यमुना (लघुकथा)
यमुना ! अग ये यमुना ! काय करतेस ग.....! अगदी जोरा जोरात आवाज देऊन सुद्धा यमुनेने ओ दिली नाही. रोजच्याप्रमाणे मैत्रिणीसोबत यमुना अंगणात खेळण्यात गुंग होती. सकाळी दिवस उजाडल्यापासून तर सायंकाळी दिवस मावळेपर्यंत यमुना अख्ख्या वाड्यामध्ये सारखी मुलींसोबत खेळत असायची. आई बापाची लाडकी एकुलती एक मुलगी ती, जणू राजकन्याच होती. पाच भावंडात सर्वांत छोटी होती. सहाजिकच आई-वडील व चारही भावांनी ज्ञानदेवांच्या मुक्ताई प्रमाणे जीवापाड तिला जपले होते. एखाद्या राज्याच्या राजकन्ये प्रमाणेच तिचे बालपण गेले. बापाचा मोठा वाडा होता. घरात अन्नधान्य, धनदौलत, पैसा आदला मुबलक होता. गावात तिच्या बापाला पाटला एवढाच मान होता. त्यामुळे यमुना ही सर्वांचीच आवडती गावातील सर्व बायका तिचा खूप लाड करायच्या. घरीदारी नुसता लाड….! अन लाडच….! सुरू होता. आईच्या व बापाच्या मायेने यमुना कधी मोठी झाली कळले सुद्धा नाही. यमुना उंचपुरी व धिप्पाड झाली होती. अगदी श्रावणाने जसा निसर्ग बहरून येतो. सगळीकडे हिरवी झालर पांघरली जाते. तसे यमुनेचे तारुण्य सौंदर्याने बहरून आले होते. अगदी कुणाचीही नजर लागावी अशी यमुना दिसत होती. यमुना आपल्या मैत्रिणी सोबत कधी वाड्यावर तर कधी मैत्रिणीच्या घरी जाऊन हसत, खेळत, गप्पागोष्टी मारत दिवस घालवत असे. अगदी आनंद व नवचैतन्य तिच्यात भरले होते. परंतु तिची आई मात्र चिंतेत होती. एके दिवशी यमुनेच्या आईने यमुनेला सांगितले, ‘‘ तू आता घराच्या बाहेर जास्त वेळ जात जाऊ नको ’’ आता तु मोठी झालीस….! लोकांची वाईट नजर तुझ्यावर पडू देऊ नको? लोक काही चांगले नाही. कोमल फुलासारख्या माझ्या मुलीवर कुणाची वाईट नजर पडली तर? नको….! नको….! तु बाहेर जात जाऊच नको. आपला वाडा काय कमी आहे का? हवे असल्यास तुझ्या मैत्रिणींना आपल्या वाड्यावर बोलून घेत जा ! ‘‘ यमुना मोठ मोठ्याने हसतच म्हणाली ’’ आई मी काय आता झोक्यातले छोटे बाळ आहे का? मला हे सर्व सांगायला. मला कळते ग….! सर्वकाही. मी माझी काळजी घेते. तू नको जीवाला घोर लावून घेऊ....! तू रात्रंदिवस फक्त माझीच फिकीर करत असते ग….! तू तुझी पण काळजी करत जा.
एके दिवशी यमुनेच्या बाबाने यमुनेला जवळ बोलावून घेतले. ‘‘ यमुना आता मी तुझे लग्न करावे म्हणतोय ’’ आपल्या शेजारच्या गावात पाटलांची बहिण सुगंधा राहते. तिचा एकुलता एक मुलगा आहे. नाव त्याचे राजाराम ! घरी पन्नास एक्कर शेती आहे त्यांचा मोठा वाडा आहे. त्यांना गावात फार मान आहे. मोठा दबदबा आहे त्या घराण्याचा पंचक्रोशीत ! मुलगाही देखणा आहे. सुगंधा आता या जगात नसल्यामुळे पाटलाला राजारामची काळजी वाटते. मी पाटलाकडे अनेक वेळा बघितलेला आहे त्याला, पाटील हे माझे लहानपणापासूनचे मित्र. त्यांचे व आपले अगदी फार जुने संबंध आहे. माणसं अगदी प्रामाणिक विश्वासाची आहेत. पाटीलांनी ‘‘ कधी बोलावून घेऊ मुलाला, असे अनेकदा विचारले.’’ माझा विचार आहे परवा या म्हणून निरोप देतो त्यांना ! चालेल ना….! एवढ्या वेळ शांतपणे उभी असलेली यमुना लाजतच बैठकीतून निघून गेली. तिच्या लाजण्यातच यमुनेचा होकार समजून आला होता.
आज सकाळपासून घरात धामधूम होती. पाहुणे येणार म्हणून घरातील सगळी माणसं….! नटुन थटुन घरातील कामे पटपट आवरत होती. एखाद्या सणाप्रमाणे घराला नवंरूप आलं होतं. घरातील बैठकीपासून ते बाहेरच्या अंगणापर्यंत सर्व घर स्वच्छ व सुंदर सजवलं होतं. सर्वजण आता पाहुणे येतील याची वाट पाहत होते. तेवढ्यात घरघडी बाहेरून जोरातच धावत आला. ‘‘ मालक मालक पाहुणे आले ’’ यमुनाचे बाबा, भाऊ, घरातील माणसं ! सर्वजण पाहुण्यांना घेण्यासाठी घराच्या बाहेर आले. राजाराम त्याचे वडील, काका असे सर्व पाहुण्यांना घेऊन पाटील दारावर आले. ‘‘ रामराम मंडळी ’’ असे जोरात पाटलाने म्हणताच, यमुनेच्या बाबाने आदराने वाकून रामराम घातला. या पाटील आमच्या वाड्यावर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. पाहुणे घरात आली चहापाणी झाला. गप्पा मारत मारत पाटलानी सर्वांची एकमेकांशी ओळख करून दिली. बोलता-बोलता बराच वेळ झाला होता. पाटील यमुनेच्या बाबाला म्हणतात, ‘‘ यमुनेला घ्या आता बोलावून ’’ यमुनेच्या बाबाने हाताने इशारा करताच धाकटा भाऊ पटकन उठला व घरात गेला. ‘‘ यमुना चल लवकर ’’ तुला बाबांनी बैठकीत बोलावले. यमुना रोजच्या पेक्षा जास्तच नटुन होती. त्यामुळे अधिकच खुलून दिसत होती. तिच्या आईने तिला जायला इशारा केला यमुना आपल्या भावाच्या पाठीमागे निघाली. ऐरव्ही बैठकीत जाताना यमुना हसत हसत जायची. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती. सहाजिकच तिला पाहुणे बघायला आले होते. भावाच्या पाठीमागून यमुना बैठकीत आली. पाहुण्यांच्या समोर मधोमध चौरंग ठेवला होता. ‘‘ बस यमुना त्या चौरंगावर पाहुण्यांच्या समोर ’’ बाबा हळूच म्हणाले. यमुना चौरंगावर जाऊन बसली. पाहुण्यांनी यमुनाला नाव गाव, आवडी निवडी विचारल्या व येण्यास सांगितले. यमुना लाजतच बैठकीतून निघून गेली. पाहुण्यांना यमुना पसंत आली. यमुना व राजारामचे लग्न ठरले. एका महिन्यावर यमुनाच्या बाबांनी लग्नाची तारीख पक्की केली. यमुना व राजारामचे अतिशय धुमधडाक्यात लग्न लावले. सर्वांची लाडकी यमुना आता परक्या घरची धन झाली होती. माहेरवासीन सासरला निघून गेली.
राजारामच्या घरी यमुनेचे धुमधडाक्यात वाजत गाजत स्वागत झाले. तिने सासरचा उंबरठा ओलांडला व दारावरचे माप ओलांडून यमुना घरात आली. सासर हेच आता यमुनेचे माहेर होते. सासु नसल्यामुळे घरात आल्यापासून यमुनेला राबावे लागणार होते. हळूहळू यमुनेच्या संसाराला सुरुवात झाली. बघता बघता यमुनेला चार मुली झाल्या. गंगा ! भागेरथी ! सावित्री ! गोदावरी ! त्यांचे नाव ठेवण्यात आले. गंगा, भागु, सावित्री, गोदा, यमुना, राजाराम व तिचे सासरे असा त्यांचा परिवार आनंदात राहत होता. एके दिवशी दुपारी अचानक यमुनेच्या बाबांच्या घरचा घरगडी दारात येऊन उभा राहतो व राजारामला बाहेर बोलावून निरोप देतो. यमुनेच्या आईला सर्पदंश झाला व त्यातच तिचे निधन झाले. यमुनेला डोंगराएवढे दुःख झाले. स्वतःची आई गेली या दुःखातून ती सावरते न सावरते ! तेच चार महिन्यांनी आईच्या दुःखाच्या धक्काने तिचे बाबाही वारले. जीवनातील दोन तेजस्वी सूर्य काळाने हिसकावून नेले होते. तिच्या जीवनातील अचानक मायेचा हा प्रकाश आटला होता. इकडे येमुनेच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली असे झाले. राजाराम व यमुनेची एक सारखी कटकट होऊ लागली. राजारामला मुलगा हवा होता. तो यमुनेकडे मुलासाठी सारखा हट्ट धरू लागला. यमुना घरात राबराब राबत होती. मध्यंतरी सासर्याला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे एक हात व पाय लुळा पडला होता. त्या दिवसापासून म्हातारा एकाच जागेवर पडून होता त्यामुळे म्हातार्याचे सर्वकाही यमुनेलाच करावे लागत होते. मुलासाठी राजाराम खूप भांडण करू लागला. यमुनेच्या जीवनात एकामागून एक वाईट प्रसंग घडतच होते. तरीसुद्धा यमुना या प्रसंगांना कशीबशी सामोरे जात होती.
अशातच तिला दिवस गेले. आता तरी मुलगा होईल म्हणुन राजाराम यमुनेला बजावत होता. यमुने ! मला मुलगा पाहिजे ! मुलगी झाली तर? मी तुला या घरात ठेवणार नाही. दिवसभर घरकाम, म्हाताऱ्याची सेवा, चार पोरींचे आवरणे यातच यमुना फार थकून जात होती. वरून राजारामच्या धाकाने तिला एक वेळचे अन्नसुद्धा गोड लागत नव्हते. यमुनेचे दिवस भरत आले होते. राजाराम मुलासाठी अति उत्साही झाला होता. एके दिवशी सकाळी सकाळी यमुनेच्या पोटात दुखायला लागले. राजारामने पळत जाऊन गावातील दायनी मावशीला बोलावून आणले. थोड्या वेळातच यमुनेला गोंडस मुलगी झाली. राजारामला मुलगी झाली कळताच….! राजाराम प्रचंड संतापला. यमुनेवर राग राग करून बाहेर निघून गेला. मुलाच्या हव्यासाने हपापलेला राजाराम या वेळी फार संतापला होता. अतिशय रागाच्या भरात राजारामने आज चुकीचे पाऊल उचलले होते. तो खूप दारू पिला होता. सायंकाळी राजाराम दारुच्या नशेतच घरी आला व खूप भांडण करू लागला. यमुनेला मारहाण केली. यमुना अतिशय दुःखी झाली. पण नशिबापुढे ती तरी काय करणार होती. राजाराम मुलाच्या हव्यासापायी रोजच दारू पिऊ लागला. घरात पैशाची चुणचुण भासू लागली. शेती विकून दारुत पैसे उडवणारा राजाराम व्यसनात पार धुंद झाला होता. एकेकाळी राजकन्ये सारखे वैभव भोगणारी यमुना आज मात्र परिस्थितीने नवऱ्याची गुलाम झाली होती. पाच पोरींचा बाप होऊन सुद्धा राजाराम मुलासाठी हपापलेलाच होता. यमुना मात्र पाच पोरींची आई व घरकाम याने फार अशक्त झाली होती. आता मरण आलेले बरे ! पण लेकरं नको ! अशी तिची मानसिकता झाली होती. पण नवऱ्याची गुलाम झालेली यमुना पुन्हा या मोहाला बळी पडली. यमुनाला सहाव्यांदा दिवस गेले. आतां तरी मुलगा होऊ दे ! नाहीतर मरण तरी दे ! असे यमुनेने देवाकडे साकडे घातले होते. उन्हाने हिरवी वेल सुकावी तशी यमुना यावेळी फार सुकून गेली होती. एका जागेवरून उठणे तिला जमेनासे झाले होते. मात्र राजाराम ठरल्याप्रमाणे दारू पिऊन घरी आला व जोर जोरात यमुने मुलगा ! यावेळेस मुलगा दे मला ! असे बडबडु लागला. दिवस मावळला होता बाहेर अंधार पडला होता. अचानक यमुनेच्या पोटात दुखू लागले. यमुना वेदनेने विव्हळत होती. दुसरीकडे नशेत धुंद असणारा राजाराम मुलगा होतो की, मुलगी या विचारात मग्न होता. गंगाने भागेरथीला पाठवून गावातून दायनी मावशीला बोलावून घेतले. दायनी मावशी आली घराचा दरवाजा लावून पोरींना बाहेर पाठवले. यमुनेच्या आयुष्यात फक्त दुःख आणि वेदनाच भरल्या होत्या त्यामुळे तिला हे नवीन नव्हते. एकेकाळी सौंदर्याने बहरलेली यमुना आता मात्र अशक्त झाली होती. चाळणीसारखे तिचे शरीर खिळखिळे झाले होते. पाच पोरींची आई होऊन यमुनेचे शरीर हाडांचा सांगाडा झाले होते. नऊ महिने रोजच कटकट व मारहाण यामुळे यावेळेस यमुनेत प्राण उरला नव्हता. यावेळेस तरी मुलगा होईल या आशेवर यमुना कसीबसी धिर धरुन नऊ महीने बळकष्टीने जीवंत होती. या वेळेस तिला अशक्त पणामुळे बाळ पोटाच्या बाहेर ढकलणे सुद्धा जमेना. प्रंचड वेदनेने यमुना ओरडत होती. एक सारखी रडत होती. दायनी मावशी यमुनेला धीर देत होती. पोरी होईल तुझं चांगलं.…! देव काही लय वाईट नाही. तुझ्या नशिबालाच काय हे कष्ट वाढुन ठेवलेत कुणास ठाऊक….! दायनी मवशीच्या आधाराने यमुनाला थोडा का होईना पण मायेचा आधार मिळत होता. थोड्या वेळातच बाळ रडण्याचा आवाज आला ! मावशीने दरवाजा उघडला. बाळाला घेऊन राजारामच्या मांडीवर ठेवून म्हणाली मुलगा झाला तुला….! मुलगा….! झाली का? आता मनाची शांती ! राजाराम नशेतच उड्या मारू लागला. मुलगा झाला ! या राजारामला मुलगा झाला ! गंगा, भागु, सावित्री, गोदा, सिंधू बघा....! बघा....! तुम्हाला भाऊ झाला. बघताय काय? शेजारी पाजारी ओरडून सांगा. ‘‘ भाऊ झाला आम्हाला, भाऊ ’’ मुलाच्या आनंदाने राजाराम पार वेडा झाला होता. यमुना कुठय? ती कशी आहे. याकडे त्याचे लक्षच नव्हते. थोड्यावेळाने गंगा, भागु घरात आली. यमुना एका जागी शांत पडली होती. पोरींनी तिला आवाज दिला. आई….! ये आई….! मुलगा झाला तुला….! यमुना मात्र ओ देत नव्हती. पोरींनी आईला हलवले. आई काहीच हालचाल करत नाही म्हटल्यावर भागु जोरात ओरडली. बाबा....! आईला काय झाले बघा. सावित्री, गोदा, सिंधू पळतच घरात आल्या. राजाराम बाळाला घेऊन डोलत डोलतच घरात आला व यमुनेकडे बघून आवाज देऊ लागला. यमुना ! ये यमुना ! बग मुलगा झाला मला....! मुलगा....! यमुना मात्र आयुष्याच्या सर्व कष्टातून व राजारामाच्या त्रासातून सुटुन एकदाचीच….! कायमची झोपली होती. कधीही न उठण्यासाठी.......!
1 comment:
Very nice...
Post a Comment