पाऊलवाट (लघुकथा)
दिवस मावळतीला आला होता. अंगणातील वडाच्या झाडावर नेहमी प्रमाणे पक्षांनी जमायला सुरुवात केली होती. सर्व पक्षी वडाच्या झाडावर आले की, त्यांची किलबिलाट सुरू होत असे. हे पक्षी जणू आमच्या घरातील सदस्य झाले होते. मी घरातून ओंजळभर दाणे आणून अंगणात टाकले. तसे हळूहळू वडाच्या झाडा वरील पक्षांनी अंगणात दाणे टिपायला सुरुवात केली. मोहनच्या बाबांची वाट पहात मी दरवाजातच उभी होते. मोहनचे बाबा तालुक्याच्या गावाला एका शेठजिकडे कामाला होते. ते रोज सकाळी कामावर जात असे व सायंकाळी मिळेल त्या वाहनाने घरी येत असे. आज त्यांना कामावरून यायला जास्तच वेळ झाला होता. एरव्ही दिवस मावळायच्या दोन तास आधी ते घरी येत असत. आज मात्र दिवस मावळायला आला तरी त्यांचा काहीच पत्ता नव्हता. मी बराच वेळ त्यांची वाट पहात दरवाजातच उभी राहिले. अंधार पडू लागला तशी माझी चिंता मात्र अधिकच वाढू लागली. मी निराश होऊन स्वयंपाक घरात आले व स्वयंपाक करत बसले. आधीच त्यांना यायला उशीर त्यात स्वयंपाक उशिरा म्हटल्यावर ते परत रागावतील. मी पटपट स्वयंपाक करू लागले. मी हळूच मोहनला आवाज दिला. मोहन बाहेर अंगणात लक्ष ठेव तुझे बाबा येतीलच येवढ्यात. तुझा अभ्यास करत बस. दिवसभर शाळेत काय शिकवले ते पहा जरा. शाळेतून आल्यापासून नुसता खेळत असतो. जरा अभ्यासाकडे लक्ष दे, नाहीतर तुझ्या बाबा सारखे तुलाही रोजच तालुक्याला कामाला जावे लागेल. मोहन चिडचिड करतच अभ्यासाला बसला. इतरवेळी घरात मोहन व त्याचे बाबा खूप मस्ती करत बसतात. मोहनला फक्त मस्ती करायला पाहिजे. अभ्यासाचा खूपच कंटाळा करतो. असे मी माझ्या मनाशीच बोलत होते. माझा स्वयंपाक आटोपला मी परत घराच्या दरवाज्यात येऊन उभी राहिले. आता मात्र सर्वत्र अंधार पडला होता. रात्र सुरू झाली होती. गावातील सर्व लाईट सुरु झाली होती. गाव विजेच्या लख्ख प्रकाशाने उठून दिसत होते. रात्र झाली तरी गल्लीतील मुले मात्र रस्त्यावर गोंधळ करत होती. मी घरात, दारात चकरा मारत होते. माझे कशातच लक्ष लागत नव्हते. मनात नाही....! नाही....! त्या शंका येत होत्या. आता बराच उशीर झाला होता. मी मोहनला जेवु घातले व त्याला झोपायला सांगितले. तो थोड्यावेळातच झोपी गेला. दारात येऊन पाहते तर गल्लीत काळं कुत्रंही जागं नव्हतं. सर्व गाव सामसूम निपचित पडलं होतं. गावातील लोकं जेवण करुन आपापल्या घरी शांत झोपी गेले होते. एरव्ही देवळात अर्ध्या रात्रीपर्यंत भजन चालत असते. आज मात्र देऊळही शांत शांत आहे. पूर्ण गावात जणू मीच एकटी जागी आहे. आज मी माझ्या मनाशी बोलत होते. मोहनचे बाबा अद्यापही आले नाही या चिंतेने मी फार अस्वस्थ झाले होते. आता मला फार भीती वाटू लागली होती. मी दरवाजा लावून घेतला व घरात एकटीच एका कोपर्यात रडत बसले. माझ्याकडे रडण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. मी एवढ्या रात्री मोहनला सोडून त्यांना बघायला सुद्धा जाऊ शकत नव्हते. मोहन बिचारा छोटा असल्यामुळे जेवून बाबांची वाट पाहत पाहत झोपी गेला. मला मात्र मोहनच्या बाबांची चिंता झोपू देत नव्हती. मी शेवटी थकून अंथरुणावर पडले. मला डोळा लागणार तेवढ्यात, दाराची कडी वाजली. टकटक....! टकटक....! असा दोनदा-तीनदा आवाज आला. मी पटकन उठले व दाराची कडी उघडण्यासाठी दारावर गेले. क्षणभर विचार केला नेमकी कोण असेल? एवढ्या रात्री मोहनचे बाबा नसले तर....! आपण घरात एकटेच आहोत. काय करावे? कसे करावे? या विचारात पडले. तेवढ्यात परत दरवाजाचा टकटक....! टकटक....! असा आवाज आला. मी कशीतरी हिंमत करुन हळूच विचारले. कोण आहे ? बाहेरून हळू आवाज आला. अग मीच आहे....! उघड लवकर....! मीच आहे म्हणाले, पण आवाज मात्र वेगळाच वाटतो. परत मी विचारले? मोहनचे बाबा का? हो....! हो....! मीच आहे गं....! उघड लवकर....! मी पटकन दरवाजाची कडी उघडली. एकदम मोहनच्या बाबाकडे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आकाशात वीज चमकावी तशी अनेक प्रश्नांची वीज माझ्या मेंदूत चमकली. मी प्रचंड घाबरले. मोहनचे बाबा रक्ताने भरले होते. डोक्यातून प्रचंड घळाघळा रक्त वाहत होते. अंगातील कपडे फाटले होते. संपूर्ण अंगाला वरखंडे लागले होते. पायात काहीच नव्हते ते अनवाणी पायी, रक्ताने माखलेल्या अवस्थेत माझ्या समोर उभे होते. त्यांना बघून माझ्या तोंडातून शब्दच फुटेना, घसा जणू कायमचा बंद झाला होता. मी थरथरत्या हाताने मोहन च्या बाबांना पकडले. काय झाले तुम्हाला....! हे .... कसं.... काय.... झाले. मी त्यांना घाबरलेल्या अवस्थेत बाहेरच प्रश्न विचारत बसले. त्यांना घरात घ्यायचे भानच मला उरले नव्हते. मी एकदम भानावर आले त्यांना पटकन घरात घेतले. दाराची आतून कडी लावली. त्यांना पटकन एक ग्लास पाणी आणून पाजले. घरातील सुती कपडे आणुन त्यांचे डोके पुसले. सुती कपड्याचा काठ फाडून त्यांच्या डोक्याला पट्टी बांधली. अंगातील फाटके, रक्ताने भरलेले कपडे बदलून घेतले. त्यांचे रक्ताने माखलेले अंग पुसले. त्यांना गरम चहा करून पाजला. मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले होते. पण अवस्थाच अशी होती की, मी त्यांना यावेळी प्रश्न विचारून परत गोंधळात टाकू शकत नव्हते. त्यामुळे मी त्यांना एकही शब्द न बोलता गादीवर आराम करायला सांगितले. घरातील आंबी हळदीचा खडा उगाळून तो गरम पाण्यात शिजवून घेतला. हातापायावर, डोक्यावर, मार लागलेल्या ठिकाणी शिजलेली गरम अंबी हळद लावू लागले. त्यांची अवस्था पाहून एका डोळ्यात पाणी, तर एका डोळ्यात घरी सुखरूप आल्याचा आनंद झळकत होता. मी हळूच त्यांना म्हणाले आराम करा आता सकाळी बोलू. तुमची अवस्था बघवत नाही हो मला....! देवाने असे कसे केले तुमच्यासोबत....! असे बोलून मी स्वयंपाक घरात जाऊन ढसाढसा रडू लागले. पदराचा बोळा तोंडात दाबुन धरला तरी रडण्याचा हुंदका मला आवरेणासा झाला होता. आज माझ्या कपाळाच्या कुंकावरच घाव घातला होता. मोहनचे बाबा अतिशय शांत स्वभावाचे, कधी कुणाशी वैर नाही. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे, मनाने अगदी प्रामाणिक व कष्टाळू हा माणूस कधीच कुणाचे वाईट चिंतीत नाही. आज यांच्यासोबत काय झाले असेल?. माझे मन मात्र विचारांच्या काहूराने सुन्न झाले होते. रात्र खूप झाली होती. आज अन्नाचा घास आमच्या दोघांच्या पोटात गेला नाही. मी केलेला स्वयंपाक तसाच पडून होता. परमेश्वरा सकाळी सकाळी कुणाचे तोंड बघितले कुणास ठाऊक. आजचा हा वाईट दिवस आमच्या आयुष्यात कुणीकडुन आला. आम्ही परिस्थितीने गरीब होतो. पण कधीच कुणापुढे लाचार होऊन हात पसरत नव्हतो. मोहनच्या बाबांनी मला सुद्धा स्वाभिमानाने जगायला शिकविले होते. त्या दिवशी मला विचारा विचारात कधी झोप लागली कळलेच नाही.
सकाळी उठल्याबरोबर मी अंगणात झाडून शेणाचा सडा टाकला. दारात रांगोळी काढून घरात आले. मोहन व त्याचे बाबा अध्यापही झोपूनच होते. एरव्ही सकाळी उठून कामावर जाण्यासाठी घाई करणारे मोहनचे बाबा आज मात्र शांत पडून होते. मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हळूच आवाज दिला. अहो....! उठता का? ते मात्र निपचित पडून होते. त्यांच्या डोक्याला खूप मार लागलेला असावा? त्यांना काहीच सुचत नव्हते़. दिवस उगवुन खूप वेळ झाला होता. बाहेर कडक ऊन पडले होते. मी घरातील कामे आवरून परत त्यांच्या जवळ जाऊन त्यांना उठवले. माझ्या मदतीने ते कसेबसे उठले .चहा पाणी झाला ते मला घडलेला सर्व प्रकार सांगू लागले. लक्ष्मी मी आज कामावर गेल्यावर सकाळीच मालकांनी मागच्या महिन्याचा पगार देतो म्हणून सांगितले होते़. मालक मला म्हणाले, प्रसाद जाताना तुझा मागच्या महिन्याचा पगार घेऊन जा. मी त्यांना हो म्हणालो, व माझ्या कामाला लागलो. दुपारी मालक जवळ येऊन सांगु लागले. प्रसाद आज मात्र काम थोडे जास्त आहे. तुला थोडा वेळ होईल. हरकत नसेल तर....! एक तास शिल्लक थांबून तेवढे काम संपून जा. मी त्यांना मान हलवुन हो म्हणालो व माझ्या कामाला लागलो. दिवसभर रोजच्या प्रमाणे काम केले परंतु आज मालकाने सांगितलेले शिल्लक काम केल्यामुळे मला उशीर झाला. मी मालकाला काम संपल्याचे सांगून निघालो. पण तेवढ्यात मालकांनी मला आवाज दिला. मागील महिन्याच्या पगाराचे पाकीट माझ्या हातात देऊन मालक म्हणाले प्रसाद पैसे संभाळून घेऊन जा. मी मान हलवून हो म्हणालो व तिथून निघून आलो. रोजच्याप्रमाणे बस स्टँडवर आलो खरा, पण आपल्या गावी येणारी गाडी निघून गेली होती. मी थोड्या वेळ इकडे तिकडे विचारपूस केली पण कोणतेच वाहन काही मिळेना. उशीर झाल्यामुळे आपल्या गावातील सर्व वाहने गावी निघून आली होती. आपल्या गावाला यायला एक पाऊल रस्ता आहे. त्याने वेळही कमी लागतो व आंतरही कमी आहे. या रस्त्याने आपण घरी जाऊया असे मी ठरविले. परत गाडीची वेळ पहात बसलो तर अंधार जास्त होईल म्हणून मी त्या पाऊल रस्त्याने निघालो. आपल्या गावातील अनेक जण गाडी नाही मिळाली की याच पाऊलवाटेने तालुक्याला ये जा करत असतात. आम्हाला लहानपणी तालुक्याला यायला जायला हिच पाऊलवाट होती. रात्री मात्र अंधार पडल्यावर सहसा कोणी या पाऊलवाटेने येत नाही व जात नाही. कारण ही पाऊलवाट एकदम दाट झाडीतून व डोंगर रांगेतून जाते.त्यामुळे लोकांना चोरांची भीती वाटते. मी विचार केला आपल्यासोबत कुठे लेडीज आहे? लहान मुलही नाही. आपल्या एकट्याला कोण खाणार....! म्हणून मी लगबगीने पाऊलवाटेने घराकडे यायला निघालो. रस्त्याने थोडा अंधार पडला होता. पाऊलवाट असल्यामुळे कोणी येणार जाणार दिसत नव्हते. मी मात्र घरी येण्याच्या घाईने पटापट माझ्याच विचारात चालत होतो. तेवढ्यात अचानक माझ्यासमोर दोन-चार माणसं आली. त्यांनी मला अडवले. कोण कुठला? नाव गाव विचारले. मला वाटले नविनच वाटसरू असावे. त्यामुळे माहिती विचार असावे. त्यांनी मला थोडावेळ तिथेच गप्पा मारत उभे केले. आजूबाजूला कोणीच नव्हते अगदी सामसूम शांत वातावरण होते. ही माणसे कुठली? अचानक कुठून माझ्यासमोर आली. कशा साठी यांनी मला इथे थांबवले. हा विचार मी मनात करतच होतो. तोच एका व्यक्तिने माझ्या डोक्यात जोरात काठी मारली. मला खाली पाडले व माझ्या जवळ काही पैसे , सोने, महत्वाच्या चीजवस्तू आहेत का? ते तपासु लागले. मला एकदम मालकाने दिलेले पगाराचे पाकीट आठवले. आता आपल्या खिशातील पैसे जाणार म्हणून मी त्या माणसांशी खूप झटापट करु लागलो. मी त्यांना खिशातून पैसे घेऊच दिले नाही. त्यामुळे ती माणसे खूप चिडली व त्यांनी मला मारायला सुरुवात केली. त्यांनी मला लाथा, बुक्या, काठीने मारले. माझ्या खिशातील पैसे काढून घेतले व ती पळून गेली. मी मोठ मोठ्याने ओरडत होतो. वाचवा....! वाचवा....! कुणीतरी मला वाचवा.....! पण रात्रीची वेळ होती. पाऊलवाट सामसूम होती. कोणीही मला वाचवायला येणार नव्हते. मला डोक्यात काठी लागल्यामुळे बहुतेक चक्कर आली असावी. मी तिथेच खाली कोसळून पडलो. मला काय होत आहे हे समजलेच नाही. मी खूप वेळ तिथेच पडून होतो. थोड्यावेळाने डोकं थंड गार पडले. रक्ताने माझे डोके, तोंड, कपडे भरले होते. मला जाग आली तेव्हा मी, हळूच उठून पाहतो तर अंधारात मी एकटाच रस्त्यात पडून होतो. मी कसाबसा उठलो हळूहळू त्या पाउलवाटेने घराकडे निघालो. डोक्याला मार, हातापायांना मार, संपूर्ण अंग झोडपल्यावाणी झाले होते. माझ्या डोक्यातील रक्त गेल्यामुळे मला काही सुचत नव्हते. मी खूप थकल्यासारखा झालो होतो. मला खूप तहान लागली होती पण जवळपास अंधारात पाणी कुठेच मिळणार नव्हते. मी फक्त घरी येण्यासाठी एकेक पाऊल टाकत पुढे पुढे चालत होतो. मला मोहन व तुझी खुप आठवण येत होती. मोहनच्या बाबांना ही सर्व कहाणी सांगता सांगता खूप घाम आला होता. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव दिसत होते. मला तर ही सर्व हकिगत ऐकून चक्कर आल्यासारखे झाले. ते रात्रीचे चोर कसले....! दरोडेखोर म्हणा की....! त्यांनी तुम्हाला पैशासाठी मारले व पैसेही घेऊन पळाले. दगडाच्या काळजाची माणसं कुठली....! पैशासाठी त्यांना माणसाचा जीव सुद्धा परका होतो. पैशासाठी माणसाच्या जीवावर उठणारी ही भूतच म्हणा की....! मोहनच्या बाबांच्या या अवस्थेतेमुळे मी रागाच्या भरात मोठ्या मोठ्याने बोलत होती. जाऊद्या पैशापेक्षा तुमचा जीव वाचला....! हे महत्त्वाचे आहे. पैसे काय कधीही कमावता येईल. तुम्ही पटकन चला गावातील डॉक्टरला दाखवून गोळ्या औषध घेऊन येऊया. डोक्याला पण डॉक्टर पट्टी करून देईल. आता आठवडाभर कुठेच जायचे नाही. घरातच आराम करत बसा. तुमच्या त्या दीड शहाण्या मालकाला निरोप पाठवून सांगा. तुम्ही येणार नाही ते....! आणि हो....! घडलेली हकीगत होऊ द्या त्याला माहित. नाही तर त्याला वाटेल पगार मिळाला म्हणून घरीच मौजमजा करत बसले. त्यांनी एक तास जास्तीचे काम लावले नसते, तर हे सर्व घडलेच नसते. ‘‘ लक्ष्मी मालकावर चिडून काय फायदा ’’ त्यांचा यात काय दोष आहे. त्यांनी आपल्याला जास्तीचे काम सांगितले तर मालक पगाराव्यतिरिक्त थोडे पैसे शिल्लक देतात. आणि हो....! त्यांना माहित असते असे होणार आहे तर त्यांनी कशाला थांबवले असते. आपलेच नशीब खराब आहे. महीना भराची कमाई गेली वरून असा जीवघेणा हल्ला झाला. देवाची पुण्याई कामी आली बघ म्हणून मी वाचलो. नाहीतर त्या पाऊलवाटेवर मला सकाळ पर्यंत जाग आली नसती तर कदाचित मी कधीच घरी येऊ शकलो नसतो. तू नेहमी म्हणतेस ना....! देव आपल्याला काहीच मदत करत नाही. बघ....! आज देवाने तुझी हाक ऐकली....! माझ्या मदतीला देवच धावून आले बघ....! देवानेच मला त्या हल्ल्यातून वाचवले. मोहनचे बाबा माझी समजूत काढत होते. पण मला त्या मालकाचा रागच आला होता. गरिबीने आमच्या वाट्यावर हे दिवस आले होते. परिस्थिती माणसाला मजबूर बनवते. ते असे....! मी मनातल्या मनात पुटपुटत देवघराजवळ गेले. देवाला हात जोडून विनंती करू लागले. देवा माझ्या कुंकवाला असेच बळ दे....! माझ्या कुंकवाला नीट सांभाळ....! तुझी कृपा आमच्यावर सदैव राहू दे....! तुझ्या कृपेने आज मोठ्या संकटातून मोहनचे बाबा वाचले. मी देवाला आरती लावुन ओवाळले. आरतीचे ताट घेऊन मोहनच्या बाबांना आरती दिली. यापुढे आता कधीच त्या पाऊलवाटेने येऊ नका. मी मोहनच्या बाबांना खडसावून सांगितले. हो....! गं....! लक्ष्मी मी यापुढे नाही येणार मोहनच्या बाबांचे हे शब्द ऐकुन मला जरा बरे वाटले.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment