लघुकथा:- देवमाणूस
रेल्वे गाडीचा मोठ्याने हॉर्न वाजला. तेवढ्यात पांढऱ्या शुभ्र कपड्यावर काळा कोट घातलेल्या साहेबांनी दिमाखात हिरवा झेंडा दाखवला. व रेल्वे रूळावरून हालली. करकर आवाज करत रेल्वेच्या चाकांनी खूप वेळेनंतर जागा सोडली. इंजन डबा जसा जसा जोरात ओढू लागला तशी चाके जोरात घुमू लागली. रेल्वेचा एकेक डब्बा रेल्वे स्थानकाला सोडून पुढे निघाला होता. माझा डब्बा शेवटचा होता त्यामुळे मी रेल्वेस्थानक निरखून पाहत होतो. माझी नजर गर्दीतील सर्व गोष्टींना मन भरुन पाहत होती. काही वेळातच माझा डब्बा सुद्धा रेल्वेस्थानक मागे सोडून इंजन सोबत गतिमान झाला होता. बिचारा काळ्या कोटातील साहेब शेवटपर्यंत हिरवा झेंडा दाखवत उभा होता. किती काळजी बिचाऱ्याला या रेल्वेतील प्रत्येक प्रवाशाची. त्याच्या हातातील या हिरव्या झेंड्यात काय ताकत होती. झेंडा दाखवताच एवढी मोठी लांबच लांब रेल्वे चालायला लागली. नुसती चालायला लागली नाही तर भरधाव वेगाने धावायला सुद्धा लागली होती. त्या हिरव्या झेंड्याच्या विचारात मी गर्दीतून आत शिरलो. एका सीटवर एक वयस्कर गृहस्थ बसले होते. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. हळूच नजर खिडकीतून बाहेर फिरवली. बाहेर पुसट पुसट हिरवे रंगीबेरंगी काहीतरी दिसत होते. बाहेरील दृश्य स्पष्ट दिसावे म्हणून माझ्या मानेने खूप आटापिटा केला. पण खिडकी जवळ ते वयस्कर गृहस्थ बसलेले असल्यामुळे मला बाहेरचे स्पष्ट दिसणे शक्य नव्हते. शेवटी मी निराश होऊन शारीरिक हालचाल थांबवून स्तब्ध बसून राहिलो. मी स्वतःच स्वतःवर रागावलो. आर्यन साहेब….! उशीर हा आपला नेहमीचा ठरलेला भाग आहे. त्यामुळे प्रत्येक बोगीतील स्वच्छ चांगली जागा गेलेलीच असते. सुदैवाने आज कमीत कमी बसायला तरी जागा मिळाली इतर वेळी उभेच जावे लागते. आज कदाचित अर्धा तास लवकर आलो असतो तर चांगली खिडकी जवळची जागा मिळवता आली असती. असो....! आता मिळाली त्या जागेवर शांत बसून राहू. अशी मनाची समजूत काढत मी शीटला डोके टेकवून डोळे मिटुन घेतले. आता माझे डोळे शांत होते. पण कानांनी डब्यातील लांबचा आवाज ऐकायला सुरुवात केली होती.
“चाय....! चाय....! गरमा गरम चाय....!”
“पाणी बॉटल....! ठंडा पाणी बॉटल....!”
“समोसा....! समोसा....! गरम गरम समोसा....!”
थोड्या वेळापूर्वी रेल्वे स्थानकावरून चढलेल्या विक्रेत्यांनी स्वतः जवळील पदार्थ विकायला सुरुवात केली होती. मी पक्के डोळे लावून कानांना सुद्धा शांत झोपायला सांगितले. तेवढ्यात शेजारच्या त्या वयस्कर गृहस्थांनी मला आवाज दिला.
“हॅलो साहेब....!”
“प्लीज आपण थोडा वेळ इकडे बसता का?”
“मी त्या गृहस्थाच्या आवाजाने पटकन डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले. त्यांनी परत एकदा मला विचारले.”
“प्लीज आपण थोडा वेळ इकडे बसता का?”
“मी त्यांना पटकन विचारले. का बरं आजोबा....!”
“माझी गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे.”
थोडेशे काहीतरी खाऊन घेतो. म्हणजे गोळ्या घेता येईल. खिडकीतून खूप वारा आतमध्ये येतो. त्यामुळे तिथे दोन घास व्यवस्थित खाता येणार नाही. की पाणी व्यवस्थित पिता येणार नाही. त्यामुळे आपण थोडा वेळ खिडकी जवळ बसले तर खूप बरे होईल.
“मी त्यांना हो म्हणायच्या आत ते जागेवरून उठले सुद्धा व उभे राहून मला म्हणतात.”
“आणि हो....! मला आजोबा म्हटलेले आवडत नाही. मी अजून मनानं तरुण आहे.”
मी चुपचाप माझ्या जागेवरून उठलो व खिडकी जवळ जाऊन बसलो. मी हळूच खिडकीतून नजर बाहेर फिरकावली. पण मनात त्या गृहस्थाचा रागच आला. अतिशय वयस्कर, शरीर थकलेले, बोलतांना आवाजात थकवा, हात थरथर कापल्यासारखे हालत आहे. तरी हे आजोबा स्वतःला तरुण समजतात ही तर कमालच आहे. मी मनातल्या मनात थोडासा हसलो. मला जरा हे ग्रहस्थ विचित्रच वाटले. मी पूर्णपणे खिडकीकडे मान वळवून बाहेर पाहू लागलो. निसर्गाचे अदभुत असे सौंदर्य दिसत होते. निसर्गाच्या नटलेल्या सौंदर्याने हा परिसर खूपच सुंदर दिसत होता. हिरवीगार उंच मोठी मोठी झाडे, काटेरी झुडपे, रंगीबेरंगी फुलांच्या वेगवेगळ्या बहरलेल्या वेली, दाट अशी झाडांनी एकमेकांसोबत केलेली गर्दी मनाला प्रसन्न करणारी होती. कदाचित या परिसरात पाऊस खूप पडत असावा. किंवा येथील माणसं कधीच झाडे तोडीत नसावी. यामुळेच एवढी सुंदर घनदाट झाडे आजही उभी आहेत. अशा सुंदर निसर्गनिर्मित ठिकाणी राहणारी माणसं किती नशीबवान असतील. मी त्या नैसर्गिक सौंदर्यात हरवून गेलो. मला प्रवासात नेहमी नवीन ठिकाणचे वेगळेपण बघायला आवडते. मी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणची सुंदरता डोळे भरुन पाहतो व मनात साठवत असतो. ही हिरवळ रंगीबेरंगी निसर्गाची दुनिया मला नेहमीच भुरळ पाडत आलेली आहे. लहानपणी मी माझ्या गावी दिवस दिवस झांडा सोबत खेळायचो. पावसाळ्यात तर दरवर्षी न चुकता झाडे लावायचो. दर शनिवारी, रविवारी त्यांना पाणी घालायचो. मी माझ्या झाडांना खूण करायचो. माझी कितीतरी झाडे आता खूप मोठी झाली असेल. आजही त्यांच्या बुडाशी दगडाने केलेल्या खुणा स्पष्ट दिसतील. मी आज प्रवासात बाहेरच्या नैसर्गिक वातावरणाने बालपणात हरवून गेलो होतो. हे बाहेरील सौंदर्य डोळे भरून पाहता यावे यासाठीच तर खिडकी जवळची जागा पाहिजे असते. नाहीतर कुठेही बसले तर काय फरक पडतो. त्या आजोबांच्या गोळ्या मुळे मला हे सौंदर्य पाहता आले. मी शांतपणे बाहेर बघत होतो. परंतु मनाने मात्र सगळीकडे फिरणे सुरूच होते. मी माझ्या मनासोबत निसर्गाच्या भ्रमंतीला दूर गेलो व तिकडेच गुंतलो. आजोबांनी मला आवाज दिला.
“अहो साहेब....!”
“या आता तुमच्या जागेवर आम्ही जातो आमच्या जागेवर. थोडी थंडी गार हवा घेतो.”
आजोबा परत उठून स्वतःच्या जागेवर बसले. मी ही पूर्वीच्या जागेवर येऊन बसलो. माझा नैसर्गिक स्वप्नभंग झाल्यासारखे झाले. मला आता बाहेरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे मागचे काहीच आठवत नव्हते. मी मनातल्या मनात त्या गृहस्थावर चिडून झोपण्यासाठी डोळे मिटले. तेवढ्यात त्या गृहस्थांनी मला प्रश्न केला.
“नाव काय आपले?”
“काय करता आपण?”
मला आधीच त्या आजोबाची खूप चीड आली होती. वाटेल तेव्हा स्वतःच्या वस्तूप्रमाणे माझा वापर करून घेत होते. मी मात्र वेड्यासारखं आजोबा म्हणेल तसे वागू लागलो होतो. मला आजोबांचे बोलणे स्पष्ट ऐकू आले पण मी न ऐकल्यासारखे करून परत जास्त घट्ट डोळे मिटुन घेतले. आजोबांनी मला परत आवाज दिला.
“अहो साहेब....!”
“झोपताय काय?”
“आता झोपायला काय रात्र झाली का?”
शक्यतो माणसांनी रात्रीच झोपावे. दिवसभर काम करत राहावे. यासाठीच तर निसर्गाने बारा तास रात्र व बारा तास दिवस अशी रचना केली आहे.
मी मनाची इच्छा नसताना सुद्धा डोळे उघडले व त्या आजोबाकडे बघितले. जेवणामुळे आजोबांच्या चेहऱ्यावर थोडी तरतरी आली होती. आवाज पण कडक येत होता. त्यांनी परत विचारले.
“नाव काय आपले?”
“काय करता आपण?”
“मी आर्यन सावंत….!”
‘भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक या पदावर काम करतो.”
“अरे वा छान....!”
“आणि राहता कुठे?”
“मी मुंबईलाच राहतो.”
“माझे मूळ गाव कोकणात आहे. परंतु शिक्षण आणि नोकरी यामुळे गेली वीस वर्ष मी मुंबईतच राहतो.”
“छान....!”
“एकंदरीत सगळं छान आहे म्हणायचं....!”
मी मानेनेच त्यांना होकार कळवला. आता त्यांना वाटले मी त्यांना नाव, गाव विचारेल. परंतु मी काहीच विचारले नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली व शांत बसून राहिलो. त्यांनी न विचारताच सांगायला सुरुवात केली.
“मी यशवंत माने….!”
माझे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पण आता मी सातारा मध्ये राहतो. मी आर्मी मध्ये तीस वर्ष लेफ्टनंट मेजर या पोस्टवर काम केले. आर्मी मधून निवृत्त झाल्यानंतर वीस वर्ष बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी केली. व गेल्या दहा वर्षापासून गोर-गरीब अनाथ मुलांसाठी मोफत सैन्य भरती अकॅडमी चालवितो. माझ्या अकॅडमीतील अनेक मुलांनी सैन्यामध्ये नोकरी मिळविली. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा तिन्ही दलात अनेक मुलं कार्यरत आहेत.
“आजोबा वयाने जवळ-जवळ ऐंशी वर्षाचे होते पण आवाजात आजही तोच कडकपणा दिसत होता.”
“आर्यन साहेब….! मी आजही तरुण आहे.”
मला अजून गोर गरीब, अनाथ मुलांसाठी खूप काम करायचे आहे. मी स्वतःला कधीच कमजोर व वृद्ध समजत नाही. माणसाने अजीवन तरुण राहावे. निर्व्यसनी, शिस्तप्रिय जीवन जगावे.
“बरोबर आहे का?”
मी मान हलवून बरोबर असल्याचे सांगितले. आजही आजोबांच्या चेहऱ्यावरील तेज व बोलण्यातील कडकपणा यावरून मला त्यांच्या स्वभावाचा अंदाज आला होता. मघाशी बोलताना त्यांनी मला आजोबांन न म्हणण्याचे का सांगितले हे मला आता कळाले होते. एवढ्या वयात सुद्धा माणूस आनंदी व कडक शिस्तीने जीवन जगतो हे खरंच आश्चर्य जनक आहे. मी एक वयस्कर गृहस्थ समजून त्यांच्या बाजूला बसलो होतो. सुरुवातीला त्यांच्याकडे पाहून वाटले नाही ते एवढे शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे असतील. मी त्यांना वृद्ध समजून पटकन दोनदा जागा बदलून दिली. थोड्या वेळा पूर्वीच्या माझ्या नैसर्गिक सौंदर्यात अशी अचानक शिस्त येईल मला वाटले नव्हते. मी मघाशी त्यांना आजोबा म्हणालो ते त्यांना का आवडले नाही हे मला आता कळाली होते. एका उच्चस्थ पदावर तीस वर्ष काम करून सुद्धा या माणसाच्या आयुष्यात किती साधेपणा आहे. आजोबांची बोलण्याची इच्छा पाहून मी ही त्यांच्याशी बोलायला लागलो.
“साहेब तुमची मुलं काय करतात.”
“साहेब नाही....!”
“काका म्हणून हाक मारा मला.”
मी साहेबांचा मान घेण्याइतपत अजून मोठा झालो नाही. साहेब ही फार मोठी पदवी आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला ही पदवी शोभत नाही.
“असो, काय म्हणालात आपण....!”
“तुमची मुलं काय करतात.”
“मला मुलंच नाही.”
वयाची ऐंशी वर्षे ओलांडल्यानंतर सुद्धा काकाच्या बोलण्यात दम होता. अतिशय उत्साहाने प्रसन्नतेने ते बोलत होते. मी मगाशी पासून फक्त ऐकत होतो. काकाजी सारखे बोलत होते. मी विचारलेल्या प्रश्नानंतर त्यांनी लगेच उत्तर दिले. त्यांना मूलबाळ नाही हे ऐकून मी शांतच बसलो. आपण त्यांना उगाच विचारले असे मला वाटले. या वयात नको त्या गोष्टीची विचारपूस करून काकांना उगाच जुन्या आठवणीचे दुःख कशाला असा विचार करून मी थोडावेळ शांतच बसलो. पुढे ते म्हणाले,
“मुलं का नाहीत हे जाणून घेणार का?”
“मी मानेने हो म्हणालो.”
“अहो किती सोपे आहे.”
“मी लग्नच केलं नाही त्यामुळे मुलं झालीच नाही.”
मला पुन्हा एकदा आश्चर्य वाटले. या काकांचे जीवन खुप ध्येयवादी दिसते. यांच्याशी बोलून यांचे जीवन जाणून घ्यायला हरकत नाही. मी त्यांच्याकडे तोंड करून उत्साहाने ऐकू लागलो.
“अहो आर्यन साहेब….!”
“मी लग्न का केले नाही सांगतो.”
“ऐका तुम्ही आता....!”
आम्ही सात भावंडे त्यात पाच बहिणी व दोन भाऊ. मी सर्वात मोठा त्यामुळे बालपणी माझे लाड तर झालेच नाही उलट लहान पणापासून जबाबदारी पडत गेली. घरी वडिलांना त्यांच्या कामात मदत करणे. लहान भावंडांना सांभाळणे. हे सर्व करत करत मी शिक्षण घेत गेलो. मला शालेय वयापासूनच देशसेवेची खूप आवड होती. माझे भारत भूमीवर खूप प्रेम होते. मी भारतभूमीच्या रक्षणासाठी तरुणपणातच वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यामध्ये भरती झालो. कुटुंबातून सर्वांचा यासाठी विरोध होता. मी मोठा असल्याने घराच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या, वडिलांना त्यांच्या व्यवसायात हातभार लावावा असे घरातील सर्वांना वाटायचे. परंतु माझा निश्चय मला रोखू शकला नाही. मी सैन्यामध्ये भरती झालो. मी भरती झाल्यामुळे घरच्यांनी मला खूप विरोध केला. सैन्यामध्ये भरती झाल्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली होती. मी पूर्ण वेळ देशसेवेत घालवत होतो. मला मिळणारे वेतन मी देशाच्या सेवेत शहीद झालेल्या कुटुंबांना दान करत असे. मी गेली तीस वर्ष देश सेवा करत असतांना कधीही सुट्टी घेतली नाही. घरी परत गेलोच नाही. सलग तीस वर्षे सेवा करून निवृत्त झालो. त्यानंतर मी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी केली. बँकेतून मिळणारे वेतन सुद्धा वृद्ध आश्रमाला दान करत होतो. बँकेत वीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालो. आता रिकामे बसून काय करावे या विचारात असतांना मी पेन्शनच्या पैशातून सैन्यभरती अकॅडमी सुरू केली. अनाथ व गरीब मुलांना या अ़कॅडमीत शिक्षण, राहण्याची व्यवस्था सर्व मोफत होते. आता गेल्या दहा वर्षापासून या अकॅडमीत काम करत आहे. मला मिळणाऱ्या पेन्शन मधून व निवृत्तीच्या वेळेस मिळालेल्या फंडातून हे सर्व सुरू आहे. आज पर्यंत कोणाचा एकही रुपया मी घेतलेला नाही. आजपर्यंत माझ्या अकॅडमीतुन अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले व या भारत भूमिच्या रक्षणासाठी सैन्यामध्ये भरती झाले. देशसेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. आपण या भारत भूमीची लेकरं आहोत. त्यामुळे या भारत भूमिसाठी जगाचे व या भारत भूमिसाठी मरायचे. अनेक लेकरं माझा हाच वसा पुढे नेत आहे. याचा मला खूप अभिमान आहे. आयुष्यात यापेक्षा हक्काची व स्वतःची लेकरं आणखीन कोणती पाहिजे. मला आयुष्यात अनेकांचा बाप होता आले. माझ्या वृद्धाश्रमातील अनेक आई-वडिलांचा मुलगा होता आले. “यापेक्षा दुसरे मोठे भाग्य कोणते?” मी एकदम शांतपणे ऐकत होतो. हे सर्व ऐकून माझे कान एकदम बधीर पडले होते. डोळ्यासमोर तर अंधार पडला होता. व मला माझ्या आयुष्यातील अहंकाराची चक्करच आली होती. आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगणारा हा माणूस किती मोठा व महान आहे हे मला आता कळले होते. सुईच्या टोकावर मावेल एवढा सुद्धा अहंकार नसलेला हा माणूस खऱ्या अर्थाने देव आहे. स्वतःचे जीवन स्वावलंबीपणे जगत आजही सेवाभाव जोपासत आहे. मी पटकन सीटवरून उठून त्यांचे पाय धरले व त्यांना बोलू लागलो. आपण खरंच आजोबा, साहेब, काका नाहीत. आपण माणसाच्या रूपातील देव आहात.
“त्यांनी मला थरथरत्या हातांनी उठवले.”
“अहो आर्यन साहेब….!”
“मी देव वगैरे काही नाही.”
“तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस आहे.”
मी शक्यतो प्रवासात येवढे कधीच कुणाला बोलत नाही. माझी जीवनाची ही कथा कुणाला सांगत नाही. तुम्ही तरुण व उच्चशिक्षित आहात. त्यामुळे तुमच्याशी एक मित्र म्हणून बोललो.
“सर आपण खरच देवमाणूस आहात.”
“अहो....! असे भावनिक व्हायचे नाही.”
माणसाला जीवनात अनेक कठोर परीक्षा द्याव्या लागतात. मी पटकन उठून माझ्या जागेवर बसलो. काकांनी मला संदेश दिला.
जीवनात चांगले कर्म करा, आयुष्य जगतांना थोडेसे दुसऱ्यासाठी जगा, अहंकार बाळगू नका, देशाप्रती अभिमान बाळगा.
“हो काका, नक्कीच....!”
तुम्ही सांगितलेल्या या सर्व सूचना मी लक्षात ठेवेल. या सूचनांचा माझ्या आयुष्यात मी नक्कीच वापर करेल. एवढ्या वेळे पासून बोलून थकले असेल म्हणून मी पटकन माझ्या जवळची पाण्याची बॉटल त्यांना देण्यासाठी पुढे केली.
“पाणी आहे माझ्याकडे साहेब....!”
असे म्हणून स्वतः जवळची पाण्याची बॉटल घेऊन त्यांनी दोन घोट पाणी पिले. स्वतःला साहेब म्हणू दिले नाही परंतु मला आदराने ते साहेब म्हणून बोलत होते.
“चला आर्यन साहेब मला उतरावे लागेल.”
“माझे स्टेशन आता काही मिनिटात येईल.”
“त्यांनी त्यांची छोटीशी पिशवी जवळ घेतली.”
“आमच्या परिसरात आले कधी तर या अॅकीडमीला भेट द्यायला.”
“हो नक्की....! काका.”
“मी एक वेळ आवर्जून भेटायला येईल.”
“त्यांनी हात जोडून नमस्कार केला.”
“मी पुन्हा एकदा पटकन त्यांचे दर्शन घेतले.”
त्यांनी माझ्या पाठीवर हात टाकून मला आशीर्वाद दिला. जीवनात जे काय करायचे ते प्रामाणिकपणे करा. तेवढ्यात रेल्वेचा हॉर्न वाजला. गाडी स्लो झाली. हळूहळू गाडी प्लॅटफॉर्मवर जाऊन उभी राहिली. काका हळूहळू उतरणाऱ्या प्रवाशांच्या मागे चालत चालत रेल्वेतून खाली उतरले. स्टेशन वरील प्रवाशांच्या गर्दीत हरवून गेले. मी खिडकीतून त्यांना शोधत होतो तेवढ्यात रेल्वे निघाली सुद्धा. मी खिडकीतून हात बाहेर काढून त्यांना बाय केले. कदाचित त्यांना माझा हात दिसला असेल की नाही हे माहीत नाही. पण आजच्या प्रवासात मला देवमाणूस भेटला हे मात्र नक्की. फुलपाखरं ज्याप्रमाणे बसेल त्या ठिकाणी उडतांना स्वतःचा रंग मागे सोडून जातात. त्या प्रमाणे या अनोळखी गृहस्थाने जातांना मला जगण्याची खूप मोठी प्रेरणा दिली. माझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. असे देवमाणूस सहजासहजी भेटत नाही. आपले नशीब आपल्याला हा देव माणूस भेटला. आज मी प्रवासात खूप भारावून गेलो होतो. रेल्वेने आता खूप स्पीड घेतला होता. खिडकीतून खूप जोरात वारा आत येत होता. मी त्या थंडगार हवेत खिडकीतून बाहेर बघितले. बाहेरच्या निसर्गाच्या सौंदर्यात माझी नजर पुन्हा हरवली. दूरवरच्या झाडांना बघत बघत मी त्यात हरवून गेलो.
✍✍✍✍
© राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852
No comments:
Post a Comment