Sunday, 7 March 2021

प्रवासातील मैत्री

                            प्रवासातील मैत्री

मी घड्याळाकडे बघितले तर दहा वाजले होते. मी घाई घाईने रिक्षातून उतरून रेल्वेस्थानकाच्या पायऱ्या पटापटा चढून तिकीट काउंटर जवळ गेले. बघते तर काय....? खूप लांबच लांब रांग होती. अरे बापरे....! आता किती वेळ लागणार. साडेदहाची गाडी आहे. आज नेमकी गाडी वेळेवर धावत आहे. इतरवेळी पाच दहा मिनिटे गाडी लेट होत असते. नेमकी आज मला वेळ झाला. त्यातही गाडी वेळेवर आता कसे करू....! तिकीट घ्यायला या रांगेत लागले तर माझी गाडी नक्की सुटेल. काय करावे मला काहीच सुचेनासे झाले होते. मी तिकीट काउंटर जवळ जाऊन उभी राहिले. रांगेतील कोणी नागपूरला जाणार असेल तर त्याला एक तिकीट काढायला सांगूया. हात जोडून विनंती करू याशिवाय दुसरा पर्याय ही नाही आपल्याकडे....! मी खिडकीजवळ उभी राहून प्रत्येकाला विचारत होते. नागपूरला जाणार आहात का आपण....! पण काहीजण वर्धा, तर काहीजण भुसावळ, मुंबई सांगत होते. अचानक एक तरुण तिकीट खिडकीजवळ धावत धावत आला. प्लीज मॅडम थोडे सरकता का बाजुला....! असे म्हणून मला बाजूला केले. खिशातील पॉकीटातुन दोनशेची नोट खिडकीतून आत दिली. मोठ्या आवाजात  म्हणाला....! सर एक नागपूर द्या. मला कळायच्या आत त्याने तिकीट हातात पण घेतले व तो निघाला. मी पटकन त्याला आवाज दिला. ओ सर....! प्लीज....! मला पण एक नागपूर चे तिकीट हवे. प्लीज....! तेवढे काढून द्या. अहो मॅडम....! अगोदर सांगायचे ना....! द्या आता पैसे लवकर....! असे म्हणून तो पुन्हा खिडकीच्या तोंडाशी जाऊन आतील साहेबांना म्हणाला. परत एक नागपूर द्या. मी घाईघाईने पर्स मधील पैसे काढून त्याच्या हातात दिले. त्याने खिडकीतून तिकीट घेतले व मला म्हणाला. अहो मॅडम....! चला लवकर गाडीची वेळ झाली. गाडी प्लॅटफॉर्मवर येईल इतक्यात. या गाडीला दोनच मिनिटाचा थांबा आहे. गाडी जास्त वेळ थांबत नाही. मी अगदी जोरात जोरात त्याच्या मागे चालु लागले. रेल्वे स्टेशनच्या त्या पायर्‍या पटापट चढतांना मला खूप थकवा आला होता. त्यामुळे माझ्या श्वासोच्छ्वास सुद्धा वाढला होता. मी मनाशीच विचार केला कशाला बरं या पायऱ्यांची इंग्रजांनी शक्कल काढली असेल....! सरळ सरळ प्लॅटफॉर्म पाहिजे. किती घाईघाईत या पायर्‍या चढाव्या लागतात. तो तरुण अगदी चपळ होता. शरीराने धष्टपुष्ट अगदी तगडा होता. तो पटपट पायऱ्या चढून प्लॅटफॉर्मवर पोहोचला. मी गर्दीतुन कशीबशी वाट काढत त्याच्यामागे गेले. आज प्लॅटफॉर्मवर खूपच गर्दी दिसत होती. मी त्या गर्दीला बघून विचार केला. अरे बापरे....! आता तर कठीण झाले. गाडीत जागा काही मिळत नाही. बघू जागा मिळण्यापेक्षा गाडीत चढणे महत्त्वाचे आहे. गाडीत चढता आले तरी खूप झाले. मी मनाशी पुटपुटत होते. तेवढ्यात माझ्या लक्षात आले आपले तिकीट या तरुणाकडेच आहे. मी त्याला ते तिकीट मागुन घेतले. त्याने मला तिकीट देताच मी त्यांचे आभार मानले. त्याने स्मितहास्य करून वेलकम....! म्हणून तो पुढे निघून गेला. मला जरा या तरुणाचा रागच आला. वेलकम म्हणायची काय गरज होती. मला काय परत परत त्याच्याकडून तिकीट काढून घ्यायचे नव्हते. आणि हो संकटाच्या वेळी एखाद्याला मदत केली म्हणून काय झाले. ती पण आम्ही लेडीज आहोत म्हणून....! आम्हाला तुमच्यासारखी धावपळ जमत नाही. नाहीतर मी माझे तिकीट घेतले असते की, पण रांगेतील लोकांनी लगेच ओरडायला सुरुवात केली असती. ओ मॅडम....! रांगेत या....! असे मध्ये घुसू नका. पण तो धट्टाकट्टा तरुण होता त्याला रांगेत या म्हणायची कुणाची हिंमत झाली नाही. जरा सुंदर मुली दिसल्या की, मुलं लगेच लागतात वेड्यासारखी करायला. आता हाच तरुण बगा ना....! किती घाईघाईने निघून आला. माझे तिकीटही दिले नाही. जणू मी याच्या सोबत प्रवास करणार आहे. सरळ मला मागेमागे बोलवत प्लॅटफॉर्मवर घेऊन आला.
                रेल्वेच्या स्पीकर मधून जाहीर होत होते. कृपया प्रवाशांनी लक्ष द्या. गाडी नंबर शुन्य, दोन, एक, एक, तिन  हावडा सुपरफास्ट ट्रेन थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म नंबर दोनवर येत आहे. हा आवाज कानावर येताच....! मी दचकून गाडी येण्याकडे पाहिले. गाडी आता प्लॅटफॉर्मकडे येणार होती. अगदी दूरवर गाडीचे एक टोक दिसत होते. मी हातातील स्कुल बॅग पाठीवर लटकवली. दुसरी मोठी पिशवी हातात घेऊन गाडीचे जनरल डब्बे नेमके कुठे उभे राहतील याचा अंदाज घेत हळूहळू चालू लागले. गाडी येण्याचे जसे जाहीर होत होते. तसे लोकांनी प्लॅटफॉर्म जवळ येण्यास सुरुवात केली होती. इतरवेळी गाडीला यायला वेळ असला की, प्रवासी निवांत प्लॅटफॉर्मवर बसलेले असतात. काहीजण जेवण करतात. तर काहीजण गप्पागोष्टी, तर काही प्रवासी इकडून तिकडे फिरत असतात. काही वेळातच गाडी मोठा हॉर्न वाजवतच धड्धड् धड्धड् करत प्लॅटफॉर्मवर येवून थांबली. गाडीच्या दरवाज्याजवळ एकच गर्दी जमली. उतरणारे जेवढे प्रवासी असतील, त्याच्या डबल प्रवासी आज चढण्यासाठी उभे होते. अरे देवा....! आता कसं करू....! असे म्हणून मी गर्दीत उभी होते. पाठी मागचे लोकं जोरजोरात ढकलत होते. माझी खूप चिडचिड होत होती. लोक किती मूर्ख आहे ना....! कशाला लोटत असतील. मुलगी, महिला, म्हातारी माणसं कळत नाही का? यांना....! रेल्वे काय यांच्या बापाची आहे जणू....! मूर्ख कुठले....! तरी माझे बाबा म्हणाले होते मृणाल रेल्वेने नको जाऊस, हल्ली खूप गर्दी असते. सकाळी सकाळी छान पैकी एसटी बसने तुला बसून देतो. पण बाबांचे ऐकेल ती मृणाल कसली. खूप हट्टी आणि स्वतःची चालवणारी मी मुलगी आहे. गर्दीत लोटत लोटतच मी रेल्वेच्या आत कधी शिरले मला कळाले पण नाही. रेल्वेच्या डब्यात प्रचंड गर्दी होती. श्वास घ्यायला पण मोकळी जागा नव्हती. सगळ्या शेगांव मधील प्रवाशांना ही एकच रेल्वे होती की काय माहित. मान वळून बघायला सुद्धा जागा नव्हती. मी आता अंदाज घेतला गाडीत आपल्याला उभे राहूनच नागपूरपर्यंत जावे लागणार. माझ्या समोरच्या काकांनी त्यांच्या सोबतच्या मित्राला विचारले. आज शेगांव मध्ये एवढी गर्दी कशी काय....!  अहो आज गुरुवार नाही का....! गजानन महाराजांच्या दर्शनाला लांबून लांबून भाविक येतात. राज्यभरातून शेगांवला येणाऱ्या भक्तांची संख्या काय कमी आहे काय....! लोकांनी आज दर्शन घेण्यासाठी कालपासूनच शेगांवात गर्दी केली असेल. सकाळी सकाळी दर्शन झालेले भाविक परत निघाले. त्यामुळे आज एवढी गर्दी आहे. तेव्हा माझ्या लक्षात आले. अरे हो....! आज गुरुवार आहे. गजानन बाबांचे दर्शन घ्यायचे राहिले की, आईने किती वेळेस ओरडून सांगितले होते. जायच्या अगोदर एकदा मंदिरात दर्शन घेऊन येशील. रात्री माझ्या लक्षात होते पण सामानाची पॅकिंग करता करता खूप वेळ झाला. सकाळी जायचे तर सकाळी मैत्रिणी घरी भेटायला आल्या त्यामुळे गजानन महाराजांचे दर्शन राहूनच गेले. मी तेवढ्या गर्दीत कसेबसे हात जोडून गजानन महाराजांना नमस्कार केला. बाबांची क्षमा मागून हात जोडले. आता नागपूर वरून परत आले की, पहिले बाबांच्या दर्शनाला जायचे असे मी ठरवले. गाडी आता शेगांवला मागे टाकून पुढे आली होती. सगळे प्रवासी गर्दीत जमेल तसे पिशव्या, मोठ्या मोठ्या बॅग शिटखाली काही वरती ठेवत होते. मी गर्दीतून सावरत सावरत पुढे येऊ लागले होते. ओ काका....! प्लीज मला समोर जाऊ द्या. असे म्हणून मी डब्याच्या मधोमध आत आले. परंतु येथे पण तेवढीच गर्दी होती. पण मनाला एक समाधान होते. दरवाजा जवळ उभे राहण्यापेक्षा येथे बरे....! कमीत कमी चोर, फामटे यांच्या पासून सावध आहे आणि येथे काही महिला पण आहेत. तिकडच्या पेक्षा इथे सुरक्षित असल्याचे मला भासत होते. एकदाचा श्वास घेऊन मनाची तयारी केली. आता नागपूर पर्यंत उभे जाऊया. आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचे. आपण मुलगी असलो तरी कणखर आहोत. मनाची समजूत घालण्यात मी तशी पटाईत होते. माझे मन कितीही चपळ असले, ते मला कितीही भरकटवत असले तरी, मी मात्र त्याची बरोबर समजूत घालत असे. माझ्या आईचे व बाबांचे संस्कार नेहमी माझ्या पाठिशी होते. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे मला कठीण नव्हते. त्यामुळे मी आता थोडीशी रिलॅक्स झाले.
               तेवढ्यात मला वरच्या सीटवर बसलेल्या तरूणाने आवाज दिला. ओ मॅडम....! येथे बसता का....? मी आवाजाकडे मान वळून पाहिले तर, तो तरुण होता. ज्याने मला घाईघाईत का होईना तिकीट काढून दिले होते. मी त्याच्याकडे पाहत त्याला नाही म्हटले. तो परत म्हणाला, मॅडम डब्बा खूप पॅक आहे. शक्यतो सर्व प्रवासी नागपूरलाच जाणारी आहेत. त्यामुळे पुढच्या स्टेशनवर सुद्धा जागा मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे बसा वसती. नागपूर यायला जवळजवळ पाच तास लागतील. एवढ्या वेळ उभे राहण्यापेक्षा बसा येथे. काय हरकत आहे हवं तर मी खाली उतरतो. नाही....! नाही....! तुम्ही बसा. तुम्ही कशाला उतरता माझ्यासाठी....! मी नाही म्हणून सुद्धा तो तरुण खाली उतरला. त्याने माझी पिशवी एका शिटच्याखाली लोटून दिली. माझ्या हातातली स्कूल बॅग वरती शीटवर ठेवून दिली. मी हळूच शिटच्या दोन्ही कडेला पकडून रिलींगने चढून वरती जाऊन बसले. त्यांच्याकडे बघून त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद दिला. आता मात्र माझ्या मनात त्या तरुणांविषयी विचारा आला. बिचारा चांगल्या मनाचा आहे. आपण उगाच त्याच्याविषयी वेगळा विचार केला व मनात राग राग व्यक्त केला. खूप वेळ झाला दोन स्टेशन येऊन गेले. तरी डब्यातील गर्दी काही कमी झाली नाही. बिचारा उभा राहून कंटाळून गेला असेल. मी थोडीशी बाजूला सरकून त्याला आवाज दिला. अहो सर....! तुम्ही पण बसा येथे किती वेळ उभे राहता. करू कसेतरी अडजेस या वरती. असे म्हणताच तो पटकन वरती चढला. माझ्या शेजारी येऊन बसला. कमी जागेत दोघेजण बसलो होतो त्यामुळे तो बिचारा जरा स्वतःला आखडून बसला होता. त्याला नीटसे बसता येत नव्हते. माझ्यामुळे त्याला विनाकारण उभे राहावे लागले. आता अडचणीत बसावे लागत आहे. बिचारा खरचं मनाने चांगला असला पाहिजे. नाहीतर कोण अनोळखी माणसासाठी एवढे करणार. जरी मुलगी असली तरी कुणी स्वतःची जागा दुसऱ्याला देत नाही. तो माझ्याशी काहीतरी बोलेल मला नाव गाव विचारेल. नागपूर का जात आहे हे जाणून घेईल. असे मला वाटले पण तो बिचारा काही बोलत नव्हता. मी बऱ्याच वेळ शांत बसून होते. पण मन मात्र सारखं बडबडत होतं. त्याला बोलावे असे मला सुचवत होतं. शेवटी मी हिंम्मत करून त्याला विचारले. तुम्ही नागपूरलाच जाणार आहात की, नागपूर वरून पुढे....! तो हसर्‍या चेहर्‍याने हळूच म्हणाला हो....! हो....! मी नागपूरलाच जात आहे. मी नागपुरातच राहतो त्यामुळे पुढे कशाला जाणार. अच्छा....! म्हणजे तुम्ही नागपूरचे आहात तर....! नाही मॅडम....! मी नागपूरचा नाही. मी मुळचा खामगावचा आहे. मी नागपूरला शिक्षणासाठी राहतो. अरे वा छान....! असे म्हणून मी शांत बसले. पुढे काय बोलावे हे मला समजेना तो मात्र शांत बसला होता. मला वाटले तो माझी चौकशी करेल, पण तो काहीच बोलला नाही. मी पुन्हा खूप वेळ शांत बसले. तो मला मॅडम म्हणून संबोधत होता. कदाचित मी नोकरीला आहे असा त्याचा गैरसमज तर झालेला नसावा. मी स्वतःहून त्याला थोड्या वेळाने हळूच सांगितले. मी नागपूरला चालले मावशीकडे....! माझी मावशी राहते पंचवीस वर्षापासून त्यामुळे अधूनमधून येणे जाणे असते. अरे वा....! छान आहे की मग मॅडम....! त्याने पुन्हा मॅडम म्हटले....! मी मात्र त्याला सांगितले. मी मॅडम नाही व माझे नाव सुद्धा मॅडम नाही बरं का....! मी मृणाल....! सगळे मला मृणालच म्हणतात. तुम्ही पण मृणालच म्हणा....! मॅडम वगैरे नको....! अरे वा....! छान नाव आहे की मृणाल....! आणि हो  मॅडम जरी नसल्या म्हणून काय झाले. तुम्ही मॅडम सारख्या दिसता बरं का....! तसेही आमच्या कॉलेजमध्ये सर, मॅडम बोलायची पद्धत आहे. त्यामुळे मी तुम्हाला मॅडम म्हणून संबोधले. तुम्हाला राग आला का....! नाही....! तसे काही नाही....! पण उगाच पदवी कशाला. कॉलेजला आहात म्हणजे नेमक काय शिकता आपण....! मी एमबीए करतो. बापरे....! खूप शिकत आहात तुम्ही. खरं तर मी तुम्हाला सर म्हणायला पाहिजे होते. सॉरी बरं का....! मी तुम्हाला एकदा पण सर नाही म्हणाले. आणि हो....! तुम्ही वयाने पण माझ्यापेक्षा मोठे आहात. असे काही नाही. माझे नाव  घनश्याम....! तुम्ही मला घनश्याम म्हटले तरी चालेल. मी त्याचे नाव ऐकून घेतले पण पुढे काहीच बोलले नाही. त्यामुळे घनश्याम पुढे म्हणाला माझे नाव घनश्याम....! आवडले  नाही का? नाही असे काही नाही. छान नाव आहे तुमचे आणि हो नावाप्रमाणे स्वभाव पण छान आहे. मी अनोळखी असतांना सुद्धा तुम्ही आज खूप मदत केली. खरंच तुमचे आभार कसे मानावे कळत नाही मला....! खूप खूप धन्यवाद तुम्हाला....! मृणाल आपण एकमेकांचे मित्र होऊया म्हणजे सॉरी आणि धन्यवाद म्हणायची गरज भासणार नाही. आवडेल ना तुम्हाला मैत्री करायला. हो....! हो....! चालेल की, मी अडखळत बोलले. घनश्याम बोलायला जेवढा गोड होता. तेवढीच त्याची भाषा पण फार गोड होती. दिसायला पण सुंदर, मनमोहक होता. उंचपुरा, देखना, नाक अगदी धारधार, सुंदर असे केस, चेहऱ्यावर एक आनंददायी चमक, सतत हसतमुख, हुशार होता. तिकीट काउंटर जवळ भेटल्यापासुन ते आतापर्यंत मला तो एकदा पण दुःखी, चिंतेत दिसला नाही.  प्रत्येक प्रसंगाला हसतमुखाने तोंड देत होता. खरंच घनश्याम खूप हुशार असला पाहिजे. त्याच्या हुशारीचे तेज त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मी काही त्याच्या पेक्षा दिसायला कमी नव्हते. त्याच्यापेक्षा गोरी, नाका डोळ्यात पण मोहक, लांब केसाची वेणी, आकाशात वीज चमकावी तशी सौंदर्याने चमकत होते. पण माझे हे सौंदर्य घनश्यामला कदाचित आवडले नसावे किंवा खूप संस्कारी मुलगा असावा. नाहीतर सौंदर्याने बहरलेली एक तरुणी मघापासून जवळ असतांना सुद्धा तो एक शब्द न बोलता शांत बसून होता. माझ्या विषयी जाणून घेण्याची ओढ त्याला नव्हती. मी एकटी प्रवास करत आहे हे त्याला माहीत असून सुद्धा तो माझ्याशी अतिशय सभ्यतेने वागत होता. मी एकटी आहे म्हणूनच त्याने मला बसण्यासाठी जागा दिली. माझी पिशवी ठेवण्यासाठी मदत केली. खरंच घनश्याम खूप चांगला मुलगा आहे. माझी ओळख नसतांना सुद्धा मॅडम म्हणून माझा फार आदर करत होता. का कुणास ठाऊक घनश्याम मला एकदम चांगला वाटू लागला होता. आम्ही जणू खूप दिवसा पासूनचे मित्र आहोत असे भासू लागले. इतरवेळी मी कुणाशीच न बोलणारी, पुरुषापासून दूर राहणारी, प्रवासात असे कधी कुणाशी स्वतःहून बोलत नसे. मी याआधी अनेक वेळा मावशीकडे आले पण आई-बाबासोबत असायचे त्यामुळे कधी कुणाशी बोलण्याची वेळच येत नसतं. पण यावेळी नेमकी एकटी आले. त्यात ही गर्दी त्यामुळे माझा घनश्यामशी संबंध आला. घनश्यामने तिकीट काढून दिले त्यावेळी तो काय करत असेल? कुठे राहात असेल? याचा विचारही मनात आला नाही. तो परत भेटेल हेही माहीत नव्हते. परंतु योगायोगाने तो परत भेटला. कदाचित दुसऱ्या डब्यात शिरला असावा व जागा शोधत शोधत तिथे येऊन बसला. पण येवढ्या कमी वेळात घनश्याम गाडीत चढून जागा शोधून वरती येऊन सुद्धा बसला होता. खरंच घनश्याम नुसता दिसायला सुंदर नव्हता तर तो चपळ, तल्लखही तेवढाच होता. मी मनातल्या मनात घनश्यामचा विचार करत होते. तेवढ्यात घनश्याम मला म्हणाला, मृणाल तू शेगांवला असतेस का? नाही. मी मूळची औरंगाबादची आहे पण माझ्या बाबांची शेगांवला बदली झाली. त्यामुळे मी शेगांवला राहते. अरे वा....! बाबा नोकरीला आहेत म्हणायचे की, हो....! माझे बाबा बँकेत नोकरी करतात व आई गृहिणी आहे. बरं....! छान आहे की मंग....! तु नेमकी काय करतेस. मी बी. कॉमच्या तृतीय वर्षाला आहे. अरे वा छान....! बाबा प्रमाणे बँकेत नोकरी करायची इच्छा आहे वाटतं....! नाही असे काही नाही. मला अगोदर पासून बी. कॉम करायची इच्छा होती. हल्ली नोकऱ्या कुठे आहेत येवढ्या. शिक्षण घेतले म्हणजे नोकरी मिळेलच याची शाश्वती सध्याच्या युगात देता येत नाही. ते पण आहे म्हणा....! पण तुमच्यासारख्या हुशार मुलींना नक्की मिळतो जॉब. मी हसतच  घनश्याम कडे बघुन बोलली. मी आणि हुशार....! काय मजाक करता आपण....! कोणी सांगितले तुम्हाला....! सांगायची काय गरज आहे. तुमच्या चेहऱ्यावरून कळतेच की तुम्ही हुशार आहात ते....! असे चेहर्‍यावरून कळाले असते तर माझ्या सारखी प्रत्येक मुलगी नोकरीला असली असते. घनश्याम तुम्ही एमबीए बरोबर भविष्य पण शिकता की काय? हळूहळू तुम्हाला भविष्य पण कळायला लागले. आम्ही दोघेपण खूप हसलो  दोघांच्या गप्पा गप्पात टाईम मात्र निघून जात होता. बरं झालं एका दृष्टीने मला घनश्याम भेटला तो....! नाही तर खूप बोर झाले असते. उभे राहतच नागपूर गाठावे लागले असते. घनश्यामचा सहवास मला छान वाटत होता. मी प्रवासात एकटी आहे हे विसरून गेले होते.
                                बघता बघता प्रवासातील चार तास निघून गेले. वर्धा जवळ आले होते. एकदा का वर्धा येऊन गेले म्हणजे गाडी डायरेक्ट नागपूरलाच थांबणार होती. खूप दिवसांनी मावशीकडे जात होती. ते पण एकटी असल्यामुळे मावशी काळजीत असेल. बाबांनी मावशीला तसे कळवले होते. मृणालला आज नागपूरला बसून देतो शक्य झाल्यास विवेकला घ्यायला पाठवून द्या. विवेक हा मावशीचा मोठा मुलगा तो पुण्याला इंजिनियर आहे. पण काही दिवसासाठी तो घरी आलेला आहे. कदाचित तो घ्यायला येणार असेल तर फोन करेलच की, तो आला म्हणजे घनश्यामला  उतरल्यावर बोलत बसता येणार नाही. नाहीतर परत घनश्याम कोण, कुठुन आला हे सर्व विचारणा होईल. नको....! नको....! उतरतांना बोलत बसायचे नाही. त्याला डब्यातच बाय करायचे व आपले आपण एकटे खुशाल उतरायचे. मी मनात असा विचार करतच होते. तोच त्याने मला प्रश्न केला. मृणाल तू किती दिवस राहणार नागपूरला. बघू आता मावशी किती दिवसांनी पाठवते ते....! एक आठवडा तरी मावशी मला पाठवणार नाही. फोनवर आधीच सांगत होती नागपूरला आल्यावर किमान एक आठवडा तरी थांबशील. परत लग्न झाल्यावर कुठे थांबायला वेळ मिळतो.
म्हणजे....! तुमचे लग्न ठरले की काय? नाही हो....! त्याने एकदम आश्चर्यचकित होऊन प्रश्न विचारला. जणू माझ्या लग्नाची त्याला चिंता पडली होती. नाही म्हटलं तुमचे लग्न ठरले असेल तर बोलवा आम्हाला तुमच्या औरंगाबादला. यानिमित्ताने तुमच्याकडे येणे होईल. खूप प्रेमळ साध्या मनाचा होता घनश्याम. अगदी चार तासाच्या आमच्या मैत्रीत तो खूप सहज बोलत होता. जणू आम्ही खूप जुने मित्र आहोत. लग्न ठरले की, तुम्हाला नक्की बोलवू या मगं....! नाहीतर विसरुन जाल कोण मृणाल....! नाही हो….! मी विसरभोळा नाही माझ्या सर्व लक्षात राहते. मगाशी तुमचे तिकीट माझ्याकडे राहिले होते. हे माझ्या आठवणीत होते बरं का....! पण प्लॅटफॉर्मवर येण्याच्या घाईत मी दिले नाही. बघता बघता नागपूर जवळ आले होते. लोक आपल्या पिशव्या शोधत होती. काहींनी तर पिशव्या जवळ घेऊन पण ठेवल्या होत्या. लोकं चढायला पण घाई व उतरायला पण येवढी घाई का करत असतील कुणास ठाऊक. घनश्याम हळूच खाली उतरला त्याने मला खाली यायला सांगितले. माझी पिशवी काढून दिली. स्कूल बॅग माझ्या हातात देत म्हणाला, मॅडम....! बॅग सांभाळा बरं  का तुमची....! परत म्हणसाल बॅग दिली नाही. मी मनाशीच विचार करत होते. नागपूर खूपच लवकर आले अजून दूर पाहिजे होते. चार-पाच तासाचा घनश्यामचा सहवास मला छान वाटत होता. खरंच घनश्याम एक चांगला मित्र झाला होता. त्याने मला आज खूप मदत केली होती. गाडी अगदी शहरात आली होती. गाडीने मोठा हॉर्न वाजवला होता. सगळ्यांना मी आले सांगत सांगत गाडी प्लॅटफॉर्मवर जाऊन उभी राहिली. घनश्यामने माझी पिशवी उचलली व तो समोर चालू पण लागला. मी त्याच्या मागेमागे गर्दीतून डब्यातून उतरले. घनश्याम आताही प्रसन्न वाटत होता. लोक स्टेशनच्या बाहेर जात होती. तर काही प्रवासी गाडीत बसत होते. मी व घनश्याम गर्दी कमी होण्याची वाट पाहत एका बाजुला उभे राहिलो. तेवढ्यात गाडी निघून गेली. घनश्याम त्याच्या हातातील पिशवी मला देऊन तो म्हणाला येतो. मृणाल मॅडम....! राहूद्या ओळख. पुन्हा भेटू कधीतरी चला बाय....! काळजी घ्या. असे म्हणून घनशाम गर्दीतून वाट काढत काढत निघून गेला. मी दहा मिनिटांनी गर्दी कमी झाल्यावर पिशवी घेऊन प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडले. तेवढ्यात बाहेर मला विवेक दिसला. मी त्याला लगेच आवाज दिला भैय्या इकडे बघ....! मी इकडे उभी आहे. विवेकने  मला पाहताच माझ्याकडे येऊन माझी पिशवी घेतली. मी विवेक सोबत मावशीच्या घरी पोहोचले. माझ्या येण्याने मावशी खूप खुश झाली होती. मी हात पाय धुऊन फ्रेश झाले मावशीने छान पैकी माझ्यासाठी गरम नाश्ता बनवून ठेवला होता. मी चहा नाष्टा घेतला व थोड्या वेळ आराम केला. रात्री मावशी, काका सोबत खुप गप्पा मारल्या. मावशी म्हणाली मृणाल आता रात्र खुप झाली. चल आराम करं उद्या बोलुया प्रवासाने थकली असेल. शेवटी मी बेडवर जाऊन पडले. मला काही केल्या झोप लागत नव्हती. झोपतांना मला मात्र घनश्यामची खूप आठवण झाली. अरे आपण घाई घाईत त्याचा मोबाईल नंबर पण घ्यायला विसरलो. नाहीतर त्याला चुपचाप फोन करुन सांगता आले असते. विवेक घ्यायला आला होता. मी मावशीच्या घरी पोहोचले. पाच तासाच्या प्रवासातील त्याची मैत्री एक आठवण बनुन गेली. घनश्यामच्या त्या आठवणीने मला कधी सुखद झोप लागली ते कळले सुद्धा नाही.

🙏🙏🙏🙏
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852






बॉस

                                          बॉस

कानावर वाहनांचा आवाज व माणसांचा कल्ला येऊन आदळला. कानावर सारखा होणारा हा आघात मला हळूच चुळबूळ करत उठवू लागला. हळूहळू जाग येताच मी रात्री पासून मिटलेले डोळे हळूच अर्धवट उघडले. पडल्या पडल्या समोरच्या खिडकीकडे बघतो तर, सूर्याची किरणे खिडकीच्या फटीतून आत येऊ पाहत होते. या किरणांना मला उठ म्हणायची जणू घाई झाली होती. त्या सूर्यप्रकाशाच्या किरणांना बघुन माझ्या डोळ्यातील झोप लगेच पळाली. मी पटकन उठून बसलो. अरे बापरे....! खूप वेळ झालेला दिसतोय. घाईघाईने मोबाईल हातात घेऊन किती वाजले ते पाहिले. बघतो तर काय? साडे आठ....! बापरे....! खूपच उशीर झाला. आता बॉस रागवणार. आज ऑफिसमध्ये बॉसने लवकर यायला सांगितले होते. नेमका झोपेने आजच बदला घेतला. आता ऑफिसला जायला उशीर होणार यात काही शंका नाही. मला अर्धवट झोपेतच पुढचे रामायण कळाले होते. मी बॉसच्या भीतीने अंगावरील चादर पटकन बाजूला सरकवली. आज कपड्यांच्या घड्या तश्याच ठेवल्या. ब्रश करत करत बाथरूम मध्ये गेलो. घाईघाईने अर्धवट अंग ओले करतच स्नान पुर्ण केल्याचे मनाची समजूत घालत बाहेर आलो. ऑफीसचा ड्रेस चढवला. हातात घड्याळ घालत टाय शोधू लागलो. नेमकी कुठे हरवला? हा टाय….! रोजच हरवून बसतो. आई म्हणते ते खरे आहे. टाय व्यवस्थीत सांभाळणारी व वेळेवर शोधून देणारी आता शोधली पाहिजे. एका हातात ऑफिसची बॅग घेऊन, एका हाताने टाय गळ्यात लटकवला. घाईघाईने रस्त्यावर येऊन उभा राहिलो. एका रिक्षाला हात देऊन ऑफिसमध्ये सोडायला सांगितले. रिक्षात बसलो त्या रिक्षा ड्रायव्हरने रिक्षा सुरू केली. रिक्षा समोर चौकात येताचं तो हळूच म्हणतो, “ साहेब नेमक्या कोणत्या ऑफिस मध्ये सोडू तुम्हाला? ” अरे तुला सुहास इन्शुरन्स कंपनीचे ऑफिस माहित नाही का? अहो साहेब मला या शहरातील प्रत्येक ऑफिस माहित आहे. पण तुम्हाला नेमकी कोणत्या ऑफिसमध्ये जायचे हे माहीत असल्याशिवाय मी तुम्हाला तेथे सोडणार कसे....! अरे हो....! मी तुला माझ्या ऑफिसचे नाव सांगायला विसरलो. अरे भाऊ सॉरी बरं का....! घाई घाईत मीच विसरलो. रिक्षावाला माझ्याच वयाचा होता. तरी मी त्याला भाऊ म्हणून उगाच भाव दिला. माझी गरज होती ना....! वेळप्रसंगी मुर्खालाही काका म्हणायास हवे....! ही आमच्या बाबांची शिकवण मी पक्की लक्षात ठेवली होती. तसा तो रिक्षावाला मूर्ख नव्हता, पण माझी झोप मूर्ख ठरल्याने मला काही सुचत नव्हते. भाऊ रिक्षा थोडी लवकर घे मला अगोदरच उशीर झाला आहे. थोडे दोनचार मिनिटे लवकर सोडता आले तर बरं होईल. हो साहेब....! प्रयत्न करतो. तो रिक्षावाल्याचा सकारात्मक प्रयत्न बघून मला थोडे बरे वाटले. रस्त्यावरील गर्दीतून वाट शोधत-शोधत अखेर रिक्षा सुहास इन्शुरन्स कंपनीच्या गेट समोर उभी राहिली. मी घाईघाईत खाली उतरून त्या रिक्षावाल्याला पन्नासची नोट दिली. तत्परतेने गेटच्या आत शिरलो. रिक्षावाला मोठ्या आवाजात म्हणाला, “ साहेब तुमचे राहिलेले दहा रुपये परत घेऊन जा. ” मी मात्र त्याला हाताने राहू दे असा इशारा करून पुढे निघून गेलो.
                    आज मला ऑफिसच्या पायऱ्या चढतांना प्रत्येक पायरी एका किलोमीटर एवढी दूर असल्याचे भासत होते. शेवटी सर्व धावपळ करून ऑफिसच्या दरवाजा समोर येऊन उभा राहिलो. एक दीर्घ श्वास घेऊन दरवाजा आत लोटून म्हणालो, “ सर आत येऊ का? ” या विवेक सर तुमचे स्वागत आहे. साहेबांनी वर न पहाताच मला आत येण्याचे सुचित केले. मी साहेबांच्या समोर जाऊन उभा राहिलो. साहेब अगदी रागाच्या मुद्रेने माझ्याकडे बघत मला बोलू लागले. विवेक सर किती वाजले? ही येण्याची वेळ आहे का? सर थोडा उशीरच झाला. थोडा नाही विवेक....! चक्क अर्धा तास उशीर झाला तुम्हाला. मी अगदी चोरट्या नजरेने बाजूच्या भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे बघितले. तर खरंच साडेनऊ वाजले होते. मी शांत उभा होतो. आज साहेब नेहमीपेक्षा खूप चिडलेले होते. अगदी मोठ्या आवाजात माझ्याशी बोलत होते. जणू साहेबांचा आणि माझा वाद सुरू आहे. विवेक तुम्हाला मी काल सांगितले होते. उद्या सकाळी नऊ वाजता हजर रहा. आपल्याला एका कंपनीसोबत डिल करायची होती. समोरच्या पार्टीला मी नऊ वाजता येण्याचे सुचविले आहे. तुम्हाला वेळेचे काहीच महत्त्व वाटत नाही. वेळ कुणासाठी कधीच थांबत नाही. आपल्याला वेळेसोबत चालावे लागते. तुमच्या सारख्या तरुण लोकांकडून मला ही अपेक्षा नव्हती. साहेबांच्या त्या खरमरीत बोलण्याने मला खुप राग आला होता. असे वाटत होते आत्ताच्या आत्ता राजीनामा लिहून साहेबांच्या तोंडावर फेकावा व स्वाभिमानाने या ऑफिसमधून बाहेर पडावे. पण मी या क्षणी तेही करू शकत नव्हतो. कारण हा जॉब सोडून परत नवीन जॉबच्या शोधात मला काही दिवस खाली राहावे लागेल. यामुळे माझे आर्थिक नुकसान होईल व ते मला परवडणारे नव्हते. मी माझ्या रागाचा तोरा गिळून घेतला. चेहऱ्यावरचा रागाचा भाव बाजूला सारून साहेबांच्या कडे बघून बोललो. सॉरी सर....! मला उशीरच झाला. पण मी जाणून बुजून उशीर केला नाही. साहेब मला आज जागच आली नाही. रात्री झोपायला खूप उशीर झाला होता. रात्री काय पार्टीमध्ये गेला होता की काय? की एकट्याने पार्टी साजरी केली. अजूनही साहेबांचे बोलणे रागाच्या आवेशात होते. सर तसे काही नाही. मी रात्री मित्राच्या आईला भेटायला दवाखान्यात गेलो होतो. माझ्या गावाकडील बालपणीच्या मित्राची आई कर्करोगाने पीडित आहे. गेल्या एका महिन्यापासून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहे. त्याच्याकडील पैसे संपले आता, त्यामुळे तो आईला घेऊन गावी परत जाणार आहे. मी त्यांनाच भेटायला गेलो होतो. दवाखान्यात थोडावेळ थांबून मित्रासोबत सर्व चौकशी केली. डॉक्टर पुढील उपचार करण्याअगोदर पैसे भरायला सांगत आहेत. त्याची परिस्थिती खूप बिकट आहे. त्याच्याकडे होते नव्हते त्यांने संपूर्ण पैसे आतापर्यंतच्या उपचारा वर खर्च केले. आता पैसे नाहीत म्हणून नाविलाजाने आईला गावी परत घेऊन जातोय. साहेबांनी ही सर्व हकीकत ऐकून घेतली. ठीक आहे आता लवकर कामाला लागा. सर्व फाईल्स एकदा चेक करून मीटिंगसाठी सज्ज ठेवा. समोरची पार्टी आज दुपारी दोन वाजता येणार आहे. आज त्यांचा सकाळीच फोन आला होता. नऊच्या ऐवजी मीटिंगची वेळ दोनची करण्यासाठी मी त्यांना होकार दिला. आता शार्प दोनला मीटिंग सुरू होईल. तुम्ही सर्व फाईल्स घेऊन मीटिंगसाठी मीटिंग हॉलमध्ये येऊन बसा. मी साहेबांना होकारार्थी मान हलवून ओके सर....! मी सर्व फाइल्स चेक करून शार्प दोन वाजता मिटींग हॉल मध्ये येतो. मी साहेबांच्या समोरील एक फाईल हातात घेऊन साहेबांच्या कॅबिन मधून बाहेर निघालो. तेवढ्यात साहेब म्हणतात तुमच्या मित्राच्या आईच्या उपचारासाठी आपल्या कंपनीकडून काही मदत करता येते का, यावर मी विचार करून कळवतो. फुल ना फुलाची पाकळी तरी आपण नक्की मदत करूया. मी हे ऐकून कॅबिनच्या बाहेर पडलो.
                    थोडेसे का होईना मला बरे वाटले. आपले साहेब तसे मनाने वाईट नाहीत. पण तेवढे चांगले पण नाहीत. सकाळची मीटिंग रद्द झाली होती. तरी त्यांनी मला बोलण्याची संधी सोडली नाही. दुपारी मिटींग आहे म्हणल्यावर माझ्या अर्ध्या तासाने काही कंपनीचे वाटोळे होणार नव्हते. पण स्वतः गप्प बसेल ते साहेब कसले....! साहेबकी दाखविल्या शिवाय यांच्या कंपनीला महत्त्व कसे राहील. मी महत्त्वाच्या सर्व फाइल्स एकत्र जमा करून माझ्या टेबलवर येऊन बसलो. साहेबांच्या भीतीने अंग बाहेरून घामाघूम झाले होते. तर आतून घसा सुकला होता. मी पाणी पिण्यासाठी हळुच पिशवीत हात घातला व पाण्याची बॉटल शोधू लागलो. नेमकी आज सकाळच्या नाट्यमय घडामोडीत पाण्याची बॉटल भरून घ्यायला वेळच कुठे होता. आज पाण्याची बॉटलच काय? सकाळचा नाष्टा पण केलेला नाही हे सुद्धा मी विसरलो होतो. साहेब वैभवच्या आईला उपचारासाठी मदत करणार हे ऐकून माझे पोट भरले होते. वैभवला नेमकी अशावेळेस आपल्या कंपनी कडून मदत झाली तर खूप बरे वाटेल. आणि हो....! दुःखाच्या वेळी आपण नाही तर कमीत कमी आपली कंपनी तरी कामी आली हे ऐकून त्याला ही बरे वाटेल. मी ऑफिस मधील राघव काकांना बोलावून घेतले. राघव काका....! ओ राघव काका....! थोडे इकडे येता का? काकांनी माझा आवाज ऐकताच माझ्याजवळ येऊन काय साहेब....! असा प्रतिप्रश्न केला. मी राघव काकांना फॅन सुरू करून, एक पाण्याची बॉटल आणायला सांगितली. कामाचा माझ्यासमोर ढिग पडलेला असतांना मी मात्र खुर्चीवर थंडगार हवा घेत बसलो. साहेबांच्या पेक्षा हा फॅन बरा. चुपचाप छान पैकी थंडी हवा देऊन मनाला प्रसन्न करतो. मी हळूच एक एक करत सर्व फाईल्सचे रेकॉर्ड तपासू लागलो. कमीत कमी आता दोनच्या मीटिंग मध्ये तरी आपले प्रेझेंटेशन चांगले झाले पाहिजे. साहेब खुश झाले पाहिजे. सकाळचा राग कुठल्या कुठे निघून गेला हे साहेबांना सुद्धा कळाले नाही पाहिजे. अशी तयारी करून ठेवायची असा मी मनाशी पक्का निर्धार केला. बघता बघता तिन तास मी संगणकावर काम करत बसलो होतो. जवळ जवळ प्रत्येक फाइल मी तपासून तिचे रेकॉर्ड अद्यावत लावून ठेवले होते. सर्व फाईलचा डाटा एका प्रतीत तयार करून ठेवला होता. राघव काकांनी पाण्याची बॉटल व त्या सोबत एक कॉफी मला पाजुन जणू माझे कामच हलके केले होते. साहेब झाले की नाही तुमचे काम, “ आज काय वर्षभराचे काम एकदाच संपवता की काय? ” असे बोलून राघव काकांनी माझ्या जवळचा कॉफीचा कप उचलून नेला. अहो राघव काका तुमचे काम खरंच सोपे आहे. तुम्ही सर्वांना ताजेतवाने करता. सर्वांच्या कामाचा बोजा एका कपात हलका करता. नाही हो साहेब....! तुम्ही समजता तेवढे सोपे नाही. एका कपात बॉस खुश झाला असता तर, माझे केव्हाच प्रमोशन केले असते की, मी सकाळी सर्वांच्या अगोदर येऊन सर्व साफसफाई करतो. दिवसभर सगळ्यांची वर वर करत इकडून तिकडे फिरत असतो. सायंकाळी सर्वात शेवटी सर्व लाइट पंखे बंद करून मगच घरी जातो. एवढे करून सुद्धा बॉस माझ्यावर चिडत असतात. आज सकाळीच बॉस माझ्यावर रागावले होते. राघव काका जातांना आठवणीने लाईट बंद करत चला. “ लाईट बिल किती आले पाहिले का? ” तुम्हा लोकांना काही घेणे नाही. तुमचा पगार फक्त वेळेवर झाला पाहिजे. तुम्हाला कंपनीचे उद्या दिवाळे निघाले तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. असे मला ठणकावून सांगत होते. “ जणू ही कंपनी माझ्यामुळेच तोट्यात येणार की काय? ” असे मला क्षणभर वाटले. आणि हो विवेक सर....! या कंपनीत सगळ्यात जास्त पगार मलाच मिळतो बरं का....! राघव काका खुप चिडून बोलत होते. राघव काकांनी पगाराचा विषय काढताच माझेही मन हिरमुसले. खरंच राघव काका दिवसभर या कंपनीची किती सेवा करत असतात आणि मोबदला सर्वात कमी त्यांनाच मिळतो. एवढ्या कमी पगारावर हा माणूस काम करतो. ते पण प्रामाणिक पणाने व हसतमुख चेहऱ्याने ही अभिमानाची गोष्ट आहे. बॉस बनने सोपे आहे पण राघव काका बनवून सगळ्यांचे मन जिंकणे खरंच खूप कमी लोकांना जमते. राघव काकाच्या त्या बोलण्याने मी क्षणभर त्यांच्या आयुष्यात डोकावलो. खरंच बॉस व्हायला व मोठमोठ्याने दुसऱ्याला आदेश द्यायला नशीब लागतं. ते नशीब मात्र गरीबाच्या घरी कधीच जन्माला येत नाही. पिढ्यानपिढ्या श्रीमंताच्या घरीच ते जन्माला येतं. देव काही आता गरिबांचा वाली राहिला नाही. तो पण श्रीमंत लोकांच्या हातातील भावला झाला आहे. ते वाटेल तेव्हा त्याचा नावाचा वापर करून घेतात. मी आज सकाळपासून बॉसवर चिडून होतो. आज हाताने जेवढे काम केले होते. त्यापेक्षा मनाची सफरही तेवढीच झाली होती. कामाच्या धुंदीत विचारांच्या लहरीसंगे मनाला खेळवत बसलो असतांना मध्येच राघव काकांनी निरोप दिला. विवेक सर काम झाले असेल तर, साहेबांनी तुम्हाला सर्व फाईल घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले आहे. राघव काका मी पाच मिनिटात येतो साहेबांना सांगा.
                       चला दोन वाजत आले तोफेच्या तोंडी जायला हरकत नाही. असे म्हणून मी गठ्ठाभर फाईल घेऊन बॉसच्या कॅबिनमध्ये गेलो. सर्व फाईलच्या रिपोर्टचा कागद साहेबांच्या समोर ठेवला. साहेब बादशहा सारखे खुर्ची फिरवत रिपोर्ट बघू लागले. मी गेल्या साडेतीन तासापासून माझ्या संगणकावर बसून एखादा चित्रपट पाहत होतो अशा अविर्भावात साहेब तो रिपोर्ट चाळत मध्येच माझ्याकडे बघायचे. शेवटी साहेबांनी ठीक आहे असे म्हणून फाईल्स घेऊन मिटींग हॉल मध्ये जायला सूचना केली. मी त्या सर्व फाईल घेऊन जातांना मी आज राघव काका असल्याचे मला भासू लागले. अर्धा तास काय उशीर झाला आणि हा माणूस आपल्या मागे लागला असे मला झाले. कंपनीमध्ये माझ्या सारख्या अनेक लोकांमधे मीच साहेबांना जवळ पाहिजे असतो. मी म्हणजे त्यांचा राग शांत करणारा एक हातचाच झालो होतो. काही वेळातच कंपनीच्या मिटिंग हॉलमध्ये आठ ते दहा लोक येऊन बसले. बॉस सगळ्यांच्या मध्ये बसून त्या सर्वांना नमस्कार करत स्मित हास्याचे फवारे उडवत स्वतःला खूप ग्रेट समजत होते. त्या नवीन पाहुण्यांना काय माहित होते साहेबांच्या चेहऱ्यावरील हे हसू ओढून-ताणून जमवलेले आहे. साहेब मिटिंग सुरु करूया असे एका अधिकाऱ्याने सांगताच बॉसने छान पैकी मानेने त्यांना होकार देत माझ्याकडे बघून मला इशारा वजा सूचना केली. विवेक सर चला आपल्या कंपनीचे थोडक्यात प्रेझेंटेशन करा. मी आपला सकाळपासून उपाशी कॉफीच्या दोन घोटाच्या एनर्जीवर उभा राहून तळमळीने कंपनी विषयी सांगू लागलो. ही कंपनी, येथे काम करणारे सर्व नोकर, काम करण्याची पद्धत, कंपनीचे ध्येय व येणाऱ्या काळातील कंपनीच्या सर्व संकल्पना मी योग्य पद्धतीने मांडल्या. या सर्व घडामोडींमध्ये आमच्या कंपनीचे अध्यक्ष व सर्वेसर्वा सावंत साहेबांचा खूप मोठा हातभार आहे. असे बोलून मी साहेबांना क्षणभर खुश केले. कंपनीविषयी कंपनीच्या सर्व ध्येय धोरणाविषयी अनेक प्रश्न उत्तरे झाली. मीटिंगसाठी आलेले पाहुणे मंडळी काही कमी नव्हतें. त्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत ते प्रश्न विचारायचे. सर्व जाणून त्यांचे समाधान झाले की, समोरच्या प्रश्नावर जात होते. आज माझ्या बॉस बरोबर तेही माझे बॉस झाले होते. दोन तासाच्या मिटिंग मध्ये सर्व प्रश्न उत्तरे व कंपनी सोबतच्या कराराला त्या साहेबांनी मान्यता दिली. सर्वांनी एकमेकांच्या हातात हात देऊन अभिनंदन केले. शेवटी त्या आलेल्या साहेबांच्या टिम मधील एका साहेबांनी मला विचारले. तुमचा काय परिचय आहे. मी विवेक या कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम पाहतो. किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला....! सर मला या कंपनीत लागून एक वर्ष झाले. अरे वा.....! छान.....! एका वर्षाच्या मानाने कंपनी फार समजून घेतली तुम्ही....! तुमच्यासारख्या तरुणांची साथ लाभली तर कंपनी मोठी व्हायला वेळ लागत नाही. त्या साहेबांनी माझे तोंड भरून कौतुक केले होते. सावंत साहेब....! छान नवखा हिरा शोधला तुम्ही, चांगला सांभाळा हा हिरा कंपनीचे नाव रोषन करायला कामी येईल. माझे साहेब हसतच म्हणाले, हो नक्कीच....! हा हिरा म्हणूनच तर मी गेल्या वर्षभरापासून जपून ठेवला आहे. दुसऱ्या लोकांना माहित नाही. नाहीतर केव्हाच पळवून नेला असता जास्तीचे पैसे देऊन. आज पहिल्यांदा माझ्या बॉसने माझे चार-चौघात कौतुक केले. येवढे मोठे मन आज कुठून आले यांच्या जवळ असा प्रश्न माझ्या मनाला पडला. माझे वडील व कॉलेजचे सर नेहमी सांगायचे. विवेक चांगले काम करत राहणे हे एवढेच आपल्या हातात असते. त्या कामाचे मोल करण्याचे साहस स्वतःत नसते. जगात अनेक चेहरे वेगवेगळे मुखवटे घालून मिरवत असतात. पण प्रामाणिकपणा व चांगले काम यांची स्तुती व परीक्षण करायला प्रगल्भ विचारांचा मुखवटा लागतो. तो आयुष्यात शोधत बसायचे नसतो. आपले चांगले काम एक दिवस त्याला शोधत शोधत आपल्या जवळ आणत असते. आज याची प्रचिती आली होती. गेल्या वर्षभरापासून कंपनीत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे फळ येवढ्या लोकांसमोर मिळाले होते. शेवटी कंपनीची मिटिंग सुटली. राघव काकांनी छान पैकी कॉफी बनवून सगळ्यांना पाजली. सर्वांच्या चेहर्‍यावर तरतरी निर्माण करून मिटिंगचा समारोप झाला. सावंत साहेबांना हस्तांदोलन करून ती सर्व मंडळी निघून गेली. मी त्या सर्व फाईल एकत्र गोळा करून माझ्या टेबलवर नेवून ठेवल्या. चला आता घरी जायला मोकळे असे म्हणून निघालो. तेवढ्यात साहेबांचा मला फोन आला. विवेक सर जातांना मला भेटून जा. अरे यार....! बॉस आता पुन्हा काय किस पाडत बसणार देव जाणे. असे   म्हणून मी साहेबांना भेटायला व येतो म्हणून सांगायला त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो.
                        साहेब आज आनंदाने मोबाईलवर कुणाशीतरी बोलत होते. कंपनीची पंचवीस कोटींची झालेली डिल सांगत होते. मी साहेबांचा फोन होईपर्यंत बाजूच्या खुर्चीवर बसून राहिलो. थोड्यावेळाने साहेबांचा फोन संपला. साहेब माझ्याकडे बघून त्यांनी माझे अभिनंदन केले. साहेबांनी मला विचारले विवेक सर आज तुमचा काय प्लॅन आहे. मी साहेबांना म्हणालो, साहेब माझ्या काय प्लॅन असणार....! मी सरळ रूमवर जाणार मेस वरुन आलेल्या डबा खाणार व आराम करणार. नाही म्हटलं....! “ तुम्हाला काही महत्वाचे काम वगैरे आहे का? ” यासाठी विचारले. नाही साहेब....! काही खास काम नाही. मग चला आज माझ्यासोबत छानपैकी बाहेर जेवण करूया व जाताना तुम्हाला सोडून देतो. नको....! नको....! सर, जेवण वगैरे कशाला. अहो विवेक सर असे काय करता. आज आपल्या कंपनीला पंचवीस कोटीचे प्रपोजल मिळाले. हा केवढा आनंद आहे. या आनंदात तुमचा पण मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे कशाला वगैरे असे बोलत बसू नका....! चुपचाप माझ्यासोबत चला. साहेबांनी स्वतःच्या गाडीतून एका मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये नेऊन मला त्यांच्यासोबत जेऊ घातले. कंपनीच्या मालकासोबत मी जेवायला बसलो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी एका मोठ्या रंजक स्वप्नात रमलो की काय? असे मला वाटू लागले. साहेबांनी मला शेवटी माझ्या रूमवर पोहचतं केले. शेवटी जातांना साहेब पुन्हा एकदा अभिनंदन विवेक सर....! म्हणून निघून गेले. माझ्या मेहनतीवर व प्रामाणिक पणावर  आमचा बॉस आज खूपच खूश झाला होता. हा आनंद मला आज खूप शांत झोप लावणार होता. मी मात्र मनाशी ठरवले हा आनंद असाच टिकवायचा असेल तर उद्या सकाळी लवकर उठून ऑफिसला वेळेवर पोहोचलो पाहिजे. साहेबांना आपण नाही तर आपले काम गोड आहे. असे म्हणून मी सकाळचा आलाराम लावून शांत झोपी गेलो.

🙏🙏🙏🙏
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

आमराई

                                   आमराई

बाबा दरवर्षी ठरवायचे की, शेतात दहा-बारा आंब्याची झाडे लावूया. गोड आणि वेगवेगळ्या जातीची आंब्याची कलम आणून एका लाईनीत आंबे लावायचे. पण चांगल्या कलमाच मिळत नव्हत्या. त्यामुळे दोन चार वर्षापासून आंबे लावायचे लांबणीवर पडले होते. या वर्षी मात्र काय योगायोग आला. माझे एक चुलत मामा कोकणात शिक्षक होते. ते माझ्या बाबांना नेहमी म्हणायचे, “ भाऊजी तुम्हाला कोकणातून काही आंब्याच्या कलमा आणु का? लावायला. ” बाबा त्यांना आणा सांगायचे. पण मामा नेहमी येते वेळी कलमा आणतच नव्हते. यावर्षी मामाची कोकणातून आमच्या गावाकडे बदली झाली. मामांनी माझ्या बाबाला फोन करून बदली झाल्याचे कळवले. सामान न्यायला वाहन घेऊन येता का विचारले. बाबांनी मामांना होकार दिला. त्यामुळे मामाचे सामान आणायला गावावरून एक टेम्पो घेऊन बाबा कोकणात गेले. मामांच्या सामानासोबत तेथील गावकऱ्यांकडून आंब्यांच्या वेगवेगळ्या जातीच्या बारा कलमा घेऊन आले. दोन दोन फुटांच्या त्या कलमा पाहून आम्हा भावंडांना तर खूपच आनंद झाला. माझी छोटी बहीण विमलने तर आईला विचारायला पण सुरुवात केली. आई याला आता आंबे कधी येणार. मी म्हणालो उद्या सकाळीच याला आंबे येणार आहे. अक्काबाई व मी मोठ्याने हसू लागलो. मोठ्या बहिणीला आम्ही अक्काबाई म्हणत असू....! आई मात्र विमलला म्हणाली, “ बाळा याला लगेच आंबे येत नसतात. ” आता ही आंब्याची छोटी छोटी झाडे आहेत. ही झाडे आपण उद्या शेतात नेऊन लावूया. याला मग खूप पाणी घालायचे. चार पाच वर्षे त्याला खूप पाणी पाजले की, मग ते आपल्याला छान गोड आंबे देईल. तू तो पर्यंत पाचव्या वर्गात जाशील. मी पाचवीत गेल्यावर त्याला खूप आंबे येईल कारे दादा....! विमल आनंदित होऊन विचारत होती. त्यादिवशी आम्ही चारही भावंडांनी तीन-तीन आंब्याच्या कलमा वाटून पण घेतल्या होत्या. उद्या मी बाबासोबत शेतात जाणार व माझे तीन आंबे माझ्या हाताने लावणार आहे. असे मी तिघींना सांगुन टाकले. घरी नवीन पाहुणे आल्यासारखे आंब्याच्या कलमांनी घरचे वातावरण प्रफुल्लित करून टाकले होते. कधी सकाळ होईल असे झाले होते.

              सकाळ झाली बाबा सकाळीच शेतावर निघून गेले. मी उठल्याबरोबर आईला विचारले बाबा कुठे गेले. आई म्हणाली ते शेतात गेले आहे. मला वाटले बाबा आंब्याच्या कलमा घेऊन शेतात गेले. मी लगेच रडायला सुरुवात केली. आई म्हणाली, “ राहूल सकाळी सकाळी रडू नकोस...! ” बाबांनी कलमा शेतात नेल्या नाहीत. आंब्याच्या कलमा घरातच आहे. मी रडक्या आवाजात घरात येऊन पाहतो तर खरंच कलमा घरातच होत्या. मी डोळे पुसतच हसू लागलो. त्या दिवशी बाबांनी बैलगाडी शेतातून घरी आणली. आमच्यासह  त्या सर्व कलमा बैलगाडीत घेऊन दुपारी शेतात गेले. बाबांनी आम्हाला सांगितले पोरांनो आपण ही सर्व झाडे या ठिकाणी एका रांगेत लावूया. म्हणजे पाणी द्यायला सोपे व एकाच ठिकाणी असल्यामुळे मोठी झाल्यावर आंबे राखायला पण सोपे जाईल. आता तुम्ही सावलीत खेळत बसा. मी पटापटा खड्डे खोदून घेतो. नंतर आपण त्यात या आंब्याच्या कलमा लावूया. बाबांनी टीकास, फावडे घेऊन भर उन्हात आंब्यासाठी खड्डे खोदले. मी मात्र खड्डे कधी होतात. याच्या प्रतीक्षेतच होतो. बाबांनी खड्डे खोदून त्यात थोडे थोडे पाणी टाकले. मी लगेच माझी तीन आंब्याची कलमे खड्ड्याजवळ नेऊन ठेवली. बांबानी आता आम्हाला आंब्याच्या झाडा विषयी माहिती सांगितली. आंबा हे अमृतफळ आहे. फक्त झाडे लावून त्याला आंबे येत नाहीत. त्यासाठी त्याचे लेकराप्रमाणे संगोपन करावे लागते. आता या सर्व आंब्याच्या कलमा वेगवेगळ्या आहेत. याची नावे पण वेगवेगळी आहेत. त्याला येणारे फळ सुद्धा चवीला वेगळे असणार आहे. “ बाबा यांची नावे तुम्हांला माहित आहे. ” मध्येच अक्काबाईने विचारले. नाही बाळा....! सगळी नावे माझ्या लक्षात नाही राहिली. काही आंब्याना तुम्हीच नावे द्यायची. सांगा बरे....! अगोदर कुणाची झाडे लावायची. बाबा....! बाबा....! अगोदर माझी, मी एकदम कल्ला करायला सुरुवात केली. बरं....! अगोदर राहुलचे झाड लावूया. बाबांनी कलम हातात घेतली. त्याच्या भवतालचे कापड काढून कलम खड्ड्यात ठेवली. चला हा झाला राहुलचा ‘ खोबऱ्या ’ आंबा. लोटा माती सगळ्यांनी....! आम्ही पटापटा माती लोटून ती कलम लावली. बाबांनी त्याला छानपैकी गोलाकार आळे पण केले. पुढे केसर, दह्या, खजुरा, दशेरी, साखरगोटी, बोरशा, रत्ना, राजा, शेप्या अशी नावे देत आंब्याच्या सर्व कलमा लावल्या. त्या दिवशी सायंकाळ पर्यंत आंबे लावण्याचे काम गेले. उशीर झाल्यामुळे बाबा म्हणाले, “ चला आता घरी लवकर पाणी उद्या देऊया. ” आम्ही सर्वजण संध्याकाळी घरी आलो. शेतात दिवसभर आंबे लावले. याचा आनंद घरात मावत नव्हता. आईने छानपैकी तांदळाची गोड खीर बनवली. शेतात आंबे लावले म्हणून सगळ्यांचे गोड तोंड करण्यासाठी खिरीचा बेत आखला होता. बाबा आम्हाला घेऊन जेवायला बसले. जेवता जेवता बाबांनी गंमत केली. आता सर्वांनी लवकर झोपायचे. उद्या सकाळी लवकर उठून आंबे तोडायला शेतात यायचं बर का....! उद्या सकाळीच आंबे येणार....! आम्ही सर्वजण खदखदुन हसलो. सकाळीच आंबे कसे येतील. सुमन आश्चर्याने म्हणाली, “बाबा तुम्हीपण चांगली गंमत करता.”
                                    उन्हाळाभर सुट्टीचा आनंद फक्त आंब्यांच्या कलमांना पाणी घालण्यातच गेला. जून महिन्यात शाळा सुरू झाल्या त्यामुळे शेतात जाणे बंद झाले. कधीतरी एखाद्या वेळेस शेतात जायचो. आता आंब्याचे आकर्षण पण कमी झाले होते. नव्याचे नऊ दिवस असतात असे एक महिना आंब्याचे गुणगान झाले. आता फारसे आंब्याच्या झाडांची आठवण येत नव्हती. चार वर्षांनी पहिल्यांदा काही झाडांना खूप मोहोर आला होता. यावर्षी नक्कीच आंबे खायला मिळणार असे वाटत होते. परंतु आभाळाने सर्व मोहोर गळून पडला. आंब्याला कसेतरी एक अर्धे फळ होते ते पण गारपिटीने खराब झाले. पुढच्या वर्षी नक्कीच आता सर्वच आंब्यांना मोहोर येईल. आंब्यांना मोहोर येईपर्यंत बाबांनी खूप काळजी घेतली होती. जेव्हा जेव्हा पाणी देण्यासाठी लाईटची व्यवस्था नव्हती. तेव्हा बाबा स्वतः विहिरीवरून पाणी काढुन झाडांना पाणी घालायचे. आता आंबे खूप मोठे झाले होते. अगदी हिरवेंगार, उंच, डौलदार सर्वच झाडे दिसत होती. माझ्या बाबांनी आम्ही लावलेल्या शेताला आमराई असे नाव सुद्धा देऊन टाकले होते. आमराई खरंच फुलून दिसत होती. शेतीचे वैभव झाडांनी वाढवले होते. झाडे माणसाप्रमाणेच किंबहुना माणसापेक्षा जास्त परोपकारी असतात. थंडगार सावली, गोड फळं, शेवटी इंधन म्हणून स्वतःचे लाकूड ते आपल्याला देते. माणसांनी पण झाडा प्रमाणे परोपकारी वागले पाहिजे. आई असे नेहमी सांगायची. आमराईतील झाडांना बाबांनी लेकराप्रमाणे सांभाळले होते. यावर्षी पाऊस जास्त असल्याने झाडांना भरपूर पाणी मिळाले. झाडे अगदी हिरवीगार व लसलशीत दिसत होती. पावसाळा संपताच थंडीच्या दिवसात आंब्याच्या झाडांना खूप मोहोर आला. यावर्षी सर्वच आंब्यांना खूप मोहोर फुटला होता. काही दिवसातच आंब्यांची झाडे फळांनी सजली होती. सर्व झांडाची आंबे खायला मिळणार होती. आम्ही सर्व भावंडं खूप खुश होतो. बाबांनी ठेवलेल्या नावाप्रमाणे केसर, दह्या, खजुरा, दशेरी, साखरगोटी, बोरशा, रत्ना, राजा, शेप्या या सर्व झाडांची फळे आता खूप भरली होती. आई-बाबांना एक दिवस म्हणाली, “आता काही दिवसांनी आंबे उतरून घ्यावे लागतील.” एखादा आंबा झाडाला पिकला व तो खाली पडला की लक्ष ठेवा. आणि हो....! गवताच्या पाच-दहा पेंड्या कापुन ठेवा. आंबे पिकु घालायला गवत लागेल. गवतात पिकलेले आंबे चवीला खूप छान लागतात. त्यांचा रंगही खूप पिवळा पडतो. बाबांनी गवताचे भारे कापून ठेवले. आमच्या शेतातील आमराई सगळ्या लोकांचे लक्ष वेधून घेत होती. आजूबाजूचे लोक कुतूहलाने विचारायचे. काहो माधवराव आंब्यांची आमराई लय फुलवली. यावर्षी आम्हाला आंबे खायला बोलवता की नाही. या सगळेजण आंबे खायला. आंबे पिकु द्या सगळ्यांना खायला बोलवतो. आंबा हे अमृत फळ आहे. त्याचा आस्वाद घेण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. बाबा सगळ्यांना नम्रतेने बोलायचे.
                     काही दिवसांनी आंबे उतरायला सुरुवात झाली. गावातील आंबे उतरणारे माणसं शेतात आली. आम्हाला पिकलेले आंबे खाण्यासाठी बाबा सोबत शेतात घेऊन गेले. बाबांनी सांगितले तुम्ही एका बाजूला बसून रहा. मधे मधे करू नका. मी तुम्हाला पिकलेले आंबे खायला देतो. आंबे उतरणे सुरू झाले. लोकं आंब्याच्या झाडावर चढून आंबे उतरत होते. आंब्यांनी बाटली भरली की, दोरीने खाली सोडायचे. बाबा ती बाटली उलटी करून घ्यायचे. मधेच एखादा आंबा खाली पडला की, मी लगेच पळत जाऊन पाहायचो. “पिकलेला आहे का?” कच्चा आंबा निघाला की, हिरमुसून जायचो. पिकलेला निघाला की लगेच दातांनी तोडून खाऊन बघायचो. अक्काबाई हा खूप गोड आहे. तो फोडलेला आंबा विमलला खायला द्यायचो. दिवसभरात आंब्याचा ढिगारा तयार झाला होता. बाबांनी सर्व आंबे पोत्यात भरुन बैलगाडीतून घरी आणले. आईने बैलगाडीची पूजा केली. आम्ही येवढे आंबे कधी याअगोदर पाहिले नव्हते. बांबाचे आमराईचे स्वप्न आज खरे ठरले होते. आमराईतील या आंब्यांनी घर भरून गेले होते. शेजारी पाजारी नुसती चर्चा सुरू होती. माझ्या बाबांनी आंबे लावले तेव्हा अनेकांनी बाबांना नावे ठेवली होती. पण आज आमराई फुलली तेव्हा सगळे जण म्हणत होते. खरंच तुमचा निर्णय छान होता. आईने घरातील मोकळ्या जागेत गवत पसरून त्यावर आंबे पिकु घातले. आता दोन-चार दिवसात आंबे खायला मिळणार आहे. असे म्हणत विमल उड्या मारु लागली. अगं विमल....! आपण सगळेच आंबे खाणार आहोत. त्यासाठी येवढा गोंधळ कशाला पाहिजे. आणि हो....! आंब्या सारखाच अभ्यासाचा मोह धरा जरा तुम्ही सगळेजण....! आंबा स्वतः सर्व कष्ट सोसून दुसऱ्याला गोडवा देतो. तसे जीवनात शिक्षण घेऊन काहीतरी अधिकारी बना व समाजाची सेवा करा. तुम्ही आंबे लावल्यापासून अभ्यासापेक्षा आंब्याचा जास्त अभ्यास केला. “आता तुम्ही लहान नाहीत” हे लक्षात ठेवा. अक्काबाई तुम्ही तर सज्ञान झालात. यांना सर्वांना समजवत चला. वेळप्रसंगी त्यांच्यावर रागवा. आई त्या दिवशी खूप रागावली होती. खरंच आम्ही सर्वजण आंबे व आमराई यात खूपच गुंतलो होतो. आठ दिवसांनी सर्व आंबे पिकले होते. केसर, दह्या, खजुरा, दशेरी, साखरगोटी, बोरशा, रत्ना, राजा, शेप्या  खायला खूप चवदार लागत होते. मनसोक्त आंबे खायला मिळाले होते. आईने खुप वेळा ओरडून सांगितले. सहन होईल तेवढेच आंबे खा....! नाहीतर आजारी पडसाल. माझे बाबा मात्र आम्हाला रोज म्हणायचे, “ मुलांनो आंबे खाल्ले का? ” मनसोक्त आंबे खा....! तुम्ही पाच वर्षापासून आंब्याच्या झाडाला खूप पाणी टाकले. त्या आठ दिवसात आम्ही मनसोक्त आंबे खाल्ले. शेजारी पाजारी सर्वांना थोडे थोडे आंबे दिले. उरलेले आंबे घेऊन आई बाजारात विकायाला जायची. दोन पैसे मिळाले तर, तेवढीच संसाराला मदत होईल असे आईला वाटायचे. आई दिवसभर उन्हात बसून आंबे विकायची. रात्री घरी आल्यावर बाबांना सांगायची. आज खुपच कमी पैसे आले. बाजारात खुप आंबे आले होते. आपले आंबे गोड असून सुद्धा लोकं कमी भावाला माघायचे. आपण शेतकरी आहोत, लोकांना शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाची किंमत वाटत नाही. तेच आंबे व्यापाऱ्याकडून घेतांना पहा किती पैसे द्यावे लागते. तिथे मात्र चुपचाप जास्तीचे पैसे देऊन आंबे घेतात. आपण दिवसभर उन्हात कितीही ओरडून त्यांना सांगा. आपले खरे वाटत नाही. काहींना तर आंबे गोड आहे यावर विश्वास सुद्धा वाटत नव्हता. मी त्यांच्या हातावर आंबा थोडा पिळुन त्यांना तो रस चाखायला सांगायचे. पण तो रस पिऊन सुद्धा काही जण म्हणायचे गोड आहे. पण “हा आंबा त्यातीलच आहे का?” लोकांना शंका वाटत होती. शेतकऱ्याचे जीवन खूप कष्टमय आहे. त्याला बाहेरच्या जगात किंमत नाही. हे त्यादिवशी मला कळाले. आई-बाबांचा संवाद ऐकून मी त्यादिवशी खूपच अस्वस्थ झालो. गेल्या पाच वर्षापासून बाबांनी आमराईवर घेतलेल्या मेहनतीचे फळ काय तर, लोकांना आंबे त्यांच्या मनाप्रमाणे कमी किंमतीत द्यायचे. हा जगाचा कुठला न्याय आहे. त्या दिवशी मी खूप विचार केला. स्वतःच्या कष्टाला किंमत मिळवून द्यायची असेल तर त्याला शिक्षणाची जोड द्यायला हवी.
                          मी त्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात केली. आयुष्यात बाबाच्या आमराईची किंमत ही खूप मोठी आहे. हे मी सगळ्या लोकांना एक दिवस दाखवून देईल. असा मी मनाशी पक्का निर्धार केला. शाळा व अभ्यास या रोजच्या प्रवासात मी स्वतःला खूप गुंतून घेतले. बघता-बघता काही दिवसांनी अक्काबाई बारावी पास झाल्या. मी त्यांच्या मागे मागे दहावीला पोहोचलो. यावर्षी मी खूप अभ्यास केला. दहावीचे महत्त्वाचे वर्ष आहे म्हणून, मी एकही दिवस शेतात गेलो नाही. त्या वर्षभरात आमराईला एकदा पण भेट दिली नाही. शेवटी माझ्या दहावीचा निकाल लागला. मी प्रथम श्रेणीत पास झालो. घरी सगळ्यांना खूप आनंद झाला. माझ्या आई-बाबांना तर आमराई आंब्यांनी पहिल्यांदा फुलली होती त्यापेक्षा अधिक आनंद माझ्या निकालाने झाला. मी अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. काही दिवसांनी अक्काबाईचे लग्न झाले. माझे शिक्षण अक्काबाईचे लग्न हा खर्च बाबा शेतीच्या भरवशावरच करत होते. आमची आमराई दरवर्षी आंब्याच्या रूपाने आम्हाला आर्थिक मदत करू लागली. आमराईच्या भक्कम आधारामुळे बाबांनी पुढील पाच वर्षात दोन्ही बहिणींचे लग्न केले. मी पुढील शिक्षण घेऊन शिक्षक झालो. नोकरीमुळे मी बाहेर जिल्ह्यात राहत होतो. आईबाबा पण खूप थकले होते. त्यामुळे बाबा शेती घरी करत नव्हते. गावातील ओळखीच्या कोणालातरी पैशाने वर्षभरासाठी शेती देऊन टाकायचे. शेतातील बाबांचा मोह कमी झाला होता. पण आमराई विषयी आजही तेवढीच आस्था होती. बाबा शेती देतांनाच सांगायचे. आमराईला वर्षभर भरपूर पाणी घालावे लागेल. माझ्या आयुष्यात माझ्या चार लेकरांन प्रमाणे मी आंब्याची झाडे वाढवलेली आहे.
          बाबांनी यावर्षी आमराईत सगळ्यांना एकत्र जमवण्याचे ठरवले होते. दिवाळी सुट्टीतच मला व बहिणींना सांगून ठेवले होते. यावर्षी आपण सर्वजण आमराईत एकत्र जमुया. सर्वांनी वेळ काढा. तुमच्या आयुष्यातील खूप सारे क्षण तुम्ही याच आमराईत घालविलेले आहेत. सर्व बालगोपालासह छान पैकी आमराईत सगळ्यांना एकदा डोळेभरुन मला पाहायचे आहे. म्हणजे मी, देवाजवळ जायला मोकळा....! अहो बाबा....! असे काही बोलू नका....! नाहीतर आम्ही येणारच नाही. बाबा यासाठी तुम्ही आम्हाला यायला सांगता का? अक्काबाई बाबावर चिडल्या होत्या. अक्काबाई खूप अधिकाराने व मोठ्या व्यक्ती सारख्या बोलत होत्या. दिवाळी संपली सर्व बहिणी सासरी निघून गेल्या. मी नोकरीच्या गावी परतलो. आम्ही चारही भावंडं आपापल्या ठिकाणी सुखात, आनंदात राहत होतो. आमच्या सर्वांच्या सुखाच्या पाठीमागे बाबा व आईचे कष्ट होते. हे कष्ट आम्ही कधीच विसरू शकत नव्हतो. बाबांचा शब्द माझ्यासाठी अंतिम शब्द होता. बाबाच्या संस्काराने आमच्या जीवनात आनंदाचा सुगंध भरला होता. या सुगंधाने आम्ही जीवनात सुखरूप होतो. दिवाळीनंतर चार महिने निघून गेले. आमची आमराई मोहोराने फुलली होती. बाबांनी फोनवर बोलतांना एकदा आमराई खुप फुलली याची आठवण करून दिली होती. गुढीपाडवा झाल्यावर पंधरा दिवसांनी आंब्याची तोडणी झाली. बाबांनी आम्हाला सर्वांना फोन करून बोलावून घेतले. मी चार दिवसाची सुट्टी टाकून गावी परतलो. अक्काबाई, सुमन, विमल या  सर्व बहिणी सुद्धा माहेरी आल्या. आम्ही घरी येताच बाबांना खूप आनंद झाला. बहिणीचे मुलं, माझा मुलगा व मुलगी सारे एकत्र आल्याने घराचे पुन्हा एकदा गोकुळ झाले होते. आम्ही लहानपणी ज्याप्रमाणे गोंधळ करायचो. तसे घरात नुसता कल्ला गोंधळ सुरू होता. या गोकुळातील सर्व बाल गोपालांसह खेळतांना बाबाच्या चेहऱ्यावर खूप आनंद झळकायचा. आईला तर दुधात साखर पडल्यासारखे झाले. तिन्ही मुली, जावई, नातू, मुलगा, सुन, घरी आल्याने मुठभर मास आले होते. बाबांनी सकाळी सर्वांना शेतावर जाण्याचे सूचित केले. आज सूर्यदेव सुंदर सकाळ घेऊन प्रकट झाले होते. आमच्या कुटुंबाच्या आनंदात जणू सामील झाले होते. आम्ही सर्वांनी लवकर तयारी करून शेतात जायला निघालो. बाबांनी नातवंडासाठी शेतातून बैलगाडी बोलावून घेतली. बाबा नातवंडासह बैलगाडीत बसून शेतावर आले. मी भाऊजी, ताई आम्ही सर्वजण पायीच शेतावर गेलो. आमराईत गेल्यावर आंब्याच्या झाडाकडे पाहत अक्काबाई म्हणतात. “झाडे किती मोठी झाली रे भैया!” आपण लावले होते तेव्हा किती छोटे होते. हो खरंच....! खूप मोठी झाली. एका एका झाडांनी किती जागा व्यापली आहे. बाबांनी याचा विचार करूनच आमराईत झाडे एका दोरीत व दूरदुर लावली होती. बाबांचे नियोजन खरच खूप चांगले होते. बाबांनी आम्हा सर्वांना एकत्र बसवले. सर्व नातवंडांना सांगू लागले. बाळांनो या आमराईत तुम्हाला जी आंब्याची झाडे  दिसत आहे. त्यातील प्रत्येकी तीन झाडे तुमच्या आईने व तीन झाडे मामांनी लावलेले आहे. या झाडांना ते खूप पाणी घालायचे. दर शनिवार, रविवार झाडांना पाणी घालण्यासाठी ते आवर्जून शेतात येत होते. त्यांनी या झाडांना खूप मोठे केले आहे. सांगा बर का मग....! कोणती झाडे कुणाची आहेत. सर्व मुले त्या आंब्याच्या झाडाकडे पाहून विचार करू लागली. आंब्याचे झाड खूप मोठे डौलदार झाले होते. प्रत्येक झाड जवळ जवळ सारखेच दिसत होते. त्यामुळे मुलं गोंधळात पडली. प्रत्येकाने आपल्या आपल्या आईला विचारले. मम्मी सांग ना....! तू लावलेले झाड कोणते आहे. मुलांनी एकच कल्लोळ केला. मध्येच अक्काबाई ओरडल्या, शांत बसा सर्वांनी....! एकदम चुप....! किती मोठ मोठ्याने कल्ला करता. अरे ही सर्व झाडे तुमच्या आजोबांनी कोकणातून आणली होती. या झाडासाठी सर्व खड्डे सुद्धा आजोबांनी स्वतः खोदले होते. आम्ही फक्त तीन तीन कलमा हातात घेऊन उभे होतो. आजोबांनीच ती लावली होती. आम्ही मात्र आपली आपली समजून त्यांना पाणी घालायचो. पण या सर्व झाडावर तुमच्या आजोबांचे सारखेच प्रेम होते. त्यांनी कोणत्याच झाडावर कमी अधिक प्रेम केले नाही. त्यामुळे सर्व झाडे सारखीच वाढलेली दिसतात. सर्व मुलं अगदी चुपचाप ऐकत होती. 
                  अक्काबाई बस झाले आमचे गुणगान....! आता जेवण करून घ्या. जावयांना भूक लागली असेल. मधेच बाबा बोलले. आम्ही सर्वांनी एकत्र बसून शेतात तयार केलले जेवण घेतले. मुलांना शेतातील जेवण फार आवडले होते. शेतातील निसर्गरम्य वातारणात आज आमराईतील केसर, दह्या, खजुरा, दशेरी, साखरगोटी, बोरशा, रत्ना, राजा, शेप्या यांचा आमरस पोटभर खाल्ला होता. लहानपणी खूप आंबे खाल्ले होते पण आजच्या आमरसात प्रेमाची चव भरली होती. बाबांच्या व आईच्या कष्टाची भाकरी आमरसा सोबत खातांना मन भरून आले होते. आज या आमराईत सर्व बालपण डोळ्यासमोर उभे राहिले होते. विमलने तर तिच्या वहिनींना सर्व बालपण सांगून टाकले होते. माझे किस्से व खोडकरपणा आज आमरसाच्या निमित्ताने सर्वांसमोर आला होता. मी बाबांचा खूप लाडका होतो. एकुलता एक असल्याने मला सर्वांच्या पेक्षा प्रत्येक बाबतीत सुट मिळत असे. मी या आमराईतील झाडे कितीतरी वेळा बदलून घेतली होती. प्रत्येक वेळी जे झाडे जास्त टवटवीत दिसायचे ते माझे म्हणून मी त्यावर माझा अधिकार गाजवायचो. शेवटपर्यंत मी सर्व झाडे माझी माझी म्हणून निवडली होती. त्यावेळी आई म्हणायची, “ राहुल बाळा एकदिवस ही सर्व झाडे तुझीच होणार आहे. ” मुली लग्नानंतर सासरी निघून जातील. तेव्हा काय ही आमराई सोबत नेणार नाही. आज खरचं ही आमराई व त्यातील एकही आंबा त्यांनी नेला नाही. मुळात आमराई फुलवण्याचे स्वप्न बाबांचे होते. बाबा नेहमी म्हणायचे, “ आपण एखादे झाड लावले तर त्याच्या फळांची अपेक्षा करू नये. ” त्याची फळे येणाऱ्या पिढीला आपोआप मिळत राहतील. आपण सुंदर फुलांची बाग तयार करायची. त्याच्या सुगंधाची अपेक्षा करायची नाही. त्याचा सुगंध येताजाता प्रत्येकाला मिळतच असतो. माणसाच्या आयुष्यातील सुखाचा सुगंध इतरांच्या जीवनात दरवळत राहिला पाहिजे. आंबा हे अमृत फळ आहे. प्रत्येकाला आवडणारे व प्रत्येकाच्या स्वादाची गरज भागवणारे हे फळ आहे. आज फळांचा राजा मनसोक्त खाऊन आम्ही सर्वजण खूप खुश झालो होतो. सर्वांनी आमराईत एकत्र येऊन आज बाबांना आनंद दिला होता. बाबांना आज मागील परिस्थिती व आमचे बालपण यांची आठवण आमराईच्या भेटीने करून दिली होती. 

🙏🙏🙏🙏
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...