Thursday, 22 July 2021

लघुकथा:- गुरुजी

                          गुरुजी

शाळेतील मामाने पितळी घंटा एका हातात पकडली. दुसऱ्या हातात गोल दगड घेतला. घंटा उंच करून टण्....टण्....टण्....टण्....सगळ्या मुलांच्या कानात आवाज घुमे पर्यंत घंटी बदडून काढली. सकाळी सकाळी मोठ्या गुरुजींचा राग घंटीवर ओकून टाकला. मामाच्या घंटीमुळे सर्व मुलं काही मिनिटातच मैदानावर गोळा झाली. पटापट वर्गानुसार रांगा तयार झाल्या. कितीतरी वेळेपासून मैदानावर सुरू असलेली किलबिलाट घंटेमुळे क्षणभरात थांबली. सायंकाळी पाखरे जशी घरट्याकडे जाण्याअगोदर एकत्र जमा होतात. तशी मुलं परीपाठासाठी एकत्र जमली होती. मामांनी हातातील दगड खिडकीत ठेवला व कार्यालयाच्या समोर उभे राहिले.
                घंटीचा आवाज ऐकून क्षणाचाही विलंब न लावता मुख्याध्यापक साहेब मैदानाकडे येऊ लागले. त्यांच्यामागे शाळेतील बाई, गुरुजी, व एक नवीनच व्यक्ती शाळेच्या व्हरांड्यातून मागे येत होते. पांढरे शुभ्र, स्वच्छ कपडे घालून शाळेत आलेले मुख्याध्यापक साहेब अगदी शिस्तीत मैदानावर पुढे येऊन उभे राहिले. थोडेसे त्यांच्यामागे एका ओळीत गुरुजी, बाई व नवीन आलेले पाहुणे एका रांगेत उभे राहिले. नेहमीची मुलं परीपाठासाठी पुढे येऊन उभी होती. मुख्याध्यापक साहेबांनी त्यांच्याकडे पाहून त्यांना डोळ्यांनी खुणावले. लगेच त्या मुलांनी ऑर्डर दिली. एका तालात, एका सुरात उंच आवाजात राष्ट्रगीत संपले. भारत माता की जय....! च्या तीन वेळेस घोषणा झाल्या. सकाळी सकाळी मुलांमध्ये जय च्या घोषणेने उत्साह भरला. थोड्या वेळातच प्रतिज्ञा, प्रार्थना, सुविचार असे क्रमाने परिपाठ संपला. मुख्याध्यापक साहेबांनी नवीन आलेल्या पाहुण्यांना समोर बोलावले. मुलांनो हे आहेत पाटील गुरुजी....! आज नव्याने आपल्या शाळेत रुजू झाले. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून गुरुजींचे स्वागत करा. मुलांनी पावसाच्या टपोऱ्या थेंबाप्रमाणे जोरात टाळ्या वाजवून गुरुजींचे स्वागत केले. आज पासून आपल्या शाळेत बाई, दोन गुरुजी व मी असे चार जण तुम्हाला शिकवण्यासाठी असणार आहोत. पाटील गुरुजी वर्गात आल्यावर बाकीचा परिचय देतीलच. सर्वांनी शिस्तीचे पालन करायचे. वर्गात लक्ष देऊन गुरुजी काय सांगतात ते ऐकायचे. अभ्यास वेळेवर पूर्ण करायचा.
“आले का ध्यानात?”
“हो सर....! सगळ्या मुलांनी एका तालासुरात होकार दिला.” चला आता सगळ्यांनी एका रांगेने आपापल्या वर्गात जाऊन बसायचे. मुख्याध्यापक साहेबांच्या सूचनेने मुलांनी लगेच रांगेने वर्गात जायला सुरुवात केली.
            पाटील गुरुजींनी या शाळेच्या परिसराची पाहणी केली. प्रत्येक वर्गात किती मुलं, मुली आहेत याची माहिती घेतली. दुपारच्या वेळेत मुख्याध्यापकांनी स्वतःच्या कार्यालयात सर्वांना बोलावून घेतले. सर्वजण येऊन समोर बसले.
“मुख्याध्यापकांनी हळूच विचारले, पाटील गुरुजी कशी वाटली शाळा.”
“साहेब छान आहे की शाळा खूप आवडली मला.”
“अहो आवडणारच की....शाळा बनवली तसीच मी....!”
गेल्या 15 वर्षापासून या शाळेवर काम करतो. शाळेची इमारत, मैदान येथील झाडं या सर्व गोष्टी मी स्वतःच्या देखरेखीखाली तयार केलेल्या आहेत. शाळेला आपण वेळ दिला की, शाळा सुंदरच तयार होते. पाटील गुरुजी नवीन असल्यामुळे काही न बोलता फक्त मानेने सहमती कळवत होते. शाळेतील हरणे बाईंनी तर चेहरा पण मुरडला होता. बाई स्वतःच्या मनाशी बोलू लागल्या.
“झाले साहेबांचे भाषण सुरू….! आता घंटाभर तरी सुटका नाही म्हणायची.”
कितीतरी वेळा हे भाषणं ऐकून झाले. नेहमी नेहमी आपल्याच नशीबात आहे साहेबांचे भाषण ऐकणे. मी जणू साहेबांची आजीवन श्रोते असल्यागत प्रत्येक वेळी निमूटपणे ऐकत आले. साहेबांचे काम नक्कीच चांगले आहे पण त्याबरोबर दरारा पण तेवढाच आहे व गाजावाजा पण तेवढाच आहे. साहेब जणू या गावचे असल्यागत शाळेत, गावात वावरत असतात. या शाळेच्या वैभवासाठी फक्त त्यांनीच कष्ट उपसले. आम्ही बाकीचे काय दिवसभर गोट्याच खेळत असतो. बाई स्वतःच्या मनाशीच बोलू लागल्या.
“पाटील गुरुजी शाळेसाठी काम करतांना जीव झोकून देऊन काम करावे लागते.” शाळा हे आपले कुटुंबच आहे. शाळा, शिक्षक, विद्यार्थी, इमारत येथील सर्व सजीव व निर्जीव गोष्टी आपल्या या कुटुंबात मोडतात. त्यामुळे येथील प्रत्येक बाबतीत स्वतःचे कुटुंब समजून स्वतःला झोकून देऊन काम करायचे. तुम्ही तरुण आहात. तुमच्या तरुण मनातील, तरुण कल्पनांना नक्कीच शाळेच्या विकासासाठी प्राधान्य राहील. धडाडीने काम करा माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी नेहमीच राहील. पाटील गुरुजी भांबावून गेल्यासारखे नुसते बघतच होते. कदाचित पाटील गुरुजींना ह्या सर्व गोष्टी आवडल्या नाहीत किंवा नवीन असल्यामुळे दडपण आले होते. शाळा, इमारत, वर्गखोल्या, विद्यार्थी, गावकरी या सगळ्या सोबत हळूहळू होईल ओळख...! काळजी करू नका.
“बरं....! यांची ओळख करून घ्यायचीच राहिली.” या आहेत हरणे बाई....! हे यादव गुरुजी....! हे बऱ्याच वर्षांपासून या शाळेत काम करतात.
“पाटील गुरुजींनी दोघांना नमस्कार घातला.”
“नमस्कार बाई....! नमस्कार गुरुजी....!”
“नमस्कार पाटील गुरुजी”
नमस्कार झाला ओळख झाली. मुख्याध्यापक, हरणे बाई, यादव गुरुजी तालुक्याला राहत असे. साहेबांनी पाटील गुरुजींना विचारले.
“गुरुजी तुम्ही आता कुठे राहणार? आम्ही तालुक्याला राहतो.”
“साहेब मी याच गावी राहतो. मी एकटाच आहे त्यामुळे शहरात राहण्याची सध्यातरी मला गरज नाही.”
“बरोबर बोलले पाटील गुरुजी तुम्ही....!”
“सध्या दोन हात आहे त्यामुळे रहा इथेच. नंतर दोनाचे चार हात झाले म्हणजे मग शहरात जावेच लागेल.”
मुख्याध्यापक साहेबांच्या बोलण्याने पाटील गुरुजी लाजल्यागत झाले. स्वतःची नजर चोरु लागले. चला तर शाळेला एक नवीन तरुण पुर्णवेळ देणारे गुरुजी मिळाले तर आज पासून. मुख्याध्यापक साहेबांनी लगेच मामांना आवाज दिला.
“पाटील गुरुजी हे तुका मामा....!”
आपल्या शाळेची देखभाल करतात. शाळेची साफसफाई, मुलांना पिण्याचे पाणी भरून ठेवणे व दिवसभर शाळेत बसून असतात. वेळेनुसार शाळेची घंटा वाजवण्याचा मान तेच घेतात. तुका मामांना आपण गावकऱ्यांकडून वर्गणी करून मानधन देतो. मी माझ्या पगारातून थोडेफार पैसे त्यांना देत असतो. त्यांना मूलबाळ नाही शेतीबाडी नाही. सात वर्षापूर्वी पत्नी आजारपणात त्यांना सोडून गेली. त्यामुळे मामा एकाकी पडले. गावच्या सरपंचांनी व प्रतिष्ठित मंडळींनी त्यांना शाळेवर ठेवले. तेव्हापासून मामा या शाळेचे शिपाई म्हणून काम पाहतात. बिन पगारी फुल अधिकारी असे मामांचे काम आहे. मामांना सगळी मुलं, गावकरी घाबरतात. वेळप्रसंगी आम्हीही मामाला घाबरतो.
“हो की नाही मामा....!”
“साहेब उगाच गरीबाची मजाक करू नका....!”
तुम्ही या शाळेचे सर्वसर्वा आहेत. तुमच्यामुळेच मी कसाबसा पोट भरतोय. नाही तर आता या वयात मला कोण कामाला ठेवेल. हाताला काम नाही म्हटल्यावर पोटाला भाकर कुठून मिळणार. शाळा हीच माझी खरी भाकर आहे. या वयात शाळाच माझी बायको, शाळाच माझी लेकरं आहेत. एवढी लेकरं असणे तरी कुणाच्या नशिबात आहे.
“हे नवीन गुरुजी का?”
“हो मामा....! हे नवीन गुरुजी आहेत.”
हे एकटेच आहेत. लग्न झालं नाही त्यामुळे ते गावातच राहणार आहे. तुम्ही त्यांना दोन दिवस तुमच्याकडे राहू द्या व गावात त्यांची कुणाकडे तरी राहण्याची व्यवस्था करा. पाटलाकडे विचारून बघा एखादी खोली मिळते का? मी तसं सरपंचांना विचारून घेतो. गुरुजीची लवकरात लवकर व्यवस्था झाली म्हणजे बरं होईल.
“साहेब काळजीच करू नका.”
“मी आज सायंकाळी दोन चार ठिकाणी जाऊन येतो. गुरुजींना दोन चार खोल्या दाखवतो. त्यांना पसंत पडेल ती खोली ठरवून घेतो. व गुरुजीचे सामान खोलीवर पोहचतं करतो. आजच्या दिवस गुरुजींना माझ्याकडे ठेवतो.”
“हो चालेल मामा....तुम्ही असल्यावर पाटील गुरुजींची चिंताच मिटली.”
“गुरुजी माझे घर साधे आहे बरं का?”
“तुम्हाला जमेल का मातीच्या घरात.....! मी गरीब माणूस आहे. माझे शेणा मातीचे घर आहे. तुम्हाला आवडले पाहिजे.”
“अहो मामा.....! असे काय बोलताय.”
“मी पण गरीब घरातूनच आलोय. माझे घर पण शेणा मातीचेच आहे.”
“आणि हो....!”
“माणसाचे मन मोठे पाहिजे घर नाही....!”
मामा तुम्ही मनाने खूप श्रीमंत आहात. गेल्या सात वर्षापासून तुम्ही या शाळेत येऊन खूप श्रीमंती कमावली. मनाला असे कमी समजत जाऊ नका. आज पासून तुमचा हा भाचा आलाय ना....! आता तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. पाटील गुरुजींच्या बोलण्याने मामाची डोळे भरून आले. मामांनी डोळे पुसत पुसत खिडकीतील दगड घेऊन दुपारची सुट्टी संपल्याचे घंटी वाजवून जाहीर केले.
 “बरं....सगळ्यांनी आता आपापल्या वर्गात जायला हरकत नाही.”
“पाटील गुरुजी तुम्ही आजपासून चौथीचा वर्ग घ्या. तुम्ही तरुण आहात व गावातच राहणार म्हणजे तुम्हाला शिष्यवृत्तीची थोडीफार शिकवणी घेता येईल.”
“पाटील गुरुजींनी मान हलवून होकार दिला.”
चला झाली एकदाची मीटिंग असे म्हणून हरणे बाई कार्यालयाच्या बाहेर पडल्या. बरं झालं बाई....शिष्यवृत्तीची शिकवणी व चौथा वर्ग पाटील गुरुजी कडे गेला तो....! नाहीतरी चार वर्षापासून माझ्याच मागे लावून दिले होते. या साहेबांनी स्वतः मात्र एक वेळ कधी शिष्यवृत्तीचे शिकवले नसेल. फक्त मीटिंग घेऊन मोकळे होतात. मुख्याध्यापक असल्याचा पुरेपूर फायदा करून घेतात. हरणे बाई स्वतःशीच बडबड करत वर्गात निघून गेल्या.
               पाटील गुरुजींनी चौथीची हजेरी, खडू घेतले व वर्गावर येऊन बसले. मुलांनी गुरुजी वर्गात येताच नमस्कार केला. सगळ्यांना नमस्कार बसा खाली. आता मी वर्गाच्या बाहेर जाईपर्यंत कोणीही बोलणार नाही व वर्गाच्या बाहेर जाणार नाही. मला शिस्त फार आवडते. सगळ्यांनी शिस्तीत राहायचे व शिस्तीचे पालन करायचे. जो कोणी बेशिस्त वागेल, शिस्त मोडेल त्याला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. पाटील गुरुजींच्या पहाडी आवाजाने वर्ग एकदम शांत झाला होता. आज शाळेला सुट्टी असल्या सारखे शांत वातावरण झाले होते. गुरुजींनी वर्गात नजर फिरवली मुलांनी वर्ग गच्च भरला होता. खूप दिवसापासून तहान लागल्यावर हरण पाण्यासाठी मोठे डोळे करून सैरावैरा पाण्याच्या मृगजळा मागे फिरत राहते. तसे ज्ञानाची भूक भागविण्यासाठी मुलं अपेक्षागत नजरेने गुरुजीकडे पाहत होते. हक्काचे गुरुजी मिळाल्याचे समाधान उराशी बाळगून शिकण्यासाठी सज्ज होते. गुरुजींनी टेबलावरची हजेरी उचलून नाव वाचण्यास सुरुवात केली.
“भगत....हजर गुरुजी….!”
“वासुदेव....हजर गुरुजी….!”
“रामप्रसाद....हजर गुरुजी….!”
क्रमाक्रमाने गुरुजी नाव घेत होते. दगडुबा....म्हणताच पूर्ण वर्ग मोठ मोठ्याने हसायला लागला. गुरुजी एकदम अचंबित झाले. मुलं का हसली असेल या विचारात त्यांची नजर वर्गात फिरू लागली. कोणीच उभे नाही व हजर गुरुजी म्हणण्याचा आवाजही आला नाही. गुरुजींनी परत एकदा दगडुबा असे मोठ्याने नाव वाचले. परत मुलांनी खळखळून हसायला सुरुवात केली. गुरुजीच्या लगेच लक्षात आले दगडुबा या नावात किंवा या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. त्याच्याशिवाय अशी ही मुलं दात काढणार नाही. गुरुजींनी वर्गात नजर फिरवली. सगळी मुलं दात काढत फिदीफिदी हसत होते. परंतु कोपऱ्यातील एक मुलगा मात्र बिलकुल हसत नव्हता. अगदी खाली मान घालून स्तब्ध बसून होता. गुरुजींनी लगेच ओळखले हाच तो दगडुबा आहे व सगळी मुलं यालाच हसतात. त्यांनी लगेच त्या मुलाजवळ जाऊन त्याचा पटकन हात धरला.
“दगडुबा उभा राहा बाळा”
“तो एकदम आश्चर्यचकित होऊन गुरुजीकडे पाहू लागला.”
आपले नाव दगडू आहे हे गुरुजींना कसे कळले. गुरुजी मला उठवायला माझ्या जवळ आले या विचाराच्या खुणा स्पष्ट चेहर्यावर दिसत होत्या. गुरुजींनी त्याला हाताला धरून उभे केले. दगडुबा अगदी लटपटत तीन-चार ठिकाणी वाकून कसातरी उभा राहिला. गुरुजींनी त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला कुरवाळत स्वतःच्या जवळ घेतले. दगडुबाला आभाळ भरून आल्यासारखं हुंदका भरून आला होता. स्वतःला खूप सावरायचा प्रयत्न करूनही शेवटी त्याचा बांध फुटला. तो ढसाढसा रडू लागला. त्याला हुंदका आवरता येईना. गुरुजींनी त्याच्या हाताला धरून त्याला समोर घेऊन आले. दगडूबा हे बघ तू हुशार मुलगा आहेस. हुशार मुलांनी असे रडत बसायचे नसते. आणि हो.....तुला रडायला काय झाले ते अगोदर सांग. गुरुजी आपल्याला हुशार म्हणाले हे ऐकून त्याला थोडे बरे वाटले असावे. त्याचे रडणे थोडे हळू झाले. तो अडखळत सांगु लागला.
“आम्ही गरीब आहोत.”
“त्यामुळे मला नवीन कपडे घालायला मिळत नाही. मी जुनी कापडं घालतो. माझी कापडं फाटलेली आसते त्यामुळे मुलं मला हसतात.”
“गुरुजींनी वर्गात मुलांना सांगायला सुरुवात केली.”
मुलांनो हा बघा दगडुबा अतिशय हुशार व शांत मुलगा आहे. प्रामाणिकपणा हा गुण त्यांच्या अंगी आहे. तुम्ही त्याला विनाकारण हसत जाऊ नका. तो शांत राहतो म्हणून त्याला परिस्थिती वरुन हसणे योग्य नाही. इतरांना असे हसणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. यातून आपणच मुर्ख असल्याचे सिद्ध होते. परिस्थिती पुढे माणुस हतबल असतो. कुणाच्याही परिस्थितीवर, व्यंगावर हसणे हे पाप आहे. त्यामुळे यापुढे दगडुबाला कोणीच हसायचे नाही. जर यापुढे मला कोणी हसतांना दिसले किंवा माहीत झाले तर मी भर वर्गात त्याला चोपून काढेल. गुरुजींनी वर्गात मुलांना चांगलाच दम भरला होता. वर्गात टाचण पडली तरी आवाज येईल एवढी शांतता निर्माण झाली होती. गुरुजींनी दगडूबाला जागेवर जाऊन बसायला सांगितले. पुढे हजेरी घेतली. हजेरी संपते तोच शाळा सुटल्याची घंटी वाजली. आज नुसतीच हजेरी घेणे झाले. या पोरांच्या दात काढल्यामुळे बराच वेळ निघून गेला. उद्या मात्र प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात करूया. या विचारात गुरुजी हजेरीपट घेऊन वर्गाबाहेर पडले. शाळा सुटल्याची घंटी वाजली तरी मुलं शांतपणे जागेवर बसून होती. नवीन गुरुजींच्या शिस्तीचा प्रभाव व दम यामुळे मुलं अगदी भीतीने धास्तावली होती. गुरुजी वर्गाच्या बाहेर पडताच मुलं हळूहळू बाहेर निघत होती. तेवढ्यात मामा चाब्या घेउन खोली बंद करण्यासाठी बाहेर येऊन उभे राहिले. “पोरांनो चला लवकर....आज घंटी ऐकू आली नाही का?”
“किती वेळ लावता बाहेर निघायला. रोज तर घंटेच्या आवाजाने पार पोळा फुटतो तुमचा....!”
मामाच्या आवाजाने मुलं पटकन बाहेर पडली. मामांनी पटापटा वर्गखोल्या लावल्या व चाब्या कार्यालयात आणून खिळ्यांना माळा घातल्या. शेवटी कार्यालयाचे कुलूप लावून एक चाबी मुख्याध्यापक सरांच्या हातात दिली व एक चाबी स्वतःच्या कमरेला लटकावली.
“येतो पाटील गुरुजी असे म्हणून मुख्याध्यापक व बाकीचे गुरुजी निघून गेले.”
शाळा सोडून काहीच अवधी झाला होता. पण दिवसभराचा गोंगाट आणि शाळा दमल्यागत आता शांत झाली होती. मनाला या गोंगाटाची सवय करून घेतली पाहिजे. गुरुजीच्या जीवनात या गोंगाटालाच महत्त्व आहे. शाळेच्या रिकाम्या व्हरांड्याकडे पाहून गुरुजी मनाशीच रमले होते. तेवढ्यात मामांनी आवाज दिला.
“गुरुजी चला घराकडे....!”
“शाळा सुटल्यावर इथे एक मिनीटभर करमत नाही. बिचारी शाळा लेकरा वाचुन स्तब्ध होऊन बसते. पुन्हा उद्या सकाळी लेकरांच्या गोगांटाने शाळेला हुरूप येईल.”
मामा जणू या शाळेचे मालक असल्यागत बोलत होते. शाळेविषयी असणारी ओढ मामांच्या कामातून दिवसभर दिसून आली. चला एक चांगला जिव्हाळ्याचा माणूस भेटला. आता यांच्या सोबतीने काम करायला मज्जा येईल. घरच्या आठवणीचा भार थोडा हलका होईल. असे म्हणून गुरुजी मामाच्या सोबत गावातून चालू लागले.
              रस्त्याने चालतांना मामा गावातील मुख्य घरांची ओळख सांगू लागले. गावातील पुढारी, सरपंच, पाटील, टाळकरी, माळकरी, शेतकरी अशा विविध नागरिकांची घरे लांबून दाखवत होते. कोऱ्या कागदावर शाईचे ठिपके पडताच ते जसे स्पष्ट उमटून जातात. तसे गुरुजीच्या मनावर गावातील नवीन साऱ्या गोष्टी कोरल्या जाऊ लागल्या. बोलत बोलत मामांचे घर आले. मामांनी घर उघडून लगबगीने बसायला पोते अथरले.
“गुरुजी बसा येथे मी तुम्हाला हात पाय धुवायला पाणी काढतो.”
“मामांनी घाईघाईने पाणी दिले.”
“मी थंडगार पाण्याने हातपाय धुतले.”
हात पाय पुसायला पांढराशुभ्र धोतराचा तुकडा पुढे करत मामा म्हणतात, “गुरुजी कोरा चहा घेता का?” चुलीवर मस्त कोरा चहा उकळतो. कपबशीभर चहा पोटात ढकलला की, दिवसभराचा क्षीण हलका होतो बघा. डोकही मस्त शांत पडून जातं. मी हो म्हणायच्या आत मामा चुलीजवळ गेले. काड्या मोडून चुलीला विस्तव लावून चहाचे सामान शोधू लागले.
                मी हातपाय पुसून पोत्यावर बसलो. क्षणात माझी नजर घरभर हिंडून आली. अगदी देवळा प्रमाणे स्वच्छ, सुंदर, नीटनेटके घर दिसत होते. वस्तु अगदी जिथल्या तिथे ठेवून होत्या. शेणा मातीचे घर पोतरुन अगदी गुळगुळीत होते. एखाद्या बाई प्रमाणे घर अगदी प्रसन्न बनवून ठेवले होते. मी घराकडे पाहून कुतूहल नजरेने मामांच्या हालचाली आठवु लागलो. येवढी शिस्त आत्मसात करून आजही या वयात सर्व दिनक्रम शिस्तीत घालवणारा हा माणूस घरी सुद्धा तेवढाच शिस्तप्रिय व नीटनेटका आहे. ही कमालची गोष्ट आहे. अशी माणसं आयुष्यातील दुःख विसरून दुसर्‍यांना आनंद देत राहतात. कुठून हे बळ त्यांना मिळत असेल. मला तर शाळा व शाळेच्या रूपाने हा देवच भेटला म्हणावा लागेल. घरून निघतांना अनेक प्रश्नांचे काहूर डोक्यात घुमत होते. कसे होईल या चिंतेने शाळेत येईपर्यंत पाठ सोडली नाही. सकाळी मामांच्या वाजलेल्या घंटेच्या आवाजाने डोक्यातील सर्व प्रश्न गळून पडले. भविष्यात शाळेच्या रूपाने असे मामा भेटेल स्वप्नातही वाटले नव्हते. मी विचारात गढून गेलो होतो.
                 तेवढ्यात कप-बशी पुढे करत मामा म्हणतात, “गुरुजी घ्या बरं गरम गरम चहा पिऊन.” कसल्या विचारात डुबले होते तुम्ही. घरची आठवण पाठ सोडत नाही का अजून? काही चिंता करू नका. शाळा आणि मामा आहे तुमच्या सोबतीला. रमेल हळूहळू मन या गावात. मी हातातील कपबशी खाली ठेवून मामाला म्हणालो, “मामा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात वडीलधारी आहात. तुम्ही माझी असी सेवा केलेली मला आवडत नाही.”
तुम्ही बसा मामा निवांतपणे चहा घ्या. मी तुमच्या भाच्यासारखा आहे. मी शाळेत गुरुजी....घरी मात्र तुमचा भाचा....! मामा एकदम भावूक झाले. चहा पिता पिता मामाच्या डोळ्यातून पाणी ओघंळले. एक अनोळखी व्यक्ती दिवसभराची ओळख व काही मिनिटांचा सहवास अनेक जन्मांचे नाते असल्यागत भासुन गेला. मी मामांना अश्रू पुसायला कपडा दिला. मामांनी स्वतःला सावरत चहाची भांडी विसळून ठेवली. थोडावेळ धरणीला अंग टाकले.
“गुरुजी दिवस मावळल्यावर गावातील मारुतीच्या देवळात दर्शनाला जाऊ.”
“तिथे अनेक गावकरी हरिपाठासाठी आलेले असतात. तुमची गावकऱ्यांना ओळख करून देता येईल. गावात नवीन गुरुजी आले हे ऐकून सगळ्यांना आनंद हहोईल”
“जाऊया मला ही मारुतीचे दर्शन होईल. देवळातील लोकांना भेटता येईल. त्यांची आणि माझी भेट गोड झाली तर जात जाऊ अधून मधून भजनाला.”
“गुरुजी तुम्हाला भजनाची आवड आहे म्हणायची तर....!”
“मामा एकदम प्रसन्न मुद्रेने म्हणाले.”
“हो आवड आहेच की, लहानपणी आजोबा सोबत देवळात भजनाला जायचो.”
पण गेल्या काही वर्षात अभ्यासाने पिच्छा सोडला नाही. गुरुजी होईपर्यंत वडीलांनी देऊळ, भजन सर्व बंद केले होते. अभ्यास हे एकच भजन सुरू होते. आज मात्र  गुरुजी म्हणून शाळेचा पहिला दिवस पूर्ण झाला. वडिलांची आज्ञा व मायची इच्छा पूर्ण झाली. आता स्वतःच्या आनंदासाठी भजनाला जायला हरकत नाही.
“बरोबर का मामा....!”
“हो गुरुजी....अगदी बरोबर बोललात.”
“माणसाचे मन रमेल तिथे जावे व मनमुराद आनंद लुटावा फक्त संस्कार व संस्कृतीची जाणीव मात्र विसरू नये.”
“मामा तुम्ही हुशार आहात. त्याचबरोबर सुसंस्कारित आहात त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टीची जाण आहे. तुम्ही मला तुमच्या संस्कारात सामावून घेतले तर बरं होईल”
“मी समजलो नाही गुरुजी.”
“मामा त्यात समजण्यासारखे अवघड काही बोललो नाही.”
मला तुमच्या सोबत येथेच राहू द्या. मी घराचे व जेवणाचे पैसे तुम्हालाच देत जाईल. तुमच्या सोबत राहिलो तर अनुभवाच्या चार गोष्टी शिकता येईल. वडीलधारी माणसाचे छत्र डोक्यावर राहिले तर, माणूस वाईट मार्गाला जात नाही. मामा हसतच उठले.
“अहो गुरुजी तुम्ही चांगले तरुण चार मित्र जमवा.”
“या म्हाताऱ्याच्या सोबतीला राहून तुम्हाला गमणार नाही. दिवसभर शाळेत सोबत व घरी रात्रभर सोबत म्हटल्यावर कंटाळून जासाल.”
“मामा माणूस वयाने म्हातारा होतो.”
विचारांनी व कर्तृत्वाने तो सदैव तरुणच असतो. तुमच्या सारखा वैचारिक तरुण मला शोधून सापडणार नाही. त्यामुळे मी ठरवले या शाळेत एकटा आहे तोपर्यंत तुमच्यासोबत राहायचे. तुम्ही मला आता येथून हाकलून लावले तरी मी जाणार नाही. आणि हो....! मी तुमचा या क्षणापासून मित्र झालोय. त्यामुळे हे घर, येथील काम माझे पण आहे. आजपासून प्रत्येक गोष्टीत मी तुम्हाला आर्धी मदत करणार. मी तुमच्यासाठी गुरुजी नाही मित्र आहे हे आता लक्षात ठेवा.
“बरं गुरुजी.....! चला मंग आता.”
“कुठे मामा?”
“शाळेत….! तुमचे सामान आणायला.”
“हक्काचे घर असल्यावर सामान शाळेत कशाला ठेवायचे.”
मी व मामा हसत हसत शाळेकडे निघालो.

✍✍✍✍✍
©® राजेंद्र प्रल्हाद शेळके
मो नंबर 9823425852

Tuesday, 29 June 2021

लघुकथा काजवा

                             काजवा

आज पौर्णिमा होती. सापाने कात टाकल्याप्रमाणे चंद्राने स्वतःच्या प्रकाशाची कात टाकली होती. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला होता. इतरवेळी रात्री पडणाऱ्या काळ्याकुट्ट अंधारावर मात करत प्रकाश बाहेर पडला होता. त्या प्रकाशाचा आज शिकारीसाठी फायदा करून घ्यायचा असे मी मनोमन ठरवले होते. पौर्णिमेच्या प्रकाशात शिकार चांगली गावेल व उद्याचा बेत मस्त घडवून आणता येईल. एखादे ससे, कबूतर, लाहुरी, घोरपड काहीतरी मिळाले पाहिजे. पण रात्रीच्याला सोबतीला कुणाला घ्यावे. मी थोडा वेळ विचारात पडलो. रात्रीच्याला जंगलात जायचे म्हणजे सोपे नाही. कधी कुठे अंधारात लांडगा, बिबट्या, कोल्हा दिसेल व पोट भरेल पत्ता लागणार नाही. आपण कुठे आहोत? याचा गावाला थांगपत्ता लागणार नाही. शेवटी गाव व जंगल यात फरक आहेच की....! जंगलात फिरणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय. एखाद्या दिवशी शिकारीचा शोक जीवावर बेतेल. समजदारी पूर्वक या गोष्टी केल्या पाहिजे.

      दुपारची वेळ होती मी शेतातले काम संपवून लवकरच घरी परतलो. विमल दळण निवडत बसलेली होती. मी शेतातून थकून आल्यामुळे विमल जवळ भिंतीला टेकुन बसलो.

“अहो आज लवकर कसे काय परतले?”

“अगं विमल....! शेतातील काम संपले. तिथे तरी थांबून काय करणार?”

सकाळपासून सारखे काम करत होतो. त्यामुळे थकवा पण खूप आला होता. आलो मग लगोलग घरी निघून.

“बरं झालं आले ते करा आराम”

“मी चहा ठेवते.”

“चहा राहूदे”

 “का बरं”

“अग उन्हातून आलो. त्यामुळे चहा राहुदे. थंडगार पाणीच दे फक्त प्यायला.”

“पाणी पण देते आणि कपभर चहा पण करते.”

“उन्हातून आल्यावर कोरा चहा घेतला म्हणजे, उन्ह तरी लागणार नाही.”

“बरं.... बरं....!”

“तुझी इच्छा आहेच तर कर एक कप चहा मस्त झकास.” विमलने आले घालून गुळाचा कोरा चहा बनवला. चहाचा फुरका मारत मी तिला म्हणालो,

“वा.... विमल....!”

“चहा झकास झाला बर का?”

“तुझ्या हाताची जादु लई चवदार आहे.”

विमल थोडीशी लाजली. पटकन पदराचा कोपरा तोंडाजवळ नेऊन तोंड लपवले.

“काय झालं विमल....!”

“काही नाही, बस झालं कौतुक....!”

“नवीनच लग्न झाल्या सारखे काय बोलताय. सहा वर्षापासून मीच चहा पाजते की तुम्हाला.”

“अग रोजच चहा मस्त करते तू....!”

“पण आज जरा जास्त चवदार झाला. म्हणून म्हणालो.”

तुम्हा बायकांना कौतुक केले तरी अडचण, नाही केले तरी अडचण. आम्ही पुरुषांनी करावे तरी काय? मी कपातील चहा संपवून कप खाली ठेवला. व विमलला म्हणालो,

“जमलं तर आज शिकारीला जातो.”

“आज अचानक असं काय?”

“आज पौर्णिमा आहे. पौर्णिमेला उजेडात शिकार करायला सोपी जाते.”

“सोबतीला कोण आहे.”

“बघू कुणालातरी सोबतीला नेतो.”

“तरी म्हटलं चहा आज जास्त गोड कसा काय लागला.” “शिकारीसाठी चहा कौतुक होते तर....!”

“विमल जरा निराश झाली होती. अग विमल मी शिकारीला जातोय लगेच जंगलात राहायला जात नाही.”

“अहो तुमची झाली शिकार पण मला रात्रीला एकटीच राहावे लागते. त्याचे काय?”

एकटीच्या मनाला किती हुरहुर लागते तुम्हाला काय त्याचे....! तुम्ही जाता शिकारीला निघून. विमल च्या नाराजीमुळे मी तिची समजूत काढली. शिकारीला जायचे दूरच राहिले मध्येच विमलच्या नाराजीचा सूर उमटला होता. “तुझी इच्छा नसेल तर जात नाही शिकारीला....! घरीच थांबतो तुला सोबतीला.”

“अहो किती मोठ्या आवाजात बोलताय.”

“माझ्यावर रागवू नका.”

मला माहित आहे. तुम्ही माझे किती ऐकता ते....! आजपर्यंत स्वतःच्या मनाने सर्वकाही करत आलात. आता तरी यापुढे कशाला विचारता. जा तुम्ही खुशाल शिकारीला. मी मला सोबतीला गया मावशींना बोलावून घेईन. रागाच्या भरात का असेना शेवटी विमल शिकारीला पाठवायला तयार झाली.

            रात्री सोबतीला कुणाला न्यावे या विचारात मी पडलो. तेवढ्यात मला लखन ची आठवण झाली. मागच्यावेळी शिकारी वरून आल्यावर लखन भेटला होता. पुढच्या वेळेस कधी गेला शिकारीला तर मला सोबत येऊ दे. असा निरोप त्यांने देऊन ठेवला होता. मी लगेच लखनच्या घरी गेलो. पण तो शेतावर गेला होता.

“का आलास?”

“काय काम होते?”

“काही अचानक काम निघाले का?”

असे अनेक प्रश्न घरात बसलेल्या लखनच्या म्हातारीने विचारले.

“नाही तसे काही खास काम नव्हते.” सहजच आलतो त्याच्याकडे....! पण तो घरी नाही म्हटल्यावर येतो मी....! भेटतो नंतर त्याला मोकळ्या वेळेत. लखनची भेट न झाल्यामुळे मी निराशा पदरी घेऊन वापस निघालो होतो. म्हातारी पेक्षा विमल बरी....! किती चौकश्या करत बसली लखनची म्हातारी....! जसं काही आदल्या जन्मी सरकारी वकील होती. मी म्हातारीच्या रागाने मनातल्या मनात विचारांना सावरत घरी निघालो.

      तेवढ्यात मला समोरून लखन येताना दिसला. लखनला पाहून मला जरा बरे वाटले. लखन जवळ येताच मी त्याला आवाज दिला.

“अरे लखन कुठे गेलतास? मी तुझ्या घरी जाऊन आलो.”

“अरे मी सकाळपासून शेतावर होतो. शेतात काम सुरू आहे. सकाळी लवकरच गेलतो.”

“काही भाकरतुकडा खाल्ला की नाही?”

“की नुसते काम आणि कामच करतो. जीवाला काही खात जा किती तब्येत खराब झाली.”

“अरे भावा....!”

“मी न्हारी घेऊन गेलतो सकाळी. न्याहारी करूनच काम करत होतो एवढ्या वेळ.”

“तुला काय वाटले. उपाशीपोटी काम करतो मी....!”

“छे....छे....!”

“आधी पोटोबा मग कामाचा विठोबा. आपण जगलो तेव्हा काम होईल. आपणच संपलो तर या कामाला तरी काय किंमत उरेल.”

“हो ते पण खरं आहे म्हणा....!”

“तसा तू लहानपणापासून हुशार आहे. शाळा शिकली नाही. नाहीतर मोठा साहेब झाला असता.”

“जाऊदे आता आपल्या नशिबातच नव्हती साहेबकी....!”

“बरं कसं काय आलता गरिबाकडे....!”

“वारे लखनराव....!”

“झाले लगेच तुम्ही गरीब....! द्या आम्हाला मोठेपणा....!”

“कमीत कमी शब्दाने बोलाय पुरते तरी आम्ही श्रीमंत आहोत म्हणायचो....!”

“नाही रे मित्रा”

“तू परिस्थितीने जरी श्रीमंत नसला, तरी मनाने खूप श्रीमंत आहे.”

“बस झालं.... मोठ्या झाडावर चढवणे. पडलो तर लय पंचाईत होईल.”

“मी व लखन मोठमोठ्याने हसलो.”

“बरं माझ्याकडे कसं काय येणे केले.”

“अरे मित्रा आज पौर्णिमा नाही का....!” म्हटलं आज रात्री शिकारीला जाऊया. मागच्या वेळेस तू म्हणाला होता एखाद्या वेळेस मला पण येऊद्या शिकारीला. म्हणून आज तुझी आठवण काढली.

“मला जमलं पाहिजे शिकार करणं.”

“अरे जमेल की, मी आहे ना तुझ्या सोबत....! मी शिकवीन तुला शिकार पकडायला.”

“ठीक आहे मग....! जाऊ या रात्री.”

“नेमकी कधी निघायचे रात्री....!”

रात्री जेवण वगैरे झाले की थोडावेळ अंग टाक. गावातील सर्व लोकं जेऊन झोपली की, मी गावाचा कानोसा घेईल. गाव शांत वाटलं की, लगेच तुला बोलवायला तुझ्या घरी येईल. दारावरची कडी वाजली की तू लगेच आवाज ओळखून बाहेर ये.

“बरं....! बरं....!”

तुझ्या म्हातारीला सांगून ठेव मी आज रात्री शिकारीला जाणार आहे. नाहीतर कडीच्या आवाजाने म्हातारी रात्रीच चोर चोर म्हणुन ओरडत बसेल. उगाच गावासमोर मी चोर व्हायला नको.

“नाही रे भावा....! तसं कसं होईल.”

“तू पण लयच भितो भावा....!”

“कसं आहे लखन कधीकधी भिलेलं बरं....! नाहीतर जास्तीची हुशारी अंगलट यायला वेळ लागत नाही.”

“हा.... हा.... हा....!”

लखन मोठ्याने हसू लागला. लखन हसत हसत पुढे घरी निघून गेला. मी ही घरी निघून आलो.

         सायंकाळी विमलने मस्त चुलीवर झणझणीत जेवण बनवले. जेवणावर मनसोक्त ताव मारला. जिभेची इच्छा पूर्ण करत ढेकर देत ताटावरून उठलो. जेवण मस्त झाल्यामुळे पोट अगदी घागरी सारखे आकार घेत तंग झाले होते. आता पोटामुळे हालचाल सुद्धा करायची इच्छा नव्हती. मी थोडासा आराम करावा म्हणून अंथरुणावर पडलो. जमिनीला पाठ लावताच खुशीत घेतल्यासारखे वाटले. जमिनीचा स्पर्श होताच निद्रा स्पर्श करू लागली. मोठ्यांने जांभई देत अंगातील आळस झटकून झोपायला तयार झालो. पडल्यापडल्या कधी डोळे मिटले हे कळलेच नाही.

         रात्रीचे बारा वाजले होते. बाहेर भयाण शांतता पसरली होती. जणू निसर्गाने श्वास घेणे बंद केले होते. हवा सुद्धा बंद झाली होती. त्यामुळे दूरवरचे स्पष्ट ऐकू येत होते. किड्यांची शाळा भरल्यागत वेगवेगळा आवाज येत होता. भू.... भू…. करत भिंगोटे फिरत होते. किड्यांचा किर्.... किर्.... आवाज येत होता. सगळे गाव गाढ झोपेत होते. गावाला पाहारा देत असल्यागत किडे सगळीकडे फिरत होते. मला शिकारीच्या आठवणीने जाग आली. मी अर्धवट झोपेत उठून बसलो. डोळे चोळत चोळत विमलला हळूच आवाज दिला. “विमल.... ये.... विमल....! मी येतो बरं का?” परत झोपेत जाग आल्यावर मी दिसलो नाहीतर आरडाओरड करत बसशील. मी शिकारीला चाललो सकाळी परत येईल. विमल गाड झोपेत रमली होती. तिला ऐकू गेले की नाही तिचे तिला माहित. चला आपण आपले कर्तव्य पार पाडले. तिला न सांगता जाण्यापेक्षा सांगून चाललो हे बरे....! असे म्हणून हळूच कोपऱ्यातील मोठी काठी घेतली. शिकारीसाठी जाळे घेतले. हळूच घराची कडी उघडून लखनच्या घराकडे निघालो. घराच्या दहा-वीस पावले चालून झाली असेल तोच रस्त्यावर कुत्रं झोपलेलं दिसलं. कुत्रं पाहून मी एकदम दबकत दबकत पाय टाकू लागलो. आपल्या पायाच्या आवाजाने जर हे कुत्रं जागी झालं तर ते अर्ध गाव उठून घेईल. व गावासमोर आपल्याला चोर, लुटारू ठरवून मोकळं होईल. त्यामुळे याला न उठवता, न कळू देता, हळूच चोर पावलांनी मी त्याच्या जवळून निघून लखनच्या घराजवळ पोहोचलो. लखनच्या दाराला कान लावून मागोसा घेतला.

        लखन नक्कीच गाढ झोपलेला दिसतोय. मी हळूच दारावरची कडी ठोकली. इकडे तिकडे आजूबाजूला पाहून पुन्हा एकदा दारावरची कडी ठोकली. थोडावेळ शांतच उभा राहिलो. लखन उठल्याचा काही संकेत दिसेना. म्हणून मी परत दरवाजा जवळ जाऊन शुक... शुक... शुक... असा आवाज दिला. तरी लखनचा उठण्याचा काही पत्ता दिसेना. मला लखनचा खूप राग आला हा कुंभकर्ण आता उठेल तरी कधी? याला उठवायला करावे तरी काय? मी विचारात पडलो. मनात विचार आला एकदम मोठमोठ्याने ओरडावे लखन.... लखन.... उठ नाहीतर दरवाजा तोडून आत येईल. मग कसा पटकन उठून बाहेर येईल. पुन्हा ध्यानावर आलो ही रात्रीची वेळ आहे. या वेळेला असा ओरडून आवाज दिला तर आजूबाजूचे लोक दचकून जागे होतील. थोडावेळ शांतच उभा राहिलो. परत हळूच दारावरची कडी हातात घेतली आजूबाजूच्या आवाजाचा अंदाज घेतला व दोन चार वेळेस ठोकली. पाच मिनिटाने लखन डोळे चोळत चोळत बाहेर आला व म्हणतो, “दरवाजा वाजवण्यापेक्षा तोडून टाकायचा होता म्हणजे तुला मला उठवता आले असते.” किती वेळेपासून दरवाजे ठोकत बसला रे....! काही दम काढायचा ना....! दरवाजा उघडायला वेळ लागणारच ना....!

“बरं आहे का? लखनराव तुमचे....!”

“तू तर एखाद्या साहेबा सारखाच बोलू लागला.”

अरे लखा तू उठत नाही म्हणून दोन-चार वेळा कडी ठोकावी लागली. तेव्हा कुठे तुला जाग आली नाही तर कुंभकर्णा सारखा तू सहा महिने उठत नव्हता.

“अरे भावा....! काल शेतात काम करून खूप थकलो होतो त्यामुळे गाड झोप लागली.”

“तुझ्या शिकारीमुळे माझी झोप मोडली नाहीतर सकाळपर्यंत घोर नव्हता. मस्त झोप झाली असती.”

        लखन जांभई देत अंगातील आळस बाहेर काढत होता. त्याचा आळस मला जसे काही सुचवत होता की, आजच्या दिवस शिकार राहूदे. आळस देत देतच दरवाजा ओढून घेतला. एका हातात काठी घेऊन माझ्या मागे मागे निघाला. गावात चोर आल्यागत आम्ही दोघे जण चोरपावलांनी गावाच्या बाहेर निघालो. श्वास रोखल्यागत लखन व मी तोंड मिटकुन काहीच न बोलता चालत होतो. रात्रीच्या अंधारात रस्ता शोधत शोधत गावाच्या बाहेर पडलो. एकदाचा श्वास सोडून मी आता शिकारीसाठी मोकळा झालो होतो. रात्रीच्याला गावाच्या बाहेर पडायचे म्हणजे सोपे नाही. शिपाया सारखे गल्लीत कुत्रे पहारे देत बसलेले असतात. थोडीशी चाहूल लागली असती तरी, भुंकून... भुंकून... साऱ्या गावाला आम्हाला वाटे लावायला जागे केले असते. लखन माझ्या माघे माघे चालत होता. एक शब्दही न बोलता आम्ही दोघे जंगलाकडे कुस करत होतो.

“लखन तोंड घरी ठेवून आला की काय?”

“बोल काही तरी एवढा शांत राहू नको.”

“अरे भावा....! तूच तर मघाशी मला बोटांने खुनवून शांत बसायला सांगितले.”

“अरे ते गावा बाहेर पडण्यापूरते होते. आता आपण गाव सोडून खूप दूर आलो. आता कितीही मोठ्याने बोललो तरी गावात आवाज जाणार नाही.”

“मग काय जंगलातील प्राण्यांना ओरडून सांगू? आम्ही शिकारीला येत आहे जागेच राह रे....!”

लखनला शिकारीला बळजबरीने आणल्यासारखे तो निराश होऊन बोलत होता. कदाचित झोप न झाल्यामुळे तो असा बोलत असावा. मी ही थोडा वेळ गप्पच बसून राहिलो. मी पुढे व तो माझ्या मागे चालत चालत जंगलात पोहोचलो.

       घनदाट झाडी, वेगवेगळ्या वेलींची झुडपे, लहान-मोठी झाडे, यांनी सगळी जागा व्यापलेली. कुठेतरी पाऊल वाट. नाही तर झाडांच्या विळख्याने पाय टाकायला सुद्धा मोकळी जागा नाही. झाडांच्या सावलीने अमावास्या असल्यागत काळाकुट्ट अंधार पडला होता. या अंधारात आता शिकार शोधायची म्हणजे तीक्ष्ण नजर ठेवावी लागणार. मी शिकारीसाठी जाळे कुठे लावायचे या विचारात जागा शोधू लागलो. तेवढ्यात लखनचा ओरडण्याचा आवाज आला.

“अरे बापरे....!”

“काय झालं.”

“साप....! भला मोठा साप ....!”

“कुठय?”

“अरे हा काय या झुडपात गेलाय.”

“गेलास ना….! जाऊदे मंग आता. घाबरू नकोस.”

“अरे पण अंधारात आपण येथे उभे आहोत.”

“लखन आपण जंगलात आहोत. इथे अंधार असणारच ना....!”

“आणि असे कितीतरी साप इथे फिरत असतील इकडून तिकडे त्यांच्या शिकारीसाठी.” त्याला काय एवढे घाबरायचे तू फक्त चालताना खाली पाहून पाय टाकत जा. लखनचा

चेहरा एकदम भित्रा झाला होता.

“अरे लखन तू शेतकरी असून घाबरतोस.”

“अरे एवढा मोठा साप दिसल्यावर घाबरणार नाही तर काय करेल? कोणी सापाशी मैत्री थोडी करणार.”

लखन बोलायला खूप तिखट होता. एवढ्या रात्री जंगलात सुद्धा त्याचे तिखट बोलणे सुरू होते. मी झुडपाच्या मागे जाळे लावले. एखादी शिकार या जाळ्यात पडेल या आशेवर पुढे चालू लागलो. आज जर शिकार गावली नाही तर लखन खूप नाराज होईल. म्हणून मी पुन्हा पुन्हा बारकाईने प्रत्येक जाळीत शिकार शोधु लागलो. थोडे पुढे गेल्यावर एका जाळीत एकदम हिरवागार प्रकाश पडलेला दिसला. लखन एकदम दचकून थांबला आणि पटकन बोलला.

“अरे भावा तिथे कुणीतरी बसलेले आहे ते बघ....! त्या जाळी जवळ प्रकाश दिसतोय.”

“अरे एवढ्या रात्री जाळीत कोण कशाला लपून बसेल.”

“काजवे असतील ते काजवे....!”

“हे काय नवीन आता.”

“अरे लखन....! तुला काजवे माहीत नाहीत.”

काजवा हा एक कीटक आहे. तो भक्ष्य पकडण्यासाठी स्वतः स्वतः साठी प्रकाश पाडतो. काजव्यांचा प्रकाश फक्त रात्रीच पडत असतो. ये माझ्या मागे आपण त्या जाळी जवळ जाऊन काजवे पाहूया. लखन माझ्या मागे मागे काटेरी झुडूपाच्या जाळी जवळ आला. तिथे खूप सारे काजवे होते. लखन तर या काजव्यांना पाहून भारावून गेला. “अरे काय सुंदर आहेत हे किडे....!” मस्त उजेड पडतो त्यांचा छोट्या छोट्या लाईटा प्रमाणे. काय मस्त चमकत आहेत. लखन हळूच जाळीतील काजव्याला पकडून हातावर घेत होता. हाताच्या स्पर्शाने ते लगेच आपला प्रकाश चमकने थांबवायचे. “अरे.... विजला गड्या हा....! याचा लाईट गेला वाटतं.....!” तो त्याला सोडून द्यायचा व पुन्हा नवीन काजवा पकडायचा. लखन लहान मुलासारखा त्या काजव्या सोबत खेळू लागला. काजव्यांच्या त्या प्रकाशाने आपण जंगलात आहोत हे तो विसरून गेला होता. त्या काटेरी झुडपांना काजव्यांनी हिरवेगार प्रकाशमान करून टाकले होते. शिकार व काजवे यामध्ये रात्र कधी सरली कळले सुद्धा नाही. पहाटेच्या वेळीची घटका जवळ आली. काजव्यामुळे आज शिकार शोधता आली नाही. उजेड पडायच्या आत घराकडे वापस गेलो पाहिजे. म्हणून मी लखनला चालायला सांगितले. गप्पा मारत मारत जंगलातून वापस निघालो. बोलत बोलत गावात पोहोचलो. तरी अद्याप लखनच्या मनातील काजव्यांचे चमकणे सुरूच होते.

✍✍✍✍

© राजेंद्र प्रल्हाद शेळके


Thursday, 10 June 2021

लघुकथा पेरणी

                लघुकथा:- पेरणी

चार महिन्यापासून सूर्य सारखा आग ओकत होता. त्याच्या उष्णतेने सगळेच हैराण झाले होते. माणसं, जनावरं, पार होरपळून निघाली होती. झाडं-झुडपं तर सुकून गेली होती त्यांच्यात जणू प्राण उरला नव्हता. यावर्षी खूपच उन्ह तापले, उन्हाळा जरा कडकच गेला. कपाळावरील घाम पुसत प्रभाकर मंदिराच्या वट्यावर बसलेल्या सगळ्या मित्रमंडळींना सांगू लागला. 

तेवढ्यात सोपानराव म्हणतात,

“ऊन तापलं तर पाणी ही तसाच पडेल की, जोमाचा”

“उन्हामुळे शेतही तापलं चांगलं यावर्षी आता पाऊस जर दमदार पडला तर यावर्षी पीक पाणी लयभारी जमेल.”

मधेच हरी म्हणतो,

“जमू दे बुवा चांगलं यावर्षी माझ्या पोरीचं लग्न हाय” यावर्षी पीक पाणी चांगलं झालं तर दोन पैसे हाती लागेल. लग्न जोमात करता येईल. पाऊस कमी पडला तर पीक पाणी कायचा जमते मग....! कुठून आणू पैसे पोरीच्या लग्नाला? हरि पार चिडून बोलत होता. पावसाच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. तेवढ्याच गावचे पोलीस पाटील जवळून जात होते. त्यांनी सगळ्यांना हातवर करून राम राम घातला.

“राम राम मंडळी”

“रामराम पाटील काय म्हणता?”

“काय नाही”

“कामानिमित्त तालुक्याला गेलतो.”

“झाले का पाटील काम मग....!”

“कायचं होतं काम हरी....!”

“तालुक्याला पोहोचलो आणि पाऊस सुरू झाला.”

“तालुक्याला....!”

“आणि पाऊस.....!”

“हो....! हो....!”

“प्रभाकरराव तालुक्याला खूप धुवाधार पाऊस झाला.”

सगळेजण आश्चर्यचकित होऊन पाटलाकडे बघतच राहिले. प्रभाकरला खूप आनंद झाला. पाटलाचे ते शब्द सारखे कानात घुमत होते. थोड्यावेळांनी मंदिराच्या वट्यावरील गप्पांची मैफिल मोडली. प्रभाकर घरी निघून आला. शेतातील कामे संपली होती. नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचनी करून शेत पेरणीसाठी सज्ज करून ठेवले होते. खत, बी-भरण आणून ठेवले होते. सगळी तयारी जोमात करून ठेवली होती. आता फक्त पावसाची प्रतीक्षा होती. पावसाला सुरुवात झाली होती. आज तालुक्याला पाऊस पडल्याची बातमी पाटलाने सांगून आणखीनच पाऊस जवळ आल्याचे समजले. चातक पक्षांप्रमाणे प्रभाकर रोज पावसाची वाट पाहू लागला. पण पाऊस काही पडेना. शेजार पाजारच्या गावात कुठं मुठं पाऊस पडल्याचे सकाळी पारावर कानी पडू लागले. पण आपलेच गाव कसं काय सुटले या पावसातून....! याची चिंता प्रभाकर करू लागला. एक आठवडा लोटला पण पावसाचा थेंब पडला नाही. सगळं गाव पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहू लागलं. पाऊस पडला नाही तर, पेरणी कशी करावी या चिंतेने प्रभाकर दोन दिवसापासून जेवला नाही. शेतकरी, जमीन व पाऊस यांचं नातं माय लेकरा सारखंच आहे. दुपारी प्रभाकर जेवून सहज विचारात मग्न झाला. पावसाच्या चिंतेत रमलेल्या प्रभाकरला डुलकी लागली. अचानक उन्ह झाकाळून आले. आकाशात ढग जमा झाले. थंडगार हवा सुटली व अचानक पावसाला सुरुवात झाली. प्रभाकर ची पोरं अंगणात खेळत होती. ती धावत पळत घरात आली व मोठमोठ्याने ओरडू लागली.

“बाबा…!”

“ओ बाबा….!”

“पाऊस सुरू झाला.”

“बघा अंगणात किती मोठे मोठे थेंब पडत आहे.”

असे म्हणून पोरं पुन्हा अंगणात जाऊन पावसात खेळू लागली. या वर्षीचा पहिलाच पाऊस होता त्यामुळे लहान मुलं पावसात आनंदाने उड्या मारू लागले. प्रभाकर लेकरांच्या आवाजामुळे जागा झाला. पावसाचे चार थेंब जमिनीवर पडताच जमिनीतून छान सुगंध बाहेर पडत होता. आठ महिन्यापासून तहानलेल्या जमिनीला सुद्धा पावसाच्या आगमनाने आनंद झाला होता. पहिल्या पावसाच्या सरीचा थेंब जमिनीवर पडताच जमिनीतून छान सुगंध बाहेर पडतो. हा सुगंध असाच शेतकऱ्यांच्या जीवनात सुद्धा भरला पाहिजे. त्याच्या कष्टाच्या घामाची, सुगंधाची किंमत समाज, व्यापारी व सरकारला कळली पाहिजे. पावसाच्या आगमनानंतर शेतात होणारी धानाची पेरणी ही खरी तर शेतकऱ्याच्या नशीबाची पेरणी आहे. वर्षभर काबाडकष्ट करा व पावसावर अवलंबून रहा. निसर्गाकडे डोळे करूनच वर्षभर जीव मुठीत धरून काम करा तेव्हा कुठे झोळीत चार पैसे पडतात. या विचारात प्रभाकर गडून गेला. तेवढ्यात त्याची बायको लक्ष्मी मस्त गुळाचा कोरा चहा करून घेऊन त्याच्याजवळ आली.

“चहाची कप बशी पुढे करून हळूच म्हणाली,”

“अहो पडले की चार थेंब पावसाचे....!”

“घ्या बघू चहा....! गोड तोंड करा.”

रूण राजा झाला की प्रसन्न....! झाली आता सुरुवात. बघा आता रोजच कसा धो धो पाऊस पडतो. उगाच तोंड पाडून बसू नका रोजच्या सारखे....!”

“प्रभाकर लक्ष्मी कडे बघुन बोलु लागला.”

“अगं लक्ष्मी दर वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस लांबला. त्यामुळे पेरणी पण लांबली ही काय आनंदाची गोष्ट आहे का? अग वेळेवर पेरणी झाली तरच पुढें पीक पाणी चांगलं येतं....! नाहीतर पिक पाणी लय मार खातं.”

“बरं....! बरं...!”

“मला ठावूक आहे सगळं....!”

“मी काय एखाद्या साहेबांची लेक बाळ आहे. हे समदं मला सांगायला.”

मी शेतकऱ्याचीच पोरं आहे. मला सगळं ठाऊक आहे. गावात फक्त आपलीच पेरणी बाकी असल्यागत तुम्ही चिंता करत बसता. यावर्षी थोडा पाऊस लांबला त्यामुळं सगळ्यांचीच पेरणी लांबली. बिचारा पाऊस तरी काय करेल. लवकर आला तरी लोक नाव ठेवतात. व उशीर झाला तरी लोक नाव ठेवतात. तो बिचारा....! तरी काय करेल. प्रभाकर व लक्ष्मीच्या गोड बोलण्यांत बाहेर तोपर्यंत छान पाऊस पडला होता. प्रभाकर बाहेर येऊन पाहतो तर अंगणात पाणी साचले होते. पोरं पावसात ओली चिंब झाली होती. पावसाच्या थेंबा बरोबर उड्या मारत मारत पोरं नाचत होती. प्रभाकरने पोरांना ओरडून घरात बोलावून घेतले. अरे किती वेळ पावसात उड्या मारता. चला आता कपडे बदलून घ्या. जास्त वेळ ओले राहिलात तर ताप, सर्दी, होईल. परत दवाखान्यात पळावे लागेल.

“अहो बाबा काय होत नाही.”

“किती दिवसांनी पाऊस पडला आज....!”

“किती छान मज्जा येत होती.”

“थंडेगार पावसाचे थेंब पडत होते. नुसते उभे राहिले तरी पाऊस भिजून टाकतो लगेच.”

“प्रभाकरची छोटी मुलगी मुक्ताई बोलत होती.”

लहान लेकरांना पेरणी, शेती हे काही कळत नाही. त्यांना फक्त पाहिजे असतो स्वतःचा आनंद. बाप आठ दिवसापासून पोटभर जेवला नाही की, शांत झोपला नाही. या पावसाच्या चिंतेने बापाची झोप उडाली होती. व तुम्हाला मस्ती सुचत आहे. चला लवकर कपडे बदला. लक्ष्मी लेकरावर चिडून बोलत होती. उद्या पासून आम्हाला शेतावर जावे लागेल. आता पेरणी, लागवड करावी लागणार तेव्हा, तुम्हांला घरी राहावे लागणार. “तुम्ही मंग दिवसभर असाच धिंगाणा घालणार आहे का?” मधेच मुक्ताई ची गडबड सुरू झाली.

“आई....! आई....! मी पण येणार शेतात.”

“मी दिवसभर शेतात थांबणार तुझ्या सोबत....!”

“अग आम्हाला शेतात काम करावे लागणार. आम्ही बसायला चाललो नाही शेतात....! तू येऊन काय करशील तिथे?”

“दादा आणि मी झोका खेळत बसेल झाडाखाली.”

“बरं...! बरं....! बघू उद्याच्या उद्या.”

“आता शांत बसा घरात. कुणीही बाहेर जायचे नाही.”

         पाऊस पडून एक घंटा झाला नव्हता तोच लक्ष्मीची उद्याच्या पेरणीची तयारी सुरू झाली होती. बी-भरण, खत पेरायला फिरायला ओटीसाठी साडीचा कपडा, खुरपे, कुऱ्हाड असे साहित्य एका कोपऱ्यात ठेवायला सुरुवात केली. प्रभाकर उद्याच्या पेरणीसाठी हरीच्या घराकडे आला होता. हरीकडे दोन बैल होते. त्याचे दोन बैल व स्वतःचे दोन बैल अशी सावड करून पेरणी करता येईल. दोन दिवसात आपली पेरणी होईल. आपले झाले की, त्याची पेरणी करता येईल. सावड केली की एकमेकांना मदत होते व पेरणीही लवकर आटोपते. लक्ष्मीला खत पेरायला त्याच्या बायकोची मदत होईल. दोघीजणी मागे लगेच खत पेरतील. अशा विचारात प्रभाकर हरीच्या घरी आला. दारातूनच प्रभाकरने आवाज दिला.

“वहिनी....! ओ वहिनी....! हरी आहे का घरी?”

“तेवढ्यात हरीने घरातून प्रभाकर चा आवाज ऐकला.”

“अरे ये प्रभाकर....! घरीच आहे. कुठे जाणार आहे अशा वेळेस....!”

“नाही म्हटलं....! काही खत, बी-भरण घ्यायला तालुक्याला गेला की काय लगेच.”

तालुक्याला जायचे काम नाही ठेवले. सगळं खत, बी-भरण, लागवडीचं बियाणं एकदाच आणुक टाकलं. पावसाचा मात्र पत्ता नव्हता.

अरे माझे पण तसेच झाले की यावर्षी....! मला तर वाटलं यावर्षी बिचारा पडतोच की नाही. की देतो सुट्टी एवढ्या वर्षी.

हरी हसत हसत म्हणाला,

“असं नको बोलू बापा....!”

मला यावर्षी त्याची लय गरज आहे. एवढ्या वर्षी त्यांन साथ दिली ना....! तर छकीचे लग्न धुमधडाक्यात लावतो. मग मला कुण्या पाहुण्याकडे हात पसरायची वेळ येणार नाही.

मलाही तेच वाटते. यावर्षी पीक पाणी चांगलं झालं तर घराचे काम करावे. पावसाळ्यात लय गळतं बघ घर....! भिंत पण लयच पडायला आली. मातीच्या भिंती आहे त्या आजोबांच्या हातच्या. किती दिवस टिकतील तरी....! तिसरी पिढी आहे माझी त्या घरात....! त्याला तरी काय म्हणावे, लय साथ दिली या घराने मला आतापर्यंत....!

मला तर आता दोन-चार वर्षे घर बांधण्याचा विचार पण करता येत नाही. दोन्ही पोरीचे एकदा व्यवस्थित लग्न पार पडले की, मी मग घर बांधायला मोकळा होतो.

“हरी एवढी चिंता करू नको.”

“होईल की छकीचे लग्न धुमधडाक्यात.”

“लय अडचण आली तर मी मदत करील तुला....! काय चिंता करू नको. छकीचे लग्न आधी, मग माझे घर. बस मग तर झालं....!”

“हरी एकदम भावूक झाला होता.”

परिस्थिती समोर प्रत्येकालाच हतबल व्हावे लागते. परिस्थितीपुढे कुणाचेही काही चालत नाही. हरीच्या बायकोने चहा करून आणला.

“भाऊजी हा घ्या चहा.”

“वहिनी चहा कशाला बनवला. मी चहा घेऊनच आलो होतो इकडे.”

“अहो भाऊजी घ्या चहा. हे काय लोकाचे घर आहे का? हे ही तुमचेच घर आहे.”

“हो....! हो....! ते तर आहे.”

“मी तरी कुठे परकं समजतो. माझेच घर आहे.”

चहा घेत घेत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळानंतर हळूच प्रभाकरने विषय काढला.

बरं मी काय म्हणतो हरी, “उद्या माझी पेरणी करू आधी” मग दोन दिवसांनी तुझी पेरणी करूया. माझी शेती जरा दूर आहे व त्याला रस्ता नाही. शेजारची पेरणी होण्याअगोदर पेरणी झाली की चिंता मिटते बघ. नाहीतर दोन दिवस उशीरही झाला असता तरी काही हरकत नव्हती. तुझे शेत रस्त्याच्या कडेला आहे त्यामुळे तुला कधीही पेरता येते.

“कधीही नाही प्रभाकर….! वेळेवरच पेरावे लागेल.”

“तुझी पेरणी झाली की दोन दिवसांनी लगेच माझी पेरणी करून घेऊ. मग कुण्याच्या ही शेतात जायला आपण मोकळे होतो.”

“हो ते आहे म्हणा.”

“दोन चार दिवस बाहेर पेरायला गेलो तर तेवढे चार पैसे फवारणीला कामी येईल.”

“ते तर आहेच मग....!”

बघू पावसाने साथ दिली तर जाता येईल. नाहीतर हा बिचारा लागून राहिला तर आपलीच पेरणी लांबेल. मग काय दुसरीकडे जायचा मेळ बसतो.

“ते आहे म्हणा, बघू पुढच्या पुढे.”

“असे म्हणून प्रभाकर हरीच्या घरून निघाला.”

“बरं वहिनी सकाळी लवकर आवरा.”

“हो....! भाऊजी सकाळी लवकर आवरून ठेवते. लक्ष्मी ताईला पण लवकर आवरायला सांगा.”

“हो....! वहिनी”

“तीला ही लवकर आवरायला सांगतो.”

असे म्हणून प्रभाकर घरी निघून आला. प्रभाकर घरी परत येताच लक्ष्मीने विचारायला सुरुवात केली.

“काय म्हणाले हरी भाऊजी? उद्या येताय ना आपल्या शेतात....!’”

येतोय म्हणाला,

पण त्यालाही त्याच्या पेरणीची चिंता वाटत होती. पाऊस जास्त पडला तर पेरणी लांबेल याची चिंता वाटते. पावसाने साथ दिली तर सगळं बरोबर होईल बग लक्ष्मी....! उद्यासाठी काय काय घ्यावे लागेल त्या सर्व वस्तू आठवणीने सोबत घे आणि हो पूजेचे सामान घ्यायला विसरु नको. पेरणीला सुरुवात करायच्या अगोदर पूजा करावी लागेल. आपल्या शेतातील मुंजा ची पूजा करावी लागेल. देवाची मान मान्यता केली म्हणजे वर्षभर काही विघ्न येणार नाही. लक्ष्मी लगबगीने सर्व तयारी करत होती. नावाप्रमाणेच प्रभाकरच्या आयुष्यातील ती खरी लक्ष्मी होती. ती मेहनतीने व काटकसरीने संसार फुलवत होती. उद्या पेरणी होणार या विचाराने आज प्रभाकर प्रसन्न होता. दुपारी पडलेल्या पावसाने जनु गावात प्राण आला होता. गावातील सगळी मंडळी दुपारपासून पेरणीच्या तयारीला लागली होती. खत, बी-भरण, औत फाटा, बैलजोडी या सगळ्या वस्तूंची जमा जमव सुरु झाली होती. रात्र झाली अंधार पडला होता. लक्ष्मीने स्वयंपाक करून ठेवला होता. प्रभाकर लेकरांना घेऊन जेवायला बसला. जेवता जेवता मुक्ताई मध्येच म्हणाली, “बाबा उद्या आम्ही शेतात येणार बरं का?”

अरे तुम्ही शेतात येऊन काय करणार. अचानक पाऊस आला तर किती फजिती होईल त्यापेक्षा घरीच खेळा.

बाबा आम्ही झाडाखाली चुपचाप खेळत बसु. तुम्हाला त्रास देणार नाही. येऊ द्या ना आम्हाला शेतात....!

प्रभाकर लेकरांकडे बघून म्हणाला, “अरे आधी पोटभर जेवण तर करा, की आत्ताच जाता शेतात पेरणी करायला.” सगळे खळखळून हसू लागले. उद्या तुम्ही पण चला शेतात पेरणी करायला. बस आता जेव्हा पटकन आणि झोपी जा सकाळी लवकर उठावे लागेल. मुलांनी पटापटा जेवण करून घेतले व झोपी गेली. प्रभाकरने आज समाधानाने जेवण झाल्याबरोबर अंग टाकले. या वर्षीच्या पावसाने खूप प्रतीक्षा करायला लावली. या पावसाच्या चिंतेने सगळ्यांची झोप उडाली होती. आज मात्र पावसाच्या आगमनाने गाव कसं शांत निपचित पडलं होतं.

        सकाळ झाली गावात सगळीकडे पेरणीसाठी लगबग सुरू होती. आज गाव सकाळीच जागं झालं होतं. लक्ष्मीने लवकर उठून सडा, रांगोळी केली. सकाळ, दुपारचा स्वयंपाक करून घेतला. आधीच घाई त्यात लेकरं सकाळीच उठून बसली. अहो मी काय म्हणते,

“लेकरांच कस करता त्यांना घ्यायचे का शेतावर”

“घेऊन टाक सकाळी सकाळी त्यांचे रडगाणे नको.”

खेळतील झाडाखाली दिवसभर. तसेही पोरं घरी असले की, पाण्या पावसाचा जीव लागेल. त्यापेक्षा सोबत असली तर आपण तरी बीन फिकीर होऊ.

“हो…! ते पण बरोबर आहे म्हणा….!”

“बरं करते मग त्यांची तयारी....!”

लक्ष्मीने पोरांना अंघोळ घातली. चहा दुध दिले. चुपचाप एका ठिकाणी बसायला सांगितले. पोरं पायात चप्पल बुट घालून अंगणात बैलगाडीची वाट पाहत बसले. प्रभाकर बैलजोडी जुपुन आणायला गेला होता. लेकरं घराच्या आत बाहेर करत होती. तेवढ्यात मुक्ताई उड्या मारतच ओरडू लागली. गाडी आली....! गाडी आली....! प्रभाकर बैल गाडी घेऊन दारात आला. घरातील खताची पोती, बी-भरण, गाडीत टाकले. लेकरं ही गाडीत जाऊन बसले. लक्ष्मीने घर लावून डोक्यावर टोपले घेऊन शेताकडे निघाली. गावाच्या बाहेर पडताच हरी सुद्धा त्याची बैलगाडी घेऊन प्रभाकरच्या शेताकडे निघालेला दिसला. दोघांनी एकमेकांना राम राम घातला. एकामागे एक बैलगाड्या शेतात निघाल्या. कालच्या दुपारच्या पावसाने ओलेचिंब झालेले शेत पेरणीसाठी सज्ज होते. बैलगाडीची चाके चिखल उडवीत होती. पोरांना आज बऱ्याच दिवसानंतर घराबाहेर पडायला मिळाले होते. त्यामुळे पोरं आज खूप खुश होती. गाडीत बसल्या बसल्या दोघांचा गोंधळ सुरूच होता. सूर्यदेव नुकतेच स्वतःचा प्रकाश सगळीकडे पसरवत होते. आज सूर्याच्या आगमना बरोबर सर्व शेतकरी शेतात येत होते. रमत गमत बैलजोड्या शेतात पोहचल्या. प्रभाकरने शेताच्या बांधावर गाडी सोडली. शेताच्या मधोमध आंब्याचे झाड होते. लक्ष्मी पोरांना घेऊन झाडाखाली जाऊन बसली. हरी व प्रभाकरने औत जुपले. बैलाची व औताची पूजा केली. प्रभाकर शेतातल्या मुंजाला नारळ फोडून आला. लक्ष्मीने प्रभाकर व हरीला कुंकू लावले. शेवटी पेरणीचा श्रीगणेशा झाला. पेरणीचे पहिले तास काढले.

             दुपारपर्यंत अर्धे शेत पेरुण झाले होते. दुपारी औत सोडुन बैलांना चरायला सोडले. सगळ्यांनी पोटभर जेवणं केली. आभाळ झाकाळून आले होते. आजही पाऊस पडणार असे वाटत होते. पोरांनी झाडाखाली मातीचे खोपे बनविले होते. पळसाच्या झाडाच्या पानासोबत खेळत खेळत लेकरं पण थकली होती. दुपारी जेवणे आटोपल्यावर पुन्हा पेरणीला सुरुवात झाली. दिवस मावळेपर्यंत जास्तीत जास्त रान झाले पाहिजे यासाठी प्रभाकर गडबड करत होता. प्रभाकर ओडीने बैलांना हाकत होता. हरीच्या घरचे व लक्ष्मी मागे खत पेरत होत्या. सूर्यदेवाने दिवसभराची भ्रमंती करुन तो मावळतीला चालला होता. आजच्या दिवसाची पेरणी थांबवुन सगळे घरी निघुन आले.

          दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळीच पेरणीला सुरुवात झाली. आज उत्साहाने पेरणी सुरु होती. आजुबाजूच्या सर्व राळात पेरणी सुरू होती. अरे राजा हो....! सरजा हो....! आरोळी ठोकून प्रभाकर औत हाकत होता. थोडा थोडा अंधार पडताच पेरणी आटोपली. हरी व प्रभाकरने औत सोडले व बैलगाडी घेऊन घराकडे आले. कालच्या पेक्षा आज दिवसभर शेतात काम करून सगळेच थकले होते. लक्ष्मीने कोरा चहा बनवला. चहा पित पित प्रभाकर लक्ष्मीला म्हणतो, “आज गडबड केली नसती तर थोडे रान उरले असते.” तेवढ्यासाठी परत उद्या जाता आले नसते.

“हो ते पण आहे म्हणा....!”

उद्या हरी भाऊजींची सुखरूप पेरणी झाली म्हणजे आपण यावर्षीच्या प्रेरणेतून मुक्त झालो. लक्ष्मीने घाईघाईने स्वयंपाक केला. पोरं शेतात दिवसभर खेळुन पार थकली होती. मुक्ताई उपाशी पोटीच झोपी चालली होती. प्रभाकर लेकरांना घेऊन जेवायला बसला. दोन घास मुखात जात नाही तोच पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या सरी सुरू होताच प्रभाकरच्या तोंडातला घास साखरेहुन गोड झाला होता. दिवसभर केलेल्या पेरणीवर पडलेल्या पावसाच्या चार थेंबांने का होईना जमिनीत पडलेला दाना दोन दिवसात अकुंर घेऊन बाहेर पडणार. पावसाच्या खुशीत प्रभाकर देवाकडे हात जोडून म्हणतो, “पावलास रे बाबा” एवढ्या वर्षी अशीच कृपा राहूदे.

✍✍✍✍

© राजेंद्र प्रल्हाद शेळके

   9823425852


लघुकथा देवमाणूस

                   लघुकथा:- देवमाणूस

रेल्वे गाडीचा मोठ्याने हॉर्न वाजला. तेवढ्यात पांढऱ्या शुभ्र कपड्यावर काळा कोट घातलेल्या साहेबांनी दिमाखात हिरवा झेंडा दाखवला. व रेल्वे रूळावरून हालली. करकर आवाज करत रेल्वेच्या चाकांनी खूप वेळेनंतर जागा सोडली. इंजन डबा जसा जसा जोरात ओढू लागला तशी चाके जोरात घुमू लागली. रेल्वेचा एकेक डब्बा रेल्वे स्थानकाला सोडून पुढे निघाला होता. माझा डब्बा शेवटचा होता त्यामुळे मी रेल्वेस्थानक निरखून पाहत होतो. माझी नजर गर्दीतील सर्व गोष्टींना मन भरुन पाहत होती. काही वेळातच माझा डब्बा सुद्धा रेल्वेस्थानक मागे सोडून इंजन सोबत गतिमान झाला होता. बिचारा काळ्या कोटातील साहेब शेवटपर्यंत हिरवा झेंडा दाखवत उभा होता. किती काळजी बिचाऱ्याला या रेल्वेतील प्रत्येक प्रवाशाची. त्याच्या हातातील या हिरव्या झेंड्यात काय ताकत होती. झेंडा दाखवताच एवढी मोठी लांबच लांब रेल्वे चालायला लागली. नुसती चालायला लागली नाही तर भरधाव वेगाने धावायला सुद्धा लागली होती. त्या हिरव्या झेंड्याच्या विचारात मी गर्दीतून आत शिरलो. एका सीटवर एक वयस्कर गृहस्थ बसले होते. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. हळूच नजर खिडकीतून बाहेर फिरवली. बाहेर पुसट पुसट हिरवे रंगीबेरंगी काहीतरी दिसत होते. बाहेरील दृश्य स्पष्ट दिसावे म्हणून माझ्या मानेने खूप आटापिटा केला. पण खिडकी जवळ ते वयस्कर गृहस्थ बसलेले असल्यामुळे मला बाहेरचे स्पष्ट दिसणे शक्य नव्हते. शेवटी मी निराश होऊन शारीरिक हालचाल थांबवून स्तब्ध बसून राहिलो. मी स्वतःच स्वतःवर रागावलो. आर्यन साहेब….! उशीर हा आपला नेहमीचा ठरलेला भाग आहे. त्यामुळे प्रत्येक बोगीतील स्वच्छ चांगली जागा गेलेलीच असते. सुदैवाने आज कमीत कमी बसायला तरी जागा मिळाली इतर वेळी उभेच जावे लागते. आज कदाचित अर्धा तास लवकर आलो असतो तर चांगली खिडकी जवळची जागा मिळवता आली असती. असो....! आता मिळाली त्या जागेवर शांत बसून राहू. अशी मनाची समजूत काढत मी शीटला डोके टेकवून डोळे मिटुन घेतले. आता माझे डोळे शांत होते. पण कानांनी डब्यातील लांबचा आवाज ऐकायला सुरुवात केली होती. 

“चाय....! चाय....! गरमा गरम चाय....!”

“पाणी बॉटल....! ठंडा पाणी बॉटल....!”

“समोसा....! समोसा....! गरम गरम समोसा....!”

थोड्या वेळापूर्वी रेल्वे स्थानकावरून चढलेल्या विक्रेत्यांनी स्वतः जवळील पदार्थ विकायला सुरुवात केली होती. मी पक्के डोळे लावून कानांना सुद्धा शांत झोपायला सांगितले. तेवढ्यात शेजारच्या त्या वयस्कर गृहस्थांनी मला आवाज दिला.

“हॅलो साहेब....!”

“प्लीज आपण थोडा वेळ इकडे बसता का?”

“मी त्या गृहस्थाच्या आवाजाने पटकन डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले. त्यांनी परत एकदा मला विचारले.”

“प्लीज आपण थोडा वेळ इकडे बसता का?”

“मी त्यांना पटकन विचारले. का बरं आजोबा....!”

“माझी गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे.”

थोडेशे काहीतरी खाऊन घेतो. म्हणजे गोळ्या घेता येईल. खिडकीतून खूप वारा आतमध्ये येतो. त्यामुळे तिथे दोन घास व्यवस्थित खाता येणार नाही. की पाणी व्यवस्थित पिता येणार नाही. त्यामुळे आपण थोडा वेळ खिडकी जवळ बसले तर खूप बरे होईल.

“मी त्यांना हो म्हणायच्या आत ते जागेवरून उठले सुद्धा व उभे राहून मला म्हणतात.”

“आणि हो....! मला आजोबा म्हटलेले आवडत नाही. मी अजून मनानं तरुण आहे.”

मी चुपचाप माझ्या जागेवरून उठलो व खिडकी जवळ जाऊन बसलो. मी हळूच खिडकीतून नजर बाहेर फिरकावली. पण मनात त्या गृहस्थाचा रागच आला. अतिशय वयस्कर, शरीर थकलेले, बोलतांना आवाजात थकवा, हात थरथर कापल्यासारखे हालत आहे. तरी हे आजोबा स्वतःला तरुण समजतात ही तर कमालच आहे. मी मनातल्या मनात थोडासा हसलो. मला जरा हे ग्रहस्थ विचित्रच वाटले. मी पूर्णपणे खिडकीकडे मान वळवून बाहेर पाहू लागलो. निसर्गाचे अदभुत असे सौंदर्य दिसत होते. निसर्गाच्या नटलेल्या सौंदर्याने हा परिसर खूपच सुंदर दिसत होता. हिरवीगार उंच मोठी मोठी झाडे, काटेरी झुडपे, रंगीबेरंगी फुलांच्या वेगवेगळ्या बहरलेल्या वेली, दाट अशी झाडांनी एकमेकांसोबत केलेली गर्दी मनाला प्रसन्न करणारी होती. कदाचित या परिसरात पाऊस खूप पडत असावा. किंवा येथील माणसं कधीच झाडे तोडीत नसावी. यामुळेच एवढी सुंदर घनदाट झाडे आजही उभी आहेत. अशा सुंदर निसर्गनिर्मित ठिकाणी राहणारी माणसं किती नशीबवान असतील. मी त्या नैसर्गिक सौंदर्यात हरवून गेलो. मला प्रवासात नेहमी नवीन ठिकाणचे वेगळेपण बघायला आवडते. मी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणची सुंदरता डोळे भरुन पाहतो व मनात साठवत असतो. ही हिरवळ रंगीबेरंगी निसर्गाची दुनिया मला नेहमीच भुरळ पाडत आलेली आहे. लहानपणी मी माझ्या गावी दिवस दिवस झांडा सोबत खेळायचो. पावसाळ्यात तर दरवर्षी न चुकता झाडे लावायचो. दर शनिवारी, रविवारी त्यांना पाणी घालायचो. मी माझ्या झाडांना खूण करायचो. माझी कितीतरी झाडे आता खूप मोठी झाली असेल. आजही त्यांच्या बुडाशी दगडाने केलेल्या खुणा स्पष्ट दिसतील. मी आज प्रवासात बाहेरच्या नैसर्गिक वातावरणाने बालपणात हरवून गेलो होतो. हे बाहेरील सौंदर्य डोळे भरून पाहता यावे यासाठीच तर खिडकी जवळची जागा पाहिजे असते. नाहीतर कुठेही बसले तर काय फरक पडतो. त्या आजोबांच्या गोळ्या मुळे मला हे सौंदर्य पाहता आले. मी शांतपणे बाहेर बघत होतो. परंतु मनाने मात्र सगळीकडे फिरणे सुरूच होते. मी माझ्या मनासोबत निसर्गाच्या भ्रमंतीला दूर गेलो व तिकडेच गुंतलो. आजोबांनी मला आवाज दिला.

“अहो साहेब....!”

“या आता तुमच्या जागेवर आम्ही जातो आमच्या जागेवर. थोडी थंडी गार हवा घेतो.”

आजोबा परत उठून स्वतःच्या जागेवर बसले. मी ही पूर्वीच्या जागेवर येऊन बसलो. माझा नैसर्गिक स्वप्नभंग झाल्यासारखे झाले. मला आता बाहेरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे मागचे काहीच आठवत नव्हते. मी मनातल्या मनात त्या गृहस्थावर चिडून झोपण्यासाठी डोळे मिटले. तेवढ्यात त्या गृहस्थांनी मला प्रश्न केला.

“नाव काय आपले?”

“काय करता आपण?”

मला आधीच त्या आजोबाची खूप चीड आली होती. वाटेल तेव्हा स्वतःच्या वस्तूप्रमाणे माझा वापर करून घेत होते. मी मात्र वेड्यासारखं आजोबा म्हणेल तसे वागू लागलो होतो. मला आजोबांचे बोलणे स्पष्ट ऐकू आले पण मी न ऐकल्यासारखे करून परत जास्त घट्ट डोळे मिटुन घेतले. आजोबांनी मला परत आवाज दिला.

“अहो साहेब....!”

“झोपताय काय?”

“आता झोपायला काय रात्र झाली का?”

शक्यतो माणसांनी रात्रीच झोपावे. दिवसभर काम करत राहावे. यासाठीच तर निसर्गाने बारा तास रात्र व बारा तास दिवस अशी रचना केली आहे.

मी मनाची इच्छा नसताना सुद्धा डोळे उघडले व त्या आजोबाकडे बघितले. जेवणामुळे आजोबांच्या चेहऱ्यावर थोडी तरतरी आली होती. आवाज पण कडक येत होता. त्यांनी परत विचारले.

“नाव काय आपले?”

“काय करता आपण?”

“मी आर्यन सावंत….!”

‘भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक या पदावर काम करतो.”

“अरे वा छान....!”

“आणि राहता कुठे?”

“मी मुंबईलाच राहतो.”

“माझे मूळ गाव कोकणात आहे. परंतु शिक्षण आणि नोकरी यामुळे गेली वीस वर्ष मी मुंबईतच राहतो.”

“छान....!”

“एकंदरीत सगळं छान आहे म्हणायचं....!”

मी मानेनेच त्यांना होकार कळवला. आता त्यांना वाटले मी त्यांना नाव, गाव विचारेल. परंतु मी काहीच विचारले नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली व शांत बसून राहिलो. त्यांनी न विचारताच सांगायला सुरुवात केली.

“मी यशवंत माने….!”

माझे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पण आता मी सातारा मध्ये राहतो. मी आर्मी मध्ये तीस वर्ष लेफ्टनंट मेजर या पोस्टवर काम केले. आर्मी मधून निवृत्त झाल्यानंतर वीस वर्ष बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी केली. व गेल्या दहा वर्षापासून गोर-गरीब अनाथ मुलांसाठी मोफत सैन्य भरती अकॅडमी चालवितो. माझ्या अकॅडमीतील अनेक मुलांनी सैन्यामध्ये नोकरी मिळविली. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा तिन्ही दलात अनेक मुलं कार्यरत आहेत.

“आजोबा वयाने जवळ-जवळ ऐंशी वर्षाचे होते पण आवाजात आजही तोच कडकपणा दिसत होता.”

“आर्यन साहेब….! मी आजही तरुण आहे.”

मला अजून गोर गरीब, अनाथ मुलांसाठी खूप काम करायचे आहे. मी स्वतःला कधीच कमजोर व वृद्ध समजत नाही. माणसाने अजीवन तरुण राहावे. निर्व्यसनी, शिस्तप्रिय जीवन जगावे.

“बरोबर आहे का?”

मी मान हलवून बरोबर असल्याचे सांगितले. आजही आजोबांच्या चेहऱ्यावरील तेज व बोलण्यातील कडकपणा यावरून मला त्यांच्या स्वभावाचा अंदाज आला होता. मघाशी बोलताना त्यांनी मला आजोबांन न म्हणण्याचे का सांगितले हे मला आता कळाले होते. एवढ्या वयात सुद्धा माणूस आनंदी व कडक शिस्तीने जीवन जगतो हे खरंच आश्चर्य जनक आहे. मी एक वयस्कर गृहस्थ समजून त्यांच्या बाजूला बसलो होतो. सुरुवातीला त्यांच्याकडे पाहून वाटले नाही ते एवढे शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे असतील. मी त्यांना वृद्ध समजून पटकन दोनदा जागा बदलून दिली. थोड्या वेळा पूर्वीच्या माझ्या नैसर्गिक सौंदर्यात अशी अचानक शिस्त येईल मला वाटले नव्हते. मी मघाशी त्यांना आजोबा म्हणालो ते त्यांना का आवडले नाही हे मला आता कळाली होते. एका उच्चस्थ पदावर तीस वर्ष काम करून सुद्धा या माणसाच्या आयुष्यात किती साधेपणा आहे. आजोबांची बोलण्याची इच्छा पाहून मी ही त्यांच्याशी बोलायला लागलो.

“साहेब तुमची मुलं काय करतात.”

“साहेब नाही....!”

“काका म्हणून हाक मारा मला.”

मी साहेबांचा मान घेण्याइतपत अजून मोठा झालो नाही. साहेब ही फार मोठी पदवी आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला ही पदवी शोभत नाही.

“असो, काय म्हणालात आपण....!”

“तुमची मुलं काय करतात.”

“मला मुलंच नाही.”

वयाची ऐंशी वर्षे ओलांडल्यानंतर सुद्धा काकाच्या बोलण्यात दम होता. अतिशय उत्साहाने प्रसन्नतेने ते बोलत होते. मी मगाशी पासून फक्त ऐकत होतो. काकाजी सारखे बोलत होते. मी विचारलेल्या प्रश्नानंतर त्यांनी लगेच उत्तर दिले. त्यांना मूलबाळ नाही हे ऐकून मी शांतच बसलो. आपण त्यांना उगाच विचारले असे मला वाटले. या वयात नको त्या गोष्टीची विचारपूस करून काकांना उगाच जुन्या आठवणीचे दुःख कशाला असा विचार करून मी थोडावेळ शांतच बसलो. पुढे ते म्हणाले,

“मुलं का नाहीत हे जाणून घेणार का?”

“मी मानेने हो म्हणालो.”

“अहो किती सोपे आहे.”

“मी लग्नच केलं नाही त्यामुळे मुलं झालीच नाही.”

मला पुन्हा एकदा आश्चर्य वाटले. या काकांचे जीवन खुप ध्येयवादी दिसते. यांच्याशी बोलून यांचे जीवन जाणून घ्यायला हरकत नाही. मी त्यांच्याकडे तोंड करून उत्साहाने ऐकू लागलो.

“अहो आर्यन साहेब….!”

“मी लग्न का केले नाही सांगतो.”

“ऐका तुम्ही आता....!”

आम्ही सात भावंडे त्यात पाच बहिणी व दोन भाऊ. मी सर्वात मोठा त्यामुळे बालपणी माझे लाड तर झालेच नाही उलट लहान पणापासून जबाबदारी पडत गेली. घरी वडिलांना त्यांच्या कामात मदत करणे. लहान भावंडांना सांभाळणे. हे सर्व करत करत मी शिक्षण घेत गेलो. मला शालेय वयापासूनच देशसेवेची खूप आवड होती. माझे भारत भूमीवर खूप प्रेम होते. मी भारतभूमीच्या रक्षणासाठी तरुणपणातच वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यामध्ये भरती झालो. कुटुंबातून सर्वांचा यासाठी विरोध होता. मी मोठा असल्याने घराच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या, वडिलांना त्यांच्या व्यवसायात हातभार लावावा असे घरातील सर्वांना वाटायचे. परंतु माझा निश्चय मला रोखू शकला नाही. मी सैन्यामध्ये भरती झालो. मी भरती झाल्यामुळे घरच्यांनी मला खूप विरोध केला. सैन्यामध्ये भरती झाल्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली होती. मी पूर्ण वेळ देशसेवेत घालवत होतो. मला मिळणारे वेतन मी देशाच्या सेवेत शहीद झालेल्या कुटुंबांना दान करत असे. मी गेली तीस वर्ष देश सेवा करत असतांना कधीही सुट्टी घेतली नाही. घरी परत गेलोच नाही. सलग तीस वर्षे सेवा करून निवृत्त झालो. त्यानंतर मी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी केली. बँकेतून मिळणारे वेतन सुद्धा वृद्ध आश्रमाला दान करत होतो. बँकेत वीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालो. आता रिकामे बसून काय करावे या विचारात असतांना मी पेन्शनच्या पैशातून सैन्यभरती अकॅडमी सुरू केली. अनाथ व गरीब मुलांना या अ़कॅडमीत शिक्षण, राहण्याची व्यवस्था सर्व मोफत होते. आता गेल्या दहा वर्षापासून या अकॅडमीत काम करत आहे. मला मिळणाऱ्या पेन्शन मधून व निवृत्तीच्या वेळेस मिळालेल्या फंडातून हे सर्व सुरू आहे. आज पर्यंत कोणाचा एकही रुपया मी घेतलेला नाही. आजपर्यंत माझ्या अकॅडमीतुन अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले व या भारत भूमिच्या रक्षणासाठी सैन्यामध्ये भरती झाले. देशसेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. आपण या भारत भूमीची लेकरं आहोत. त्यामुळे या भारत भूमिसाठी जगाचे व या भारत भूमिसाठी मरायचे. अनेक लेकरं माझा हाच वसा पुढे नेत आहे. याचा मला खूप अभिमान आहे. आयुष्यात यापेक्षा हक्काची व स्वतःची लेकरं आणखीन कोणती पाहिजे. मला आयुष्यात अनेकांचा बाप होता आले. माझ्या वृद्धाश्रमातील अनेक आई-वडिलांचा मुलगा होता आले. “यापेक्षा दुसरे मोठे भाग्य कोणते?” मी एकदम शांतपणे ऐकत होतो. हे सर्व ऐकून माझे कान एकदम बधीर पडले होते. डोळ्यासमोर तर अंधार पडला होता. व मला माझ्या आयुष्यातील अहंकाराची चक्करच आली होती. आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगणारा हा माणूस किती मोठा व महान आहे हे मला आता कळले होते. सुईच्या टोकावर मावेल एवढा सुद्धा अहंकार नसलेला हा माणूस खऱ्या अर्थाने देव आहे. स्वतःचे जीवन स्वावलंबीपणे जगत आजही सेवाभाव जोपासत आहे. मी पटकन सीटवरून उठून त्यांचे पाय धरले व त्यांना बोलू लागलो. आपण खरंच आजोबा, साहेब, काका नाहीत. आपण माणसाच्या रूपातील देव आहात.

“त्यांनी मला थरथरत्या हातांनी उठवले.”

“अहो आर्यन साहेब….!”

“मी देव वगैरे काही नाही.”

“तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस आहे.”

मी शक्यतो प्रवासात येवढे कधीच कुणाला बोलत नाही. माझी जीवनाची ही कथा कुणाला सांगत नाही. तुम्ही तरुण व उच्चशिक्षित आहात. त्यामुळे तुमच्याशी एक मित्र म्हणून बोललो.

“सर आपण खरच देवमाणूस आहात.”

“अहो....! असे भावनिक व्हायचे नाही.”

माणसाला जीवनात अनेक कठोर परीक्षा द्याव्या लागतात. मी पटकन उठून माझ्या जागेवर बसलो. काकांनी मला संदेश दिला.

जीवनात चांगले कर्म करा, आयुष्य जगतांना थोडेसे दुसऱ्यासाठी जगा, अहंकार बाळगू नका, देशाप्रती अभिमान बाळगा.

“हो काका, नक्कीच....!”

तुम्ही सांगितलेल्या या सर्व सूचना मी लक्षात ठेवेल. या सूचनांचा माझ्या आयुष्यात मी नक्कीच वापर करेल. एवढ्या वेळे पासून बोलून थकले असेल म्हणून मी पटकन माझ्या जवळची पाण्याची बॉटल त्यांना देण्यासाठी पुढे केली.

“पाणी आहे माझ्याकडे साहेब....!”

असे म्हणून स्वतः जवळची पाण्याची बॉटल घेऊन त्यांनी दोन घोट पाणी पिले. स्वतःला साहेब म्हणू दिले नाही परंतु मला आदराने ते साहेब म्हणून बोलत होते.

“चला आर्यन साहेब मला उतरावे लागेल.”

“माझे स्टेशन आता काही मिनिटात येईल.”

“त्यांनी त्यांची छोटीशी पिशवी जवळ घेतली.”

“आमच्या परिसरात आले कधी तर या अॅकीडमीला भेट द्यायला.”

“हो नक्की....! काका.”

“मी एक वेळ आवर्जून भेटायला येईल.”

“त्यांनी हात जोडून नमस्कार केला.”

“मी पुन्हा एकदा पटकन त्यांचे दर्शन घेतले.”

त्यांनी माझ्या पाठीवर हात टाकून मला आशीर्वाद दिला. जीवनात जे काय करायचे ते प्रामाणिकपणे करा. तेवढ्यात रेल्वेचा हॉर्न वाजला. गाडी स्लो झाली. हळूहळू गाडी प्लॅटफॉर्मवर जाऊन उभी राहिली. काका हळूहळू उतरणाऱ्या प्रवाशांच्या मागे चालत चालत रेल्वेतून खाली उतरले. स्टेशन वरील प्रवाशांच्या गर्दीत हरवून गेले. मी खिडकीतून त्यांना शोधत होतो तेवढ्यात रेल्वे निघाली सुद्धा. मी खिडकीतून हात बाहेर काढून त्यांना बाय केले. कदाचित त्यांना माझा हात दिसला असेल की नाही हे माहीत नाही. पण आजच्या प्रवासात मला देवमाणूस भेटला हे मात्र नक्की. फुलपाखरं ज्याप्रमाणे बसेल त्या ठिकाणी उडतांना स्वतःचा रंग मागे सोडून जातात. त्या प्रमाणे या अनोळखी गृहस्थाने जातांना मला जगण्याची खूप मोठी प्रेरणा दिली. माझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. असे देवमाणूस सहजासहजी भेटत नाही. आपले नशीब आपल्याला हा देव माणूस भेटला. आज मी प्रवासात खूप भारावून गेलो होतो. रेल्वेने आता खूप स्पीड घेतला होता. खिडकीतून खूप जोरात वारा आत येत होता. मी त्या थंडगार हवेत खिडकीतून बाहेर बघितले. बाहेरच्या निसर्गाच्या सौंदर्यात माझी नजर पुन्हा हरवली. दूरवरच्या झाडांना बघत बघत मी त्यात हरवून गेलो.

✍✍✍✍

© राजेंद्र प्रल्हाद शेळके

    9823425852


Monday, 31 May 2021

लघुकथा:- सांजवेळ

                      लघुकथा:- सांजवेळ

सांजवेळ झाली होती पक्षाने स्वतःच्या घरट्याकडे जायला किलबिलाट सुरू केला होता. पक्ष्यांच्या घरट्याकडे जाण्याची ओढ पाहून हिराला स्वतःच्या घराकडची आठवण झाली. सात महिन्यांचे तान्हे गोंडस बाळ घरी झोक्यात टाकून हिरा जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी दुपारपासूनच आलेली होती. लहानपणा पासून गरिबीचे चटके भोगत, जन्मतः नशिबाने कपाळावर कोरलेल्या भाग्यरेषा आजमावत सुखाच्या दिवसाची वाट पहात हिरा प्रत्येक दिवस घालवत होती. जन्मतः काबाडकष्ट पदरी बांधल्याने ते सोडून तरी कसे चालेल. अशी मनाची समजूत घालत हिरा दिवस-रात्र परिस्थितीशी झुंजत राहायची. लाकडे गोळा करता करता आज जरा जास्त वेळ झाला होता. हिरा आज जंगलात एकटीच होती. कोणी गडीमाणूस सोबत नसला की, बाईच्या जातीला हुरहुर वाटते. कुणी सोबतीला असले की, चार गोष्टी बोलत बोलत वेळ कुठल्या कुठे निघून जातो. मनाच्या  एका कोपऱ्यातील साठलेल्या शब्दांना मोकळ्या हवेत जोडीदारा सोबत वाट मोकळी करुन देता येते. पण आमचे मालक कधीच येत नाही. त्यांना स्वतःच्या मनाशीच कधी बोलु वाटत नाही. तर माझ्या मनासोबत कधी बोलणार. माझ्या पेक्षा त्यांना जास्त दारुची नशा चांगली वाटते. लग्न झाल्यापासुन स्वतःच्या धुंदीत हरवलेल्या या माणसा कडुन आपण तरी का अपेक्षा ठेवायची.  स्वतःच्या मनाची समजुत घालत हिरा शहाणपणाच्या गोष्टी करत करत दुपारपासून गोळा केलेल्या लाकडाची भलीमोठी मोळी डोक्यावर घेऊन घराकडे निघाली.
                          जंगलातील पाऊल वाटेने चालतांना अनवाणी पायाला बोचणाऱ्या दगड, धोंडा, काटेरी झुडपांची खुंटे याची पर्वा न करता, प्रसन्न चेहऱ्याने हिरा चालत होती. लांबसडक, पातळ शरीरबांधा, गोरीपाण कातडी, धारदार नाक-डोळे, चेहर्यावर सूर्याप्रमाणे तेच, सौंदर्याने बहरलेल्या बागेतील जणू ती शेवंतीच वाटत होती. स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान नसणारी हिरा फक्त कपाळावरील कुंकवाला आपले जीवन समजून जगत होती. जंगलातून तडातडा चालत हिरा घरी आली. डोक्यावरील ओझ्याने मान पार आवळुन गेली होती. कपाळावरील घामाचे थेंब ओघळत पुर्ण अंगात शिरले होते. कष्टाचा घाम गळायला पण नशिबच लागतं. सहजासहजी हा घाम कुणाच्या वाटायला येत नाही. ज्याच्या मनगटात कष्ट करण्याची ताकद असते. त्यालाच देव घाम गाळण्याची संधी देतो. अशी मनाची समजुत घालत हिराने डोक्यावरची मोळी अंगणात धाडकन फेकून दिली. अंगावरील लुगड्याच्या पदराने तोंडावरील घाम पुसत हिरा लगबगीने घरात शिरली. एखाद्या नुकत्याच जन्मलेल्या गायीच्या वासराला जशी गाय चुटूचुटू चाटत असते. तसे हिराने पटकन झोपेतील आपल्या लेकराला उचलून घेतले व त्याचे पटापट मुके घेऊ लागली. सांजवेळ झाल्याने बाळ झोपेतून उठून झोक्यातच आपलं मनाशीच खेळत होतं. आता मात्र हिराच्या स्पर्शाने व गालावरील मुक्याने जणू माय लेकराचं पोट भरत होतं. लेकराचा मुका घेतांना आयुष्यातील सर्व दुःख पार पळून गेलं होतं. हिरा लेकराला घेऊन खाली बसणार तेवढ्यात म्हातारी मोठ्याने ओरडली.
“अग पोरी पायावर पाणी घे, दिवसभर कुठे कुठे भटकुन आलीस कुणास ठावूक.”
“लेकराला ठेव खाली बघू आधी....!”
तुला कितींदा सांगितले. बाहेरून आल्यावर पायावर दोन तांबे ओतल्या शिवाय लेकराला घेत जाऊ नकोस....! लेकरांवर कुण्या पाप्याची सावली पडायला नको….!
“बरं....! बरं....! माय.”
आधी पायावर पाणी घेते. तोंडाला पण पाणी लावते. मग माझ्या लेकराला पोटभरून दुध पाजते. दुपारपासून माझं सोनं उपाशी आहे. भुक लागली असेल. पण आपल्या आजीला त्रास नको म्हणून रडत नाही. खुप गुणाचं हाय लेकरू माझं….!
“पाज बाई लेकराला आधी शहाण्या माणसासारखं….!”
“ दुपारपासून शांत बसून तुझी वाट पाहत होतं. माझं तोंड पाहून पाहून कंटाळल असेल बिचारं....!”
माय असं काय बोलतेस. तूच त्याची खरी माय आहे. माझ्यापेक्षा तुच तर त्याला जास्त सांभाळते. सारखं तुझ्याकडेच पाहत राहत बाळ....!
“अग बाई....! लेकराला नुसतं तोंड पाहून नाही जमत.”
त्याला मायेचा पान्हा पाजावा लागतो. लेकराचं पोट तोंड पाहून भरत नाही. त्याला दूध पाजावे लागते. लेकराला पोटभर दूध पाज बघु पहिले.
म्हातारी हिराची सासू होती. पण हिराला स्वतःच्या माय प्रमाणे  जिव्हाळा लावत होती.
                          हिराचे सासरे पावसाळ्यात शेतात जनावरं सांभाळत असतांना वीज पडून वारले होते. म्हातारीने पोटतिडकीने संसार करून सात लेकरं जगवली होती. स्वतःच्या कष्टाच्या हिमतींवर सहा पोरींची लग्न लावून दिली. एकुलता एक लेक लाडाचा पाड करून तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला. लाडाने पोराला कधी परिस्थितीची जाणीव झाली नाही. गावातील पाटलाच्या पोरांसोबत राहून राहून श्रीमंतीचा माज अंगात भरून होता. रोजच गावात उचापती करत बसायचा. रोजच लोकांचे लफडे घरी येऊ लागले. गावात भांडण, अरेरावी यामुळे म्हातारी पोराला कंटाळून गेली होती. म्हातारीला गावातील अनेकांनी, नातलगांनी लग्न करून टाकण्याचे समजावले होते. म्हातारीला वाटले लग्नामुळ तरी पोरगं सुधारेल. नातलगातील पोरगी पाहून महादेवाचे हिरा सोबत लग्न लावून दिले. पिवळी जरत पोर घरात करून आणली. आता तरी महादेवा काही काम धंदा करेल, सोन्यासारखी बायको पाहून तिच्यात रमेल असे म्हातारीला वाटले. पण उलट महादेवा बिनधास्त झाला होता. कामधंदा नाही, घरात लक्ष नाही, दोन टाईम भाकरीचा तुकडा पोटात ढकलायचा आणि दिवसभर गावातील मित्रासोबत दारू ढोसत बसायचा. दिवसभराच्या नशेत धुंद झालेला महादेवा रात्री बडबड करत निपचित पडून झोपी जायचा. नवीन नवीन लग्न झाल्यामुळे हिराला महादेवाचे हे वागणे पटत नव्हते. पण ती म्हातारी व नवऱ्यापुढे काहीच बोलत नसे. आपल्या संसारातील हा धनी आज सुधारेल, उद्या सुधारेल म्हणून ती महादेवाला खूप समजावयाची. त्याच्या पुढे दयावया करून हात जोडून ढसाढसा रडायची. पण दारूच्या आहारी गेलेल्या महादेवाला तिचे रडणे काही समजत नव्हते. बघता बघता हिराच्या लग्नाला चार वर्षे झाली. नवरा घरात काही काम धंदा करत नाही. म्हातारीला आता काम होत नाही. घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतल्याशिवाय पर्याय नाही. याची जाणीव ओळखुन हिरा कंबर कसून कामधंदा करू लागली. जीवाचं रान करून स्वतःचा संसार फुलवू लागली. महादेवाची नशा व शिव्या याची तिला आता सवय झाली होती. म्हातारीला व महादेवाला सांभाळत हिरा घरातील गडीमाणूस झाली होती. संसाराचा गाडा चालवत असतांना महादेवा कधीकधी साथ द्यायला लागला होता. तर कधी कधी येरे मागल्या....! पुन्हा जसेच्या तसे....! दारूच्या नशेत अखंड बुडालेला महादेवा अनेक वेळा दारू सुटण्यासाठी प्रयत्न करायचा. पण दारू आणि मित्र त्याला सोडत नव्हते.
                 आयुष्यातील गरिबी व संसारातील दुःख यात अखंड बुडालेल्या हिराला एक दिवस सुखाचा अकुंर फुटलेला कळालं. हिराला दिवस गेले होते. हीराने सकाळी सकाळी म्हातारीला ही गोड बातमी सांगितली. म्हातारी तर नातवंड होणार या खुशीने देवाचे ऋण मानु लागली. म्हातारीच्या वेगवेगळ्या देवाला केलेल्या नवसाची ही कमाल होती. असे म्हातारीला ठाम वाटायचे. महादेवा तर बायकोला दिवस गेले या खुशीत खूप दारू पिऊ लागला. सकाळी दिवस उगवल्या पासून ते अर्ध्या रात्रीपर्यंत नशेच्या धुंदीत अथांग बुडालेला राहायचा. महादेवाची दारू व नशा हिराला व म्हातारीला नवीन नव्हते. म्हातारीपण महादेवा पेक्षा गर्भावस्थेत हिरावर जास्त लक्ष ठेवून होती. घराण्याला वारस हवा म्हणून म्हातारी पंचक्रोशीतल्या सर्व देवांना नवस करून दमली होती. घरची गरिबी असून सुद्धा म्हातारी हिराला हवे-नको ते बघू लागली. महादेवाच्या नशेमुळे घरात करता पुरुष नसल्यासारखे होते. हिरा दिवसभर शेतात मोल मजुरीला जात होती. एक दिवस देवाने म्हातारीची हाक ऐकली. हिराने सकाळी सकाळी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. नातू झाल्याचा आनंद म्हातारीने गावभर ओरडुन सांगितला. म्हातारा गेल्यापासून म्हातारीच्या चेहऱ्यावरील हरवलेला आनंद आज कितीतरी दिवसांनी पुन्हा झळकला होता. महादेवा तर गावातील मित्रांना घेऊन सकाळपासून आनंदाची नशा करत बसला होता. घरातील बाळाचे सुख हिरा व म्हातारी उपभोगत होती. महादेवा मुलाच्या खुशीत रोजच खूप नशा करू लागला. तोंडावर मिसरूड फुटण्याच्या आधी पासून दारू पिणारा महादेवाचे शरीर दारूमुळे फार चाळणी झाले होते. व्यसणाच्या आहारी गेल्यामुळे क्षणिक आनंद भेटत होता. पण शरीर खराब होत होते हे महादेवाला कळत नव्हते. एकदिवस दारूमुळे महादेवा च्या पोटात सारखे दुखू लागले. महादेवा एका जागेवर पडुन गडाबडा लोळु लागला. शारीरिक व्याधीमुळे सुकलेल्या झाडासारखा महादेवा खूप सुकून गेला होता. गावातील, पंचक्रोशीतील वैद्यांना दाखवुन झाले होते. पण महादेवाला काहीच फरक पडत नव्हता. अंगात रग होती तोपर्यंत महादेवा फार उन्मत्त झाला होता. मारक्या बैला सारखा भेटेल त्याला टक्कर देण्यासाठी सज्ज राहायचा. गोरगरीब लोकांशी दादागिरी करायचा. स्वतःचा बाप देवासारखा मयाळु होता. कधी कुणालाही रुतला नाही. देवासमान माणूस लवकरच देवाघरी गेला. महिन्याभरा पूर्वी पोराच्या जन्माने म्हातारीच्या डोळ्यात दोन सुखाचे क्षण उमटले होते. ते महादेवाच्या आजारापायी आटूण गेले. हिरा व म्हातारी महादेवाच्या व्याधीमुळे खूप दुःखी होत्या. देवाने माझ्याच कपाळावर का असे लिहून ठेवले. देवा तु माझ्या कपाळाच्या कुंकवाच्या का मागे लागलास. हिरा खूप रडून देवाला विचारत होती.
                शेवटी एक दिवस सूर्यनारायण लख्ख प्रकाश घेऊन उगवले होते. पण आज हिराच्या घरात अंधार कोसळला होता. महादेवा म्हातारीला व हिराला सोडून कायमचा निघून गेला होता. स्वतःचा बाप असाच शेतात काबाडकष्ट करतांना लहान लहान लेकरांना सोडून गेलता. महादेवाही पोटच्या पोराला एक महिन्यात पोरका करून गेला. घरातील पुरुष गेल्यामुळे म्हातारी व हिरावर दुःखाचा फार डोंगर कोसळला होता. महादेवाच्या जाण्यामुळे घराची जबाबदारी हिराच्या खांद्यावर आली होती. दिवस-रात्र कष्ट उपसणारी हिरा पोटच्या गोळ्या मध्ये महादेवाला पाहत होती. आता घरातील म्हातारा व महादेवा दोन्ही या लेकरांमध्येच दिसत होते. आयुष्यात याला तरी बापा प्रमाणे वाया जाऊ द्यायचे नाही. असा विचार करत करत हिरा लेकराला पाजत होती. महादेवाच्या आठवणीने तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. जवळ जवळ महादेवाला जाऊन सहा महिने झाले होते. पण हिराला तरीही महादेवाची आठवण सारखी पाठीमागे घेऊन जायची. त्याच्या आठवणीने तिला पाठीमागचे सगळे दिवस आठवायचे. महादेवाच्या आठवणीत हरवलेल्या हिराला पाहून म्हातारीने मोठ्याने आवाज दिला.
“पोरी कुठं हरवलीस किती वेळापासून लेकरू पाजत बसली आहे.”
“लेकरू पिऊन तुझ्या मांडीवर झोपी गेलं आहे.”
“तुझं लक्ष आहे का? त्याच्याकडं....!”
अशा सांजवेळाला लेकरांला झोपू देऊ नये. लेकरू उठल्यावर किरकिर करतं मगं....! म्हातारीच्या आवाजाने हिरा दचकून भानावर आली. पटकन डोळे पुसून लेकराला मांडीवरून उचलून झोक्यात टाकले.
“अहो....!”
“किती आठवणीत हरवते मी तुमच्या....!”
“तुम्हाला आमची आठवण येते की नाही.”
अशी मनाशी पुटपुटत हिरा चुलीकडे निघून गेली.

✍✍✍✍
© राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852


Sunday, 16 May 2021

               मी पणाचा अहंकार....!

माणूस म्हणून जगत असतांना प्रत्येकामध्ये मी पणाचा अहंकार दिसून येतो. माझ्या मुळे हे शक्य झाले, मीच हे केले, मी नसतो तर हे अशक्य होते. अशी अनेक मी पणाचे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. कुटुंबात, शेजारी, मित्रामध्ये, समाजात अशा ठिकाणी मी पणाचा अनुभव आपल्याला येत असतो. मुळात मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याला समाजात राहायला आवडते. तो एकटा जीवन जगू शकत नाही. निसर्गाने त्याला जन्मता समाजशील म्हणूनच जन्माला घातलेले असते. जन्मानंतर त्याचा संबंध आई, डॉक्टर, नर्स, इतर नातेवाईक यांच्याशी लगेच येतो. म्हणजे त्याला समूहाचा लगेच संपर्क येतो. समाजशील जीवन जगतांना माणूस स्वतःच्या जगण्या बरोबरच इतरांच्या जगण्यात सुद्धा मदतगार राहतो. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, या शिवाय शिक्षण, मनोरंजन, आरोग्य  या गरजा भागवत असतांना प्रत्येकाला समूहातील, समाजातील, कुटुंबातील इतरांची मदत घ्यावी लागते. प्रत्येकाला एकमेकांच्या मदतीने स्वतःचे जीवन सुखकर बनवता येते. प्रत्येक मनुष्य स्वतः बरोबर इतरांना मदत करण्यास पुढे येतो. यात काही जण मदत करतात. तर काहीजण मदत करण्यास स्पष्ट नाकारतात. असे का होते, तर त्यांचा मी पणा नडतो. प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीसाठी मी पणा जबाबदार ठरत असतो. आपण इतरांसाठी काही करतो म्हणजेच आपल्या मुळे चांगले घडले हा आपला मी पणाचा अहंकार आहे.
               मुळात या जगात निसर्गाने प्रत्येकाला भरपूर काही दिले आहे. भगवंताने प्रत्येकाला सक्षम बनवून या पृथ्वीतलावर जन्मला घातलेले आहे. या ठिकाणी असणारी प्रत्येक गोष्ट ही निसर्गनिर्मित आहे. निसर्गाने जमीन, हवा, पाणी, ऊन या गोष्टी दिलेल्या आहे. आपण या गोष्टीचा वापर आपल्या गरजांसाठी करतो. यात मात्र मी पणाचा अहंकार स्पष्ट दिसून येतो. आज समाजात मी पणाचा अहंकार मिरवत असणारी अनेक माणसं दिसतात. याच मी पणाच्या अहंकारामुळे समाजात गरीब-श्रीमंत असा भेद करणारे दोन वर्ग निर्माण होतात. मुळात जन्माला येतांना भगवंताने प्रत्येकाला सारखेच बनवून पाठवले आहे. शरीररुपी देह प्रत्येकाचा सारखाच आहे. तरीही माणूस मानवी शरीराचा सुद्धा अहंकार करतो. शरीरभेद, रंगरूप, यांचा सुद्धा माणसं अहंकार करतात. समाजात आज सामाजिक गोष्टी पुढारी पूर्ण करतात. कौटुंबिक गोष्टी कुटुंबप्रमुख पूर्ण करतो. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या अशा अनेक इतर गोष्टी त्या त्या क्षेत्रातील ती ती व्यक्ती पूर्ण करत असतात. या सर्वांचा ते मात्र अहंकार करतात. माझ्या मुळेच सर्वकाही चांगले घडत आहे.
             माणसाला माणसाने केलेली मदत अथवा, अडचणीच्या काळात दिलेला धीर हा उपकार नसून ती एक माणुसकीची भावना आहे. त्यामुळे त्याचा अहंकार केला नाही पाहीजे. मुळात अहंकार हा सर्व सुखाचा नाश करणारा आहे. माणसातील माणुसपण नष्ट करणार आहे. माणसाला कनिष्ठ, हीन लेखणारा आहे. म्हणून प्रत्येकांने अहंकार रहीत वागायला हवे. आज जगात जे काय आहे ते आपले नाही. कारण प्रत्येकाने जन्माला येतांना सोबत काही आणले नव्हते. व जातांना सुद्धा सोबत काही नेणार नाही. जे काय आयुष्यात कमावले, जीवनाला बाह्यपणाची, सुख सुविधेची झालर पांघरली ती एक दिवस येथेच सोडून जावे लागणार आहे. मरतांना सोबत काहीच येत नाही. पैसा, धन, संपत्ती, संतती, मान, सन्मान, ऐश्वर्यसंपन्न जगलेलं आयुष्य, वेगवेगळ्या मानाची पदे काहीही सोबत येत नाही. तरीसुद्धा माणूस या सर्व गोष्टींचा सतत अहंकार करत असतो. त्याच्या वागण्यात, बोलण्यात, त्याच्या जगण्यात, मी पणाचा हा अहंकार सतत दिसून येत असतो. हा मी पणाचा अहंकार माणसाला स्वतःच्या आयुष्यात गुरफटून ठेवतो. मधमाशी ज्याप्रमाणे मधाच्या पोळ्याला सारखी चिटकून राहते. त्याप्रमाणे माणसाला हा चिटकलेला अहंकार शेवटपर्यंत सोडत नाही. म्हणून प्रत्येकाने मी पणाच्या अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. अहंकार विरहीत जीवन आनंदी व सुखदायी असते. संत, महात्म्यांनी कधीच मी पणाचा अहंकार केला नाही. त्यामुळे त्यांचे श्रेष्ठत्व आपल्याला देवासमान वाटते. प्रत्येकाने मी पणाच्या अहंकाराला मागे सोडून आनंदी व सुखदायी जीवन जगायला सुरुवात करूया. मनुष्य जन्माचे श्रेष्ठत्व ओळखून जीवन जगूया.

✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

Friday, 7 May 2021

 कवितेचे शिर्षक:- वेडं मन


मना मनाची गुंफण

कळली नव्हती मला

मन सारखं भटकत होतं

हे कळतच नव्हत मला

आवर घालायची होती

माझ्या वेड्या मनाला

चिंब भिजलेल्या डोळ्यांनी

मन माझं पारखत होतो

असंख्य वेदनातूनही

त्याला सोडवत होतो

अनेक शब्दांचे आघात

मन पेलत होतं

गुरफटलेल्या विचाराला

मन सावरत होतं

स्वप्नातूनही जागवायच होतं

झोपेतूनही उठावायचं होतं

जीवनाच्या वाटेवरती

माझ्या वेड्या मनाला

जगायला शिकवायचं होतं


✍✍✍✍ 

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852


Thursday, 6 May 2021

कवितेचे शिर्षक:- आई

                       कवितेचे शिर्षक:- आई


जिवाच रान करून तिनं सांभाळलं होतं मला

लहानाचं मोठं करता करता भान उरलं नव्हतं तिचं तिला ||

ती उपाशीपोटी राहून घास भरवत होती मला

तिच्या ममतेचा एक एक घोट पाजत होती मला ||

ऊन वारा लागू नये म्हणून ती जपत होती मला

तिच्या मायेचा पदर पसरवत होती माझ्या अंगाला ||

ती रात्रभर जागी राहून झोपवत होती मला

तिच्या प्रेमाचा झोका झुलवत होती सदा ||

नजर लागेल कुणाची आपल्या बाळाला म्हणून

तिच्या आसवांचा ठिपका देत होती माझ्या गालाला ||

कसं विसरून चालेल या थोर माझ्या आईला

जिने जन्मा बरोबर जग दाखविले या जिवाला ||

✍✍✍✍

राजेंद्र शेळके

9823425852


Wednesday, 5 May 2021

कवितेचे शिर्षक:- माझे घर

                 कवितेचे शिर्षक:- माझे घर

दगड मातीचे घर
माझा निवारा होता
सारवलेल्या मातीचा वास
काही वेगळाच होता

दारात टाकलेला सडा
आणी काढलेली रांगोळी
हेच होते घराचे वैभव
दिवा सांयकाळी पाजळी

मातीच्या घरात होती 
सोन्यासारखी माणसं
प्रेम जिव्हाळा आणि विश्वास
यांचा दरवळत होता येथे सुंगध

घराला माझ्या होते 
माणुसकीचे कुंपन
घरी येणाऱ्या प्रत्येकाशी
होत होती नात्यांची गुंफण

घराच्या चार भिंती येथे
चार विश्वासाचे खाब होते
प्रत्येक कुटुंबाचा आदर करणे
असे माझे घर होते.

✍✍✍✍
राजेंद शेळके
9823425852

Tuesday, 4 May 2021

कवितेचे शिर्षक:- शेतकरी

                        कवितेचे शिर्षक:- शेतकरी

दिवसभर उन्हात राब राब राबुन
निघतो कष्टाचा घाम
तेव्हा कुठे मिळतो दाम ||

जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या
पोटात भरवतो घास
त्याला नाही पैशाचा भास ||

शेती त्याची काळी आई
तिच त्याचा जीवप्राण
बाळगतो त्याचा अभिमान ||

दुष्काळ आणि अतिवृष्टी
त्याच्या मागे लागते हातधुन
दरवर्षी तिच कटकट तिच बोंब ||

सरकार आणि पुढारी
देतात कोरडी आश्वासने
मदतीची पुसतात तोंडाला पाने ||

पुन्हा उमेदीने उभा राहतो
करतो अभिमानाने शेती
हा काळ्या आईचा शेतकरी ||

✍✍✍✍
राजेंद शेळके
९८२३४२५८५२

Monday, 3 May 2021

कवितेचे शिर्षक:- जीवनाची पाऊलवाट

                जीवनाची पाऊलवाट


जीवनाच्या वाटेवरती
शोधत होतो प्रकाश
अंधाराला सावरत सावरत
प्रकाशाची पहात होतो वाट....! 

जीवनाच्या वाटेवरती
नव्हते कोणी सोबती
मीच होतो एकटा
मला सावली सोबती....! 

जीवनाचा पाऊल रस्ता
चालून चालून थकलो होतो
पण थकल्या नव्हत्या
अंधारमय पाऊलवाटा....! 

प्रकाश शोधता शोधता
दुःखी झालो होतो मी
पण दुःखी झाला नव्हता
जीवनमय अंधार....! 

जीवनाचा रस्ता संपता
संपला होता अंधार
पण संपली नव्हती
प्रकाशमय जीवनाची पाऊलवाट....! 

✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
9823425852

Sunday, 2 May 2021

क्षणभंगूर जीवन....!

                       क्षणभंगूर जीवन....!

मनुष्य जन्माला येतो तो आनंदाचा क्षण घेऊनच. कुटुंब, नातेवाईक, आई-वडील यांना खूप आनंद होतो. बालपणाचा मन भरून आनंद सगळ्यांना वाटत वाटत माणूस मोठा होतो. स्व ची जाणीव व्हायला लागली की, मनुष्य स्वतःच्या जीवनाविषयी स्वप्न बघायला लागतो. आयुष्य कसे जगायचे? आयुष्य कसे असावे? या विचारात गढून जातो. भविष्याची स्वप्न रंगवत असतो. मुळात जीवन जगतांना परिस्थिती, जात, धर्म, शिक्षण, वातावरण, समाज या गोष्टींचा माणूस विचार करत नाही. असेल त्या परिस्थितीत, असेल त्या ठिकाणी स्वतःचे आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात जीवन जगताना इतर बाधक ठरणारे घटक बाजूला सारून मुक्तपणे जीवन जगता आले पाहिजे. आयुष्यात पुढे काय घडणार आहे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागणार हे माहिती नसते. त्यामुळे सदैव प्रत्येक क्षणाला जगण्याचा आनंद घेतला तर मनुष्य सुखी होईल. आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठी मनुष्य सतत धावाधाव करत असतो. अपेक्षांची ओझी स्वतः तयार करून ठेवतो. व हे अपेक्षांचे ओझे पूर्ण करण्यासाठी मनुष्य सतत काबाडकष्ट करत राहतो. यामध्ये स्वतःचे आयुष्य जगायचे राहून जाते. प्रत्येक जण करत असलेले काम, परिस्थिती, शिक्षण व घराणेशाहीतुन मिळालेले काम प्रत्येक जण करत असतो. स्वतः काबाडकष्ट करत असताना प्रत्येकाने आयुष्यात जगायला शिकावे. आयुष्य हे क्षणभंगुर आहे त्यामुळे ते प्रत्येक क्षणाला जगले पाहिजे. जीवन हे पाण्याच्या बुडबुड्या सारखे आहे. पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल सांगता येत नाही. त्याप्रमाणे आयुष्य कधी संपेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक क्षणाचा मनभरून आनंद घेतला पाहिजे. सुखाचा जरा आपणच निर्माण करत असतो. तो सुखाचा जरा क्षणाक्षणाला उपभोगला तर आयुष्याचे क्षणभंगूर जीवन जगले असे म्हणता येईल. मानसन्मान, प्रतिष्ठा, पद, यासाठी माणूस सतत झटत राहतो. घरदार, संपत्ती, संतती यासाठीसुद्धा झटत राहतो. स्वप्नांचे ओझे आयुष्यभर स्वतःच्या मनाच्या गाभाऱ्यात बंद करून माणुस जगत असतो. आपण या पृथ्वीतलावर एक पाहुणे म्हणून जन्माला आलो आहोत. एक दिवस हे जग सोडून जावे लागणार आहे. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही. परंतु जन्म व मृत्यूच्या मधील काळ मात्र उपभोगण्याचे आपल्या हातात आहे. आयुष्यात सुख-दुःख, यश, अपयश यांची खंत करत न बसता. प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण भरभरून आनंदाने जगला पाहिजे. एक क्षण आपल्या हातात आहे. पुढील क्षण मात्र आपल्या हातात नाही. त्यामुळे चिंता करत न बसता, आहे त्या क्षणाचा आनंद घेऊया. जीवन अनमोल आहे ते आनंदाने घालवूया.

✍✍✍✍✍
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा ता सिंदखेड राजा 
जि बुलढाणा
9823425852

Tuesday, 27 April 2021

कवितेचे शिर्षक:- क्षणभर आयुष्य

                   क्षणभर आयुष्य

गर्व कशाला करतो रे माणसा या नाशिवंत देहाचा

जगुन घे मनसोक्त येथे  लाखमोलाचे जीवन सारे

क्षणभर आयुष्य कधी संपेल नाही याचा भरवसा


दिवस रात्र नुसतीच उठाठेव गरिबी आणि श्रीमंतीची

मनी कशाला बाळगतो या मृगजळाचा गर्व 

निघून जाईल एक दिवस मी पणाचा अहंकार


आयुष्याच्या स्पर्धेत भाग घेतांना कुठवर धावशील जिकांयला

कुठपर्यंत आला काळ आणि वेळ नाही माहित तुला

क्षणात झडप घालून नियती नेईल काढुन प्राणाला


जीवन यात्रा संपताना सोडुन द्यावे लागते येथेच सर्वकाही

आयुष्यातील चांगले कर्म आणि स्वाभिमानाची किर्ती

सोबत घेऊन जातो जो तो आठवणींचा ठेवा


जन्म आणि मृत्यूचा फेरा चुकवावाच लागतो एकदा

जीवनातील आनंद आणि दुखः भोगून घ्यावा लागतो

जगण्यातील क्षणभर आयुष्याचा मरणरुपी विसावा


✍✍✍✍

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852

Monday, 19 April 2021

कवितेचे शिर्षक :- जीवन-मरण

 कवितेचे शिर्षक :- जीवन-मरण 


मरणास सांगा मी, अजून जगणार आहे

आयुष्याच्या वेदनेवरती फुंकर घालणार आहे….!


जन्मा अगोदरच नशिबाने रेखाटले कपाळ येथे

जन्मा बरोबर स्विकारले आईच्या गर्भाचे दुःख येथे

डगमगलो नाही कधी त्या प्रसृती वेदनेने

हसत हसत जन्माला सामोरे आलो

मरणास सांगा मी, अजून जगणार आहे….!


जरी पेरले येथे आयुष्याच्या वाटेत संकटाचे अनेक काटे

याच काट्यावरुन चालतांना दुःख वेचवयास शिकलो

फुलतांना बागडतांना चाहुल ओळखत गेलो

याच जगात आयुष्य जगायला शिकलो

मरणास सांगा मी, अजून जगणार आहे….!


परिस्थिती शिकवत होती मनाच्या घराला

एकदिवस उजाडेल असाही लख्ख प्रकाशाने

दिपुन टाकेल दुःख सारे जीवनाचे

उमटेल लहर आनंदाची श्वासासंगे

मरणास सांगा मी, अजून जगणार आहे….!


आयुष्यातील शेवटचा श्वास घेतांना

जगण्यातील सगळी माया आठवत होती

मरणाचा क्षण जवळ येतांना सुद्धा

मनाची घालमेल जगण्यासाठी सुरु होती

मरणास सांगा मी, अजुन जगणार आहे….!

🙏🙏

राजेंद्र प्रल्हाद शेळके

9823425852


Saturday, 17 April 2021

भय इथले संपेना....!

                 भय इथले संपेना....!

कोरोना महामारीने गेल्या वर्षभरापासून थैमान घातले. जगभराच्या विळख्यात भारत देशही अडकला. भारतात सर्वत्र कोरोनाने आपले बस्तान बसवले. भारतातील महाराष्ट्र या राज्यात कोरोनाने सध्याच्या घडीला आहाकार माजवला आहे. हजारोतील आकडे लाखाच्या जवळपास जाऊन पोहचले आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्र तुरळक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण निघायचे. तरी प्रत्येकाच्या मनात भय होते. मध्यंतरी लसीकरण सुरू झाले. लस आल्यानंतर कोरोना पासून सुटका होईल असे वाटत होते. परंतु लसीकरण सुरू असतांना सुद्धा भय काही कमी झाले नाही. आजच्या घडीला राज्यात दर दिवशी 65 हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. कुठेतरी व्हाट्सअप, फेसबुक, बातम्या, वर्तमानपत्रातून सतत निधनाच्या बातम्या कळतात. यामुळे मनाला अत्यंत वेदना होतात. अतिशय भयानक परिस्थिती असल्याचे भासते.

                        याउलट राज्याचा विचार केला तर जवळजवळ 55 ते 56 हजार लोक दररोज कोरोनावर मात करून घरी सुरक्षित परतत आहे. सरकारी सर्व यंत्रणा, सरकारी दवाखाने, कोवीड सेंटर, खाजगी दवाखाने कोरोना रुग्णांसाठी 24 तास सेवा देत आहे. डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, मेडिकल स्टाफ, दवाखान्यातील कामगार, आपल्या जीवाची बाजी लावून प्रत्येकाचा प्राण वाचवण्यात अतोनात प्रयत्न करत आहे. वास्तविक विचार केला तर, कोरोनाचा मृत्यूदर सरासरी फक्त दोन टक्के आहे. इतर वेळेचा विचार केला तर, अपघात, नैसर्गिक आपत्ती, इतर आजार व आत्महत्या या कारणांनी मृत्यू होतच असतो. परंतु कोरोनाच्या मृत्यूमुळे भय मात्र वाढले आहे. इतर मृत्यूच्या कारणांपेक्षा कोरोनाच्या मृत्यूचे भय प्रत्येक माणसाच्या मनावर ठसले आहे. याचे कारण असे की, सर्व ठिकाणी बातम्यांमध्ये, वर्तमानपत्र, व्हाट्सअप, फेसबुक, गावा गावातील चौकात, मंदिरावर सर्वत्र फक्त कोरोनाच्या बाबतीत भय निर्माण केले जात आहे. वास्तविक पाहता 100 रुग्णांमध्ये 98 रुग्ण बरे होत आहे. फक्त दोन रुग्णांचे निधन होत आहे. या दोन रुग्णांमध्ये सुद्धा इतर आजाराची बाधा आधीपासूनच आहे. 98 रुग्णांपेक्षा 2 रुग्णाची चर्चा आज समाजात सर्रास होतांना दिसत आहे. 98 रुग्ण कोरोनावर मात करत आहे. परंतु त्याची कुठेच चर्चा होत नाही. म्हणूनच इथले भय संपेना...!

                प्रत्येकाने कोरोनावर मात करण्यासाठी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. शक्यतो कामाव्यतिरिक्त घरा बाहेर निघणे टाळावे. सामुदायिक ठिकाणी एकत्र येणे टाळावे. लग्न, समारंभ, अंत्यविधी, धार्मिक कार्यक्रम आदी ठिकाणी गर्दी करणे टाळावे. यामुळे आपोआपच कोरोनाची वाढती साखळी खंडित होईल. कोरोनाचे रुग्ण कमी होतील. ज्या दिवशी कोरोनाचे रुग्ण कमी होतील त्या दिवशी मृत्युचे प्रमाण सुद्धा कमी होईल. कोरोनाचे भय सुद्धा संपेल. आज कोरोना होण्यापेक्षा त्याच्या भयाने अधिक नैराश्याची झालर पांघरलेली आहे. समाजात जीवनमानावर सर्वाधिक कोरोनाचे नैराश्य पसरलेले दिसत आहे. वास्तविक पाहता मनुष्याला जीवन जगतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. मुळात जीवन जगणे हे एक संघर्षच आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे भय मानवाच्या डोक्यात घर करत आहे. आज फक्त प्रत्येकाला कोरोनाचे भय व कोरोना संकट दिसत आहे. प्रत्येकाने त्यातून स्वतःला दूर केले पाहिजे. व कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने व आरोग्य यंत्रणेने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. जन माणूसच या कोरोनाला पळवून लावू शकतो. इतिहासात डोकावून पाहिले तर यापेक्षाही कठीण संकटांना याच मानवाने तोंड दिले आहे. जुन्या काळापेक्षा आज तर विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अत्यंत सुसज्ज व आधुनिक झाली आहे. त्यामुळेच तर 100 पैकी 98 रुग्ण आज बरे होत आहे. फक्त गरज आहे ती प्रत्येकाने नियमांचे पालन करणे धैर्याने या संकटाला सामोरे जाणे. व कोरोनाच्या भयातून मुक्त होणे. प्रत्येकाने स्वतःला सुरक्षित ठेवले व स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची उत्तम काळजी घेतली तर कोरोनाचे भय उरणारच नाही.
 
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु पो किनगाव राजा
ता सिंदखेड राजा
जि बुलढाणा
मो नं 98 23 42 58 52

नवीन वर्ष

  नवीन वर्ष बारा पानांच्या पुस्तकाचे कव्हर बदलले पानं मात्र बाराच प्रत्येक पानांच्या ओळीही सारख्या पानं ही नेहमी सारखीच पण प्रत्येक पानावर स...