Sunday, 30 August 2020

अव्यक्त प्रेम ( लघुकथा )

अव्यक्त प्रेम ( लघुकथा ) 

आज सकाळपासून थंड गार वारा सुटला होता. हिवाळ्याचे दिवस असल्याने गुलाबी थंडी सगळ्यांना हुडहुडी भरवत होती. झोंबणार्‍या थंडीपासून बचावासाठी सगळे जण काहीना काही उपाय करत होते. म्हातारी माणसं अंगावर घोंगडी, चादर गुंडाळून बसायचे. लहान मुलं स्वेटर व डोक्यात गोंड्याची टोपी घालून बिनधास्त खेळायची. तरुण पोरं सकाळी सकाळी कचरा पेटवून मोठा जाळ करत त्याच्या भोवती शेकत बसायची. हिवाळा जणू सगळ्यांना थंडी बरोबर मस्ती व आनंद वाटत फिरायचा. आज सकाळीच मी या कडाक्याच्या थंडीत आवरून गावातील महादेवाच्या मंदिरात निघाले. आईने मोठ्याने ओरडून सांगितले. अंगावर ने गं ! पोरी काहीतरी….! थंडी जास्त आहे. आई मी देवळात चालले ....! बाहेर फिरायला नाही. देवळात अंगावर घेऊन गेले तर, तिथला पुजारी हसेल की? मला….! असे म्हणून मी पूजेचे ताट घेऊन मंदिराकडे जायला निघाली. जातांना वाटातल्या मैत्रिणींना आवाज देऊन त्यांनाही सोबत घेऊन मी महादेवाच्या मंदिरात गेले. मंदिरातील पुजारी काका नुकतीच पूजा करत होते. मी व माझ्या मैत्रिणींनी महादेवाच्या पिंडीची पूजा करून दर्शन घेतले. व देवळाबाहेर येऊन आम्ही सर्वजणी पायरीवर बसलो. सकाळी सकाळी धुक्याच्या थंडीतून वाट करत सूर्यदेवांनी आपल्या किरणांनी हळूच प्रकाश टाकला. प्रकाशाबरोबर नवचैतन्य जणू बाहेर आले होते. अगदी प्रसन्न अवस्थेत पुजारी काका पूजा आटोपून मंदिराच्या पायऱ्या उतरत होते. मी हळूच आवाज दिला     ‘‘ काका प्रसाद द्या आम्हाला ’’ पुजारी काकांनी आवाज ऐकताच….! मध्येच थांबून आम्हा मुलींना प्रसाद दिला. पोरींनो आज सकाळीच थंडीत महादेवाच्या दर्शनाला कसं काय? सहज आलो काका….! कालच बारावीची परीक्षा संपली. आलो मग महादेवाच्या दर्शनाला मी महाराजांना सांगितले. छान....! बरं झालं की, सकाळी सकाळी महादेवाला ही नवीन भक्तांचे दर्शन झाले. नाहीतर ! रोज सकाळी माझ्या भेटीने महादेवाला ही कंटाळा आला असेल.....! असे म्हणून, हसत....! हसत....! पुजारी काका मंदिराच्या पायऱ्या उतरून निघून गेले़. मी व माझ्या मैत्रिणी सुद्धा हसत हसत पुन्हा एकदा पायऱ्यावर येऊन बसलो. सकाळच्या धामधुमीत गावातील सगळी लोकं आपापल्या कामधंद्यात व्यस्त होती. तेवढ्यात गावातील विस वर्षांचा गोरापान, उंचापुरा तरुण धोतर नेसून, खांद्यावर घागर घेऊन मंदिराकडे येत होता. माझे त्या तरुणाकडे लक्ष गेले. तेवढ्यात तो तरुण मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिरात निघून गेला. मी व माझ्या मैत्रिणी सुद्धा घराकडे जायला निघालो. मंदिराच्या पायऱ्या उतरता उतरता मी मात्र त्या तरुणाच्या विचारात हरवून गेले. कोण असेल तो तरुण? किती भक्तिभावाने सकाळीच महादेवाच्या पूजेला आला. एका हातात धोतराचा घोळ धऊन व दुसऱ्या हाताने खांद्यावर घागर धरून झपाझपा पायऱ्या चढत होता. किती त्याच्या चेहऱ्यावर तेज होते. मी हरवलेल्या विचारात असतानाच मैत्रिणीं हळूच म्हणतात. येतो गं उमा आम्ही...! मी दचकून हो....! हो....! या गं….! असे म्हणून, मी घरी पोहोचले. बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती. आता अभ्यासाचा ताण नाही. या सुट्ट्या अगदी आनंदात व मस्तीत घालवायच्या असे मी मनाशी ठरवले होते.

             पोरीने तालुक्याच्या गावाला जाऊन बारावीची परीक्षा दिली. या अभिमानाने माझ्या वडिलांचा ऊर भरून आला होता. ते खूपच खुश होते. बाबांनी दुपारी आईला आवाज दिला. ऐकतेस का गं….! उमा कुठे गेली? सकाळ पासुन दिसलीच नाही. ‘‘ मगाशीच जेवून झोपली ती आतमध्ये ’’ आई चिडुन बोलली. परीक्षा संपली ना….! त्यामुळे पोरीचे पाय कुठे एका जागेवर आहेत. सकाळपासून नुसती फिरत आहे इकडून तिकडे, आई बाबांना सांगत होती. बरं....! बरं....! झोपू दे तिला. आपल्या घराण्यात गेल्या अनेक पिढीत एकही मुलगी बारावी शिकली नाही. आपल्या लेकीने तालुक्याला जाऊन बारावीची परीक्षा दिली. महादेवाच्या कृपेने सगळं काही छान होत आहे. उमाला जास्त कामाला लावू नको ! ती आधीच अभ्यास करून थकली त्यात पेपरं दिली. आता तिला आराम करू दे….! आई मधेच चिडुन म्हणाली ‘‘ तिच्या मनाला वाटेल ते करत बस म्हणा ’’ , पोरीने बारावीची अवघड परीक्षा दिली हे खरं आहे ! म्हणून तिला डोक्यावर घेऊ नका….! उमा लेकीची जात आहे. एक ना एक दिवस दुसऱ्याच्या घरी नांदायला जावं लागणार….! नुसते शिक्षण असून चालणार नाही. तर घरातली कामं पण करता आली पाहिजे. एवढ्या दिवस नुसती शाळा....! शाळा....! शाळाच होती. आता मी तिला घरातली सर्व कामं शिकवणार आहे. तुम्ही लय लेकीची बाजू घेऊ नका ! मला पण तिची काळजी आहे. आई मोठ्या मोठ्या आवाजात बोलत घरात निघून गेली. थोड्यावेळाने आईने मला आवाज दिला. उमा....! ये उमा….! उठ आता. किती वेळ झोपणार. हात-पाय, तोंड धुऊन देवाला दिवा लाव. आईने आवाज देताच मी दचकून उठले. बापरे....! किती वेळ झाला झोपून. किती दिवसांनी दुपारी शांत झोप लागली. मी गरम पाण्याने हात तोंड धुऊन फ्रेश झाले. देवापाशी दिवा लावला, देवाला हात जोडून नमस्कार केला. मिटलेल्या डोळ्यापुढे अचानक महादेवाच्या मंदिराच्या पायऱ्यावर चढणारा तो तरूण आठवला. त्या आठवणीने जरा प्रसन्न वाटले. त्या दिवसापासून का कुणास ठाऊक ! तो तरुण आठवला की मला खूप छान वाटायचे. सुट्टीचे दिवस मजेत चालले होते. रोज धमाल-मस्ती, मैत्रिणीसोबत गप्पा-टप्पा मारत वेळ जात होता. उद्या सोमवार आहे सकाळीच महादेवाच्या देवळात जाऊन येऊया असा मनाशीच मी विचार करत होते. विचार करत करत मला कधी झोप लागली कळले सुद्धा नाही. सकाळी लवकर उठून महादेवाच्या दर्शनाला मी निघाले. आज मात्र मी मैत्रिणींना सोबत घेतले नाही. मी एकटीच सकाळी सकाळी मंदिरात पोहोचले. पुजारी काका पूजा करतच होते. मी महादेवाच्या पिंडीची मनोभावे पूजा केली व दर्शन घेतले. बाहेर येऊन मंदिराच्या पायरीवर थोडावेळ बसले. तेवढ्यात त्यादिवशीचा तो तरुण आजही उघडा धोतर नेसून, खांद्यावर घागर घेऊन, मंदिराकडे येत असलेला मला दिसला. मी एकटक त्या तरुणाकडे बघतच राहिले. तो झपाझपा मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिराच्या गाभाऱ्यात शिरला. मी आज त्याला मन भरून पाहिले होते. अगदी उंचपुरा, गारशे डोळे, देखणा होता तो….! त्याला बघून मला प्रसन्न वाटले. चला महादेवा बरोबर याही महादेवाचे दर्शन झाले असे मनाशी पुटपुटत मी घरी आले. आज दिवसभर मात्र त्या तरुणा विषयीचे कुतूहल मनात सारखे घोळत होते. मी आता देवळात जायला सोमवारची वाट बघत नव्हते. मी रोज देवळात जाऊ लागले. महादेवा बरोबर त्या तरुणाचे दर्शन मला घ्यावे वाटू लागले. पायऱ्या चढत चढत तो तरूणही माझ्याकडे चोरून बघायचा. पण मी त्याला बोलायची हिम्मत केली नाही. मी रोजच महादेवाच्या देवळात जाऊ लागले. याने माझे बाबा खूप आनंदी होते. पोरगी खूप धार्मिक झाली असे त्यांना वाटू लागले. मी एक दिवस ठरवले ! कोण कुठला हा तरुण? रोज मंदिरात येतो. या अगोदर त्याला आपण पण गावात कधीच बघितले नाही. हा गावात कुठेही दिसत नाही. मात्र मंदिरात हमखास येतो. केवळ योगायोग का होईना परंतु सुरुवातीला तो मला भेटत गेला. उद्या मात्र त्याला नाव गाव विचारायचे. ठरल्याप्रमाणे मी मंदिरात आले. महादेवाचे दर्शन घेऊन पायरीवर बसले. तो तरुण  नेहमी प्रमाणे हातात धोतर धरुन, खांद्यावर पाण्याची घागर घेऊन पायऱ्या चढत चढत मंदिराकडे येत होता. माझ्या जवळ येताच ! मी त्याला आवाज दिला. कोण आपण? नवीन दिसता या गावात ! तो मात्र एकही शब्द न बोलता मंदिरात निघून गेला. मला जरा आश्चर्यच वाटले ! तो एक शब्दही न बोलता निघून गेला. एकतर बहिरा असावा, नाहीतर जास्तीचा शहाणा तरी असेल ! असे मी मोठ्यांने पटकन बोलून गेले. आज मात्र तो घाईगडबडीत पूजा करून मंदिराच्या बाहेर आला. मी मात्र त्याच्या शांत राहण्याने रागावून अध्यापही पायऱ्यावर त्याच विचारात बसून होते. तेवढ्यात त्याने मला हळूच आवाज दिला. मगाशी आपण मला आवाज दिला होता ना....! हो....! पण आपल्याला ऐकू येत नाही वाटतं ! तो तरुण गालातल्या गालात हसत म्हणाला, ‘‘ तसे नाही काही, मला छान ऐकू येते ’’ पण मी सकाळी महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय कोणालाच बोलत नाही. माझा तसा नियमच आहे. अरे वा....! छान....! नियम आहे तुमचा ! आम्हाला नाही असे नियम वगैरे आवडत. देवाने छान तोंड दिले सगळ्यांना बोलण्यासाठी त्याला कशाला नियम हवेत. मी नेहमी कधी कुणाशी न बोलणारी आज मात्र या अनोळखी तरुणाशी धीटपणे बिनधास्त बोलत होते. मधेच तो म्हणाला, ‘‘ मी महादू मिठाईवाला ’’ आम्ही या गावचे नाही. आम्ही मूळचे ''राजस्थानचे'' आहोत. माझ्या बाबाचा मिठाई चा व्यवसाय आहे. आम्ही गावोगाव मिठाई विकत फिरत असतो. या गावात मिठाईचा व्यवसाय बरा चालतो म्हणून गेल्या सहा महिन्यापासून येथेच वास्तवास आहोत. मला लहान पणापासून महादेव खूप आवडतो. म्हणून माझे नावही महादूच पडले. तसे माझे जन्मनाव खरे “ चंदनशिव '' आहे. तसेही माझ्या दोन्ही नावात महादेव आहेतच की ! तुम्हाला जे आवडेल ते लक्षात ठेवा. तुमचे काय नाव? तुम्ही पण रोजच महादेवाच्या देवळात येत असता ! तुमच्याही नावात....! महादेव आहे की काय? अगदी गोड आवाज होता महादूचा. अतिशय प्रेमळ व चांगल्या भावनेने तो माझ्याशी बोलत होता. जणू आमची खूप दिवसांची ओळख असल्यासारखे आम्ही मंदिराच्या पायऱ्यावर बोलत उभे होतो. मी एका अनोळखी तरुणासोबत बिनधास्त बोलत आहे याचे भान मला राहिलेच नव्हते. महादूने मला पुन्हा एकदा विचारले. तुमचे नाव काय? की तुम्हाला पण ऐकू येत नाही. मी मगाशी त्याला बहिरा म्हणाले त्याने ते ऐकले होते. मी त्याला नाव न सांगता तसेच लाजत....! लाजत....! पटापटा पायर्‍या उतरून घराकडे निघून आले. महादू खूप वेळ एका जागेवर उभा राहून मला बघतच होता. रोज वाटायचे हा तरुण कोण आहे. आज मात्र त्याच्याशी बोलून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. किती गोड आहे नाव त्याचे 'चंदनशिव ' अगदी नावाप्रमाणे शिवाचा भक्त शोभतो.

             मी आता महादेवाच्या देवळात न चुकता रोज जाऊ लागले. महादेवा बरोबर महादुचेही दर्शन घेण्याचा नित्यक्रमच माझा झाला होता. मला महादू आवडू लागला होता. मला त्याच्याविषयी आकर्षण वाटू लागले होते. सहज म्हणता म्हणता मी त्याच्या प्रेमात पडले होते. आज मात्र कमालच झाली होती. तो माझ्या आधी देवळात येऊन पूजा करुन पायऱ्यावर माझी वाट बघत होता. मी मंदिराच्या पायऱ्या चढून त्याच्या जवळ जाताच त्याने आवाज दिला. ‘‘ उमा हा घे प्रसाद, मी बनवलेली मिठाई आहे.’’ तुझ्या नावा इतकीच मिठाई पण गोड आहे. असे म्हणून महादू निघून गेला. मी मात्र विचारात पडले ! आपले नाव याला कसे काय कळले. महादू मिठाईवाला होता खरा ! पण मिठाई इतकाच दिसायला गोड, स्वभावही गोड, व बुद्धीने ही गोड होता. त्याने पुजाऱ्यांकडून माझ्या विषयीची सर्व माहिती मिळविली होती. माझ्याप्रमाणे मीही त्याला खूप आवडत होते पण त्याने तसे कधी बोलून दाखवले नाही. लोकांच्या नजरा चुकवून मंदिरात भेटणे, बोलणे आमचे सुरूच होते़. सकाळी सकाळी जणू महादेव पुजारी, महादू व मी फक्त आम्हा तिघांनाच बोलवत होता. आमच्या तिघांशिवाय सकाळी कोणीच लवकर मंदिराकडे येत नव्हते. त्यामुळे आम्ही मंदिराच्या पायऱ्यावर बसून एकमेकांशी बोलत बसायचो. एकमेकांच्या आवडी निवडी, स्वभाव, विचार, आचार माहिती झाले होते. आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण तसे कुणी बोलून दाखवत नव्हते. त्यामुळे आम्ही मित्र म्हणून एकमेकांशी वागत होतो. आमची मैत्री देवळातील महादेवाला, पुजारी काकाला व आम्हालाच माहित होती. आम्ही पुजारी काका इतकेच महादेवाचे भक्त झालो होतो. महादुमुळे मलाही भक्तिची गोडी लागली होती. माझे प्रेम मुळातच तारुण्यातील जरी होते तरी ते भक्तीच्या गोड रसाळ वाणी प्रमाणे होते. मला महादू मनापासून आवडायचा तो त्यातील सद्गुनामुळे ! त्यामुळे आमच्या प्रेमात कृष्ण-राधे सारखा मैत्रीचा प्रेम भाव अधिक होता. बारावीच्या परीक्षेनंतरचा सुट्टीचा कालावधी महादुच्या प्रेमात मजेत जात होता. थंडी म्हणता म्हणता हिवाळा व उन्हाळा दोन्ही ऋतू कधी संपले कळलेच नाही. निकालाची तारीख जवळ येत होती. मी पास झाल्यावर महादू स्वतः तयार केलेली मिठाई देवळात महादेवा जवळ ठेवणार होता. मी त्याला सांगून ठेवले होते मी पास झाले की माझ्या बाबांना घेऊन तुझ्या मिठाईच्या दुकानात येईल. महादू ऐरवी मला अनेक वेळा दुकानात यायला आग्रह करत असे पण कारण सापडत नव्हते. त्यामुळे निकाला शिवाय ते शक्य होणार नव्हते. तू तयार केलेली मिठाई मला विकत देशील ! मी ती मिठाई घेऊन सायंकाळी देवळात येईल. तू सुद्धा सायंकाळी देवळात ये असे आम्ही एकमेकांना सांगून ठेवले होते. आमच्या मैत्रीविषयी माझ्या बाबांना, आईला कोणालाच काही माहीत नव्हते. आम्ही दोघे मंदिरात चोरुन भेटायचो ! त्यामुळे फारसे कोणालाच आमच्यावर शंका येण्याचे कारणच नव्हते.

                    अखेर निकालाचा दिवस उजाडला. मी सकाळीच महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. चांगले मार्क पडण्याचे देवाला साकडे घातले. महादुने प्रसन्न चेहऱ्याने मला शुभेच्छा दिल्या व सायंकाळी माझ्या हाताने तुला मिठाई भरवेल असे सांगीतले. मी लगबगीने घरी आले. बाबा निकाल बघायला तालुक्याला जाणार होते. आज सकाळपासून घरात निकालाच्या उत्साहाची धामधूम होती. आई तर नेहमीप्रमाणे माझ्यावर चिडून होती. ‘‘ कारटी काय दिवा लावते महादेवास ठाऊक ’’ असे म्हणून आई देवघरात दिवा लावते. बाबा तालुक्याला निकाल पाहण्यासाठी जातात. मी व आई घरी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. दुपारचे तीन वाजले होते बाबा अचानक दारात येऊन उभे राहतात. मी पळतच बाबा जवळ जाऊन विचारले, ‘‘ बाबा कसा लागला निकाल ’’ बाबा जोरात म्हणतात, ‘‘ माझं लेकरू पास झालं ! ’’ शाळेतून पहिला क्रमांक आला पोरी तुझा ! बापाचं नाव कमावलं ! माझ्या निकालाने बाबांना खूप आनंद झाला होता. तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. बाबांनी येतानाच तालुक्यावरून मिठाई आणली होती. मी पळत पळत देवघरात जाऊन देवाच्या पायाशी मिठाई ठेवली. आईला, बाबाला मिठाई भरवली. आईबाबांनी सुद्धा मला मिठाई भरवली. आज घरात सगळेजण आनंदाने नाचत होते. निकालाच्या आनंदाने कधी वेळ निघुन गेला कळलेच नाही. रात्र झाली ! मला एकदम महादू ची आठवण झाली. त्याला मी मिठाई घ्यायला येईल असे सांगितले होते. तो बिचारा माझी वाट पाहत असेल. कदाचित मी गेले नाही म्हणजे नापास झाले असेल ! असा तर त्याचा समज झाला नसेल. आपण ठरल्याप्रमाणे मंदिरात जायला हवे होते. मी पास झाले हे महादुला कळवायला पाहिजे होते. माझा पहिला नंबर आला ! हे ऐकून त्याला खूप आनंद झाला असता. मला त्याच्या हातची मिठाई खायची होती. या निकालाच्या घाईगडबडीने मी सायंकाळी मंदिरात जायला विसरून गेले. मला महादुची खुप आठवण येत होती. पण काय करणार ! आता तर रात्र झाली. मी ठरविले ! उद्या सकाळीच मंदिरात जायचे. महादेवाचे दर्शन घेऊन ही गोड बातमी महादुला सांगायची. त्याच्या हातून मिठाई खाता खाता त्याला सांगून टाकायचे. तू मला खूप आवडतो. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. ही उमा तुझी कायमची व्हायला तयार आहे. त्यालाही मी आवडते ! तो माझ्या प्रेमाला नाही म्हणणार नाही मला विश्वास आहे. कोण कुठला महादू....! कुठून आला....! कुठे जाणार....! कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा याचा मी विचारही केला नव्हता. याविषयी त्याला कधी विचारले सुद्धा नाही. माझ्या स्वच्छ, सुंदर, प्रेमळ मनाने महादुला स्वीकारले होते. प्रेमाला जात, पात, धर्म, गरीब, श्रीमंत, प्रांत हा भेद नसतो हे माझ्या प्रेमाने दाखवून दिले होते. महादु माझा झाला नाही तरीही उमा मात्र महादुची झाली होती. महादेवाच्या आशीर्वादाने व साक्षीने मी महादुच्या प्रेमात पडले होते. हे मात्र खरं आहे ! तो मला पहिल्यांदा मंदिराच्या पायरीवर भेटला. आयुष्यात यापुढे उमा महादुचा हा जोडा आयुष्यभरासाठी मंदिराच्या पायरीवर एकत्र घट्ट जोडावा एवढीच माझी इच्छा आहे. त्या दिवशी रात्री महादूच्या आठवणीत कधी झोप लागली कळलेच नाही. मी सकाळी लवकर उठून ! पूजेचे ताट घेऊन खुशी खुशीत मंदिरात आले. महादेवाचे दर्शन घेतले. महादेवाला महादुची मिठाई ठेवायची आहे म्हणून माझ्या जवळचा प्रसाद मी ताटातच राहू दिला. नेहमीप्रमाणे पायरीवर येऊन बसले. महादुची वाट पहात आतुरतेने दूरवर नजर लावून बसले होते. नेमकी आज महादुला यायला उशीर झाला होता. तो अद्यापही आला नाही म्हणून मला त्याचा खूप राग येत होता. मला स्वतःच्या हाताने मिठाई भरणार होता ! पण आज अध्याप आला कसा नाही ! या विचाराने माझी तळमळ होत होती. मला खुप वेळ झाला होता पायरीवर बसून ! पण महादू आलाच नाही. पुजारी काका नेहमी प्रमाणे पुजा आटपून बाहेर आले. माझ्या जवळ येऊन म्हणाले ‘‘ आता कितीही वेळ दूरवर नजर लावून बसली तरी काही फायदा होणार नाही ’’ महादू आता कधीच येणार नाही. हा घे प्रसाद….! तोंड गोड कर….! महादूने तुझ्यासाठी ही मिठाई माझ्याजवळ दिली आहे. पुजारी काका काय बोलत होते मला कळतच नव्हते. भुवळ आल्यासारखे नुसते मंदिर माझ्याभोवती गरगर फिरत होते. मी नुसती कावरीबावरी होऊन महादुला शोधत होते. पुजारी काका पुढे म्हणाले, ‘‘ पोरी महादु काल सायंकाळी मंदिरात मिठाई घेऊन आला होता. ’’ त्याने तुझी खूप वेळ वाट पाहिली. शेवटी निराश होऊन माझ्याजवळ मिठाई देऊन निघुन गेला. जातांना मला म्हणाला की, ‘‘ मिठाई सकाळी महादेवाला ठेवा व उरलेली उमाला द्या. ’’ तिला सांगा तुझा मित्र महादू रात्रीच गाव सोडून गेला आहे. तेही कायमचे....! पुजाऱ्याचे शब्द ऐकून ! मी मात्र थंडीच्या दिवसात पाण्याचे बर्फ बनावे तशी स्तब्ध गोठुन गेली होते. एका क्षणात स्वप्नांचा डोंगर कोसळून पडला होता. भुंकपाने जमीन हादरावी तसे माझे पाय लटपटत होते. एका क्षणात मी महादुच्या प्रेमात पोरकी झाले होते. अचानक महादुचे जाणे हे अनेक प्रश्नांचे कोडेच आता उरले होते. गुलाबी थंडीत मंदिराच्या पायऱ्यावर सुरू झालेली माझी मैत्रीची प्रेम कहाणी, मंदिराच्या पायरीवरच अशी विस्कटून पडेल असे मला स्वप्नातही कधीच वाटले नव्हते. दोघांनाही एकमेकाचं प्रेम कळलं होतं ! पण ते व्यक्त न होता कायमचं मूकं झालं होतं ! पुन्हा कधीही व्यक्त न होण्यासाठी....! असंख्य प्रश्नांचे काहूर मागे सोडून महादू आयुष्याच्या वळणावर पुन्हा कधी? कुठे? भेटेल याचा ठावठिकाणा न सांगता माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला होता.

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

मु पो किनगाव राजाता  सिंदखेड राजा

जि बुलढाणा फोन नंबर 9823425852

rajendrashelke2018@gmail.com

ब्लॉग वर वाचा

rpshelke.blogspot.com

Saturday, 29 August 2020

जाणून घेऊया रक्तदानाचे महत्त्व


जाणून घेऊया रक्तदानाचे महत्त्व


जगात विज्ञानाने अनेक शोध लावले. विज्ञानाने माणसाचे जीवनमान उंचावले गेले. पूर्वीच्या काळी मनुष्य अतिशय साध्या पद्धतीने जीवन जगत होता. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या सुद्धा पुरेशा प्रमाणात त्याला भागवता येत नव्हत्या. याशिवाय त्याला इतर गरजा नव्हत्या असे नाही. परंतु त्या त्या परिस्थितीत तो जीवन जगण्याला प्राधान्य देत होता. जिवंत राहण्यासाठी त्याची धडपड चालत असे. मुळात विचार करणे, शिक्षण घेणे, शोधक वृत्तीला चालना देणे या गोष्टी त्या काळात घडत नसत. यामुळे साधे जीवन जगणे हाच पर्याय त्याच्यापुढे होता. हळूहळू मनुष्य विचार करू लागला. शिक्षणाचे माध्यम उपलब्ध झाले. त्याच्या शोधक वृत्तीचा विकास होत गेला. याच्या जोरावर मनुष्य अनेक शोध साध्य करू लागला. यातूनच शिक्षण, शोध व विज्ञान याच्या जोरावर अनेक नवीन शोध लागत गेले. नवीन शोधाच्या उपलब्धतेनुसार मानवाच्या गरजा सुद्धा वाढत गेल्या. स्वतःच्या मूलभूत गरजांबरोबरच शिक्षण, मनोरंजन, आरोग्य, शोध, संशोधन या गरजा निर्माण होत गेल्या. यातून मानवाने स्वतःचे विचार, शिक्षण व बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक शोध लावले. मग ते शोध प्रत्येक क्षेत्रात लावले गेले. आरोग्याच्या क्षेत्रात मानवाच्या संपूर्ण शरीराचा अभ्यास करणारे शास्त्र शिक्षणाच्या रुपाने समोर आले. आज संपूर्ण मानवी शरीरावर उपचार केले जातात. एवढा प्रचंड मोठा शोध विज्ञानाने लावला. रक्तगट व रक्तातील पेशींचा शोध लावला गेला. परंतु जगात आजही विज्ञान व विज्ञानवादी शास्त्रज्ञ यांना मानवी शरीरातील रक्ताप्रमाणे नविन रक्त निर्माण करता आले नाही. रक्त निर्माण करुन मानवाच्या शरीरात सोडता आले नाही. रक्त निर्माण करण्याचे अनेक प्रयोग झाले. परंतु त्यात अद्यापही यश आले नाही. आज आपण पाहतो मानवाच्या आजारपणात अनेक व्याधीवर शस्त्रक्रिया केली जाते. तसेच नैसर्गिक अपघातातून सुद्धा मनुष्यावर शारीरिक संकटाचे प्रसंग ओढावले जाते. या वेळी त्याला वाचवतांना रक्ताची गरज भासते. मुळात रक्ताची निर्मिती केली जात नाही. रक्त कुठे बाजारात, दुकानात विकत मिळत नाही. रक्त शेतात पिकवता येत नाही. हे दानाच्या स्वरूपाने एकाकडून दुसऱ्या पर्यंत पोहचवता येते. त्यासाठी सुद्धा खूप तपासण्या, रक्त काढणे, रक्ततपासणी, रक्त टिकविणे व गरजेनुसार समोरच्या व्यक्तीला रक्तगट जुळवून रक्त देणे. या सर्व प्रक्रियेला खर्च येतो. अर्थात या प्रक्रिया घडण्यासाठी मनुष्याच्या शरीरातून रक्त काढणे गरजेचे असते. आजकाल आरोग्य यंत्रणेत औषधी बरोबरच रक्त ही महत्त्वाची गोष्ट बनली आहे. याचा विचार करून गावोगाव रक्त संकलन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. समाजात रक्तदानासाठी आव्हान केले जाते. परंतु समाजात आजही रक्तदानाविषयी पाहिजे तेवढी जागृती झाली नाही. रक्त दिल्याने प्रकृती बिघडेल, प्रकृती खालावली तर वजन कमी होईल, परत रक्त येणार नाही, रक्ताची रिकव्हरी झाली नाही तर कदाचित जीवितास धोका निर्माण होईल. अशा वेगवेगळ्या वैचारिक गैरसमजुती आहेत. यामुळे अनेक जण रक्तदान करत नाही. रक्तदान हे अतीशय महत्त्वाचे दान आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत. अन्नदान, ज्ञानदान, मतदान, अवयवदान, नेत्रदान, रक्तदान अशा स्वरूपाने दान दिले जाते. प्रत्येकाला दान देणे शक्य आहे. जो तो आपआपल्या परीने दान करत असतो. परमार्थात अन्नदानाला महत्त्व आहे. शिक्षण क्षेत्रात ज्ञान दानाला महत्त्व आहे. राजकारणात मतदानाला महत्त्व आहे. आरोग्य क्षेत्रात अवयवदानाला महत्त्व आहे. तसेच मनुष्याला शारीरिक व्याधीच्या संकटातून वाचण्यासाठी रक्ताची गरज आहे. त्यासाठी रक्तदान सुद्धा महत्वाचे दान आहे. आयुष्यात कधी कोणाच्या कुटुंबावर, कुटुंबातील व्यक्तीवर जीवन-मरणाचा प्रसंग ओढावेल सांगता येत नाही. अशा वेळी डॉक्टर रक्ताची गरज आहे असे सांगतात. रक्त त्वरित उपलब्ध करावे लागेल अशा सूचना करतात. अशावेळी मनुष्य धावत पळत रक्तपेढीची पायरी ओलांडतो. त्याठिकाणी रक्ताची पिशवी उपलब्ध नसेल तर खूप मोठे संकट उभे राहते. अशावेळी रक्तदानाचे महत्त्व कळते. स्वतःचे प्राण, स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीचे प्राण किंवा जवळच्या नातेवाईकांचे प्राण आपल्याला महत्त्वाचे वाटतात. परंतु या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याचे प्राणही तेवढेच महत्त्वाचे आहे. मग तो आपला जवळचा असो किंवा आपला नातेवाईक नसो. आपल्या एका रक्तदानाने आपण त्याचे प्राण वाचू शकतो. रक्तदान हे असे धन आहे की, मनुष्याचे प्राण वाचवू शकतात. एका रक्तदानामुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात. माणसाने माणसाला जीवदान देणारे दान म्हणजे रक्तदान होय. आजकाल नैसर्गिक संकटे खूप ओढवली जातात. अपघाता सारखे संकटे पावला पावलावर उभी आहे. तसेच आरोग्याच्या व्याधीमुळे अनेकांना सर्जरी करावी लागते. सर्जरी करण्याचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे. यासाठी रक्ताची खूप गरज भासते. यासाठी समाजातील तरुण पिढीने पुढे आले पाहिजे. स्वतः रक्तदान करून इतरांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. रक्तदानाचे अनेक फायदे आहेत. हे फायदे समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. रक्तदानाची महती प्रत्येकाला कळली पाहिजे. लाखो करोडो रुपये खर्च करून मनुष्य स्वतःचा प्राण वाचवू शकत नाही. पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा यामुळे प्राण वाचत नाही. तर योग्य उपचार, योग्य औषधे व वेळेवर रक्त यामुळे मात्र अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकते. पैशाची मदत अनेकजण करतात. उपचाराची मदत डॉक्टर करतात. पण रक्तदानाची मदत मात्र सामान्य माणूसच करू शकतो. रक्तदान हे निस्वार्थी दान आहे. आपण दिलेले रक्त कधी कुणाला कामी येईल हे आपल्याला माहित नाही. परंतु निश्चितच एखाद्याचे प्राण वाचेल ऐवढे मात्र खरे. समाजाने रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. अनेक गावात, शहरात वेळोवेळी रक्तदानाच्या शिबिराचे आयोजन केले पाहिजे. अशा शिबिरांमध्ये अनेकांनी रक्तदान केले पाहिजे. दर तीन महिन्यानंतर रक्तदाता रक्तदान करू शकतो. अमूल्य असे रक्तदान निस्वार्थी सेवा भावनेने केले जाते. त्याचा मोबदला वाचलेल्या मनुष्याच्या आशीर्वादाने आपल्याला मिळत असतो. जनमानसात आलेल्या संकटात आपण माणुस म्हणून एकमेकांसाठी धावून जाऊया. आपल्या आपल्या परीने रक्तदान करण्यासाठी पुढे येऊया. सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी समजून रक्तदान करूया. अनेकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करूया. अनेकांचे प्राण वाचवूया. चला पुन्हा एकदा रक्तदान करू या.

‘‘ एक रक्तदान वाचवेल अनेकांचे प्राण. ’’

‘‘ रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.’’

‘‘ थेंब आहे हा रक्ताचा, आधार आहे दुसर्याच्या जीवनाचा.’’


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852


Monday, 17 August 2020

पोळा (लघुकथा)

                 " पोळा " ( लघुकथा ) 

बाबा.....! ओ......! बाबा....! आपल्याला नवीन बैल कधी घ्यायचा. घेऊ रे बाळा ....! आपल्याकडे पैसे आले की नक्की बैल घेऊ आपण, सखाराम हळू आवाजात मुलाशी बोलला. मलापण बैल घ्यावे वाटतात. पण पैशाचा मेळ बसत नाही. सखाराम निराश होऊन मंग्याशी बोलत होता. मंग्याला काय माहीत बैल घेण्यासाठी फक्त इच्छा असून चालत नाही तर त्यासाठी नगदी पैसेही लागतात. पण यावर्षी पेरणीच्या आधी काहीही झाले तरी बैल घ्यायचेच ! असे सखारामने मनोमन ठरवले. बैल असले की, शेतीची मशागत चांगली होते. पीक पाणी चांगले येते त्याचबरोबर शेणखतही जमिनीला मिळते. असा विचार सखाराम मनाशीच करत बसला होता. उन्हाळ्याचे दिवस सुरू होते लग्नसराई धुमधडाक्यात सुरू होती. पाहुण्या राहुण्यांच्या घरी लग्नासाठी येणे जाणे सुरूच होते. सखाराम असाच एक दिवस सकाळीच एका पाहुण्यांच्या घरी पाहूनकीसाठी निघाला. सखारामच्या पत्नीने हळूच आवाज दिला. अहो....! ऐकले का? मी काय म्हणते....! पाहुण्याकडे चाललाच आहे तर, त्यांच्याकडे काढा बैलाचा विषय. किती दिवसापासून बैल घ्यायचे म्हणताय ना ! पाहुण्याकडे बघा विषय काढून. त्यांच्या गावातील कुणाकडे बैलजोडी विक्री असेल तर पाहुणे दाखवतील कि तुम्हाला ! सखाराम चिडून म्हणाला अ....! पाहुण्याकडे बैलाचा विषय काढायला येथे कुठे? नगदी पैसे आहे माझ्याजवळ….! पाहुण्यांच्या कडे कशाला बैलाचा विषय. त्यांनी बैल दाखवले व पसंत पडले तर बोला म्हणतील लगेच किंमतीचे….! मंग काय पैशाची दैना दाखवु तिथे….! पार्वती हळूच म्हणाली,  ‘‘ माझ्यावर काय चिडताय, माझ्यावर चिडून काय बैल फुकट मिळणार आहे. ’’ बैल कुठूनही घेतले तरी पैसे लागतीलच. पैसे ही महत्त्वाचे आहे व बैल सुद्धा. घेऊनच टाकू यावर्षी....! पैशाचे काय? जाईल फिटून कसेबी माला टालावर. तुम्ही फक्त बैल पाहून घ्या. तुमच्या पसंत असेल तर, पुढचे पुढे बघू. सखारामने मुकाट्याने ऐकून घेतले व मान हलवून म्हणाला, बघतो तसे पाहुण्यांना म्हणून, बैलाचे....! बरं....! मी येतो आता….! पोरांवर लक्ष ठेव. त्यांना जास्त वेळ एकटे कुठे जाऊ देऊ नको. घरीच खेळा म्हणा….! ऊन जास्त आहे उन्हाचा चटका लागला तर परत बिमार पडतील. असे बोलून सखाराम पाहूनकीसाठी घरून निघाला. मनात मात्र बैलाचा विषय पक्का करून टाकला.
                     दुपारची वेळ होती पाहूनकीच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून नवीन नवीन पाहुणे येतच होते. बैठकीत पाहुण्यांची गर्दी जमू लागली. हळूहळू नवरदेवा कडील पाहुणे आले मानपान झाला. लग्नाची बोलणी झाली. जेवण आटपलं, लग्नाची तारीख ठरली. कार्यक्रम आटोपला पाहुणेमंडळी शिदोरी घेऊन निघाली. जवळजवळ सांजवेळ झाली सर्व पाहुणे निघून गेली. सखाराम पाहुण्यांना म्हणतो, येतो मी आता….! पाहुणे हळूच म्हणतात, ‘‘ अहो दाजी एवढ्या उशिरा कशाला जाता. ’’ परत आमची बहीण म्हणेल पाहुण्याची लय अडचण झालती का? आलेच  आहे तर थांबा आता आजच्या दिवस. गप्पाटप्पा होईल, आराम होईल सकाळी जा उठून. तसही बैलाचा विषय राहिलाच की आपला बोलायचा. संध्याकाळी बोलता येईल….! थांबूच आजच्या दिवस असे मनाशीच सखाराम पुटपुटला. हो....! हो....! तसा उशीरच झाला. गाड्याही लागतील याचा भरोसा नाही. थांबतो रात्रभर सकाळीच जाईल उठून गावाकडं....! असं म्हणून सखाराम व पाहूणे पुन्हा एकदा घरात बैठकीत येऊन बसतात. पाहुणे सखारामला पीक-पाणी, लेकरां बाळाची खुशाली विचारतात. नवीन काय चाललं दाजी....! काही नाही बस घर शेत....! आणि शेत घर....! दुसरं काय असणार आपल्या नशिबी. पीक पाणी कसे झाले यावर्षी दाजी. बरे झाले जेम….! तेम….! सखाराम हळू स्वरात म्हणाला. माझ्याकडे बैल नाही दुसरे जनावर नाही. आता काय शेतात काम धंदा नाही. चालू आहे लग्न खाणं आरामशीर.
               बरं....! किसनराव मी काय म्हणतो. कुणाकडे चांगली बैल जोडी आहे का विक्री? ‘‘ कुणाला घ्यायची दाजी बैलजोडी ’’ किसनराव विचारतात. मीच घ्यायची म्हणतोय ! दरवर्षी पेरणीच्या अगोदर बैलजोडी नसल्यामुळे मशागतीची लय फजिती होते. पेरणीला पण लय उशीर होतो. जो तो आपली पेरणी आटोपल्यानंतर बैलजोडी देतो. ते पण खरं आहे दाजी….! पण बैलजोडी नाही म्हटल्यावर काही विलाज चालत नाही. आमच्या शेजाऱ्यांची बैलजोडी विक्री आहे. लय माणसं बघून गेली. बैलजोडी तगडी आहे त्यामुळे अजून काही विकली नाही. तुम्ही घ्या दाजी सकाळी बैलजोडी बघून ! तुम्हाला पसंत पडली तर भावाचे बघू पुढच्या पुढे? काय करायचं ते….! किसन तळमळीने बोलत होता. सखाराम म्हणाला, ‘‘ बरं…!  बरं…! बघू की सकाळी ’’ आपल्याला झेपली तर घेऊ नाहीतर देऊ सोडून. गप्पा मारत मारत दोघेही झोपी गेले. सकाळ झाली सखाराम झोपेतून उठला. चहापाणी, अंघोळ आटपली किसन व सखाराम न्याहारीसाठी बसले. दाजी मी दिला निरोप शेजार्‍यांना बैलाच्या बाबतीत थोड्यावेळाने जाऊ बघायला. गप्पा मारत मारत पोटभर न्याहारी करून सखाराम व किसन बैलजोडी पाहण्यासाठी शेजारच्या शेतात निघून जातात. उंचपुरी, लालसर रंगाची, टोकदार शिंगांची, अगदी लुसलुशीत अशी बैल जोडी होती. बैलाच्या मालकाने पाठीवरून हात मारून दाखविला. बैल आतिशय चांगले आहेत. मारत नाही, कामाला, चरायला लय चांगली आहे. दातात पण पुर्ण भरली आहे. किसनरावच्या नेहमीच पाहण्यातील आहे आमची बैल जोडी….! लय लोकांच्या पसंत पडली. पण भावाकडून नाही जुळला सवदा. खरं सांगु का, पाहुणे….! मला बैलजोडी विकायची इच्छा नाही पण पोरीचं लग्न ठरलंय….! त्यामुळे चार पैसे हातात शिल्लक असलेले बरे….! म्हणुन काढली बैलजोडी विक्रीला. बगा तुमच्या पसंत पडली असेल तर किसनरावच्या मध्यस्तीने देऊ हिशोबा हिशोबाने लावून. बैलजोडी सखारामच्या पसंतीला पडली होती. त्यामुळे सखारामने किंमत विचारून घेतली व कळवतो निरोप म्हणून सखाराम व किसन घरी वापस निघून आले. पाहुण्यांचा निरोप घेऊन सखाराम दुपारी आपल्या गावी परतला.
             पार्वती सकाळपासून वाटच पाहत होती. सखाराम घरी येताच लेकरांनी एकच गोंधळ केला. बाबा आले...! बाबा आले....! जसा काही सखाराम खूप दिवसापासून गावी गेला होता. शेवटी बाप आल्याची खुशी लेकरांनी त्यांच्या गोंधळातून प्रगट केलीच. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर हळूच पार्वतीने बैलाचा विषय काढला. सखारामने सर्व हकिगत सांगितली. नगदी पैसे असेल तर पंचवीस हजारापर्यंत बैलजोडी मिळते. बैल एकदम खास आहेत पंचवीस हजाराला घ्यायला पुरतात. पण माझ्याकडे जेमतेम दहा हजार रुपयेच आहेत नगदी. बाकीचे पंधरा हजार रुपये आणायचे कुठून ? असा प्रश्न उपस्थित करून सखारामने पार्वतीला सुद्धा विचारात पाडले. थोडा वेळ दोघेही पैशाच्या विचारात शांत बसले. अंगणात खेळणाऱ्या लेकरांचा स्पष्ट आवाज येत होता. मध्येच पार्वती म्हणाली, मी काय म्हणते तुम्हाला? बैल जोडी आवडली ना....! मग या घेऊन. मी माझा दागिना देते तुमच्या जवळ तो सोनाराकडे घेऊन जा व मोडीत किती पैसे येतात बघा. बैलजोडी महत्त्वाची आहे. गळ्यातील दागिना काय? कधी नवा करता येईल. पार्वतीच्या बोलण्याने सखाराम भारावून गेला. अग पार्वती....! तुझ्या गळ्यात काही चार-पाच दागिने नाहीत मोडायला.....! एकुंती एक मंगळसूत्राची पोत हाय....! ती कशी काय मोडते. ते तर बाईच्या जातीचा महत्त्वाचा दागिना असतो. नको....! नको....! तो पर्याय नकोच. बघू दुसरी काही व्यवस्था होती का पैशाची. सखाराम उठून बाहेर गेला. दोन दिवस प्रयत्न करूनही पैशाचा मेळ बसत नाही. म्हणून शेवटी सखारामने बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र नेऊन सोनाराकडे मोडीत विकले. त्याचे नगदी अठरा हजार रुपये सखारामच्या हातात आले. दागिन्याचे पैसे व स्वतः जवळचे पैसे घेऊन सखाराम किसनरावच्या गावी गेला. त्यांच्या मदतीने नगदी पैशाने बैलजोडी विकत घेऊन आला. सखाराम बैलांना घेऊन दारात येताच लेकरं उड्याच मारू लागली. लेकरांना खूप आनंद झाला. पार्वती ओवाळण्यासाठी ताट घेऊन बाहेर आली. बैलाच्या पायावर पाणी टाकून बैलांना ओवाळले. भाकरीचा कुटका बैलांच्या वरुन ओवाळून फेकला. मालकीण बाई काय नाव ठेवायचे यांचे आता....! तुम्हीच सांगा. सखाराम हसतच पार्वतीला म्हणाला. हरणा सारखी सुंदर जोडी आहे म्हणून याचे नाव ‘हरण्या’ व याचा सोबती म्हणून याचे नाव ‘सुदाम्या’ ठेऊया. घरात नवीन पाहुणे आल्यासारखे बैलजोडीने घरातील वातावरण आनंदी झाले होते. पार्वतीच्या समजुतदार पणामुळे आज सोन्याचे शिंग दारात आले होते. याचा आनंद सखारामला मनोमन झाला होता. घरचीच बैलजोडी असल्यामुळे शेतीच्या कामाला सुरुवात झाली. दर वर्षीपेक्षा या वर्षी लवकर पाऊस पडला. त्यामुळे पेरणीही लवकर आटोपली. शेतातील माल चांगला उगवला होता काही दिवसांनी खुरपणी, कोळपणी झाली. आता रान हिरवंगार दिसू लागलं होतं. श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती. काही दिवसावर पोळा हा सण येऊन ठेपला होता. यावर्षी सुदाम्या व हरण्यामुळे पोळा या सणाला विशेष महत्व आले होते. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा सण पोळाच असतो. त्यामुळे सखाराम व पार्वती सुद्धा खूप आनंदी होती. बैलजोडीसाठी यावर्षी नवा साज घ्यावा लागणार म्हणून, पार्वती काही दिवस दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ लागली. दोन पैसे नगदी मिळाले तर बैलासाठी चांगला नवा साज घेता येईल. श्रावण महिन्यातील दिवस भुरकून निघून गेले. पोळा सहा दिवसांवर आला होता. सखारामने शेजारच्या गावावरून आठवडी बाजारातून सुदाम्या व हरण्यासाठी नवा कासरा, वेसण, कवड्या व घुंगरांच्या माळा, बाशिंग, झुल, हिंगूळ, बेगड असा नवा साज आणला. पोटच्या लेकरा सारखीच हेही दोन लेकरं समजून सखाराम बैलांना खूप जीव लावत होता. सकाळपासून बैलांचा साज घेण्यासाठी बाजारात बाबाच्या मागे मागे फिरणारा मंग्या मात्र खूप थकला होता. जेवून तो आज लगेच झोपी गेला.
        सकाळ झाली दिवस उगवला. पार्वतीने हळूच मंग्याला आवाज दिला. मंग्या….! ये ! मंग्या....! उठ आज पोळ्याचा दिवस आहे ना ! तुला बैल धुवायला जायचे नाही का? तुझ्या बाबासोबत. पार्वतीने आवाज देताच मंग्या पटकन उठला. गडबडीने तोंड धुवुन त्याच्या बाबासंग नदीवर गेला. बैलांच्या अंगावर पाणी उडवून उडवून बैलांना अंघोळ घातली. सुदाम्या व हरण्या खूप गरीब होते. लेकरा पासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही सहज जवळ येऊ देत असत. त्यामुळे मंग्या बैलांना खूप सांभाळत असे. दिवसभर कासरा हातात घेऊन मंग्याने बैलांना गवत चारले. खांदमळन, पोळा, शिळा पोळा असे तीन दिवस त्यांचा सण म्हणून बैलांना फक्त चारा गवत खाणे व आराम करणे एवढेच काम असते. बर का.....मंग्या ! लक्षात ठेव. या तीन दिवसात बैलांना शेतीच्या कामाला जुपायचे नसते. सखाराम मंग्याला समजून सांगत होता. दुपारी बैलांना घेऊन मंग्या बाबासोबत घरी आला. सखारमने सुदाम्या व हरण्याला अंगणात बांधून त्यांच्या शिंगाना हिंगूळ लावू लागला. बैलांना नवीन वेसण, नवीन कासरा लावण्यात आला. गळ्यात कवड्याची व घुंगराची माळ घालण्यात आली. बाशिंग बांधून पाठीवर झुला टाकल्या. शिंगांना नवीन बेगड चिटकवून बैल पोळ्यात जाण्यासाठी तयार झाले होते. आज सुदाम्या व हरण्या ओळखूच येत नव्हते. नवीन साजाने बैलजोडी उठून दिसत होती. शेवटी दुपारचे चार वाजले. गावातील बैल वेशीवर पोळ्यात जाऊ लागली. गावाच्या वेशीवर गावातील सगळ्या बैलांचा पोळा भरत असे. सखाराम मंग्याच्या हातात कासरा देऊन बैलांना घेऊन वेशीवर आला. गावातील सगळे बैल जमा झाले होते. कधी नव्हे ती सर्व बैल सजवून एकत्र आली होती. पोळा खूप भरला होता. सखाराम व मंग्या दोघेही खूप खुश होती. कितीतरी दिवसांची त्यांची इच्छा आज पूर्ण झाली होती. दोघेही बैलांचा कासरा हातात धरून पोळा फुटण्याची वाट पाहत होते. ‘‘ बाबा….! कधी फुटणार पोळा ’’ मंग्या हळूच म्हणाला. सर्व गावातील बैल आले की, पाच वाजता फुठत असतो पोळा. आता थोड्या वेळात फुठेलच पोळा तू आवाजाकडे लक्ष ठेव. आवाज आला की लगेच सर्व लोक बैल घेऊन तोरणा खालुन धावत जातील. आपल्यालाही लगेच धावावे लागेल नाहीतर मागचे बैल आपल्याला तुडवून जातील असे सखाराम मंग्याशी बोलतच होता. तोच डफड्याचा आवाज सुरु झाला. आंब्याच्या पानाचे तोरण आडवे ओढले व पोळा फुटला. पोळ्यातील बैल एका पेक्षा एक जोरात धावत सुटली. कुणाचा बैल निसटून गेला, तर कुणाचा कासरा सुटला. गावातील तुकाराम जोरात पळता पळता पडला बैलांनी त्याला तुडवून काढले. लोकांनी गर्दीतून पटकन तुकारामला बाहेर ओढले. सगळ्या गोंधळात सखाराम दोन्ही बैलांना व मंग्याला घेऊन हळूहळू तोरणा खालून निघाला. बाबा....! बाबा....! पळवा लवकर सुदाम्या व हरण्याला. चला लवकर घरी सगळ्यांच्या आधी….! मंग्याची घाई सुरू होती. शेवटी गावातून चक्कर मारून सखाराम मंग्याला व बैलांना सुखरुप घेउन अंगणात आला. पार्वती बैलांना ओवाळण्यासाठी ताट घेऊन उभीच होती. पार्वतीने बैलांना मंग्याला व सखारामला कुंकू लावून ओवाळले. बैलांना पुरणपोळी चारली. बैल शेजारी पाजारी मिरवून शेवटी सखारामने बैल गोठ्यात नेऊन बांधले. स्वतःचे बैल पोळ्यात मिरवून आल्याचा आनंद सखारामच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शेतात दिवस-रात्र कष्ट करून शेती पिकवण्या मध्ये राबणारा आपला धनी व सुदाम्या हरण्याच्या कष्टाच्या पाय गुणाने पिकणारी शेती यापुढे आपल्या मंगळसूत्राची किंमत कमीच आहे. सखारामच्या चेहऱ्याकडे पाहून पार्वतीच्या मनात विचार आला. लेकरांना घेऊन सखाराम जेवायला बसला. आईच्या हाताची गरम-गरम पुरणपोळी खात मंग्या हळूच म्हणतो. बाबा.....! रोजच पाहिजे असा पोळा.


✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा ता सिंदखेड राजा
जि बुलढाणा मो नं 9823425852
ब्लॉग वरती वाचा

Monday, 10 August 2020

यमुना ( लघुकथा )

                  यमुना (लघुकथा) 

यमुना ! अग ये यमुना ! काय करतेस ग.....! अगदी जोरा जोरात आवाज देऊन सुद्धा यमुनेने ओ दिली नाही. रोजच्याप्रमाणे मैत्रिणीसोबत यमुना अंगणात खेळण्यात गुंग होती. सकाळी दिवस उजाडल्यापासून तर सायंकाळी दिवस मावळेपर्यंत यमुना अख्ख्या वाड्यामध्ये सारखी मुलींसोबत खेळत असायची. आई बापाची लाडकी एकुलती एक मुलगी ती, जणू राजकन्याच होती. पाच भावंडात सर्वांत छोटी होती. सहाजिकच आई-वडील व चारही भावांनी ज्ञानदेवांच्या मुक्ताई प्रमाणे जीवापाड तिला जपले होते. एखाद्या राज्याच्या राजकन्ये प्रमाणेच तिचे बालपण गेले. बापाचा मोठा वाडा होता. घरात अन्नधान्य, धनदौलत, पैसा आदला मुबलक होता. गावात तिच्या बापाला पाटला एवढाच मान होता. त्यामुळे यमुना ही सर्वांचीच आवडती गावातील सर्व बायका तिचा खूप लाड करायच्या. घरीदारी नुसता लाड….! अन लाडच….! सुरू होता. आईच्या व बापाच्या मायेने यमुना कधी मोठी झाली कळले सुद्धा नाही. यमुना उंचपुरी व धिप्पाड झाली होती. अगदी श्रावणाने जसा निसर्ग बहरून येतो. सगळीकडे हिरवी झालर पांघरली जाते. तसे यमुनेचे तारुण्य सौंदर्याने बहरून आले होते. अगदी कुणाचीही नजर लागावी अशी यमुना दिसत होती. यमुना आपल्या मैत्रिणी सोबत कधी वाड्यावर तर कधी मैत्रिणीच्या घरी जाऊन हसत, खेळत, गप्पागोष्टी मारत दिवस घालवत असे. अगदी आनंद व नवचैतन्य तिच्यात भरले होते. परंतु तिची आई मात्र चिंतेत होती. एके दिवशी यमुनेच्या आईने यमुनेला सांगितले, ‘‘ तू आता घराच्या बाहेर जास्त वेळ जात जाऊ नको ’’ आता तु मोठी झालीस….! लोकांची वाईट नजर तुझ्यावर पडू देऊ नको? लोक काही चांगले नाही. कोमल फुलासारख्या माझ्या मुलीवर कुणाची वाईट नजर पडली तर? नको….! नको….! तु बाहेर जात जाऊच नको. आपला वाडा काय कमी आहे का? हवे असल्यास तुझ्या मैत्रिणींना आपल्या वाड्यावर बोलून घेत जा ! ‘‘ यमुना मोठ मोठ्याने हसतच म्हणाली ’’  आई मी काय आता झोक्यातले छोटे बाळ आहे का? मला हे सर्व सांगायला. मला कळते ग….! सर्वकाही. मी माझी काळजी घेते. तू नको जीवाला घोर लावून घेऊ....! तू रात्रंदिवस फक्त माझीच फिकीर करत असते ग….! तू तुझी पण काळजी करत जा.

                       एके दिवशी यमुनेच्या बाबाने यमुनेला जवळ बोलावून घेतले. ‘‘ यमुना आता मी तुझे लग्न करावे म्हणतोय ’’ आपल्या शेजारच्या गावात पाटलांची बहिण सुगंधा राहते. तिचा एकुलता एक मुलगा आहे. नाव त्याचे राजाराम ! घरी पन्नास एक्कर शेती आहे त्यांचा मोठा वाडा आहे. त्यांना गावात फार मान आहे. मोठा दबदबा आहे त्या घराण्याचा पंचक्रोशीत ! मुलगाही देखणा आहे. सुगंधा आता या जगात नसल्यामुळे पाटलाला राजारामची काळजी वाटते. मी पाटलाकडे अनेक वेळा बघितलेला आहे त्याला, पाटील हे माझे लहानपणापासूनचे मित्र. त्यांचे व आपले अगदी फार जुने संबंध आहे. माणसं अगदी प्रामाणिक विश्वासाची आहेत. पाटीलांनी ‘‘ कधी बोलावून घेऊ मुलाला, असे अनेकदा विचारले.’’ माझा विचार आहे परवा या म्हणून निरोप देतो त्यांना ! चालेल ना….! एवढ्या वेळ शांतपणे उभी असलेली यमुना लाजतच बैठकीतून निघून गेली. तिच्या लाजण्यातच यमुनेचा होकार समजून आला होता.

                         आज सकाळपासून घरात धामधूम होती. पाहुणे येणार म्हणून घरातील सगळी माणसं….! नटुन थटुन घरातील कामे पटपट आवरत होती. एखाद्या सणाप्रमाणे घराला नवंरूप आलं होतं. घरातील बैठकीपासून ते बाहेरच्या अंगणापर्यंत सर्व घर स्वच्छ व सुंदर सजवलं होतं. सर्वजण आता पाहुणे येतील याची वाट पाहत होते. तेवढ्यात घरघडी बाहेरून जोरातच धावत आला. ‘‘ मालक मालक पाहुणे आले ’’ यमुनाचे बाबा, भाऊ, घरातील माणसं ! सर्वजण पाहुण्यांना घेण्यासाठी घराच्या बाहेर आले. राजाराम त्याचे वडील, काका असे सर्व पाहुण्यांना घेऊन पाटील दारावर आले. ‘‘ रामराम मंडळी ’’ असे जोरात पाटलाने म्हणताच, यमुनेच्या बाबाने आदराने वाकून रामराम घातला. या पाटील आमच्या वाड्यावर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. पाहुणे घरात आली चहापाणी झाला. गप्पा मारत मारत पाटलानी सर्वांची एकमेकांशी ओळख करून दिली. बोलता-बोलता बराच वेळ झाला होता. पाटील यमुनेच्या बाबाला म्हणतात, ‘‘ यमुनेला घ्या आता बोलावून ’’ यमुनेच्या बाबाने हाताने इशारा करताच धाकटा भाऊ पटकन उठला व घरात गेला. ‘‘ यमुना चल लवकर ’’ तुला बाबांनी बैठकीत बोलावले. यमुना रोजच्या पेक्षा जास्तच नटुन होती. त्यामुळे अधिकच खुलून दिसत होती. तिच्या आईने तिला जायला इशारा केला यमुना आपल्या भावाच्या पाठीमागे निघाली. ऐरव्ही बैठकीत जाताना यमुना हसत हसत जायची. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती. सहाजिकच तिला पाहुणे बघायला आले होते. भावाच्या पाठीमागून यमुना बैठकीत आली. पाहुण्यांच्या समोर मधोमध चौरंग ठेवला होता. ‘‘ बस यमुना त्या चौरंगावर पाहुण्यांच्या समोर ’’ बाबा हळूच म्हणाले. यमुना चौरंगावर जाऊन बसली. पाहुण्यांनी यमुनाला नाव गाव, आवडी निवडी विचारल्या व येण्यास सांगितले. यमुना लाजतच बैठकीतून निघून गेली. पाहुण्यांना यमुना पसंत आली. यमुना व राजारामचे लग्न ठरले. एका महिन्यावर यमुनाच्या बाबांनी लग्नाची तारीख पक्की केली. यमुना व राजारामचे अतिशय धुमधडाक्यात लग्न लावले. सर्वांची लाडकी यमुना आता परक्या घरची धन झाली होती. माहेरवासीन सासरला निघून गेली.

          राजारामच्या घरी यमुनेचे धुमधडाक्यात वाजत गाजत स्वागत झाले. तिने सासरचा उंबरठा ओलांडला व दारावरचे माप ओलांडून यमुना घरात आली. सासर हेच आता यमुनेचे माहेर होते. सासु नसल्यामुळे घरात आल्यापासून यमुनेला राबावे लागणार होते. हळूहळू यमुनेच्या संसाराला सुरुवात झाली. बघता बघता यमुनेला चार मुली झाल्या. गंगा ! भागेरथी ! सावित्री ! गोदावरी ! त्यांचे नाव ठेवण्यात आले. गंगा, भागु, सावित्री, गोदा, यमुना, राजाराम व तिचे सासरे असा त्यांचा परिवार आनंदात राहत होता. एके दिवशी दुपारी अचानक यमुनेच्या बाबांच्या घरचा घरगडी दारात येऊन उभा राहतो व राजारामला बाहेर बोलावून निरोप देतो. यमुनेच्या आईला सर्पदंश झाला व त्यातच तिचे निधन झाले. यमुनेला डोंगराएवढे दुःख झाले. स्वतःची आई गेली या दुःखातून ती सावरते न सावरते ! तेच चार महिन्यांनी आईच्या दुःखाच्या धक्काने तिचे बाबाही वारले. जीवनातील दोन तेजस्वी सूर्य काळाने हिसकावून नेले होते. तिच्या जीवनातील अचानक मायेचा हा प्रकाश आटला होता. इकडे येमुनेच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली असे झाले. राजाराम व यमुनेची एक सारखी कटकट होऊ लागली. राजारामला मुलगा हवा होता. तो यमुनेकडे मुलासाठी सारखा हट्ट धरू लागला. यमुना घरात राबराब राबत होती. मध्यंतरी सासर्‍याला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे एक हात व पाय लुळा पडला होता. त्या दिवसापासून म्हातारा एकाच जागेवर पडून होता त्यामुळे म्हातार्‍याचे सर्वकाही यमुनेलाच करावे लागत होते. मुलासाठी राजाराम खूप भांडण करू लागला. यमुनेच्या जीवनात एकामागून एक वाईट प्रसंग घडतच होते. तरीसुद्धा यमुना या प्रसंगांना कशीबशी सामोरे जात होती.

                    अशातच तिला दिवस गेले. आता तरी मुलगा होईल म्हणुन राजाराम यमुनेला बजावत होता. यमुने ! मला मुलगा पाहिजे ! मुलगी झाली तर? मी तुला या घरात ठेवणार नाही. दिवसभर घरकाम, म्हाताऱ्याची सेवा, चार पोरींचे आवरणे यातच यमुना फार थकून  जात होती. वरून राजारामच्या धाकाने तिला एक वेळचे अन्नसुद्धा गोड लागत नव्हते. यमुनेचे दिवस भरत आले होते. राजाराम मुलासाठी अति उत्साही झाला होता. एके दिवशी सकाळी सकाळी यमुनेच्या पोटात दुखायला लागले. राजारामने पळत जाऊन गावातील दायनी मावशीला बोलावून आणले. थोड्या वेळातच यमुनेला गोंडस मुलगी झाली. राजारामला मुलगी झाली कळताच….! राजाराम प्रचंड संतापला. यमुनेवर राग राग करून बाहेर निघून गेला. मुलाच्या हव्यासाने हपापलेला राजाराम या वेळी फार संतापला होता. अतिशय रागाच्या भरात राजारामने आज चुकीचे पाऊल उचलले होते. तो खूप दारू पिला होता. सायंकाळी राजाराम दारुच्या नशेतच घरी आला व खूप भांडण करू लागला. यमुनेला मारहाण केली. यमुना अतिशय दुःखी झाली. पण नशिबापुढे ती तरी काय करणार होती. राजाराम मुलाच्या हव्यासापायी रोजच दारू पिऊ लागला. घरात पैशाची चुणचुण भासू लागली. शेती विकून दारुत पैसे उडवणारा राजाराम व्यसनात पार धुंद झाला होता. एकेकाळी राजकन्ये सारखे वैभव भोगणारी यमुना आज मात्र परिस्थितीने नवऱ्याची गुलाम झाली होती. पाच पोरींचा बाप होऊन सुद्धा राजाराम मुलासाठी हपापलेलाच होता. यमुना मात्र पाच पोरींची आई व घरकाम याने फार अशक्त झाली होती. आता मरण आलेले बरे ! पण लेकरं नको ! अशी तिची मानसिकता झाली होती. पण नवऱ्याची गुलाम झालेली यमुना पुन्हा या मोहाला बळी पडली. यमुनाला सहाव्यांदा दिवस गेले. आतां तरी मुलगा होऊ दे ! नाहीतर मरण तरी दे ! असे यमुनेने देवाकडे साकडे घातले होते. उन्हाने हिरवी वेल सुकावी तशी यमुना यावेळी फार सुकून गेली होती. एका जागेवरून उठणे तिला जमेनासे झाले होते. मात्र राजाराम ठरल्याप्रमाणे दारू पिऊन घरी आला व जोर जोरात यमुने मुलगा ! यावेळेस मुलगा दे मला ! असे बडबडु लागला. दिवस मावळला होता बाहेर अंधार पडला होता. अचानक यमुनेच्या पोटात दुखू लागले. यमुना वेदनेने विव्हळत होती. दुसरीकडे नशेत धुंद असणारा राजाराम मुलगा होतो की, मुलगी या विचारात मग्न होता. गंगाने भागेरथीला पाठवून गावातून दायनी मावशीला बोलावून घेतले. दायनी मावशी आली घराचा दरवाजा लावून पोरींना बाहेर पाठवले. यमुनेच्या आयुष्यात फक्त दुःख आणि वेदनाच भरल्या होत्या त्यामुळे तिला हे नवीन नव्हते. एकेकाळी सौंदर्याने बहरलेली यमुना आता मात्र अशक्त झाली होती. चाळणीसारखे तिचे शरीर खिळखिळे झाले होते.  पाच पोरींची आई होऊन यमुनेचे शरीर हाडांचा सांगाडा झाले होते. नऊ महिने रोजच कटकट व मारहाण यामुळे यावेळेस यमुनेत प्राण उरला नव्हता. यावेळेस तरी मुलगा होईल या आशेवर यमुना कसीबसी धिर धरुन नऊ महीने बळकष्टीने जीवंत होती. या वेळेस तिला अशक्त पणामुळे बाळ पोटाच्या बाहेर ढकलणे सुद्धा जमेना. प्रंचड वेदनेने यमुना ओरडत होती. एक सारखी रडत होती. दायनी मावशी यमुनेला धीर देत होती. पोरी होईल तुझं चांगलं.…! देव काही लय वाईट नाही. तुझ्या नशिबालाच काय हे कष्ट वाढुन ठेवलेत कुणास ठाऊक….! दायनी मवशीच्या आधाराने यमुनाला थोडा का होईना पण मायेचा आधार मिळत होता. थोड्या वेळातच बाळ रडण्याचा आवाज आला ! मावशीने दरवाजा उघडला. बाळाला घेऊन राजारामच्या मांडीवर ठेवून म्हणाली मुलगा झाला तुला….! मुलगा….! झाली का? आता मनाची शांती ! राजाराम नशेतच उड्या मारू लागला. मुलगा झाला ! या राजारामला मुलगा झाला ! गंगा, भागु, सावित्री, गोदा, सिंधू बघा....! बघा....! तुम्हाला भाऊ झाला. बघताय काय? शेजारी पाजारी ओरडून सांगा. ‘‘ भाऊ झाला आम्हाला, भाऊ ’’ मुलाच्या आनंदाने राजाराम पार वेडा झाला होता. यमुना कुठय? ती कशी आहे. याकडे त्याचे लक्षच नव्हते. थोड्यावेळाने गंगा, भागु घरात आली. यमुना एका जागी शांत पडली होती. पोरींनी तिला आवाज दिला. आई….! ये आई….! मुलगा झाला तुला….! यमुना मात्र ओ देत नव्हती. पोरींनी आईला हलवले. आई काहीच हालचाल करत नाही म्हटल्यावर भागु जोरात ओरडली. बाबा....! आईला काय झाले बघा. सावित्री, गोदा, सिंधू पळतच घरात आल्या. राजाराम बाळाला घेऊन डोलत डोलतच घरात आला व यमुनेकडे बघून आवाज देऊ लागला. यमुना ! ये यमुना ! बग मुलगा झाला मला....! मुलगा....! यमुना मात्र आयुष्याच्या सर्व कष्टातून व राजारामाच्या त्रासातून सुटुन एकदाचीच….! कायमची झोपली होती. कधीही न उठण्यासाठी.......!

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलढाणा
9823425852
ब्लॉग वरती वाचु शकता

शाळेची घंटा कधी वाजणार ?

     शाळेची घंटा कधी वाजणार ? 


दरवर्षी जून महिना सुरु झाला की, मुलांना चाहूल लागते ती शाळेची. महाराष्ट्रात कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश व मराठवाडा या ठिकाणी 15 जून रोजी शाळा उघडते. तर विदर्भात 26 जुन या दिवशी शाळा सुरू होतात. शाळा सुरु झाली की, पहिल्या दिवशी शाळेची घंटा वाजली की, शाळेला जिवंत स्वरूप प्राप्त होते. मुलांचा एकच कल्लोळ, सगळीकडे लगबग सुरू होते. कुणाची जागा पकडण्यासाठी, तर कुणाची सरांना भेटण्यासाठी घाई, तर कुणाची मित्रांना भेटण्यासाठी घाई सुरु होते. माझी शाळा, माझा वर्ग, माझी बसण्याची जागा, माझा फळा, माझे पुस्तक या सर्वांशी पुन्हा एकदा लळा सुरू होतो. उन्हाळी सुट्टी लागल्यापासून विद्यार्थी व शिक्षकांची भेट नसते. तसेच विद्यार्थी सुद्धा एकमेकांना फारसे भेटत नाही. सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाणे, तसेच इतर नातेवाईक, लग्न समारंभ, वेगवेगळ्या पर्यटन स्थळी फिरण्यासाठी आई-वडिलांसोबत जात असतात. तर काही विद्यार्थी सुट्ट्यांमध्ये गुणवत्तावाढीसाठी तसेच स्वतःच्या कला जोपासण्यासाठी उन्हाळी वर्ग, शिकवणी लावतात. उन्हाळी शिबिरामध्ये सहभागी होऊन विविध कलागुणांना वाव देतात. त्याचबरोबर पोहणे, रांगोळी काढणे, चित्रकला, गायन, वादन, नृत्य, अभिनय, सुंदर हस्ताक्षर अशा विविध कला आत्मसात करतात. सुट्टीचा पूर्णवेळ विद्यार्थी अनौपचारिक शिक्षणात घालवतात. मुक्तपणे छंद जोपासतात. सुट्टी संपली शाळा उघडली की खूप दिवसांनी पुन्हा एकदा सगळी मुलं एकत्र येतात.एकमेकांची विचारपूस, सुट्टीतील उपक्रम, सुट्टीतील मजा एकमेकासोबत शेअर करतात. आता पुढील नवीन वर्गात प्रवेश घेतलेला असतो. मुले एका वर्षांनी मोठी झालेली असतात. शाळेच्या या नवीन शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी विद्यार्थी सज्ज असतात. विद्यार्थी दशेतील जीवन हे सतत नवीन शिकण्यासाठी प्रोत्साहित असते. नवीन पुस्तके, नवीन दप्तर, नवीन गणवेश, नविन शुज सर्व शालेय साहित्य नवीन मिळणार असते. विद्यार्थी मनाने अतिशय प्रसन्न असतात. विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक स्थिती अतिशय प्रफुल्लित असते. शिक्षक शाळेच्या प्रांगणात येताच विद्यार्थी जल्लोष करतात. प्रत्येकाच्या तोंडातून आमचे सर आले,आमचे सर आले हे वाक्य बाहेर पडते. यामागे विद्यार्थ्यांचे शिक्षका विषयी असलेले प्रेम प्रगट होत असते. विद्यार्थी व शिक्षक हे अतिशय अतूट नाते आहे. हे नाते गुरु व शिष्य एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता मित्र, पालक, गुरु, मार्गदर्शक अशा विविध भूमिकेतून हे नाते दृढ होत जात असते. शिक्षक व विद्यार्थी दोघेही विविध भूमिका साकारत असतात. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील हे दोन्ही महत्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना भेटण्याची उत्सुकता व शिक्षकाचे मिळणारे प्रेम या दिवशी दोन्ही गोष्टी सफल होतात. विद्यार्थी नवीन पुस्तके स्वीकारतात. याबरोबरच नवीन ज्ञान, नवीन अनुभव, नवीन उपक्रम, नवीन माहिती घेण्यासाठी सज्ज असतात. विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांना पुरक असे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थी हा शिक्षणातील केंद्रबिंदू समजून शिक्षणाचे नियोजन केले जाते. शिक्षण ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तेवढीच शिक्षक, शाळा व सरकार यांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे. शिक्षण हे तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. शिक्षण दर्जेदार व सर्व सुविधा मोफत विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी सरकारने कायदा अमलात आणला आहे. सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा निर्माण झालेला आहे. या कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे.प्रत्येक बालक शिक्षण घेण्यास सक्षम आहे. गरज आहे ती फक्त शाळा,  समाज, पालक व सरकार यांनी जागृत होण्याची. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये द्वितीय वर्षाला सुरुवात झाली. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होती. परीक्षेचा काळ जवळ आला आणि कोरोना सारख्या माहमारीने जगभर थैमान घातले. यात भारतात सुद्धा या विषाणूने आपला प्रादुर्भाव वाढवला. देशाला लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे ग्रामीण-शहरी सर्व शाळा बंद झाल्या. लॉकडाऊन एक-दोन-तीन असे वाढतच राहिले. शाळा बंद केल्या त्या अद्यापही बंदच आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाही. तसेच शिक्षण व अध्ययन प्रक्रिया थांबली. यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक, शाळा व सरकार यांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले. ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर सुरू झाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार केले. त्यावर नियमित विद्यार्थ्यांना अभ्यास देणे सुरू झाले. याशिवाय दीक्षा ॲपचा वापर करणे, तसेच विविध शैक्षणिक ॲपचा वापर करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊ लागले. ऑनलाइन शिक्षण प्रणालीने शिक्षणाचा उद्देश पूर्ण होऊ लागला. परंतु शिक्षण मात्र प्रत्येक बालकाच्या पर्यंत पोहोचू शकले नाही. अर्थात त्याला अनेक कारणं आहेत. आजही ग्रामीण भागात वीज नसणे, मोबाईलचे पुरेसे नेटवर्क नाही. अनेक कुटुंबात अँड्रॉइड मोबाईल नाही. अनेक पालकांना तर मोबाईलच नाही. यामुळे अशा कुटुंबातील मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळू शकले नाही. ऑनलाईन शिक्षण हे शहरी भागासाठी प्रभावी ठरेल. परंतु ग्रामीण भागासाठी मात्र पुरेसे नाही.आजही ग्रामीण भागात गावात वाडी-वस्तीवर प्रत्येक बालकापर्यंत शिक्षण पोहोचवायचे असेल तर शाळा सुरू होणे गरजेचे आहे. आजही वाडी-वस्तीवर मुले शाळेच्या घंटीच्या आवाजाकडे कान लावून बसलेली आहे. आज शाळा सुरु होण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. शिक्षणा ऐवढेच आरोग्य सुद्धा महत्वाचे आहे. कोरोना सारख्या महामारी मध्ये शाळा सुरु करणे कितपत योग्य आहे. हा विचार सरकार करत आहे. जर शाळा उघडता आले नाही. तर पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाइन शिक्षण सुविधा निर्माण होऊ शकते. परंतु प्रत्येक बालकाच्या पर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी मात्र शाळा सुरू होणेच योग्य राहील. आज प्रत्येक विद्यार्थी व पालक शाळा कधी उघडणार याकडे लक्ष देऊन आहे. कोरोना सारखे महामारीचे संकट लवकरच जावो हीच देवाकडे प्रार्थना करूया. या माहमारीतुन भारताला लवकर बाहेर पडू दे जेणेकरून लॉकडाऊन संपेल. पुन्हा एकदा सर्वसामान्य जीवन सुरळीत होईल. शाळा सुरू करण्याबाबत सरकार कडून सूचना प्राप्त होतील. पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजेल. विद्यार्थ्यांचा एकच आवाज शाळेत घुमेल. शाळेला नवचैतन्य निर्माण होईल. गेल्या तीन महिन्यापासून विद्यार्थीविना शांत झालेली शाळा पुन्हा फुलून जाईल.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852




Sunday, 9 August 2020

लेक ( कविता )

कवितेचे शिर्षक :-  लेक

घरी जन्माला येता लेक

आनंदाने उजाळते घरदार

लक्ष्मीच्या पावलाने होते

बापाच्या जीवनाची भरभराट


वंशाच्या दिव्या पेक्षा

दिवातली वात बरी

संस्कार आणि संस्कृतीचा

प्रकाश देते घरीदारी


गरिबीची तमा न बाळगता

परिस्थितीशी करते दोन हात

बापाच्या हाताला देते

कष्टाच्या मदतीचा हातभार


कुणाची मुलगी कुणाची ताई

कुणाची आई कुणाची बाई

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

निभावते भुमिका सर्वकाही


लेक वाचवा लेक शिकवा

नका करु वैचारीक मतभेद

अभिमान बाळगा लेकीचा

नका करु जन्माचा खेद


शिक्षण, उद्योग, नौकरीत

बरोबरीने चालते प्रवाहात

आवाज घुमतो सगळीकडे

अभिमानाचा या महाराष्ट्रात


✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852


" कुटुंबातील सुसंवाद "

" कुटुंबातील सुसंवाद "


आधुनिक युगात जीवन जगतांना प्रत्येक जण धावपळीचे आयुष्य जगतोय.दिवस निघाल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत प्रत्येक मनुष्य स्वतःच्या आयुष्यात खूप बिझी झाला.पर्यायाने त्याला समाज,शेजारी-पाजारी,मित्रमंडळी यांच्यासोबत वेळ देणे शक्य होत नाही.आपले घर आणि आपले काम यातच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे.त्यामुळे समाज,शेजारी,मित्रमंडळी, यांच्यातील संवाद घडवून आणणे बंद झाले.स्वतःच्या कुटुंबात तो व्यस्त झाला.यातच तंत्रज्ञानाने गरुड झेप घेतली.इंटरनेटच्या जमान्यात थ्री जी, फोर जी इंटरनेट सुविधा आली.व्हाट्सअप, फेसबुक,ट्विटर,इंस्टाग्राम यासारखी साधने आली.माणसाने स्वतःला या सर्वांशी गुंतवून घेतले.एकेकाळी समाज,शेजारी, मित्रमंडळी यांच्यापासून दुरावलेला माणूस आतातर कुटुंबातून सुद्धा दुरावत चाललेला आहे.कारण कुटुंबात प्रत्येकाकडे मोबाईल आला.या मोबाईलने प्रत्येकाला व्हाट्सअप,फेसबुक, ट्विटर यासारखी व्यसने लावली.या सर्वांमध्ये मनुष्य एवढा गुंतला गेला की,तो कुटुंबात सुद्धा संवाद साधत नाही.घरात एकमेकासमोर बसलेली कुटुंबातील माणसे अनोळखी माणसा सारखी एकमेकांकडे बघतात. पण बोलत नाही.कारण त्यांचे सर्व लक्ष मोबाईलमध्ये गुंतलेले असते.एकेकाळी गावातील चावडीवर,मंदिरावर, माणसांचा घोळका दिसायचा.एकमेकांशी माणसं मनमोकळेपणाने गप्पा मारायची एकमेकांची विचारपूस करायची.यातुन अनेकांचे सुख दुःख कळायचे.एकमेकांची आपुलकीने चौकशी करायची यातून माणसा माणसांमध्ये सुसंवाद व्हायचा व प्रेम, जिव्हाळा वाढिस लागायचा.बसने प्रवास करताना सहाजिकच शेजारी बसलेल्या माणसाची विचारपूस करून ओळख निर्माण व्हायची.यात्रा-जत्रा, बस स्टॅन्ड,लग्न समारंभ अशा विविध गर्दीच्या ठिकाणी ओळखीचा माणूस बघितला की गर्दीतून वाट काढत त्याच्याकडे जाऊन आपुलकीने विचारपूस व्हायची.आता मात्र या गोष्टी होताना दिसत नाही.कुटुंबातील सुसंवाद बंद झाला.यामुळे कुटुंबातील प्रेम,जिव्हाळा कमी होत चालला आहे.कुटुंबातील आपुलकीची भावना लोप पावत आहे. सणवार,उत्सव यासाठी कुटुंब एकत्र जमायचे.प्रत्येक जण मनमोकळेपणाने गप्पा मारायचे,मनमुराद हसायचे,मुक्तपणे चर्चा चालायच्या.यातून अनेक गोष्टींची, विचारांची देवाण-घेवाण व्हायची.यामुळे मन प्रसन्न होऊन प्रत्येक जण दुसऱ्या दिवशी उत्साहाने आपापल्या कामावर जायचा.सहाजिकच आनंदी जीवन शैलीमुळे मानसिक व शारीरिक संतुलन अबाधीत राहायचे.आजकाल मात्र मोबाईल, टीव्ही,इंटरनेट यामुळे संवाद होत नाही.चर्चा,गप्पा,हसणे या गोष्टींना कोणीच महत्त्व देत नाही.यातून विचारांची देवाण-घेवाण होत नाही.सुख,दुःख अनेक अडचणी शेअर होत नाही.माणूस भावनिक दृष्ट्या एकटा पडत चालला आहे. यामुळे चिडचिड होणे,अति राग येणे,मानसिक अस्वस्थता या गोष्टी घडत आहे. माणूस भावनाशील आहे कुठेतरी त्याच्या भावना मोकळ्या झाल्या पाहिजे.नाही तर मनुष्य चिडचिडा बनतो,आक्रमक बनतो यातून नैराश्य निर्माण होते.अनेक जण आत्महत्या करतात.स्वतःला संपवतात. कुठेतरी या गोष्टी थांबवण्यासाठी कुटुंबातील सुसंवाद घडणे गरजेचे आहे.सुसंवाद,गप्पा-गोष्टी, चर्चा,वाचन,लेखन या गोष्टी करण्यासाठी प्रत्येकाने व्हाट्सअप, फेसबुक,ट्विटर यासारख्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.तरच कुटुंबातील सुसंवाद वाढेल.सुखी आयुष्य जगण्यासाठी सुसंवाद,वाचन,लेखनाची नितांत गरज आहे.नविन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण सर्वजण संकल्प करूया. कुटुंबातील सुसंवाद वाढवूया आनंदी जीवन जगूया.

✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

Saturday, 8 August 2020

मानसिक स्वास्थ

                                    

                         मानसिक स्वास्थ


अठराव्या शतकापासून ते आजच्या एकविसाव्या शतकापर्यंत भारत देशाची प्रगती वाढत गेली आहे. अठराव्या शतकातील मानवजात व एकविसाव्या शतकातील मानवजात यात प्रचंड बदल झाला आहे. सुरुवातीच्या काळात मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी खूप संघर्ष, खूप कष्ट करावे लागत होते. प्रचंड आर्थिक कमतरता त्याकाळात भासत होती. अर्थात त्याकाळी व्यवसाय, उद्योग धंदे, शिक्षण, तंत्रज्ञान विज्ञान यामध्ये भारत मागे होता. बारा बलुतेदारी नुसार लोक आपापली व्यवसायाची कामे करत व त्यावर स्वतःचा उदरनिर्वाह भागवत असे. त्यावेळच्या कष्टाची चुलीवरची गरमागरम भाकरीची चव मात्र खूप भारी होती. कारण परिस्थिती, काम, कष्ट या गोष्टी लोकांनी आनंदाने स्वीकारल्या होत्या. लोक संकटांना स्वाभिमानाने सामोरे जात असत. त्यामुळे दैनंदिन जीवनावर मात्र परिस्थितीचा तीळमात्रही परिणाम होत नसे. लोकांच्या गरजाही खूप कमी होत्या. जीवन जगताना पोटाला पोटभर भाकर, अंगाला वस्त्र आणि राहण्यापुरती जागा एवढे जरी आयुष्यात मिळवता आले तरी खूप सारी संपत्ती जमवली असा माणसांचा समज होता. त्याचे कारण लोकांचे आजच्या तुलनेत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम होते.
               एकविसाव्या शतकातील माणसाचे जीवन मात्र उलटे झाले आहे. देशाने प्रचंड प्रगती केली शिक्षण व तंत्रज्ञानात खूप बदल झाले. शहरापासून ते गावापर्यंत शिक्षणाची सुविधा प्राप्त झाली. त्यामुळे प्रत्येक जन्माला येणारा व्यक्ती उच्च शिक्षण घेऊ लागला. शिक्षणाबरोबरच व्यवसाय, उद्योग धंदे, आधुनिक तंत्रज्ञान, नोकरी आदी ठिकाणी रोजगार निर्माण झाला. प्रत्येकाला स्वतःच्या शिक्षणानुसार व अनुभवानुसार रोजगार, नोकरी मिळत गेली. प्रत्येकाला उत्तम पगार, व्यवसायात उत्तम उत्पादन मिळत गेले. त्यामुळे माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा सहज भागत आहे. याशिवाय मनुष्याने स्वतःच्या इच्छेने निर्माण केलेल्या इतरही गरजा मनुष्य भागवत आहे. आज आपण समाजात पाहतो राहणीमान, व्यसन, वेगवेगळ्या प्रकारच्या सुखाची साधने आदी गोष्टीसाठी माणूस प्रचंड खर्च करत आहे. आज अनेक लोकांकडे सर्व सुविधा आहे. चांगली नोकरी, मोठा बंगला, घरासमोर आलिशान चार चाकी गाडी अशा सुखसोयी उपलब्ध आहे. परंतु मानसिक समाधान मात्र नाही. प्रत्येक जण प्रचंड ताण तणावाचे जीवन जगत आहे. घर, कुटुंब, समाज, शेजारी आधी गोष्टी पासूनच्या अनेक समस्या रोज निर्माण होत आहे. मनुष्य या समस्यांमुळे प्रचंड अस्वस्थ आहे. पैसा, प्रतिष्ठा, सुविधा, सुख देतात म्हणून आयुष्यात या गोष्टीमागे मनुष्य खूप धावत राहतो. या सगळ्यांमध्ये मात्र जीवन जगायचे राहून जाते. आज अर्ध्या पेक्षा जास्त काळ सुखाच्या मृगजळा मागे खर्च होतो. मिळवलेल्या सुखसुविधांचा उपभोग घ्यायचा तर मनुष्याच्या मागे आजार, वेगवेगळ्या व्याधी लागतात. त्याचे मानसिक स्वास्थ बिघडून जाते. जीवनाच्या संघर्षात जगायचे राहून जाते. याचे कारण म्हणजे मानसिक स्वास्थ्य चांगले नाही. मानसिक समाधान नाही. प्रचंड ताण तणाव अति प्रगतीची धावपळ त्याचबरोबर वेळेवर जेवन नाही पुरेसी झोप नाही. कामकरण्याचे नियोजन नाही. नियमीत व्यायाम नाही. सर्वांमध्ये निश्चितच मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. आज मित्र, कुटुंब, नातेवाईक, समाज यापासून प्रत्येकजण दुरावत चाललेला आहे. वाचन, संवाद, गप्पागोष्टी, सामुहिक उत्सव, सामुहीक सण साजरे होणे यामुळे मनुष्याचे स्वास्थ्य उत्तम राहते. परंतु आदी गोष्टी मात्र आज घडत नाही. कारण आयुष्यात प्रगतीच्या मागे धावताना कुणालाच मागे वळून पाहवेसे वाटत नाही. म्हणून मनुष्य फक्त धावतोय स्वतःच्या स्वास्थ्याकडे त्याचे लक्ष नाही. मनाला समाधान लाभेल असे काही घडत नाही. यातूनच मानसिक स्वास्थ्य बिघडत जाते. मनुष्यात बदल होत जातो तो एकटा एकटा राहतो. एकटे जीवन जगणे पसंत करतो. स्वतःच्या मनातील विचार, भावना तशाच दाबून ठेवतो. यामुळे प्रचंड ताण तणाव, प्रचंड क्रोध, नैराश्य आदी गोष्टीकडे मनुष्य झुकला जातोय. यामुळे समाजात सर्व गोष्टींनी सर्व सुखांनी समृद्ध असणारी माणसं सुद्धा आत्महत्या करतात. नेमकी याची कारणे शोधणे कठीण होऊन बसते. यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात उपलब्ध सोयीनुसार जीवनात आनंद शोधला पाहिजे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाचा निखळ आनंद लुटला पाहिजे. मनुष्य जीवन हे मुळातच सुंदर फुला सारखे फुलत जाते. फक्त आपल्याला त्याचा सुगंध घेता आला पाहिजे. फुलाचा सुगंध घेतला काय ? किंवा नाही घेतला काय ? ते एक दिवस सुकूनच जाणार असते. म्हणून उमललेल्या फुलाप्रमाणे माणसाने स्वतःचे जीवन आनंदाने बहरून टाकावे. प्रत्येकाने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपावे स्वतःच्या जगण्याला वेळ द्यावा. जीवन जगण्यासाठी आहे ते व्यर्थ घालवण्यासाठी नाही. प्रत्येकाने मन भरून जीवन जगावे जीवन जगण्यातच खरा आनंद आहे. मात्र आजचा मनुष्य जीवन घालवण्यातच व्यस्त आहे. चला जीवनाचा आनंद घेऊया व आनंदी जीवन जगूया. दुसऱ्यांना सुद्धा स्वतःच्या जगण्यातून आनंद वाटूया.

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा......
झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा......
पाण्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा........
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा.......


✍✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलढाणा
9823425852

Saturday, 1 August 2020

बळीराज्याची दिवाळी यावर्षी संकटात

   बळीराज्याची दिवाळी यावर्षी संकटात


भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक जाती धर्मात वेगवेगळे सण,उत्सव साजरे होत असतात.प्रत्येक राज्यात तेथील भौगोलिक,सामाजिक परिस्थितीनुसार सण साजरे होत असतात.महाराष्ट्रात सुद्धा अनेक सण,उत्सव साजरे होतात.यातीलच महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी होय.प्रत्येकाच्या घरात आनंदाचा प्रकाश घेऊन येणारा हा सण आहे.वर्षभर काबाडकष्ट,नोकरी सांभाळत असताना कुटुंबापासून, स्वतःच्या गावापासून दूर राहावे लागते.दिवाळी सणाला प्रत्येकजण स्वतःच्या गावी येतो.व कुटुंबासोबत उत्साहात दिवाळी साजरा करतो.देशातील बळीराजा कष्टकरी, शेतकरी मात्र निसर्गावर अवलंबून असतो.बळीराजाची या वर्षीची दिवाळी मात्र संकटात, अंधारात आहे.कारण दरवर्षी येणारे संकट त्याला सतत अडचणीत आणत असते. मागच्या वर्षी भीषण दुष्काळ होता.यामुळे शेतात उत्पन्न झाले नाही.गेल्या वर्षी खर्च केल्या इतका माल झाला नाही.यातच वीमा कंपनीने शेतकऱ्यांना पुरेसा विमा दिला नाही.यातून स्वतःला सावरत पुन्हा नवीन उमेदीने शेतकरी कामाला लागला.जून महिन्यात बँकेच्या पायऱ्या झिजवत कर्ज मिळविले.काहींना कर्ज सुद्धा मिळाले नाही.पैसे नाही म्हणून पेरणीसाठी खत,बी,भरण घेणे थांबले.कसाबसा पैसा मिळवून खत,बी,भरण घेतले.जुलैच्या सुरुवातीला पेरणी केली.कसबसे पिक उगवले. स्वतःच्या पोटच्या गोळ्याप्रमाणे शेतातील पीक जपले. खुरपणी, फवारणी,केली. यातच कुठे पाऊस पडला नाही,तर कुठे अतिवृष्टी झाली.एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले.काही भागात अतिवृष्टी झाली.बळीराजाच्या शेतातील पिकाचे एका रात्रीत संपूर्ण नुकसान झाले.तर याउलट काही भागांमध्ये पाऊस नाही.म्हणून शेतातील छोटी-छोटी पिके पावसाच्या आशेने आभाळाकडे बघत राहिले.या सर्वातुन सावरत शेतातील माल डोलायला लागला,रान हिरवेगार मोत्यासारखे चमकू लागले.कष्टाला पुन्हा एकदा उभारी आली.कधी नव्हे एवढे पीक यावर्षी आले.जणूकाही यावर्षी शेतकरी गर्भश्रीमंत होणार यासाठी निसर्गाने किमया घडवली असे वाटू लागले. सोयाबीन चा हंगाम सुरू झाला.दिवस-रात्र कष्ट करून सोयाबीन कापणी सुरू झाली.काही भागात सोयाबीन कापणी चालूच,तोच वरुणराजाने जोरदार हजेरी लावली.रोजच पाऊस पडू लागला व तोंडाजवळ आलेला घास पुन्हा निसर्गाने हिसकावून घेणे सुरू झाले.नको त्या वेळी पडलेल्या या पावसाने ज्वारीच्या उभ्या कणसाला कोम फुटु लागले,सोयाबीनच्या सूड्या शेतात खराब होऊ लागल्या. कपाशीचे बोंड सडू लागले.बळीराजावर पुन्हा एकदा संकट आले.मात्र या संकटात लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे.पुढारी मात्र विधानसभेच्या धामधुमीत व्यस्त होते. सरकारला नवीन सरकारचे वेध लागले.कर्मचारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त झाले.शेतकरी मात्र चिंतेने पार हतबल झाला.नेहमीप्रमाणे रोजच नको असलेलं आयुष्य जगू लागला.निसर्गच त्याचा मित्र आणि निसर्गच त्याचा शत्रू सांगावे तरी कुणाला अशी त्याची अवस्था झाली.जवळचे पैसे शेतीला लावून बसला.आता त्याच्या जवळ पैसे उरले नाही व उमेदही उरली नाही.वर्षभराचा उत्सव दिवाळीच्या रुपाने अंगणात आला.मात्र आता या उत्सवाचा प्रकाश करायला त्याच्याकडे पैसे नाही.मनात इच्छा उरली नाही.आज पुढारी, नोकरदार,व्यवसायिक यांच्या घरात उत्साहात दिवाळी साजरी होणार,पण जगाचा पोशिंदा माझ्या बळीराजाची दिवाळी या वर्षीसुद्धा संकटातच साजरी होणार.या कृषीप्रधान देशात माझ्या बळीराजाला चांगले दिवस येवोत व माझ्या बळीराजाची दिवाळी दरवर्षी आनंदाने लख्ख प्रकाशात साजरी होवो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना.यासाठी प्रत्येकाने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया तरच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

माझे जीवन माझा योगा

           माझे जीवन माझा योगा

21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो.उद्देश हाच योगाचे महत्व प्रत्येकाला समजावे. आज आपण पाहतो एकविसाव्या शतकात वावरतांना प्रत्येकाचे आयुष्य अतिशय धावपळीचे झाले आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे मनुष्य दिवसभर धावत असतो. उद्योग,व्यवसाय,नोकरी,शिक्षण,शेती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतो.जीवनात प्रगती करण्यासाठी मनुष्य सतत धावत असतो.प्रगती,पैसा,प्रतिष्ठा या मागे धावताना स्वताकडे लक्ष देत नाही.आयुष्यात पैसा,प्रतिष्ठा एवढेच महत्त्वाचे नाही.त्याचबरोबर निरोगी आरोग्य सुद्धा महत्त्वाचे आहे.स्वतःचे आरोग्य चांगले असेल तर,इतर सर्व गोष्टी मनुष्य करू शकतो. अनेक जण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही.शेवटी शरीराला एखाद्या रोगाने ग्रासले की,मात्र आयुष्यात कमावलेला पैसा खर्च करत राहतो.परंतु आरोग्य पहिल्यासारखे पुन्हा कधीच मिळत नाही.भगवंताने दिलेले सुंदर शरीर शेवटपर्यंत सुंदर व तरुन राहण्यासाठी नियमित योगा केला पाहिजे.दिवसभराच्या व्यस्त कामात आपण आपल्या शरीरासाठी दररोज किमान एक तास दिला पाहिजे.नियमित रोज सकाळी एक तास योगा केला पाहिजे.माणसाचे मन शेवटपर्यंत तरूण राहते. तसे शरीर सुद्धा निरोगी व तरुण राहण्यासाठी योगा करणे फार महत्त्वाचे आहे. आज आजारपणात मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये निदानासाठी गेल्यानंतर डॉक्टर योग्य उपचार करतात.व सोबत नियमित व्यायाम,योगा करण्याचा सल्ला देतात.निरोगी आयुष्यासाठी योगाचे स्थान महत्वाचे आहे. एखादा आजार योग्य मेडीसिनने बरा होऊ शकतो.परंतु निरोगी आरोग्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतः एक तासाचा वेळ दिला तर आयुष्यात हॉस्पिटलमध्ये अनेक तास घालवायची गरज पडणार नाही.आज देशात हजारो लोक सकाळीच योगा करतात. योगामुळे प्रसन्नता लाभते.दिवसभर करणारे काम प्रसन्नतेने, उत्साहाने पूर्ण होते.योग शरीराला निरोगी ठेवते.याबरोबरच उत्साह,प्रसन्नता,कार्यक्षमता वाढविण्यास सुद्धा मदत करते.आपले ह्रदय दिवसभर काम करते.त्याला प्रसन्न करण्यासाठी,त्याचा थकवा घालवण्यासाठी योगा करणे आवश्यक आहे.वेगवेगळ्या आजारावर योगाच्या माध्यमातून सहज विजय मिळवता येतो. कुठल्याही आजारावर रामबाण उपाय म्हणजे योगा होय.नियमित योगा करण्यासाठी सकाळची वेळ उत्तम आहे.आपण असाल त्याठिकाणी हवेशीर मोकळ्या जागेत योगा करू शकतो. लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत योगा करू शकतात.ज्यांना जो आजार आहे ज्या शारीरिक व्याधी आहे त्याला अनुसरून योगा करता येतो.आज बाजारात योगासनाच्या संदर्भात पुस्तके उपलब्ध आहे.आपण पुस्तके, टीव्ही,मोबाईल, युट्यूब याद्वारे सहज योगासनांची माहिती मिळवू शकतो.योगासनाचे व्हिडिओ बघून योगा करू शकतो.योग हा आस्तिक समजला जातो.योगामुळे मन,विचार,भावना,शारीरिक हालचाली सकारात्मक, आस्तिक होतात.चांगले विचार,चांगले मन,चांगली भावना, चांगल्या कामास प्रवृत्त करत असतात.मनाची प्रसन्नता व चांगले विचार याचे उत्तम औषध म्हणजे योग होय.आज देशभर,जगभर लोक योगा करतात. शालेय वयापासूनच योगाचे महत्त्व मुलांमध्ये रुजवले जाते.उत्तम आरोग्य हेच खरे धन आहे.आरोग्य ठणठणीत असेल तर इतर सुखाचा उपभोग घेता येईल.जीवनात सुखाचा उपभोग घेण्यासाठी निरोगी शरीर असावे लागते.शरीर रोगी असेल तर कोणतेही सुख सहजासहजी घेता येत नाही.रोजच्या जीवनशैलीला बंधने येतात. खाणे-पिणे,फिरणे,नेयमीत गोळ्या औषधी, नियमीत दवाखाना या गोष्टी मागे लागतात.यासाठी नियमित प्रत्येकाने सकाळी एक तास योगा करावा.निरोगी मनुष्य निरोगी आयुष्य ही येणाऱ्या काळाची गरज आहे.आज माणसाचे आयुष्यमान कमी झाले.पूर्वी शंभर वर्षे जगणारी माणसं शेवटपर्यंत निरोगी,ठणठणीत राहायची.आजकाल मनुष्याचे आयुष्य फार कमी झाले.अगदी कमी वयात वेगवेगळे आजार माणसाला जडत आहे.याचे कारण म्हणजे शरीराला पुरेसा वेळ आपण देत नाही.शरीराची बाह्य काळजी घेत राहतो.परंतु अंतर्गत शरीराची काळजी घेतली जात नाही.त्याचबरोबर सकाळी उशिरा उठणे,रात्री उशिरा झोपणे, चटपटीत फास्ट फूड खाणे, व्यसनाधीनता इत्यादी कारणांनी आयुष्मान कमी करून टाकले आहे.आज माणसाने विज्ञानाच्या साह्याने अनेक शोध लावले. अनेक नवीन गोष्टीचा माणसाच्या जीवनात शिरकाव झाला.या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपभोग घेण्यासाठी निरोगी आयुष्य मात्र दीर्घकाळ मिळत नाही.नवनवीन शोधाचे मागे धावताना स्वतःच्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संकल्प करुया नियमीत एक तास योगा करूया.स्वतःची व संपूर्ण कुटुंबाची निरोगी आयुष्याची काळजी मिटवूया.योगाने सुंदर जीवन घडवुया.माझे जीवन माझा योगा हा निरोगी आयुष्याचा संकल्प मनी ठाम करुया. 

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...