ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचा सन्मान
5 सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक करत असलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यास गौरवांकित करण्याचा हा दिवस होय. कुटुंबात लहान मूल जन्माला आल्यानंतर प्रथम त्याची आई त्याचा पहिला गुरू होते. आपल्या मुलावर जगातील उत्तम असे संस्कार करण्याचे कामही करत असते. जीवनातील दुसरा महत्त्वाचा उत्तम संस्कार म्हणजे शिक्षण होय. शाळेच्या प्रांगणात पहिले पाऊल ठेवल्यापासून ते मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य शिक्षण, ज्ञान घेत असतो. प्रत्येकाच्या जीवनातील दुसरा गुरु म्हणजे शिक्षक होय. संपूर्ण आयुष्य घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षणामुळे मनुष्य समृद्ध बनतो. त्याचा सर्वांगीण विकास साधला जातो. शिक्षण अखंड चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतील शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. विज्ञान व तंत्रज्ञानाने एकविसाव्या शतकात प्रचंड प्रगती केली.पण आजही खडू-फळा, शिक्षक-विद्यार्थी या प्रक्रियेतून मिळणारे शिक्षण हे गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण विकास साधणारे आहे. आज 3G 4G 5G च्या जमान्यात आजही गुरुजी महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही. शिक्षकांमुळे विद्यार्थी घडतो, हा विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहे. जुन्या काळातील गुरुकुल पद्धती होती तिला फार महत्त्वाचे स्थान होते. विद्या मिळवताना गुरू पूजनीय समजले जायचे. गुरूचा आदर सत्कार केला जायचा. आज मात्र समाजात शिक्षकांचा आदर कमी झाला आहे. शिक्षकांविषयी समाजाची भावना पैसे देऊन शिक्षण विकत घेण्यापुरती झाली आहे. शिक्षक हा आयुष्यातील सर्वात मोठा गुरु आहे. गुरुचे स्थान मोठे आहे ते मोठेच राहणार.5 सप्टेंबर या दिवशी प्रत्येक कार्यरत शिक्षकाचा सन्मान झाला पाहिजे. पालक, गावकरी, समाजाने शिक्षकांच्या कार्याचा या दिवशी सत्कार करून त्यांना उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांप्रदायिक याठिकाणी सर्वोच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच शिक्षकांनी घडविले आहे हे विसरून चालणार नाही. जन्मता कोणीही मोठे नसतात.ती स्वतःच्या कर्तुत्वाने व शिक्षकांच्या ज्ञानदानाने मोठे होत असतात. पहिलीपासून ते वेगवेगळ्या शिक्षण शाखेमध्ये शिक्षक काम करत असतात. प्रत्येक विद्याशाखेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. यापुढेही प्रयत्नशील राहतील. फक्त गरज आहे ती शिक्षका प्रति आदर बाळगण्याची व त्यांचा योग्य तो मान सन्मान राखण्याची. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा कौतुक सोहळा संपन्न होत असतो. महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांचा मनापासून कौतुक करूया. व पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा देऊया. पुढील काळातही शिक्षणाचे हे पवित्र कार्य अखंडपणे सुरू राहण्यासाठी सर्व शिक्षक बांधवांना खुप खुप शुभेच्छा.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment