Friday, 17 January 2020

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद


                युवकांचे प्रेरणास्थान
         स्वामी विवेकानंद


बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ते काही खोटे नाही.ही म्हण अगदी जशीच्या तशी लागू पडते ती भारतासारख्या पावन भूमीत जन्म घेतलेल्या एका महान युगपुरुषासाठी.ज्यांनी आपल्या आयुष्यात छोट्याशा कारकीर्दीत स्वतःच्या कर्तृत्वाने प्रसिद्धी मिळविली. भारताबरोबर विदेशात सुद्धा ज्यांनी आपल्या देशाचा ठसा उमटवला.ज्यांच्या ज्ञानाने व तेजस्वी रुपाने लोकांना मंत्रमुग्ध करून सोडलं.भारतीय संस्कृती आणि येथील शिकवण विदेशात पोहोचविण्यासाठी या महापुरुषांने योगदान दिल.संपूर्ण विश्वात हिंदू धर्माचे स्थान निर्माण करून त्याचे महत्त्व टिकवून ठेवण्यात विवेकानंदांचा फार मोठा वाटा आहे.स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी भारतातील कलकत्ता या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते.स्वामी विवेकानंदांचे नाव नरेंद्रनाथ होते. स्वामी विवेकानंदांचा जन्म एका बंगाली कुटुंबात झाला होता.स्वामी विवेकानंदांचे वडील कोलकत्ता येथे उच्च न्यायालयात वकिली करत होते.विवेकानंदावर कुटुंबातून अध्यात्मिक व धर्मविषयक योग्य संस्कार झाले. बालपणापासूनच विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दिसून येत असत.त्या म्हणजे ते स्वभावाने श्रद्धाळू होते.व दुसरे म्हणजे कोणतीही गोष्ट बेधडकपणे करण्याची हिंमत त्यांच्यात होती.त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत पाठवण्यात आले.शाळेत असताना विवेकानंद अतिशय हुशार होते.शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी त्यांच्या लगेच लक्षात राहत असत.तसेच त्यांनी एकदा वाचन केले की ते लगेच त्यांचे पाठ होऊन जायचे.अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांची होती.या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वतःला घडवले,समृद्ध केले.विवेकानंदांनी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांच्या कुळाची व शाळेची कीर्ती ध्वजा उंचावली.पुढे कोलकत्ता च्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी तत्वज्ञान विषयात एम.ए केले.पुढे स्वामी विवेकानंद धर्म परिषदेसाठी शिकागोला जाण्यासाठी मुंबईवरुन रवाना झाले.अमेरिकेतील प्रख्यात अशा शिकागो शहरात आले.शिकागो येथे 11 सप्टेंबर रोजी धर्मपरिषद होणार असल्याची त्यांना समजले.श्रेष्ठ अशा हिंदु धर्माची ओळख भारतभूमीच्या या पुत्राने जगाला करून देणे हा दैवयोग होता.11 सप्टेंबर 1893 रोजी झालेल्या सर्व धर्म परिषदेच्या माध्यमातून साऱ्या जगाला आव्हान करणारे स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचे खरे प्रतिनिधी ठरले.11 सप्टेंबर 1893 रोजी सकाळी धर्मगुरुंच्या मंत्रोच्चारानंतर संगीतमय वातावरणात धर्म परिषदेचा शुभारंभ झाला.व्यासपीठावर अनेक पंथांचे धर्म प्रमुख बसलेले होते.या परिषदेस सहा ते सात हजार स्त्री-पुरुष उपस्थित होते.अध्यक्षांच्या सूचनेनुसार व्यासपीठावरील प्रत्येक प्रतिनिधी आपली तयार केलेली भाषणे वाचून दाखवत होते.शेवटी स्वामीजींचे नाव पुकारले गेले.स्वामीजींनी आपले भाषण लिहून आणले नव्हते. वेळेवर ते उभे राहिले.व आपल्या गुरूंचे स्मरण करून बोलण्यास सुरुवात केली.अमेरिकेतील माझ्या ''भगिनींनो आणि बंधुंनो'' या शब्दांनी सुरुवात करून त्यांनी सभेला संबोधित केले.त्यांच्या चैतन्यपूर्ण ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले.स्वामी विवेकानंदांच्या चेहऱ्यावरील तेजस्वी तेज आणि वाणीतील गोडवा सदैव सर्वांना प्रेरित करणारा होता.त्यांच्या बोलण्यात अशी काही अद्भुत शक्ती होती की, स्वामीजींनी माझ्या भगिनींनो आणि बंधुंनो हे शब्द उच्चारताच हजारो स्त्री-पुरुष आपल्या जागी उभी राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.स्वामी विवेकानंदांचे विचार ऐकून सर्व जमा झालेले विद्वान चकित झाले होते.त्यांनी त्यांच्या बोलण्यातून हिंदू धर्माची व भारताच्या संस्कृतीची ओळख करून दिली होती. स्वामीजींनी कोणत्याही धर्माची निंदा किंवा टीका केली नाही.कोणत्याही धर्माला कमी लेखले नाही.म्हणूनच जागतिक सर्वधर्मपरिषदेत हिंदूधर्माला सर्वोच्च आसनावर विराजमान केले.या परिषदेत हिंदुस्तानाबद्दल बोलताना ते म्हणतात हिंदुस्तान ही पुण्यभूमी आहे,कर्तव्यभूमी आहे,या भूमीला अध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल.जगात परधर्माबद्दलची सहिष्णुता व जिव्हाळा फक्त याच भूमीत अनुभवता येतो.अमेरिकासारख्या परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करून कोलकात्यात परतल्यावर भारतातील नागरिकांनी स्वामीजींचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले. आपल्या व्याख्यानातून ते लोकांना सदैव मार्गदर्शन करत राहिले.स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरु मानले होते.रामकृष्ण परमहंस यांच्या विचारातून ते घडत गेले होते.स्वामी विवेकानंद यांनी गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्याचबरोबर ठिकठिकाणी अनाथाश्रम,दवाखाने,वस्तीगृह यांची स्थापना केली.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात त्यांचे विचार खूप महान होते.विद्यार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे गेले पाहिजे असे ते म्हणत.अशा महान योगी पुरुषाने 4 जुलै 1902 या दिवशी कोलकत्ता जवळील बेलूर मठात समाधी घेतली.एका तेजस्वी, कर्मयोगी,संन्यासी,बुद्धिमान अशा स्वामी विवेकानंदांचा विचार आजच्या युवकांना प्रेरणादायी व स्फूर्तिदायी आहे. देशाच्या प्रत्येक युवकाच्या मनात व विचारात सदैव प्रेरणा बनून हिंदुस्तानाला व हिंदुस्थानाच्या संस्कृतीला हजारो वर्ष अबाधित राखण्याची शक्ती स्वामी विवेकानंदांनी दिली आहे.अशा महान स्वामी विवेकानंदांचा 12 जानेवारी हा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक सदैव प्रेरणा देत उभे राहिले आहे.स्वामी विवेकानंदांचे आयुष्य हिंदुस्थानाला व हिंदुस्थानातील युवकांना प्रेरित करणारे आहे.येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते प्रेरणादायी राहतील.देशातील युवकांनी विवेकानंदांची प्रेरणा घेऊन सदैव स्वतःला व हिंदुस्थानाला गौरवांकीत केले पाहिजे.बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं विवेकानंदांच्या बाबतीत म्हणणं वावगं ठरणार नाही.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

Thursday, 9 January 2020

कुटुंबात संस्काराचे बिज रुजवा


 कुटुंबात संस्काराचे बिज रुजवा


महाराष्ट्र हे संतांचे, समाजसुधारकांचे व विचारवंतांचे राज्य आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात संस्कार मिळण्याचे ठिकाण कुटुंब, शाळा आणि समाज हे आहे. पूर्वीच्या काळात संस्कार कुटुंब, समाज व गुरुकुलामधून मिळायचे. मग ते आध्यात्मिक संस्कार असो वा शैक्षणिक संस्कार असो. आज मात्र परिस्थिती थोडीशी बदललेली दिसते. संस्कार हे फक्त शाळेतूनच मिळावे किंवा मोठ्या शिकवणी वर्गातून मिळावे ही पालकांची भूमिका झाली आहे. मुलांना मोठी-मोठी पुस्तके मिळाली, चांगला गणवेश मिळाला व शहराच्या नामांकित शाळेत प्रवेश मिळाला म्हणजे, मुलगा सुसंस्कारित व उच्चशिक्षित होणार असा मोठा गैरसमज आजकालच्या पालकाचा झाला आहे. कुटुंबाची व आई-वडिलांची भूमिका मात्र सगळेजण विसरत चालले आहे. आपल्या मुलावर संस्कार करायला आई-वडिलांकडे वेळ नाही. शहरी भागात आई-वडील दोघेजण नोकरी करतात. तर ग्रामीण भागात आई-वडील दोघे शेतात काम करतात. तसेच शहरी व ग्रामीण भागात आई-वडील दोघेही व्यावसायिक आहेत. अशा परस्थितीत कुटुंबाचा वेळ कामामध्ये विभागलेला आहे. प्रत्येक कुटुंब ही व्यस्त झालेली आहे. त्यामुळे मुलांनवर संस्कार करायला आजकाल वेळ मिळत नाही. हे सत्य आहे. घरामध्ये मुलांकडे लक्ष देणारी आजी-आजोबा कुटुंबातून गायब झालेली पाहावयास मिळत आहे. याचे कारण म्हणजे कौटुंबिक व्यवस्था ही एकत्रित राहिली नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आई-वडील आणि मुले असा छोटा परिवार निर्माण झाला आहे. कुटुंबातून घरातील मोठी व्यक्ती म्हणून आजी-आजोबा नातवांना संस्कार देऊ शकतात. वेळ देऊ शकतात. मात्र विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे आजी-आजोबांचे वेगळे कुटुंब पहावयास मिळत आहे. याउलट थोडे मागे वळून पाहिले तर, ग्रामीण भागात एकत्र कुटुंबपद्धती होती. कुटुंबात आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू, चुलत भाऊ, चुलत बहीण असे सर्व जण एकत्र राहायचे. सणवार, उत्सव, रुढी परंपरा एकत्र साजरे करायचे. त्यामुळे साहजीकच आई-वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर राहिले तरी, आजी-आजोबा नातवंडांना वेळ द्यायचे. नातवंडा सोबत खेळायचे. रात्री आजी आपल्या नातवांना रामायण-महाभारतातील कृष्ण, बळीराम, राम-लक्ष्मण, अर्जुन, श्रावण कुमार, कर्ण, तसेच इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्या गोष्टी सांगायच्या. यातून मुलांवर चांगले संस्कार घडायचे. गोष्टी, गाणी, पाळणा यासारख्या गोष्टींमधून मुलांवर चांगले संस्कार होत असत. मुलांना चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टीची जाणीव लहान वयातच व्हायची. चांगला आणि वाईट हा फरक मुलांना लहानपणीच कळायचा. नकळत  मुलांवर वाढत्या वयाबरोबर चांगले संस्कार व्हायचे. कुटुंबातील मोठी व्यक्ती म्हणून आजी-आजोबा नातवंडांचे लाड करायचे, त्याचबरोबर शिस्त सुद्धा लावायचे. शिस्त मोडल्यावर शिक्षा सुद्धा करायचे. यामुळे अंगात साहजिकच शिस्त भिंनली जायची. आजकाल मात्र कुटुंबात मुलांचे लाड होतात. शिस्त मात्र मुलांमध्ये फारशी दिसत नाही. कारण आजकालचे पालक मुलांना शिक्षा करण्यापेक्षा, लाडच अधिक करतात. आणि म्हणून आजकालची मुलं शिक्षणाने सुशिक्षित होतांना दिसतात. परंतु संस्कारांनी अशिक्षित असल्याचे जाणवते. आजच्या पिढीतील तरुण मुलांच्या वर्तनावरून तरी हेच दिसत आहे. आजचा तरुण कॉलेजच्या नावाखाली व फॅशनच्या नावाखाली संस्कार व संस्कृती पायदळी तुडवतांना दिसत आहे. फॅशनच्या नावाखाली अर्धवट अंग झाकणारी कपडे घालायचे. अंग उघडे ठेवले म्हणजे फॅशन, वेगवेगळे व्यसन केले म्हणजे फॅशन, मैत्रीच्या नावाखाली पार्टी, नाच-गाणी केली म्हणजे मैत्री. अशा अनेक गैरसमजुतीने  किंवा पुढारलेल्या विचारसरणीने तरुणाई भरकटलेली दिसत आहे. आणि यातूनच सामाजिक भान विसरून हीच तरुणाई भारताचे नागरिक म्हणून समोर येत आहे. आपण पाहतो समाजाचे वैचारिक संतुलन बिघडत चाललेले आहे. याला कारणीभूत समाज, फॅशन, चित्रपट, तंत्रज्ञान, मोबाइल, राहणीमान व पुढारलेली विचारसरणी याबरोबच कुटुंब सुद्धा  जबाबदार आहे. आज समाजात गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात व महाराष्ट्र बरोबर संपूर्ण भारत देशात ज्या काही वेगवेगळ्या घटना घडत आहे. यामध्ये बलात्कार, छेड काढणे, मुलींना त्रास देणे, विवाहीत स्त्रियांचा छळ करणे अशा घटना मनाला सुन्न करणाऱ्या आहेत. सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्राचे पान उलटल्या बरोबर अशा घटना वाचावयास मिळतात. टीव्हीचे बटन दाबून न्यूज चैनल सुरू करताच क्षणी अशा घटनांच्या बातम्या कानावर ऐकायला येतात. यामुळे या घटना माणसाच्या मनाला प्रचंड वेदना देणाऱ्या व उच्चशिक्षित म्हणून घेणाऱ्या समाजाला काळीमा फासणाऱ्या आहेत. जेव्हा अशा घटना घडतात. तेव्हा साहजिकच प्रत्येक जण समाजाला, प्रशासनाला, पोलिस यंत्रणेला, सरकारला जबाबदार धरतात. अनेकांकडून पोलिसांचे लक्ष नव्हते का?, सरकार काय करते?, महिला आयोग कुठे आहे? असे प्रश्न उपस्थित केले जातात. पण प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की, समाजातील ज्या मुलीवर, महिलांवर अत्याचार होत आहे. ज्या महिलांचा छळ होत आहे. त्या कुणाच्या तरी आई, बहीण, मुलगी आहे. अत्याचार करणारे सुद्धा कोणाचेतरी वडील, भाऊ, काका, मामा, दादा आहे. शेवटी या वाईट घटनांमागे समाजातीलच कुणाच्या तरी कुटुंबातील व्यक्ती आहे. म्हणजे समाजातील कुटुंबाच्या संस्कारा अभावी अशा घटना घडतात असे म्हणता येईल. यासाठी प्रत्येक कुटुंबातुन आपल्या मुला-मुलींना जर चांगले संस्कार दिले. तर या घटना कुठेतरी कमी होताना दिसेल. मग मुला-मुलींचे राहणीमान, मैत्री करणे, शिक्षण घेणे, सण-उत्सव साजरा करणे, फॅशनची आवड बाळगणे, यासारख्या गोष्टी करण्याअगोदरच उत्तम संस्कार घालून दिले. तर वाईट घटना घडणे निश्चितच थांबेल. कुटुंबातील आईने आपल्या मुलाला लहानपणापासून चांगले संस्कार दिले, तर त्याला समाजातील प्रत्येक स्त्री आई, मावशी, बहिण वाटेल. समाजातील स्त्री ही स्वतःच्या आई व बहिणी प्रमाणे वाटायला लागेल. असे संस्कार मुलांमध्ये रुजवायला प्रत्येक आईने व वडिलांने समोर आले पाहिजे. समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टीवर चर्चा करत बसण्यापेक्षा त्याची कारणे शोधून, जर प्रत्येकाने तर वाईट घटना घडणारच नाही. संस्कार कुठे विकत मिळत नाही. किंवा संस्काराची कुठे क्लासेस सुद्धा चालत नाही. ती प्रत्येकाला स्वतःमध्ये रुजवावी लागतात. पालक या नात्याने प्रत्येकाची जबाबदारी आहे की, आपल्या मुलांमध्ये आपण चांगले संस्कार रुजवले पाहिजे. यासाठी प्रत्येक आई-वडीलाने आपल्या मुलांनसोबत वेळ दिला पाहिजे. व्यवसाय, नोकरी, काम धंदा याबरोबरच मुलांना सुद्धा पुरेसा वेळ देणे, हे गरजेचे आहे. हे उच्चशिक्षित पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. संस्कृतीची, परंपरेची ओळख करून दिली पाहिजे. मुलांना चांगले कपडे, चांगली खाद्यपदार्थ याबरोबरच चांगली पुस्तके घेऊन दिली पाहिजे. संस्कार घडवणारी पुस्तके मुलांना वाचायला सांगितली तर निश्चितच मुलांवर चांगले संस्कार होतील. सण, उत्सव, परंपरा यांची मुलांना योग्य ओळख करून दिली पाहिजे. मुलांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य मार्गदर्शन करून योग्य ती बंधने घातली. तरच येणारी पिढी सुसंस्कारित व संस्कृतीला जोपासणारी निर्माण होईल. यासाठी समाज, सरकार, प्रशासन यांना दोष न देता प्रत्येक पालकाने संस्काराचे बीज कुटुंबातच रुजवले पाहिजे.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

Wednesday, 8 January 2020

बालपणीची शाळा

       कवितेचे शिर्षक:- बालपणीची शाळा
 


कोरी पाटी घेऊन 
दाखल झालो शाळेत
कानाला हात पुरवुन
गुरुजी म्हणाले बसा शाळेत

गुरुजींनी केले स्वागत
मायेचा हात फिरवत
आपले गुरुजी म्हणून
घरी आलो मिरवत

अभ्यासाचा ताण नाही
पाठांतराची भिती नाही
हसत खेळत बडबड गाणी
उड्या मारत म्हणू लागलो

कळलेच नाही अ आ ई
लिहायला कधी शिकलो
चित्र मोजुन संख्या
ओळखायला लागलो

बघता बघता शिक्षण
सर करत गेलो
बालपणीची शाळा मात्र
मनात घर करत राहीलो

शिक्षणाचा संस्कार दिला
दिली जिवनात शिस्त
अशी माझी बालपणीची शाळा
आजही वाटते मस्त

✍✍✍✍
राजेंद्र शेळके 
9823425852

माझे घर


 
कविता

माझे घर

दगड मातीचे घर
माझा निवारा होता
सारवलेल्या मातीचा वास
काही वेगळा होता

दारात टाकलेला सडा
आणी काढलेली रांगोळी
हेच होते घराचे वैभव
दिवा सांयकाळी पाजळी

मातीच्या घरात होती 
सोन्यासारखी माणसं
प्रेम जिव्हाळा आणि विश्वास
यांचा दरवळत होता येथे सुंगध

घराला माझ्या होते 
माणुसकीचे कुंपन
घरी येणाऱ्या प्रत्येकाशी
होत होती नात्यांची गुंफण

घराच्या चार भिंती येथे
चार विश्वासाचे खाब होते
प्रत्येक कुटुंबाचा आदर करणे
असे माझे घर होते.

राजेंद प्रल्हाद शेळके
किनगाव राजा
सिंदखेड राजा
बुलढाणा
9823425852


नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...