आमराई

बाबा दरवर्षी ठरवायचे की, शेतात दहा-बारा आंब्याची झाडे लावूया. गोड आणि वेगवेगळ्या जातीची आंब्याची कलम आणून एका लाईनीत आंबे लावायचे. पण चांगल्या कलमाच मिळत नव्हत्या. त्यामुळे दोन चार वर्षापासून आंबे लावायचे लांबणीवर पडले होते. या वर्षी मात्र काय योगायोग आला. माझे एक चुलत मामा कोकणात शिक्षक होते. ते माझ्या बाबांना नेहमी म्हणायचे, “ भाऊजी तुम्हाला कोकणातून काही आंब्याच्या कलमा आणु का? लावायला. ” बाबा त्यांना आणा सांगायचे. पण मामा नेहमी येते वेळी कलमा आणतच नव्हते. यावर्षी मामाची कोकणातून आमच्या गावाकडे बदली झाली. मामांनी माझ्या बाबाला फोन करून बदली झाल्याचे कळवले. सामान न्यायला वाहन घेऊन येता का विचारले. बाबांनी मामांना होकार दिला. त्यामुळे मामाचे सामान आणायला गावावरून एक टेम्पो घेऊन बाबा कोकणात गेले. मामांच्या सामानासोबत तेथील गावकऱ्यांकडून आंब्यांच्या वेगवेगळ्या जातीच्या बारा कलमा घेऊन आले. दोन दोन फुटांच्या त्या कलमा पाहून आम्हा भावंडांना तर खूपच आनंद झाला. माझी छोटी बहीण विमलने तर आईला विचारायला पण सुरुवात केली. आई याला आता आंबे कधी येणार. मी म्हणालो उद्या सकाळीच याला आंबे येणार आहे. अक्काबाई व मी मोठ्याने हसू लागलो. मोठ्या बहिणीला आम्ही अक्काबाई म्हणत असू....! आई मात्र विमलला म्हणाली, “ बाळा याला लगेच आंबे येत नसतात. ” आता ही आंब्याची छोटी छोटी झाडे आहेत. ही झाडे आपण उद्या शेतात नेऊन लावूया. याला मग खूप पाणी घालायचे. चार पाच वर्षे त्याला खूप पाणी पाजले की, मग ते आपल्याला छान गोड आंबे देईल. तू तो पर्यंत पाचव्या वर्गात जाशील. मी पाचवीत गेल्यावर त्याला खूप आंबे येईल कारे दादा....! विमल आनंदित होऊन विचारत होती. त्यादिवशी आम्ही चारही भावंडांनी तीन-तीन आंब्याच्या कलमा वाटून पण घेतल्या होत्या. उद्या मी बाबासोबत शेतात जाणार व माझे तीन आंबे माझ्या हाताने लावणार आहे. असे मी तिघींना सांगुन टाकले. घरी नवीन पाहुणे आल्यासारखे आंब्याच्या कलमांनी घरचे वातावरण प्रफुल्लित करून टाकले होते. कधी सकाळ होईल असे झाले होते.
सकाळ झाली बाबा सकाळीच शेतावर निघून गेले. मी उठल्याबरोबर आईला विचारले बाबा कुठे गेले. आई म्हणाली ते शेतात गेले आहे. मला वाटले बाबा आंब्याच्या कलमा घेऊन शेतात गेले. मी लगेच रडायला सुरुवात केली. आई म्हणाली, “ राहूल सकाळी सकाळी रडू नकोस...! ” बाबांनी कलमा शेतात नेल्या नाहीत. आंब्याच्या कलमा घरातच आहे. मी रडक्या आवाजात घरात येऊन पाहतो तर खरंच कलमा घरातच होत्या. मी डोळे पुसतच हसू लागलो. त्या दिवशी बाबांनी बैलगाडी शेतातून घरी आणली. आमच्यासह त्या सर्व कलमा बैलगाडीत घेऊन दुपारी शेतात गेले. बाबांनी आम्हाला सांगितले पोरांनो आपण ही सर्व झाडे या ठिकाणी एका रांगेत लावूया. म्हणजे पाणी द्यायला सोपे व एकाच ठिकाणी असल्यामुळे मोठी झाल्यावर आंबे राखायला पण सोपे जाईल. आता तुम्ही सावलीत खेळत बसा. मी पटापटा खड्डे खोदून घेतो. नंतर आपण त्यात या आंब्याच्या कलमा लावूया. बाबांनी टीकास, फावडे घेऊन भर उन्हात आंब्यासाठी खड्डे खोदले. मी मात्र खड्डे कधी होतात. याच्या प्रतीक्षेतच होतो. बाबांनी खड्डे खोदून त्यात थोडे थोडे पाणी टाकले. मी लगेच माझी तीन आंब्याची कलमे खड्ड्याजवळ नेऊन ठेवली. बांबानी आता आम्हाला आंब्याच्या झाडा विषयी माहिती सांगितली. आंबा हे अमृतफळ आहे. फक्त झाडे लावून त्याला आंबे येत नाहीत. त्यासाठी त्याचे लेकराप्रमाणे संगोपन करावे लागते. आता या सर्व आंब्याच्या कलमा वेगवेगळ्या आहेत. याची नावे पण वेगवेगळी आहेत. त्याला येणारे फळ सुद्धा चवीला वेगळे असणार आहे. “ बाबा यांची नावे तुम्हांला माहित आहे. ” मध्येच अक्काबाईने विचारले. नाही बाळा....! सगळी नावे माझ्या लक्षात नाही राहिली. काही आंब्याना तुम्हीच नावे द्यायची. सांगा बरे....! अगोदर कुणाची झाडे लावायची. बाबा....! बाबा....! अगोदर माझी, मी एकदम कल्ला करायला सुरुवात केली. बरं....! अगोदर राहुलचे झाड लावूया. बाबांनी कलम हातात घेतली. त्याच्या भवतालचे कापड काढून कलम खड्ड्यात ठेवली. चला हा झाला राहुलचा ‘ खोबऱ्या ’ आंबा. लोटा माती सगळ्यांनी....! आम्ही पटापटा माती लोटून ती कलम लावली. बाबांनी त्याला छानपैकी गोलाकार आळे पण केले. पुढे केसर, दह्या, खजुरा, दशेरी, साखरगोटी, बोरशा, रत्ना, राजा, शेप्या अशी नावे देत आंब्याच्या सर्व कलमा लावल्या. त्या दिवशी सायंकाळ पर्यंत आंबे लावण्याचे काम गेले. उशीर झाल्यामुळे बाबा म्हणाले, “ चला आता घरी लवकर पाणी उद्या देऊया. ” आम्ही सर्वजण संध्याकाळी घरी आलो. शेतात दिवसभर आंबे लावले. याचा आनंद घरात मावत नव्हता. आईने छानपैकी तांदळाची गोड खीर बनवली. शेतात आंबे लावले म्हणून सगळ्यांचे गोड तोंड करण्यासाठी खिरीचा बेत आखला होता. बाबा आम्हाला घेऊन जेवायला बसले. जेवता जेवता बाबांनी गंमत केली. आता सर्वांनी लवकर झोपायचे. उद्या सकाळी लवकर उठून आंबे तोडायला शेतात यायचं बर का....! उद्या सकाळीच आंबे येणार....! आम्ही सर्वजण खदखदुन हसलो. सकाळीच आंबे कसे येतील. सुमन आश्चर्याने म्हणाली, “बाबा तुम्हीपण चांगली गंमत करता.”
उन्हाळाभर सुट्टीचा आनंद फक्त आंब्यांच्या कलमांना पाणी घालण्यातच गेला. जून महिन्यात शाळा सुरू झाल्या त्यामुळे शेतात जाणे बंद झाले. कधीतरी एखाद्या वेळेस शेतात जायचो. आता आंब्याचे आकर्षण पण कमी झाले होते. नव्याचे नऊ दिवस असतात असे एक महिना आंब्याचे गुणगान झाले. आता फारसे आंब्याच्या झाडांची आठवण येत नव्हती. चार वर्षांनी पहिल्यांदा काही झाडांना खूप मोहोर आला होता. यावर्षी नक्कीच आंबे खायला मिळणार असे वाटत होते. परंतु आभाळाने सर्व मोहोर गळून पडला. आंब्याला कसेतरी एक अर्धे फळ होते ते पण गारपिटीने खराब झाले. पुढच्या वर्षी नक्कीच आता सर्वच आंब्यांना मोहोर येईल. आंब्यांना मोहोर येईपर्यंत बाबांनी खूप काळजी घेतली होती. जेव्हा जेव्हा पाणी देण्यासाठी लाईटची व्यवस्था नव्हती. तेव्हा बाबा स्वतः विहिरीवरून पाणी काढुन झाडांना पाणी घालायचे. आता आंबे खूप मोठे झाले होते. अगदी हिरवेंगार, उंच, डौलदार सर्वच झाडे दिसत होती. माझ्या बाबांनी आम्ही लावलेल्या शेताला आमराई असे नाव सुद्धा देऊन टाकले होते. आमराई खरंच फुलून दिसत होती. शेतीचे वैभव झाडांनी वाढवले होते. झाडे माणसाप्रमाणेच किंबहुना माणसापेक्षा जास्त परोपकारी असतात. थंडगार सावली, गोड फळं, शेवटी इंधन म्हणून स्वतःचे लाकूड ते आपल्याला देते. माणसांनी पण झाडा प्रमाणे परोपकारी वागले पाहिजे. आई असे नेहमी सांगायची. आमराईतील झाडांना बाबांनी लेकराप्रमाणे सांभाळले होते. यावर्षी पाऊस जास्त असल्याने झाडांना भरपूर पाणी मिळाले. झाडे अगदी हिरवीगार व लसलशीत दिसत होती. पावसाळा संपताच थंडीच्या दिवसात आंब्याच्या झाडांना खूप मोहोर आला. यावर्षी सर्वच आंब्यांना खूप मोहोर फुटला होता. काही दिवसातच आंब्यांची झाडे फळांनी सजली होती. सर्व झांडाची आंबे खायला मिळणार होती. आम्ही सर्व भावंडं खूप खुश होतो. बाबांनी ठेवलेल्या नावाप्रमाणे केसर, दह्या, खजुरा, दशेरी, साखरगोटी, बोरशा, रत्ना, राजा, शेप्या या सर्व झाडांची फळे आता खूप भरली होती. आई-बाबांना एक दिवस म्हणाली, “आता काही दिवसांनी आंबे उतरून घ्यावे लागतील.” एखादा आंबा झाडाला पिकला व तो खाली पडला की लक्ष ठेवा. आणि हो....! गवताच्या पाच-दहा पेंड्या कापुन ठेवा. आंबे पिकु घालायला गवत लागेल. गवतात पिकलेले आंबे चवीला खूप छान लागतात. त्यांचा रंगही खूप पिवळा पडतो. बाबांनी गवताचे भारे कापून ठेवले. आमच्या शेतातील आमराई सगळ्या लोकांचे लक्ष वेधून घेत होती. आजूबाजूचे लोक कुतूहलाने विचारायचे. काहो माधवराव आंब्यांची आमराई लय फुलवली. यावर्षी आम्हाला आंबे खायला बोलवता की नाही. या सगळेजण आंबे खायला. आंबे पिकु द्या सगळ्यांना खायला बोलवतो. आंबा हे अमृत फळ आहे. त्याचा आस्वाद घेण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. बाबा सगळ्यांना नम्रतेने बोलायचे.
काही दिवसांनी आंबे उतरायला सुरुवात झाली. गावातील आंबे उतरणारे माणसं शेतात आली. आम्हाला पिकलेले आंबे खाण्यासाठी बाबा सोबत शेतात घेऊन गेले. बाबांनी सांगितले तुम्ही एका बाजूला बसून रहा. मधे मधे करू नका. मी तुम्हाला पिकलेले आंबे खायला देतो. आंबे उतरणे सुरू झाले. लोकं आंब्याच्या झाडावर चढून आंबे उतरत होते. आंब्यांनी बाटली भरली की, दोरीने खाली सोडायचे. बाबा ती बाटली उलटी करून घ्यायचे. मधेच एखादा आंबा खाली पडला की, मी लगेच पळत जाऊन पाहायचो. “पिकलेला आहे का?” कच्चा आंबा निघाला की, हिरमुसून जायचो. पिकलेला निघाला की लगेच दातांनी तोडून खाऊन बघायचो. अक्काबाई हा खूप गोड आहे. तो फोडलेला आंबा विमलला खायला द्यायचो. दिवसभरात आंब्याचा ढिगारा तयार झाला होता. बाबांनी सर्व आंबे पोत्यात भरुन बैलगाडीतून घरी आणले. आईने बैलगाडीची पूजा केली. आम्ही येवढे आंबे कधी याअगोदर पाहिले नव्हते. बांबाचे आमराईचे स्वप्न आज खरे ठरले होते. आमराईतील या आंब्यांनी घर भरून गेले होते. शेजारी पाजारी नुसती चर्चा सुरू होती. माझ्या बाबांनी आंबे लावले तेव्हा अनेकांनी बाबांना नावे ठेवली होती. पण आज आमराई फुलली तेव्हा सगळे जण म्हणत होते. खरंच तुमचा निर्णय छान होता. आईने घरातील मोकळ्या जागेत गवत पसरून त्यावर आंबे पिकु घातले. आता दोन-चार दिवसात आंबे खायला मिळणार आहे. असे म्हणत विमल उड्या मारु लागली. अगं विमल....! आपण सगळेच आंबे खाणार आहोत. त्यासाठी येवढा गोंधळ कशाला पाहिजे. आणि हो....! आंब्या सारखाच अभ्यासाचा मोह धरा जरा तुम्ही सगळेजण....! आंबा स्वतः सर्व कष्ट सोसून दुसऱ्याला गोडवा देतो. तसे जीवनात शिक्षण घेऊन काहीतरी अधिकारी बना व समाजाची सेवा करा. तुम्ही आंबे लावल्यापासून अभ्यासापेक्षा आंब्याचा जास्त अभ्यास केला. “आता तुम्ही लहान नाहीत” हे लक्षात ठेवा. अक्काबाई तुम्ही तर सज्ञान झालात. यांना सर्वांना समजवत चला. वेळप्रसंगी त्यांच्यावर रागवा. आई त्या दिवशी खूप रागावली होती. खरंच आम्ही सर्वजण आंबे व आमराई यात खूपच गुंतलो होतो. आठ दिवसांनी सर्व आंबे पिकले होते. केसर, दह्या, खजुरा, दशेरी, साखरगोटी, बोरशा, रत्ना, राजा, शेप्या खायला खूप चवदार लागत होते. मनसोक्त आंबे खायला मिळाले होते. आईने खुप वेळा ओरडून सांगितले. सहन होईल तेवढेच आंबे खा....! नाहीतर आजारी पडसाल. माझे बाबा मात्र आम्हाला रोज म्हणायचे, “ मुलांनो आंबे खाल्ले का? ” मनसोक्त आंबे खा....! तुम्ही पाच वर्षापासून आंब्याच्या झाडाला खूप पाणी टाकले. त्या आठ दिवसात आम्ही मनसोक्त आंबे खाल्ले. शेजारी पाजारी सर्वांना थोडे थोडे आंबे दिले. उरलेले आंबे घेऊन आई बाजारात विकायाला जायची. दोन पैसे मिळाले तर, तेवढीच संसाराला मदत होईल असे आईला वाटायचे. आई दिवसभर उन्हात बसून आंबे विकायची. रात्री घरी आल्यावर बाबांना सांगायची. आज खुपच कमी पैसे आले. बाजारात खुप आंबे आले होते. आपले आंबे गोड असून सुद्धा लोकं कमी भावाला माघायचे. आपण शेतकरी आहोत, लोकांना शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाची किंमत वाटत नाही. तेच आंबे व्यापाऱ्याकडून घेतांना पहा किती पैसे द्यावे लागते. तिथे मात्र चुपचाप जास्तीचे पैसे देऊन आंबे घेतात. आपण दिवसभर उन्हात कितीही ओरडून त्यांना सांगा. आपले खरे वाटत नाही. काहींना तर आंबे गोड आहे यावर विश्वास सुद्धा वाटत नव्हता. मी त्यांच्या हातावर आंबा थोडा पिळुन त्यांना तो रस चाखायला सांगायचे. पण तो रस पिऊन सुद्धा काही जण म्हणायचे गोड आहे. पण “हा आंबा त्यातीलच आहे का?” लोकांना शंका वाटत होती. शेतकऱ्याचे जीवन खूप कष्टमय आहे. त्याला बाहेरच्या जगात किंमत नाही. हे त्यादिवशी मला कळाले. आई-बाबांचा संवाद ऐकून मी त्यादिवशी खूपच अस्वस्थ झालो. गेल्या पाच वर्षापासून बाबांनी आमराईवर घेतलेल्या मेहनतीचे फळ काय तर, लोकांना आंबे त्यांच्या मनाप्रमाणे कमी किंमतीत द्यायचे. हा जगाचा कुठला न्याय आहे. त्या दिवशी मी खूप विचार केला. स्वतःच्या कष्टाला किंमत मिळवून द्यायची असेल तर त्याला शिक्षणाची जोड द्यायला हवी.
मी त्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात केली. आयुष्यात बाबाच्या आमराईची किंमत ही खूप मोठी आहे. हे मी सगळ्या लोकांना एक दिवस दाखवून देईल. असा मी मनाशी पक्का निर्धार केला. शाळा व अभ्यास या रोजच्या प्रवासात मी स्वतःला खूप गुंतून घेतले. बघता-बघता काही दिवसांनी अक्काबाई बारावी पास झाल्या. मी त्यांच्या मागे मागे दहावीला पोहोचलो. यावर्षी मी खूप अभ्यास केला. दहावीचे महत्त्वाचे वर्ष आहे म्हणून, मी एकही दिवस शेतात गेलो नाही. त्या वर्षभरात आमराईला एकदा पण भेट दिली नाही. शेवटी माझ्या दहावीचा निकाल लागला. मी प्रथम श्रेणीत पास झालो. घरी सगळ्यांना खूप आनंद झाला. माझ्या आई-बाबांना तर आमराई आंब्यांनी पहिल्यांदा फुलली होती त्यापेक्षा अधिक आनंद माझ्या निकालाने झाला. मी अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. काही दिवसांनी अक्काबाईचे लग्न झाले. माझे शिक्षण अक्काबाईचे लग्न हा खर्च बाबा शेतीच्या भरवशावरच करत होते. आमची आमराई दरवर्षी आंब्याच्या रूपाने आम्हाला आर्थिक मदत करू लागली. आमराईच्या भक्कम आधारामुळे बाबांनी पुढील पाच वर्षात दोन्ही बहिणींचे लग्न केले. मी पुढील शिक्षण घेऊन शिक्षक झालो. नोकरीमुळे मी बाहेर जिल्ह्यात राहत होतो. आईबाबा पण खूप थकले होते. त्यामुळे बाबा शेती घरी करत नव्हते. गावातील ओळखीच्या कोणालातरी पैशाने वर्षभरासाठी शेती देऊन टाकायचे. शेतातील बाबांचा मोह कमी झाला होता. पण आमराई विषयी आजही तेवढीच आस्था होती. बाबा शेती देतांनाच सांगायचे. आमराईला वर्षभर भरपूर पाणी घालावे लागेल. माझ्या आयुष्यात माझ्या चार लेकरांन प्रमाणे मी आंब्याची झाडे वाढवलेली आहे.
बाबांनी यावर्षी आमराईत सगळ्यांना एकत्र जमवण्याचे ठरवले होते. दिवाळी सुट्टीतच मला व बहिणींना सांगून ठेवले होते. यावर्षी आपण सर्वजण आमराईत एकत्र जमुया. सर्वांनी वेळ काढा. तुमच्या आयुष्यातील खूप सारे क्षण तुम्ही याच आमराईत घालविलेले आहेत. सर्व बालगोपालासह छान पैकी आमराईत सगळ्यांना एकदा डोळेभरुन मला पाहायचे आहे. म्हणजे मी, देवाजवळ जायला मोकळा....! अहो बाबा....! असे काही बोलू नका....! नाहीतर आम्ही येणारच नाही. बाबा यासाठी तुम्ही आम्हाला यायला सांगता का? अक्काबाई बाबावर चिडल्या होत्या. अक्काबाई खूप अधिकाराने व मोठ्या व्यक्ती सारख्या बोलत होत्या. दिवाळी संपली सर्व बहिणी सासरी निघून गेल्या. मी नोकरीच्या गावी परतलो. आम्ही चारही भावंडं आपापल्या ठिकाणी सुखात, आनंदात राहत होतो. आमच्या सर्वांच्या सुखाच्या पाठीमागे बाबा व आईचे कष्ट होते. हे कष्ट आम्ही कधीच विसरू शकत नव्हतो. बाबांचा शब्द माझ्यासाठी अंतिम शब्द होता. बाबाच्या संस्काराने आमच्या जीवनात आनंदाचा सुगंध भरला होता. या सुगंधाने आम्ही जीवनात सुखरूप होतो. दिवाळीनंतर चार महिने निघून गेले. आमची आमराई मोहोराने फुलली होती. बाबांनी फोनवर बोलतांना एकदा आमराई खुप फुलली याची आठवण करून दिली होती. गुढीपाडवा झाल्यावर पंधरा दिवसांनी आंब्याची तोडणी झाली. बाबांनी आम्हाला सर्वांना फोन करून बोलावून घेतले. मी चार दिवसाची सुट्टी टाकून गावी परतलो. अक्काबाई, सुमन, विमल या सर्व बहिणी सुद्धा माहेरी आल्या. आम्ही घरी येताच बाबांना खूप आनंद झाला. बहिणीचे मुलं, माझा मुलगा व मुलगी सारे एकत्र आल्याने घराचे पुन्हा एकदा गोकुळ झाले होते. आम्ही लहानपणी ज्याप्रमाणे गोंधळ करायचो. तसे घरात नुसता कल्ला गोंधळ सुरू होता. या गोकुळातील सर्व बाल गोपालांसह खेळतांना बाबाच्या चेहऱ्यावर खूप आनंद झळकायचा. आईला तर दुधात साखर पडल्यासारखे झाले. तिन्ही मुली, जावई, नातू, मुलगा, सुन, घरी आल्याने मुठभर मास आले होते. बाबांनी सकाळी सर्वांना शेतावर जाण्याचे सूचित केले. आज सूर्यदेव सुंदर सकाळ घेऊन प्रकट झाले होते. आमच्या कुटुंबाच्या आनंदात जणू सामील झाले होते. आम्ही सर्वांनी लवकर तयारी करून शेतात जायला निघालो. बाबांनी नातवंडासाठी शेतातून बैलगाडी बोलावून घेतली. बाबा नातवंडासह बैलगाडीत बसून शेतावर आले. मी भाऊजी, ताई आम्ही सर्वजण पायीच शेतावर गेलो. आमराईत गेल्यावर आंब्याच्या झाडाकडे पाहत अक्काबाई म्हणतात. “झाडे किती मोठी झाली रे भैया!” आपण लावले होते तेव्हा किती छोटे होते. हो खरंच....! खूप मोठी झाली. एका एका झाडांनी किती जागा व्यापली आहे. बाबांनी याचा विचार करूनच आमराईत झाडे एका दोरीत व दूरदुर लावली होती. बाबांचे नियोजन खरच खूप चांगले होते. बाबांनी आम्हा सर्वांना एकत्र बसवले. सर्व नातवंडांना सांगू लागले. बाळांनो या आमराईत तुम्हाला जी आंब्याची झाडे दिसत आहे. त्यातील प्रत्येकी तीन झाडे तुमच्या आईने व तीन झाडे मामांनी लावलेले आहे. या झाडांना ते खूप पाणी घालायचे. दर शनिवार, रविवार झाडांना पाणी घालण्यासाठी ते आवर्जून शेतात येत होते. त्यांनी या झाडांना खूप मोठे केले आहे. सांगा बर का मग....! कोणती झाडे कुणाची आहेत. सर्व मुले त्या आंब्याच्या झाडाकडे पाहून विचार करू लागली. आंब्याचे झाड खूप मोठे डौलदार झाले होते. प्रत्येक झाड जवळ जवळ सारखेच दिसत होते. त्यामुळे मुलं गोंधळात पडली. प्रत्येकाने आपल्या आपल्या आईला विचारले. मम्मी सांग ना....! तू लावलेले झाड कोणते आहे. मुलांनी एकच कल्लोळ केला. मध्येच अक्काबाई ओरडल्या, शांत बसा सर्वांनी....! एकदम चुप....! किती मोठ मोठ्याने कल्ला करता. अरे ही सर्व झाडे तुमच्या आजोबांनी कोकणातून आणली होती. या झाडासाठी सर्व खड्डे सुद्धा आजोबांनी स्वतः खोदले होते. आम्ही फक्त तीन तीन कलमा हातात घेऊन उभे होतो. आजोबांनीच ती लावली होती. आम्ही मात्र आपली आपली समजून त्यांना पाणी घालायचो. पण या सर्व झाडावर तुमच्या आजोबांचे सारखेच प्रेम होते. त्यांनी कोणत्याच झाडावर कमी अधिक प्रेम केले नाही. त्यामुळे सर्व झाडे सारखीच वाढलेली दिसतात. सर्व मुलं अगदी चुपचाप ऐकत होती.
अक्काबाई बस झाले आमचे गुणगान....! आता जेवण करून घ्या. जावयांना भूक लागली असेल. मधेच बाबा बोलले. आम्ही सर्वांनी एकत्र बसून शेतात तयार केलले जेवण घेतले. मुलांना शेतातील जेवण फार आवडले होते. शेतातील निसर्गरम्य वातारणात आज आमराईतील केसर, दह्या, खजुरा, दशेरी, साखरगोटी, बोरशा, रत्ना, राजा, शेप्या यांचा आमरस पोटभर खाल्ला होता. लहानपणी खूप आंबे खाल्ले होते पण आजच्या आमरसात प्रेमाची चव भरली होती. बाबांच्या व आईच्या कष्टाची भाकरी आमरसा सोबत खातांना मन भरून आले होते. आज या आमराईत सर्व बालपण डोळ्यासमोर उभे राहिले होते. विमलने तर तिच्या वहिनींना सर्व बालपण सांगून टाकले होते. माझे किस्से व खोडकरपणा आज आमरसाच्या निमित्ताने सर्वांसमोर आला होता. मी बाबांचा खूप लाडका होतो. एकुलता एक असल्याने मला सर्वांच्या पेक्षा प्रत्येक बाबतीत सुट मिळत असे. मी या आमराईतील झाडे कितीतरी वेळा बदलून घेतली होती. प्रत्येक वेळी जे झाडे जास्त टवटवीत दिसायचे ते माझे म्हणून मी त्यावर माझा अधिकार गाजवायचो. शेवटपर्यंत मी सर्व झाडे माझी माझी म्हणून निवडली होती. त्यावेळी आई म्हणायची, “ राहुल बाळा एकदिवस ही सर्व झाडे तुझीच होणार आहे. ” मुली लग्नानंतर सासरी निघून जातील. तेव्हा काय ही आमराई सोबत नेणार नाही. आज खरचं ही आमराई व त्यातील एकही आंबा त्यांनी नेला नाही. मुळात आमराई फुलवण्याचे स्वप्न बाबांचे होते. बाबा नेहमी म्हणायचे, “ आपण एखादे झाड लावले तर त्याच्या फळांची अपेक्षा करू नये. ” त्याची फळे येणाऱ्या पिढीला आपोआप मिळत राहतील. आपण सुंदर फुलांची बाग तयार करायची. त्याच्या सुगंधाची अपेक्षा करायची नाही. त्याचा सुगंध येताजाता प्रत्येकाला मिळतच असतो. माणसाच्या आयुष्यातील सुखाचा सुगंध इतरांच्या जीवनात दरवळत राहिला पाहिजे. आंबा हे अमृत फळ आहे. प्रत्येकाला आवडणारे व प्रत्येकाच्या स्वादाची गरज भागवणारे हे फळ आहे. आज फळांचा राजा मनसोक्त खाऊन आम्ही सर्वजण खूप खुश झालो होतो. सर्वांनी आमराईत एकत्र येऊन आज बाबांना आनंद दिला होता. बाबांना आज मागील परिस्थिती व आमचे बालपण यांची आठवण आमराईच्या भेटीने करून दिली होती.
🙏🙏🙏🙏
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852