Thursday, 9 January 2020

कुटुंबात संस्काराचे बिज रुजवा


 कुटुंबात संस्काराचे बिज रुजवा


महाराष्ट्र हे संतांचे, समाजसुधारकांचे व विचारवंतांचे राज्य आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात संस्कार मिळण्याचे ठिकाण कुटुंब, शाळा आणि समाज हे आहे. पूर्वीच्या काळात संस्कार कुटुंब, समाज व गुरुकुलामधून मिळायचे. मग ते आध्यात्मिक संस्कार असो वा शैक्षणिक संस्कार असो. आज मात्र परिस्थिती थोडीशी बदललेली दिसते. संस्कार हे फक्त शाळेतूनच मिळावे किंवा मोठ्या शिकवणी वर्गातून मिळावे ही पालकांची भूमिका झाली आहे. मुलांना मोठी-मोठी पुस्तके मिळाली, चांगला गणवेश मिळाला व शहराच्या नामांकित शाळेत प्रवेश मिळाला म्हणजे, मुलगा सुसंस्कारित व उच्चशिक्षित होणार असा मोठा गैरसमज आजकालच्या पालकाचा झाला आहे. कुटुंबाची व आई-वडिलांची भूमिका मात्र सगळेजण विसरत चालले आहे. आपल्या मुलावर संस्कार करायला आई-वडिलांकडे वेळ नाही. शहरी भागात आई-वडील दोघेजण नोकरी करतात. तर ग्रामीण भागात आई-वडील दोघे शेतात काम करतात. तसेच शहरी व ग्रामीण भागात आई-वडील दोघेही व्यावसायिक आहेत. अशा परस्थितीत कुटुंबाचा वेळ कामामध्ये विभागलेला आहे. प्रत्येक कुटुंब ही व्यस्त झालेली आहे. त्यामुळे मुलांनवर संस्कार करायला आजकाल वेळ मिळत नाही. हे सत्य आहे. घरामध्ये मुलांकडे लक्ष देणारी आजी-आजोबा कुटुंबातून गायब झालेली पाहावयास मिळत आहे. याचे कारण म्हणजे कौटुंबिक व्यवस्था ही एकत्रित राहिली नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आई-वडील आणि मुले असा छोटा परिवार निर्माण झाला आहे. कुटुंबातून घरातील मोठी व्यक्ती म्हणून आजी-आजोबा नातवांना संस्कार देऊ शकतात. वेळ देऊ शकतात. मात्र विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे आजी-आजोबांचे वेगळे कुटुंब पहावयास मिळत आहे. याउलट थोडे मागे वळून पाहिले तर, ग्रामीण भागात एकत्र कुटुंबपद्धती होती. कुटुंबात आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू, चुलत भाऊ, चुलत बहीण असे सर्व जण एकत्र राहायचे. सणवार, उत्सव, रुढी परंपरा एकत्र साजरे करायचे. त्यामुळे साहजीकच आई-वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर राहिले तरी, आजी-आजोबा नातवंडांना वेळ द्यायचे. नातवंडा सोबत खेळायचे. रात्री आजी आपल्या नातवांना रामायण-महाभारतातील कृष्ण, बळीराम, राम-लक्ष्मण, अर्जुन, श्रावण कुमार, कर्ण, तसेच इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्या गोष्टी सांगायच्या. यातून मुलांवर चांगले संस्कार घडायचे. गोष्टी, गाणी, पाळणा यासारख्या गोष्टींमधून मुलांवर चांगले संस्कार होत असत. मुलांना चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टीची जाणीव लहान वयातच व्हायची. चांगला आणि वाईट हा फरक मुलांना लहानपणीच कळायचा. नकळत  मुलांवर वाढत्या वयाबरोबर चांगले संस्कार व्हायचे. कुटुंबातील मोठी व्यक्ती म्हणून आजी-आजोबा नातवंडांचे लाड करायचे, त्याचबरोबर शिस्त सुद्धा लावायचे. शिस्त मोडल्यावर शिक्षा सुद्धा करायचे. यामुळे अंगात साहजिकच शिस्त भिंनली जायची. आजकाल मात्र कुटुंबात मुलांचे लाड होतात. शिस्त मात्र मुलांमध्ये फारशी दिसत नाही. कारण आजकालचे पालक मुलांना शिक्षा करण्यापेक्षा, लाडच अधिक करतात. आणि म्हणून आजकालची मुलं शिक्षणाने सुशिक्षित होतांना दिसतात. परंतु संस्कारांनी अशिक्षित असल्याचे जाणवते. आजच्या पिढीतील तरुण मुलांच्या वर्तनावरून तरी हेच दिसत आहे. आजचा तरुण कॉलेजच्या नावाखाली व फॅशनच्या नावाखाली संस्कार व संस्कृती पायदळी तुडवतांना दिसत आहे. फॅशनच्या नावाखाली अर्धवट अंग झाकणारी कपडे घालायचे. अंग उघडे ठेवले म्हणजे फॅशन, वेगवेगळे व्यसन केले म्हणजे फॅशन, मैत्रीच्या नावाखाली पार्टी, नाच-गाणी केली म्हणजे मैत्री. अशा अनेक गैरसमजुतीने  किंवा पुढारलेल्या विचारसरणीने तरुणाई भरकटलेली दिसत आहे. आणि यातूनच सामाजिक भान विसरून हीच तरुणाई भारताचे नागरिक म्हणून समोर येत आहे. आपण पाहतो समाजाचे वैचारिक संतुलन बिघडत चाललेले आहे. याला कारणीभूत समाज, फॅशन, चित्रपट, तंत्रज्ञान, मोबाइल, राहणीमान व पुढारलेली विचारसरणी याबरोबच कुटुंब सुद्धा  जबाबदार आहे. आज समाजात गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात व महाराष्ट्र बरोबर संपूर्ण भारत देशात ज्या काही वेगवेगळ्या घटना घडत आहे. यामध्ये बलात्कार, छेड काढणे, मुलींना त्रास देणे, विवाहीत स्त्रियांचा छळ करणे अशा घटना मनाला सुन्न करणाऱ्या आहेत. सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्राचे पान उलटल्या बरोबर अशा घटना वाचावयास मिळतात. टीव्हीचे बटन दाबून न्यूज चैनल सुरू करताच क्षणी अशा घटनांच्या बातम्या कानावर ऐकायला येतात. यामुळे या घटना माणसाच्या मनाला प्रचंड वेदना देणाऱ्या व उच्चशिक्षित म्हणून घेणाऱ्या समाजाला काळीमा फासणाऱ्या आहेत. जेव्हा अशा घटना घडतात. तेव्हा साहजिकच प्रत्येक जण समाजाला, प्रशासनाला, पोलिस यंत्रणेला, सरकारला जबाबदार धरतात. अनेकांकडून पोलिसांचे लक्ष नव्हते का?, सरकार काय करते?, महिला आयोग कुठे आहे? असे प्रश्न उपस्थित केले जातात. पण प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की, समाजातील ज्या मुलीवर, महिलांवर अत्याचार होत आहे. ज्या महिलांचा छळ होत आहे. त्या कुणाच्या तरी आई, बहीण, मुलगी आहे. अत्याचार करणारे सुद्धा कोणाचेतरी वडील, भाऊ, काका, मामा, दादा आहे. शेवटी या वाईट घटनांमागे समाजातीलच कुणाच्या तरी कुटुंबातील व्यक्ती आहे. म्हणजे समाजातील कुटुंबाच्या संस्कारा अभावी अशा घटना घडतात असे म्हणता येईल. यासाठी प्रत्येक कुटुंबातुन आपल्या मुला-मुलींना जर चांगले संस्कार दिले. तर या घटना कुठेतरी कमी होताना दिसेल. मग मुला-मुलींचे राहणीमान, मैत्री करणे, शिक्षण घेणे, सण-उत्सव साजरा करणे, फॅशनची आवड बाळगणे, यासारख्या गोष्टी करण्याअगोदरच उत्तम संस्कार घालून दिले. तर वाईट घटना घडणे निश्चितच थांबेल. कुटुंबातील आईने आपल्या मुलाला लहानपणापासून चांगले संस्कार दिले, तर त्याला समाजातील प्रत्येक स्त्री आई, मावशी, बहिण वाटेल. समाजातील स्त्री ही स्वतःच्या आई व बहिणी प्रमाणे वाटायला लागेल. असे संस्कार मुलांमध्ये रुजवायला प्रत्येक आईने व वडिलांने समोर आले पाहिजे. समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टीवर चर्चा करत बसण्यापेक्षा त्याची कारणे शोधून, जर प्रत्येकाने तर वाईट घटना घडणारच नाही. संस्कार कुठे विकत मिळत नाही. किंवा संस्काराची कुठे क्लासेस सुद्धा चालत नाही. ती प्रत्येकाला स्वतःमध्ये रुजवावी लागतात. पालक या नात्याने प्रत्येकाची जबाबदारी आहे की, आपल्या मुलांमध्ये आपण चांगले संस्कार रुजवले पाहिजे. यासाठी प्रत्येक आई-वडीलाने आपल्या मुलांनसोबत वेळ दिला पाहिजे. व्यवसाय, नोकरी, काम धंदा याबरोबरच मुलांना सुद्धा पुरेसा वेळ देणे, हे गरजेचे आहे. हे उच्चशिक्षित पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. संस्कृतीची, परंपरेची ओळख करून दिली पाहिजे. मुलांना चांगले कपडे, चांगली खाद्यपदार्थ याबरोबरच चांगली पुस्तके घेऊन दिली पाहिजे. संस्कार घडवणारी पुस्तके मुलांना वाचायला सांगितली तर निश्चितच मुलांवर चांगले संस्कार होतील. सण, उत्सव, परंपरा यांची मुलांना योग्य ओळख करून दिली पाहिजे. मुलांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य मार्गदर्शन करून योग्य ती बंधने घातली. तरच येणारी पिढी सुसंस्कारित व संस्कृतीला जोपासणारी निर्माण होईल. यासाठी समाज, सरकार, प्रशासन यांना दोष न देता प्रत्येक पालकाने संस्काराचे बीज कुटुंबातच रुजवले पाहिजे.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

1 comment:

Unknown said...

खुप सुंदर लेख

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...