Saturday, 17 April 2021

भय इथले संपेना....!

                 भय इथले संपेना....!

कोरोना महामारीने गेल्या वर्षभरापासून थैमान घातले. जगभराच्या विळख्यात भारत देशही अडकला. भारतात सर्वत्र कोरोनाने आपले बस्तान बसवले. भारतातील महाराष्ट्र या राज्यात कोरोनाने सध्याच्या घडीला आहाकार माजवला आहे. हजारोतील आकडे लाखाच्या जवळपास जाऊन पोहचले आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्र तुरळक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण निघायचे. तरी प्रत्येकाच्या मनात भय होते. मध्यंतरी लसीकरण सुरू झाले. लस आल्यानंतर कोरोना पासून सुटका होईल असे वाटत होते. परंतु लसीकरण सुरू असतांना सुद्धा भय काही कमी झाले नाही. आजच्या घडीला राज्यात दर दिवशी 65 हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. कुठेतरी व्हाट्सअप, फेसबुक, बातम्या, वर्तमानपत्रातून सतत निधनाच्या बातम्या कळतात. यामुळे मनाला अत्यंत वेदना होतात. अतिशय भयानक परिस्थिती असल्याचे भासते.

                        याउलट राज्याचा विचार केला तर जवळजवळ 55 ते 56 हजार लोक दररोज कोरोनावर मात करून घरी सुरक्षित परतत आहे. सरकारी सर्व यंत्रणा, सरकारी दवाखाने, कोवीड सेंटर, खाजगी दवाखाने कोरोना रुग्णांसाठी 24 तास सेवा देत आहे. डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, मेडिकल स्टाफ, दवाखान्यातील कामगार, आपल्या जीवाची बाजी लावून प्रत्येकाचा प्राण वाचवण्यात अतोनात प्रयत्न करत आहे. वास्तविक विचार केला तर, कोरोनाचा मृत्यूदर सरासरी फक्त दोन टक्के आहे. इतर वेळेचा विचार केला तर, अपघात, नैसर्गिक आपत्ती, इतर आजार व आत्महत्या या कारणांनी मृत्यू होतच असतो. परंतु कोरोनाच्या मृत्यूमुळे भय मात्र वाढले आहे. इतर मृत्यूच्या कारणांपेक्षा कोरोनाच्या मृत्यूचे भय प्रत्येक माणसाच्या मनावर ठसले आहे. याचे कारण असे की, सर्व ठिकाणी बातम्यांमध्ये, वर्तमानपत्र, व्हाट्सअप, फेसबुक, गावा गावातील चौकात, मंदिरावर सर्वत्र फक्त कोरोनाच्या बाबतीत भय निर्माण केले जात आहे. वास्तविक पाहता 100 रुग्णांमध्ये 98 रुग्ण बरे होत आहे. फक्त दोन रुग्णांचे निधन होत आहे. या दोन रुग्णांमध्ये सुद्धा इतर आजाराची बाधा आधीपासूनच आहे. 98 रुग्णांपेक्षा 2 रुग्णाची चर्चा आज समाजात सर्रास होतांना दिसत आहे. 98 रुग्ण कोरोनावर मात करत आहे. परंतु त्याची कुठेच चर्चा होत नाही. म्हणूनच इथले भय संपेना...!

                प्रत्येकाने कोरोनावर मात करण्यासाठी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. शक्यतो कामाव्यतिरिक्त घरा बाहेर निघणे टाळावे. सामुदायिक ठिकाणी एकत्र येणे टाळावे. लग्न, समारंभ, अंत्यविधी, धार्मिक कार्यक्रम आदी ठिकाणी गर्दी करणे टाळावे. यामुळे आपोआपच कोरोनाची वाढती साखळी खंडित होईल. कोरोनाचे रुग्ण कमी होतील. ज्या दिवशी कोरोनाचे रुग्ण कमी होतील त्या दिवशी मृत्युचे प्रमाण सुद्धा कमी होईल. कोरोनाचे भय सुद्धा संपेल. आज कोरोना होण्यापेक्षा त्याच्या भयाने अधिक नैराश्याची झालर पांघरलेली आहे. समाजात जीवनमानावर सर्वाधिक कोरोनाचे नैराश्य पसरलेले दिसत आहे. वास्तविक पाहता मनुष्याला जीवन जगतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. मुळात जीवन जगणे हे एक संघर्षच आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे भय मानवाच्या डोक्यात घर करत आहे. आज फक्त प्रत्येकाला कोरोनाचे भय व कोरोना संकट दिसत आहे. प्रत्येकाने त्यातून स्वतःला दूर केले पाहिजे. व कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने व आरोग्य यंत्रणेने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. जन माणूसच या कोरोनाला पळवून लावू शकतो. इतिहासात डोकावून पाहिले तर यापेक्षाही कठीण संकटांना याच मानवाने तोंड दिले आहे. जुन्या काळापेक्षा आज तर विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अत्यंत सुसज्ज व आधुनिक झाली आहे. त्यामुळेच तर 100 पैकी 98 रुग्ण आज बरे होत आहे. फक्त गरज आहे ती प्रत्येकाने नियमांचे पालन करणे धैर्याने या संकटाला सामोरे जाणे. व कोरोनाच्या भयातून मुक्त होणे. प्रत्येकाने स्वतःला सुरक्षित ठेवले व स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची उत्तम काळजी घेतली तर कोरोनाचे भय उरणारच नाही.
 
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलढाणा
मो नं 98 23 42 58 52

No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...