Friday, 25 September 2020

संस्काराचे मोती

                       संस्काराचे मोती

निसर्गाचा अनमोल ठेवा म्हणजे कोकण होय. सौंदर्याने नटलेल्या या कोकणात काजू, फणस व आंब्याच्या बागांनी अधिकच भर घातली आहे. या ठिकाणी जन्माला आलो म्हणजे स्वर्गसुख प्राप्त झाल्यासारखे वाटते. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणातील मजा काही वेगळीच होती. राधिका मावशीचा जन्म याच कोकणातील मालवणचा होता. लग्नानंतर मात्र राधिका मावशींना चिपळूणला जावे लागले. सासरही कोकणातीलच मिळाले म्हणून राधिका मावशी खूप खुश होत्या. “ माहेर व सासर कोकणात मिळायला फार भाग्य लागते. ” असं त्या नेहमी म्हणायच्या. लग्नानंतर एका वर्षांनी राधिका मावशींना सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले. आई व बाबा मुलीच्या जन्मामुळे खूपच खूश होते. कारण राधिका मावशीच्या सासरी तीन पिढ्यापासुन  मुलगी नव्हती. मुलीच्या जन्माने तीन पिढ्यांची उणीव भरून काढली होती. थाटामाटात मुलीचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला. राधिका मावशीच्या सासरकडील सर्व बायका, सासू-सासरे, नवरा, दिर असे सर्वजण मालवणला आले होते. राधिका मावशीच्या सासूने मुलीच्या कानात कुर्र....! आवाज करून कुसुम नाव ठेवले. सर्वांना आवडती कुसुम आता चार महिन्याची झाली होती. कुसुमला आता स्वतःच्या घरी नेण्यासाठी तिचे बाबा मालवणला आले होते. राधिका मावशीची भरल्या ओटीने सगळ्यांनी पाठवणी केली. कुसुम आता बाबांच्या मांडीवर जाऊन बसली होती. आजोबा लाडात कुसुमला म्हणतात. लबाड कुठली....! बाबा आले तर....! घरी जाण्यासाठी तयार झाली. आज तुझे रडने गायब झाले. खूप रडून घेतले कुसुम बाई....! आमच्या मालवणी काय तुम्हाला करमत नव्हते का....! आजोबाच्या लाडाने नात खळखळून हसली. सर्वांनाही खळखळून हसू आले....! राधिका मावशी, कुसुम, व तिचे बाबा यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. एसटी बस निघाली. कुसुमने आजोळ सोडले. 

             स्वतःच्या गावी चिपळूणला जायला निघालेल्या या चिमुकलीला नियतीचा खेळ कुठे माहित होता....! जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या भाग्यरेषा बदलता येत नाही. देवाने लिहून पाठवलेल्या भाग्यरेषा भोगाव्याच लागतात. मात्र त्या भाग्यरेषा माणसाला वाचता आल्या असत्या तर....! स्वतःचे भाग्य अनेकांनी बदवले असते. मालवण वरून चिपळूण सहा तासाचा रस्ता होता. गाडी जशी जोरात धावू लागली, तसा खिडकीतून थंडगार वारा आत येत होता. थंडगार हवेमुळे कुसुमला छान झोप लागली होती. मालवण वरून गाडी निघून चार तास झाले होते. आता दोन तासात चिपळूण येईल....! राधिका आपल्या घरी सगळे कुसुमला भेटायला आतुर झाले आहे. नाव ठेवायला आले होते त्यानंतर पुन्हा कुसुमला पाहण्याचा योग आला नाही. कुसुमचे बाबा व राधिका मावशी बस मध्ये गप्पा मारत होते. बस भरधाव धावत होती. अचानक बसला बिघाड झाली. ड्रायव्हरचे बस वरील नियंत्रण सुटले व बसचा मोठा अपघात झाला. बसचा अपघात एवढा भीषण होता की, बस मधील जवळजवळ पंचवीस लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला. या अपघाताने मात्र कुसुमच्या डोक्यावरचे छत्र हरवले होते. राधिका मावशी व तिचे पती दोघांचे या अपघातात निधन झाले. या भीषण अपघातात मात्र नशिबाने भाग्यवान असणारी कुसुम मात्र सुखरूप बचावली होती. या अपघाताच्या बातमीने मालवण व चिपळूणची सर्व माणसं हादरून गेले होते. नियतीच्या या क्रुर डावापुढे कोणाचेच काही चालत नाही. राधिका मावशी व कुसुमच्या बाबाच्या निधनाच्या बातमीने सर्व नातेवाईक फार हादरून गेले होते. दुःखाच्या अथांग सागरात कुसुमच्या नशिबाची नाव डुबली होती. चार महिन्यापूर्वी, काही तासांपूर्वी नशीबवान, भाग्यवान असणारी कुसुम मात्र नियतीपुढे हरली होती. या अपघाताविषयी सर्व कोकणात हळहळ व्यक्त झाली. कुसुम मात्र सगळ्यांच्या तोंडी नशीबवान ठरली होती. या भीषण अपघातातून देवाने कुसुमला सुखरूप बचावले होते. हा चमत्कार कसं काय घडला....! ते कुणालाच कळत नव्हते....! आई व बाबाच्या निधनाने पोरकी झालेली कुसुम मालवणी परतली होती.

                    कुसुमचा  सांभाळ आता मामा-मामी करू लागले होते. कुसुम ही राधिका मावशीची आता शेवटची आठवण होती. आजोळी कुसुम राधिका मावशीची उणीव भरून काढत होती. काळजाचा तुकडा गेल्यामुळे आजी-आजोबांना फार धक्का बसला होता. पण कुसुमकडे बघून थोडे फार दुःख हलके होत होते. आजी-आजोबा, मामा-मामीच्या लाडात कुसुम मोठी होत होती. राधिका मावशीच्या स्वप्नांना आता कुसुमच्या रूपाने पूर्ण करावे लागणार होते. ही जबाबदारी ओळखून कुसुमच्या मामाने कुसुमला छान संस्कार दिले होते. घरातील सर्वांच्या लाडात कुसुम अनेक नवीन नवीन गोष्टी शिकत होती. आजी आजोबांनी तिच्या बालमनावर खूप चांगले संस्कार केले होते. बोलणे, चालणे, वागणे, अशा सर्व गोष्टीत कुसुम सुसंस्कारित झाली होती. कुसुमला बघता बघता सहा वर्षे पूर्ण झाले होते. या वर्षी शाळेत टाकावे लागणार म्हणून कुसुमच्या आजोबांनी गुरुजीशी तसे बोलून पण ठेवले होते. पावसाळा सुरू झाला होता. धो....! धो....! पडणाऱ्या पावसा बरोबरच लहान मुलांना आनंद देणारी शाळाही सुरू झाली होती. कुसुमच्या आजोबांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत जाऊन कुसुमचे नाव गुरुजीकडे नोंदवुन दिले. गुरुजींनी कुसुमला नाव विचारून बोलते केले. खूपच गोड मुलगी आहे कुसुम....! हरणे काका अगदी तुमच्यावर गेली नात....! असे म्हणून,  “ गुरुजींनी कुसुमचे तोंड भरून कौतुक केले.’’  खूप हुशार आहे मुलगी....! एक दिवस नाव मोठे करेल तुमचे....! नातीच्या हुशारीने आजोबांच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी का होईना....! पण थोडा आनंद झळकला होता. शाळेत नाव दाखल होताच कुसुमला गुरुजींनी नवीन पुस्तके, पाटी व लेखणी दिली. कुसूम खूप आनंदी झाली होती. आता नियमीत कुसुमची शाळा सुरू झाली. दिवसभर शाळेत नवनवीन गोष्टी शिकायच्या, घरी आले की आजोबांना ते सांगायचे. शाळेत गुरुजी, घरी आजोबा या दोघांच्या शिकवणीने कुसुम लवकरच लिहायला व वाचायला शिकली होती. गणितातही सर्व क्रिया करू लागली. शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान पक्के झाले होते. घरातील कोणीही कोणतेही काम सांगितले की, कुसुम पळत-पळत काम पूर्ण करायची. स्वतःतील नम्रपणा, बोलण्यातील गोडवा, अभ्यासातील हुशारी यामुळे कुसुम घरीदारी सर्वांची लाडकी कौतुकास पात्र ठरत असे. आईवडिलांची उणीव आतापर्यंत कुसुमला घरच्यांनी भासू दिली नाही. आई वडीला वाचून पोरकी असल्यामुळे तिचे फक्त लाड होत असे. तिच्यावर कधीच कुणी रागवत नसे. कुसुम सुध्दा तशी वेळ कधी येऊच देत नव्हती. बघता बघता कुसुम चौथी पास झाली. वर्गातून प्रथम आली व शिष्यवृत्तीची परीक्षाही पात्र झाली. म्हणून गुरुजींनी हरणे काकांच्या घरी भेट देऊन कुसुमचे कौतुक केले. गुरुजी घरी येऊन कुसुमचे कौतुक करतात. यामुळे कुसुमचा सर्वांना अभिमान वाटला. आजी आजोबा, मामा मामीच्या संस्काराने व शाळेतील गुरुजीच्या शिक्षणाने कुसुम परिपूर्ण होत होती.

               बघता बघता कुसुम एस.एस.सी, एच.एस.सी मध्ये प्रथम आली. कुसुमने आपल्या पहिल्या नंबरची परंपरा कायम ठेवली होती. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली. शिक्षण, संस्कार, समजुतदार पणा याबरोबरच सौंदर्यानेही ती अधीक बहरली होती. तारुण्यातील नवचैतन्य तिच्या चेहर्‍यावर झळकत होते. पण मुळात संस्कारी असलेली कुसुम आपल्या वयाने व सौंदर्याने भाळून न जाता या वयातही स्वतःची पायरी ओळखून वागत असे. आतापर्यंतच्या प्रवासात तिने खूप यश मिळवले होते. पण आयुष्यात खुप काही गमावले सुद्धा होते. जन्मानंतर चार महिन्यात आईवडील गमावले होते. त्यांचा चेहरा ही तिला आठवत नव्हता. पुढे दहावीत असतांना ज्यांनी आई-वडीला प्रमाणे सांभाळले ते आजी-आजोबाही एका पाठोपाठ तिला कायमचे सोडून गेले. ती इतरांसाठी नशीबवान वाटत होती. पण स्वतःसाठी मात्र कम नशिबी होती. आता आजी आजोबांच्या पश्च्यात कुसुमची जबाबदारी मामा व मामीवर पडली. मामांनी कुसुमच्या पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. व कुसुमच्या लग्नासाठी एखादा चांगला मुलगा शोधणे सुरू केले. आई-वडील व बहिणीच्या मनाला शांती लाभावी असे कुसुम चे थाटामाटात लग्न करण्याचे मामाने मनाशी पक्के केले होते. स्थळ शोधण्याची मोहीम सुरू झाली अनेक ठिकाणी मामा जाऊन आले. पण त्यांना योग्य असे स्थळ मिळत नव्हते. एके दिवशी कुसुमच्या मामीच्या नातलगातील एका स्थळाचा निरोप आला. मामांनी लगेच दोन चार दिवसात येतो म्हणून निरोप दिला. मामा व त्यांचा सोबती दोघेजण मुलगा बघून आले. मामांना मुलगा खूप आवडला होता. त्यादिवशी मामांनी कुसुमला जवळ बोलावून घेतले. मामा कुसुमला मुलाविषयी सांगू लागले. बघ कुसुम मुलगा कोकणातीलच आहे. खेड जवळच त्याचे छोटेसे गाव आहे. गावावर शेती आहे त्यांचा तिथे मोठा वाडा आहे. काजूच्या व आंब्याच्या खूप मोठ्या बागा आहेत. मुलगा पुण्याला शिकत होता तो आता इंजिनियर होऊन मुंबईला मोठ्या कंपनीत नोकरी करत आहे. मुलगा दिसायलाही खूप सुंदर आहे. त्याचे आई-वडील गावाकडेच राहतात. त्यांना मात्र मुलगी शिकलेली व दिसायलाही सुंदर पाहिजे. लग्नानंतर मुलगा मुलीला मुंबईला सोबत नेणार आहे. त्यामुळे मुलगी शिक्षणा बरोबरच संस्कारित व शहरात अॅडजेस होणारी पाहिजे. त्यांना मी तुझ्याविषयी सर्व खरी खरी माहिती सांगितली. त्यांना स्पष्ट सांगून आलो मुलगी बघतांना तुम्हाला काय विचारायचे ते विचारा. आमची कुसुम लाखात एक आहे. जसा शिंपल्यातील मोती चमकावा तशी ती सर्व ठिकाणी स्वतःच्या संस्कारांनी चमकत असते. ‘‘ माझ्या राधिकाताईच्या काळजाचा तुकडा आहे तो.....! ” तुम्हाला नक्कीच आवडेल....! दोन दिवसांनी बघायला येणार आहे असा निरोप पाठवला त्यांनी....! आजच निरोप मिळाला. कुसुम हे ऐकतच मामाच्या समोर बसून होती. तिचे डोळे एकदम भरून आले. लहानपणी आई वडील गेले. निट आईचा चेहरा तिला आठवत नाही. पण आई-वडिलांच्या आठवणीने मात्र ती कधीकधी खूप अस्वस्थ होत असे. मामाने तिला जवळ घेत तिचे डोळे पुसले. वेडी आहेस का तु....? असे रडायला काय झाले. मुलगा नुसता बघायला येतोय....! उद्याच काही घेऊन जाणार नाही. आणि हो....! तसंही मुंबईमध्ये राहायला नशीब लागतंय....! मुंबई काही साध्यासुध्या लोकांचे शहर नाही. येथे राहायला पैसा व ज्ञान दोन्ही लागते. मध्येच मामी म्हणाली, “ आपली कुसुम काय अशिक्षित आहे का? ” ती एवढी शिकली, संस्काराने या कुटुंबात वाढली, कुणाला अशी सुसंस्कारित मुलगी आवडणार नाही. आमच्या कुसुम बाईंना आधी मुलगा तर बघू द्या....! त्यांना आवडला....? तरच पुढचे पुढे बघू....! मुंबईत माणसंच राहतात. यंत्राची पुतळे नाही. कुसुम व मामा दोघेही मोठ्याने हसतात. मामा कुसुमकडे बघून म्हणतात, “ तुझी मामी म्हणजे आपल्या घरची बॉस...! ” ती आपल्या दोघांना बोलण्यात ऐकणार नाही.

                पाहुणे येणार म्हणुन मामाने घराची साफसफाई करून घेतली. घरासमोरील बाग, अंगणातील केरकचरा वेचुन घेतला. आजी आजोबा गेल्यापासून घराला घरपण राहिले नव्हते. जणु घरातील नवचैतन्य हरवले होते. आज कितीतरी दिवसांनी संपूर्ण घराची स्वच्छता झाली. आज पाहुणे येणार म्हणून कुसुमने सकाळीच तयारी केली. खेड वरुन पाहुणे आले, त्यांनी कुसुमला बघितले. तिला अनेक प्रश्न विचारले जवळ जवळ एक तास कुसुमची परीक्षा घेतली. कुसुमने मात्र त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक दिली. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. मुलाने जाताजाता कुसुम पसंत असल्याचे सांगून टाकले. पुढील बोलणी तुम्ही माझ्या आई बाबा सोबत करून घ्या. लग्नाचा काय मानपान असेल तो ठरवून घ्या. असे अजयराव  यांनी सांगितले. मामांनी व अजयच्या आई-वडिलांनी लग्नाची बोलणी करून लग्नाचा मुहूर्त ठरवला. ठरलेल्या मुहूर्तावर कुसुम व अजयचे थाटामाटात लग्न पार पडले. कुसुम जन्म झाल्यापासून एक दिवस वाडा सोडून गेली होती. त्यानंतर परत ती कधी या वाड्याला सोडून गेली नाही. आज मात्र अजय सोबत कायमची हा वाडा सोडून सासरी निघाली होती. मामांना कुसुमच्या बालपणाची आठवण झाली. मामा मोठ्याने रडू लागले. कुसुमला पोटच्या गोळ्याप्रमाणे जिवापाड जपले होते. कुसुमच्या वीस वर्षाच्या आयुष्यात कधीही कुसुमला रागवायचे काम पडले नाही. एवढी गुणी व सर्वगुणसंपन्न  माझ्या आयुष्यातील मोती मी आज तुम्हाला देत आहे. तिला जीवापाड जपा असे अजय रावांना सांगून मामा पुन्हा रडायला लागले. सर्वांनी जड अंतकरणाने कुसुमला वाटे लावले. सासरी आल्यावर सर्वांशी ओळख झाली. लग्नाचा मानपान सोहळा पार पडला. यात जवळजवळ पंधरा दिवस लोटले होते. अजयच्या  सुट्ट्या संपल्या होत्या, त्यामुळे अजय व कुसुम मुंबईला निघून आले. कुसुमने स्वतःचा संसार थाटामाटात उभारला होता. कोकणातील एका छोट्या खेड्यात जन्मलेली ही मुलगी, आई बापा वाचून मामाकडे राहिली. शिक्षण, व संस्काराने नटुन मोठी झाली. आज एवढ्या मोठ्या मुंबई शहरात वास्तवास आली होती. लहान पणापासून हुशार, प्रामाणिक, सुसंस्कारित असल्यामुळे ती मुंबईला सहज रमून गेली. अजय व कुसुम यांचे विचार खूप जुळत होते. कुसुम कोकणातील एका खेड्यातील असूनही विचारांनी व ज्ञानाने पुढारलेली आहे. ती नेहमी आपल्याला प्रत्येक कामात भक्कम साथ देते. नेहमी चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करते. या सर्व गोष्टीमुळे अजयला तिचा खूप अभिमान वाटत होता. हसत खेळत संसाराची सहा महिने कधी निघुन गेले हे दोघांनाही कळले नाही. अजय काम करत असलेल्या कंपनीला खूप मोठा नफा झाल्यामुळे कंपनीच्या मालकाने  मुंबईतील एका मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. यासाठी कंपनीतील मोठ्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकुटुंब पार्टीचे निमंत्रण दिले होते. अजय सुद्धा या कंपनीत मोठ्या पदावर काम करत होता. त्यामुळे सहकुटुंब पार्टीचे निमंत्रण मिळाले. अजय त्यादिवशी कंपनीतून घरी आल्या आल्या त्यांने ही आनंदाची बातमी कुसुमला सांगितली. तिलाही खूप आनंद झाला. खूप दिवसांनी दोघांना कुठेतरी बाहेर एन्जॉय करता येणार होता. माझा नवरा कंपनीत प्रामाणिक व धडपडीने काम करतो. कंपनीच्या नफ्यात माझ्या नवऱ्याचा वाटा आहेच की....! याशिवाय थोडीच हे निमंत्रण मिळाले....! मी नटून थटून माझ्या नवऱ्या सोबत पार्टीला जाणार आहे. कुसुम आज मोठ्या थाटात बोलत होती. कुसुमबाई साहेब नक्की या....! तुम्ही आम्हाला रोज रोज आनंदाने कंपनीत पाठवता ना....! त्यामुळेच तर कंपनीच्या मालकांनी तुला सुद्धा निमंत्रण दिले. कुसुम चिडुन बोलली. बस आता....!  पुरे झाले कौतुक....! हात धुऊन लवकर तयार व्हा. मी जेवायला ताट वाढते.

            शेवटी कंपनीच्या कार्यक्रमाचा दिवस उजाडला. आज कंपनीला सुट्टी होती सर्व कर्मचाऱ्यांना सायंकाळी पार्टीच्या ठिकाणी येण्याचे निमंत्रण होते. त्यामुळे अजयराव आज खूप वेळ झोपून होते. रोज मात्र सकाळीच उठून तयारी करावी लागत असे. वेळेचे सेकंदा सेकंदाला महत्त्व आहे या मुंबईत....! आमच्या कोकणात तासन तास वाया गेला तरी कुणी टेन्शन घेत नाही. ही मुंबई म्हणजे लोकांचा श्वास आहे. इथे कोण झोपते व कोण उठते हे कळतच नाही. मुंबई मात्र चोवीस तास जागीच असते. सायंकाळी मी व अजय छान तयारी करून पार्टीसाठी निघालो. खूप दिवसांनी सायंकाळी नटून थटून आम्ही दोघे बाहेर पडलो होतो. झगमगत्या दुनियेत प्रत्येक जण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. येथे बाह्यरूपालाच जास्त किंमत आहे. शेवटी आम्ही दोघे जण कंपनीच्या पार्टी मध्ये पोहोचलो. खूप आलेशान महागड्या हॉटेल मध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांसाठी बसण्याची, जेवणाची, फोटो काढण्याची, नाचण्याची, गप्पागोष्टी करण्याची सर्व प्रकारच्या व्यवस्था येथे करण्यात आल्या होत्या. माझे व अजयरावांचे नवीन लग्न झालेले असल्यामुळे अनेक जण माझी ओळख विचारत होते. यांच्या कंपनीतील अनेक सहकारी मित्र लग्नाला आलेले नव्हते. त्यामुळे प्रत्येकाला मला बघण्याची उत्सुकता होती. अजय माझी सर्वांशी ओळख करून देत होते. आता पार्टीच्या हॉलमध्ये गर्दी जमली होती. जो तो आपापल्या ओळखीने मित्रांशी सहकुटुंब गप्पा मारत बसले होते. थोड्याच वेळात कंपनीचे मालक सर्वांना मार्गदर्शन करणार होते. अजय मला घेऊन त्याठिकाणी असलेल्या अनेक नविन गोष्टी दाखवत होता. अचानक माझ्या पायाला काही तरी टोचल्याचे मला भासले. मी खाली वाकून पायाला काय टोचले म्हणून बघितले तर माझ्या पायाजवळ गळ्यातील  एक हार पडलेला मला दिसला. मी तो उचलुन हातात घेतला. बघते तर अतिशय सुंदर नक्षी असलेला तो महागडा हार असावा....! कुणीतरी श्रीमंत बाईचा तो असेल.....! मी पटकन तो हार अजयजवळ दिला. अजयला कुतूहल वाटले येवढ्या घाईत जो तो एन्जॉय करण्यात व्यस्त आहे. तुला कसा काय? हा हार सापडला....! कुसुम एक मिनिट इथेच थांब....! मी हाराविषयी माईकवरुन जाहीर करतो. कुणाचा असला तर? त्यांना लगेच परत करता येईल. असे म्हणून अजय माईक जवळ गेला. माईक हातात घेऊन सगळ्यांना शांत राहण्याचा त्यानी इशारा केला. हॅलो फ्रेंड्स....! प्लिज एक मिनिट लक्ष द्या. एक महागडा लेडीज  हार माझ्या पत्नीला सापडला आहे. कुणाचा असेल तर प्लीज घेऊन जा. हॉलमधील सगळेजण आवाजाच्या दिशेने बघू लागले. तेवढ्यात तेथील एक नोकर पळतच आला. “ साहेब हा हार बाईसाहेबांचा आहे. ”  मी एकदम आश्चर्यचकित झालो. कुसुमला चक्क कंपनीच्या मालकाच्या पत्नीचा हार सापडला होता. त्या मॅडमही आमच्या कंपनीत सीईओ म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी लगेच चौकशी करून मला व  कुसुमला स्टेजवर बोलावून घेतले. मॅडमच्या हातात माईक होता. आम्ही दोघेही स्टेजवर पोहोचलो. मॅडमनी सर्वांना हॅलो नमस्ते....! म्हणून इशारा केला. सगळा हॉल आता शांत झाला होता. मॅडम एकट्याच बोलत होत्या. लक्ष द्या...! आज माझा पन्नास लाखाचा हिऱ्याचा हार दोन तासापूर्वी हरवला होता. कदाचित तो आता पुन्हा सापडणार नाही या चिंतेने मी अस्वस्थ होते. पण काय आश्चर्य आहे?...! तो आपल्या कंपनीच्या अजय साहेबांच्या पत्नीला सापडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता हा हार परत केला. एवढे प्रामाणिक माणसं आपल्या कंपनीत काम करतात हे आमचे भाग्यच आहे. मी अजय व त्यांच्या पत्नीचे मनापासून स्वागत करते. हिऱ्याच्या हारापेक्षा सुसंस्कारीत मोत्यासारखी अजय व कुसुमच्या रूपाने संस्काराचे दोन मोती आज मिळाले. त्याचा अधिक आनंद मला झाला आहे. माणूस कुठे जन्माला आला याला महत्त्व नाही. शहर, गाव यापेक्षा संस्कार महत्त्वाचे आहेत. कुसुम सारखा संस्काराचा मोती प्रत्येक घरात जन्माला  यायला पाहिजे. मी पुन्हा एकदा दोघांचे अभिनंदन करते व त्यांना धन्यवाद देते. आज कुसुममुळे पुन्हा एकदा माझी मान उंचावली होती.  ती तिच्या अंगी असलेल्या ‘ संस्काराने ’….! याचा मला खूप आनंद झाला. 

✍✍✍✍✍

लेखक

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852



Tuesday, 22 September 2020

पाऊलवाट

               पाऊलवाट (लघुकथा) 

दिवस मावळतीला आला होता. अंगणातील वडाच्या झाडावर नेहमी प्रमाणे पक्षांनी जमायला सुरुवात केली होती. सर्व पक्षी वडाच्या झाडावर आले की, त्यांची किलबिलाट सुरू होत असे. हे पक्षी जणू आमच्या घरातील सदस्य झाले होते. मी घरातून ओंजळभर दाणे आणून अंगणात टाकले. तसे हळूहळू वडाच्या झाडा वरील पक्षांनी अंगणात दाणे टिपायला सुरुवात केली. मोहनच्या बाबांची वाट पहात मी दरवाजातच उभी होते. मोहनचे बाबा तालुक्याच्या गावाला एका शेठजिकडे कामाला होते. ते रोज सकाळी कामावर जात असे व सायंकाळी मिळेल त्या वाहनाने घरी येत असे. आज त्यांना कामावरून यायला जास्तच वेळ झाला होता. एरव्ही दिवस मावळायच्या दोन तास आधी ते घरी येत असत. आज मात्र दिवस मावळायला आला तरी त्यांचा काहीच पत्ता नव्हता. मी बराच वेळ त्यांची वाट पहात दरवाजातच उभी राहिले. अंधार पडू लागला तशी माझी चिंता मात्र अधिकच वाढू लागली. मी निराश होऊन स्वयंपाक घरात आले व स्वयंपाक करत बसले. आधीच त्यांना यायला उशीर त्यात स्वयंपाक उशिरा म्हटल्यावर ते परत रागावतील. मी पटपट स्वयंपाक करू लागले. मी हळूच मोहनला आवाज दिला. मोहन बाहेर अंगणात लक्ष ठेव तुझे बाबा येतीलच येवढ्यात. तुझा अभ्यास करत बस. दिवसभर शाळेत काय शिकवले ते पहा जरा. शाळेतून आल्यापासून नुसता खेळत असतो. जरा अभ्यासाकडे लक्ष दे, नाहीतर तुझ्या बाबा सारखे तुलाही रोजच तालुक्याला कामाला जावे लागेल. मोहन चिडचिड करतच अभ्यासाला बसला. इतरवेळी घरात मोहन व त्याचे बाबा खूप मस्ती करत बसतात. मोहनला फक्त मस्ती करायला पाहिजे. अभ्यासाचा खूपच कंटाळा करतो. असे मी माझ्या मनाशीच बोलत होते. माझा स्वयंपाक आटोपला मी परत घराच्या दरवाज्यात येऊन उभी राहिले. आता मात्र सर्वत्र अंधार पडला होता. रात्र सुरू झाली होती. गावातील सर्व लाईट सुरु झाली होती. गाव विजेच्या लख्ख प्रकाशाने उठून दिसत होते. रात्र झाली तरी गल्लीतील मुले मात्र रस्त्यावर गोंधळ करत होती. मी घरात, दारात चकरा मारत होते. माझे कशातच लक्ष लागत नव्हते. मनात नाही....! नाही....! त्या शंका येत होत्या. आता बराच उशीर झाला होता. मी मोहनला जेवु घातले व त्याला झोपायला सांगितले. तो थोड्यावेळातच झोपी गेला. दारात येऊन पाहते तर गल्लीत काळं कुत्रंही जागं नव्हतं. सर्व गाव सामसूम निपचित पडलं होतं. गावातील लोकं जेवण करुन आपापल्या घरी शांत झोपी गेले होते. एरव्ही देवळात अर्ध्या रात्रीपर्यंत भजन चालत असते. आज मात्र देऊळही शांत शांत आहे. पूर्ण गावात जणू मीच एकटी जागी आहे. आज मी माझ्या मनाशी बोलत होते. मोहनचे बाबा अद्यापही आले नाही या चिंतेने मी फार अस्वस्थ झाले होते. आता मला फार भीती वाटू लागली होती. मी दरवाजा लावून घेतला व घरात एकटीच एका कोपर्‍यात रडत बसले. माझ्याकडे रडण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. मी एवढ्या रात्री मोहनला सोडून त्यांना बघायला सुद्धा जाऊ शकत नव्हते. मोहन बिचारा छोटा असल्यामुळे जेवून बाबांची वाट पाहत पाहत झोपी गेला. मला मात्र मोहनच्या बाबांची चिंता झोपू देत नव्हती. मी शेवटी थकून अंथरुणावर पडले. मला डोळा लागणार तेवढ्यात, दाराची कडी वाजली. टकटक....! टकटक....! असा दोनदा-तीनदा आवाज आला. मी पटकन उठले व दाराची कडी उघडण्यासाठी दारावर गेले. क्षणभर विचार केला नेमकी कोण असेल? एवढ्या रात्री मोहनचे बाबा नसले तर....! आपण घरात एकटेच आहोत. काय करावे? कसे करावे? या विचारात पडले. तेवढ्यात परत दरवाजाचा टकटक....! टकटक....! असा आवाज आला. मी कशीतरी हिंमत करुन हळूच विचारले. कोण आहे ? बाहेरून हळू आवाज आला. अग मीच आहे....! उघड लवकर....! मीच आहे म्हणाले, पण आवाज मात्र वेगळाच वाटतो. परत मी विचारले? मोहनचे बाबा का? हो....! हो....! मीच आहे गं....! उघड लवकर....! मी पटकन दरवाजाची कडी उघडली. एकदम मोहनच्या बाबाकडे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आकाशात वीज चमकावी तशी अनेक प्रश्नांची वीज माझ्या मेंदूत चमकली. मी प्रचंड घाबरले. मोहनचे बाबा रक्ताने भरले होते. डोक्यातून प्रचंड घळाघळा रक्त वाहत होते. अंगातील कपडे फाटले होते. संपूर्ण अंगाला वरखंडे लागले होते. पायात काहीच नव्हते ते अनवाणी पायी, रक्ताने माखलेल्या अवस्थेत माझ्या समोर उभे होते. त्यांना बघून माझ्या तोंडातून शब्दच फुटेना, घसा जणू कायमचा बंद झाला होता. मी थरथरत्या हाताने मोहन च्या बाबांना पकडले. काय झाले तुम्हाला....! हे .... कसं.... काय.... झाले. मी त्यांना घाबरलेल्या अवस्थेत बाहेरच प्रश्न विचारत बसले. त्यांना घरात घ्यायचे भानच मला उरले नव्हते. मी एकदम भानावर आले त्यांना पटकन घरात घेतले. दाराची आतून कडी लावली. त्यांना पटकन एक ग्लास पाणी आणून पाजले. घरातील सुती कपडे आणुन  त्यांचे डोके पुसले. सुती कपड्याचा काठ फाडून त्यांच्या डोक्याला पट्टी बांधली. अंगातील फाटके, रक्ताने भरलेले कपडे बदलून घेतले. त्यांचे रक्ताने माखलेले अंग पुसले. त्यांना गरम चहा करून पाजला. मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते. पण अवस्थाच अशी होती की, मी त्यांना यावेळी प्रश्न विचारून परत गोंधळात टाकू शकत नव्हते. त्यामुळे मी त्यांना एकही शब्द न बोलता गादीवर आराम करायला सांगितले. घरातील आंबी हळदीचा खडा उगाळून तो गरम पाण्यात शिजवून घेतला. हातापायावर, डोक्यावर, मार लागलेल्या ठिकाणी शिजलेली गरम अंबी हळद लावू लागले. त्यांची अवस्था पाहून एका डोळ्यात पाणी, तर एका डोळ्यात घरी सुखरूप आल्याचा आनंद झळकत होता. मी हळूच त्यांना म्हणाले आराम करा आता सकाळी बोलू. तुमची अवस्था बघवत नाही हो मला....! देवाने असे कसे केले तुमच्यासोबत....! असे बोलून मी स्वयंपाक घरात जाऊन ढसाढसा रडू लागले. पदराचा बोळा तोंडात दाबुन धरला तरी रडण्याचा हुंदका मला आवरेणासा झाला होता. आज माझ्या कपाळाच्या कुंकावरच घाव घातला होता. मोहनचे बाबा अतिशय शांत स्वभावाचे, कधी कुणाशी वैर नाही. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे, मनाने अगदी प्रामाणिक व कष्टाळू हा माणूस कधीच कुणाचे वाईट चिंतीत नाही. आज यांच्यासोबत काय झाले असेल?. माझे मन मात्र विचारांच्या काहूराने सुन्न झाले होते. रात्र खूप झाली होती. आज अन्नाचा घास आमच्या दोघांच्या पोटात गेला नाही. मी केलेला स्वयंपाक तसाच पडून होता. परमेश्वरा सकाळी सकाळी कुणाचे तोंड बघितले कुणास ठाऊक. आजचा हा वाईट दिवस आमच्या आयुष्यात कुणीकडुन आला. आम्ही परिस्थितीने गरीब होतो. पण कधीच कुणापुढे लाचार होऊन हात पसरत नव्हतो. मोहनच्या बाबांनी मला सुद्धा स्वाभिमानाने जगायला शिकविले होते. त्या दिवशी मला विचारा विचारात कधी झोप लागली कळलेच नाही.
                          सकाळी उठल्याबरोबर मी अंगणात झाडून शेणाचा सडा टाकला. दारात रांगोळी काढून घरात आले. मोहन व त्याचे बाबा अध्यापही  झोपूनच होते. एरव्ही सकाळी उठून कामावर जाण्यासाठी घाई करणारे मोहनचे बाबा आज मात्र शांत पडून होते. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हळूच आवाज दिला. अहो....! उठता का? ते मात्र निपचित पडून होते. त्यांच्या डोक्याला खूप मार लागलेला असावा? त्यांना काहीच  सुचत नव्हते़. दिवस उगवुन खूप वेळ झाला होता. बाहेर कडक ऊन पडले होते. मी घरातील कामे आवरून परत त्यांच्या जवळ जाऊन त्यांना उठवले. माझ्या मदतीने ते कसेबसे उठले .चहा पाणी झाला ते मला घडलेला सर्व प्रकार सांगू लागले. लक्ष्मी मी आज कामावर गेल्यावर सकाळीच मालकांनी मागच्या महिन्याचा पगार देतो म्हणून सांगितले होते़. मालक मला म्हणाले, प्रसाद जाताना तुझा मागच्या महिन्याचा पगार घेऊन जा. मी त्यांना हो म्हणालो, व माझ्या कामाला लागलो. दुपारी मालक जवळ येऊन सांगु लागले. प्रसाद आज मात्र काम थोडे जास्त आहे. तुला थोडा वेळ होईल. हरकत नसेल तर....! एक तास शिल्लक थांबून तेवढे काम संपून जा. मी त्यांना मान हलवुन हो म्हणालो व माझ्या कामाला लागलो. दिवसभर रोजच्या प्रमाणे काम केले परंतु आज मालकाने सांगितलेले  शिल्लक काम केल्यामुळे मला उशीर झाला. मी मालकाला काम संपल्याचे सांगून निघालो. पण तेवढ्यात मालकांनी मला आवाज दिला. मागील महिन्याच्या पगाराचे पाकीट माझ्या हातात देऊन मालक म्हणाले प्रसाद पैसे संभाळून घेऊन जा. मी मान हलवून हो म्हणालो व  तिथून निघून आलो. रोजच्याप्रमाणे बस स्टँडवर आलो खरा, पण आपल्या गावी येणारी गाडी निघून गेली होती. मी थोड्या वेळ इकडे तिकडे विचारपूस केली पण कोणतेच वाहन काही मिळेना. उशीर झाल्यामुळे आपल्या गावातील सर्व वाहने गावी निघून आली होती. आपल्या गावाला यायला एक पाऊल रस्ता आहे. त्याने वेळही कमी लागतो व आंतरही कमी आहे. या रस्त्याने आपण घरी जाऊया असे मी ठरविले. परत गाडीची वेळ पहात बसलो तर अंधार जास्त होईल म्हणून मी त्या पाऊल रस्त्याने निघालो. आपल्या गावातील अनेक जण गाडी नाही मिळाली की याच पाऊलवाटेने तालुक्याला ये जा करत असतात. आम्हाला लहानपणी तालुक्याला यायला जायला हिच पाऊलवाट होती. रात्री मात्र अंधार पडल्यावर सहसा कोणी या पाऊलवाटेने येत नाही व जात नाही. कारण ही पाऊलवाट एकदम दाट झाडीतून व डोंगर रांगेतून जाते.त्यामुळे लोकांना चोरांची भीती वाटते. मी विचार केला आपल्यासोबत कुठे लेडीज आहे? लहान मुलही नाही. आपल्या एकट्याला कोण खाणार....! म्हणून मी लगबगीने पाऊलवाटेने घराकडे यायला निघालो. रस्त्याने थोडा अंधार पडला होता. पाऊलवाट असल्यामुळे कोणी येणार जाणार दिसत नव्हते. मी मात्र घरी येण्याच्या घाईने पटापट माझ्याच विचारात चालत होतो. तेवढ्यात अचानक माझ्यासमोर दोन-चार माणसं आली. त्यांनी मला अडवले. कोण कुठला? नाव गाव विचारले. मला वाटले नविनच वाटसरू असावे. त्यामुळे माहिती विचार असावे. त्यांनी मला थोडावेळ तिथेच गप्पा मारत उभे केले. आजूबाजूला कोणीच नव्हते अगदी सामसूम शांत वातावरण होते. ही माणसे कुठली? अचानक कुठून माझ्यासमोर आली. कशा साठी यांनी मला इथे थांबवले. हा विचार मी मनात करतच होतो. तोच एका व्यक्तिने माझ्या डोक्यात जोरात काठी मारली. मला खाली पाडले व माझ्या जवळ काही  पैसे , सोने, महत्वाच्या चीजवस्तू  आहेत का? ते तपासु लागले. मला एकदम मालकाने दिलेले पगाराचे पाकीट आठवले. आता आपल्या खिशातील पैसे जाणार म्हणून मी त्या माणसांशी खूप झटापट करु लागलो. मी त्यांना खिशातून पैसे घेऊच दिले नाही. त्यामुळे ती माणसे खूप चिडली व त्यांनी मला मारायला सुरुवात केली. त्यांनी मला लाथा, बुक्या, काठीने मारले. माझ्या खिशातील पैसे काढून घेतले व ती पळून गेली. मी मोठ मोठ्याने ओरडत होतो. वाचवा....! वाचवा....! कुणीतरी मला वाचवा.....! पण रात्रीची वेळ होती. पाऊलवाट सामसूम होती. कोणीही मला वाचवायला येणार नव्हते. मला डोक्यात काठी लागल्यामुळे बहुतेक चक्कर आली असावी. मी तिथेच खाली कोसळून पडलो. मला काय होत आहे हे समजलेच नाही. मी खूप वेळ तिथेच पडून होतो. थोड्यावेळाने डोकं थंड गार पडले. रक्ताने माझे डोके, तोंड, कपडे भरले होते. मला जाग आली तेव्हा मी, हळूच उठून पाहतो तर अंधारात मी एकटाच रस्त्यात पडून होतो. मी कसाबसा उठलो हळूहळू त्या पाउलवाटेने घराकडे निघालो. डोक्याला मार, हातापायांना मार, संपूर्ण अंग झोडपल्यावाणी झाले होते. माझ्या डोक्यातील रक्त गेल्यामुळे मला काही सुचत नव्हते. मी खूप थकल्यासारखा झालो होतो. मला खूप तहान लागली होती पण जवळपास अंधारात पाणी कुठेच मिळणार नव्हते. मी फक्त घरी येण्यासाठी एकेक पाऊल टाकत पुढे पुढे चालत होतो. मला मोहन व तुझी खुप आठवण येत होती. मोहनच्या बाबांना ही सर्व कहाणी सांगता सांगता खूप घाम आला होता. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव दिसत होते. मला तर ही सर्व हकिगत ऐकून चक्कर आल्यासारखे झाले. ते रात्रीचे चोर कसले....! दरोडेखोर म्हणा की....! त्यांनी तुम्हाला पैशासाठी मारले  व पैसेही घेऊन पळाले. दगडाच्या काळजाची माणसं कुठली....! पैशासाठी त्यांना माणसाचा जीव सुद्धा परका होतो. पैशासाठी माणसाच्या जीवावर उठणारी ही भूतच म्हणा की....! मोहनच्या बाबांच्या या अवस्थेतेमुळे मी रागाच्या भरात मोठ्या मोठ्याने बोलत होती. जाऊद्या पैशापेक्षा तुमचा जीव वाचला....! हे महत्त्वाचे आहे. पैसे काय कधीही कमावता येईल. तुम्ही  पटकन चला गावातील डॉक्टरला दाखवून गोळ्या औषध घेऊन येऊया. डोक्याला पण डॉक्टर पट्टी करून देईल. आता आठवडाभर कुठेच जायचे नाही. घरातच आराम करत बसा. तुमच्या त्या दीड शहाण्या मालकाला निरोप पाठवून सांगा. तुम्ही येणार नाही ते....! आणि हो....! घडलेली हकीगत होऊ द्या त्याला माहित. नाही तर त्याला वाटेल पगार मिळाला म्हणून घरीच मौजमजा करत बसले. त्यांनी एक तास जास्तीचे काम लावले नसते, तर हे सर्व घडलेच नसते. ‘‘ लक्ष्मी मालकावर  चिडून काय फायदा ’’ त्यांचा यात काय दोष आहे. त्यांनी आपल्याला जास्तीचे काम सांगितले तर मालक पगाराव्यतिरिक्त थोडे पैसे शिल्लक देतात. आणि हो....!  त्यांना माहित असते असे होणार आहे तर त्यांनी कशाला थांबवले असते. आपलेच नशीब खराब आहे. महीना भराची कमाई गेली वरून असा जीवघेणा हल्ला झाला. देवाची पुण्याई कामी आली बघ म्हणून मी वाचलो. नाहीतर त्या पाऊलवाटेवर मला सकाळ पर्यंत जाग आली नसती तर कदाचित मी कधीच घरी येऊ शकलो नसतो. तू नेहमी म्हणतेस ना....! देव आपल्याला काहीच मदत करत नाही. बघ....! आज देवाने तुझी हाक ऐकली....! माझ्या मदतीला देवच धावून आले बघ....! देवानेच मला त्या हल्ल्यातून वाचवले. मोहनचे बाबा माझी समजूत काढत होते. पण मला त्या मालकाचा रागच आला होता. गरिबीने आमच्या वाट्यावर हे दिवस आले होते. परिस्थिती माणसाला मजबूर बनवते. ते असे....! मी मनातल्या मनात पुटपुटत देवघराजवळ  गेले. देवाला हात जोडून  विनंती करू लागले. देवा माझ्या कुंकवाला असेच बळ दे....! माझ्या कुंकवाला नीट सांभाळ....! तुझी कृपा आमच्यावर सदैव राहू दे....! तुझ्या कृपेने आज मोठ्या संकटातून मोहनचे बाबा वाचले. मी देवाला आरती लावुन ओवाळले. आरतीचे ताट घेऊन मोहनच्या बाबांना आरती दिली. यापुढे आता कधीच त्या पाऊलवाटेने येऊ नका. मी मोहनच्या बाबांना खडसावून सांगितले. हो....! गं....! लक्ष्मी मी यापुढे नाही येणार मोहनच्या बाबांचे हे शब्द ऐकुन मला जरा बरे वाटले.

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852

Wednesday, 16 September 2020

झाडे लावा ; झाडे जगवा !

                        

             झाडे लावा ; झाडे जगवा ! 

      

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |

पक्षीही सुस्वरे आळविती ||

येणे सुख रुचे एकांताचा वास | 

नाही गुणदोष अंगी येत ||

संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून सजीवातील प्राणी व वनस्पती या दोन्हींचा एकमेकांशी असलेला संबंध व्यक्त केला आहे. वृक्ष हे सजीव आहेत. त्यांची वाढ होते. त्यांना अन्न, पाणी व हवेची गरज आहे. माणसापेक्षा वृक्ष अधिक चांगले व इमानदार आहे. त्यांचे जीवन परोपकारी आहे. माणूस मात्र स्वार्थी व क्षणिक सुखाच्या लोभाचे जीवन जगत असतो. एक छोटेशे रोपटे लावले, त्याची योग्य निगा राखली, त्याला खत पाणी घातले की, त्या झाडाची व्यवस्थीत वाढ होते. ते झाड मोठे झाल्यावर फुल, फळ, सावली देते. स्वतःचा मोठा विस्तार झाल्यावर सावलीच्या रुपाने अनेकांना आधार देते. गोड फळाच्या रूपाने प्रत्येकाच्या मुखात गोड स्वाद भरवते. पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखण्याचे काम झाडे करतात. प्रदूषण रोखणे, जमिनीची धूप, पाऊस पडणे अशा पर्यावरण विषयक समस्या सोडवण्यासाठी झाडांची महत्त्वाची भूमिका असते. आपण पाहतो समाजात एखाद्या व्यक्तीवर कितीही उपकार करा त्याला अडीअडचणीत मदत करा एक दिवस तो बदलेल सर्व उपकार विसरून जाईल. माणूसच माणसाला बेईमान होतो. परंतु एखादे लावलेले झाड आयुष्यात कधीच दगा देत नाही. ते त्याच्या परोपकाराचा गुणधर्म कधीच विसरत नाही. आयुष्यात जिवाभावाचे चार माणसे जोडता आली नाही. तरी चालतील, पण चार झाडं मात्र आयुष्यात लावले तर आयुष्याचा अनेक काळ त्याच्या सानिध्यात आनंदात घालता येईल. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, सरकार तर्फे 1जुलै ते 7 जुलै हा वन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सरकार दरवर्षी नवीन वृक्षलागवडीचा संकल्प करतात. सर्व जनतेला वृक्ष लागवडीसाठी आव्हान करतात. दरवर्षी लाखो, कोटींच्या संख्येत वृक्ष लावले जातात. वृक्षलागवडीचे फोटो, बातम्या पेपर मधून प्रकाशित होतात, पण वृक्षसंवर्धन, संगोपन होतांना दिसत नाही. वृक्ष लावण्याबरोबरच त्याचे संगोपन सुद्धा करणे गरजेचे आहे. झाडांची योग्य निगा राखली त्याला वेळोवेळी पाणी घातले तर वृक्ष मोठे होतील, बहरतील निसर्गाचे सौंदर्य वाढवतील. झांडाची संख्या लावण्या पुरती न राहता प्रत्यक्ष झाडे मोठी झाली पाहिजे. झाडे जगण्याची व वाढण्याची संख्या वाढली पाहिजे. मागील 20 वर्षांपूर्वी इंधन म्हणून लाकडाचा प्रचंड वापर होत होता. त्याच बरोबर घरातील विविध लाकडी वस्तू, लाकडी खेळणी, घर बांधकामासाठी लाकुड, अशा विविध कामासाठी वृक्षतोड व्हायची. आज मात्र घरातील लाकडी वस्तू कमी झाल्या, लाकडी खेळणी बंद झाली, घरांचे बांधकामे सिंमेट कॉग्रेटची झाली. इंधन म्हणून गॅस, रॉकेल, विद्युत शेंगडी आदी गोष्टींचा वापर अधिक वाढला. यामुळे वृक्षतोड फार कमी होऊ लागली होती. तरीही वृक्षांची संख्या मात्र कमी कमी होत गेली आहे. याचे कारण म्हणजे शिक्षण, व्यवसाय, नोकरी, उद्योगधंद्यांनी जशी प्रगती केली. तशी पर्यावरणाची प्रगती मात्र झाली नाही. याउलट उद्योगधंदे, कारखाने, कंपन्या, वसाहती, शहरीकरण, रस्ते रुंदीकरण, नवीन रस्ते, धरण, कालवे आदींमुळे प्रचंड वृक्षतोड झाली. आजही ही वृक्षतोड सुरूच आहे. कुठे तरी वृक्षतोडीला लगाम घातला गेला पाहिजे. नाहीतर एक वेळ पृथ्वीवरून वृक्ष नाहीसे होतील व संपूर्ण मानव जातीला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मनुष्यजीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग वाचला तर माणूस वाचेल निसर्ग व मानवजात हे एकमेकांचे मित्र आहेत. मानवच मानवाच्या जीवनात धोका निर्माण करत आहे. हे आत्ताच लक्षात घेतले पाहिजे. आज आपण पाहतो समाजात मोठ मोठी लग्न समारंभ, वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यासाठी लाखो रुपयांचे फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. लाख रुपयांचा सत्कार खर्च मान सन्मानासाठी केला जातो. या ऐवजी हजार रुपयाच्या महत्त्वाच्या झाडांची रोपे आणून लग्नसमारंभातील प्रमुख अतिथी, नातेवाईक यांना देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना झाडे लावण्याचे आव्हान केले तर खऱ्या अर्थाने सुशिक्षित व पर्यावरण पूरक समारंभ पूर्ण झाले असे म्हणता येईल. याच बरोबर वर वधूंना संसार रुपी जीवनाला सुरुवात करताना एक एक झाड लावण्याचे आव्हाहन केले पाहिजे. जर त्यांनी झाडे लावली तर त्यांचा संसार वृक्षाप्रमाणे निश्चितच अधिक फुलेल व आयुष्याचा काही काळ याच झांडाच्या सावलीत घालवता येईल. त्याचबरोबर घरातील, कुटुंबातील व्यक्तीचे निधन होते. तेव्हा अंत्यसंस्कार, इतर विधी करुन आपण हळुहळु त्या व्यक्तिला विसरून जातो. त्या व्यक्तीच्या नावाने जर एक झाड लावले तर ती व्यक्ती झाडाच्या रुपाने सदैव आठवण म्हणून आपल्यासमोर असेल. झाडे लावणे व मोठी करणे काळाची गरज आहे. झाडे लावा झाडे जगवा हा नारा खूप गाजला लोकांनी खूप झाडे लावली. परंतु झाडे जगवण्यात मात्र आपण कमी पडलो. मग त्याला कमी पाऊस, दुष्काळ, झांडाची निवड या सारखे कारणेही आहेत. दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, प्रत्येकाने शेतात, रानात, जंगलात, मोकळ्या जागेत, घरा शेजारी, शाळेत, ऑफीसमध्ये एक तरी झाड लावावे. वर्षभर त्या झाडाची निगा राखावी. झाडे मोठी होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. प्रत्येकाने लावलेले झाड स्वतःला व येणाऱ्यां पिढीला निश्चितच फायदा देत राहील. मानवाचे जीवन प्रदूषण मुक्त व पर्यावरणपूरक होईल. झाडे शुद्ध ऑक्सीजन व निखळ आनंद देतात. ह्या दोन्हीची माणसाला गरज आहे. म्हणून 

‘‘ प्रत्येकाने झाडे लावूया झाडे जगवुया व झाडाप्रमाणे स्वतःचे आयुष्य आनंदाने सदैव बहरत ठेवूया. ’’

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852


Saturday, 12 September 2020

प्राण्यांची सहल

प्राण्यांची सहल
एकदा जंगलाचा राजा सिंह याने सर्व प्राण्यांची मीटिंग घेण्याचे ठरवले. लगेच सिंहाने  ससोबा ला बोलावून घेतले. ससोबा ससोबा मी काय म्हणतो आपण सर्व प्राण्यांची सहल काढूया का ? ससोबा म्हणाला वा....!  काय छान आयडिया आहे. किती मज्जा येईल. सर्व प्राणी एकत्रित सहलीला सोबत असतांना खुप धमाल करता येईल. पण सर्व प्राण्यांना माहीत कसं होणार ? की आपल्याला सहलीला जायचं आहे. मध्येच ससा बोलला सिंह मोठ्या आवाजात ओरडून म्हणतो, ‘‘ अरे ससोबा मी त्यासाठीच तर तुला बोलावले ’’  तू पटकन जाऊन  सर्व प्राण्यांना सांग आज रात्रीला माझ्या गुहेमध्ये मी मिटींग घेणार आहे. त्यासाठी  तुम्हा सर्वांना बोलवलं आहे. बरं म्हणून ससोबा तिथून निघून गेला. ससोबा उड्या मारत मारत जंगलात फिरु लागला. लांडगा, कोल्हा, हरिण, हत्ती, वाघ, चित्ता, जिराफ, घोडा, अस्वल, माकड, या सर्वांना मीटिंगसाठी निमंत्रण दिले. रात्र झाली हळूहळू सर्व प्राणी राज्याच्या गुहेमध्ये जमा झाली. राजांनी हळूच सहलीचा विषय काढला. मी काय म्हणतो, आपण सर्व प्राणी मिळून जंगलात सहलीला जाऊ या का ? सर्व प्राणी एकमेकाकडे बघून हो म्हणाले. मधेच हत्ती दादा सोंड हलवत म्हणाला पण जायचे कुठे ? ते तर आधी सांगा. लांडगा मान हलवून म्हणाला हो...!  हो...!  कुठे जायचे ते आधी सांगा. नाहीतर आपण माणसाच्या वस्तीत गेलो तर पकडल्या जाऊ. सर्व प्राणी मोठ्यांनी मान हलवून म्हणाले बरोबर आहे. कुठे जायचं ते आधी सांगा. तरच आम्ही सहलीला येऊ. नाही तर आम्हाला नाही यायचे सहलीला. सिंह उभा राहून मोठ्यांने म्हणतो, अरे घाबरू नका. या जंगलाचा राजा तुमच्या सोबत असणार आहे.तुम्हाला कोण पकडते मी बघतोच. आपण जंगलातच सहलीला जाणार आहोत. मानवाच्या वस्तीत नाही. उद्या सकाळी ठीक नऊ वाजता सर्वांनी सहलीसाठी माझ्या गुहेसमोर जमा व्हायचे आहे. माझ्या परवानगीने आपण सर्वजण एकत्र सहलीला निघणार आहोत. सर्वांनी माना हलवल्या व सर्व  प्राणी खुशीतच आपापल्या घराकडे निघाले. हरण उड्या मारतच रस्त्याने पळत होते. माकडांनी खूप उड्या मारल्या, हत्ती, जिराफ, लांडगा, कोल्हा, अस्वल, सर्वजण आज खुश होते. कारण सर्वांना सहलीचे निमंत्रण मिळाले होते. रात्र झाली सर्वजण शांत झोपी गेले. हत्ती दादा मात्र रात्रभर जागा होता. कधी सकाळ होईल याची वाट पहात हत्ती जागीच राहिला. सकाळ झाली सूर्यकिरणांनी जंगलात प्रवेश केला तसे ससोबा संपूर्ण तयारीनिशी उड्या मारत मारतच फिरू लागला. चला... चला... रे...!  चला.... चला.... रे...!  सहलीला चला. धावा.... धावा..... पळा...!  धावा..... धावा.... पळा...!  असे म्हणत ससोबा प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन ओरडत होता. सशाचा आवाज ऐकून लांडगा नटून थटून बाहेर आला. अस्वलाने तर मोठे जॅकेट घातले होते. हत्ती दादाने तर स्वतःच्या पाठीवर झूल घातली होती.  हरीण अगदी नाकात नथ घालून मान हलवत सर्वांच्या पुढे येऊन थांबली. सशाने  पायात घुंगरू बांधले होते. त्याच्या टुणुक टुणुक उड्या बरोबर घुंगरांचा आवाज येत होता. राजाच्या गुहे  बाहेर सर्व प्राणी बिनधास्त येऊन उभे होते. सिंह थोड्या वेळाने गुहे बाहेर आला. सर्व प्राण्यांवर नजर टाकुन कोण कोण आले ते बघतो. सिंह हसतच म्हणाला गमंत झाली. माकड मामा आलेच नाही. ससोबा माकड मामाला नाही बोलून आणले का ? ससा म्हणाला , " मी तर सर्वांना आवाज दिला होता ".  मग माकड का बर आले नसेल , म्हणून ससोबा पुन्हा टुणुक टुणुक उड्या मारत जंगलात गेले. झाडाच्या खाली उभे राहून मोठ्याने आवाज देऊ लागले. माकड मामा....!  माकड मामा...!  चला.... चला.... सहलीला चला...! माकडाला मात्र सहलीच्या खुशीमध्ये येवढी गाढ झोप लागली होती की, अजूनही माकड झोपेत होते. ससोबाच्या आवाजाने पटकन उठुन  शेपटीला छान गोंडा बांधला.व ससोबा  बरोबर उड्या मारत मारत गुहेबाहेर आले. सिंहाने सर्वांना सूचना दिल्या. जंगलात फिरताना काय  काय काळजी घ्यायची हे सर्वांना सांगितले. सर्वांनी मान हलवून सूचनांचे पालन करण्याचे कबूल केले. शेवटी सशाने  मोठ्याने घंटी वाजवली. व सिंहाच्या मागे सर्व प्राणी सहलीसाठी निघाले. दिवसभर सर्व जंगलात सर्व प्राण्यांनी खूप मजा केली. एकमेकांची घरे बघितली, वेगवेगळी झाडं बघितली, जंगलातील वेगवेगळी फळे, फुले, रस्ता, पाणी  या सर्वांची  गंमत पाहिली. आपण सर्वजण या जंगलात रहात असून कधीही एकमेकांच्या भितीने एकमेकांच्या घरासमोर आलो नाही. त्यामुळे आपण एकत्र राहतो  कधी आपल्याला कळलेच नाही. अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. शेवटी दिवस मावळायला आला सर्वजण चालून चालून थकले होते. हत्तीदादा तर म्हणाला बाप रे....! मी किती थकलो. मला तर चालता पण येऊ लागले नाही. हरीण  मध्येच म्हणाली , " हत्तीदादा तुम्ही तर आमच्या पेक्षा सगळ्यात मोठे "  मग तुम्ही कसे काय थकले. हत्ती मध्येच म्हणाला , " अगं हरिन ताई माझं शरीर मोठे "  त्यामुळे त्यामुळे मला पटापट चालताही येत नाही. मी हळूहळू चालत चालत तुमच्या सर्वांच्या मागे आज खूप थकून गेलो. मला तर कुणीतरी उचलून घ्यायला पाहिजे.हरीण  मोठ्यामोठ्याने हसून म्हणाली , " हत्तीदादा अशी गंमत करू नका "  आम्ही सगळे प्राणी तुम्हाला साधे उचलू शकत नाही. तर पाठीवर घेऊन कसे जाणार. अशा प्रकारे प्राण्यांच्या गमती जमती मध्ये आजचा दिवस फार आनंदात गेला होता. सगळ्यांनी सिंहाच्या गुहे बाहेरून सिंहाला धन्यवाद दिला. ससा मध्येच म्हणाला राज्याच्या परवानगीने आपल्या सर्वांना सहलीचा आनंद घेता आला, पण मी तर काल पासून किती धावपळीत होतो. सर्वांना निमंत्रण मीच दिलं, सर्वांना सकाळी उठवायला पण मीच आलो  होतो. पण मला काही कुणी धन्यवाद दिले नाही. माकड मध्येच उड्या मारत म्हणाले ससोबा तुलाही खूप खूप धन्यवाद. ससोबा भाऊचा जय जयकार असो....!  असे म्हणून सगळे प्राणी आपापल्या घराकडे निघून गेले. सिंहालाही आजच्या सहली मुळे खुप बरे वाटले होते. आपण सर्व प्राणी एकमेकांशी यापुढे असेच प्रेमाने वागूया. एकमेकांची भीती न बाळगता सर्वांनी एकत्र या जंगलामध्ये वास्तव करूया. असे म्हणून सिंहाने आपल्या गुहेचा दरवाजा बंद केला. सिंह  शांत झोपी गेला. 

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852

Friday, 4 September 2020

ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचा सन्मान

    ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचा सन्मान

5 सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक करत असलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यास गौरवांकित करण्याचा हा दिवस होय. कुटुंबात लहान मूल जन्माला आल्यानंतर प्रथम त्याची आई त्याचा पहिला गुरू होते. आपल्या मुलावर जगातील उत्तम असे संस्कार करण्याचे कामही करत असते. जीवनातील दुसरा महत्त्वाचा उत्तम संस्कार म्हणजे शिक्षण होय. शाळेच्या प्रांगणात पहिले पाऊल ठेवल्यापासून ते मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य शिक्षण, ज्ञान घेत असतो. प्रत्येकाच्या जीवनातील दुसरा गुरु म्हणजे शिक्षक होय. संपूर्ण आयुष्य घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षणामुळे मनुष्य समृद्ध बनतो. त्याचा सर्वांगीण विकास साधला जातो.  शिक्षण अखंड चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतील शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. विज्ञान व तंत्रज्ञानाने एकविसाव्या शतकात प्रचंड प्रगती केली.पण आजही खडू-फळा, शिक्षक-विद्यार्थी या प्रक्रियेतून मिळणारे शिक्षण हे गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण विकास साधणारे आहे. आज 3G  4G 5G  च्या जमान्यात आजही गुरुजी महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही. शिक्षकांमुळे विद्यार्थी  घडतो, हा विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहे. जुन्या काळातील गुरुकुल पद्धती होती तिला फार महत्त्वाचे स्थान होते. विद्या मिळवताना गुरू पूजनीय समजले जायचे. गुरूचा आदर सत्कार केला जायचा. आज मात्र समाजात शिक्षकांचा आदर कमी झाला आहे. शिक्षकांविषयी समाजाची भावना पैसे देऊन शिक्षण विकत घेण्यापुरती झाली आहे. शिक्षक हा आयुष्यातील सर्वात मोठा गुरु आहे. गुरुचे स्थान मोठे आहे  ते मोठेच राहणार.5 सप्टेंबर या दिवशी प्रत्येक कार्यरत शिक्षकाचा सन्मान झाला पाहिजे. पालक, गावकरी, समाजाने शिक्षकांच्या कार्याचा या दिवशी सत्कार करून त्यांना उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांप्रदायिक याठिकाणी सर्वोच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच शिक्षकांनी घडविले आहे हे विसरून चालणार नाही. जन्मता कोणीही मोठे नसतात.ती स्वतःच्या कर्तुत्वाने व शिक्षकांच्या ज्ञानदानाने मोठे होत असतात. पहिलीपासून ते वेगवेगळ्या शिक्षण शाखेमध्ये शिक्षक काम करत असतात. प्रत्येक विद्याशाखेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी  सदैव प्रयत्नशील असतात. यापुढेही प्रयत्नशील राहतील. फक्त गरज आहे ती शिक्षका प्रति आदर बाळगण्याची व त्यांचा योग्य तो मान सन्मान राखण्याची. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा कौतुक सोहळा संपन्न होत असतो. महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांचा मनापासून कौतुक करूया. व पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा देऊया. पुढील काळातही शिक्षणाचे हे पवित्र कार्य अखंडपणे सुरू राहण्यासाठी सर्व शिक्षक बांधवांना खुप खुप शुभेच्छा. 

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...