्या फडाच्या मालकासोबत बोलत होता. तुम्हाला बदनाम करायचं कारस्थान रचलाय त्या सावकारानी. आमच्या फडाच्या मालकाला लय पैसे कबूल केलेत. तुम्हाला बदनाम करून टाकायचा डाव आहे त्यांचा. त्यांनी मला तुमच्यावर खोटा आळ घ्यायला सांगितलाय. तुम्ही माझी अब्रू लुटली असे ओरडून ओरडून तमाशातील लोकांसमोर तुमची बदनामी करायची सांगितली.”

“काय सांगतेस?”

“हो…  मला जे सांगितले तेच सांगते.”

“मी आणि अब्रु… ! कसं शक्य आहे.”

“मला काही सुचेनासे झाले”

“तुमच्यासारखा पैलवान कशापाई बदनाम करायचा ठरवलाय कुणास ठाऊक.”

“मी हात जोडून विनंती करते तुम्हाला…!”

“ तुम्ही पळून जा लवकर येथून.”

“नाहीतर मला तुमच्यावर खोटा आळ घ्यावा लागेल.”

“नाही घेतला तर मालक मारून टाकतील मला.”

“आणि हो संभाळून जा…! नाही तर सावकाराची माणसं तुम्हाला पकडून मारून टाकतील.”

हे ऐकून भिमाच्या पायाखालची जमीनच हादरली. भूकंप झाल्यासारखं पुरा हदरला होता. काय ही वेळ येऊन ठेपली. असे कसे झाले. भिमाला काय करावे काही समजत नव्हते. भिमाने हात जोडून शेवंतीला विनंती केली मी तसला माणूस नाही. मी पैलवान आहे. मी बाई माणसांचा आदर करतो. शेवंता तूच मला वाचव. सावकारांनी सूडबुद्धीने मला कुस्तीत हरवायचे ठरवले. मी तयार होत नाही म्हणून हा डाव रचला त्या नास्तिक माणसाने.

“शेवंताने हळूच खोपीच्या फठीतून बाहेर डोकुन पाहिले तर काही माणसं काठ्या घेऊन उभी दिसली.” 

“बापरे…! पैलवान बाहेर तर तुमच्या जीवाला खूप धोका आहे. आणि आत मधी माझ्या जीवाला.”

“मी जर सांगितल्या प्रमाणे नाही केले तर माझा मालक मला जीवच मारीन. माझ्या जीवापेक्षा त्याला कागदी रुपयाची जास्त किंमत आहे.”

“शेवंता बिचारी तमाशात असून सुद्धा चांगली सुशील, सदगुणी मुलगी वाटत होती. तिच्या कडून खरं बाहेर पडलं.”

भिमाला काय करावे काहीच समजत नव्हते. आपण कसं बसं बाहेर पडलो तर आपला जीव वाचेल व बदनामी सुद्धा होणार नाही. पण माझ्यामुळे या निरागस शेवंताचा जीव मात्र जाईल. शेवंतीचा जीव वाचवायला गेलो तर मला बदनामीचा डाग आयुष्यभर अंगावर घेऊन जगावे लागेल. भिमा हात जोडून ढसाढसा रडू लागला. हे देवा…! काय तुझा गुन्हा केला मी? एवढ्या संकटात मला उभे केले. कुस्ती शिकलो व खेळत राहिलो हा गुन्हा केला का? भिमाच्या हाताला धरून शेवंता सावरू लागली.

“अहो पैलवान नका रडू. माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुमच्यावर हा डाग लागू देणार नाही. मी तुमच्यावर आळ घेणार नाही. ”

बोलताना शेवंताच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या. एका अनोळखी मुलीचा हा नम्र, शीलपणा पाहून भिमा भारावून गेला. आपल्या या कुस्तीच्या भानगडीत शेवंता नाहक बळी ठरत आहे. दोघांपैकी एकाचा जीव जाणार यात शंका नाही. हा सावकार पैशाच्या जोरावर एक तरी जीव घेईल. पैशाच्या घमंडीने आजपर्यंत गावभर माज करत आलाय हा सावकार. आता तर माझ्या कुस्तीच्या भीतीने त्याची फार झोप उडाली. मी जर कुस्ती जिंकली तर त्याचा पाहूणा हरेल व माझे पंचक्रोशीत नाव होईल. हे त्याला नकोय म्हणून त्याने हा सगळा डाव रचलाय. या डावात मात्र माझ्यामुळे तुझ्यावर संकट ओढावले शेवंता. नियतीने काय गाठ घातली. तुझा काहीच दोष नसतांना तुला हा त्रास सहन करावा लागतो.

“दोष कसा नाही म्हणता पैलवान. गरिबीचा व अनाथ असल्याचा भोग भोगते आहे. हा दोषच म्हणायचा बाकी काय?”

“थरथरत्या आवाजात शेवंता बोलली.”

“म्हणजे…! तुला आई बाप नाही.”

“नाही.”

“मी लहान असतानाच माझी मायबाप तमाशात काम करतानाच मला सोडून गेले. तेव्हापासून या तमाशातील बायांनी माझा सांभाळ केलाय व त्यांच्यासोबत या फडात कामावर घेऊन आल्यात.”

“शेवंता अनाथ असूनही येवढी गुणवान व शिलवान मुलगी आहे. गरीबीचा भोक अशा पद्धतीने भोगत होती. आता तर भिमाला काही सूचेना एकदम सुन्न होऊन तो पटकन खाली बसला.”

“शेवंता डोळे पुसत पुट पुटली अहो पैलवान ठरवा लवकर काहीतरी नाहीतर माझा मालक येईल.”

“शेवंता ठरवायचे काय त्यात तुझ्या जीवासाठी माझ्या बदनामीचा बळी जाऊ दे. नाहक तुझा बळी कशाला.”

“पहिलवान एक बोलू का?”

“बोल आता शेवंता तुझीच बोलण्याची वेळ आली.”

“पैलवान आपण दोघांचे जीव वाचवू.”

“ते कसे काय?”

“आपण येथून पळून जाऊ.”

“त्याने काय फरक पडणार शेवंता. बदनामीचा डाग तसाही लागणारच.”

“पण पैलवान बदनामीचा खोटा डाग लागण्यापेक्षा पळून जाण्याचा डाग कधी बरा.”

आणि हो, “मी तुमचा जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी म्हणतेया. लगेच माझ्यासोबत पळून चला नाही म्हणत.”

“एवढ्या संकटात सुद्धा निर्मळ मनाची शेवंता खरंच निर्मळ विचार करत होती. माझ्यासाठी स्वतःचे आयुष्य पोरकं करायला निघाली होती शेवंता.”

“खरंच किती निर्मळ आणि पवित्र मनाची ही स्त्री देवाने अशा नरकात जन्माला घातली.”

आजचा विचार हाच उद्याचा दिवस आता घडणार होता. शेवंता सोबत पळून गेलो तरी बदनामी. नाही गेलो तरी याही पेक्षा जास्त बदनामी. यात माझी कुस्ती मात्र गुरफटून कायमची मरणार. एका तमाशातील पोरीची इज्जत लुटणारा भिमा तात्याला तरी काय तोंड दाखवणार. तात्या या धक्क्यातून कसे जगतील या विचाराने भिमाचे डोके फार भनानले होते. त्यापेक्षा शेवंता सोबत भिमा पळून गेला एवढेच कानावर जाईल. असे काळे तोंड पाहण्याची वेळ तरी तात्यावर येणार नाही. भिमा ताटकन उभा राहिला. क्षणाचाही विलंब न करता शेवंताचा हातात हात धरून बोलू लागला. शेवंता या पैलवानाच्या हातात तुझ्या रूपाने पहिल्यांदा एका स्त्रीचा हात आलाय. हा विश्वासाचा हात मी कायमचा धरायचा ठरवलाय. लोक काय म्हणतील याची मला परवा नाही तू फक्त नाही म्हणू नको. शेवंता भिमाकडे एकटक पाहत उभी होती. दोन्ही डोळ्यातून पाणी घळाघळा गळत होते. ती काहीही न बोलता पटकन भिमाला बिलगली. तिच्या स्पर्शाने भिमाला समजले की शेवंतीचा होकार आहे. ती आपल्या सोबत आयुष्यभर राहायला तयार आहे. शेवंता आता इथून बाहेर कसे पडायचे पटकन ठरव.

शेवंताने पटकन एक लुगडे भिमा समोर फेकले आणि म्हणाली, “पैलवान पटकन तुम्ही हे लुगडे नेसा.”

“बाईच्या वेशात तुम्हाला कोणी ओळखणार नाही. व माझ्या मागे मागे चला तंबूच्या पाठीमागे घेऊन जाते तुम्हाला. तिथून पुढला रस्ता नाही माहित मला.”

“शेवंता माणसाच्या आयुष्यात कधी कोण पुढे आणि कधी कोण मागे राहील सांगता येत नाही. कुस्तीत फक्त पुढे जायची माहीत होते असे एक दिवस कुस्ती पासून दूर पळावे लागेल स्वप्नातही वाटले नव्हते.”

“भिमाने पटकन ते लुगडे नेसले, पदराने तोंड झाकून घेतले.”

“शेवंता या पैलवानाला लंगोट नसायची सवय होती आता नशिबाने लुगडं नेसायला लावले. नशिबाचे भोक बाकी काय?”

“भिमा ढसा ढसा रडू लागला.”

“शेवंताने भिमाने हात धरला व ती बोलु लागली.”

“पैलवान या शेवंतीचा जीवात जीव असेपर्यंत हा हात सोडणार नाही वचन देते तुम्हाला. उठा चला आता माझ्या मागे रडत बसु नका.”

शेवंताच्या मागे भिमा आयुष्यातील नको असलेली पावले टाकत निघाला. दोघांनी कोणाला समजायच्या आत तंबूतून पळ काढला. थोड्यावेळात तंबूतील एक मावशी खोपीत बघायला आली. खोपीत कोणीच दिसत नाही कापड उचलून बघितले. बया… बया… “शेवंती पळाली की काय?” मावशी ओरडतच फडाच्या मालकाकडे पळत आली आणि सांगू लागली.

“मालक शेवंता पळाली...!”

“काय? शेवंती पळाली.”

“आणि तो पैलवान”

“ पैलवाना सोबतच शेवंता पळाली.”

“आता सावकाराला काय तोंड दाखवू. मालक चक्रागत पटकन खाली बसला.”

“माणसाला पाठवून सावकाराला बाजूला बोलावून घेतलं आणि सांगू लागला. तुमचा पैलवान आमच्या पोरीला घेऊन पळाला.”

सावकार मोठ मोठ्याने खदा खदा हसत म्हणाला, “काटा काढायच्या ऐवजी काटा खुदच निघून गेला म्हणायचा.”

“मामा बारीक तोंड करून काय उभे राहिलात. जा आता जाहीर करा.”

“ भिमा पैलवान तमाशातील पोरीला घेऊन पळाला.”

डोळ्यातील घळाघळा निघणाऱ्या आठवणींच्या अश्रूंनी हातातील आरशाला आंघोळ घातली होती. कौतिकरावच्या हसण्याने भिमाला आज मागील आठवणींनी उजाळून टाकले होते. मागे वळुन पाहतांना पैलवानाचा सोगांड्या कधी झाला कळते सुद्धा नाही.

🙏🙏

 ©®राजेंद्र शेळके

मो नं 9823425852

Sunday, 19 June 2022

तो असतो बाप..!

 शिर्षक:- तो असतो बाप. 

चाळणी सारखे झालेले बनीयन अंगात घालुन
पोराला मालक बनवायचे स्वप्न पाहणारा.....||1||
तो असतो बाप.

आयुष्यात गरीबीच्या काटेरी वाटेवर चालतांना
स्वप्नाची पायघडी घालणारा.....||2||
तो असतो बाप.

आयुष्य झिजवुन लेकरांसाठी आनदांची,
सुखी समाधानाची बाग फुलवणारा.....||3||
तो असतो बाप.

परिस्थितीला समाधानाची झालर पांघरुण
प्रत्येक श्वासाशी संघर्ष करणारा.....||4||
तो असतो बाप.

कष्ट आणि घाम गाळून कमावलेली
इमानदारीची प्रतिष्ठा गावभर मिरवणारा.....||5||
तो असतो बाप.

आयुष्यभर पोटाला चिमटा देऊन
लेकरांच्या मुखात चिमुटभर घास भरवणारा.....||6||
तो असतो बाप.

अभिमान व अहंकार नसलेला
सामान्य माणूस म्हणून जीवन जगणारा.....||8||
तो असतो बाप.

जबाबदारीच्या वाढलेल्या वेलीचा गुंता सोडवतांना 
अंथरुणावर खितपत पडलेला.....||9||
तो असतो बाप.

मावळतीला गेलेल्या सूर्याप्रमाणे एक दिवस कायमचा आठवणींचा अंधार पसरवून गेलेला..... ||10||
तो असतो बाप.


🙏🙏
राजेंद्र शेळके
9823425852

Saturday, 15 January 2022

कोरोना शाळा बंद करू शकतो? शिक्षण नव्हे!

कोरोना शाळा बंद करू शकतो? शिक्षण नव्हे! 

जगातील भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक देशात विविधता आढळते. तसेच शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण, व्यवसाय, तंत्रज्ञान, आरोग्य, शेती, नोकरी, उद्योगधंदे आदी गोष्टींमध्ये वेगळेपण दिसून येते. परंतु गेल्या दोन वर्षापासून जगातील अर्ध्यापेक्षा जास्त देशांमध्ये एक गोष्ट सारखी आढळून आली. ती म्हणजे कोरोना महामारी सारखी भयंकर आपत्ती. प्रगतीच्या चढाओढी मध्ये अनेक देश कोरोनाच्या संकटात अडकून पडली. यामुळे प्रगतीला चांगलाच अडसर निर्माण झाला. कोरोना दरवर्षी नव्या लक्षणासह एकामागून एक लाट घेऊन येत आहे. कोरोनाच्या आतापर्यंत दोन लाटा मोठ्या भयंकर रुद्र संकट घेऊन आल्या. त्यात मानवासह अनेक गोष्टींचे नुकसान झाले. त्यात प्रामुख्याने जिवितहानी, आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक, सामाजिक व शैक्षणिक अशा प्रकारच्या हानी देशात झाल्या आहे. या दोन्ही लाटांना देशाने समर्थपणे तोंड देऊन कोरोनाला रोखण्यात यश मिळवले. परंतु कोरोनाला पुर्णपणे घालवण्यात अपयश आले. आणि म्हणून पुन्हा नवीन रूप घेऊन कोरोनाची तिसरी लाट जगाबरोबर भारतात सुद्धा येऊन ठेपली. पुन्हा हळूहळू या तिसऱ्या लाटेचा प्रभाव सगळीकडे दिसू लागला. आतापर्यंत या तिन्ही लाटेत सर्वाधिक न दिसणारे असे मोठे नुकसान झाले ते म्हणजे शिक्षणाचे. देशाच्या प्रगतीत सर्वाधिक मोलाचा वाटा असणारा घटक म्हणजे शिक्षण. याच शिक्षणावर गेली दोन वर्षे सर्वाधिक दुष्परिणाम झाला. शिक्षणाची प्रक्रिया कोलमडून पडली. कोरोनाच्या भीतीने संसर्ग रोखण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून लॉकडाऊचा जन्म झाला. हा पर्याय सर्वात अगोदर शाळेंना लागू करण्यात आला. कारण येणारी पिढी, घडणारा तरुण वर्ग याच शाळा, कॉलेज, महाविद्यालया मध्ये शिकत आहे. मनुष्य जन्मा मध्ये सर्वाधिक महत्त्व जगण्याला दिले जाते. मनुष्य जगला तरच देश टिकेल. आणि म्हणून सहाजिकच आतापर्यंत दोन्ही लाटेत सर्वाधिक काळ कोरोनाच्या भीतीने शाळा, कॉलेज, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. याचा दुष्परिणाम मुलांच्या शिक्षण पद्धतीवर, जडणघडणीवर, शैक्षणिक संस्कारावर झाला. मुले स्वभावाने रागीट, आक्रमक, एकेखोर, बंड होत गेली. अभ्यास सोडून इतर गोष्टीकडे आकर्षित झाली. मोबाईल, टीव्ही, कार्टून, मोबाईल वरील गेम्स, खेड्यापाड्यात घराबाहेरील सायकल, गोट्या, टायर आदी खेळ, भांडण, व्यसन, गुन्हेगारी अशा गोष्टींकडे मुलं, तरुणवर्ग खेचला गेला. समाज, पालक, शिक्षणतज्ञ यांना पुन्हा एकदा शाळा, शिक्षक, शिक्षण या गोष्टींचे महत्त्व व गरज पटली. प्रत्येकाच्या जीवनात शाळा, शिक्षक, आणि शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे कोरोना व लॉकडाऊन मुळे दिसून आले. कोरोनाची दुसरी लाट देशातुन ओसरली तसे हळूहळू सरकारने महाविद्यालये, कॉलेज, शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. पुन्हा एकदा राज्यभर शाळा सुरू झाल्या. शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचायला सुरुवात झाली. घराबाहेर दंगामस्ती करणारी मुलं शाळेत शिक्षण घेऊ लागली. ज्ञान व शिस्त यांची सांगड घालून पुन्हा एकदा गुरु शिष्याचा ज्ञानदानाचा यज्ञ सुरू झाला. सर्व सुरळीत सुरु असताना ओमिक्रॉन नावाच्या कोरोना रूपाने तोंड वर काढले. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव हळूहळू वाढत गेला. तिसऱ्या लाटेच्या भीतीने सरकारने शाळा बंद केल्या. कोरोनाच्या भीतीने राज्य सरकारने नियमावली जाहीर केली. यामध्ये अर्ध्या क्षमतेने अनेक गोष्टी बंद केल्या. शाळा, कॉलेज, महाविद्यालये मात्र पूर्ण क्षमतेने बंद केली. यात राज्य शासनाचा हेतू हा लहान मुलं, तरुण, युवक यांना या कोरोनाच्या धोक्यापासून दूर ठेवणे हा होता. परंतु पालक, समाज यामधून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. शाळा बंदला विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाज यांनी तीव्र विरोध दर्शवला. कारण शिक्षणाची प्रक्रिया बंद पडता कामा नये हा प्रामाणिक हेतू या सर्वांचा यामागे होता. परंतु राज्य शासन शाळा बंद वर ठाम आहे. कोरोना शाळा बंद करू शकतो? शिक्षण नव्हे! हे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांनी समजून घेतले पाहिजे. शाळा जरी बंद झाल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण हे कालही सुरू होते आजही सुरू आहे व उद्याही सुरू राहील. फक्त शिक्षण प्रक्रियेतील बदल परिस्थितीनुसार व वेळेनुसार स्वीकारणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालये बंद झाली म्हणून शिक्षण बंद होत नाही. शिक्षण हे ऑनलाईन, स्वयंअध्ययन, स्वाध्याय अशा पद्धतीनुसार घेत राहणे महत्त्वाचे आहे. संकटाला प्राप्त परिस्थितीनुसार सामोरे जाणे हा माणसाचा स्वाभाविक गुण आहे. कोरोना, सरकार, लॉकडाऊन या सर्वांच्या भूमिकेतून जाताना विद्यार्थी आणि पालकांनी स्वयम शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आजच्या परिस्थिती नुसार मुलांना शिक्षण कसे व कुठून मिळेल याला अधिक महत्त्व आहे. प्रत्येक बालक शिकले पाहिजे यासाठी शिक्षण हक्क कायदा 2009 करण्यात आला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण देणे गरजेचे आहे तसेच शिक्षण घेणे सुद्धा बंधनकारक आहे. शिक्षण ही सामाजिक गरज आहे त्यापेक्षा अधिक ती स्वतःची गरज आहे. हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. शिक्षण ही स्वतःची गरज म्हणून आपण स्वीकारले तर अनेक आव्हानांचे व समस्यांचे ते उत्तर ठरेल. कोरोना ने शाळा बंद केल्या परंतु शिक्षण सुरू आहे. हे पालकांनी मुलांना समजावून सांगावे. "सारे शिकूया पुढे जाऊया" हा निर्धारच शिक्षण प्रक्रियेला व सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे.

राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु. पो. किनगाव राजा
ता. सिंदखेड राजा
जि. बुलडाणा
मो. न. 9823425852

Thursday, 13 January 2022

विचारांची श्रीमंती

 




*विचारांची श्रीमंती*

जीवनातील विचारांची श्रीमंती वाढवण्यासाठी विचारांची श्रीमंती (ललीत लेख) हे पुस्तक अवश्य वाचा.

पुस्तकाची मुळ किंमत 120 रुपये

(पुस्तकावर 33% सुट) 

पुस्तक विक्री किंमत 80 रुपये

पोस्ट खर्च 50 रुपये

पुस्तक हवे असल्यास 130 रुपये फोन पे/गुगल पे करा.

पुर्ण पत्ता, पिन कोड, मोबाईल नंबर वाट्सअप करा.

पुस्तक बाय पोस्ट पाठवतो.

फोन पे 9823425852

गुगल पे 9823425852

🙏🙏

संपर्क:- राजेंद्र शेळके 9823425852

Thursday, 22 July 2021

लघुकथा:- गुरुजी

                          गुरुजी

शाळेतील मामाने पितळी घंटा एका हातात पकडली. दुसऱ्या हातात गोल दगड घेतला. घंटा उंच करून टण्....टण्....टण्....टण्....सगळ्या मुलांच्या कानात आवाज घुमे पर्यंत घंटी बदडून काढली. सकाळी सकाळी मोठ्या गुरुजींचा राग घंटीवर ओकून टाकला. मामाच्या घंटीमुळे सर्व मुलं काही मिनिटातच मैदानावर गोळा झाली. पटापट वर्गानुसार रांगा तयार झाल्या. कितीतरी वेळेपासून मैदानावर सुरू असलेली किलबिलाट घंटेमुळे क्षणभरात थांबली. सायंकाळी पाखरे जशी घरट्याकडे जाण्याअगोदर एकत्र जमा होतात. तशी मुलं परीपाठासाठी एकत्र जमली होती. मामांनी हातातील दगड खिडकीत ठेवला व कार्यालयाच्या समोर उभे राहिले.
                घंटीचा आवाज ऐकून क्षणाचाही विलंब न लावता मुख्याध्यापक साहेब मैदानाकडे येऊ लागले. त्यांच्यामागे शाळेतील बाई, गुरुजी, व एक नवीनच व्यक्ती शाळेच्या व्हरांड्यातून मागे येत होते. पांढरे शुभ्र, स्वच्छ कपडे घालून शाळेत आलेले मुख्याध्यापक साहेब अगदी शिस्तीत मैदानावर पुढे येऊन उभे राहिले. थोडेसे त्यांच्यामागे एका ओळीत गुरुजी, बाई व नवीन आलेले पाहुणे एका रांगेत उभे राहिले. नेहमीची मुलं परीपाठासाठी पुढे येऊन उभी होती. मुख्याध्यापक साहेबांनी त्यांच्याकडे पाहून त्यांना डोळ्यांनी खुणावले. लगेच त्या मुलांनी ऑर्डर दिली. एका तालात, एका सुरात उंच आवाजात राष्ट्रगीत संपले. भारत माता की जय....! च्या तीन वेळेस घोषणा झाल्या. सकाळी सकाळी मुलांमध्ये जय च्या घोषणेने उत्साह भरला. थोड्या वेळातच प्रतिज्ञा, प्रार्थना, सुविचार असे क्रमाने परिपाठ संपला. मुख्याध्यापक साहेबांनी नवीन आलेल्या पाहुण्यांना समोर बोलावले. मुलांनो हे आहेत पाटील गुरुजी....! आज नव्याने आपल्या शाळेत रुजू झाले. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून गुरुजींचे स्वागत करा. मुलांनी पावसाच्या टपोऱ्या थेंबाप्रमाणे जोरात टाळ्या वाजवून गुरुजींचे स्वागत केले. आज पासून आपल्या शाळेत बाई, दोन गुरुजी व मी असे चार जण तुम्हाला शिकवण्यासाठी असणार आहोत. पाटील गुरुजी वर्गात आल्यावर बाकीचा परिचय देतीलच. सर्वांनी शिस्तीचे पालन करायचे. वर्गात लक्ष देऊन गुरुजी काय सांगतात ते ऐकायचे. अभ्यास वेळेवर पूर्ण करायचा.
“आले का ध्यानात?”
“हो सर....! सगळ्या मुलांनी एका तालासुरात होकार दिला.” चला आता सगळ्यांनी एका रांगेने आपापल्या वर्गात जाऊन बसायचे. मुख्याध्यापक साहेबांच्या सूचनेने मुलांनी लगेच रांगेने वर्गात जायला सुरुवात केली.
            पाटील गुरुजींनी या शाळेच्या परिसराची पाहणी केली. प्रत्येक वर्गात किती मुलं, मुली आहेत याची माहिती घेतली. दुपारच्या वेळेत मुख्याध्यापकांनी स्वतःच्या कार्यालयात सर्वांना बोलावून घेतले. सर्वजण येऊन समोर बसले.
“मुख्याध्यापकांनी हळूच विचारले, पाटील गुरुजी कशी वाटली शाळा.”
“साहेब छान आहे की शाळा खूप आवडली मला.”
“अहो आवडणारच की....शाळा बनवली तसीच मी....!”
गेल्या 15 वर्षापासून या शाळेवर काम करतो. शाळेची इमारत, मैदान येथील झाडं या सर्व गोष्टी मी स्वतःच्या देखरेखीखाली तयार केलेल्या आहेत. शाळेला आपण वेळ दिला की, शाळा सुंदरच तयार होते. पाटील गुरुजी नवीन असल्यामुळे काही न बोलता फक्त मानेने सहमती कळवत होते. शाळेतील हरणे बाईंनी तर चेहरा पण मुरडला होता. बाई स्वतःच्या मनाशी बोलू लागल्या.
“झाले साहेबांचे भाषण सुरू….! आता घंटाभर तरी सुटका नाही म्हणायची.”
कितीतरी वेळा हे भाषणं ऐकून झाले. नेहमी नेहमी आपल्याच नशीबात आहे साहेबांचे भाषण ऐकणे. मी जणू साहेबांची आजीवन श्रोते असल्यागत प्रत्येक वेळी निमूटपणे ऐकत आले. साहेबांचे काम नक्कीच चांगले आहे पण त्याबरोबर दरारा पण तेवढाच आहे व गाजावाजा पण तेवढाच आहे. साहेब जणू या गावचे असल्यागत शाळेत, गावात वावरत असतात. या शाळेच्या वैभवासाठी फक्त त्यांनीच कष्ट उपसले. आम्ही बाकीचे काय दिवसभर गोट्याच खेळत असतो. बाई स्वतःच्या मनाशीच बोलू लागल्या.
“पाटील गुरुजी शाळेसाठी काम करतांना जीव झोकून देऊन काम करावे लागते.” शाळा हे आपले कुटुंबच आहे. शाळा, शिक्षक, विद्यार्थी, इमारत येथील सर्व सजीव व निर्जीव गोष्टी आपल्या या कुटुंबात मोडतात. त्यामुळे येथील प्रत्येक बाबतीत स्वतःचे कुटुंब समजून स्वतःला झोकून देऊन काम करायचे. तुम्ही तरुण आहात. तुमच्या तरुण मनातील, तरुण कल्पनांना नक्कीच शाळेच्या विकासासाठी प्राधान्य राहील. धडाडीने काम करा माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी नेहमीच राहील. पाटील गुरुजी भांबावून गेल्यासारखे नुसते बघतच होते. कदाचित पाटील गुरुजींना ह्या सर्व गोष्टी आवडल्या नाहीत किंवा नवीन असल्यामुळे दडपण आले होते. शाळा, इमारत, वर्गखोल्या, विद्यार्थी, गावकरी या सगळ्या सोबत हळूहळू होईल ओळख...! काळजी करू नका.
“बरं....! यांची ओळख करून घ्यायचीच राहिली.” या आहेत हरणे बाई....! हे यादव गुरुजी....! हे बऱ्याच वर्षांपासून या शाळेत काम करतात.
“पाटील गुरुजींनी दोघांना नमस्कार घातला.”
“नमस्कार बाई....! नमस्कार गुरुजी....!”
“नमस्कार पाटील गुरुजी”
नमस्कार झाला ओळख झाली. मुख्याध्यापक, हरणे बाई, यादव गुरुजी तालुक्याला राहत असे. साहेबांनी पाटील गुरुजींना विचारले.
“गुरुजी तुम्ही आता कुठे राहणार? आम्ही तालुक्याला राहतो.”
“साहेब मी याच गावी राहतो. मी एकटाच आहे त्यामुळे शहरात राहण्याची सध्यातरी मला गरज नाही.”
“बरोबर बोलले पाटील गुरुजी तुम्ही....!”
“सध्या दोन हात आहे त्यामुळे रहा इथेच. नंतर दोनाचे चार हात झाले म्हणजे मग शहरात जावेच लागेल.”
मुख्याध्यापक साहेबांच्या बोलण्याने पाटील गुरुजी लाजल्यागत झाले. स्वतःची नजर चोरु लागले. चला तर शाळेला एक नवीन तरुण पुर्णवेळ देणारे गुरुजी मिळाले तर आज पासून. मुख्याध्यापक साहेबांनी लगेच मामांना आवाज दिला.
“पाटील गुरुजी हे तुका मामा....!”
आपल्या शाळेची देखभाल करतात. शाळेची साफसफाई, मुलांना पिण्याचे पाणी भरून ठेवणे व दिवसभर शाळेत बसून असतात. वेळेनुसार शाळेची घंटा वाजवण्याचा मान तेच घेतात. तुका मामांना आपण गावकऱ्यांकडून वर्गणी करून मानधन देतो. मी माझ्या पगारातून थोडेफार पैसे त्यांना देत असतो. त्यांना मूलबाळ नाही शेतीबाडी नाही. सात वर्षापूर्वी पत्नी आजारपणात त्यांना सोडून गेली. त्यामुळे मामा एकाकी पडले. गावच्या सरपंचांनी व प्रतिष्ठित मंडळींनी त्यांना शाळेवर ठेवले. तेव्हापासून मामा या शाळेचे शिपाई म्हणून काम पाहतात. बिन पगारी फुल अधिकारी असे मामांचे काम आहे. मामांना सगळी मुलं, गावकरी घाबरतात. वेळप्रसंगी आम्हीही मामाला घाबरतो.
“हो की नाही मामा....!”
“साहेब उगाच गरीबाची मजाक करू नका....!”
तुम्ही या शाळेचे सर्वसर्वा आहेत. तुमच्यामुळेच मी कसाबसा पोट भरतोय. नाही तर आता या वयात मला कोण कामाला ठेवेल. हाताला काम नाही म्हटल्यावर पोटाला भाकर कुठून मिळणार. शाळा हीच माझी खरी भाकर आहे. या वयात शाळाच माझी बायको, शाळाच माझी लेकरं आहेत. एवढी लेकरं असणे तरी कुणाच्या नशिबात आहे.
“हे नवीन गुरुजी का?”
“हो मामा....! हे नवीन गुरुजी आहेत.”
हे एकटेच आहेत. लग्न झालं नाही त्यामुळे ते गावातच राहणार आहे. तुम्ही त्यांना दोन दिवस तुमच्याकडे राहू द्या व गावात त्यांची कुणाकडे तरी राहण्याची व्यवस्था करा. पाटलाकडे विचारून बघा एखादी खोली मिळते का? मी तसं सरपंचांना विचारून घेतो. गुरुजीची लवकरात लवकर व्यवस्था झाली म्हणजे बरं होईल.
“साहेब काळजीच करू नका.”
“मी आज सायंकाळी दोन चार ठिकाणी जाऊन येतो. गुरुजींना दोन चार खोल्या दाखवतो. त्यांना पसंत पडेल ती खोली ठरवून घेतो. व गुरुजीचे सामान खोलीवर पोहचतं करतो. आजच्या दिवस गुरुजींना माझ्याकडे ठेवतो.”
“हो चालेल मामा....तुम्ही असल्यावर पाटील गुरुजींची चिंताच मिटली.”
“गुरुजी माझे घर साधे आहे बरं का?”
“तुम्हाला जमेल का मातीच्या घरात.....! मी गरीब माणूस आहे. माझे शेणा मातीचे घर आहे. तुम्हाला आवडले पाहिजे.”
“अहो मामा.....! असे काय बोलताय.”
“मी पण गरीब घरातूनच आलोय. माझे घर पण शेणा मातीचेच आहे.”
“आणि हो....!”
“माणसाचे मन मोठे पाहिजे घर नाही....!”
मामा तुम्ही मनाने खूप श्रीमंत आहात. गेल्या सात वर्षापासून तुम्ही या शाळेत येऊन खूप श्रीमंती कमावली. मनाला असे कमी समजत जाऊ नका. आज पासून तुमचा हा भाचा आलाय ना....! आता तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. पाटील गुरुजींच्या बोलण्याने मामाची डोळे भरून आले. मामांनी डोळे पुसत पुसत खिडकीतील दगड घेऊन दुपारची सुट्टी संपल्याचे घंटी वाजवून जाहीर केले.
 “बरं....सगळ्यांनी आता आपापल्या वर्गात जायला हरकत नाही.”
“पाटील गुरुजी तुम्ही आजपासून चौथीचा वर्ग घ्या. तुम्ही तरुण आहात व गावातच राहणार म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्तीची थोडीफार शिकवणी घेता येईल.”
“पाटील गुरुजींनी मान हलवून होकार दिला.”
चला झाली एकदाची मीटिंग असे म्हणून हरणे बाई कार्यालयाच्या बाहेर पडल्या. बरं झालं बाई....शिष्यवृत्तीची शिकवणी व चौथा वर्ग पाटील गुरुजी कडे गेला तो....! नाहीतरी चार वर्षापासून माझ्याच मागे लावून दिले होते. या साहेबांनी स्वतः मात्र एक वेळ कधी शिष्यवृत्तीचे शिकवले नसेल. फक्त मीटिंग घेऊन मोकळे होतात. मुख्याध्यापक असल्याचा पुरेपूर फायदा करून घेतात. हरणे बाई स्वतःशीच बडबड करत वर्गात निघून गेल्या.
               पाटील गुरुजींनी चौथीची हजेरी, खडू घेतले व वर्गावर येऊन बसले. मुलांनी गुरुजी वर्गात येताच नमस्कार केला. सगळ्यांना नमस्कार बसा खाली. आता मी वर्गाच्या बाहेर जाईपर्यंत कोणीही बोलणार नाही व वर्गाच्या बाहेर जाणार नाही. मला शिस्त फार आवडते. सगळ्यांनी शिस्तीत राहायचे व शिस्तीचे पालन करायचे. जो कोणी बेशिस्त वागेल, शिस्त मोडेल त्याला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. पाटील गुरुजींच्या पहाडी आवाजाने वर्ग एकदम शांत झाला होता. आज शाळेला सुट्टी असल्या सारखे शांत वातावरण झाले होते. गुरुजींनी वर्गात नजर फिरवली मुलांनी वर्ग गच्च भरला होता. खूप दिवसापासून तहान लागल्यावर हरण पाण्यासाठी मोठे डोळे करून सैरावैरा पाण्याच्या मृगजळा मागे फिरत राहते. तसे ज्ञानाची भूक भागविण्यासाठी मुलं अपेक्षागत नजरेने गुरुजीकडे पाहत होते. हक्काचे गुरुजी मिळाल्याचे समाधान उराशी बाळगून शिकण्यासाठी सज्ज होते. गुरुजींनी टेबलावरची हजेरी उचलून नाव वाचण्यास सुरुवात केली.
“भगत....हजर गुरुजी….!”
“वासुदेव....हजर गुरुजी….!”
“रामप्रसाद....हजर गुरुजी….!”
क्रमाक्रमाने गुरुजी नाव घेत होते. दगडुबा....म्हणताच पूर्ण वर्ग मोठ मोठ्याने हसायला लागला. गुरुजी एकदम अचंबित झाले. मुलं का हसली असेल या विचारात त्यांची नजर वर्गात फिरू लागली. कोणीच उभे नाही व हजर गुरुजी म्हणण्याचा आवाजही आला नाही. गुरुजींनी परत एकदा दगडुबा असे मोठ्याने नाव वाचले. परत मुलांनी खळखळून हसायला सुरुवात केली. गुरुजीच्या लगेच लक्षात आले दगडुबा या नावात किंवा या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. त्याच्याशिवाय अशी ही मुलं दात काढणार नाही. गुरुजींनी वर्गात नजर फिरवली. सगळी मुलं दात काढत फिदीफिदी हसत होते. परंतु कोपऱ्यातील एक मुलगा मात्र बिलकुल हसत नव्हता. अगदी खाली मान घालून स्तब्ध बसून होता. गुरुजींनी लगेच ओळखले हाच तो दगडुबा आहे व सगळी मुलं यालाच हसतात. त्यांनी लगेच त्या मुलाजवळ जाऊन त्याचा पटकन हात धरला.
“दगडुबा उभा राहा बाळा”
“तो एकदम आश्चर्यचकित होऊन गुरुजीकडे पाहू लागला.”
आपले नाव दगडू आहे हे गुरुजींना कसे कळले. गुरुजी मला उठवायला माझ्या जवळ आले या विचाराच्या खुणा स्पष्ट चेहर्यावर दिसत होत्या. गुरुजींनी त्याला हाताला धरून उभे केले. दगडुबा अगदी लटपटत तीन-चार ठिकाणी वाकून कसातरी उभा राहिला. गुरुजींनी त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला कुरवाळत स्वतःच्या जवळ घेतले. दगडुबाला आभाळ भरून आल्यासारखं हुंदका भरून आला होता. स्वतःला खूप सावरायचा प्रयत्न करूनही शेवटी त्याचा बांध फुटला. तो ढसाढसा रडू लागला. त्याला हुंदका आवरता येईना. गुरुजींनी त्याच्या हाताला धरून त्याला समोर घेऊन आले. दगडूबा हे बघ तू हुशार मुलगा आहेस. हुशार मुलांनी असे रडत बसायचे नसते. आणि हो.....तुला रडायला काय झाले ते अगोदर सांग. गुरुजी आपल्याला हुशार म्हणाले हे ऐकून त्याला थोडे बरे वाटले असावे. त्याचे रडणे थोडे हळू झाले. तो अडखळत सांगु लागला.
“आम्ही गरीब आहोत.”
“त्यामुळे मला नवीन कपडे घालायला मिळत नाही. मी जुनी कापडं घालतो. माझी कापडं फाटलेली आसते त्यामुळे मुलं मला हसतात.”
“गुरुजींनी वर्गात मुलांना सांगायला सुरुवात केली.”
मुलांनो हा बघा दगडुबा अतिशय हुशार व शांत मुलगा आहे. प्रामाणिकपणा हा गुण त्यांच्या अंगी आहे. तुम्ही त्याला विनाकारण हसत जाऊ नका. तो शांत राहतो म्हणून त्याला परिस्थिती वरुन हसणे योग्य नाही. इतरांना असे हसणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. यातून आपणच मुर्ख असल्याचे सिद्ध होते. परिस्थिती पुढे माणुस हतबल असतो. कुणाच्याही परिस्थितीवर, व्यंगावर हसणे हे पाप आहे. त्यामुळे यापुढे दगडुबाला कोणीच हसायचे नाही. जर यापुढे मला कोणी हसतांना दिसले किंवा माहीत झाले तर मी भर वर्गात त्याला चोपून काढेल. गुरुजींनी वर्गात मुलांना चांगलाच दम भरला होता. वर्गात टाचण पडली तरी आवाज येईल एवढी शांतता निर्माण झाली होती. गुरुजींनी दगडूबाला जागेवर जाऊन बसायला सांगितले. पुढे हजेरी घेतली. हजेरी संपते तोच शाळा सुटल्याची घंटी वाजली. आज नुसतीच हजेरी घेणे झाले. या पोरांच्या दात काढल्यामुळे बराच वेळ निघून गेला. उद्या मात्र प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात करूया. या विचारात गुरुजी हजेरीपट घेऊन वर्गाबाहेर पडले. शाळा सुटल्याची घंटी वाजली तरी मुलं शांतपणे जागेवर बसून होती. नवीन गुरुजींच्या शिस्तीचा प्रभाव व दम यामुळे मुलं अगदी भीतीने धास्तावली होती. गुरुजी वर्गाच्या बाहेर पडताच मुलं हळूहळू बाहेर निघत होती. तेवढ्यात मामा चाब्या घेउन खोली बंद करण्यासाठी बाहेर येऊन उभे राहिले. “पोरांनो चला लवकर....आज घंटी ऐकू आली नाही का?”
“किती वेळ लावता बाहेर निघायला. रोज तर घंटेच्या आवाजाने पार पोळा फुटतो तुमचा....!”
मामाच्या आवाजाने मुलं पटकन बाहेर पडली. मामांनी पटापटा वर्गखोल्या लावल्या व चाब्या कार्यालयात आणून खिळ्यांना माळा घातल्या. शेवटी कार्यालयाचे कुलूप लावून एक चाबी मुख्याध्यापक सरांच्या हातात दिली व एक चाबी स्वतःच्या कमरेला लटकावली.
“येतो पाटील गुरुजी असे म्हणून मुख्याध्यापक व बाकीचे गुरुजी निघून गेले.”
शाळा सोडून काहीच अवधी झाला होता. पण दिवसभराचा गोंगाट आणि शाळा दमल्यागत आता शांत झाली होती. मनाला या गोंगाटाची सवय करून घेतली पाहिजे. गुरुजीच्या जीवनात या गोंगाटालाच महत्त्व आहे. शाळेच्या रिकाम्या व्हरांड्याकडे पाहून गुरुजी मनाशीच रमले होते. तेवढ्यात मामांनी आवाज दिला.
“गुरुजी चला घराकडे....!”
“शाळा सुटल्यावर इथे एक मिनीटभर करमत नाही. बिचारी शाळा लेकरा वाचुन स्तब्ध होऊन बसते. पुन्हा उद्या सकाळी लेकरांच्या गोगांटाने शाळेला हुरूप येईल.”
मामा जणू या शाळेचे मालक असल्यागत बोलत होते. शाळेविषयी असणारी ओढ मामांच्या कामातून दिवसभर दिसून आली. चला एक चांगला जिव्हाळ्याचा माणूस भेटला. आता यांच्या सोबतीने काम करायला मज्जा येईल. घरच्या आठवणीचा भार थोडा हलका होईल. असे म्हणून गुरुजी मामाच्या सोबत गावातून चालू लागले.
              रस्त्याने चालतांना मामा गावातील मुख्य घरांची ओळख सांगू लागले. गावातील पुढारी, सरपंच, पाटील, टाळकरी, माळकरी, शेतकरी अशा विविध नागरिकांची घरे लांबून दाखवत होते. कोऱ्या कागदावर शाईचे ठिपके पडताच ते जसे स्पष्ट उमटून जातात. तसे गुरुजीच्या मनावर गावातील नवीन साऱ्या गोष्टी कोरल्या जाऊ लागल्या. बोलत बोलत मामांचे घर आले. मामांनी घर उघडून लगबगीने बसायला पोते अथरले.
“गुरुजी बसा येथे मी तुम्हाला हात पाय धुवायला पाणी काढतो.”
“मामांनी घाईघाईने पाणी दिले.”
“मी थंडगार पाण्याने हातपाय धुतले.”
हात पाय पुसायला पांढराशुभ्र धोतराचा तुकडा पुढे करत मामा म्हणतात, “गुरुजी कोरा चहा घेता का?” चुलीवर मस्त कोरा चहा उकळतो. कपबशीभर चहा पोटात ढकलला की, दिवसभराचा क्षीण हलका होतो बघा. डोकही मस्त शांत पडून जातं. मी हो म्हणायच्या आत मामा चुलीजवळ गेले. काड्या मोडून चुलीला विस्तव लावून चहाचे सामान शोधू लागले.
                मी हातपाय पुसून पोत्यावर बसलो. क्षणात माझी नजर घरभर हिंडून आली. अगदी देवळा प्रमाणे स्वच्छ, सुंदर, नीटनेटके घर दिसत होते. वस्तु अगदी जिथल्या तिथे ठेवून होत्या. शेणा मातीचे घर पोतरुन अगदी गुळगुळीत होते. एखाद्या बाई प्रमाणे घर अगदी प्रसन्न बनवून ठेवले होते. मी घराकडे पाहून कुतूहल नजरेने मामांच्या हालचाली आठवु लागलो. येवढी शिस्त आत्मसात करून आजही या वयात सर्व दिनक्रम शिस्तीत घालवणारा हा माणूस घरी सुद्धा तेवढाच शिस्तप्रिय व नीटनेटका आहे. ही कमालची गोष्ट आहे. अशी माणसं आयुष्यातील दुःख विसरून दुसर्‍यांना आनंद देत राहतात. कुठून हे बळ त्यांना मिळत असेल. मला तर शाळा व शाळेच्या रूपाने हा देवच भेटला म्हणावा लागेल. घरून निघतांना अनेक प्रश्नांचे काहूर डोक्यात घुमत होते. कसे होईल या चिंतेने शाळेत येईपर्यंत पाठ सोडली नाही. सकाळी मामांच्या वाजलेल्या घंटेच्या आवाजाने डोक्यातील सर्व प्रश्न गळून पडले. भविष्यात शाळेच्या रूपाने असे मामा भेटेल स्वप्नातही वाटले नव्हते. मी विचारात गढून गेलो होतो.
                 तेवढ्यात कप-बशी पुढे करत मामा म्हणतात, “गुरुजी घ्या बरं गरम गरम चहा पिऊन.” कसल्या विचारात डुबले होते तुम्ही. घरची आठवण पाठ सोडत नाही का अजून? काही चिंता करू नका. शाळा आणि मामा आहे तुमच्या सोबतीला. रमेल हळूहळू मन या गावात. मी हातातील कपबशी खाली ठेवून मामाला म्हणालो, “मामा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात वडीलधारी आहात. तुम्ही माझी असी सेवा केलेली मला आवडत नाही.”
तुम्ही बसा मामा निवांतपणे चहा घ्या. मी तुमच्या भाच्यासारखा आहे. मी शाळेत गुरुजी....घरी मात्र तुमचा भाचा....! मामा एकदम भावूक झाले. चहा पिता पिता मामाच्या डोळ्यातून पाणी ओघंळले. एक अनोळखी व्यक्ती दिवसभराची ओळख व काही मिनिटांचा सहवास अनेक जन्मांचे नाते असल्यागत भासुन गेला. मी मामांना अश्रू पुसायला कपडा दिला. मामांनी स्वतःला सावरत चहाची भांडी विसळून ठेवली. थोडावेळ धरणीला अंग टाकले.
“गुरुजी दिवस मावळल्यावर गावातील मारुतीच्या देवळात दर्शनाला जाऊ.”
“तिथे अनेक गावकरी हरिपाठासाठी आलेले असतात. तुमची गावकऱ्यांना ओळख करून देता येईल. गावात नवीन गुरुजी आले हे ऐकून सगळ्यांना आनंद हहोईल”
“जाऊया मला ही मारुतीचे दर्शन होईल. देवळातील लोकांना भेटता येईल. त्यांची आणि माझी भेट गोड झाली तर जात जाऊ अधून मधून भजनाला.”
“गुरुजी तुम्हाला भजनाची आवड आहे म्हणायची तर....!”
“मामा एकदम प्रसन्न मुद्रेने म्हणाले.”
“हो आवड आहेच की, लहानपणी आजोबा सोबत देवळात भजनाला जायचो.”
पण गेल्या काही वर्षात अभ्यासाने पिच्छा सोडला नाही. गुरुजी होईपर्यंत वडीलांनी देऊळ, भजन सर्व बंद केले होते. अभ्यास हे एकच भजन सुरू होते. आज मात्र  गुरुजी म्हणून शाळेचा पहिला दिवस पूर्ण झाला. वडिलांची आज्ञा व मायची इच्छा पूर्ण झाली. आता स्वतःच्या आनंदासाठी भजनाला जायला हरकत नाही.
“बरोबर का मामा....!”
“हो गुरुजी....अगदी बरोबर बोललात.”
“माणसाचे मन रमेल तिथे जावे व मनमुराद आनंद लुटावा फक्त संस्कार व संस्कृतीची जाणीव मात्र विसरू नये.”
“मामा तुम्ही हुशार आहात. त्याचबरोबर सुसंस्कारित आहात त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टीची जाण आहे. तुम्ही मला तुमच्या संस्कारात सामावून घेतले तर बरं होईल”
“मी समजलो नाही गुरुजी.”
“मामा त्यात समजण्यासारखे अवघड काही बोललो नाही.”
मला तुमच्या सोबत येथेच राहू द्या. मी घराचे व जेवणाचे पैसे तुम्हालाच देत जाईल. तुमच्या सोबत राहिलो तर अनुभवाच्या चार गोष्टी शिकता येईल. वडीलधारी माणसाचे छत्र डोक्यावर राहिले तर, माणूस वाईट मार्गाला जात नाही. मामा हसतच उठले.
“अहो गुरुजी तुम्ही चांगले तरुण चार मित्र जमवा.”
“या म्हाताऱ्याच्या सोबतीला राहून तुम्हाला गमणार नाही. दिवसभर शाळेत सोबत व घरी रात्रभर सोबत म्हटल्यावर कंटाळून जासाल.”
“मामा माणूस वयाने म्हातारा होतो.”
विचारांनी व कर्तृत्वाने तो सदैव तरुणच असतो. तुमच्या सारखा वैचारिक तरुण मला शोधून सापडणार नाही. त्यामुळे मी ठरवले या शाळेत एकटा आहे तोपर्यंत तुमच्यासोबत राहायचे. तुम्ही मला आता येथून हाकलून लावले तरी मी जाणार नाही. आणि हो....! मी तुमचा या क्षणापासून मित्र झालोय. त्यामुळे हे घर, येथील काम माझे पण आहे. आजपासून प्रत्येक गोष्टीत मी तुम्हाला आर्धी मदत करणार. मी तुमच्यासाठी गुरुजी नाही मित्र आहे हे आता लक्षात ठेवा.
“बरं गुरुजी.....! चला मंग आता.”
“कुठे मामा?”
“शाळेत….! तुमचे सामान आणायला.”
“हक्काचे घर असल्यावर सामान शाळेत कशाला ठेवायचे.”
मी व मामा हसत हसत शाळेकडे निघालो.

✍✍✍✍✍
©® राजेंद्र प्रल्हाद शेळके
मो नंबर 9823425852

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...