Wednesday, 16 September 2020

झाडे लावा ; झाडे जगवा !

                        

             झाडे लावा ; झाडे जगवा ! 

      

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |

पक्षीही सुस्वरे आळविती ||

येणे सुख रुचे एकांताचा वास | 

नाही गुणदोष अंगी येत ||

संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून सजीवातील प्राणी व वनस्पती या दोन्हींचा एकमेकांशी असलेला संबंध व्यक्त केला आहे. वृक्ष हे सजीव आहेत. त्यांची वाढ होते. त्यांना अन्न, पाणी व हवेची गरज आहे. माणसापेक्षा वृक्ष अधिक चांगले व इमानदार आहे. त्यांचे जीवन परोपकारी आहे. माणूस मात्र स्वार्थी व क्षणिक सुखाच्या लोभाचे जीवन जगत असतो. एक छोटेशे रोपटे लावले, त्याची योग्य निगा राखली, त्याला खत पाणी घातले की, त्या झाडाची व्यवस्थीत वाढ होते. ते झाड मोठे झाल्यावर फुल, फळ, सावली देते. स्वतःचा मोठा विस्तार झाल्यावर सावलीच्या रुपाने अनेकांना आधार देते. गोड फळाच्या रूपाने प्रत्येकाच्या मुखात गोड स्वाद भरवते. पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखण्याचे काम झाडे करतात. प्रदूषण रोखणे, जमिनीची धूप, पाऊस पडणे अशा पर्यावरण विषयक समस्या सोडवण्यासाठी झाडांची महत्त्वाची भूमिका असते. आपण पाहतो समाजात एखाद्या व्यक्तीवर कितीही उपकार करा त्याला अडीअडचणीत मदत करा एक दिवस तो बदलेल सर्व उपकार विसरून जाईल. माणूसच माणसाला बेईमान होतो. परंतु एखादे लावलेले झाड आयुष्यात कधीच दगा देत नाही. ते त्याच्या परोपकाराचा गुणधर्म कधीच विसरत नाही. आयुष्यात जिवाभावाचे चार माणसे जोडता आली नाही. तरी चालतील, पण चार झाडं मात्र आयुष्यात लावले तर आयुष्याचा अनेक काळ त्याच्या सानिध्यात आनंदात घालता येईल. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, सरकार तर्फे 1जुलै ते 7 जुलै हा वन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. सरकार दरवर्षी नवीन वृक्षलागवडीचा संकल्प करतात. सर्व जनतेला वृक्ष लागवडीसाठी आव्हान करतात. दरवर्षी लाखो, कोटींच्या संख्येत वृक्ष लावले जातात. वृक्षलागवडीचे फोटो, बातम्या पेपर मधून प्रकाशित होतात, पण वृक्षसंवर्धन, संगोपन होतांना दिसत नाही. वृक्ष लावण्याबरोबरच त्याचे संगोपन सुद्धा करणे गरजेचे आहे. झाडांची योग्य निगा राखली त्याला वेळोवेळी पाणी घातले तर वृक्ष मोठे होतील, बहरतील निसर्गाचे सौंदर्य वाढवतील. झांडाची संख्या लावण्या पुरती न राहता प्रत्यक्ष झाडे मोठी झाली पाहिजे. झाडे जगण्याची व वाढण्याची संख्या वाढली पाहिजे. मागील 20 वर्षांपूर्वी इंधन म्हणून लाकडाचा प्रचंड वापर होत होता. त्याच बरोबर घरातील विविध लाकडी वस्तू, लाकडी खेळणी, घर बांधकामासाठी लाकुड, अशा विविध कामासाठी वृक्षतोड व्हायची. आज मात्र घरातील लाकडी वस्तू कमी झाल्या, लाकडी खेळणी बंद झाली, घरांचे बांधकामे सिंमेट कॉग्रेटची झाली. इंधन म्हणून गॅस, रॉकेल, विद्युत शेंगडी आदी गोष्टींचा वापर अधिक वाढला. यामुळे वृक्षतोड फार कमी होऊ लागली होती. तरीही वृक्षांची संख्या मात्र कमी कमी होत गेली आहे. याचे कारण म्हणजे शिक्षण, व्यवसाय, नोकरी, उद्योगधंद्यांनी जशी प्रगती केली. तशी पर्यावरणाची प्रगती मात्र झाली नाही. याउलट उद्योगधंदे, कारखाने, कंपन्या, वसाहती, शहरीकरण, रस्ते रुंदीकरण, नवीन रस्ते, धरण, कालवे आदींमुळे प्रचंड वृक्षतोड झाली. आजही ही वृक्षतोड सुरूच आहे. कुठे तरी वृक्षतोडीला लगाम घातला गेला पाहिजे. नाहीतर एक वेळ पृथ्वीवरून वृक्ष नाहीसे होतील व संपूर्ण मानव जातीला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मनुष्यजीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग वाचला तर माणूस वाचेल निसर्ग व मानवजात हे एकमेकांचे मित्र आहेत. मानवच मानवाच्या जीवनात धोका निर्माण करत आहे. हे आत्ताच लक्षात घेतले पाहिजे. आज आपण पाहतो समाजात मोठ मोठी लग्न समारंभ, वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यासाठी लाखो रुपयांचे फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. लाख रुपयांचा सत्कार खर्च मान सन्मानासाठी केला जातो. या ऐवजी हजार रुपयाच्या महत्त्वाच्या झाडांची रोपे आणून लग्नसमारंभातील प्रमुख अतिथी, नातेवाईक यांना देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना झाडे लावण्याचे आव्हान केले तर खऱ्या अर्थाने सुशिक्षित व पर्यावरण पूरक समारंभ पूर्ण झाले असे म्हणता येईल. याच बरोबर वर वधूंना संसार रुपी जीवनाला सुरुवात करताना एक एक झाड लावण्याचे आव्हाहन केले पाहिजे. जर त्यांनी झाडे लावली तर त्यांचा संसार वृक्षाप्रमाणे निश्चितच अधिक फुलेल व आयुष्याचा काही काळ याच झांडाच्या सावलीत घालवता येईल. त्याचबरोबर घरातील, कुटुंबातील व्यक्तीचे निधन होते. तेव्हा अंत्यसंस्कार, इतर विधी करुन आपण हळुहळु त्या व्यक्तिला विसरून जातो. त्या व्यक्तीच्या नावाने जर एक झाड लावले तर ती व्यक्ती झाडाच्या रुपाने सदैव आठवण म्हणून आपल्यासमोर असेल. झाडे लावणे व मोठी करणे काळाची गरज आहे. झाडे लावा झाडे जगवा हा नारा खूप गाजला लोकांनी खूप झाडे लावली. परंतु झाडे जगवण्यात मात्र आपण कमी पडलो. मग त्याला कमी पाऊस, दुष्काळ, झांडाची निवड या सारखे कारणेही आहेत. दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, प्रत्येकाने शेतात, रानात, जंगलात, मोकळ्या जागेत, घरा शेजारी, शाळेत, ऑफीसमध्ये एक तरी झाड लावावे. वर्षभर त्या झाडाची निगा राखावी. झाडे मोठी होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. प्रत्येकाने लावलेले झाड स्वतःला व येणाऱ्यां पिढीला निश्चितच फायदा देत राहील. मानवाचे जीवन प्रदूषण मुक्त व पर्यावरणपूरक होईल. झाडे शुद्ध ऑक्सीजन व निखळ आनंद देतात. ह्या दोन्हीची माणसाला गरज आहे. म्हणून 

‘‘ प्रत्येकाने झाडे लावूया झाडे जगवुया व झाडाप्रमाणे स्वतःचे आयुष्य आनंदाने सदैव बहरत ठेवूया. ’’

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852


No comments:

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...