मी पणाचा अहंकार....!
माणूस म्हणून जगत असतांना प्रत्येकामध्ये मी पणाचा अहंकार दिसून येतो. माझ्या मुळे हे शक्य झाले, मीच हे केले, मी नसतो तर हे अशक्य होते. अशी अनेक मी पणाचे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. कुटुंबात, शेजारी, मित्रामध्ये, समाजात अशा ठिकाणी मी पणाचा अनुभव आपल्याला येत असतो. मुळात मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याला समाजात राहायला आवडते. तो एकटा जीवन जगू शकत नाही. निसर्गाने त्याला जन्मता समाजशील म्हणूनच जन्माला घातलेले असते. जन्मानंतर त्याचा संबंध आई, डॉक्टर, नर्स, इतर नातेवाईक यांच्याशी लगेच येतो. म्हणजे त्याला समूहाचा लगेच संपर्क येतो. समाजशील जीवन जगतांना माणूस स्वतःच्या जगण्या बरोबरच इतरांच्या जगण्यात सुद्धा मदतगार राहतो. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, या शिवाय शिक्षण, मनोरंजन, आरोग्य या गरजा भागवत असतांना प्रत्येकाला समूहातील, समाजातील, कुटुंबातील इतरांची मदत घ्यावी लागते. प्रत्येकाला एकमेकांच्या मदतीने स्वतःचे जीवन सुखकर बनवता येते. प्रत्येक मनुष्य स्वतः बरोबर इतरांना मदत करण्यास पुढे येतो. यात काही जण मदत करतात. तर काहीजण मदत करण्यास स्पष्ट नाकारतात. असे का होते, तर त्यांचा मी पणा नडतो. प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीसाठी मी पणा जबाबदार ठरत असतो. आपण इतरांसाठी काही करतो म्हणजेच आपल्या मुळे चांगले घडले हा आपला मी पणाचा अहंकार आहे.
मुळात या जगात निसर्गाने प्रत्येकाला भरपूर काही दिले आहे. भगवंताने प्रत्येकाला सक्षम बनवून या पृथ्वीतलावर जन्मला घातलेले आहे. या ठिकाणी असणारी प्रत्येक गोष्ट ही निसर्गनिर्मित आहे. निसर्गाने जमीन, हवा, पाणी, ऊन या गोष्टी दिलेल्या आहे. आपण या गोष्टीचा वापर आपल्या गरजांसाठी करतो. यात मात्र मी पणाचा अहंकार स्पष्ट दिसून येतो. आज समाजात मी पणाचा अहंकार मिरवत असणारी अनेक माणसं दिसतात. याच मी पणाच्या अहंकारामुळे समाजात गरीब-श्रीमंत असा भेद करणारे दोन वर्ग निर्माण होतात. मुळात जन्माला येतांना भगवंताने प्रत्येकाला सारखेच बनवून पाठवले आहे. शरीररुपी देह प्रत्येकाचा सारखाच आहे. तरीही माणूस मानवी शरीराचा सुद्धा अहंकार करतो. शरीरभेद, रंगरूप, यांचा सुद्धा माणसं अहंकार करतात. समाजात आज सामाजिक गोष्टी पुढारी पूर्ण करतात. कौटुंबिक गोष्टी कुटुंबप्रमुख पूर्ण करतो. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या अशा अनेक इतर गोष्टी त्या त्या क्षेत्रातील ती ती व्यक्ती पूर्ण करत असतात. या सर्वांचा ते मात्र अहंकार करतात. माझ्या मुळेच सर्वकाही चांगले घडत आहे.
माणसाला माणसाने केलेली मदत अथवा, अडचणीच्या काळात दिलेला धीर हा उपकार नसून ती एक माणुसकीची भावना आहे. त्यामुळे त्याचा अहंकार केला नाही पाहीजे. मुळात अहंकार हा सर्व सुखाचा नाश करणारा आहे. माणसातील माणुसपण नष्ट करणार आहे. माणसाला कनिष्ठ, हीन लेखणारा आहे. म्हणून प्रत्येकांने अहंकार रहीत वागायला हवे. आज जगात जे काय आहे ते आपले नाही. कारण प्रत्येकाने जन्माला येतांना सोबत काही आणले नव्हते. व जातांना सुद्धा सोबत काही नेणार नाही. जे काय आयुष्यात कमावले, जीवनाला बाह्यपणाची, सुख सुविधेची झालर पांघरली ती एक दिवस येथेच सोडून जावे लागणार आहे. मरतांना सोबत काहीच येत नाही. पैसा, धन, संपत्ती, संतती, मान, सन्मान, ऐश्वर्यसंपन्न जगलेलं आयुष्य, वेगवेगळ्या मानाची पदे काहीही सोबत येत नाही. तरीसुद्धा माणूस या सर्व गोष्टींचा सतत अहंकार करत असतो. त्याच्या वागण्यात, बोलण्यात, त्याच्या जगण्यात, मी पणाचा हा अहंकार सतत दिसून येत असतो. हा मी पणाचा अहंकार माणसाला स्वतःच्या आयुष्यात गुरफटून ठेवतो. मधमाशी ज्याप्रमाणे मधाच्या पोळ्याला सारखी चिटकून राहते. त्याप्रमाणे माणसाला हा चिटकलेला अहंकार शेवटपर्यंत सोडत नाही. म्हणून प्रत्येकाने मी पणाच्या अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. अहंकार विरहीत जीवन आनंदी व सुखदायी असते. संत, महात्म्यांनी कधीच मी पणाचा अहंकार केला नाही. त्यामुळे त्यांचे श्रेष्ठत्व आपल्याला देवासमान वाटते. प्रत्येकाने मी पणाच्या अहंकाराला मागे सोडून आनंदी व सुखदायी जीवन जगायला सुरुवात करूया. मनुष्य जन्माचे श्रेष्ठत्व ओळखून जीवन जगूया.
✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment