काजवा
आज पौर्णिमा होती. सापाने कात टाकल्याप्रमाणे चंद्राने स्वतःच्या प्रकाशाची कात टाकली होती. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला होता. इतरवेळी रात्री पडणाऱ्या काळ्याकुट्ट अंधारावर मात करत प्रकाश बाहेर पडला होता. त्या प्रकाशाचा आज शिकारीसाठी फायदा करून घ्यायचा असे मी मनोमन ठरवले होते. पौर्णिमेच्या प्रकाशात शिकार चांगली गावेल व उद्याचा बेत मस्त घडवून आणता येईल. एखादे ससे, कबूतर, लाहुरी, घोरपड काहीतरी मिळाले पाहिजे. पण रात्रीच्याला सोबतीला कुणाला घ्यावे. मी थोडा वेळ विचारात पडलो. रात्रीच्याला जंगलात जायचे म्हणजे सोपे नाही. कधी कुठे अंधारात लांडगा, बिबट्या, कोल्हा दिसेल व पोट भरेल पत्ता लागणार नाही. आपण कुठे आहोत? याचा गावाला थांगपत्ता लागणार नाही. शेवटी गाव व जंगल यात फरक आहेच की....! जंगलात फिरणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय. एखाद्या दिवशी शिकारीचा शोक जीवावर बेतेल. समजदारी पूर्वक या गोष्टी केल्या पाहिजे.
दुपारची वेळ होती मी शेतातले काम संपवून लवकरच घरी परतलो. विमल दळण निवडत बसलेली होती. मी शेतातून थकून आल्यामुळे विमल जवळ भिंतीला टेकुन बसलो.
“अहो आज लवकर कसे काय परतले?”
“अगं विमल....! शेतातील काम संपले. तिथे तरी थांबून काय करणार?”
सकाळपासून सारखे काम करत होतो. त्यामुळे थकवा पण खूप आला होता. आलो मग लगोलग घरी निघून.
“बरं झालं आले ते करा आराम”
“मी चहा ठेवते.”
“चहा राहूदे”
“का बरं”
“अग उन्हातून आलो. त्यामुळे चहा राहुदे. थंडगार पाणीच दे फक्त प्यायला.”
“पाणी पण देते आणि कपभर चहा पण करते.”
“उन्हातून आल्यावर कोरा चहा घेतला म्हणजे, उन्ह तरी लागणार नाही.”
“बरं.... बरं....!”
“तुझी इच्छा आहेच तर कर एक कप चहा मस्त झकास.” विमलने आले घालून गुळाचा कोरा चहा बनवला. चहाचा फुरका मारत मी तिला म्हणालो,
“वा.... विमल....!”
“चहा झकास झाला बर का?”
“तुझ्या हाताची जादु लई चवदार आहे.”
विमल थोडीशी लाजली. पटकन पदराचा कोपरा तोंडाजवळ नेऊन तोंड लपवले.
“काय झालं विमल....!”
“काही नाही, बस झालं कौतुक....!”
“नवीनच लग्न झाल्या सारखे काय बोलताय. सहा वर्षापासून मीच चहा पाजते की तुम्हाला.”
“अग रोजच चहा मस्त करते तू....!”
“पण आज जरा जास्त चवदार झाला. म्हणून म्हणालो.”
तुम्हा बायकांना कौतुक केले तरी अडचण, नाही केले तरी अडचण. आम्ही पुरुषांनी करावे तरी काय? मी कपातील चहा संपवून कप खाली ठेवला. व विमलला म्हणालो,
“जमलं तर आज शिकारीला जातो.”
“आज अचानक असं काय?”
“आज पौर्णिमा आहे. पौर्णिमेला उजेडात शिकार करायला सोपी जाते.”
“सोबतीला कोण आहे.”
“बघू कुणालातरी सोबतीला नेतो.”
“तरी म्हटलं चहा आज जास्त गोड कसा काय लागला.” “शिकारीसाठी चहा कौतुक होते तर....!”
“विमल जरा निराश झाली होती. अग विमल मी शिकारीला जातोय लगेच जंगलात राहायला जात नाही.”
“अहो तुमची झाली शिकार पण मला रात्रीला एकटीच राहावे लागते. त्याचे काय?”
एकटीच्या मनाला किती हुरहुर लागते तुम्हाला काय त्याचे....! तुम्ही जाता शिकारीला निघून. विमल च्या नाराजीमुळे मी तिची समजूत काढली. शिकारीला जायचे दूरच राहिले मध्येच विमलच्या नाराजीचा सूर उमटला होता. “तुझी इच्छा नसेल तर जात नाही शिकारीला....! घरीच थांबतो तुला सोबतीला.”
“अहो किती मोठ्या आवाजात बोलताय.”
“माझ्यावर रागवू नका.”
मला माहित आहे. तुम्ही माझे किती ऐकता ते....! आजपर्यंत स्वतःच्या मनाने सर्वकाही करत आलात. आता तरी यापुढे कशाला विचारता. जा तुम्ही खुशाल शिकारीला. मी मला सोबतीला गया मावशींना बोलावून घेईन. रागाच्या भरात का असेना शेवटी विमल शिकारीला पाठवायला तयार झाली.
रात्री सोबतीला कुणाला न्यावे या विचारात मी पडलो. तेवढ्यात मला लखन ची आठवण झाली. मागच्यावेळी शिकारी वरून आल्यावर लखन भेटला होता. पुढच्या वेळेस कधी गेला शिकारीला तर मला सोबत येऊ दे. असा निरोप त्यांने देऊन ठेवला होता. मी लगेच लखनच्या घरी गेलो. पण तो शेतावर गेला होता.
“का आलास?”
“काय काम होते?”
“काही अचानक काम निघाले का?”
असे अनेक प्रश्न घरात बसलेल्या लखनच्या म्हातारीने विचारले.
“नाही तसे काही खास काम नव्हते.” सहजच आलतो त्याच्याकडे....! पण तो घरी नाही म्हटल्यावर येतो मी....! भेटतो नंतर त्याला मोकळ्या वेळेत. लखनची भेट न झाल्यामुळे मी निराशा पदरी घेऊन वापस निघालो होतो. म्हातारी पेक्षा विमल बरी....! किती चौकश्या करत बसली लखनची म्हातारी....! जसं काही आदल्या जन्मी सरकारी वकील होती. मी म्हातारीच्या रागाने मनातल्या मनात विचारांना सावरत घरी निघालो.
तेवढ्यात मला समोरून लखन येताना दिसला. लखनला पाहून मला जरा बरे वाटले. लखन जवळ येताच मी त्याला आवाज दिला.
“अरे लखन कुठे गेलतास? मी तुझ्या घरी जाऊन आलो.”
“अरे मी सकाळपासून शेतावर होतो. शेतात काम सुरू आहे. सकाळी लवकरच गेलतो.”
“काही भाकरतुकडा खाल्ला की नाही?”
“की नुसते काम आणि कामच करतो. जीवाला काही खात जा किती तब्येत खराब झाली.”
“अरे भावा....!”
“मी न्हारी घेऊन गेलतो सकाळी. न्याहारी करूनच काम करत होतो एवढ्या वेळ.”
“तुला काय वाटले. उपाशीपोटी काम करतो मी....!”
“छे....छे....!”
“आधी पोटोबा मग कामाचा विठोबा. आपण जगलो तेव्हा काम होईल. आपणच संपलो तर या कामाला तरी काय किंमत उरेल.”
“हो ते पण खरं आहे म्हणा....!”
“तसा तू लहानपणापासून हुशार आहे. शाळा शिकली नाही. नाहीतर मोठा साहेब झाला असता.”
“जाऊदे आता आपल्या नशिबातच नव्हती साहेबकी....!”
“बरं कसं काय आलता गरिबाकडे....!”
“वारे लखनराव....!”
“झाले लगेच तुम्ही गरीब....! द्या आम्हाला मोठेपणा....!”
“कमीत कमी शब्दाने बोलाय पुरते तरी आम्ही श्रीमंत आहोत म्हणायचो....!”
“नाही रे मित्रा”
“तू परिस्थितीने जरी श्रीमंत नसला, तरी मनाने खूप श्रीमंत आहे.”
“बस झालं.... मोठ्या झाडावर चढवणे. पडलो तर लय पंचाईत होईल.”
“मी व लखन मोठमोठ्याने हसलो.”
“बरं माझ्याकडे कसं काय येणे केले.”
“अरे मित्रा आज पौर्णिमा नाही का....!” म्हटलं आज रात्री शिकारीला जाऊया. मागच्या वेळेस तू म्हणाला होता एखाद्या वेळेस मला पण येऊद्या शिकारीला. म्हणून आज तुझी आठवण काढली.
“मला जमलं पाहिजे शिकार करणं.”
“अरे जमेल की, मी आहे ना तुझ्या सोबत....! मी शिकवीन तुला शिकार पकडायला.”
“ठीक आहे मग....! जाऊ या रात्री.”
“नेमकी कधी निघायचे रात्री....!”
रात्री जेवण वगैरे झाले की थोडावेळ अंग टाक. गावातील सर्व लोकं जेऊन झोपली की, मी गावाचा कानोसा घेईल. गाव शांत वाटलं की, लगेच तुला बोलवायला तुझ्या घरी येईल. दारावरची कडी वाजली की तू लगेच आवाज ओळखून बाहेर ये.
“बरं....! बरं....!”
तुझ्या म्हातारीला सांगून ठेव मी आज रात्री शिकारीला जाणार आहे. नाहीतर कडीच्या आवाजाने म्हातारी रात्रीच चोर चोर म्हणुन ओरडत बसेल. उगाच गावासमोर मी चोर व्हायला नको.
“नाही रे भावा....! तसं कसं होईल.”
“तू पण लयच भितो भावा....!”
“कसं आहे लखन कधीकधी भिलेलं बरं....! नाहीतर जास्तीची हुशारी अंगलट यायला वेळ लागत नाही.”
“हा.... हा.... हा....!”
लखन मोठ्याने हसू लागला. लखन हसत हसत पुढे घरी निघून गेला. मी ही घरी निघून आलो.
सायंकाळी विमलने मस्त चुलीवर झणझणीत जेवण बनवले. जेवणावर मनसोक्त ताव मारला. जिभेची इच्छा पूर्ण करत ढेकर देत ताटावरून उठलो. जेवण मस्त झाल्यामुळे पोट अगदी घागरी सारखे आकार घेत तंग झाले होते. आता पोटामुळे हालचाल सुद्धा करायची इच्छा नव्हती. मी थोडासा आराम करावा म्हणून अंथरुणावर पडलो. जमिनीला पाठ लावताच खुशीत घेतल्यासारखे वाटले. जमिनीचा स्पर्श होताच निद्रा स्पर्श करू लागली. मोठ्यांने जांभई देत अंगातील आळस झटकून झोपायला तयार झालो. पडल्यापडल्या कधी डोळे मिटले हे कळलेच नाही.
रात्रीचे बारा वाजले होते. बाहेर भयाण शांतता पसरली होती. जणू निसर्गाने श्वास घेणे बंद केले होते. हवा सुद्धा बंद झाली होती. त्यामुळे दूरवरचे स्पष्ट ऐकू येत होते. किड्यांची शाळा भरल्यागत वेगवेगळा आवाज येत होता. भू.... भू…. करत भिंगोटे फिरत होते. किड्यांचा किर्.... किर्.... आवाज येत होता. सगळे गाव गाढ झोपेत होते. गावाला पाहारा देत असल्यागत किडे सगळीकडे फिरत होते. मला शिकारीच्या आठवणीने जाग आली. मी अर्धवट झोपेत उठून बसलो. डोळे चोळत चोळत विमलला हळूच आवाज दिला. “विमल.... ये.... विमल....! मी येतो बरं का?” परत झोपेत जाग आल्यावर मी दिसलो नाहीतर आरडाओरड करत बसशील. मी शिकारीला चाललो सकाळी परत येईल. विमल गाड झोपेत रमली होती. तिला ऐकू गेले की नाही तिचे तिला माहित. चला आपण आपले कर्तव्य पार पाडले. तिला न सांगता जाण्यापेक्षा सांगून चाललो हे बरे....! असे म्हणून हळूच कोपऱ्यातील मोठी काठी घेतली. शिकारीसाठी जाळे घेतले. हळूच घराची कडी उघडून लखनच्या घराकडे निघालो. घराच्या दहा-वीस पावले चालून झाली असेल तोच रस्त्यावर कुत्रं झोपलेलं दिसलं. कुत्रं पाहून मी एकदम दबकत दबकत पाय टाकू लागलो. आपल्या पायाच्या आवाजाने जर हे कुत्रं जागी झालं तर ते अर्ध गाव उठून घेईल. व गावासमोर आपल्याला चोर, लुटारू ठरवून मोकळं होईल. त्यामुळे याला न उठवता, न कळू देता, हळूच चोर पावलांनी मी त्याच्या जवळून निघून लखनच्या घराजवळ पोहोचलो. लखनच्या दाराला कान लावून मागोसा घेतला.
लखन नक्कीच गाढ झोपलेला दिसतोय. मी हळूच दारावरची कडी ठोकली. इकडे तिकडे आजूबाजूला पाहून पुन्हा एकदा दारावरची कडी ठोकली. थोडावेळ शांतच उभा राहिलो. लखन उठल्याचा काही संकेत दिसेना. म्हणून मी परत दरवाजा जवळ जाऊन शुक... शुक... शुक... असा आवाज दिला. तरी लखनचा उठण्याचा काही पत्ता दिसेना. मला लखनचा खूप राग आला हा कुंभकर्ण आता उठेल तरी कधी? याला उठवायला करावे तरी काय? मी विचारात पडलो. मनात विचार आला एकदम मोठमोठ्याने ओरडावे लखन.... लखन.... उठ नाहीतर दरवाजा तोडून आत येईल. मग कसा पटकन उठून बाहेर येईल. पुन्हा ध्यानावर आलो ही रात्रीची वेळ आहे. या वेळेला असा ओरडून आवाज दिला तर आजूबाजूचे लोक दचकून जागे होतील. थोडावेळ शांतच उभा राहिलो. परत हळूच दारावरची कडी हातात घेतली आजूबाजूच्या आवाजाचा अंदाज घेतला व दोन चार वेळेस ठोकली. पाच मिनिटाने लखन डोळे चोळत चोळत बाहेर आला व म्हणतो, “दरवाजा वाजवण्यापेक्षा तोडून टाकायचा होता म्हणजे तुला मला उठवता आले असते.” किती वेळेपासून दरवाजे ठोकत बसला रे....! काही दम काढायचा ना....! दरवाजा उघडायला वेळ लागणारच ना....!
“बरं आहे का? लखनराव तुमचे....!”
“तू तर एखाद्या साहेबा सारखाच बोलू लागला.”
अरे लखा तू उठत नाही म्हणून दोन-चार वेळा कडी ठोकावी लागली. तेव्हा कुठे तुला जाग आली नाही तर कुंभकर्णा सारखा तू सहा महिने उठत नव्हता.
“अरे भावा....! काल शेतात काम करून खूप थकलो होतो त्यामुळे गाड झोप लागली.”
“तुझ्या शिकारीमुळे माझी झोप मोडली नाहीतर सकाळपर्यंत घोर नव्हता. मस्त झोप झाली असती.”
लखन जांभई देत अंगातील आळस बाहेर काढत होता. त्याचा आळस मला जसे काही सुचवत होता की, आजच्या दिवस शिकार राहूदे. आळस देत देतच दरवाजा ओढून घेतला. एका हातात काठी घेऊन माझ्या मागे मागे निघाला. गावात चोर आल्यागत आम्ही दोघे जण चोरपावलांनी गावाच्या बाहेर निघालो. श्वास रोखल्यागत लखन व मी तोंड मिटकुन काहीच न बोलता चालत होतो. रात्रीच्या अंधारात रस्ता शोधत शोधत गावाच्या बाहेर पडलो. एकदाचा श्वास सोडून मी आता शिकारीसाठी मोकळा झालो होतो. रात्रीच्याला गावाच्या बाहेर पडायचे म्हणजे सोपे नाही. शिपाया सारखे गल्लीत कुत्रे पहारे देत बसलेले असतात. थोडीशी चाहूल लागली असती तरी, भुंकून... भुंकून... साऱ्या गावाला आम्हाला वाटे लावायला जागे केले असते. लखन माझ्या माघे माघे चालत होता. एक शब्दही न बोलता आम्ही दोघे जंगलाकडे कुस करत होतो.
“लखन तोंड घरी ठेवून आला की काय?”
“बोल काही तरी एवढा शांत राहू नको.”
“अरे भावा....! तूच तर मघाशी मला बोटांने खुनवून शांत बसायला सांगितले.”
“अरे ते गावा बाहेर पडण्यापूरते होते. आता आपण गाव सोडून खूप दूर आलो. आता कितीही मोठ्याने बोललो तरी गावात आवाज जाणार नाही.”
“मग काय जंगलातील प्राण्यांना ओरडून सांगू? आम्ही शिकारीला येत आहे जागेच राह रे....!”
लखनला शिकारीला बळजबरीने आणल्यासारखे तो निराश होऊन बोलत होता. कदाचित झोप न झाल्यामुळे तो असा बोलत असावा. मी ही थोडा वेळ गप्पच बसून राहिलो. मी पुढे व तो माझ्या मागे चालत चालत जंगलात पोहोचलो.
घनदाट झाडी, वेगवेगळ्या वेलींची झुडपे, लहान-मोठी झाडे, यांनी सगळी जागा व्यापलेली. कुठेतरी पाऊल वाट. नाही तर झाडांच्या विळख्याने पाय टाकायला सुद्धा मोकळी जागा नाही. झाडांच्या सावलीने अमावास्या असल्यागत काळाकुट्ट अंधार पडला होता. या अंधारात आता शिकार शोधायची म्हणजे तीक्ष्ण नजर ठेवावी लागणार. मी शिकारीसाठी जाळे कुठे लावायचे या विचारात जागा शोधू लागलो. तेवढ्यात लखनचा ओरडण्याचा आवाज आला.
“अरे बापरे....!”
“काय झालं.”
“साप....! भला मोठा साप ....!”
“कुठय?”
“अरे हा काय या झुडपात गेलाय.”
“गेलास ना….! जाऊदे मंग आता. घाबरू नकोस.”
“अरे पण अंधारात आपण येथे उभे आहोत.”
“लखन आपण जंगलात आहोत. इथे अंधार असणारच ना....!”
“आणि असे कितीतरी साप इथे फिरत असतील इकडून तिकडे त्यांच्या शिकारीसाठी.” त्याला काय एवढे घाबरायचे तू फक्त चालताना खाली पाहून पाय टाकत जा. लखनचा
चेहरा एकदम भित्रा झाला होता.
“अरे लखन तू शेतकरी असून घाबरतोस.”
“अरे एवढा मोठा साप दिसल्यावर घाबरणार नाही तर काय करेल? कोणी सापाशी मैत्री थोडी करणार.”
लखन बोलायला खूप तिखट होता. एवढ्या रात्री जंगलात सुद्धा त्याचे तिखट बोलणे सुरू होते. मी झुडपाच्या मागे जाळे लावले. एखादी शिकार या जाळ्यात पडेल या आशेवर पुढे चालू लागलो. आज जर शिकार गावली नाही तर लखन खूप नाराज होईल. म्हणून मी पुन्हा पुन्हा बारकाईने प्रत्येक जाळीत शिकार शोधु लागलो. थोडे पुढे गेल्यावर एका जाळीत एकदम हिरवागार प्रकाश पडलेला दिसला. लखन एकदम दचकून थांबला आणि पटकन बोलला.
“अरे भावा तिथे कुणीतरी बसलेले आहे ते बघ....! त्या जाळी जवळ प्रकाश दिसतोय.”
“अरे एवढ्या रात्री जाळीत कोण कशाला लपून बसेल.”
“काजवे असतील ते काजवे....!”
“हे काय नवीन आता.”
“अरे लखन....! तुला काजवे माहीत नाहीत.”
काजवा हा एक कीटक आहे. तो भक्ष्य पकडण्यासाठी स्वतः स्वतः साठी प्रकाश पाडतो. काजव्यांचा प्रकाश फक्त रात्रीच पडत असतो. ये माझ्या मागे आपण त्या जाळी जवळ जाऊन काजवे पाहूया. लखन माझ्या मागे मागे काटेरी झुडूपाच्या जाळी जवळ आला. तिथे खूप सारे काजवे होते. लखन तर या काजव्यांना पाहून भारावून गेला. “अरे काय सुंदर आहेत हे किडे....!” मस्त उजेड पडतो त्यांचा छोट्या छोट्या लाईटा प्रमाणे. काय मस्त चमकत आहेत. लखन हळूच जाळीतील काजव्याला पकडून हातावर घेत होता. हाताच्या स्पर्शाने ते लगेच आपला प्रकाश चमकने थांबवायचे. “अरे.... विजला गड्या हा....! याचा लाईट गेला वाटतं.....!” तो त्याला सोडून द्यायचा व पुन्हा नवीन काजवा पकडायचा. लखन लहान मुलासारखा त्या काजव्या सोबत खेळू लागला. काजव्यांच्या त्या प्रकाशाने आपण जंगलात आहोत हे तो विसरून गेला होता. त्या काटेरी झुडपांना काजव्यांनी हिरवेगार प्रकाशमान करून टाकले होते. शिकार व काजवे यामध्ये रात्र कधी सरली कळले सुद्धा नाही. पहाटेच्या वेळीची घटका जवळ आली. काजव्यामुळे आज शिकार शोधता आली नाही. उजेड पडायच्या आत घराकडे वापस गेलो पाहिजे. म्हणून मी लखनला चालायला सांगितले. गप्पा मारत मारत जंगलातून वापस निघालो. बोलत बोलत गावात पोहोचलो. तरी अद्याप लखनच्या मनातील काजव्यांचे चमकणे सुरूच होते.
✍✍✍✍
© राजेंद्र प्रल्हाद शेळके
No comments:
Post a Comment