Sunday, 7 March 2021

प्रवासातील मैत्री

                            प्रवासातील मैत्री

मी घड्याळाकडे बघितले तर दहा वाजले होते. मी घाई घाईने रिक्षातून उतरून रेल्वेस्थानकाच्या पायऱ्या पटापटा चढून तिकीट काउंटर जवळ गेले. बघते तर काय....? खूप लांबच लांब रांग होती. अरे बापरे....! आता किती वेळ लागणार. साडेदहाची गाडी आहे. आज नेमकी गाडी वेळेवर धावत आहे. इतरवेळी पाच दहा मिनिटे गाडी लेट होत असते. नेमकी आज मला वेळ झाला. त्यातही गाडी वेळेवर आता कसे करू....! तिकीट घ्यायला या रांगेत लागले तर माझी गाडी नक्की सुटेल. काय करावे मला काहीच सुचेनासे झाले होते. मी तिकीट काउंटर जवळ जाऊन उभी राहिले. रांगेतील कोणी नागपूरला जाणार असेल तर त्याला एक तिकीट काढायला सांगूया. हात जोडून विनंती करू याशिवाय दुसरा पर्याय ही नाही आपल्याकडे....! मी खिडकीजवळ उभी राहून प्रत्येकाला विचारत होते. नागपूरला जाणार आहात का आपण....! पण काहीजण वर्धा, तर काहीजण भुसावळ, मुंबई सांगत होते. अचानक एक तरुण तिकीट खिडकीजवळ धावत धावत आला. प्लीज मॅडम थोडे सरकता का बाजुला....! असे म्हणून मला बाजूला केले. खिशातील पॉकीटातुन दोनशेची नोट खिडकीतून आत दिली. मोठ्या आवाजात  म्हणाला....! सर एक नागपूर द्या. मला कळायच्या आत त्याने तिकीट हातात पण घेतले व तो निघाला. मी पटकन त्याला आवाज दिला. ओ सर....! प्लीज....! मला पण एक नागपूर चे तिकीट हवे. प्लीज....! तेवढे काढून द्या. अहो मॅडम....! अगोदर सांगायचे ना....! द्या आता पैसे लवकर....! असे म्हणून तो पुन्हा खिडकीच्या तोंडाशी जाऊन आतील साहेबांना म्हणाला. परत एक नागपूर द्या. मी घाईघाईने पर्स मधील पैसे काढून त्याच्या हातात दिले. त्याने खिडकीतून तिकीट घेतले व मला म्हणाला. अहो मॅडम....! चला लवकर गाडीची वेळ झाली. गाडी प्लॅटफॉर्मवर येईल इतक्यात. या गाडीला दोनच मिनिटाचा थांबा आहे. गाडी जास्त वेळ थांबत नाही. मी अगदी जोरात जोरात त्याच्या मागे चालु लागले. रेल्वे स्टेशनच्या त्या पायर्‍या पटापट चढतांना मला खूप थकवा आला होता. त्यामुळे माझ्या श्वासोच्छ्वास सुद्धा वाढला होता. मी मनाशीच विचार केला कशाला बरं या पायऱ्यांची इंग्रजांनी शक्कल काढली असेल....! सरळ सरळ प्लॅटफॉर्म पाहिजे. किती घाईघाईत या पायर्‍या चढाव्या लागतात. तो तरुण अगदी चपळ होता. शरीराने धष्टपुष्ट अगदी तगडा होता. तो पटपट पायऱ्या चढून प्लॅटफॉर्मवर पोहोचला. मी गर्दीतुन कशीबशी वाट काढत त्याच्यामागे गेले. आज प्लॅटफॉर्मवर खूपच गर्दी दिसत होती. मी त्या गर्दीला बघून विचार केला. अरे बापरे....! आता तर कठीण झाले. गाडीत जागा काही मिळत नाही. बघू जागा मिळण्यापेक्षा गाडीत चढणे महत्त्वाचे आहे. गाडीत चढता आले तरी खूप झाले. मी मनाशी पुटपुटत होते. तेवढ्यात माझ्या लक्षात आले आपले तिकीट या तरुणाकडेच आहे. मी त्याला ते तिकीट मागुन घेतले. त्याने मला तिकीट देताच मी त्यांचे आभार मानले. त्याने स्मितहास्य करून वेलकम....! म्हणून तो पुढे निघून गेला. मला जरा या तरुणाचा रागच आला. वेलकम म्हणायची काय गरज होती. मला काय परत परत त्याच्याकडून तिकीट काढून घ्यायचे नव्हते. आणि हो संकटाच्या वेळी एखाद्याला मदत केली म्हणून काय झाले. ती पण आम्ही लेडीज आहोत म्हणून....! आम्हाला तुमच्यासारखी धावपळ जमत नाही. नाहीतर मी माझे तिकीट घेतले असते की, पण रांगेतील लोकांनी लगेच ओरडायला सुरुवात केली असती. ओ मॅडम....! रांगेत या....! असे मध्ये घुसू नका. पण तो धट्टाकट्टा तरुण होता त्याला रांगेत या म्हणायची कुणाची हिंमत झाली नाही. जरा सुंदर मुली दिसल्या की, मुलं लगेच लागतात वेड्यासारखी करायला. आता हाच तरुण बगा ना....! किती घाईघाईने निघून आला. माझे तिकीटही दिले नाही. जणू मी याच्या सोबत प्रवास करणार आहे. सरळ मला मागेमागे बोलवत प्लॅटफॉर्मवर घेऊन आला.
                रेल्वेच्या स्पीकर मधून जाहीर होत होते. कृपया प्रवाशांनी लक्ष द्या. गाडी नंबर शुन्य, दोन, एक, एक, तिन  हावडा सुपरफास्ट ट्रेन थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म नंबर दोनवर येत आहे. हा आवाज कानावर येताच....! मी दचकून गाडी येण्याकडे पाहिले. गाडी आता प्लॅटफॉर्मकडे येणार होती. अगदी दूरवर गाडीचे एक टोक दिसत होते. मी हातातील स्कुल बॅग पाठीवर लटकवली. दुसरी मोठी पिशवी हातात घेऊन गाडीचे जनरल डब्बे नेमके कुठे उभे राहतील याचा अंदाज घेत हळूहळू चालू लागले. गाडी येण्याचे जसे जाहीर होत होते. तसे लोकांनी प्लॅटफॉर्म जवळ येण्यास सुरुवात केली होती. इतरवेळी गाडीला यायला वेळ असला की, प्रवासी निवांत प्लॅटफॉर्मवर बसलेले असतात. काहीजण जेवण करतात. तर काहीजण गप्पागोष्टी, तर काही प्रवासी इकडून तिकडे फिरत असतात. काही वेळातच गाडी मोठा हॉर्न वाजवतच धड्धड् धड्धड् करत प्लॅटफॉर्मवर येवून थांबली. गाडीच्या दरवाज्याजवळ एकच गर्दी जमली. उतरणारे जेवढे प्रवासी असतील, त्याच्या डबल प्रवासी आज चढण्यासाठी उभे होते. अरे देवा....! आता कसं करू....! असे म्हणून मी गर्दीत उभी होते. पाठी मागचे लोकं जोरजोरात ढकलत होते. माझी खूप चिडचिड होत होती. लोक किती मूर्ख आहे ना....! कशाला लोटत असतील. मुलगी, महिला, म्हातारी माणसं कळत नाही का? यांना....! रेल्वे काय यांच्या बापाची आहे जणू....! मूर्ख कुठले....! तरी माझे बाबा म्हणाले होते मृणाल रेल्वेने नको जाऊस, हल्ली खूप गर्दी असते. सकाळी सकाळी छान पैकी एसटी बसने तुला बसून देतो. पण बाबांचे ऐकेल ती मृणाल कसली. खूप हट्टी आणि स्वतःची चालवणारी मी मुलगी आहे. गर्दीत लोटत लोटतच मी रेल्वेच्या आत कधी शिरले मला कळाले पण नाही. रेल्वेच्या डब्यात प्रचंड गर्दी होती. श्वास घ्यायला पण मोकळी जागा नव्हती. सगळ्या शेगांव मधील प्रवाशांना ही एकच रेल्वे होती की काय माहित. मान वळून बघायला सुद्धा जागा नव्हती. मी आता अंदाज घेतला गाडीत आपल्याला उभे राहूनच नागपूरपर्यंत जावे लागणार. माझ्या समोरच्या काकांनी त्यांच्या सोबतच्या मित्राला विचारले. आज शेगांव मध्ये एवढी गर्दी कशी काय....!  अहो आज गुरुवार नाही का....! गजानन महाराजांच्या दर्शनाला लांबून लांबून भाविक येतात. राज्यभरातून शेगांवला येणाऱ्या भक्तांची संख्या काय कमी आहे काय....! लोकांनी आज दर्शन घेण्यासाठी कालपासूनच शेगांवात गर्दी केली असेल. सकाळी सकाळी दर्शन झालेले भाविक परत निघाले. त्यामुळे आज एवढी गर्दी आहे. तेव्हा माझ्या लक्षात आले. अरे हो....! आज गुरुवार आहे. गजानन बाबांचे दर्शन घ्यायचे राहिले की, आईने किती वेळेस ओरडून सांगितले होते. जायच्या अगोदर एकदा मंदिरात दर्शन घेऊन येशील. रात्री माझ्या लक्षात होते पण सामानाची पॅकिंग करता करता खूप वेळ झाला. सकाळी जायचे तर सकाळी मैत्रिणी घरी भेटायला आल्या त्यामुळे गजानन महाराजांचे दर्शन राहूनच गेले. मी तेवढ्या गर्दीत कसेबसे हात जोडून गजानन महाराजांना नमस्कार केला. बाबांची क्षमा मागून हात जोडले. आता नागपूर वरून परत आले की, पहिले बाबांच्या दर्शनाला जायचे असे मी ठरवले. गाडी आता शेगांवला मागे टाकून पुढे आली होती. सगळे प्रवासी गर्दीत जमेल तसे पिशव्या, मोठ्या मोठ्या बॅग शिटखाली काही वरती ठेवत होते. मी गर्दीतून सावरत सावरत पुढे येऊ लागले होते. ओ काका....! प्लीज मला समोर जाऊ द्या. असे म्हणून मी डब्याच्या मधोमध आत आले. परंतु येथे पण तेवढीच गर्दी होती. पण मनाला एक समाधान होते. दरवाजा जवळ उभे राहण्यापेक्षा येथे बरे....! कमीत कमी चोर, फामटे यांच्या पासून सावध आहे आणि येथे काही महिला पण आहेत. तिकडच्या पेक्षा इथे सुरक्षित असल्याचे मला भासत होते. एकदाचा श्वास घेऊन मनाची तयारी केली. आता नागपूर पर्यंत उभे जाऊया. आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचे. आपण मुलगी असलो तरी कणखर आहोत. मनाची समजूत घालण्यात मी तशी पटाईत होते. माझे मन कितीही चपळ असले, ते मला कितीही भरकटवत असले तरी, मी मात्र त्याची बरोबर समजूत घालत असे. माझ्या आईचे व बाबांचे संस्कार नेहमी माझ्या पाठिशी होते. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे मला कठीण नव्हते. त्यामुळे मी आता थोडीशी रिलॅक्स झाले.
               तेवढ्यात मला वरच्या सीटवर बसलेल्या तरूणाने आवाज दिला. ओ मॅडम....! येथे बसता का....? मी आवाजाकडे मान वळून पाहिले तर, तो तरुण होता. ज्याने मला घाईघाईत का होईना तिकीट काढून दिले होते. मी त्याच्याकडे पाहत त्याला नाही म्हटले. तो परत म्हणाला, मॅडम डब्बा खूप पॅक आहे. शक्यतो सर्व प्रवासी नागपूरलाच जाणारी आहेत. त्यामुळे पुढच्या स्टेशनवर सुद्धा जागा मिळेल याची शाश्वती नाही त्यामुळे बसा वसती. नागपूर यायला जवळजवळ पाच तास लागतील. एवढ्या वेळ उभे राहण्यापेक्षा बसा येथे. काय हरकत आहे हवं तर मी खाली उतरतो. नाही....! नाही....! तुम्ही बसा. तुम्ही कशाला उतरता माझ्यासाठी....! मी नाही म्हणून सुद्धा तो तरुण खाली उतरला. त्याने माझी पिशवी एका शिटच्याखाली लोटून दिली. माझ्या हातातली स्कूल बॅग वरती शीटवर ठेवून दिली. मी हळूच शिटच्या दोन्ही कडेला पकडून रिलींगने चढून वरती जाऊन बसले. त्यांच्याकडे बघून त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद दिला. आता मात्र माझ्या मनात त्या तरुणांविषयी विचारा आला. बिचारा चांगल्या मनाचा आहे. आपण उगाच त्याच्याविषयी वेगळा विचार केला व मनात राग राग व्यक्त केला. खूप वेळ झाला दोन स्टेशन येऊन गेले. तरी डब्यातील गर्दी काही कमी झाली नाही. बिचारा उभा राहून कंटाळून गेला असेल. मी थोडीशी बाजूला सरकून त्याला आवाज दिला. अहो सर....! तुम्ही पण बसा येथे किती वेळ उभे राहता. करू कसेतरी अडजेस या वरती. असे म्हणताच तो पटकन वरती चढला. माझ्या शेजारी येऊन बसला. कमी जागेत दोघेजण बसलो होतो त्यामुळे तो बिचारा जरा स्वतःला आखडून बसला होता. त्याला नीटसे बसता येत नव्हते. माझ्यामुळे त्याला विनाकारण उभे राहावे लागले. आता अडचणीत बसावे लागत आहे. बिचारा खरचं मनाने चांगला असला पाहिजे. नाहीतर कोण अनोळखी माणसासाठी एवढे करणार. जरी मुलगी असली तरी कुणी स्वतःची जागा दुसऱ्याला देत नाही. तो माझ्याशी काहीतरी बोलेल मला नाव गाव विचारेल. नागपूर का जात आहे हे जाणून घेईल. असे मला वाटले पण तो बिचारा काही बोलत नव्हता. मी बऱ्याच वेळ शांत बसून होते. पण मन मात्र सारखं बडबडत होतं. त्याला बोलावे असे मला सुचवत होतं. शेवटी मी हिंम्मत करून त्याला विचारले. तुम्ही नागपूरलाच जाणार आहात की, नागपूर वरून पुढे....! तो हसर्‍या चेहर्‍याने हळूच म्हणाला हो....! हो....! मी नागपूरलाच जात आहे. मी नागपुरातच राहतो त्यामुळे पुढे कशाला जाणार. अच्छा....! म्हणजे तुम्ही नागपूरचे आहात तर....! नाही मॅडम....! मी नागपूरचा नाही. मी मुळचा खामगावचा आहे. मी नागपूरला शिक्षणासाठी राहतो. अरे वा छान....! असे म्हणून मी शांत बसले. पुढे काय बोलावे हे मला समजेना तो मात्र शांत बसला होता. मला वाटले तो माझी चौकशी करेल, पण तो काहीच बोलला नाही. मी पुन्हा खूप वेळ शांत बसले. तो मला मॅडम म्हणून संबोधत होता. कदाचित मी नोकरीला आहे असा त्याचा गैरसमज तर झालेला नसावा. मी स्वतःहून त्याला थोड्या वेळाने हळूच सांगितले. मी नागपूरला चालले मावशीकडे....! माझी मावशी राहते पंचवीस वर्षापासून त्यामुळे अधूनमधून येणे जाणे असते. अरे वा....! छान आहे की मग मॅडम....! त्याने पुन्हा मॅडम म्हटले....! मी मात्र त्याला सांगितले. मी मॅडम नाही व माझे नाव सुद्धा मॅडम नाही बरं का....! मी मृणाल....! सगळे मला मृणालच म्हणतात. तुम्ही पण मृणालच म्हणा....! मॅडम वगैरे नको....! अरे वा....! छान नाव आहे की मृणाल....! आणि हो  मॅडम जरी नसल्या म्हणून काय झाले. तुम्ही मॅडम सारख्या दिसता बरं का....! तसेही आमच्या कॉलेजमध्ये सर, मॅडम बोलायची पद्धत आहे. त्यामुळे मी तुम्हाला मॅडम म्हणून संबोधले. तुम्हाला राग आला का....! नाही....! तसे काही नाही....! पण उगाच पदवी कशाला. कॉलेजला आहात म्हणजे नेमक काय शिकता आपण....! मी एमबीए करतो. बापरे....! खूप शिकत आहात तुम्ही. खरं तर मी तुम्हाला सर म्हणायला पाहिजे होते. सॉरी बरं का....! मी तुम्हाला एकदा पण सर नाही म्हणाले. आणि हो....! तुम्ही वयाने पण माझ्यापेक्षा मोठे आहात. असे काही नाही. माझे नाव  घनश्याम....! तुम्ही मला घनश्याम म्हटले तरी चालेल. मी त्याचे नाव ऐकून घेतले पण पुढे काहीच बोलले नाही. त्यामुळे घनश्याम पुढे म्हणाला माझे नाव घनश्याम....! आवडले  नाही का? नाही असे काही नाही. छान नाव आहे तुमचे आणि हो नावाप्रमाणे स्वभाव पण छान आहे. मी अनोळखी असतांना सुद्धा तुम्ही आज खूप मदत केली. खरंच तुमचे आभार कसे मानावे कळत नाही मला....! खूप खूप धन्यवाद तुम्हाला....! मृणाल आपण एकमेकांचे मित्र होऊया म्हणजे सॉरी आणि धन्यवाद म्हणायची गरज भासणार नाही. आवडेल ना तुम्हाला मैत्री करायला. हो....! हो....! चालेल की, मी अडखळत बोलले. घनश्याम बोलायला जेवढा गोड होता. तेवढीच त्याची भाषा पण फार गोड होती. दिसायला पण सुंदर, मनमोहक होता. उंचपुरा, देखना, नाक अगदी धारधार, सुंदर असे केस, चेहऱ्यावर एक आनंददायी चमक, सतत हसतमुख, हुशार होता. तिकीट काउंटर जवळ भेटल्यापासुन ते आतापर्यंत मला तो एकदा पण दुःखी, चिंतेत दिसला नाही.  प्रत्येक प्रसंगाला हसतमुखाने तोंड देत होता. खरंच घनश्याम खूप हुशार असला पाहिजे. त्याच्या हुशारीचे तेज त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मी काही त्याच्या पेक्षा दिसायला कमी नव्हते. त्याच्यापेक्षा गोरी, नाका डोळ्यात पण मोहक, लांब केसाची वेणी, आकाशात वीज चमकावी तशी सौंदर्याने चमकत होते. पण माझे हे सौंदर्य घनश्यामला कदाचित आवडले नसावे किंवा खूप संस्कारी मुलगा असावा. नाहीतर सौंदर्याने बहरलेली एक तरुणी मघापासून जवळ असतांना सुद्धा तो एक शब्द न बोलता शांत बसून होता. माझ्या विषयी जाणून घेण्याची ओढ त्याला नव्हती. मी एकटी प्रवास करत आहे हे त्याला माहीत असून सुद्धा तो माझ्याशी अतिशय सभ्यतेने वागत होता. मी एकटी आहे म्हणूनच त्याने मला बसण्यासाठी जागा दिली. माझी पिशवी ठेवण्यासाठी मदत केली. खरंच घनश्याम खूप चांगला मुलगा आहे. माझी ओळख नसतांना सुद्धा मॅडम म्हणून माझा फार आदर करत होता. का कुणास ठाऊक घनश्याम मला एकदम चांगला वाटू लागला होता. आम्ही जणू खूप दिवसा पासूनचे मित्र आहोत असे भासू लागले. इतरवेळी मी कुणाशीच न बोलणारी, पुरुषापासून दूर राहणारी, प्रवासात असे कधी कुणाशी स्वतःहून बोलत नसे. मी याआधी अनेक वेळा मावशीकडे आले पण आई-बाबासोबत असायचे त्यामुळे कधी कुणाशी बोलण्याची वेळच येत नसतं. पण यावेळी नेमकी एकटी आले. त्यात ही गर्दी त्यामुळे माझा घनश्यामशी संबंध आला. घनश्यामने तिकीट काढून दिले त्यावेळी तो काय करत असेल? कुठे राहात असेल? याचा विचारही मनात आला नाही. तो परत भेटेल हेही माहीत नव्हते. परंतु योगायोगाने तो परत भेटला. कदाचित दुसऱ्या डब्यात शिरला असावा व जागा शोधत शोधत तिथे येऊन बसला. पण येवढ्या कमी वेळात घनश्याम गाडीत चढून जागा शोधून वरती येऊन सुद्धा बसला होता. खरंच घनश्याम नुसता दिसायला सुंदर नव्हता तर तो चपळ, तल्लखही तेवढाच होता. मी मनातल्या मनात घनश्यामचा विचार करत होते. तेवढ्यात घनश्याम मला म्हणाला, मृणाल तू शेगांवला असतेस का? नाही. मी मूळची औरंगाबादची आहे पण माझ्या बाबांची शेगांवला बदली झाली. त्यामुळे मी शेगांवला राहते. अरे वा....! बाबा नोकरीला आहेत म्हणायचे की, हो....! माझे बाबा बँकेत नोकरी करतात व आई गृहिणी आहे. बरं....! छान आहे की मंग....! तु नेमकी काय करतेस. मी बी. कॉमच्या तृतीय वर्षाला आहे. अरे वा छान....! बाबा प्रमाणे बँकेत नोकरी करायची इच्छा आहे वाटतं....! नाही असे काही नाही. मला अगोदर पासून बी. कॉम करायची इच्छा होती. हल्ली नोकऱ्या कुठे आहेत येवढ्या. शिक्षण घेतले म्हणजे नोकरी मिळेलच याची शाश्वती सध्याच्या युगात देता येत नाही. ते पण आहे म्हणा....! पण तुमच्यासारख्या हुशार मुलींना नक्की मिळतो जॉब. मी हसतच  घनश्याम कडे बघुन बोलली. मी आणि हुशार....! काय मजाक करता आपण....! कोणी सांगितले तुम्हाला....! सांगायची काय गरज आहे. तुमच्या चेहऱ्यावरून कळतेच की तुम्ही हुशार आहात ते....! असे चेहर्‍यावरून कळाले असते तर माझ्या सारखी प्रत्येक मुलगी नोकरीला असली असते. घनश्याम तुम्ही एमबीए बरोबर भविष्य पण शिकता की काय? हळूहळू तुम्हाला भविष्य पण कळायला लागले. आम्ही दोघेपण खूप हसलो  दोघांच्या गप्पा गप्पात टाईम मात्र निघून जात होता. बरं झालं एका दृष्टीने मला घनश्याम भेटला तो....! नाही तर खूप बोर झाले असते. उभे राहतच नागपूर गाठावे लागले असते. घनश्यामचा सहवास मला छान वाटत होता. मी प्रवासात एकटी आहे हे विसरून गेले होते.
                                बघता बघता प्रवासातील चार तास निघून गेले. वर्धा जवळ आले होते. एकदा का वर्धा येऊन गेले म्हणजे गाडी डायरेक्ट नागपूरलाच थांबणार होती. खूप दिवसांनी मावशीकडे जात होती. ते पण एकटी असल्यामुळे मावशी काळजीत असेल. बाबांनी मावशीला तसे कळवले होते. मृणालला आज नागपूरला बसून देतो शक्य झाल्यास विवेकला घ्यायला पाठवून द्या. विवेक हा मावशीचा मोठा मुलगा तो पुण्याला इंजिनियर आहे. पण काही दिवसासाठी तो घरी आलेला आहे. कदाचित तो घ्यायला येणार असेल तर फोन करेलच की, तो आला म्हणजे घनश्यामला  उतरल्यावर बोलत बसता येणार नाही. नाहीतर परत घनश्याम कोण, कुठुन आला हे सर्व विचारणा होईल. नको....! नको....! उतरतांना बोलत बसायचे नाही. त्याला डब्यातच बाय करायचे व आपले आपण एकटे खुशाल उतरायचे. मी मनात असा विचार करतच होते. तोच त्याने मला प्रश्न केला. मृणाल तू किती दिवस राहणार नागपूरला. बघू आता मावशी किती दिवसांनी पाठवते ते....! एक आठवडा तरी मावशी मला पाठवणार नाही. फोनवर आधीच सांगत होती नागपूरला आल्यावर किमान एक आठवडा तरी थांबशील. परत लग्न झाल्यावर कुठे थांबायला वेळ मिळतो.
म्हणजे....! तुमचे लग्न ठरले की काय? नाही हो....! त्याने एकदम आश्चर्यचकित होऊन प्रश्न विचारला. जणू माझ्या लग्नाची त्याला चिंता पडली होती. नाही म्हटलं तुमचे लग्न ठरले असेल तर बोलवा आम्हाला तुमच्या औरंगाबादला. यानिमित्ताने तुमच्याकडे येणे होईल. खूप प्रेमळ साध्या मनाचा होता घनश्याम. अगदी चार तासाच्या आमच्या मैत्रीत तो खूप सहज बोलत होता. जणू आम्ही खूप जुने मित्र आहोत. लग्न ठरले की, तुम्हाला नक्की बोलवू या मगं....! नाहीतर विसरुन जाल कोण मृणाल....! नाही हो….! मी विसरभोळा नाही माझ्या सर्व लक्षात राहते. मगाशी तुमचे तिकीट माझ्याकडे राहिले होते. हे माझ्या आठवणीत होते बरं का....! पण प्लॅटफॉर्मवर येण्याच्या घाईत मी दिले नाही. बघता बघता नागपूर जवळ आले होते. लोक आपल्या पिशव्या शोधत होती. काहींनी तर पिशव्या जवळ घेऊन पण ठेवल्या होत्या. लोकं चढायला पण घाई व उतरायला पण येवढी घाई का करत असतील कुणास ठाऊक. घनश्याम हळूच खाली उतरला त्याने मला खाली यायला सांगितले. माझी पिशवी काढून दिली. स्कूल बॅग माझ्या हातात देत म्हणाला, मॅडम....! बॅग सांभाळा बरं  का तुमची....! परत म्हणसाल बॅग दिली नाही. मी मनाशीच विचार करत होते. नागपूर खूपच लवकर आले अजून दूर पाहिजे होते. चार-पाच तासाचा घनश्यामचा सहवास मला छान वाटत होता. खरंच घनश्याम एक चांगला मित्र झाला होता. त्याने मला आज खूप मदत केली होती. गाडी अगदी शहरात आली होती. गाडीने मोठा हॉर्न वाजवला होता. सगळ्यांना मी आले सांगत सांगत गाडी प्लॅटफॉर्मवर जाऊन उभी राहिली. घनश्यामने माझी पिशवी उचलली व तो समोर चालू पण लागला. मी त्याच्या मागेमागे गर्दीतून डब्यातून उतरले. घनश्याम आताही प्रसन्न वाटत होता. लोक स्टेशनच्या बाहेर जात होती. तर काही प्रवासी गाडीत बसत होते. मी व घनश्याम गर्दी कमी होण्याची वाट पाहत एका बाजुला उभे राहिलो. तेवढ्यात गाडी निघून गेली. घनश्याम त्याच्या हातातील पिशवी मला देऊन तो म्हणाला येतो. मृणाल मॅडम....! राहूद्या ओळख. पुन्हा भेटू कधीतरी चला बाय....! काळजी घ्या. असे म्हणून घनशाम गर्दीतून वाट काढत काढत निघून गेला. मी दहा मिनिटांनी गर्दी कमी झाल्यावर पिशवी घेऊन प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडले. तेवढ्यात बाहेर मला विवेक दिसला. मी त्याला लगेच आवाज दिला भैय्या इकडे बघ....! मी इकडे उभी आहे. विवेकने  मला पाहताच माझ्याकडे येऊन माझी पिशवी घेतली. मी विवेक सोबत मावशीच्या घरी पोहोचले. माझ्या येण्याने मावशी खूप खुश झाली होती. मी हात पाय धुऊन फ्रेश झाले मावशीने छान पैकी माझ्यासाठी गरम नाश्ता बनवून ठेवला होता. मी चहा नाष्टा घेतला व थोड्या वेळ आराम केला. रात्री मावशी, काका सोबत खुप गप्पा मारल्या. मावशी म्हणाली मृणाल आता रात्र खुप झाली. चल आराम करं उद्या बोलुया प्रवासाने थकली असेल. शेवटी मी बेडवर जाऊन पडले. मला काही केल्या झोप लागत नव्हती. झोपतांना मला मात्र घनश्यामची खूप आठवण झाली. अरे आपण घाई घाईत त्याचा मोबाईल नंबर पण घ्यायला विसरलो. नाहीतर त्याला चुपचाप फोन करुन सांगता आले असते. विवेक घ्यायला आला होता. मी मावशीच्या घरी पोहोचले. पाच तासाच्या प्रवासातील त्याची मैत्री एक आठवण बनुन गेली. घनश्यामच्या त्या आठवणीने मला कधी सुखद झोप लागली ते कळले सुद्धा नाही.

🙏🙏🙏🙏
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852






No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...