Monday, 31 May 2021

लघुकथा:- सांजवेळ

                      लघुकथा:- सांजवेळ

सांजवेळ झाली होती पक्षाने स्वतःच्या घरट्याकडे जायला किलबिलाट सुरू केला होता. पक्ष्यांच्या घरट्याकडे जाण्याची ओढ पाहून हिराला स्वतःच्या घराकडची आठवण झाली. सात महिन्यांचे तान्हे गोंडस बाळ घरी झोक्यात टाकून हिरा जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी दुपारपासूनच आलेली होती. लहानपणा पासून गरिबीचे चटके भोगत, जन्मतः नशिबाने कपाळावर कोरलेल्या भाग्यरेषा आजमावत सुखाच्या दिवसाची वाट पहात हिरा प्रत्येक दिवस घालवत होती. जन्मतः काबाडकष्ट पदरी बांधल्याने ते सोडून तरी कसे चालेल. अशी मनाची समजूत घालत हिरा दिवस-रात्र परिस्थितीशी झुंजत राहायची. लाकडे गोळा करता करता आज जरा जास्त वेळ झाला होता. हिरा आज जंगलात एकटीच होती. कोणी गडीमाणूस सोबत नसला की, बाईच्या जातीला हुरहुर वाटते. कुणी सोबतीला असले की, चार गोष्टी बोलत बोलत वेळ कुठल्या कुठे निघून जातो. मनाच्या  एका कोपऱ्यातील साठलेल्या शब्दांना मोकळ्या हवेत जोडीदारा सोबत वाट मोकळी करुन देता येते. पण आमचे मालक कधीच येत नाही. त्यांना स्वतःच्या मनाशीच कधी बोलु वाटत नाही. तर माझ्या मनासोबत कधी बोलणार. माझ्या पेक्षा त्यांना जास्त दारुची नशा चांगली वाटते. लग्न झाल्यापासुन स्वतःच्या धुंदीत हरवलेल्या या माणसा कडुन आपण तरी का अपेक्षा ठेवायची.  स्वतःच्या मनाची समजुत घालत हिरा शहाणपणाच्या गोष्टी करत करत दुपारपासून गोळा केलेल्या लाकडाची भलीमोठी मोळी डोक्यावर घेऊन घराकडे निघाली.
                          जंगलातील पाऊल वाटेने चालतांना अनवाणी पायाला बोचणाऱ्या दगड, धोंडा, काटेरी झुडपांची खुंटे याची पर्वा न करता, प्रसन्न चेहऱ्याने हिरा चालत होती. लांबसडक, पातळ शरीरबांधा, गोरीपाण कातडी, धारदार नाक-डोळे, चेहर्यावर सूर्याप्रमाणे तेच, सौंदर्याने बहरलेल्या बागेतील जणू ती शेवंतीच वाटत होती. स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान नसणारी हिरा फक्त कपाळावरील कुंकवाला आपले जीवन समजून जगत होती. जंगलातून तडातडा चालत हिरा घरी आली. डोक्यावरील ओझ्याने मान पार आवळुन गेली होती. कपाळावरील घामाचे थेंब ओघळत पुर्ण अंगात शिरले होते. कष्टाचा घाम गळायला पण नशिबच लागतं. सहजासहजी हा घाम कुणाच्या वाटायला येत नाही. ज्याच्या मनगटात कष्ट करण्याची ताकद असते. त्यालाच देव घाम गाळण्याची संधी देतो. अशी मनाची समजुत घालत हिराने डोक्यावरची मोळी अंगणात धाडकन फेकून दिली. अंगावरील लुगड्याच्या पदराने तोंडावरील घाम पुसत हिरा लगबगीने घरात शिरली. एखाद्या नुकत्याच जन्मलेल्या गायीच्या वासराला जशी गाय चुटूचुटू चाटत असते. तसे हिराने पटकन झोपेतील आपल्या लेकराला उचलून घेतले व त्याचे पटापट मुके घेऊ लागली. सांजवेळ झाल्याने बाळ झोपेतून उठून झोक्यातच आपलं मनाशीच खेळत होतं. आता मात्र हिराच्या स्पर्शाने व गालावरील मुक्याने जणू माय लेकराचं पोट भरत होतं. लेकराचा मुका घेतांना आयुष्यातील सर्व दुःख पार पळून गेलं होतं. हिरा लेकराला घेऊन खाली बसणार तेवढ्यात म्हातारी मोठ्याने ओरडली.
“अग पोरी पायावर पाणी घे, दिवसभर कुठे कुठे भटकुन आलीस कुणास ठावूक.”
“लेकराला ठेव खाली बघू आधी....!”
तुला कितींदा सांगितले. बाहेरून आल्यावर पायावर दोन तांबे ओतल्या शिवाय लेकराला घेत जाऊ नकोस....! लेकरांवर कुण्या पाप्याची सावली पडायला नको….!
“बरं....! बरं....! माय.”
आधी पायावर पाणी घेते. तोंडाला पण पाणी लावते. मग माझ्या लेकराला पोटभरून दुध पाजते. दुपारपासून माझं सोनं उपाशी आहे. भुक लागली असेल. पण आपल्या आजीला त्रास नको म्हणून रडत नाही. खुप गुणाचं हाय लेकरू माझं….!
“पाज बाई लेकराला आधी शहाण्या माणसासारखं….!”
“ दुपारपासून शांत बसून तुझी वाट पाहत होतं. माझं तोंड पाहून पाहून कंटाळल असेल बिचारं....!”
माय असं काय बोलतेस. तूच त्याची खरी माय आहे. माझ्यापेक्षा तुच तर त्याला जास्त सांभाळते. सारखं तुझ्याकडेच पाहत राहत बाळ....!
“अग बाई....! लेकराला नुसतं तोंड पाहून नाही जमत.”
त्याला मायेचा पान्हा पाजावा लागतो. लेकराचं पोट तोंड पाहून भरत नाही. त्याला दूध पाजावे लागते. लेकराला पोटभर दूध पाज बघु पहिले.
म्हातारी हिराची सासू होती. पण हिराला स्वतःच्या माय प्रमाणे  जिव्हाळा लावत होती.
                          हिराचे सासरे पावसाळ्यात शेतात जनावरं सांभाळत असतांना वीज पडून वारले होते. म्हातारीने पोटतिडकीने संसार करून सात लेकरं जगवली होती. स्वतःच्या कष्टाच्या हिमतींवर सहा पोरींची लग्न लावून दिली. एकुलता एक लेक लाडाचा पाड करून तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला. लाडाने पोराला कधी परिस्थितीची जाणीव झाली नाही. गावातील पाटलाच्या पोरांसोबत राहून राहून श्रीमंतीचा माज अंगात भरून होता. रोजच गावात उचापती करत बसायचा. रोजच लोकांचे लफडे घरी येऊ लागले. गावात भांडण, अरेरावी यामुळे म्हातारी पोराला कंटाळून गेली होती. म्हातारीला गावातील अनेकांनी, नातलगांनी लग्न करून टाकण्याचे समजावले होते. म्हातारीला वाटले लग्नामुळ तरी पोरगं सुधारेल. नातलगातील पोरगी पाहून महादेवाचे हिरा सोबत लग्न लावून दिले. पिवळी जरत पोर घरात करून आणली. आता तरी महादेवा काही काम धंदा करेल, सोन्यासारखी बायको पाहून तिच्यात रमेल असे म्हातारीला वाटले. पण उलट महादेवा बिनधास्त झाला होता. कामधंदा नाही, घरात लक्ष नाही, दोन टाईम भाकरीचा तुकडा पोटात ढकलायचा आणि दिवसभर गावातील मित्रासोबत दारू ढोसत बसायचा. दिवसभराच्या नशेत धुंद झालेला महादेवा रात्री बडबड करत निपचित पडून झोपी जायचा. नवीन नवीन लग्न झाल्यामुळे हिराला महादेवाचे हे वागणे पटत नव्हते. पण ती म्हातारी व नवऱ्यापुढे काहीच बोलत नसे. आपल्या संसारातील हा धनी आज सुधारेल, उद्या सुधारेल म्हणून ती महादेवाला खूप समजावयाची. त्याच्या पुढे दयावया करून हात जोडून ढसाढसा रडायची. पण दारूच्या आहारी गेलेल्या महादेवाला तिचे रडणे काही समजत नव्हते. बघता बघता हिराच्या लग्नाला चार वर्षे झाली. नवरा घरात काही काम धंदा करत नाही. म्हातारीला आता काम होत नाही. घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतल्याशिवाय पर्याय नाही. याची जाणीव ओळखुन हिरा कंबर कसून कामधंदा करू लागली. जीवाचं रान करून स्वतःचा संसार फुलवू लागली. महादेवाची नशा व शिव्या याची तिला आता सवय झाली होती. म्हातारीला व महादेवाला सांभाळत हिरा घरातील गडीमाणूस झाली होती. संसाराचा गाडा चालवत असतांना महादेवा कधीकधी साथ द्यायला लागला होता. तर कधी कधी येरे मागल्या....! पुन्हा जसेच्या तसे....! दारूच्या नशेत अखंड बुडालेला महादेवा अनेक वेळा दारू सुटण्यासाठी प्रयत्न करायचा. पण दारू आणि मित्र त्याला सोडत नव्हते.
                 आयुष्यातील गरिबी व संसारातील दुःख यात अखंड बुडालेल्या हिराला एक दिवस सुखाचा अकुंर फुटलेला कळालं. हिराला दिवस गेले होते. हीराने सकाळी सकाळी म्हातारीला ही गोड बातमी सांगितली. म्हातारी तर नातवंड होणार या खुशीने देवाचे ऋण मानु लागली. म्हातारीच्या वेगवेगळ्या देवाला केलेल्या नवसाची ही कमाल होती. असे म्हातारीला ठाम वाटायचे. महादेवा तर बायकोला दिवस गेले या खुशीत खूप दारू पिऊ लागला. सकाळी दिवस उगवल्या पासून ते अर्ध्या रात्रीपर्यंत नशेच्या धुंदीत अथांग बुडालेला राहायचा. महादेवाची दारू व नशा हिराला व म्हातारीला नवीन नव्हते. म्हातारीपण महादेवा पेक्षा गर्भावस्थेत हिरावर जास्त लक्ष ठेवून होती. घराण्याला वारस हवा म्हणून म्हातारी पंचक्रोशीतल्या सर्व देवांना नवस करून दमली होती. घरची गरिबी असून सुद्धा म्हातारी हिराला हवे-नको ते बघू लागली. महादेवाच्या नशेमुळे घरात करता पुरुष नसल्यासारखे होते. हिरा दिवसभर शेतात मोल मजुरीला जात होती. एक दिवस देवाने म्हातारीची हाक ऐकली. हिराने सकाळी सकाळी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. नातू झाल्याचा आनंद म्हातारीने गावभर ओरडुन सांगितला. म्हातारा गेल्यापासून म्हातारीच्या चेहऱ्यावरील हरवलेला आनंद आज कितीतरी दिवसांनी पुन्हा झळकला होता. महादेवा तर गावातील मित्रांना घेऊन सकाळपासून आनंदाची नशा करत बसला होता. घरातील बाळाचे सुख हिरा व म्हातारी उपभोगत होती. महादेवा मुलाच्या खुशीत रोजच खूप नशा करू लागला. तोंडावर मिसरूड फुटण्याच्या आधी पासून दारू पिणारा महादेवाचे शरीर दारूमुळे फार चाळणी झाले होते. व्यसणाच्या आहारी गेल्यामुळे क्षणिक आनंद भेटत होता. पण शरीर खराब होत होते हे महादेवाला कळत नव्हते. एकदिवस दारूमुळे महादेवा च्या पोटात सारखे दुखू लागले. महादेवा एका जागेवर पडुन गडाबडा लोळु लागला. शारीरिक व्याधीमुळे सुकलेल्या झाडासारखा महादेवा खूप सुकून गेला होता. गावातील, पंचक्रोशीतील वैद्यांना दाखवुन झाले होते. पण महादेवाला काहीच फरक पडत नव्हता. अंगात रग होती तोपर्यंत महादेवा फार उन्मत्त झाला होता. मारक्या बैला सारखा भेटेल त्याला टक्कर देण्यासाठी सज्ज राहायचा. गोरगरीब लोकांशी दादागिरी करायचा. स्वतःचा बाप देवासारखा मयाळु होता. कधी कुणालाही रुतला नाही. देवासमान माणूस लवकरच देवाघरी गेला. महिन्याभरा पूर्वी पोराच्या जन्माने म्हातारीच्या डोळ्यात दोन सुखाचे क्षण उमटले होते. ते महादेवाच्या आजारापायी आटूण गेले. हिरा व म्हातारी महादेवाच्या व्याधीमुळे खूप दुःखी होत्या. देवाने माझ्याच कपाळावर का असे लिहून ठेवले. देवा तु माझ्या कपाळाच्या कुंकवाच्या का मागे लागलास. हिरा खूप रडून देवाला विचारत होती.
                शेवटी एक दिवस सूर्यनारायण लख्ख प्रकाश घेऊन उगवले होते. पण आज हिराच्या घरात अंधार कोसळला होता. महादेवा म्हातारीला व हिराला सोडून कायमचा निघून गेला होता. स्वतःचा बाप असाच शेतात काबाडकष्ट करतांना लहान लहान लेकरांना सोडून गेलता. महादेवाही पोटच्या पोराला एक महिन्यात पोरका करून गेला. घरातील पुरुष गेल्यामुळे म्हातारी व हिरावर दुःखाचा फार डोंगर कोसळला होता. महादेवाच्या जाण्यामुळे घराची जबाबदारी हिराच्या खांद्यावर आली होती. दिवस-रात्र कष्ट उपसणारी हिरा पोटच्या गोळ्या मध्ये महादेवाला पाहत होती. आता घरातील म्हातारा व महादेवा दोन्ही या लेकरांमध्येच दिसत होते. आयुष्यात याला तरी बापा प्रमाणे वाया जाऊ द्यायचे नाही. असा विचार करत करत हिरा लेकराला पाजत होती. महादेवाच्या आठवणीने तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. जवळ जवळ महादेवाला जाऊन सहा महिने झाले होते. पण हिराला तरीही महादेवाची आठवण सारखी पाठीमागे घेऊन जायची. त्याच्या आठवणीने तिला पाठीमागचे सगळे दिवस आठवायचे. महादेवाच्या आठवणीत हरवलेल्या हिराला पाहून म्हातारीने मोठ्याने आवाज दिला.
“पोरी कुठं हरवलीस किती वेळापासून लेकरू पाजत बसली आहे.”
“लेकरू पिऊन तुझ्या मांडीवर झोपी गेलं आहे.”
“तुझं लक्ष आहे का? त्याच्याकडं....!”
अशा सांजवेळाला लेकरांला झोपू देऊ नये. लेकरू उठल्यावर किरकिर करतं मगं....! म्हातारीच्या आवाजाने हिरा दचकून भानावर आली. पटकन डोळे पुसून लेकराला मांडीवरून उचलून झोक्यात टाकले.
“अहो....!”
“किती आठवणीत हरवते मी तुमच्या....!”
“तुम्हाला आमची आठवण येते की नाही.”
अशी मनाशी पुटपुटत हिरा चुलीकडे निघून गेली.

✍✍✍✍
© राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852


Sunday, 16 May 2021

               मी पणाचा अहंकार....!

माणूस म्हणून जगत असतांना प्रत्येकामध्ये मी पणाचा अहंकार दिसून येतो. माझ्या मुळे हे शक्य झाले, मीच हे केले, मी नसतो तर हे अशक्य होते. अशी अनेक मी पणाचे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. कुटुंबात, शेजारी, मित्रामध्ये, समाजात अशा ठिकाणी मी पणाचा अनुभव आपल्याला येत असतो. मुळात मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याला समाजात राहायला आवडते. तो एकटा जीवन जगू शकत नाही. निसर्गाने त्याला जन्मता समाजशील म्हणूनच जन्माला घातलेले असते. जन्मानंतर त्याचा संबंध आई, डॉक्टर, नर्स, इतर नातेवाईक यांच्याशी लगेच येतो. म्हणजे त्याला समूहाचा लगेच संपर्क येतो. समाजशील जीवन जगतांना माणूस स्वतःच्या जगण्या बरोबरच इतरांच्या जगण्यात सुद्धा मदतगार राहतो. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, या शिवाय शिक्षण, मनोरंजन, आरोग्य  या गरजा भागवत असतांना प्रत्येकाला समूहातील, समाजातील, कुटुंबातील इतरांची मदत घ्यावी लागते. प्रत्येकाला एकमेकांच्या मदतीने स्वतःचे जीवन सुखकर बनवता येते. प्रत्येक मनुष्य स्वतः बरोबर इतरांना मदत करण्यास पुढे येतो. यात काही जण मदत करतात. तर काहीजण मदत करण्यास स्पष्ट नाकारतात. असे का होते, तर त्यांचा मी पणा नडतो. प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीसाठी मी पणा जबाबदार ठरत असतो. आपण इतरांसाठी काही करतो म्हणजेच आपल्या मुळे चांगले घडले हा आपला मी पणाचा अहंकार आहे.
               मुळात या जगात निसर्गाने प्रत्येकाला भरपूर काही दिले आहे. भगवंताने प्रत्येकाला सक्षम बनवून या पृथ्वीतलावर जन्मला घातलेले आहे. या ठिकाणी असणारी प्रत्येक गोष्ट ही निसर्गनिर्मित आहे. निसर्गाने जमीन, हवा, पाणी, ऊन या गोष्टी दिलेल्या आहे. आपण या गोष्टीचा वापर आपल्या गरजांसाठी करतो. यात मात्र मी पणाचा अहंकार स्पष्ट दिसून येतो. आज समाजात मी पणाचा अहंकार मिरवत असणारी अनेक माणसं दिसतात. याच मी पणाच्या अहंकारामुळे समाजात गरीब-श्रीमंत असा भेद करणारे दोन वर्ग निर्माण होतात. मुळात जन्माला येतांना भगवंताने प्रत्येकाला सारखेच बनवून पाठवले आहे. शरीररुपी देह प्रत्येकाचा सारखाच आहे. तरीही माणूस मानवी शरीराचा सुद्धा अहंकार करतो. शरीरभेद, रंगरूप, यांचा सुद्धा माणसं अहंकार करतात. समाजात आज सामाजिक गोष्टी पुढारी पूर्ण करतात. कौटुंबिक गोष्टी कुटुंबप्रमुख पूर्ण करतो. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या अशा अनेक इतर गोष्टी त्या त्या क्षेत्रातील ती ती व्यक्ती पूर्ण करत असतात. या सर्वांचा ते मात्र अहंकार करतात. माझ्या मुळेच सर्वकाही चांगले घडत आहे.
             माणसाला माणसाने केलेली मदत अथवा, अडचणीच्या काळात दिलेला धीर हा उपकार नसून ती एक माणुसकीची भावना आहे. त्यामुळे त्याचा अहंकार केला नाही पाहीजे. मुळात अहंकार हा सर्व सुखाचा नाश करणारा आहे. माणसातील माणुसपण नष्ट करणार आहे. माणसाला कनिष्ठ, हीन लेखणारा आहे. म्हणून प्रत्येकांने अहंकार रहीत वागायला हवे. आज जगात जे काय आहे ते आपले नाही. कारण प्रत्येकाने जन्माला येतांना सोबत काही आणले नव्हते. व जातांना सुद्धा सोबत काही नेणार नाही. जे काय आयुष्यात कमावले, जीवनाला बाह्यपणाची, सुख सुविधेची झालर पांघरली ती एक दिवस येथेच सोडून जावे लागणार आहे. मरतांना सोबत काहीच येत नाही. पैसा, धन, संपत्ती, संतती, मान, सन्मान, ऐश्वर्यसंपन्न जगलेलं आयुष्य, वेगवेगळ्या मानाची पदे काहीही सोबत येत नाही. तरीसुद्धा माणूस या सर्व गोष्टींचा सतत अहंकार करत असतो. त्याच्या वागण्यात, बोलण्यात, त्याच्या जगण्यात, मी पणाचा हा अहंकार सतत दिसून येत असतो. हा मी पणाचा अहंकार माणसाला स्वतःच्या आयुष्यात गुरफटून ठेवतो. मधमाशी ज्याप्रमाणे मधाच्या पोळ्याला सारखी चिटकून राहते. त्याप्रमाणे माणसाला हा चिटकलेला अहंकार शेवटपर्यंत सोडत नाही. म्हणून प्रत्येकाने मी पणाच्या अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. अहंकार विरहीत जीवन आनंदी व सुखदायी असते. संत, महात्म्यांनी कधीच मी पणाचा अहंकार केला नाही. त्यामुळे त्यांचे श्रेष्ठत्व आपल्याला देवासमान वाटते. प्रत्येकाने मी पणाच्या अहंकाराला मागे सोडून आनंदी व सुखदायी जीवन जगायला सुरुवात करूया. मनुष्य जन्माचे श्रेष्ठत्व ओळखून जीवन जगूया.

✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

Friday, 7 May 2021

 कवितेचे शिर्षक:- वेडं मन


मना मनाची गुंफण

कळली नव्हती मला

मन सारखं भटकत होतं

हे कळतच नव्हत मला

आवर घालायची होती

माझ्या वेड्या मनाला

चिंब भिजलेल्या डोळ्यांनी

मन माझं पारखत होतो

असंख्य वेदनातूनही

त्याला सोडवत होतो

अनेक शब्दांचे आघात

मन पेलत होतं

गुरफटलेल्या विचाराला

मन सावरत होतं

स्वप्नातूनही जागवायच होतं

झोपेतूनही उठावायचं होतं

जीवनाच्या वाटेवरती

माझ्या वेड्या मनाला

जगायला शिकवायचं होतं


✍✍✍✍ 

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852


Thursday, 6 May 2021

कवितेचे शिर्षक:- आई

                       कवितेचे शिर्षक:- आई


जिवाच रान करून तिनं सांभाळलं होतं मला

लहानाचं मोठं करता करता भान उरलं नव्हतं तिचं तिला ||

ती उपाशीपोटी राहून घास भरवत होती मला

तिच्या ममतेचा एक एक घोट पाजत होती मला ||

ऊन वारा लागू नये म्हणून ती जपत होती मला

तिच्या मायेचा पदर पसरवत होती माझ्या अंगाला ||

ती रात्रभर जागी राहून झोपवत होती मला

तिच्या प्रेमाचा झोका झुलवत होती सदा ||

नजर लागेल कुणाची आपल्या बाळाला म्हणून

तिच्या आसवांचा ठिपका देत होती माझ्या गालाला ||

कसं विसरून चालेल या थोर माझ्या आईला

जिने जन्मा बरोबर जग दाखविले या जिवाला ||

✍✍✍✍

राजेंद्र शेळके

9823425852


Wednesday, 5 May 2021

कवितेचे शिर्षक:- माझे घर

                 कवितेचे शिर्षक:- माझे घर

दगड मातीचे घर
माझा निवारा होता
सारवलेल्या मातीचा वास
काही वेगळाच होता

दारात टाकलेला सडा
आणी काढलेली रांगोळी
हेच होते घराचे वैभव
दिवा सांयकाळी पाजळी

मातीच्या घरात होती 
सोन्यासारखी माणसं
प्रेम जिव्हाळा आणि विश्वास
यांचा दरवळत होता येथे सुंगध

घराला माझ्या होते 
माणुसकीचे कुंपन
घरी येणाऱ्या प्रत्येकाशी
होत होती नात्यांची गुंफण

घराच्या चार भिंती येथे
चार विश्वासाचे खाब होते
प्रत्येक कुटुंबाचा आदर करणे
असे माझे घर होते.

✍✍✍✍
राजेंद शेळके
9823425852

Tuesday, 4 May 2021

कवितेचे शिर्षक:- शेतकरी

                        कवितेचे शिर्षक:- शेतकरी

दिवसभर उन्हात राब राब राबुन
निघतो कष्टाचा घाम
तेव्हा कुठे मिळतो दाम ||

जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या
पोटात भरवतो घास
त्याला नाही पैशाचा भास ||

शेती त्याची काळी आई
तिच त्याचा जीवप्राण
बाळगतो त्याचा अभिमान ||

दुष्काळ आणि अतिवृष्टी
त्याच्या मागे लागते हातधुन
दरवर्षी तिच कटकट तिच बोंब ||

सरकार आणि पुढारी
देतात कोरडी आश्वासने
मदतीची पुसतात तोंडाला पाने ||

पुन्हा उमेदीने उभा राहतो
करतो अभिमानाने शेती
हा काळ्या आईचा शेतकरी ||

✍✍✍✍
राजेंद शेळके
९८२३४२५८५२

Monday, 3 May 2021

कवितेचे शिर्षक:- जीवनाची पाऊलवाट

                जीवनाची पाऊलवाट


जीवनाच्या वाटेवरती
शोधत होतो प्रकाश
अंधाराला सावरत सावरत
प्रकाशाची पहात होतो वाट....! 

जीवनाच्या वाटेवरती
नव्हते कोणी सोबती
मीच होतो एकटा
मला सावली सोबती....! 

जीवनाचा पाऊल रस्ता
चालून चालून थकलो होतो
पण थकल्या नव्हत्या
अंधारमय पाऊलवाटा....! 

प्रकाश शोधता शोधता
दुःखी झालो होतो मी
पण दुःखी झाला नव्हता
जीवनमय अंधार....! 

जीवनाचा रस्ता संपता
संपला होता अंधार
पण संपली नव्हती
प्रकाशमय जीवनाची पाऊलवाट....! 

✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

Sunday, 2 May 2021

क्षणभंगूर जीवन....!

                       क्षणभंगूर जीवन....!

मनुष्य जन्माला येतो तो आनंदाचा क्षण घेऊनच. कुटुंब, नातेवाईक, आई-वडील यांना खूप आनंद होतो. बालपणाचा मन भरून आनंद सगळ्यांना वाटत वाटत माणूस मोठा होतो. स्व ची जाणीव व्हायला लागली की, मनुष्य स्वतःच्या जीवनाविषयी स्वप्न बघायला लागतो. आयुष्य कसे जगायचे? आयुष्य कसे असावे? या विचारात गढून जातो. भविष्याची स्वप्न रंगवत असतो. मुळात जीवन जगतांना परिस्थिती, जात, धर्म, शिक्षण, वातावरण, समाज या गोष्टींचा माणूस विचार करत नाही. असेल त्या परिस्थितीत, असेल त्या ठिकाणी स्वतःचे आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात जीवन जगताना इतर बाधक ठरणारे घटक बाजूला सारून मुक्तपणे जीवन जगता आले पाहिजे. आयुष्यात पुढे काय घडणार आहे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागणार हे माहिती नसते. त्यामुळे सदैव प्रत्येक क्षणाला जगण्याचा आनंद घेतला तर मनुष्य सुखी होईल. आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठी मनुष्य सतत धावाधाव करत असतो. अपेक्षांची ओझी स्वतः तयार करून ठेवतो. व हे अपेक्षांचे ओझे पूर्ण करण्यासाठी मनुष्य सतत काबाडकष्ट करत राहतो. यामध्ये स्वतःचे आयुष्य जगायचे राहून जाते. प्रत्येक जण करत असलेले काम, परिस्थिती, शिक्षण व घराणेशाहीतुन मिळालेले काम प्रत्येक जण करत असतो. स्वतः काबाडकष्ट करत असताना प्रत्येकाने आयुष्यात जगायला शिकावे. आयुष्य हे क्षणभंगुर आहे त्यामुळे ते प्रत्येक क्षणाला जगले पाहिजे. जीवन हे पाण्याच्या बुडबुड्या सारखे आहे. पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल सांगता येत नाही. त्याप्रमाणे आयुष्य कधी संपेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक क्षणाचा मनभरून आनंद घेतला पाहिजे. सुखाचा जरा आपणच निर्माण करत असतो. तो सुखाचा जरा क्षणाक्षणाला उपभोगला तर आयुष्याचे क्षणभंगूर जीवन जगले असे म्हणता येईल. मानसन्मान, प्रतिष्ठा, पद, यासाठी माणूस सतत झटत राहतो. घरदार, संपत्ती, संतती यासाठीसुद्धा झटत राहतो. स्वप्नांचे ओझे आयुष्यभर स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात बंद करून माणुस जगत असतो. आपण या पृथ्वीतलावर एक पाहुणे म्हणून जन्माला आलो आहोत. एक दिवस हे जग सोडून जावे लागणार आहे. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही. परंतु जन्म व मृत्यूच्या मधील काळ मात्र उपभोगण्याचे आपल्या हातात आहे. आयुष्यात सुख-दुःख, यश, अपयश यांची खंत करत न बसता. प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण भरभरून आनंदाने जगला पाहिजे. एक क्षण आपल्या हातात आहे. पुढील क्षण मात्र आपल्या हातात नाही. त्यामुळे चिंता करत न बसता, आहे त्या क्षणाचा आनंद घेऊया. जीवन अनमोल आहे ते आनंदाने घालवूया.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा ता सिंदखेड राजा 
जि बुलढाणा
9823425852

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...