क्षणभंगूर जीवन....!
मनुष्य जन्माला येतो तो आनंदाचा क्षण घेऊनच. कुटुंब, नातेवाईक, आई-वडील यांना खूप आनंद होतो. बालपणाचा मन भरून आनंद सगळ्यांना वाटत वाटत माणूस मोठा होतो. स्व ची जाणीव व्हायला लागली की, मनुष्य स्वतःच्या जीवनाविषयी स्वप्न बघायला लागतो. आयुष्य कसे जगायचे? आयुष्य कसे असावे? या विचारात गढून जातो. भविष्याची स्वप्न रंगवत असतो. मुळात जीवन जगतांना परिस्थिती, जात, धर्म, शिक्षण, वातावरण, समाज या गोष्टींचा माणूस विचार करत नाही. असेल त्या परिस्थितीत, असेल त्या ठिकाणी स्वतःचे आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात जीवन जगताना इतर बाधक ठरणारे घटक बाजूला सारून मुक्तपणे जीवन जगता आले पाहिजे. आयुष्यात पुढे काय घडणार आहे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागणार हे माहिती नसते. त्यामुळे सदैव प्रत्येक क्षणाला जगण्याचा आनंद घेतला तर मनुष्य सुखी होईल. आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठी मनुष्य सतत धावाधाव करत असतो. अपेक्षांची ओझी स्वतः तयार करून ठेवतो. व हे अपेक्षांचे ओझे पूर्ण करण्यासाठी मनुष्य सतत काबाडकष्ट करत राहतो. यामध्ये स्वतःचे आयुष्य जगायचे राहून जाते. प्रत्येक जण करत असलेले काम, परिस्थिती, शिक्षण व घराणेशाहीतुन मिळालेले काम प्रत्येक जण करत असतो. स्वतः काबाडकष्ट करत असताना प्रत्येकाने आयुष्यात जगायला शिकावे. आयुष्य हे क्षणभंगुर आहे त्यामुळे ते प्रत्येक क्षणाला जगले पाहिजे. जीवन हे पाण्याच्या बुडबुड्या सारखे आहे. पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल सांगता येत नाही. त्याप्रमाणे आयुष्य कधी संपेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक क्षणाचा मनभरून आनंद घेतला पाहिजे. सुखाचा जरा आपणच निर्माण करत असतो. तो सुखाचा जरा क्षणाक्षणाला उपभोगला तर आयुष्याचे क्षणभंगूर जीवन जगले असे म्हणता येईल. मानसन्मान, प्रतिष्ठा, पद, यासाठी माणूस सतत झटत राहतो. घरदार, संपत्ती, संतती यासाठीसुद्धा झटत राहतो. स्वप्नांचे ओझे आयुष्यभर स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात बंद करून माणुस जगत असतो. आपण या पृथ्वीतलावर एक पाहुणे म्हणून जन्माला आलो आहोत. एक दिवस हे जग सोडून जावे लागणार आहे. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही. परंतु जन्म व मृत्यूच्या मधील काळ मात्र उपभोगण्याचे आपल्या हातात आहे. आयुष्यात सुख-दुःख, यश, अपयश यांची खंत करत न बसता. प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण भरभरून आनंदाने जगला पाहिजे. एक क्षण आपल्या हातात आहे. पुढील क्षण मात्र आपल्या हातात नाही. त्यामुळे चिंता करत न बसता, आहे त्या क्षणाचा आनंद घेऊया. जीवन अनमोल आहे ते आनंदाने घालवूया.
✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा ता सिंदखेड राजा
जि बुलढाणा
9823425852
No comments:
Post a Comment